सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख - काव्यानुभव

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जे न देखे रवी...
20 Jun 2021 - 4:06 pm

प्रारंभः
मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे.
सुखाचा शोध तसा सामान्यतः सुखकर नसतो. समाजमान्य सुखं आपल्याला प्राप्त झाली किंवा आपल्याला ती प्राप्त झाली आहेत असं समाजमान्य झालं, तरीही आपण नक्की सुखी आहोत का हा प्रश्न अनेकांच्या जीवनात सुटलेला नसतो. काही लोकांची तर इतकी पक्की धारणा झालेली असते की आपलं काय कोणाचाच जीवन हे सुखासाठी नसतं. सुखाची कसोटी काय? सुखांचे किती प्रकार आहेत? त्यातले आपल्याला किती प्राप्त व्हावेत? त्यातलं सर्वश्रेष्ठ असं सुख कोणतं? आपण त्याच्या मागे किती धावावं? आपण कुठं थांबावं? आपण लौकिक अर्थाने सुखी असावं की खर्‍या अर्थानं सुखी असावं? आपण इतरांकरिता सुख निर्माण करावं की इतरांनी निर्माण केलेलं सुख आपण भोगत राहावं? फार जास्त काळ जास्त सुखी राहील्यामुळे आपली सुखी असल्याची भावना बोथट झाली आहे का? आपण सुखी झालो तर इतरांच्या दुःखांबद्दल आपण विचार करावा का? कितपत विचार करावा? जीवनाची जी भिन्नभिन्न सर्वोच्च उद्दिष्टे अनेक महान लोकांनी सांगितली आहेत, त्यांचा मार्ग कष्टप्रद जरी असला तरीही त्यांचं अंतिम उद्दिष्ट पुन्हा सुखच आहे का?
आनंद हा क्षणिक असतो. सुख या शब्दाला एक कालविस्तार आहे. आपण फार तर फार 1-2 तास आनंदी असतो, पण वर्षानुवर्ष सुखी असल्याचे वर्णन सांगितलं जातं.
मी इथे एका अभंगाची लिंक देत आहे. तो अभंग शांतपणे ऐका. तुम्ही स्वतः सुखी असाल वा नसाल, तुम्हाला सुखाची प्रचिती येत असेल व नसेल, तुम्हाला आपल्या स्वतःच्या सुखाची अभिव्यक्ती करता येत असेल व नसेल, इतरांच्या सुखाची जाणीव होत असेल व नसेल, खालील अभंग ऐकताना तुम्हाला नक्कीच अभंगकाराच्या सुखमग्नतेची तीव्र प्रचिती येईल. या गाण्यामध्ये गायिकेनं त्याच त्याच शब्दांची जी वारंवार आवर्तनं घेतली आहेत, ती श्रोत्यांच्या कानांना अत्यंत सुखकर आहेत, इतकं नक्कीच.

गाणं
Https://www.youtube.com/watch?v=09nV1Ozmeqc
==
भाग १:
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख ।
पाहता ही भूक, तहान गेली ॥१॥
-
मनुष्य ज्याला सुख म्हणतो त्या प्रत्येक सुखाच्या अनेक मर्यादा आहेत. त्यांचे अनेक कंगोरे आहेत. त्यांच्या अनेक उणीवा आणि त्रुटी आहेत. कदाचित जे आपलं सुख आहे ते इतर कोणाचं दुःख असू शकतं. आपलं सुख सुख आहे अशी आपली धारणाच चुकीची असू शकते. काही लोकांना तर इतरांच्या जीवनात दुःख निर्माण करण्यातच सुख मिळतं. इतकंच काय, अनेकांना विकृती देखील सुख देऊन जातात. माणसाच्या सुखाचं काय सांगावं! परंतु या सर्व सुखांनीच ज्या सुखाला सुख मानलं आहे, सुखांचं सुख, ते मात्र खरं असावं आणि ते परिशुद्ध आनंद देऊन जात असावं. नामदेवांनी ते सुख कोणतं ते सांगण्याऐवजी ते सुख उत्पन्न करणारी घटना कोणती ते सांगितली आहे. लीन आणि भक्तीपूर्ण मार्गानं झालेलं ईश्वराचे दर्शन! इथे ईश्वर म्हणजे तो ब्रह्मांडाच्या केंद्रस्थ असा ईश्वर आणि भेट म्हणजे त्याची व्यक्तिगत मुलाखत असं अजिबात अभिप्रेत नाही. ईश्वराच्या मूर्तीचे दर्शन, किंवा ईश्वराच्या नामस्मरणाने झालेलं त्याचं मानसिक दर्शन इतकंच अभिप्रेत आहे.
मनुष्य म्हणजे गरजांची एक यादी आहे. जे जे काही दिसत आहे, दिसलं आहे, दिसणार आहे ती प्रत्येक गोष्ट त्याला हवी आहे, प्रचंड प्रमाणात हवी आहे, आणि सार्वभौम हक्कांनी हवी आहे. गरजांची ही भूक किंवा तहान मिटणं या जन्मी तरी शक्य दिसत नाही. या गरजा पूर्ण करण्याकरता जीवनभर सैरभैर धावत राहणे हाच सामान्य मनुष्यधर्म आहे. या गरजा भागवणं तर शक्य दिसत नाही परंतु या गरजाच नष्ट झाल्या आहेत अशी भावना कशी असेल? अशी भावना कशी उत्पन्न होत असेल? इथे नामदेव ईश्वरानुभूतीचा मार्ग सांगतात.

==
भाग २:
भेटली, भेटली, विठाई माऊली ।
वासना निवाली, जिवातील ॥२॥
-
मनुष्याच्या भौतिक देहाच्या गरजा भागल्यानंतर किंवा नष्ट झाल्यानं काम पूर्ण होत नाही. त्याचं जे सूक्ष्म अस्तित्व आहे, मन आहे, प्राण आहे, चित्त आहे, जीव आहे, आत्मा आहे, त्यांच्या गरजा देखील माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. ईश्वराला नुसतं भेटून काय प्राप्त होणार आहे? त्याची विशेष कृपादृष्टी होऊन देखील काय प्राप्त होणार आहे? अनंत अस्तित्वातील आत्म्याचा जो अनंत कालीन प्रवास आहे, त्यातले काही टप्पे ईश्वरांनं तातडीने पार पाडून दिले, तरीही त्याचा पुढे काय उपयोग आहे? तीच अस्वस्थता, तीच अशांतता, तीच खळबळ, तीच अप्राप्तिची भावना, हे सगळं अंतापर्यंत बाळगायचं आहे का? आत्म्याच्या या भावनांबद्दल ईश्वराला कोणतीही ढवळाढवळ करायची नाहीय. अशाप्रकारची ढवळाढवळ केली तर मग या ब्रह्मांडाच्या असण्याची मज्जाच काय उरली?
हे जे काही करायचं आहे, ते स्वशक्तीने करायचं आहे, स्वेच्छेने करायचं आहे. नामदेवांना ते करता आलं आहे. ढोबळमानाने, पहिल्यांदा देव भेटतो, पावतो, कळतो, तेव्हा तो एक प्रश्न असतो. तिथे सुखाच्या भावनेपेक्षा त्याच्याबद्दलचे आणि स्वतःबद्दलचे संदेह जास्त असतात. देव जसा कसा आहे, किंवा जसा कसा मानायचा आहे, किंवा कोणत्या प्रकारे तो हे जग चालवतो, त्याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न चिकित्सा या अर्थाने असतात, आणि नंतर बराच काळ ते तक्रारी आणि मतभेद या अर्थाने असतात. एका प्रदीर्घ कालावधीनंतर संतांना ईश्वराचं दुसरं दर्शन घडतं. इथे आपल्याला ईश्वरानं स्वतःला कसल्या प्रकारचे जीवन दिलं आहे, आणि इतरांच्या वाट्याला काय काय दिलं आहे, का दिलं आहे, हे गौण ठरवण्याइतकी परिपक्वता आलेली असते. म्हणून इथे नामदेवांनी दोनदा भेटली असं म्हटलं आहे.
भूक आणि वासना या संज्ञांमध्ये एक फरक आहे. भूक ही नैसर्गिक प्रेरणेने असते. वासना ही अंतःप्रेरणेने असते. विषयसुख प्राप्त झालं की भूक तात्पुरती का होईना मिटते. वासना कदाचित मिटण्याकरता नसतेच. अशी वासना शांत झाली, तिच्यातली आग नष्ट झाली, तर आनंदाची भावना होईल तिचे वर्णन काय सांगावे? हे सगळं स्वतःच्या पुढाकाराने करता आलं, स्वतःच्या प्रयत्नानं करता आलं, सर्वसामान्य समाजामध्ये रहात असताना करता आलं, आणि ईश्वराची कोणतीही विशेष सहायता नसताना करता आलं तर सर्वश्रेष्ठ अशा सुखाची भावना का होणार नाही?

==
भाग ३:
चंद्रासी चकोर, मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर, आनंदाचा ॥३॥
-
चकोर पक्षी चंद्राचे चांदणे पिऊन जिवंत राहतो अशी कवीविश्वामध्ये मान्यता आहे. रात्रभर तो एकटक चंद्राकडे पहात असतो. त्याला वियोगी प्रेमाचं प्रतीक मानलं आहे कारण रात्रभर चंद्राकडे पहात असताना आपल्याला त्याची कधीच प्राप्ती होणार नाही याची जाणीव चकोराला असते असं मानतात. अमावस्येच्या रात्री नंतर पुनश्च चंद्राशी भेट होताना चकोराला होणारा आनंद अद्वितीय असतो असं अनेक काव्यांमध्ये वर्णन आहे. मनुष्य देखील जी गोष्ट त्याला खूप सुख देऊन जाते तिची वारंवार आठवण करतो, आणि ती प्रत्यक्ष असेल तर तिच्याकडे पहात राहतो. तरुण वयामध्ये तथाकथित असुंदर तरुण (तरुणी तर असोतच...) देखील स्वतःला कितीतरी वेळ आरशात न्याहाळत असतो.

मोरही तसाच पाऊस आला आहे, त्याचा सृजनकाल आला आहे, ढग दाटून पाऊस आले आहेत, मादीशी आपला समागम होणार आहे
म्हणून नृत्य करतो. त्याला त्याचा आत्यंतिक आनंद झालेला असतो. संशोधन तर असं सांगतं की बऱ्याच पक्षांना संगीत कळतं आणि ते त्याच्या तालावर नाचू शकतात. नाच करायला माणसाला अंग आणि मन हे दोन्ही खूप सैल सोडावं लागतं. अंग आखडून केलेलं उत्तम नृत्य देखील मनाला भावत नाही, आणि ज्याला नृत्यामध्ये अजिबात गती नाही, अशा व्यक्तीने नृत्याच्या नावाने वेडेवाकडे अंगविक्षेप केले तरीही ते नाच म्हणून चालून जातात. म्हणून बऱ्याच लोकांनी अख्या जीवनात फक्त एख्खादे वेळेस नाच केलेला असतो, मग तो भजनात वा लग्नात का करावा लागलेला असेना. त्यांना पुन्हा तशी उर्मी येत नाही. कारण अशा लोकांना नामदेव सांगतात तसा सुखाचा भर जवळजवळ कधी येतच नाही.
माणसाला आपल्याला सुख कशानं प्राप्त होतं, कुठं प्राप्त होतं, कुणामुळं प्राप्त होतं, किती प्राप्त होतं हे थोडं अभ्यासलं पाहिजे. असं सुख मिळालं तेव्हा आपण नैसर्गिक रित्या काय करतो, आपलं शरीर काय करतं, आपण ते व्यक्त करतो का लगेच डब्यात बंद करून ठेवतो, ते आपण अंगावर कसे घेतो, ते लोकांना कसं दाखवतो, कसं सांगतो हे पाहायला पहिजे. बाकीचे लोक त्यांना सुख मिळाल्यावर काय करतात हे बघून कॉपी करायला पहिजे.

सुख हे एका क्षणात करता नसतं. एखाद्या समारंभामध्ये आपला जाहीर सत्कार होतो तेव्हा एक मिनिट टाळ्या मिळवण्याकरता अखंड जीवन वाया घालवू नये. श्रोत्यांमध्ये बरेच लोक टाळ्या वाजवत नाहीत. बरेच लोक इतर टाळ्या वाजवताना पाहून टाळ्या वाजवणे चालू करतात, आणि टाळ्यांचा नाद जसाजसा कमी होतो तसे ते आपल्या टाळ्या आधी बंद करतात. तुमच्या आनंदाशी खऱ्या अर्थाने जोडलेल्या झालेल्या लोकांची संख्या फार कमी असते. म्हणून काटेरी आणि दुःखमय मार्गाने क्षणभंगुर सुख प्राप्त करण्याकरता, खोटी कीर्ती प्राप्त करण्याकरता, जगाला दाखवण्याकरता आयुष्य खडतर करून घेऊ नये. जे सुख स्वतःला सुख वाटेल अशाच सुखाचा मार्ग निवडावा पण आधेमधे थोडं प्रबोधन करून घ्यावं.

एका अर्थानं या जगातलं प्रत्येक सुख परमात्म्याने फुकट निर्माण करून ठेवलं आहे. त्याच्याने मन भागत नाही म्हणून, अजून जास्त सुख मिळावं म्हणून, जास्त प्रकारचं सुख मिळावं म्हणून, अजून जास्त प्रमाणात सुख मिळावं म्हणून, माणसानं अनेक समाजविधा बनवून ठेवल्या आहेत. परंतु त्यांचा मूळ उद्देश विसरून आपण सारे त्यांच्या खोट्या शास्त्रांचे, प्रथांचे, विधींचे अनुसरण करत आहोत. अर्थातच याचा परिणाम म्हणून खरं नि सातत्यशील सुख हे एक मृगजळ बनून राहिलं आहे. एका अर्थानं आपल्या पारंपारिक आणि आधुनिक व्यवस्थांच्या धुरिणांनी लोकांच्या वैयक्तिक सुखाचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. वैज्ञानिक आणि इंजिनियर्स प्रत्येक गोष्टीमागे निसर्गाचे नियम शोधत बसतात, विश्वाच्या भौतिक आणि अधिभौतिक स्वरूपाचं संपूर्ण आकलन करत बसतात. अर्थशास्त्रज्ञ आणि अकाउंटंट प्रत्येक गोष्टीत व्यवहार पाहतात आणि हिशेब लिहीत बसतात. न्यायाधीश आणि वकील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा कीस पाडत बसतात. राजकारणी आणि प्रशासक मानवाच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल एक व्यवस्था निर्माण करत असतात. व्यावसायिकांना आणि निवेशकांना जगाची सगळी संपत्ती आपल्या नावानं करून घ्यायचा एकच ध्यास अहर्निश पडलेला असतो. या लोकांना त्यांच्या आनंदाची परिभाषा त्यांच्या या क्षेत्रांमधील प्रगतीच्या बाहेर करताच येत नाही. आणि कळस म्हणजे हे घोर अज्ञानी लोक ज्या लोकांना निरागसपणानं, प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं, लहरीपणानं, गंभीर न बनता, अज्ञानानं, विनोदानं, हलकंसं दुष्टपणानं, लौकिकार्थानं कोणतीही मोठी गोष्ट न करता, बुद्धी न लावता, निसर्गवृत्तीनं, इत्यादी, इत्यादी, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगाचा मनमुराद आनंद लुटता येतो त्यांना मूर्ख मानतात. हे जग एक भौतिक किंवा फिजिकल फेसबूक आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीवर एक लाइक बटन आहे. ती गोष्ट नीट पाहण्याची आपल्याकडे उसंत असली पाहिजे. तिला अधिक जाणून घेण्याकरता आपल्याकडे वेळ असला पाहिजे. ते बटन दाबून तिचा आनंद घेण्याची मानसिकता असली पाहिजे.
नामदेव म्हणतात की समाजामध्ये ईश्वर नावाची एक अत्यंत सुंदर कल्पना आहे. अशा ईश्वराच्या अस्तित्वाचा, त्याच्या आणि आपल्या सान्निध्याचा, त्याच्या आणि आपल्या संबंधाचा, त्याच्या आणि आपल्या संवादांचा, आणि तसेच थोड्याफार एकतर्फी मार्गाने का होईना आपल्याला होणाऱ्या ईश्वराच्या स्वरूपाच्या बोधाचा होणारा आनंद एकमेवाद्वितीय आहे, रोमारोमांत सुखाच्या लहरी पोहचवणारा आहे, मनुष्याच्या स्थूल आणि सूक्ष्म अस्तित्वांना आनंदाने डोलावणारा आहे.

==
भाग ४:
नामा म्हणे पाप, आणि ताप, दु:ख, गेले ।
जाहले हे सुख, बोलवेना ॥४॥
-
स्थूल देहाची भूक मिटणे, सूक्ष्म देहातील जीव शांतवणे या गोष्टी घडल्यानंतरही भूतकाळातल्या संचयचा हिशेब उरतोच. इथून पुढे ठीक आहे पण मागचं काय? पाप म्हणजे तुमच्या वाईट विचारांचा, कृतींचा तुम्ही सोडून इतरांनी ठेवलेला (आणि कदाचित पुढे चुकता करायचा आहेच असं मधे मधे जाणवून देत राहणारा) हिशेब. ताप म्हणजे तुम्ही किंवा इतरांनी निर्माण केलेल्या परिस्थितींचा अंततः तुम्हाला होणारा त्रास, आणि यातून सातत्याने राहणारी भावना म्हणजे दुःख. ईश्वराच्या दर्शनानं हे सगळे कसं काय नष्ट होईल? तर ईश्वराच्या प्रार्थनेनं, नामस्मरणानं, भक्तीन>, पूजेनं किंवा आठवणीनं मनुष्याला हे विश्व निराधार वाटत नाही. आपल्याभोवतीचे हे सगळ्या जगाचा आणि आपल्या स्वत:चा जीवनप्रवास किंवा हे जगत्कारण निरुद्दिष्ट वाटत नाही, या जगातले दुसरे जीव आपल्याशी असंबंधित आहेत असं वाटत नाही, ते आपले वाटतात, आपले सहोदर वाटतात. ईश्वराच्या खर्‍या स्वरूपाची ओळख पटल्यास मनुष्यामधल्या सत्प्रवृत्ती जागृत होतात, किमान होणे अभिप्रेत तरी आहे.

पाश्चात्त्य विज्ञान पुन:सिद्धीच्या सिद्धांतावर आधारित आहे. भारतीय विज्ञान अनुभूतीच्या सिद्धांतावर आधारित आहे. कोणतंही मूळ सत्य त्याच्या प्रमाणाच्या किंवा साक्षाच्या आधारावर संपूर्णतः विदित करता येत नाही, किंवा त्याचा तशास तसा पुनराविष्कार करता येत नाही, ते केवळ स्वानुभवानेच जाणता येतं असं आपल्याकडे मानतात. संत नामदेव एक अत्यंत महान कवी आहेत, आणि अगदी इथ्थेच आणि याच्च विषयावर इतकं उत्कृष्ट कवन करून गेले आहेत, तरीही ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा, स्वरूपाच्या जाणिवेचा त्यांचा आनंद इतका तुडुंब भरून आला आहे आहे की म्हणताहेत की बोलवेना! ज्ञानेश्वरांनी देखील बाप रखुमादेविवरु हृदयीचा जाणुनी, अनुभवु सौरसु केला असं म्हटलं आहे. आपलं आणि ईश्वराचं नातं हे आत्मपरिवर्तनाकरिता, आत्मसुखाकरिता आहे, जगत्कारणाकरता आहे; त्याचा प्रत्यय आल्यावर त्याचं वर्णन करणं भल्याभल्यांकरताही कठीण आहे म्हणून ते सुख स्वानुभवाने भोगलेलं बरं, असं निष्कर्ष आपण काढू शकतो.

समाप्त
==
लेखकः

The author is the Chairman and Managing Director of Apohan Corporate Consultants Private Limited, Pune. It is a fintech company into strategic transactions for equity funding of deserving small and medium enterprises (SMEs). He can be reached on:

arun.joshi@apohanconsultants.com

अभंगधर्मवाङ्मयकवितासमाजजीवनमानSant Namdev

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 4:35 pm | गॉडजिला

सर्वजण भौतिक गरजा पुरेपुर उपभोगत आहेत हे गृहित धरुन सामजावली जातात... अन त्यावर फलाना फलाना मार्ग हा एकमेव रामबाण उपाय असेही सुनावले जाते...

इथेच शिकवण चुकायला सुरुवात होते, योग्य विवेचन असुनही.

खरे तर दुख्ख व्याधी, आर्थिक विवंचना, अप्रबलता, नश्वरता या चार रुपाने जरी सामोरे येत असले तरी प्रत्येकाचे तत्कालिक कारण वेगळे असते... जसे लहान मुल एखाद्या खेळन्यासाठि दुख्खि असेल, टिनेज व्यक्ती मोबाइलसाठि, एखादा नोकरदार पगार वा पदासाठि... वयस्कर आरोग्यासाठि ?

त्याच्या विविध गरजा पुर्ण होउन यात सुख नाही हि उमज तयार व्हायला काळ जातो याकडे उपदेशकर्ते अथ्वा त्याचे विश्लेशक जाणतेअजाणते दुर्लक्ष करतात व यावर उपाय फक्त एकच असा मार्ग लागु करतात हे वास्तवतः हे चुक होय.

अगदी उपदेशकर्त्याची समज कशी तयार झाली याकडे तर प्रत्येकाचे दुर्लक्ष होते, आपण उपदेश का स्विकारला कोणत्या परिस्थिती नंतर स्विकारला याचेही भान उपदेशाच्या नादी लागणार्‍यांकडे समग्र असत नाही परीणामी हे सर्व फोल आहे असा अनेकांचा समज विरोध रुपाने अनेकांच्या मनात प्रकट होतो.

वस्तुतः सुखाची शिकवण आत्मनिरीक्षणापासुन सुरु व्हायला हवी तरच ती फलद्रुप होते, यात अपयश, दुख्खः, अप्रगल्भता हे भाग महत्वपुर्ण योगदान देतात व मार्गी व्यक्तीला सत्याच्या जवळ न्हेण्यास सुरुवात करतात... त्याखेरीज बाकी सगळेच... व्यर्थ जाते अथवा अध्यात्माचा विरोधाभास निर्माण करते

arunjoshi123's picture

20 Jun 2021 - 4:41 pm | arunjoshi123

नामदेवांना बहुदा सुखाचा हा एकच मार्ग आहे किंवा सुखाची ही एकच प्रचिती आहे असं सूचित करायचं नसावं. त्यांनी त्यांना आलेल्या एका अनुभवाची अभिव्यक्ती इथे केली आहे.

नक्किच अनुभवाची अभिव्यक्ती सुंदर आहे पण त्यातुन इतरांना काय लाभ ? असं कोणते कर्म नामदेवांनी केले की ज्याचे फळ कर्माच्या , फळाच्या व त्याच्या पलिकडील वस्तुस्थितीचा लाभ त्यांना झाला ? इतर लोक हे वर्णन व तसे वर्तनाचा अंध प्रयत्न त्यांच्या सामान्य दुख्खि अवस्थेतुन बाहेर पडायचा मार्ग आहे या गैरसमजाला बळी नाही का पडणार.

वस्तुतहा ते काय जे बुध्दाला बुध्द, ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर अथवा संताना संत बनवते याकडे पुर्ण दुर्लक्ष आहे... आपणासही नामदेवांना अलेला अनुभव प्राप्त करायचा मार्ग कोणता हे विचारले तर त्याचे ठाम विवेचन देता येणार नाही. मग कर्म दुर्लक्षित करुन त्याच्या फळाच्या वर्णनात अध्यात्मसार मानत सामान्य जिवांनी किती जन्म घिसायचे .

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 5:30 pm | गॉडजिला

सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख ।
पाहता ही भूक, तहान गेली ॥१॥
भेटली, भेटली, विठाई माऊली ।
वासना निवाली, जिवातील ॥२॥

यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ?

चंद्रासी चकोर, मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर, आनंदाचा ॥३॥

हे सुध्दा झालेल्या आनंदाचे वर्णन आहे तो आनंद प्राप्त करावा कसा याबाबत काय मार्गदर्शन ?

नामा म्हणे पाप, आणि ताप, दु:ख, गेले ।
जाहले हे सुख, बोलवेना ॥४॥

नेमकं काय केल ?

यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ?

कार मध्ये बसून मला आनंद देत आहे असं सांगत खेळणार आज कार विकत घेण्याचे पैसे कसे कमावले हे सांगणे बंधनकारक नसावं. सचिन तेंडुलकर नेते सेंचुरी काढली, पण त्याने ते इतके अवघड अवघड बोल कसे खेळले हे सांगितलंच नाही तर मॅच बघायची नाही का?

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 3:06 pm | गॉडजिला

फक्त खाली तळटीप हवी की हे तुम्ही वाचून/ऐकून/बघून आंनद घ्या फक्त हे तुम्हाला जमणार नाही... फक्त मलाच हे शक्य आहे आणि तुम्हाला ते कसं शक्य झाले ते सांगणार नाही.

बाकी तेंडुलकरांची फ्लनंदाजी बघणे आणि शिकणे या दोन वेगळ्या बाबी असल्याने त्यावर जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही ...

राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...

राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...

कृपया या कायद्याचे नाव मला कळवा.
नारायण मूर्ती, मुकेश अंबानी, गौतम अडाणी यांनी अरुण जोशी किंवा गोडजिला यांना त्यांनी पैसे कसे कमावले हे शिकवणे बंधनकारक आहे, शिवाय या दोघांनी आपण पैसे कसे कमावले हे आपल्याला आता कळले आहे असे लिखित मध्ये देईपर्यंत शिकवणे बंधनकारक आहे हे मला एक प्रचंड नवीन ज्ञान आहे.
इतका महत्त्वाचा कायदा आपल्या देशात असताना आणि आपल्याला पूर्वीपासून माहीत असताना आपण आपल्या देशातील श्रीमंत लोकांकडून असे श्रीमंत कसे व्हावे हे कळेपर्यंत का शिकून घेतले नाही हे देखील आयकायचे मला थोडेसे कुतूहल आहे.
==
बाकी परमात्माला जग नीट चालवता येत नाही, नामदेवांना भक्ती करता येत नाही, अरुण जोशींना रसग्रहण करता येत नाही व व्यवसायही करता येत नाही, तर आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.

आपण अस्वस्थ होऊन शिकवण सोडून द्याल...

मी सध्या फक्त हे नक्की सांगेन

परमात्माला जग नीट चालवता येत नाही

परमात्मा जग एडमीनिस्टर करत नाही.

नामदेवांना भक्ती करता येत नाही

नामदेवांनी भक्तीमार्ग लोकांना सांगण्यापूर्वी त्याच्या यशाची कसलीही जबाबदारी कोणाचीच नाही व उत्तराधिकारास नकार लागू हे सांगायचे टाळणे पटत नाही.

जोशींना रसग्रहण करता येत नाही

कोई शक ?

व व्यवसायही करता येत नाही
जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...

आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.

एखादी गोष्टी समग्र समजून घ्यायला मला फार आवडते व इतर जे काही करतो त्यापेक्षा यात मला जास्त प्राविण्य आहे.

आणि कळस म्हणजे हे घोर अज्ञानी लोक ज्या लोकांना निरागसपणानं, प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं, लहरीपणानं, गंभीर न बनता, अज्ञानानं, विनोदानं, हलकंसं दुष्टपणानं, लौकिकार्थानं कोणतीही मोठी गोष्ट न करता, बुद्धी न लावता, निसर्गवृत्तीनं, इत्यादी, इत्यादी, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगाचा मनमुराद आनंद लुटता येतो त्यांना मूर्ख मानतात.

आपल्या संवादात हे वाक्य मस्त बसतं.

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 12:15 am | गॉडजिला

पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो

पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो

एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन.
--
अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 12:31 am | गॉडजिला

हाच लोभ राहूदे पामरावर.

पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो

एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन.
--
अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...

प्रिय साहेब, तुमच्या वाचण्यात कोणती तरी फार घोर अशी कायद्याची प्रत आलेली दिसते. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट ही नाही आणि वकीलही नाही हे मी अत्यंत ठामपणे सांगू शकतो, शिवाय तुम्ही असे काही नाही हे अनेकांच्या नशिबाचा फार मोठा भाग आहे हे देखिल सांगु शकतो.
--
उत्तरादाखल तुम्ही अजून कोणते कोणते कायदे वाचले आहेत आणि त्यात काय काय अधिकार लोकांना प्राप्त आहेत ते वाचले आहे ते सांगा. तुमचे वाचनाची कला आणि त्यातूनच ज्ञान घेण्याची प्रथा फारच रोचक आहेत.
--
हे नामदेव बिमदेव वाचण्यात फार काही तथ्य दिसत नाहीये. आयकर कायद्याचं तुम्ही जे रसग्रहण केलं आहे त्याची सर कुठल्याही संतांच्या कुठल्याही अभंगाच्या रसग्रहणला येणार नाही. बजाओ अपना टेप, सर, हम सुन रहें है.

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 12:29 am | गॉडजिला

खिलजि's picture

23 Jun 2021 - 12:31 pm | खिलजि

मस्त निरूपण केलंय. कालच प्रतिक्रिया देणार होतो पण असो .. आवडलंय.. दम है भाऊ ..

कशाला भेटू त्या निर्गुणाला निराकाराला

इथे सगुण साकार मूर्तिमंत सर्व

निरूपण देतोय साक्षात गॉडझिला

सर्व पंडितांचा हरुनी गर्व

जियो मेरे लाल ---- गॉडझिलाकी कमाल

कॉमी's picture

20 Jun 2021 - 7:47 pm | कॉमी

ह्या विषयात आपली गती शून्य, तरीपण-
भाग ४-

पाप म्हणजे तुमच्या वाईट विचारांचा, कृतींचा तुम्ही सोडून इतरांनी ठेवलेला (आणि कदाचित पुढे चुकता करायचा आहेच असं मधे मधे जाणवून देत राहणारा) हिशेब. ताप म्हणजे तुम्ही किंवा इतरांनी निर्माण केलेल्या परिस्थितींचा अंततः तुम्हाला होणारा त्रास, आणि यातून सातत्याने राहणारी भावना म्हणजे दुःख. ईश्वराच्या दर्शनानं हे सगळे कसं काय नष्ट होईल?

ह्याचे उत्तर-

तर ईश्वराच्या प्रार्थनेनं, नामस्मरणानं, भक्तीन>, पूजेनं किंवा आठवणीनं मनुष्याला हे विश्व निराधार वाटत नाही. आपल्याभोवतीचे हे सगळ्या जगाचा आणि आपल्या स्वत:चा जीवनप्रवास किंवा हे जगत्कारण निरुद्दिष्ट वाटत नाही, या जगातले दुसरे जीव आपल्याशी असंबंधित आहेत असं वाटत नाही, ते आपले वाटतात, आपले सहोदर वाटतात. ईश्वराच्या खर्‍या स्वरूपाची ओळख पटल्यास मनुष्यामधल्या सत्प्रवृत्ती जागृत होतात, किमान होणे अभिप्रेत तरी आहे.

हे उत्तर ताप पाप व्याख्येशी परस्परविरोधी नाहीये का ? सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ? आणि,

पाप वरील व्याख्येनुसार पूर्णपणे आपल्याला नियंत्रण न करता येणारी बाब आहे. मग आपल्याला होणाऱ्या अनुभूतीतून पाप कसे मिटेल ? आपल्या वाईट विचारांचा आणि कृतींचा इतरांनी ठेवलेला हिशोब आपल्या ईश्वरदर्शनाने कसा मिटेल ?

भाग २-
भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.

भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.

द्विरुक्तीचं आपलं एक व्याकरण असतं.

arunjoshi123's picture

20 Jun 2021 - 10:23 pm | arunjoshi123

सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ?

सत्प्रवृत्ती असूनही आणि इतरांबद्दल आपुलकी असूनही त्याचा ताप न होणं हे संतप्रवृत्तीचं लक्षण आहे. आपुलकी असल्यास ताप होणं आवश्यक नाही.

अधिक माहितीसाठी यासंबंधी धागा अवश्य चाळावा :)

arunjoshi123's picture

22 Jun 2021 - 12:14 am | arunjoshi123

देशात लोकशाही आहे हो. निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे. का कोणता कायदा आहे तुमच्या माहितीत त्यांना तुरुंगात टाकायला? तुम्हाला कायद्याचं जे प्रचंड ज्ञान आहे ते पाहून विचारावंसं वाटलं.

निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे.

नक्कीच असावे. अन्यथा त्याची शिकवण देणाऱ्या धाग्या कधीच पंख फुटले असते :)

मला असं वाटतंय कि निष्क्रिय सज्जन असण्यापेक्षा सक्रिय मूर्ख असणे देशात जास्त कायदेशीर असावं.

यावर चार शब्द अवश्य लिहावेत

कोणता अभ्यास? नामदेव? बिझनेस? कि कायदे? आपले बरेच विषय चर्चून झालेत म्हणून विचारलं?
==
इथेच तुमची उत्तरं देताना माझा बराच अभ्यास झालाय. तुम्ही गोडी लावलीत असं म्हणेन थोडक्यात.

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 1:06 am | गॉडजिला

गोंधळ उडणे साहजिक आहे खरे पण आपण

सगळ्यावरच बोललात तरी चालेल की गोडी कशी लागली

शाम भागवत's picture

22 Jun 2021 - 2:11 pm | शाम भागवत

माझा नामदेव महाराजांच्या अभंगाचा अभ्यास वगैरे काही नाही. पण हे नामस्मरण मार्गातील मोठे अधिकारी संत होते. त्यांच्या या अभंगावर जे व जसे सुचले तसे लिहिले आहे.
भगवंताचे दर्शन ही अध्यात्माची सुरवात आहे. तर मीच भगवंत अशी अनुभूती येणे हा शेवट आहे. हा शेवटचा अनुभव नामदेव महाराजांना नक्कीच आलेला होता.
देवाचिया दारी उभा क्षणभरी म्हणजे देवदर्शनाचा पहिला प्रसंग. यानंतर चारी मुक्तिचे दरवाजे उघडतात व वाटचाल सुरू होते. हाच देवदर्शनाचा प्रसंग इथे वर्णिला आहे असे वाटते. मग या देवदर्शनाचीच आस लागते. तोच ध्यास लागतो. तरीपण या देवदर्शनासाठी द्वैताची आवश्यकता असते.
असो.

मला वाटते नामदेव महाराजांनी ही काव्यरचना त्यांच्या गतकाळातील अनुभवांवर आधारित आहे. या मार्गावरील वाटसरूंना मार्गदर्शनासाठी या अभंगाची रचना केली गेली असणे शक्य आहे.
🙏
================================

सुखाचे हे सुख
सुख हे देहाच्या संदर्भात असते. त्यामुळे ते साधारणत: अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असते. सतत बदलत राहणे हा परिस्थितीचा गुणधर्म असतो. त्यासाठी ही बदलती परिस्थिती आपल्याला सतत अनुकूल करत राहण्याचा प्रयास करत बसायला लागतो.
देहाला होणारे कष्ट कसे कमी होतील या दृष्टीनेही सुख शब्द वापरला जातो. सुखसोयी हा शब्द यातूनच आलेला आहे. विज्ञानाची बरीचशी प्रगती याच गोष्टीवर अवलंबून आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

मात्र या अभंगात, नामदेव ज्या सुखाबद्दल म्हणताहेत ते सुख देहावर अवलंबूनच नाहीये. त्यामुळे त्यावर बदलत्या परिस्थितीचाही परिणाम होत नाही. किंवा परिस्थिती अनुकूल करत बसण्याचे प्रयास करत बसायला लागत नाहीत. असे ते सुख देहातीत आहे. म्हणून त्यांनी सुखाचे सुख असा शब्दप्रयोग केलाय.

थोडक्यात साधे सुख कशावर तरी अवलंबून असते. त्या दृष्टीने ते परावलंबी असते. ते अवलंबित्व काढून टाकले तर त्याला म्हणायचे सुखाचे सुख. किंवा सुखांचा राजा.

श्रीहरी मुख
साधारणत: एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून आपण त्याला ओळखतो. एखाद्या व्यक्तीचा चेहरा सोडून बाकी अंगाचे कितीही फोटो काढले तरी त्या फोटोवरून तो माणूस ओळखता येईलच असे नव्हे. पण त्या व्यक्तिचा चेहऱ्याचा फोटो असेल तर मात्र त्या व्यक्तिला तात्काळ ओळखता येते, मग बाकीचे फोटो नसले तरी चालते.

इथे नामदेव म्हणताहेत की, मला श्रीहरीचे मुख दिसले किंवा पाहिले. म्हणजे मला भगवंताची ओळख झाली. आता भगवंत ओळखायला बाकी कोणत्याही फाफटपसाऱ्याची जरूरी नाही. भगवंत म्हणजे काय हे आत्तापर्यंत विश्वासावर किंवा श्रध्देने जाणत होतो पण आता तो दिसला म्हणजे तो कळला. हे जे कळणे आहे त्यालाच म्हणतात भगवंताचे दर्शन. फक्त फरक इतकाच की, हे कळणे तर्काधारीत किंवा माहीतीवर आधारीत नाहीये तर प्रत्यक्ष प्रचिती आलीय. अनुभव आलाय. त्यामुळे तो कळून घ्यायला आता कशाचीही कोणाचीही जरूरी भासणार नाहीये.

पाहता ही भूक, तहान गेली
मनुष्याच्या ज्या काही मूलभूत संवेदना आहेत त्यातील बऱ्याचशा परिस्थितीवर किंवा मनुष्याच्या वयावर अवलंबून असतात. पण
भूक व तहान या मात्र दोन तीव्र व मूलभूत संवेदना आहेत. या संवेदनांमुळे देह भानावर येतो. या संवेदना सुध्दा जाणवत नाहीत याचा अर्थच देहभान हरवणे असा आहे. मला वाटते "देहभान हरवणे" हे शब्दप्रयोग करायच्या ऐवजी त्यांनी इथे देहभान हरपते म्हणजे नक्की काय होते तेच जास्त स्पष्ट करून सांगितले आहे.

भेटली, भेटली, विठाई माऊली ।
कोणी कोणाला तरी भेटायचे असेल तर त्यासाठी द्वैत लागते. भेटणे, दर्शन होणे यासाठी द्वैताची जरूरी असते. ही विठाई भेटली म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त तर्काने जाणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नात त्रास होता, शीण होता. प्रयत्नांना यश मिळाले नसल्याने एक प्रकारचे अपुरेपण जाणवत होते. हे आता सगळे नाहीसे झालंय. आता तू भेटली आहेस. तुझ्यात व माझ्यात बरेच अंतर असले तरी तू कुठे आहेस हे लक्षात आल्याने मार्गक्रमण कसे करायचे त्याबद्दल कोणताही संदेह राहिलेला नाही. फक्त मार्गक्रमण करायचे शिल्लक आहे.

वासना निवाली,
प्रत्येक मनुष्य सुखाची काहीतरी व्याख्या करत असतो. त्यासाठी तो स्वत:ला विनाकारण काही अटी घालत असतो. अमूक झालं तरच मी सुखी. अमूक हे टाळता आलं तरच मी सुखी. अशा प्रकारे हवे नकोचे खूप मोठे जाळे मनुष्य स्वत:भोवती विणत असतो व त्यातच गुरफटून घेत असतो. एखाद्याने खांबाला घट्ट मिठी मारावी व त्या खांबालाच, मला सोड मला सोड असे दरडावून सांगावे तसेच काहीसे हे असते.

पण भगवंताचे दर्शन झाले की या अशा प्रकारच्या आपणच घातलेल्या अटी गळून पडतात. या अटीच नाहीशा झाल्याने सुख तात्काळ हजर होते. वासना म्हणजे हवे-नकोपण. तीच निवते असे नामदेव महाराज म्हणताहेत.

जिवातील
जीव व शीव असे दोन विरूध्दार्थी शब्द आहेत. भगवंताच्या विस्मरणात म्हणजे जीव व भगवंताच्या स्मरणात शीव अशा रितीने या शब्दांचा वापर केला जातो. पण जोपर्यंत भगवंताचे दर्शनच झालेले नसेल तर स्मरण व विस्मरण या संज्ञाच लागू होत नाहीत. तिथे फक्त जीवदशाच असते. वासना नेहमी जिवाला असते. ती देहासंदर्भात असते किंवा देहबुध्दीतून जन्म घेते. देहाच्या संदर्त्भातील या इच्छा आकांक्षा नाहीशा झाल्या आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. भगवंताचे दर्शन झाल्यामुळे त्यांनी वापरलेल्या जीव या शब्दाला अर्थ प्राप्त होतो.

चंद्रासी चकोर, मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर, आनंदाचा

एखादी गोष्ट जेव्हा सहज मिळते तेव्हां त्याचं फारसं कौतूक कोणाला वाटत नाही. पण एखादी गोष्ट खूप कष्ट केल्यावर प्राप्त होते तेव्हा त्यातून मिळणारे समाधान किंवा आनंद हा वेगळाच असतो.

पण भगवंताचे दर्शन हे खरोखरच खूप दुर्मिळ असते. तिथपर्यंत कसे पोहोचायचे तो मार्ग देखील झटकन सापडत नाही किंवा लक्षात येत नाही अशी गोष्ट खूप कष्ट सोसल्यानंतर व मुख्य म्हणजे खूप काळ धीर व संयम या जोरावर टिकून राहिल्यावर अप्राप्य वाटणारी गोष्ट मिळाल्यावर मिळणारा आनंद काय असतो याचे वर्णन करायचा प्रयत्न इथे केलेला दिसतो.

नामा म्हणे पाप,
या अवस्थेत पोहोचलेल्या व्यक्तिच्या पाप पुण्याच्या व्याख्याच वेगळ्या असतात. कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप अशी आता स्थिती झालेली असते. हे भगवंताचे दर्शनही त्याच्या कृपेमुळेच झाले आहे अशी भावना असल्यामुळे त्याबाबतीतही कृतज्ञतचा दाटून आलेली असते. थोडक्यात कृतघ्नता संपूर्णपणे नाहिशी झालेली असते व कृतज्ञता भरून राहिलेली असते. भगवंत कधीच चुकत नाही अशी त्यामुळे खात्री पटलेली असते. याचा परिणाम म्हणून हे हवे हे नको या इच्छाच विरून गेलेल्या असतात. कारण अशी काही इच्छा धरणे म्हणजे मला काय द्यायचे व काय नाही, हे भगवंताला काही कळत नाही असे म्हटल्यासारखेच असते. म्हणजे हवे-नकोपण जाते व त्या हवे-नकोपणातून येणारा ताप-व्याप-प्रयत्नही नाहीसा होतो. अर्थात त्या तापातून दु:ख होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

जाहले हे सुख, बोलवेना
साधारणत: सुख झाले की कोणाला तरी सांगावेसे वाटते. निदान आपल्या प्रियजनांना कधी एकदा सांगतो असे होऊन जाते. प्रियजनांना ते सांगण्यात पण एक आनंद असतो. पण भगवंत दर्शनाचे सुख असे आगळे वेगळे आहे की, माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी?
त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात.
🙏
=================================
माझ्या तुटपुंज्या अनुभवाच्या आधारावर मी मला समजलेला अर्थ लिहिलाय. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात व त्यामुळे मांडणी बदलू शकते. पण तरीही ते बरोबर असू शकतात. कोणाचेही मुद्दे खोडून काढण्यासाठी हे लिहिलेले नाही एवढेच प्रथम स्पष्ट करतो. तसेच माझे मुद्दे इतरांना पटवून सांगण्यात रस नसल्याने मी चर्चेत भागही घेणार नाही आहे. मिपावरील वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जेवढे पाहिजे तेवढे ते योग्य ठिकाणाहून उचलतील याची खात्री आहे.
😊

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 6:03 pm | गॉडजिला

माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी?
त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात.

हे फार आवडले आहे, शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय ? नाही नाही तिथं स्तब्ध नाही व्हायचे तर त्याच्याशी चर्चा करायची ज्यातून अभंग तयार होतात. हे खूप छान विवेचन लिहले आहे, आवडले.

मूकवाचक's picture

22 Jun 2021 - 6:20 pm | मूकवाचक

_/\_

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2021 - 12:14 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेखन, सत्संगाची अनुभुती आली !
पुढील अभंग निरुपणाच्या प्रतिक्षेत !

खरचं एकदम भारी विचारले तुम्ही जरी वेगळ्या काँटेक्स्ट मधे म्हटले तरी.

मला असे प्रश्न पडले

भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ?
किती वेळ असु शकतील ?
कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार
वॉट नेक्स्ट ?
आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?

ज्याला याची ओळख पटली तो गप्पा नक्किच मारणार नाही. ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल...

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jun 2021 - 2:47 pm | उन्मेष दिक्षीत

झाला क्षण जगुन. पुढे काय?
हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे बघा!

गॉडजिला's picture

25 Jun 2021 - 3:21 pm | गॉडजिला

हा कायम सोबत राहतो... वर्तमान बनुन

गॉडजिला's picture

25 Jun 2021 - 3:32 pm | गॉडजिला

आणि मागेही काहीही असत नाही. जे आहे ते फक्त वर्तमानात आहे.

भुतकाळ स्म्रुतीने जिवंत राखला आहे तर भविश्य अपेक्षांनी वाहते ठेवले आहे प्रत्यक्षात हे दोन्हीही अस्तित्वात नाहीत, अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान.. याची अनुभुती आत्मस्वरुपाच्या जाणीवेतुन येउ लागते त्यामुळे सर्व गोश्टी कालातीत होतात... याला क्षण जगणे म्हणतात कारण हा क्षण सोडुन प्रत्याक्ष अस्तित्वात काहीच नाही हा अनुभव येउ लागला की पुढे काय प्रश्न आपोआप नाहीसा होतो

त्याला मुलभुत दोनच गोश्टी कळतात ० आणि १.

पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो...

आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.)

हा मेंदु देखिल कोणतीही गोश्ट नश्ट होणे = ० व निर्मीत होणे = १ या अस्तित्वात असणार्‍या दोनच मुलभुत नियमाचे /संवेदनांचे मनाच्या आधारे प्रोसेसिंग करत एक फार मोठे मायाजाल तयार करतो. यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते. वस्तुतहा गोश्टी फक्त नाहिश्या होतात व निर्मीत होतात हा एकमेव बदल सातत्याने होत असतो

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jun 2021 - 4:26 pm | उन्मेष दिक्षीत

माहीती बद्दल. मेंदूचा काही अभ्यास नाही माझा.

आणि मिपावर,
>> पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो...
आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.)
यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते.

हे इतके स्पष्ट असे काही लिहायचे नसते ही इतकी बेसिक गोष्ट माहीती नाही का तुम्हाला ?

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jun 2021 - 4:09 pm | उन्मेष दिक्षीत

ज्यातुन अभंग तयार होतात.
काहीतरी एक स्टँड घ्या.

>> ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल...
>> हा क्षण जगुन होत नसतो

तो क्षण जगणार्‍या व्यक्तीसाठी विचारलं, पुढे काय म्हणून, क्षणासाठी नाही.

>> शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय

एवढया पार्ट वर मी पहीला प्रतिसाद अक्षरश: टाईमपास म्हणून लिहिला होता. अ जनरल वंडरिंग. सिरियसली घेऊ नका फार.

गॉडजिला's picture

25 Jun 2021 - 4:12 pm | गॉडजिला

म्हणुन गंभिरतेचा आव आणलाय...

ज्यातुन अभंग तयार होतात.

हे माझे वाक्य असले तरी विधान मि न्हवे भागवत काकांनी केले आहे

गॉडजिला's picture

25 Jun 2021 - 4:14 pm | गॉडजिला

आणि सर्व प्रतिसादातिल एक शब्दही गंभिरपणे विचारकरण्या योग्य नाहीत असे माझे वैयक्तीक मत आहे.

लेख आणि भागवत काकांचे विवेचन, दोन्ही आवडले.

बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार?
जास्तीत जास्त होऊ शकेल ते असे - जर त्यांना आलेला अनुभव आपल्याला आला तर कदाचित समजून घेऊ शकू! :-)

शाम भागवत's picture

26 Jun 2021 - 10:15 am | शाम भागवत

बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार?

मला वाटते हे अभंग म्हणजे नामदेव महाराजांचे आत्मनिवेदन आहे. त्यामागे महाराजांचा कोणताही हेतू नाही. हेतू किंवा योजना असली तर ती फक्त भगवंताची असेल.

भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते.

त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे.

हा प्रतिसाद राघवजी यांना आहे.
🙏

भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते.

वेगळा विचार. या दृष्टीकोनातून बघीतले नव्हते. :-)

त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे.

_/\_

गामा पैलवान's picture

28 Jun 2021 - 6:45 pm | गामा पैलवान

उन्मेष दीक्षित,

तुमचे इथले प्रश्न वाचले : https://www.misalpav.com/comment/1111746#comment-1111746

मला जमतील तशी उत्तरं देतो.

१.

भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ?

काही नाही. तशी गरज उरंत नाही.

२.

किती वेळ असु शकतील ?

अनंतकाळ. किंबहुना भगवद्दर्शन झाल्यावर हे आपल्याला आधीपासनंच ठाऊक होतं, असं काहीसं वाटायला लागतं.

३.

कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार

कोणीही न सांगता ते आपोआप कळायला लागतं. अगदी स्वत:चं स्वत:ला सांगायचीही गरज पडंत नाही.

वॉट नेक्स्ट ?

नथिंग नेक्स्ट. नथिंग प्रिव्हीयस टू. नथिंग राईट नाव. ( Nothing next. Nothing previous. Nothing right now. Sheer existence remains.)

नंतर काही नाही. अगोदरही काही नाही. सध्या काही नाही. केवळ अस्तित्व उरतं.

५.

आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?

तुम्ही आरशात स्वत:चं प्रतिबिंब बघितलं असेल. तो शरीराचा आरसा झाला. तसाचा मनाचाही आरसा असतो. त्यात मी चं स्वच्छ प्रतिबिंब पडायला लागतं. ते प्रतिबिंब म्हणजे भगवन.

असो.

जमेल तशी उत्तरं दिली आहेत. कृपया गोड मानून घेणे.

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

28 Jun 2021 - 7:03 pm | गॉडजिला

.

कॉमी's picture

28 Jun 2021 - 9:25 pm | कॉमी

मनाचा आरसा, प्रतिबिंब... काय समजलं नाही बुवा.