✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

ट
टर्मीनेटर यांनी
Wed, 06/19/2024 - 20:36  ·  लेख
लेख
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच! कौतुक : सर्वप्रथम बकरी ईदनिमित्त होणाऱ्या कत्तलीपासून तब्बल १२४ बोकडांचा जीव वाचवणाऱ्या 'गुरू संजीव, चिराग जैन आणि त्यांच्या चमूचे' हार्दिक अभिनंदन! मौज : सदर बातमीतील,
"धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले."
वरील वाक्ये वाचून मौज / गंमत वाटली! पवित्र गोमातेचे दर्शन घेणे, धार्मिक विधी / मंगल कार्याच्या प्रसंगी तिला 'गोग्रास' अर्पण करणे, गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र अशा पाच गोष्टींचा समावेश असलेले 'पंचगव्य' प्राशन करणे अशा रूढी / परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. जैन धर्माविषयी मनात आदर आहे आणि जैन धर्मियांचा अवमान् करण्याचा किंचितही हेतु नसला तरी, वरिल प्रमाणे पवित्र 'बकरी दर्शन', गोग्रासाप्रमाणे 'बग्रास', बकरीचे दूध, दही, लेंड्या आणि मूत्र अशा (बकरीच्या दुधापासून तूप तयार करता येत नसल्याने) पाचच्या ऐवजी चार गोष्टींचा समावेश करून तयार केलेले 'चौगव्य' प्राशन करण्याच्या नव्या रूढी / परंपरा जैन धर्मात सुरु होतील कि काय असा एक फाजील विचार मनात येऊन हसूही आले. व्यावहारिक 'चिंता' : बातमीतील पुढची माहिती वाचत असताना सुरुवातीला मनात 'भावनिक' पातळीवर निर्माण झालेल्या कौतुक आणि मौज/गंमत अशा भावना ओसरल्या आणि मेंदूत 'व्यावहारिक' विचारमंथन सुरु झाले. शेळीपालनात एका प्रौढ बोकडासाठी १५ ते २० चौ. फूट जागा बंदिस्त निवाऱ्यासाठी आणि त्याच्या १० पट मोकळी जागा उपलब्ध असणे हि आदर्श परिस्थिती मनाली जाते. त्यावर आधारित १२४ बोकडांसाठी गणित केल्यास किमान अर्धा एकर क्षेत्रफळ आवश्यक असल्याने, लोकवर्गणीतून जमा झालेल्या पंधरा लाखांपैकी जवळपास साडे बारा लाख रुपये खर्चून मंडईतून खरेदी करून आणलेल्या बोकडांना 'मंदिरातील धर्मशाळेचे अंगण आणि विवाहसोहळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्याचे वाचून चमकलो होतो, पण बातमीच्या शेवटी त्यांची रवानगी 'जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये' करण्यात येणार असल्याचे वाचल्यावर हायसे वाटले. “आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती” असे दिल्लीच्या मंडईचे विदारक वर्णन विवेक जैन ह्यांनी बातमीत केले आहे. माझ्या काही मोजक्याच पण अतिशय जवळच्या अशा मुस्लिम मित्रांबरोबर 'हा काय प्रकार असतो' ह्या उत्सुकतेपोटी' बकरी ईदच्या आदल्या दिवशी 'कुर्बानीचे बोकड' खरेदी करण्यासाठी मुंबईतील 'देवनार' आणि कल्याण-भिवंडी रोडवरील 'कोन गाव' अशा दोन 'बकरा मंडी'ना दिलेल्या भेटीत अशी मन विदीर्ण करणारी दृश्ये प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्यांनी केलेले वर्णन अगदी चपखल असल्याचे जाणवले आणि त्यावरून एक गंभीर शंका मनात आली आणि "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी? हा प्रश्न पडला! 'ईद मार्केट' साठी व्यापाऱ्यांनी विक्रीकरीता आणलेले विविध जातींचे, वयाचे आणि हमखास चांगला चांगला भाव मिळवून देतील असे 'खास शारीरिक वैशिष्ठ्यांचे' 'कुर्बानीचे' बोकड हे केवळ त्या त्या तालुका, जिल्हा किंवा राज्यातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणलेले नसून, वेगवेगळ्या राज्यांतील लहानमोठे 'शेळीपालक शेतकरी' आणि व्यावसायिक 'गोट फार्म्स' मधूनही खरेदी केलेले असतात. खरेदी केल्यापासून फारतर आठ-दहा दिवसांत हे बोकड 'हलाल' केले जाणार असल्याने प्राणघातक ठरू शकणाऱ्या काही आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे नियमित 'लसीकरण' झालेले आहे किंवा नाही ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. बकरा मंडीत तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या शेड्समध्ये बांबू आणि शेडनेटचे पार्टीशन्स टाकून शेकड्यांनी तयार केलेल्या चार-पाचशे चौ. फुट आकाराच्या एकेका गाळ्यात, वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून कोंबून आणलेले हे बोकड दाटीवाटीने ठेवलेले असतात. वर म्हंटल्याप्रमाणे हे बोकड आठ-दहा दिवसांत 'हलाल' केले गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. चिराग जैन आणि त्यांच्या टीमने खरेदी केलेले १२४ बोकड हे 'जातिवंत' आणि ज्यांच्या किमती २५ हजारांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असतात असे खास 'ईद मार्केट' साठी तयार केलेले बोकड नसून साधारण एक वर्ष वयाचे, तीस-बत्तीस किलो वजनाचे आणि दोन दातांचे 'रेग्युलर मीट मार्केट' साठी विक्री होणारे 'गावरान' बोकड असल्याचे त्यांच्या 'सरासरी १० हजार रुपये प्रति बोकड' ह्या किमतीवरून सहज लक्षात येतंय. ह्या वाचवलेल्या बोकडांचे नियमित लसीकरण झालेले असेल का? ते झालेले नसल्यास भिन्न वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेल्या असंख्य 'परक्या' बोकडांच्या सहवासात आल्याने त्यांच्यापैकी काहींना किंवा सर्वांना पी.पी.आर. सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगाची लागण/बाधा झाली असेल का? संसर्गजन्य रोग एकवेळ बाजूला ठेऊ, पण बकरा मंडीत बोकड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी त्यांना पसंत पडल्याने बाजूला काढलेल्या अनेक बोकडांमधून एक किंवा त्यापेक्षा जास्तीची निवड करताना त्यांच्या वयाची खात्री पटवण्यासाठी बोकडाचे तोंड धरून दोन बोटे तोंडात खुपसून, जबडा फाकवुन त्याचे दात दाखवले जातात. हि क्रिया वारंवार केली जात असल्याने त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्याच्या बोटांना लागलेली एका बोकडाची लाळ दुसऱ्याच्या जिभेला, दुसऱ्याची तिसऱ्याच्या जिभेला लागणे असे चक्र सुरु राहते आणि त्यातला एक जरी बोकड आजारी/बाधित असेल तर त्याच्या लाळेवाटे अन्य बोकड बाधित होण्याची शक्यताही वाढत जाते. दुर्दैवाने वरीलपैकी काही होऊन त्यांच्यातला एक, अनेक किंवा सर्व बोकड बाधित झाले असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करणे आले नाहीतर "कत्तलीपासून वाचवले, पण आजाराने मेले" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे काही होऊ नये हि सदिच्छा, पण हे पाऊल उचलताना ह्या गोष्टींचा विचार त्यांनी केला होता/असेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या अपडेट्स साठी बातमीचा पाठपुरावा करणे आले! बातमीत म्हंटल्याप्रमाणे ह्या बोकडांची रवानगी गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यांची क्षमता, क्षेत्रफळ, उत्पन्नाचे स्रोत आणि तिथे ह्या बोकडांच्या चारा-पाण्याची काय सोय आहे हे देखील पाहावे लागेल. सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळी/बोकडाच्या आहारासाठी आजघडीला प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. त्याच्या जोडीला त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले मिनरल मिक्श्चर, लिव्हर टॉनिक अशा गोष्टी, जंतांसाठीचे 'डिवर्मिंग', 'नियमित लसीकरण' आणि अन्य पशुवैद्यकीय खर्च, निवाऱ्यासाठी शेड, वीज, पाणी, औषधे आणि देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ ह्यावर होणारा खर्च वेगळा. हे विचारांत घेता ह्या १२४ बोकडांना पोसण्यासाठी, एका बोकडावर प्रतिमाह १००० रुपये असा किमान खर्च गृहीत धरला तर तो जवळपास सव्वा लाख रुपयांच्या घरात भरतो, गणिताच्या सोयीसाठी आपण तो आणखीन कमी करून १ लाख रुपये धरून चालू. ह्या हिशोबाने त्यांच्या एक वर्षाचा खर्च १२ लाख रुपये मात्र. शेळी/बोकडाचा आयुष्यकाल सरासरी १२ ते १५ वर्षांचा असतो, तोही आपण सोयीसाठी कमी करून १० वर्षे गृहीत धरून गणित केल्यास दहा वर्षांत त्यांच्यावर होणारा खर्च १ कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो (ह्यात भविष्यात वरील गोष्टींच्या किमतीत होणारी वाढ धरलेली नाही) हा खर्च भागवण्यासाठी त्या गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांचे स्वतःचे काही उत्पन्नाचे स्रोत असल्यास आनंदच आहे, आणि लोकांकडून देणग्या गोळा करून हा खर्च भागविण्यात येणार असल्यास आनंदी-आनंदच आहे! कोणातरी गुरूच्या सांगण्यावरून आणि आंतरिक उर्मीने लोकवर्गणीतून सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केलेले हे उपयोगशून्य बोकड आणि त्यांना पोसण्यासाठी भविष्यात प्रतिवर्षी खर्च होणाऱ्या जवळपास सव्वा कोटी रुपये अशा एकंदरीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या ह्या अनावश्यक खर्चाचे समर्थन कशाच्या आधारावर करायचे हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. बरे ह्यावर्षी झालाय हा प्रकार इथपर्यंतच मर्यादित राहिला तर एकवेळ ठीक आहे, पण ह्या चिराग जैन आणि मंडळींकडून दरवर्षी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य काही मंडळींनी असे प्रकार सुरु केले तर देशभरात प्रतिवर्षी किती नवीन 'बकरशाळा' उघडतील आणि त्यांवर किती अब्ज रुपये खर्ची पडतील ह्या विचाराने मेंदूला मुंग्या आल्या. असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख

प्रतिक्रिया द्या
28869 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

इकडे मावळ भागात ज्यांची देवी

टर्मीनेटर
Sun, 06/30/2024 - 17:15 नवीन
इकडे मावळ भागात ज्यांची देवी बोल्हाई ते बोकडाचे मटण खात नाहीत.
शेलार आडनाव असलेले माझे एक-दोन मित्र/मैत्रिणी देखील मेढ्याचेच मांस खातात. बोकडाचे मटण खात नाहीत, ते फक्त देवीच्या नेवेद्याला. आणि आमच्या सोसायटीत एक भले मोठे आणि तालेवार गुजराती (कुंभार समाजाचे) कुटुंब रहाते, त्यांच्या देवीला कोंबडीचा नैवेद्य लागतो त्यामुळे ते लोक घरात चिकन शिजवत नाहीत. कोणा कुटुंबियाला तशी इच्छा झाल्यास तो/ती हॉटेलमध्ये जाउन चिकन खातो/खाते. त्यांच्या घरातले रोजच्या जेवणातले सकाळ-संध्याकाळ बोकडाचे मटण आणि मच्छी खाण्याचे प्रमाण पाहिले तर स्वतःला अट्टल मांसाहारी म्हणवुन घेणाऱ्यांचीही बोबडी वळते 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

ऑ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/28/2024 - 12:23 नवीन
>>>> सर्वांचे एकत्रीत गणित केल्यास सर्वसाधारणपणे ३० ते ३२ किलोचा, १० हजार रुपये किमतीत खरेदी केलेला बोकड कापुन विकल्यावर खाटकास १००० ते १२०० रुपये नफा मिळतो. कुर्बानीच्या बोकड्याचं जाऊ द्या पण वरील मताबाबत थोडं थेट प्रत्यक्ष अनुभवाधारित मत येऊ द्यावे असे वाटते. खाटीक जास्तीत जास्त पंधरा किलोचा बोकड़ टांगतो, असा तीस बत्तीस किलोचा बोकड़ टांगतो असे वाटत नाही. असे मटन प्रचंड धोड लागेल, असे निब्बर बोकड़ कधी शिजायचे ? मागील महिन्यात १२ किलोचा बोकड़ आम्ही पार्टीसाठी सहा हजारात घेतला ओळखीच्या शेतकरी माणसाकडुन. हिसाब में झोल हो रहा है... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सरजी, "झोल हिसाब में नहीं, बल्की अपने

टर्मीनेटर
Sun, 06/30/2024 - 16:42 नवीन
हिसाब में झोल हो रहा है...
सरजी, "झोल हिसाब में नहीं, बल्की अपने निजी 'शौक' कि तुलना 'व्यापार' से करनेसे, और 'औसत' वाले उदाहरण को 'पत्थर कि लकीर' मानकर आपकेद्वारा निकाले गये निष्कर्ष/अनुमान/आशंका में हो रहा है..." 😀 'सर्वसाधारणपणे ३० ते ३२ किलोचा, १० हजार रुपये किमतीत खरेदी केलेला बोकड कापुन विकल्यावर खाटकास १००० ते १२०० रुपये नफा मिळतो' हे,
"मार्केटमध्ये मांसासाठी विकला जाणारा एक साधारण बोकड (कुर्बानीचा नव्हे) दहा हजार रुपयांना सरासरी असतो ही माहिती नव्हती. बरेच आश्चर्य वाटले. त्यात विकणेबल मांस किती किलो निघत असेल आणि एकूण रिटेल विक्रेत्यांचे नफ्याचे गणित कसे बसत असेल हा विचार आला."
ह्यातल्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिलेले एक प्रातिनिधिक उदाहरण आहे! मुळात सजीव प्राण्यांशी संबंधित असलेल्या ह्या व्यवसायात, कारखान्यात उत्पादित होणाऱ्या निर्जीव वस्तूंप्रमाणे उत्पादन खर्च आणि विक्रीमूल्य ह्यांचे गणित मांडून अचूक नफानिश्चिती करणे निव्वळ अशक्य असते. त्यात प्रत्येक बोकडाचा (जातीनिहाय) 'ग्रोथ रेट' वेगळा, Feed conversion ratio (FCR) वेगळा, हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, हवामान अशा अनेक गोष्टी प्रभावशाली ठरत असल्याने नफ्याचा एक ठोस आकडा न मिळता सरासरी वर आधारित एक ढोबळ 'रेंज' तेवढी मिळू शकते.
"खाटीक जास्तीत जास्त पंधरा किलोचा बोकड़ टांगतो"
आपल्या वरील विधानातले 'जास्तीत जास्त' हे शब्द काढून "खाटीक पंधरा किलोचा बोकडही टांगतो!" असा बदल केल्यास ते वस्तुनिष्ठ ठरेल. कारण मांसाला कमी मागणी असणारे सोमवार, मंगळवार, गुरुवार तसेच संकष्टी, एकादशी असे उपासाचे दिवस, जास्त मागणी असणारे बुधवार-रविवार, आणि 'छप्परतोड' मागणी असणारे 'गटारी अमावस्या', 'एकतीस डिसेंबर' सारखे 'राष्ट्रीय सण' वगैरे मुद्दे विचारात घेऊन खाटीक पंधरा किलोंचा 'छोट्या चणीचा पण शारीरिक वाढ पुर्ण झालेला' बोकडच काय, (बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध होणारा आणि शेळी पालक व मांसविक्रेता अशा दोघांसठी फायदेशीर ठरणारा) तीस-बत्तीस किलोंचा 'गावरान/क्रॉसब्रीड' तसेच मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले चांगल्या 'ब्रीड'चे उदा. 'बरबरी/उस्मानाबादी/संगमनेरी' असे सरासरी पस्तीस ते चाळीस किलोंचे, 'सिरोही / बीटल' असे सरासरी पन्नास ते साठ किलोंचे बोकडही त्याच्या विक्रीक्षमतेनुसार कापून टांगतो!
"असे मटन प्रचंड धोड लागेल, असे निब्बर बोकड़ कधी शिजायचे ?"
घ्या... म्हणजे, "शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी" 😀 'वजनदार' बोकडांची पैदास करून मांसोत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने देशी शेळ्यांना 'नराचे सरासरी ११४ किलो वजन' हे वैशिष्ट्य असणाऱ्या 'आफ्रिकन बोअर' ह्या विदेशी जातीच्या बोकडाबरोबर 'क्रॉसब्रीड' करणे हि प्रचलित पद्धत आहे. त्यातून ६५ ते ७० किलो वजनाचे बोकड 'तयार' केले जातात. अशा संकरित बोकडाचे मांस चवीस वातड लागते म्हणतात. अर्थात त्यात काही तथ्य नसून, 'विशेष ब्रीड' वर काम करणारे शेळीपालक त्यांच्या अर्थकारणात बाधा यायला नको म्हणून असा अपप्रचार करतात आणि 'ग्राहकांची' अशी तक्रार असल्याचे कारण देत व्यापारी/खाटीक असे बोकड भाव पाडून मागण्यासाठी ह्या अपप्रचाराचा फायदा उठवतात असे त्यांची पैदास करणाऱ्या शेतकरी/शेळी पालकांचे मत आहे, खरे खोटे देव जाणे! वरील मुद्दा हा अपप्रचार नसून त्यात जर खरेच काही तथ्य असेल तर अश्या बोकडांचे मांस धोड/वातड लागत असूही शकेल (स्वानुभव नाही), पण वाताडपणाचा संबंध केवळ बोकडाच्या वजनाशी नसून त्यांच्या वयाशी असतो असे ह्या विषयातल्या तज्ज्ञांचे मत आहे. तसेच मुख्यत्वे पुनरुत्पादनासाठी वापरले जाणारे पैदाशीचे धष्टपुष्ट बोकड (ब्रीडर) हे ठराविक मुदतीनंतर बाजारात विक्रीसाठी येत असतात, अशा सात-आठ वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त वयाच्या बोकडाचे मांस खाण्यात आल्यास ते प्रचंड धोड लागेल ह्यात शंकाच नाही. बाकी 'असे निब्बर बोकड़ कधी शिजायचे' ते शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असेल, कुकरमध्ये ते फारतर २०-२५ मिनिटांत शिजेल किंवा गॅसवर पातेल्यात/टोपात त्यासाठी तास-दीड तासही लागू शकेल आणि चुलीत चांगली फाटी टाकल्यास साधारण तेवढाच वेळ लागेल पण एखाद्याने 'बिरबलाच्या खिचडी' सारख्या गवताच्या काड्या आणि काटक्या टाकून शिजवायचे म्हंटले तर किती तास/दिवस लागतील हे मोजणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे 😀
"मागील महिन्यात १२ किलोचा बोकड़ आम्ही पार्टीसाठी सहा हजारात घेतला ओळखीच्या शेतकरी माणसाकडुन."
जेब्बात! "शौक बहोत बडी चीज होती है..." 👍 त्यामुळे 'चार हजार' किंवा डोक्यावरून पाणी 'साडेचार हजार' रुपयांना मिळू शकणारे 'सात ते नउ महिन्याचे कोकरू' सहा हजारांना खरेदी केलेत तेही 'ओळखीच्या शेतकरी माणसाकडुन' ग्रेट! "हौसेला मोल नसते म्हणतात तेच खरे..." आणि, अशा प्रकारच्या व्यवहारात ग्राहक आणि विक्रेता एकमेकांना गृहीत धरून चालत असल्याने 'ओळखीचा व्यापारी/विक्रेता हमखास लुबाडतो' ह्या अनुभवातून अनेकजण असे व्यवहार करण्याचे टाळतात तेही त्यांच्याजागी योग्यच असल्याची खात्री पटली 😀 जोक्स अपार्ट, असे १२ किलोचे कोकरू हौसे-मौजेचा भाग म्हणून अवाजवी किमतीत विकत घेऊन खाणे वेगळे पण खाटिकाने ते ह्या किमतीला विकत घेऊन त्याला कापून विकायचे म्हटल्यास त्याची अवस्था "नंगा नहाएगा क्या, और निचोडेगा क्या" अशीच होईल की! शरीराची वाढच पूर्ण झाली नसल्याने त्या कोकरापासून अल्पप्रमाणात मिळू शकणारे विक्रीयोग्य मांस अणि अन्य गोष्टी विकुन नफा होणे तर दूरच, पण 'ब्रेक-इव्हन पॉईंटही' गाठता येणे त्याला मुश्किल होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला. गटारी

पॅट्रीक जेड
Sun, 06/30/2024 - 19:08 नवीन
प्रतिसाद आवडला. गटारी अमावस्या नी ३१ डिसेंबरला कधीही मटण खाऊ नये. गाढव नी कुत्रे सर्रास मारून विकले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

बाहेर खाऊ नये म्हणा .... !

नठ्यारा
Sun, 06/30/2024 - 19:49 नवीन
घरी आणून शिजवून खाल्लेलं चालतं. ;-) -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅट्रीक जेड

नमस्कार !

धर्मराजमुटके
Wed, 06/26/2024 - 10:00 नवीन
नमस्कार ! माझ्या प्रतिसादामुळे तुम्ही हा लेख लिहिण्यास प्रेरीत झालात त्यामुळे तो वाचणे क्रमप्राप्तच होते :) प्रतिसादास उशीर झाला त्याबद्दल माफी असावी. ईद च्या दिवशी जगभरात लाखो (कदाचित करोडो) बकरे पाडले जात असतील त्यात १२४ चा आकडा म्हणजे दर्या मे खसखस. मुळात वर्तमानपत्रातील बातमीचे महत्व दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत असायचे. (आता तर बाललीला पाहण्याचे सुख देखील वर्तमानपत्रांच्या नशीबी नाही ते एक असोच) त्यामुळे इतका सखोल विचार करण्याचे कारण नाही. "जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ?" / रामकृष्ण ही आले गेले, त्याविना जग की हे ओसची पडले" या काव्यपंक्तींना स्मरुन आपण पुढे चालावे. मात्र लेखाच्या निमित्ताने आपण आणि आपले वाचक लिहिते झालात, काही प्रमाणात वैचारिक मंथन झाले ही जमेची गोष्ट. वर प्रतिसादांत हलाल (खरेतर हालहाल) आणि झ्टका मांसाचा उल्लेख आला आहे. त्यानिमित्ताने दोन शब्द. हलाल मांस खाण्यामागे काही धार्मिक कारणे देखील आहेत. प्रत्येक प्राण्याच्या मनात काही बरे वाईट विचार चाललेले असतात, इच्छा आकांक्षा वसत असतात. एखाद्याला एका झटक्यात मरण आले तर त्याचे विचार, भावना, इच्छा आकांक्षा त्याच्या जीवातच / आत्म्यातच राहतात. याउलट हळुहळू मृत्यु आला की वरील सर्व भावनांचा निचरा होऊन मरेपर्यंत मनुष्य (प्राणी) अनासक्त होतो आणि पवित्र होतो. मेलेल्याची आसक्ती आपल्या जीवात उतरु नये म्हणून बरेच धर्मात हलाल (पवित्र) मांस खाण्याची प्रथा आहे अशी एक विचारधारा आहे. बौद्ध संप्रदायात देखील पवित्र मांस खायला हरकत नाही असे वाचल्याचे स्मरते. पवित्र मांस म्हणजे तुमच्या खाण्यासाठी त्या जीवाची हत्या झालेली नसली पाहिजे. त्यामुळे नैसर्गिकरित्या मृत्यु पावलेल्या प्राण्याचे मांस, इतर प्राण्यांनी त्यांचे उदरभरणसाठी ठार मारलेले पशू, पक्षी यांचे मासं खाण्याची अनुमती देण्यात आली आहे असे आठवते. बहुधा बुद्धाने (किंवा त्यांच्या नजीकच्या अनुयायाने मुर्दा मांस खाण्याचे समर्थन केल्याचा उल्लेख आढळतो. ( नक्की संदर्भ आठवत नाही पण बाबासाहेबांनी संपादित केलेले आणि इंडोनेशिया किंवा थायलंड येथून प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात याचा उल्लेख मी स्वतः वाचल्याचे स्मरते. पुस्तक नेहमीप्रमाणे मित्राला वाचायला दिल्यावर परत मिळाले नाही.) संदर्भ चुकला असल्यास अगोदरच क्षमाप्रार्थी आहे.
  • Log in or register to post comments

प्रत्येक प्राण्याच्या मनात

पॅट्रीक जेड
Wed, 06/26/2024 - 17:30 नवीन
प्रत्येक प्राण्याच्या मनात काही बरे वाईट विचार चाललेले असतात, इच्छा आकांक्षा वसत असतात. एखाद्याला एका झटक्यात मरण आले तर त्याचे विचार, भावना, इच्छा आकांक्षा त्याच्या जीवात कैच्यकाई. हलाल/कोशर करण्यामागे कारण आहेकी अर्धा गळा चिरल्यावर हृदय पंपिंग करुन भकाभक रक्त बाहेर फेकते. त्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त रक्त बाहेर फेकल्या जाते नी मांस धुवायला जास्त पाणी लागत नाही. तसेच मांस जास्त दिवस टिकते. वाळवंटी टेक्निक. अतिकृरपणा आहे. जनावराचाग गळा चिरणारे त्याचा आत्मा वगैरेचा विचार करत असतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

कैच्यकाई.

धर्मराजमुटके
Wed, 06/26/2024 - 20:09 नवीन
जनावराचाग गळा चिरणारे त्याचा आत्मा वगैरेचा विचार करत असतील? जनावराच्या आत्म्याचा विचार नाही करत हो. स्वतःच्या आत्म्याचा विचार करतात. मारलेल्या जीवाच्या वासना आपल्या शरीरात येऊ नये असा त्याचा मतितार्थ. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅट्रीक जेड

मुळातच त्या विषयात अजिबात रस नाही पण,

टर्मीनेटर
गुरुवार, 06/27/2024 - 14:56 नवीन
मुळातच त्या विषयात अजिबात रस नाही पण,
"प्रत्येक प्राण्याच्या मनात काही बरे वाईट विचार चाललेले असतात, इच्छा आकांक्षा वसत असतात. एखाद्याला एका झटक्यात मरण आले तर त्याचे विचार, भावना, इच्छा आकांक्षा त्याच्या जीवातच / आत्म्यातच राहतात. याउलट हळुहळू मृत्यु आला की वरील सर्व भावनांचा निचरा होऊन मरेपर्यंत मनुष्य (प्राणी) अनासक्त होतो आणि पवित्र होतो. मेलेल्याची आसक्ती आपल्या जीवात उतरु नये म्हणून बरेच धर्मात हलाल (पवित्र) मांस खाण्याची प्रथा आहे अशी एक विचारधारा आहे. "
त्या अट्टाहासामागे अशी काही तात्विक/वैचारीक बैठक असेल असेही कधी वाटले नव्हते. असो... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

जो पर्यंत शास्त्र हे सिद्ध

चौकस२१२
Wed, 06/26/2024 - 16:19 नवीन
जो पर्यंत शास्त्र हे सिद्ध करीत नाही कि हाल हाल मास शरीराला चांगले कि झटका मास तो पर्यंत माझ्य सारख्याला काही फरक पडत नाही फरक कुठे कि हाल हाल अर्थव्यस्थेचा अप्रत्यक्ष दबाव ... त्याला आपली हरकत आहे ... हा "त्रास" येथे जाणवत नाही कारण बहुतेक मास झटका असते फक्त बोकड / शेळी चे मास मुख्य प्रभावात नसल्याने ते हाल हाल वालय खाटीका कडून घावे लागते . य याउलट भारतात जर छोटया गावात असतो तर कदाचित हाल हाल ची जास्त अप्रत्यक्ष सक्ती होते म्हणजे असे कि मला आठवते त्या प्रमाणे निम शहरी खाटीक खाण्यात मुसलमान खाटीकचा जास्त असल्याने मास त्यांच्या कडूनच घयावे लागायचे ...
  • Log in or register to post comments

फरिदाबादमधले खाटिक मराठी आहेत.

चित्रगुप्त
Wed, 06/26/2024 - 22:08 नवीन
निम शहरी खाटीक खाण्यात मुसलमान खाटीकचा जास्त असल्याने
-- गंमत वा आश्चर्य म्हणजे आम्ही जिथे तीस वर्षे रहात होतो, त्या फरिदाबाद (ओल्ड) मधील 'मीट वाली गली' मधले खाटिक हे चक्क 'मराठी' होते/आहेत. आमचे एक मराठी प्रोफेसर होते, त्यांना हा शोध लागला होता. त्या गल्लीतून मुख्य बाजारात जायचा शॉर्टकट असल्याने ते तिथून कधीकधी जायचे. एका खाटिकाच्या दुकानावरच्या पाटीवर काहीतरी नाव मराठी आडनाव दिसले म्हणून त्यांनी चवकशी केली. तिथे एक अगदी म्हातारा माणूस बसला होता, त्याच्याकडून समजले की पानिपताहून जीव वाचवून निघाल्यावर काही मराठी लोक फरिदाबदमधे स्थायिक झाले, त्यापैकी हे सगळे खाटीक आहेत. अर्थातच त्यांच्या आताच्या पिढीला मराठी भाषा वगैरे काहीच येत नाही. (कदाचित कुणाच्या घरी छत्रपतींचे चित्र, विठोबा, गणपती वगैरे असूही शकते) मला तिकडून जाणेही नकोसे होत असल्याने मी कधी विचारपूस केली नाही.
  • Log in or register to post comments

आपल्या अवांतर माहितीमुळे

रामचंद्र
Wed, 06/26/2024 - 23:06 नवीन
आपल्या अवांतर माहितीमुळे तिथल्या स्थानिक इतिहासाचा हा एक मानवी पैलू समोर आला. ते लोक कदाचित होळकरांच्या फौजेतील धनगर मावळ्यांचे वंशज असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

रोचक माहिती आहे!

टर्मीनेटर
गुरुवार, 06/27/2024 - 14:49 नवीन
रोचक माहिती आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हलाल करणे == हालहाल करून मारणे

कांदा लिंबू
गुरुवार, 06/27/2024 - 20:27 नवीन
खाद्य प्राण्याला एका झटक्यात मारून टाकणे हे त्याच्यावर कमीत कमी अत्याचार करणे आहे. हलाल हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. हलाल करणे == हालहाल करून मारणे All else is confusion.
  • Log in or register to post comments

टर्मी भौ,

कांदा लिंबू
गुरुवार, 06/27/2024 - 20:28 नवीन
टर्मी भौ, तुम्ही शेळ्या-बोकडांचा धंदा कराच. जम बसल्यावर मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

छान चर्चा. मी लहान असताना

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/27/2024 - 23:39 नवीन
छान चर्चा. मी लहान असताना घराजवळच राहणाऱ्या काकूंनी बकऱ्या पाळल्या होत्या. एक बकरी काहीतरी आजाराने अंथरुणाला खिळली. म्हणजे जमिनीवरच एका बाजूला पडून राहिली. तिला उठताही येईना. खूपच आजारी पडल्यावर म्हणजे फक्त डोळ्यांची हालचाल होत होती तेव्हा काकूंनी खाटीक बोलावला. तो सुरा घेऊन उभाच होता. पण “दर” ठरत नव्हता. चर्चेचं गुर्हाळ चालूच राहिल नी बकरीने जीव सोडला. खाटीक बकरी तशीच सोडून निघून गेला. थोड्या पैशासाठी काकूंनी डील गमावली. त्याने आधी “हलाल” केलं असतं नी नंतर चर्चा केली असती तर नसतं का चाललं?? लहानपणी नाशकात मी मटण आणायला गेलो होतो कुणासोबत तरी, तिथे एक गोंडस कोकरू अर्धा गळा चिरुन सोडलं, पाय बांधले होते, चित्रविचित्र आवाज काढून ते मृत्यु पावलं. त्या नंतर बरेच दिवस मला नॉनव्हेज खाल्ल गेलं नाही. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ते खरच सुखी आहेत. आमच्या इकडे बहुतेक बिजासनी देवी(?) नी इतर देवींना बोकड बळी चढवतात. बळी झटका पद्धतीने असल्याने हिंदू खाटीक असतात. ते पैसे घेऊन बोकड मारतात नी मुंडके स्वतः नेतात. पण ह्यात ते चलाखी करतात. बोकड मरताना ते अश्या पधतीने मारतात की मानेचा जास्तीत जास्त भाग त्यांच्याकडे यावा. म्हणजे डोक्याचा बाजूने न मारता धडाच्या बाजूने तलवार झटदिशी मारतात. त्यामुळे दोन चार किलो मटणाचा त्यांचा फायदा होतो. काही लोक लक्ष ठेऊन त्यांना निशाणी आखून देतात नी तिथेच तलवार किंवा मोठा चाकू मरायला सांगतात. माझ्या एका नातेवाईकाने रिसेंटलिच बीजासनी देवीला बोकड बळी न देता फक्त थोडासा कान कापून, रक्त शिंपडून सोडून दिला. मागे केरळात महापूर (२०१७-१८ दरम्यान) आल्यावर तिथले व्यापारी कोल्हापूर भागातून ट्रका भरून बोकड घेऊन गेले. त्यामुळे कोल्हापूर भागात अचानक बोकडटंचाई झाल्याने भाव वाढले नी दुकानदार व ग्राहकात चकमकी झडू लागल्या. शेवटी शासनाने ६०० की ७०० रुपये दर ठरवून दिले. नागपूरहून विमानभरून सौदीला जाणारे बोकड मेनका गांधींनी अडवले. ह्या बद्दल मटणप प्रेमीनी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. नाहीतर बोकडाचे मटण आता २००० रुपये किलो असते. जर सतत विमाने जाऊ लागली असती तर…. राजदेहेर की काळडेहेर कुठल्यातरी नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यावर वर जाणाऱ्या पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून उडवल्या होत्या. आता त्या किल्ल्यावर जायला फक्त एक शिडी आहे. गावातल्या कुणीतरी शक्कल लावून वर बकऱ्या सोडल्या. फक्त विकायवही असेल तरच खाली आणतो. वर चारा पाणी निवारा सोय आहे. बकऱ्या किल्ल्यावरून उडी मारत नाहीत. नी ह्याला निगा राखायची गरज नाही. आता इतकंच. येतो. - अमरेंद्र बाहुबली (भूतदयाळू)
  • Log in or register to post comments

काय मजा आली वाचून!

हणमंतअण्णा शंक…
Sat, 06/29/2024 - 03:40 नवीन
सो फकिंग इंट्रेस्टिंग!! आपल्या फडात बराच माल दिसतोय! येऊ द्या येऊ द्या!! प्लीज येऊ द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपल्या फडात बराच माल दिसतोय!

टर्मीनेटर
Sun, 06/30/2024 - 16:54 नवीन
आपल्या फडात बराच माल दिसतोय! येऊ द्या येऊ द्या!! प्लीज येऊ द्या!
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

छान लिहिते राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/29/2024 - 09:08 नवीन
मस्त अनुभव. बोकड, कोंबड्या, जीवंत मासे, डोळ्यासमोर मोठ्या सूरीने कापतांना मनात लैच दयाळुभाव निर्माण होतो खाण्याची इच्छा मरून जाते. आपल्या डोळ्यासमोर ते उघडे डोळे, ती तडफड, शीट.. डोळ्यासमोर नकोच ते. बोकडच्या ऐवजी पाठ ( बकरी) मटन चांगलं लागत नाही म्हणून आपल्या डोळ्यासमोर कापलेले पाहिजे, पाठ राहिली तर, बोकड्याची आंडं खाटीक बदलतो, त्याला लावून बोकड़ मटन विकतांना पाहिलेले आहे, सगळी दृश्य डोळ्यासमोर येतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चिंबोऱ्यांचं आजूनंच वेगळं ....

नठ्यारा
Sat, 06/29/2024 - 19:13 नवीन
कोंबडी स्वत: मारून खाल्लीये. अनेकदा बोकड कापतांना बघितलाय व नंतर बिर्याणीवर ताव मारलाय. पण खरं वाईट वाटतं ते चिंबोऱ्यांचं. ते बिचारे खेकडे मरंतच नाहीत. अगदी कवच उपटून काढलं तरीही जिवंत असतात. शेवटी जिवंतपणीच शिजायला टाकले जातात. पण खायला मजा येते. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीव आणि प्राण हे वेगवेगळे असतात का ? आधी जीव जातो की प्राण ?

चित्रगुप्त
Sat, 06/29/2024 - 21:11 नवीन
तो तिचा 'जीव की प्राण' होता... जीव गेला पण प्राण गेला नाही ... वगैरेंमधून 'जीव' आणि 'प्राण' हे वेगवेगळे असावेतसे दिसते. यांचा नेमका अर्थ कुणी उलगडून सांगेल काय ? ज्यांनी बोकड वगैरेंना हलाल पद्धतीने मारताना बघितले आहे, त्यांना तो प्राणी मरताना असे काही लक्षात आले का ? आधी जीव जातो की प्राण ? याशिवाय 'आत्मा' नावाची भानगडही आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

"यंग गोट"

चौकस२१२
Mon, 07/01/2024 - 06:39 नवीन
हो सहमत , येथे "यंग गोट" तसा महाग विकला जातो या शिवावय शरीरातील कोणता तुकडा यावर पण निबर आणि कोणता लुसलुशीत हे अवलंबून असते उदाहरण खांदा हा जरा निबर तर त्या मागील "रॅक" जास्त लुसलुशीत कोंबडी म्हणाल तर खालील प्रमाणे सर्वात लुसलुशीत = टेंडरलॉइन सर्वात " भरपूर मास" = ब्रेस्ट पण ते जास्त निबर होते त्यापेक्षा , थाय जास्त चविष्ट
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा