त्या अंधार्या राती काय घडले
(उत्तर कोरियातील प्रसिद्ध लेखक मिंग क्यारी स्कू यांनी लिहीलेल्या 'What had happened on that dark night' या अप्रकाशित कथेचा 'त्या अंधार्या रात्री काय घडले' हा मराठीतील स्वैर अनूवाद. (सर्व पात्रे, वातावरण भारतीय आहे.)
उत्तर कोरियातील आत्ताची अंदाधूंद राजकीय परिस्थिती पाहता या कथेचे मूळ हस्तलिखीत हस्तगत करण्यास फार कष्ट करावे लागले.)
म्या नामदेव. आपला शिंप्याचा नाम्या वो. आत्ता कसं वळीखलं. नाय आता ऐकेरी आरे तूरे केल्यानी मानूस कसा जवळचा वाटतो पघा. आपन कापडं शिवतो. तसं आमच झ्याक पैकी दुकान हाय पेठेत. चार मशिनी चालतात दिसभर. दिवाळी मोहरम आसल तर रातभर सुधा काम करतो. आपन सुट पेशालिश्ट हाय. एकलाच हाय सध्या. आजून लगीन झाल नाय म्हनून एकलं म्हनायच. नायतर घरी आई-बा, दोन वडीलभाव, वयन्या, धाकली भन, आन भावांची दोन पोरं हाय.
आमच गाव तस म्हटल तर लहान म्हटल तर मोठ. गावात शाळा, हायस्कूल, सर्कारी दवाखाना हाय. आमदार धर्मा जाधवांच डियेड, बियेड कालेज हाय. पावसाळ्यात बंद र्हानार थेटर हाय. (आनंदा वानी त्यात खतं, ब्या बियानं, धान्य लपवून ठिवतो पावसाळ्यात, आन नंतर ते जास्तीच्या भावान विकतो.) मागल्या काही वर्शात डिस टिवी आल्यापास्न बहूतेक घरांवर डिशा लागल्यात. तालूक्याच्या रस्त्याला, वढ्याच्या पलिकडे नविन बंगल्यांची कालनी उभी राहिली. लोकांकडे पैसा येत असल्याने चार चार चाकी गाड्या हायत. बागायतदार लोक तर स्वताच्या पिकप मधून शेतमाल बाजार समितीत विकाया नेतात.
गावाच्या पश्चिमेला लिंगरूट टेकडीवर खंडोबाच जाग्रूत देवस्थान हाय. माघी महिन्यात पयल्या रईवारी 'देवाची आंगूळ' आसती. त्यावेळी पुर्वेला तालूक्याच्या रस्त्याच्या वढ्यात आसलेल्या 'भेगी' डोहाच पानी लोक कावडीनी आनून देवाची आंगूळ करतात. लय मोठी यात्रा भरते. तिसर्या दिवशी कुस्त्या होत्यात आन रातीला नारायनगावाहून एक दोन तमाशे येतात. समदा गाव उत्साहात आसतो.
आमच्या दुकानी सकाळी बा जातो. सगळी तयारी, काय हाय नाय ते बघतो. त्याच्या कस्टमर चे कपडे कटिंग करतो. कारागिरांना सुचना देवून १२ /१ वाजता घरी येतो. नंतर म्याच दुकानात जातो. म्या पन कपडे कटिंगचे काम करतो. एस वाय ला असेपर्यंत म्या दुकानात लय काय यायचो नाय. दोनवर्शामाग बा म्हनला की 'तुझ्यासाठी स्थळं येत्यात तर जरा पोटापान्याच बघ'. मी या धंद्यात येत नव्हतो. तालूक्याला दोन चार ठिकाणी फुटकळ कारकूनी केली. मन आन खिसा काय भरला नाही. मग म्या दुकानात याया लागलो. बा चा चांगला चालनारा धंदा आन गल्ला बघून खुष झालो आन ईथेच रमलो.
लहानपनापासून बरोबर असणार्या सवंगड्यांचे धंदे पन याच पेठेत आहे त्यामूळे जवा जास काम नसल तस मी त्यांच्या दुकानी जाउन येतो. गेनूच अंबीका-विजय हातर आमच्या दोस्त लोकांचा अड्डा. कोपर्यातलं टेबल म्हंजे बाल्कनीच. रस्त्यावरची ट्रॅपीक थेट नजरेत जाती तेथून.गेना पाटील काय गिर्हाईक नसल तर गल्ला सोडून आमच्यात येतो. बेनं बाकी उधारीला लई पक्क. गप्पा मारतांना उधारीची आठवन देतो प्रत्येकाला. मागच्याच आठवड्याला म्हमद्याला त्याची लय उधारी हाय म्हनून कांदाभजी पन द्येत नव्हता. म्या पन मग त्याची माझ्याकडची मागच्या दिवाळीतल्या कापडाची बाकी उधारीची आठवन दिली तवा त्यान सवताच सगळ्यांना भजी चारली.
दिवसा भेटायचा अड्डा गेनूच हाटेल तर राती गावाभायेर वढ्याच्या काठाला आसलेल मारूतीच मंदिर. राती काम संपल्यावर आमी सगळे दोस्त जेवानखान करूनशान मंदिरात बसतो. सगळे दोस्त लोक आन काही रिकामी मंडळी तिथे असल्यानं गावातल्या बातम्या, आसपासच्या खबरी, कुनाच्या उखाळ्यापाखाळ्या समजत्यात. मानूस बहिस्कृत होतो. नंतर म्या कटाळून घरी मागल्या दारानं झोपायला जातो.
आमच्या बैठकीत लय गमती जमती ऐकायला भेटायच्या. गावातल्या दामूची मुलगी सुगंधा रमेश गॅरेजवाल्याबरोबर कशी पळून गेली, रमेशच्या बापाला नंतर दामूलाच कशे पैसे द्यावे लागले, हप्त्यानं वस्तू देणारे मद्राशी पळून गेल्यावर गावातले कोणकोण पैशे बुडाले म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडत होते, अॅस्टीन डि'काश्टा कडे थकबाकी मागायला बँकेचे वसुलीवाले येवून काय काय बोलत होते, गावात कोनाकडं कोन आजारी हाय, त्याला काय मदत लागती काय आसल्या चांगल्या आन वाईटाच्या सुरस कथा आमच्या बैठकीत सांगीतल्या जायच्या.
आसच मागल्या जून महिन्यात पावसाची झड चालू व्हती. त्याआधी कोरड्या असणार्या नाल्यालापन लय पानी आल व्हत. रातीला पलीकडं मारूती मंदिरात जातांना आम्हा दोस्तांना एकमेकांच्या हातांची साखळी करूनच जाव लागायच. एकडाव तुक्या पाटलानं, "आपन 'त्या' जोकमधल्या साधूंसारख न भिजवता जायच का? ", आस विचारून हासवून सगळ्यांच्या डोळ्यातून पानी काढल व्हत.
गेल्या शनीवारी आमच्या बैठकीतल्या बाब्यानं गेल्या २ तारखेला गावातल्या जाधव सरपंचाच्या पोराच्या लग्नाच्यावेळी दारू पिवून लग्नगावी काय गोंधळ घातला त्ये त्यानं त्याच्या तोंडान सांगीतल. मी म्हनलं, "कारं बाब्या, सोसत न्हाई तर पेत्यो कशाला एवढ?" त्यावर म्हमद्या म्हनाला, "आरं त्याला 'फुकट त्येच पौश्टिक' हेच माहीत हाय नव्ह." बाब्यानं तो ईतर येळेला सवताच्या पैशान पितो याची आठवण करून दिली. त्यानंतर म्हमद्याची आन बाब्याची मारामारीत होणारी वादावादी आम्हाला सोडवावी लागली. दुसर्याच दिवशी ते दोघ गळ्यात गळे टाकून डोलत डोलत बैठकीला आले तव्हा त्यांच्यात काही दुरावा निर्माण झाला नसल्याच आमाला लगेच समजले. बाब्या तर वढ्यात पडून पुरा भिजला व्हता.
त्याच दिवशी येत्या बुधवारी येणार्या गटारी आमूशाला काय करायचं यावर आमची चर्चा झाली. त्यात बाब्याचा पुढाकार होता. तो स्वत: तर रजा टाकून सकाळपासूनच पिनार व्हता. नायतरी तो शाळेत शिपायगीरी कमी आन पेताडगीरीच जास्त करायचा. आमच्या बैठकीत तसे सगळे दारूडे नव्हते. येळप्रसंगी बसणारे माझ्यासारखेच व्हते समदे. त्यामूळ या परसंगाचे आध्यक्षपद बाब्याने कोणी न सांगता घेतल. तो गटारी आमूशाच्या सकाळपासून वेवस्था करणार व्हता. बामणाचा आरुन काही घेत नसल्याने त्याच्यासाठी थंड पेयाची येवस्था केली जाणार व्ह्ती. बाब्या सकाळपासूनच पेताड व्हनार असल्याने सगळ्यांचे ब्रांड, पैशाचा येवहार, चकना, जेवन लक्शात ठेवन्यासाठी आरून आन महिपती त्याच्या मदतीला राहनार व्हते. सगळ्यांनी गोळा केल्येले ५०००/- रूपये आरून कडे दिले.
नंतरचे दोन दिवस माझे तालूक्याच्या गावाला जाने झाल्यामूळे रात्रीच्या कट्याला जाने झाले नाही. त्यामूळे आमच्या गटारीला होनार्या बैठकीची तयारी समजली नाही.
मंडळी, आता दुकानात लय काम पडलेल हाय आन मी तुमच्याशी काय बोलून र्हायलो? तवा मी तुम्हाला उरल्याली गोश्ट आपन परत भ्येटू तवा सांगन. म्या आता जातू. नाततर बा लय कावल.
(क्रमश:)
(मंडळी, मी संपुर्ण कथा वहीत लिहिलेली आहे पण मझ्या कडे जास्त काम आल्याने मी टायपिंग साठी वेळ देऊ शकत नाही. तरी मी आपली नाराजी पत्करत ही कथा दोन भागात लिहीत आहे. मला क्रमशः नाईलाजाने लिहावे लागत आहे.
- पाषाणभेद )
मंडळी, दुसरा भाग टाकला आहे. लगोलग वाचून काढा.
त्या अंधार्या राती काय घडले ( भाग २/२)
त्या अंधार्या राती काय घडले
Book traversal links for त्या अंधार्या राती काय घडले
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येवांद्या
उत्तम कथा
आताच खुलासा करावा लागतोय
मस्त लिहिले आहे !!
वा ! मस्त
सही बे दगडू !!!
पुढचा भाग लवकर वाचवा...म्हणजे लिहा हो..
वा !! मस्तंच
मन:पुर्वक आभार