Skip to main content

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/07/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती. मला स्वतःला नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, मित्रांच्या अशा किमान दहा ग्रुपवर ही पोस्ट फाॅरवर्ड म्हणून आली होती. व्हाॅट्सअपवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशी एकुणात आपल्या भारतीय लोकांची मानसिकता झालीये गेल्या काही वर्षात. व्हाॅट्सअपवरचे मॅसेजेस, मग ते नासाच्या तुटणाऱ्या ग्रहांचे असोत, युनेस्कोने जाहीर केलेल्या राष्ट्रगीताचे असोत, वा पाच तोंड असलेल्या शेषनागाच्या दर्शनाचे असोत, आपली लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून, डोळे झाकून आणखी शंभर लोकांना पुढे ढकलून देणार. अगदी त्याच मानसिकतेतून आपल्या लोकांनी वाफ घेण्याच्या गोष्टीची शहानिशा न करता, बहुतेकांनी अडगळीत पडलेले स्टीमर शोधून काढले. काहींनी लगोलग मेडिकल गाठून नवे विकत आणले, आणखी काहींनी अॅमेझाॅनवर चांगल्या प्रतीचे स्टीमर आॅर्डर केले आणि औषधांचा डोस घेतो त्याप्रमाणे सकाळ-दुपार-संध्याकाळ वाफ घ्यायला सुरूवात केली. केवळ उत्सुकतेपोटी, नाकाच्या पाठी हे अशा प्रकारचे पॅरानेझल सायनस असते का? त्याचे लाॅकिंग मेकॅनिझम म्हणजे नेमके काय? आणि त्यातून खरंच विषाणू थेट फुप्पूसात जावू शकतात हे मी गुगलबाबाला विचारून पाह्यले, पण शेवटी गुगलबाबा म्हणजे कुणी डाॅक्टर नव्हे असं स्वतःची समजूत घालून तो नाद सोडला आणि गपगुमान दुसऱ्या दिवशी मेडिकलमधून साधे स्टीमर विकत घरी आणले. या मॅसेजच्या वायरलनंतर काही दिवसांनी कूपर हाॅस्पीटलच्या दोन डाॅक्टरांमधला संवाद म्हणून एक आॅडीओ क्लिप व्हाॅट्सअप युनिवर्सिटीवर पसरू लागली. इतके दिवस दुर्लक्षित केलेली ती क्लिप आज सकाळी प्रत्यक्ष एेकली आणि आपला बेंबट्या झाला आहे याची शंभर टक्के खात्री पटली. त्या एकंदर संवादात त्यातल्या कथित डाॅक्टर भोसलेंच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा त्या मॅसेजमधलाच होता. अगदी समोर मॅसेज ठेवून वाचत असल्यासारखा, फक्त अविर्भाव मात्र विश्वातले मोठे गुपीत सांगितल्यासारखा होता. खरेच डाॅक्टर होते कि व्हाॅट्सअॅप युनिवर्सिटीतल्या फाॅरवर्ड्समधून शिकलेले स्वयंघोषित डाॅक्टर होते, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आधी वायरल झालेल्या मॅसेजप्रमाणेच, क्लिपमधल्या संभाषणातली ती व्यक्तीही लोकांपर्यंत अर्धवट आणि चुकीची माहिती पोहचवत होती. एकुणातच आधीच्या मॅसेजमुळे आणि या आॅडीओ क्लिपमुळे, लोकांच्या घाबरलेल्या मानसिकतेला अशा सगळ्या खोट्या गोष्टींतून खतपाणी घालून वेगाने गैरसमज पसरवण्याचे काम आपोआप झालेय यात काही शंकाच नाही. डाॅ. संग्राम पाटील यांचा या संदर्भातला युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्या क्लिपमधल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातला आवर्जून लक्षात घेण्याजोगा असा दुसरा मुद्दा म्हणजे, ४०° ते ६०° तापमानातली वाफ घेण्यामुळे करोनाचे विषाणू मरत नाहीत, तर त्यामुळे आपलाच चेहरा भाजण्याची शक्यता जास्त होते. करोनाचा विषाणू ७०° किंवा त्यावरील तापमानात जिवंत राहू शकत नाही आणि त्याखालील तापमानाची वाफ घेतली तर त्यामुळे आपल्याला भाजण्याचे चान्सेस जास्त या गोष्टीला अधोरेखित करणे महत्वाचे. करोनाचा विषाणू सुरूवातीचे तीन-चार दिवस घशात/पॅरानेझल सायनसमध्ये राहतो आणि तिथून मग फुप्पूसात शिरतो वैगेरे आॅल बुलशीट !! ट्रेकिंग करताना सर्वात पुढे वाटाड्या चालत असतो आणि त्याच्या मागोमाग इतर लोक चालत असतात. ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी, ज्या दिशेेने वाटाड्या वाटेने चालत राहील, त्याच्या पाठोपाठ जात रहायचे एवढेच लोकांना ठाऊक असते. पुढे मग तो वाटाड्या चुकीच्या वाटेने चालत राहीला, तरी डोक्याने सारासार विचार करणे थांबवून लोक चुकलेल्या वाटेवरून चालतच राहतात, प्रश्न न करता !! वाट चुकल्याचे जेव्हा कळते, तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच पण त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. फेसबूक, व्हाॅट्सअॅपसारखी समाजमाध्यमे ही त्या वाट चुकवलेल्या वाटाड्यासारखी झालीयेत सध्या. जनता सारासार विचार न करता, चुकीच्या गोष्टींमागे डोळे बंद करून पळते आहे निव्वळ !! सध्याच्या कठीण काळात, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासोबतच अशा सगळ्या सरसकट येणाऱ्या मॅसेजेसकडे डोळस नजरेने बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. - किसन शिंदे

वाचने 54516
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

डॉक्टर हा सुरक्षित पेशा ठेवला आहे ना पण त्यांना नियम हवेत. अफाट फी लावता येणार नाही 8 हजाराचे इंजेक्शन 150000 लाख रुपये ल विकले जाते. विनाकारण कमिशन साठी टेस्ट केल्या जातात. आजार चे अयोग्य निदान करून उपचार केले जातात लोकांचा जीव पण जातो आणि पैसे ही. सर्रास नाही पण असे चालते . औषध कंपन्या दर काही महिन्यांनी पार्टी देतात हवा तेवढा खर्च करा . हे चालत हे नाकारता येत नाही. 5 वी पासून शरीर शास्त्र चे धडे दिले तर 12 वी पर्यंत सर्वच डॉक्टर होतील. पण डॉक्टर पेशाला पैसे कमविण्याची हमी दिली आहे तर त्याला नियम पण हवेत.

In reply to by Rajesh188

प्रत्येक व्यवसायात आरोग्यदायी स्पर्धात्मकता असेल तर वस्तु आणि सेवांचे दर आणि दर्जा आवाक्यात रहाण्यास मदत होते. मागणीच्या प्रमाणात पुरवठा असेल तर दर आटोक्यात रहातात. अगदीच १२वी पर्यंतच्या शिक्षणाने कुणाला प्रशिक्षीत डॉक्टर करता येईल या बद्दल साशंकता वाटली तरी सध्या पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये उघडणे, पर्यायी अल्टरनेट मेडीसीन जसे आयुर्वेद / होमीओपॅथ / निसर्गोपचार क्षेत्रातील वैद्यकांना आधुनिक वैद्यकाचेही प्रशिक्षण देणे, अनुभवी प्रशिक्षीत नर्सेस ना अधिक शरीरशास्त्रीय शिक्षणाची संधी देऊन बघणे, अनुभवी मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह बी फार्म ग्रॅज्युएट्स यांना इच्छा झाल्यास आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण देऊन आरोग्यक्षेत्रातील प्रशिक्षीत माणूसबळाची कमतरता दूर करून पुरवठा वाढवता आला तर त्यांचे वैद्यकीय दर आटोक्यात रहाण्यास मदत होऊ शकेल. हॉस्पीटल्सना प्रॉपर्टी टॅक्स वीज पाणी कमर्शिअल दरांनी पुरवले जाते की सर्वसामान्य दरांनी पुरवले जाते याचाही दरांवर परीणाम होत असावा. अगदी मेनरोडवर हॉस्पीटल्स चालवण्याचा अट्टाहास पुरेसा समजत नाही, मेन रोडवरील प्रॉपर्टींचे दर खूप अधिक असतात तसे हॉस्पीटलचे खर्चही आणि पर्यायाने दर वाढतात अर्थात पुरवठा वाढला तर त्यावर आपोआपच नियंत्रण मिळण्यास मदत होऊ शकावी. आरोग्य सेवांचे दर वाढण्याचे कारण इन्श्युरन्सकडून पैसा उपलब्ध होण्याची शाश्वती वाढल्याने त्याचा गैरफायदा वाढीव दरांनी घेण्याचा प्रयत्न आरोग्य व्यवस्थापनातील साखळी प्रयत्न करते त्यावर उपाय काय असू शकेल याचा विचार करण्याचा काळ नक्कीच आला आहे.

In reply to by Rajesh188

5 वी पासून शरीर शास्त्र चे धडे दिले तर 12 वी पर्यंत सर्वच डॉक्टर होतील.
धन्यवाद , आज खूप दिवसांनी मनापासून हसलो :)

In reply to by Rajesh188

करोनाच्या या महामारीत डॉक्टर्स आणि नर्सेस आणि त्यांच्या कर्मचा-यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांना सेवा दिली, देत आहेत अनेक रुग्णांना बरे केले त्यांच्यासाठी आपला एक कडक सॅलूट कधीही आहेच. सरसकट सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयांवर हा ब्लेम नाही पण सध्याच्या काळात काही डॉक्टर्स, रुग्णालये, पॅथॉलॉजीवाल्यांच्या रुग्णांना लुटत असल्याच्या बातम्या येत आहेत त्या दुर्दैवी आहेत. त्या कथांवर एक स्वतंत्र धागा यायलाच पाहिजे. आपण म्हणता तसे शिक्षणात एक आरोग्यविषयक कंपलसरी विषय शिकवला पाहिजे. आणि पोरांना सरसकट त्याचं शिक्षण देऊन प्रॅक्टीकल्ससाठी खेडेगाव तालूक्यात सिनियर डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली शिबिरांचे आयोजन करुन जूजबी आजारांसाठी औषधे आणि जनजागृतीचं प्रशिक्षण भविष्यात आवश्यक आहे, असेच वाटते. लूटमार करणारे कोणत्याही भांडवलांची गुंतवणूक न करता निव्वळ नफ्यांवर डल्ला मारतात तो गुन्हा होतो, सनदशीर मार्गाने लूटमार करणार्‍यांवरही काही नियम-कायदे असलेच पाहिजे असे आता वाटायला लागले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लूटमार करणे हा मानवी स्वभाव आहे. ४७००० कोटी रुपये स्वयंपाकाचा गॅस थेट खात्यात जमा केल्यावर सरकारचे वाचले. किंवा उत्तराखंडात आधार कार्डाशी संलग्न केल्यावर २ लाख विद्यार्थी अचानक गायब झाले. रेमडेसीव्हिरचा काळाबाजार होतो आहे आणि ५ हजाराचे औषध ३० हजाराला विकले जाते आहे. महाराष्ट्र सरकारने पीपीई किट सुरुवातीला ६ हजार रुपयाला विकत घेतले. ज्याची उत्पादन किंमत ३००-४०० रुपये आहे. विविध कोव्हीड केंद्रे अचाट आणि अफाट किमतीत बांधली गेली आहेत जेथे एखाद्या रुग्णाला क्वारंटाईन मध्ये ठेवता येईल इतक्याच सुविधा आहेत. रुग्णाचा उपचार होईल अशी सूत्रं शक्यता नाही परंतु खर्च तर तसा "दाखवला गेला" आहे. आणि अजूनही पीपीई किट किंवा एन ९५ मुखवट्याच्या किमतीवर सरकारने नियंत्रण आणलेले नाही. आजही गावाला जाण्यासाठी सरकार कडून E पास लागतो त्याचे एजंट आहेत ३००० रुपयात पास घरी आणून देतात. ( सध्या गणेशोत्सवा साठी कोकणात जाण्यासाठी पास मिळवण्याची झुंबड उडाली आहे) तुम्ही जालावर आपला अर्ज दाखल करून वाट पाहत बसा काहीही होत नाही. अशा स्थितीत काही वैद्यकीय व्यावसायिक सुद्धा हात धुवून घेत आहेत हि पण वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे हे दुर्दैव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्याच्या काळात काही डॉक्टर्स, रुग्णालये, पॅथॉलॉजीवाल्यांच्या रुग्णांना लुटत असल्याच्या बातम्या येत आहेत त्या दुर्दैवी आहेत. त्या कथांवर एक स्वतंत्र धागा यायलाच पाहिजे.
सहमत.

5 वी पासून शरीर शास्त्र चे धडे दिले तर 12 वी पर्यंत सर्वच डॉक्टर होतील. काय सांगताय ? खरं कि काय?

भारतात लोकसंख्या च्या प्रमाणात डॉक्टर ची संख्या खूप कमी आहे. मेडिकल महाविद्यालय पण प्रगत राज्यातच जास्त आहेत. आणि सर्वात महत्वाचे खूप महाग असलेले शिक्षण डॉक्टर होण्यासाठी 1 करोड तरी खर्च होतात सरकारी महाविद्यालय खूपच कमी आहेत. शिक्षण वर 1 करोड खर्च होत असतील तर आवड आणि कुवत असून सुद्धा डॉक्टर होवू शकत नाही. म्हणून सर्वानाच शालेय जीवनापासून शरीर शास्त्र शिकवले तर दृष्ट चक्र थांबेल. शिक्षण साठी करोडो रुपये खर्च आणि ते वसूल करण्यासाठी गैर मार्ग. हे थांबवण्याचा तो एक मार्ग आहे सर्वांना शरिरशास्त्र चे शिक्षण ते पण सविस्तर.

एखाद्या आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी वैद्यकीय वेबसाईट वर प्रत्येक औषधाचे बरोबर दर टाकणं आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं अशक्य नाहीये. आणि एखाद रुग्णालय जास्त दर आकारत असेल तर, लोकांनाच बिल पाठवायला एखादा ईमेल / फॅक्स नंबर दिला तरी लगेच भरपूर माहिती गोळा होऊ शकेल. अगदी एखाद्या माहिती असलेल्या सामान्य माणसाने अशी लिस्ट करून जगप्रसिद्ध वॉट्सअँप युनिव्हर्सिटी मध्ये टाकली तरी भरपूर लोकांपर्यंत जाईल. किमान लोक रुग्णालयात भरपूर प्रश्न तरी विचारायला लागतील.

प्रत्येक औषधाचे बरोबर दर टाकणं औषधांचे जास्तीत जास्त विक्री मूल्य हे त्यावर लिहिलेलेच असते. मुळात त्याची जेंव्हा कमतरता भासते तेंव्हा काळा बाजार होतो आणि हे करणारे लोक डॉक्टर नसून केमिस्ट असतात. कारण रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात कि हे औषध आमच्याकडे उपलब्ध नाही तुम्ही बाहेरून घेऊन या. मग रुग्ण इकडे तिकडे केमिस्ट कडे चकरा मारतो तेंव्हा कोणी तरी त्याला औषध कुठे मिळू शकेल हे सांगतो. Rs-60000-for-a-rs-5500-vial-how-remdesivir-black-market-thrives-as-covid-cases-rise https://theprint.in/health/rs-60000-for-a-rs-5500-vial-how-remdesivir-b… रुग्णालये आपल्या औषधालयात सर्वात महाग असलेला ब्रँड ठेवतात ( जो बहुतेक वेळेस बहुराष्ट्रीय कंपनीचा असतो) कारण साधारण केमिस्टला १५ ते २० % अधिकृत कमिशन असते खालील दुवा पहा यात एकच औषध रुपये १९९ पासून ते रु १०५७ किमतीला आहे. https://sastimedicine.com/salt-alternatives/15218-2877194/Piperacillin-… येथे रुग्णालयाने २०० रुप्याचे औषध ठेवले तर त्यांना ४० रुपये फायदा होतो त्यापेक्षा १०५७ रुप्याचे औषध असले तर २१० रुपये नक्त फायदा होतो. आणि हे अधिकृत रित्या असते. हे औषध कोणत्या कंपनीचे आणायचे हे व्यवस्थापन आणि खरेदी विभाग ठरवत असतो ज्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग "नसतो." औषध "चांगल्या कंपनीचे" आहे एवढेच ते पाहू शकतात. या परिस्थितीत ना रुग्ण ना उपचार करणारा डॉक्टर काही करू शकतो या सारख्या बाबींमुळे रुग्णालयातील उपचार महाग होत जातात. मग ते कॉर्पोरेट असो किंवा खाजगी याला नेमका उपाय काय आहे हे डॉक्टरांच्या परिषदात बराच उहापोह झाला आहे( कारण महाग उपचाराना बहुतेक वेळेस डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाते). परंतु त्याचे नक्की उत्तर सापडलेले नाही.

डॉक्टर खरे ह्यांच्या मताशी सहमत आहे. महाग उपचार ह्याला फक्त डॉक्टर जबाबदार नाही बाकी अनेक लोक त्या मध्ये सहभागी आहेत. मोठमोठ्या औषध कंपन्या ज्या जास्त कमिशन देवून बाकी चांगल्या स्वस्त औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक नुकसान पोचवतात आणि त्यांना काम करणे अवघड करतात ह्या विषयी स्पष्ट नियम सरकार नी करावा .की इतकेच कमिशन देता येईल. दुसरे काळा बाजार करणारे जे साठा करून ठेवतात. आणि थोडा फार डॉक्टर चा सहभाग असतो. आता सरकार नी जेनेटिक औषध विकण्या साठी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या च नुसार सरकार नी काही औषध दुकाने चालू करावीत.

स्पष्ट नियम सरकार नी करावा .की इतकेच कमिशन देता येईल. सरकारने स्पष्ट नियम केलेले आहेत. DPCO किंवा औषध किंमत नियंत्रण कायदा आहे. पण त्यात सर्व औषधे येत नाहीत. नवीन औषध त्या सूचित टाकण्यास वेळ लागतो आणि आपले औषध या सूचित टाकण्यासाठी भरपूर कालापव्यय कसा होईल हे कंपन्या नेहमीच पाहत असतात अर्थात सरकारी अधिकारी यात भरपूर मलिदा घेतातच. त्यातून उत्तम औषधे DPCO किंवा औषध किंमत नियंत्रण कायद्यात आली कि कंपन्या त्याचा प्रचार आणि प्रसार थांबवतात. ती औषधे केमिस्ट कडे "उपलब्ध" होत नाहीत. उपलब्ध असली तरी आपले जास्त किमतीचे उत्पादन लिहावे म्हणून डॉक्टरांना आमिषे दाखवली जातात. आणि एवढा सगळं झाल्यावर सुद्धा एखादे औषध स्वस्त आहे म्हणजे ते फालतू आहे असा आपल्या जनतेचा गैरसमज करून दिला गेला आहे. भाई साहब , सस्ती चीज और याचंही चीज मी फरक होता है हे याचेच द्योतक आहे. रुग्ण सुद्धा सर्रास डॉक्टरांना सांगतात डॉक्टर जरा चांगलं महागाचं औषध लिहून द्या कोणत्याही सरकारी कामात भ्रष्टाचार झाला नाही असे होतच नाही अशी परिस्थिती झाली आहे.

मिपाचे दोन सुशिक्षित सदस्य येथे एकमेकांची लायकी काढत असल्याचे बघून मनोरंजन होतेय, संपादकही कुठे गायब झाले काही कळेना.

करोना वाफेने मरतो की नै ते नै सांगता येणार, पण दोन सन्माननीय सदस्यांच्या प्रतिसादांमधे तो जर आला तर नक्की मरेल असे वाटते. :) (हलकेच घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण पंचांच्या दुर्लक्षीकरणाचा फायदा घेऊन पैलवानांनी स्वतःच रिंगणात येऊन, पुन्हा नवा डाव टाकला आहे !

धाग्याचे तात्पर्य : नुसत्या वाफ घेण्याने, मानवी शरीरातील कोरोना व्हायरस मरत नाही. कारण, जर नुसत्या वाफेने कोरोना व्हायरस मेला असता, तर, कोरोनामुळे देशाला लॉकडाऊन मध्ये टाकणाऱ्या मोदींजींना, महामुर्ख म्हटले गेले असते.

In reply to by mrcoolguynice

धाग्याचे तात्पर्य : नुसत्या वाफ घेण्याने, मानवी शरीरातील कोरोना व्हायरस मरत नाही.
पूर्णतः सहमत
शेपुट: डोळे आणि त्वचेला ईजा न होऊ देता वाफ घेणे, जल नेती, कोमट पाण्याने स्नान ईत्यादी मानवी शरीरास पुरक सहाय्यकारी ठरू शकते. संदर्भ: १) BMC seven hills hospital Corona claim on steam therapy) २) जलनेती बद्दल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संशोधन संपून अहवालाची वाट पहा संदर्भ डॉ. धनंजय केळकरांचे व्याख्यान ३) Turning up the heat on COVID-19: heat as a therapeutic intervention

लॉक डाऊन करणाऱ्या इतर देशात श्री मोदी नसताना तिथे का लॉक डाऊन केला आहे? कि श्री मोदी हे जगाचे नेते आहेत? आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे?