Skip to main content

पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/07/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद, जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात. त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही. यास्तव ही पोस्ट. _____________________________________ या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत, त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल. तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्‍यांनी तो सिद्ध करायचा आहे. _______________________________ या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ १. हा सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती. २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही. ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही. ५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ ! अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत. ______________________________ तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे. ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. --मिपा व्यवस्थापन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70013
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

एकीकडे म्हणायचं, " मानवी स्मृती मॅनेज करणारी कोणतीही रिअल टाईम यंत्रणा नाही आणि मृत्यूत ती नष्ट होते याला प्रतिवाद करून दाखवा" आणि दुसरीकडे स्वतःच म्हणायचं "या प्रोसेसमधे काही वेळा स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो" बरं, ही तुमचीच परस्परविरोधी वाक्ये तुमच्या अनेक वेळेला लक्षात आणून दाखवली तरीही काही वेळाने पुन्हा तेच तुणतुणं वाजणं सुरु होतं तुमचं.

In reply to by कोहंसोहं१०

असे प्रतिसाद सरळ फाट्यावर मारले जातत. चुक कबुल करायला मनाचा मोकळेपणा लागतो, धैर्य लागतं. सर्वप्रथम आपलं चुकु शकतं याची जाणिव असावी लागते. आधि बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तूळ काढायचे, आणि त्या वर्तुळाचं अथक कवित्व गायचं.. हि मनोवृत्ती असल्यावर तुणतुण्याव्यतिरीक्त अजुन काय वाजणार...

संजय क्षीरसागर, १.
विषय पूर्वसंचित आणि कर्मफलाचा आहे. शिवाय अवयव प्रत्यारोपण ही अपवादत्मक केस आहे आणि जरी अशा स्मृती संक्रमित झाल्या तरी > २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे आणि त्या विधानाला बाधा येत नाही.
शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतात. याचा अर्थ स्मृतींना शरीराव्यतिरिक्त अस्तित्व आहे. त्यालाच कर्मफळ का म्हणू नये? २.
ती मॅनेज करणारी कोणतीही रिअल टाईम यंत्रणा नाही आणि मृत्यूत ती नष्ट होते याचा प्रतिवाद करुन दाखवा, कारण कर्मफलसिद्धांत या दोन गोष्टींवर आधारित आहे.
विकेंद्रित प्रक्रियनात ती म्यानेज करायला स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता नाही. हाच तर माझा मुद्दा आहे. प्रक्रियन विकेंद्रित असल्याने एकाच नोडवर ( म्हणजे एका माणसाच्या मेंदूत) इतरांच्या स्मृतीही साठवलेल्या असू शकतात. पुनर्जन्माच्या घटनेत आपल्या स्वत:च्या जुन्या स्मृती परत त्याच आकृतीबंधात कार्यान्वित होतात. हे प्रक्रियन विकेंद्रित असल्याने जुना मेंदू जाळून नष्ट झाला तरीही स्मृती इतरत्र ठिकाणाहून कार्यान्वित होतात. निदान असं अनुमान तरी काढता येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामाजी, तुमच्या एका प्रतिसादात दिलेल्या लिंक मधल्या पेपरमधे मेमरीवर एक चांगला परिच्छेद होता तो असा: four types of cellular memory are presented: (1) epigenetic memory, (2) DNA memory, (3) RNA memory, and (4) protein memory. Other possibilities, such as the transfer of memory via intracardiac neurological memory and energetic memory ह्यातली एनर्जेटीक मेमरी हा उप्रकार फार महत्वाचा आहे. तुम्ही संगणकातली ‘डाटा रिप्लिकेशन‘ ही संकल्पना जी समजावू पाहता आहात ती ह्या एनर्जेटीक मेमरी प्रकाराने समजू शकेल. - (रिप्लीकेटेड & डिस्ट्रीब्युटेड) सोकाजी

In reply to by गामा पैलवान

शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतात
इतरत्र? अंतराळात राहातात हे मागेच सिद्ध झालंय ना?

In reply to by गामा पैलवान

यात तुमचा घोळ होतोयं !
१. शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतात.
कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ?
२. > विकेंद्रित प्रक्रियनात ती म्यानेज करायला स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता नाही. हाच तर माझा मुद्दा आहे. प्रक्रियन विकेंद्रित असल्याने एकाच नोडवर ( म्हणजे एका माणसाच्या मेंदूत) इतरांच्या स्मृतीही साठवलेल्या असू शकतात.
इथे तर फंडामेंटल चूक झालीये. कर्मफल ही व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे. त्याच व्यक्तीचा डेटा प्रोसेस करुन त्याचंच कर्मफल ठरवायचं आहे. इतरांच्या स्मृती तुमच्या मेंदूत स्टोअर करुन उपयोग नाही आणि ते असंभव आहे. तुम्ही इतरांच्या जीवनात घडलेल्या घटना सांगू शकता का ? प्रोसेसिंग डिस्ट्रीब्यूटेड असेल तरी डेटा व्यक्तीनिष्ठच लागेल. नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील ! थोडक्यात, तुमचा काहीही तर्क आणि ठोकाठोकी चाललीये.
३.> पुनर्जन्माच्या घटनेत आपल्या स्वत:च्या जुन्या स्मृती परत त्याच आकृतीबंधात कार्यान्वित होतात. हे प्रक्रियन विकेंद्रित असल्याने जुना मेंदू जाळून नष्ट झाला तरीही स्मृती इतरत्र ठिकाणाहून कार्यान्वित होतात. निदान असं अनुमान तरी काढता येतं.
हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ? असं काहीही आणि कुठेही स्टोअर करणारी सिस्टम अस्तित्वात नाही. तुमचा दावा सर्वस्वी निराधार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ?
तुम्हीच तर म्हणालेलात ना अंतराळात म्हणून? तुम्हाला माहीत असेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ?
कुठे राहतात ते माहीत नाही. त्याचा पुरावा काही नाही. मात्र धूर दिसतो याचा अर्थ आग लागली आहे, असं अनुमान काढता येतं. २.
नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील !
तशी ती लागतातंच. यालाच संगाने कर्मफळ भोगावं लागणं म्हणतात. अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू होणे हे असंच नको त्या संगामुळे निर्माण झालेलं कर्मफळ आहे. पंचमहापातकांची यादी बघितली तर प्रत्यक्षात केवळ चारंच पापं आहेत. पाचवं पाप या चौघांच्या संगाचं आहे. कर्माची गती गहन आहे, असं प्राचीन तत्त्वज्ञांनी सांगून ठेवलंय. ३.
थोडक्यात, तुमचा काहीही तर्क आणि ठोकाठोकी चाललीये.
बरोबर आहे. यालाच चाचपणी असंही म्हणतात. मी कुठलेही दावे करीत नाही. ४.
हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ?
नक्की सांगता येणार नाही. इलेक्ट्रॉन नेमका कुठे असतो हे कोणालाही सांगता येत नाही. हेही तसंच समजा. ५.
असं काहीही आणि कुठेही स्टोअर करणारी सिस्टम अस्तित्वात नाही. तुमचा दावा सर्वस्वी निराधार आहे.
ज्याअर्थी धूर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली असणार. ज्याअर्थी जुन्या स्मृती नव्या बालकाच्या तोंडून बाहेर पडताहेत त्याअर्थी त्या देहाबाहेर कुठेतरी अस्तित्वात असणार. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ? कुठे राहतात ते माहीत नाही. त्याचा पुरावा काही नाही. मात्र धूर दिसतो याचा अर्थ आग लागली आहे, असं अनुमान काढता येतं.
कल्पना काहीही करता येते !
२. > नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील ! तशी ती लागतातंच. यालाच संगाने कर्मफळ भोगावं लागणं म्हणतात. अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू होणे हे असंच नको त्या संगामुळे निर्माण झालेलं कर्मफळ आहे. पंचमहापातकांची यादी बघितली तर प्रत्यक्षात केवळ चारंच पापं आहेत. पाचवं पाप या चौघांच्या संगाचं आहे. कर्माची गती गहन आहे, असं प्राचीन तत्त्वज्ञांनी सांगून ठेवलंय.
वाचा : ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही.
३., ४. ५. > सर्व अनुमानं आणि निव्वळ कल्पनाविलास !
लेखात मांडलेल्या १ ते ५ पैकी एकाही विधानाचा प्रतिवाद तुम्ही करु शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
कल्पना काहीही करता येते !
मात्र ती सुसंगत हवी ना? इंद्रियांवर मर्यादा असल्याने माणसाला इलेक्ट्रॉन दिसंत नाही. म्हणून त्याची कल्पना करून गणिती सूत्र मांडावी लागतात. दुसरा कोणताही मार्ग नाही. २.
शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत.
DNA ही कल्पना सुद्धा मानवीच आहे. विषाणू ही सुद्धा अशीच मानवी कल्पना आहे. ३.
३., ४. ५. > सर्व अनुमानं आणि निव्वळ कल्पनाविलास !
इलेक्ट्रॉन हा कल्पनाविलास असेल तर तसं नोबेल पारितोषिक समितीला कळवलं पाहिजे. तिने कल्पनाविलासला भुलून अनेकांना भौतिकशास्त्राची नोबेल पारितोषिकं बहाल केली आहेत. ४.
लेखात मांडलेल्या १ ते ५ पैकी एकाही विधानाचा प्रतिवाद तुम्ही करु शकत नाही.
करेक्ट. मी फक्त मत मांडतो. आ.न., -गा.पै.

माझे दोन पैसे. कर्मविपाक सिद्धांत हा मूळ हिंदू किंवा वेदिक धर्माचा भाग नव्हता. तो भगवद्गीतेच्या रूपाने महाभारतात फार नंतर घुसडला गेला. संपूर्ण भगवद्गीता ही प्रक्षिप्त आहे. विवक्षित फलाची अपेक्षा ठेवून केले जाणारे कर्म हा वेदिक धर्माचा किंवा जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग होता. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ह्यालाच पूर्वमीमांसा किंवा पूर्ववेदांत असे म्हटले जाते. जेव्हा ह्या कर्मकांडांचा आणि तदानुषंगिक बळी देण्यासारख्या प्रथांचा अतिरेक झाला तेव्हा जैन आणि बौद्ध मतांचा प्रभाव वाढला. त्यातही आन्विक्षिकी म्हणजे लोकायत किंवा चार्वाक ह्यांनी या कर्मकांडांवर फार कठोर भाषेत कोरडे ओढले आहेत. त्यातून नंतर जन्माला आले ते उपनिषदे किंवा उत्तरमीमांसा किंवा उत्तरवेदांतरुपी तत्त्वज्ञान. ह्यात कर्मकांडांना विरोध केलेला दिसतो. आता हा झाला इतिहास. पण मुळातच कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत परस्परविरोधी आहेत. जर एखाद्याचे पूर्वसंचित किंवा कर्म त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गुणोत्तर ठरवत असेल तर तिथे ईश्वर हा फॅक्टर बिनकामाचा ठरतो. कारण कर्म हे ईश्वरापेक्षा जास्त शक्तिशाली ठरते. इथे आपसूकच ईश्वराच्या सर्वशक्तीशाली अशा रूपाची संकल्पना व्यर्थ ठरते. आणि जर ईश्वरच प्रत्येकाकडून कर्म करवून घेत असेल असे मानले तर कर्माचे सामर्थ्य इथे कुचकामी ठरते. इथेही एकच ईश्वर हा भिन्न व्यक्तींकडून भिन्न कर्मे का करवून घेतो, एखाद्या अश्राप जीवावर दुसऱ्या गुन्हेगाराकडून बलात्कार करवून कसा काय घेतो हे उदाहरणार्थ, हा प्रश्न पडतोच. असा भेदभाव, अन्याय करणारा ईश्वर कसा असू शकेल ह्याचे समाधानकारक उत्तर जगातील कुठलाही धर्म वा पंथ देऊ शकत नाही, ही ईश्वर ह्या संकल्पनेची शोकांतिका आहे. थोडक्यात कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही केवळ काही मनुष्यांंच्या मनातून उद्भवलेले कल्पनाविलास आहेत. ह्या सिद्धांतांंच्या आहारी न लागताही, कुठल्याही प्रकारची श्रद्धा न बाळगताही, उच्च नीतीमत्तेचे आयुष्य जगता येते आणि चंगळवाद टाळूनही भौतिक सुखांचा सम्यक आस्वाद घेत आपले जीवन सुखाने आणि संतोषाने व्यतीत करता येते हे महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे. आणि हाच सम्यक विज्ञानवाद जगण्याचा योग्य मार्ग आहे. इत्यलम!

In reply to by एस

पण मुळातच कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत परस्परविरोधी आहेत. जर एखाद्याचे पूर्वसंचित किंवा कर्म त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गुणोत्तर ठरवत असेल तर तिथे ईश्वर हा फॅक्टर बिनकामाचा ठरतो. कारण कर्म हे ईश्वरापेक्षा जास्त शक्तिशाली ठरते. इथे आपसूकच ईश्वराच्या सर्वशक्तीशाली अशा रूपाची संकल्पना व्यर्थ ठरते. आणि जर ईश्वरच प्रत्येकाकडून कर्म करवून घेत असेल असे मानले तर कर्माचे सामर्थ्य इथे कुचकामी ठरते. थोडक्यात कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही केवळ काही मनुष्यांंच्या मनातून उद्भवलेले कल्पनाविलास आहेत.
ह्या सिद्धांतांंच्या आहारी न लागताही, कुठल्याही प्रकारची श्रद्धा न बाळगताही, उच्च नीतीमत्तेचे आयुष्य जगता येते आणि चंगळवाद टाळूनही भौतिक सुखांचा सम्यक आस्वाद घेत आपले जीवन सुखाने आणि संतोषाने व्यतीत करता येते हे महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे. आणि हाच सम्यक विज्ञानवाद जगण्याचा योग्य मार्ग आहे.
इतकी उघड गोष्ट, सुशिक्षित आणि किमान विचार करु शकणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या लक्षात येत नाही हे नवल आहे !

In reply to by एस

कर्मविपाक सिद्धांत हा मूळ हिंदू किंवा वेदिक धर्माचा भाग नव्हता....विवक्षित फलाची अपेक्षा ठेवून केले जाणारे कर्म हा वेदिक धर्माचा किंवा जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग होता >>>>> हे दोन्ही परस्परविरोधी नाही वाटत का तुम्हाला? वेदांमधील कर्मकांडातील पूजा ह्या कर्म (पूजेच्या रूपाने केले जाणारे) आणि त्यातून मिळणारे फळ ह्यावर जर अवलंबून असतील तर तो कर्मसिद्धांतच झाला ना? कर्मसिद्धांत एवढाच सांगतो कि केलेल्या कर्माचे फळ मिळेल. ते लगेच त्या क्षणीच मिळेल असे नाही कारण कर्माचे बीज अंकुरित होणे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर ते कर्म जमा होते (संचित कर्म) आणि योग्य वेळ अली कि मार्कबीजाला अंकुर फुटतो. त्याला एका जन्माची मर्यादा नाही. वेदान्ताचे म्हणाल तर उपनिषदाचा जोर परमात्मा/ब्रह्म प्राप्तीवर दिला आहे हे खरे आहे. पण नादबिंदू उपनिषदात प्रारब्धाचा उल्लेख आहे - आत्मानं सततं ज्ञात्वा कालं नय महामते | प्रारब्धमखिलं भुञ्जन्नोद्वेगं कर्तुमर्हसि || २१|| जर एखाद्याचे पूर्वसंचित किंवा कर्म त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गुणोत्तर ठरवत असेल तर तिथे ईश्वर हा फॅक्टर बिनकामाचा ठरतो >>>>>> पेट्रोल असल्याशिवाय गाडी चालत नाही. कारणाशिवाय कार्य नाही. पूर्वसंचित किंवा कर्मफलाप्रमाणे रिसल्ट मिळणे हे झाले कार्य. पण त्याला नियंत्रित करणारी, कोणते आणि किती कर्म कोणत्या वेळी फळ देणार कि व्यवस्था चालवायला जो आहे तो ईश्वर. जर एखाद्याचे पूर्वसंचित किंवा कर्म त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गुणोत्तर ठरवत असेल तर तिथे ईश्वर हा फॅक्टर बिनकामाचा ठरतो. कारण कर्म हे ईश्वरापेक्षा जास्त शक्तिशाली ठरते. इथे आपसूकच ईश्वराच्या सर्वशक्तीशाली अशा रूपाची संकल्पना व्यर्थ ठरते. आणि जर ईश्वरच प्रत्येकाकडून कर्म करवून घेत असेल असे मानले तर कर्माचे सामर्थ्य इथे कुचकामी ठरते >>>>> संचित कर्माचा बॅलन्स फक्त भोगुनच संपतो असा तुम्हाला समज झालेला दिसतो. कर्म करणे जसे माणसाच्या हाती आहे तसे त्या कर्माचा प्रभाव कमी करणे किंवा नष्ट करणे हेही माणसाच्या हाती आहे. कर्मसाखळी तोडण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. ईश्वरसानिध्य जेवढे जास्त तेवढे कर्मबंधन कमी होत जाते. अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः॥१८-६६॥ भेदभाव, अन्याय करणारा ईश्वर कसा असू शकेल ह्याचे समाधानकारक उत्तर जगातील कुठलाही धर्म वा पंथ देऊ शकत नाही, ही ईश्वर ह्या संकल्पनेची शोकांतिका आहे>>>>>> ईश्वर कोणाकडून कर्म करून घेत नाही. किंवा अन्याय भेदभावही करत नाही.हे कर्मसिद्धांत नीट कळून न घेतल्यामुळे झालेले गैरसमज आहेत. कर्म करण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे परंतु त्या स्वातंत्र्याचा कसा उपयोग तुम्ही करता त्यावरून होणारे परिणाम भोगावे लागणे हा साधा नियम आहे. म्हणूनच कर्मसिद्धांत आणि ईश्वर आपापल्या जागी शक्तिशाली आहेत आणि माणसाला चॉईस आहे. जेवढे तुम्ही ईश्वराभिमुख व्हाल तेवढा कर्माचे ओझे कमी होईल कारण ते कर्म अंकुरित होण्याआधी नष्ट करण्याची किंवा अंकुरित झालेले कर्मफल शक्य तेवढ्या कमी त्रासाचे होईल हे पाहण्याची जबाबदारी त्याची. रादर ते आपोआपच होत जाईल. एखाद्या थंड प्रदेशात शेकोटी पेटवली असेल तर तुम्ही जेवढे शेकोटीजवळ जाल तेवढी तुमची थंडी आओपाप कमी होईल. जेवढे तुम्ही लांब तेवढा तुम्हाला थंडीचा त्रास जास्त. तुम्हाला कुठे थांबायला आवडेल हा चॉईस तुमचा आहे. ह्या सिद्धांतांंच्या आहारी न लागताही, कुठल्याही प्रकारची श्रद्धा न बाळगताही, उच्च नीतीमत्तेचे आयुष्य जगता येते आणि चंगळवाद टाळूनही भौतिक सुखांचा सम्यक आस्वाद घेत आपले जीवन सुखाने आणि संतोषाने व्यतीत करता येते हे महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे. >>>>> कोणी आपले जीवन कसे जगावे हा ज्याचा त्याचा चॉईस. तुमचा ईश्वरावर किंवा कर्मसिद्धांतावर विश्वास असू किंवा नसू दे त्याने फरक काहीच पडत नाही. तो त्याचे कार्य करत राहील आणि त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव मिळत राहतील. मानो या ना मानो. चॉईस तुमचा.

प्रतिसाद तुम्हाला रेफर करुन देतोय, पण तो पर्सनली तुम्ही म्हणुन घेऊ नका. सर्वप्रथम आपल्याला 'कर्म' म्हणजे काय हे लक्षात घ्यावं लागेल. अपघाताचंच उदाहरण घेऊ या. (आता अपघात कोणि मुद्दाम करुन घेत नाहि. मग त्याला 'कर्म' म्हणायचं काय... असे प्रश्न बाजुला ठेउया. एक घटना म्हणुन तिच्याकडे बघुया) हे अपघाताचं कर्म घडलं, पाय मोडला. हि घटना घडताना जो काहि आवाज झाला (गाड्यांचा, पडण्याचा वगैरे), जे तुम्ही बघितलं (प्रसंगातले घटक), आणि जे स्पर्ष तुम्ही अनुभवले (रुतणे, कापणे, मुरगळणे, धक्का बसणे वगैरे)... या सर्वांचा दृक्/श्राव्य्/स्पर्ष आठवणी काहि प्रमाणात मेंदुने नोंद केल्या. पण हे 'कर्म' फक्त डोळे, कान, कातडी, एव्हढचं लिमीटेड होतं का? पाय मोडला असेल तर स्नायु, हाडं यांनी बदल टिपला. रक्त आलं असेल रक्तवाहिन्यांनी नोंद घेतली. या सर्व घडामोडींवर आता शरीर प्रतिसाद देणं सुरु करेल. तुम्ही पेनकिलर घेऊन दु:ख दाबुन टाकलं. फार सिरीयस असेल तर डॉक्टर अनॅस्थेशीया देऊन दु:ख अजीबात जाणवणार नाहि असं प्रोव्हीजन करतील. फारच क्रिटीकल अपघात झाला असेल, मेंदुला घक्का लागला असेल मेंदुतुन कदाचीत सगळ्या दृक्/श्राव्य्/स्पर्ष आठवणी पुसल्या जातील. पण या आठवणी पुसल्या गेल्या म्हणजे मोडलेला पाय जोडला जाईल का? शरीराच्या इतर व्यवस्थांनी या कर्माची जि नोंद घेतली आहे त्या बरहुकुम प्रतिसाद दिला जाणार नाहि का? तुम्ही दृक्/श्राव्य आठवणी विसरलात तरी घटना विसरली गेली आहे का? या सगळ्या 'कर्माच्या स्मृती' किती दीर्घकाळ कॅरी फॉर्वड होतील हे फक्त दृक्/श्राव्य आठवणी डिसाईड करेल का? या स्मृती जैवीक पद्धतीने नोंद घेऊन, जैवीक प्रभावानेच कॅरी फॉर्वर्ड होणार नाहि का? कर्माच्या या स्मृती किती काळ टिकतील? कदाचीत आयुष्यभर... उंदरांवर विजेच्या शॉकचा प्रयोग केला गेला. शॉक दिलेल्य उंदरांच्या पुढल्या काहि पिढ्या त्या विजेरी तारांपासुन आपसुक लांब राहिल्या. झुरळं आपल्या 'स्मृती' लाखो वर्षांपासुन जतन करुन आहेत. 'कर्मा'तुन तयार होणार्या अनेक 'मेमरी' मधलं एका टाईपचं, जेनेटीक मेमरीचं, हे केवळ उदाहरण आहे. आपल्या फ्री विल ने कळत-नकळत अनेक प्रकारच्या ऊर्जा आयुष्यभर हाताळणार्‍या माणसाच्या प्रत्येक कर्माची नोंद किती पद्धतीने, किती पातळ्यांवर, किती डायमेन्शन्स मधे होत असेल, आणि त्यावर कसल्या रिअ‍ॅक्शन येत असतील, हा विषय थोडा विचार करण्यालायक नाहि का? घटना घडली, पुढे थोडीफार आठवत गेली, मग विसरली गेली, विषय संपला... खरच एव्हढं थिल्लर प्रकरण आहे का हे? पुनर्जन्म, पूर्वसंचीत, कर्मसिद्धांत, त्याचं कॅल्क्युलेशन, ते कोण मेनेज करतं वगैरे प्रश्नांची उत्तरं फार लांब राहिली. सर्वप्रथम या विषयाचा आवाका तरी लक्षात येतोय का? दृक्/श्राव्य आठवणींचं लाईफटाईम कितीसं असणार? आणि आपण फक्त त्यावरुन एकदम कर्मविपाक वगैरे विषय मोडीत काढायचे ? ज्यांनी त्यावर सिरीयसली चिंतन, मनन, प्रयोग, अभ्यास केला, त्यांना सरळ मूर्खात काढायचं ? थिंक ऑफ इट.

In reply to by अर्धवटराव

केवळ तुमच्या भल्यासाठी प्रतिसाद देतो. तुम्ही तो राइट स्पिरीटमधे घ्याल अशी अपेक्षा आहे. सोत्रीच्या प्रतिसादाशी तुम्ही संपूर्ण सहमत आहात आणि सोत्रीनी म्हटलंय :
मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. execution of free will वगैरे कितीही शब्दात कर्माची डेफीनेशन पकडतो म्हटलं तरी कर्म हि इतकी गहन संकल्पना आहे कि मती गुंग व्हावी.
थोडक्यात, तुम्हा दोघांनाही कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म काय आहे याची कल्पना नाही. तुम्ही जैविक स्मृतीत गेलात आणि सोत्री क्वांटम फिजिक्समधे ! १. कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म म्हणजे ज्यात तुम्ही उघडपणे कर्ता आहात, जे करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे असं ऐच्छिक कर्म. २. तुम्ही विचार करतायं त्या जैविक स्मृतींनी घडणार्‍या क्रिया (इम्युन सिस्टम, जिनोम, किंवा तत्सम रुधिराभिसरण, अन्नपचन) कर्मसिद्धांताच्या कक्षेतच येत नाहीत कारण त्यात कर्ता म्हणून व्यक्तीची कामगिरी शून्य असते. ३. सोत्रींनी क्वांटम फिजिक्समधे आणून असाच विपर्यास केला आहे. त्याचा आणि व्यक्तीगत कर्माचा सुतराम संबंध नाही. ४. गीतेत सांगितलेला कर्मयोग आणि तिथे अपेक्षित असलेलं कर्ता प्रभावित कर्म हा कर्मसिद्धांताचा विषय आहे कारण जैविक स्मृतींनी किंवा क्वांटम फिजिक्सनुसार घडणार्‍या कर्माचा कर्मविपाक शून्य आहे. थोडक्यात, तुम्ही दोघांनीही वेगळीच लाईन पकडली आहे ! ५. सोत्रींनी तर पुढे हाईट केली आहे :
पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाही
पूर्वसंचित आणि कर्मविपाकाचा पाप-पुण्याशी संबंध नसेल तर तो सिद्धांतच फेल जातो ही उघड गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही. जर तसा संबंध नसेल तर देव या संकल्पनेलाही अर्थ उरत नाही कारण कर्मसिद्धांत मॅनेज करणारा कुणी राहातच नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

तर खरच तुम्हच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे आहे, कारण जसं तुम्हाला आमचं आकलन चुकीचं वाटतय तसं मला तुमचं आकलन चुकीचं वाटतय.
थोडक्यात, तुम्हा दोघांनाही कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म काय आहे याची कल्पना नाही. तुम्ही जैविक स्मृतीत गेलात आणि सोत्री क्वांटम फिजिक्समधे !
तुम्ही 'कर्म' फार लिमीटेड अर्थाने घेताय. कर्म नेहेमी साकल्याने होते, आयसोलेशनने नाहि. घटक जैवीक असोत वा आधुनीक विज्ञान शस्त्रातल्या संज्ञा वापरुन निर्देशीत केलेले पदार्थाचे गुणधर्म असोत.. कर्म सगळ्या पातळ्यांना टच करतं. निसर्गात कुठलीच गोष्ट सुट्या पद्धतीने होत नाहि (निसर्ग म्हणजे केवळ झाडं, नद्या, पर्वत आणि ग्रह तारे नाहित. कंडक्टींग मटेरीअलच्या भोवती चुंबकीय प्रवाह नेला असता निर्माण होणारा विद्युत प्रवाह देखील निसर्ग आहे, व ज्या नियमांनी हि ऊर्जा ट्रान्स्फॉर्म होते ते नियमही निसर्गच आहेत)
१. कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म म्हणजे ज्यात तुम्ही उघडपणे कर्ता आहात, जे करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे असं ऐच्छिक कर्म.
अगदी सिरीयसली विचारतोय... 'उघडपणे' म्हणजे काय? कायीक पातळीवर जी अ‍ॅच्युअल हालचाल होते ते ? मानसीक पातळीवर कर्माचा विचार झाला, अगदी सिंपल उदाहरण म्हणजे आणखी एक पोळी खावी कि नको, आणि तुम्ही प्रत्यक्ष्य पोळी पानात घेतलीच नाहि.. म्हणजे कुठलच कर्म झालं नाहि असा काहिसा अर्थ अभिप्रेत आहे का? असल्यास तो चुकीचा आहे. कर्म इतकं शॅलो नाहि. परत सिरीयसली विचारतोय... 'ऐच्छीक कर्म' म्हणजे काय ? कारण कर्मविपाकाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. ढोबळ मानाने बघायचं झाल्यास 'इच्छा' परिणामांना प्रभावीत करणारी, परिणामांचा रोख निश्चित करणारी संज्ञा आहे. भौतीकीच्या नियमांनी चालणार्‍या जड व्यवहारांच्या वृत्तींना निवृती करणानी अशी हि 'इच्छा' नामक एण्टीटी स्थूलाची पुढली स्टेज डिसाईड करते. कर्त्याला इच्छा झाली, इच्छेने जडाला हलवलं. जड आपल्या वृत्तींसकट हललं. जडाच्या या बदललेया वृत्ती परत कर्त्यासमोर उभ्या ठाकल्या, बिकॉझ हि आस्क्ड फॉर इट. कर्म सिद्धांताचा ढोबळ मानाने हा बेस आहे. कर्ता सतत आपली फ्री विल एक्झीक्यूट करत असतो. मनाच्या, व्यावहारीक दृष्टीने आठवणीच्या पातळीवर हि फ्री विल शब्द रुपाने प्रकट होवो अथवा न होवो (सहसा ति होत नाहिच... अगदी ९९.९९% टाइम्स). कर्ता सतत मेनु ऑर्डर देत असतो. त्यानुसार त्याच्या समोर प्लेट येत असते. आपण हि प्लेट कधि ऑर्डर केली हे कर्त्याला आठवणे, न आठवणे हि फार क्षुल्लक बाब आहे, कारण हि आठवण देणारी मेमरीच मुळी अतीशय क्षुल्लक आहे (पाढे पाठ करणारी हिच ति बया). थोडक्यात काय, तर अशा पाढे पाठ करणार्‍या मेमरीचा आणि कर्माच्या मेकॅनिक्सचा काहि संबंध नाहि. असलाच तर, कर्म ज्याप्रमाणे सजीवाचा अखत्यारीत असलेल्या जड तत्वाला जसं प्रभावीत करतं तसं या मेमरीला देखील करतं. इतकाच तिचा रोल.
२. तुम्ही विचार करतायं त्या जैविक स्मृतींनी घडणार्‍या क्रिया (इम्युन सिस्टम, जिनोम, किंवा तत्सम रुधिराभिसरण, अन्नपचन) कर्मसिद्धांताच्या कक्षेतच येत नाहीत कारण त्यात कर्ता म्हणून व्यक्तीची कामगिरी शून्य असते.
वर म्हटल्याप्रमाणे अशी कुठलीच गोष्ट नाहि जि कर्म सिद्धांताच्या कक्षेत येत नाहि. मग तो पदार्थ असो वा ऊर्जेची रुपं.
३. सोत्रींनी क्वांटम फिजिक्समधे आणून असाच विपर्यास केला आहे. त्याचा आणि व्यक्तीगत कर्माचा सुतराम संबंध नाही.
अगदी १००% संबंध आहे. क्वांटम फिजिस्क भौतीकीच्या सूक्ष्म पातळ्यांचा अभ्यास करते. कर्म या सर्व पातळ्यांवर प्रभाव टाकतं. वर म्हटलय तसं कर्माने भौतीकाची वृत्ती बदलते (वृत्ती = करंट नेट टेण्डन्सी) वृत्तीतला हा बदल आत्यंतीक सूक्ष्म ते स्थूल पातळ्यांवर अभ्यासला जातो. त्यानुसार भौतीकशास्त्राच्या शाखा तयार होतात.
४. गीतेत सांगितलेला कर्मयोग आणि तिथे अपेक्षित असलेलं कर्ता प्रभावित कर्म हा कर्मसिद्धांताचा विषय आहे कारण जैविक स्मृतींनी किंवा क्वांटम फिजिक्सनुसार घडणार्‍या कर्माचा कर्मविपाक शून्य आहे.
भगवद्गीतेत सांगीतलेला कर्म योग आणि तिथे अपेक्षीत कर्ता-कर्मच वर सांगितलं आहे. ** भगवद्गीता फार वेगळा विषय आहे. अशी सुट्या पद्धतीने गीतेतल्या विषयांची मांडणी करणं चुक आहे. भगवद्गीतेचा मुख्य , किंबहुना एकमेव विषय म्हणजे सजीवाची वासुदेव भक्तीत परिणीत होणारी अवस्था. सगळी गीता या एका कन्सेप्टवर तोलली आहे. गीतेत वर्णीलेला कर्मयोग देखील त्यापासुन वेगळा काढता येत नाहि. पण तो भिन्न विषय आहे. आणि कदाचीत इथे त्याची चर्चा कठीण आहे.
थोडक्यात, तुम्ही दोघांनीही वेगळीच लाईन पकडली आहे !
आम्हाला जि लाइन प्रामाणीकपणे दिसली ति आम्हि टंकली. इतर लाइनींचा खुल्या दिलाने विचार करण्याचं आम्हाला अजीबात वावडं नाहि. प्रतिसादाची दिशा मात्र प्रश्नकर्त्याच्या टोनवर अवलंबुन असते. या धाग्यात कर्मविपाक आणि त्याचा मेमरी वगैरे विषयांशी अत्यंत उथळ आणि चुकाचा समंध दाखवला गेला, असं आम्हाला वाटलं. तसच ते संयतपणे नमुद देखील केलं होतं. असो.
पूर्वसंचित आणि कर्मविपाकाचा पाप-पुण्याशी संबंध नसेल तर तो सिद्धांतच फेल जातो ही उघड गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही. जर तसा संबंध नसेल तर देव या संकल्पनेलाही अर्थ उरत नाही कारण कर्मसिद्धांत मॅनेज करणारा कुणी राहातच नाही !
पाप-पूण्याच्या इतक्या वेगवेगळ्या छटा प्रचलीत आहेत कि विचारता सोय नाहि. मॉरल पोलिसींग, कुठलच अपिअरंट कारण नसता भोगायला लागलेली सुख-दु:ख, धार्मीक ग्रंथांमधे या दोन्हिचं फ्युजन, माणसाच्या अवस्थांवर प्रभाव टाकणारं आजवर कलेक्ट झालेलं मॅग्निट्युड, अगदी कॅश ट्रान्स्फर करावी तशा कर्म प्रभाव मॅनिप्युलेट करणार्‍या संकल्पना... पाप-पुण्याच्या बाबतीत हे सर्वच खरं आहे. राहिल प्रश्न देवाचा... तर देव.. ईश्वर म्हणुया, हा कन्सेप्ट देखील फक्त पाप-पुण्याच्या तराजुने मोजावा इतका उथळ नाहि. गोविंद = सर्व कारण कारणम् (root cause of all causes, and cause of itself). हा वाद-विवादाचा विषय नसुन रिअलझेशनचा आहे. कोणाला खरच ते रिअलाइझ करायचं असेल तर, आणि तरच, त्यावर चर्चा संभवते. अन्यथा नुसता वितंडवाद. पण तो सध्याचा विषय नाहि. धन्यवाद

जीन्स आणि इम्यून सिस्टम हे स्मृतींचे भंडार आहेत. जीन्स मध्ये साठवलेली जैविक मेमरी गुणधर्मांसह पुढच्या पिढीत संक्रमित होते हे सांगायला डॉक्टरचीही गरज नाही. तस्मात 'स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही ' असली भंपक विधानं कोणी कसे काय करू शकतो हे नवलच म्हणायचे. एकूणच अनुभव आणि अभ्यास नसलेल्या क्षेत्रात ज्ञान पाजळायला जाणे आणि आपले अज्ञानाचे पितळ उघडे पाडणे हे नित्याचेच झाले आहे काही जणान्च्या बाबतीत.

In reply to by संजय क्षीरसागर

वरच्या प्रतिसादात मी कर्मसिद्धांताचा कोठेही उल्लेख केला नाहीये. वरचा प्रतिसाद हा केवळ स्मृती केवळ मेंदूमध्ये असतात बाकी कुठे नाही ह्या विधानातील फोलपणा दर्शवून देण्याचा होता. कारण जैविक स्मृती पण शेवटी स्मृतीच झाली. आता राहिले कर्मसिद्धांताचे तर माझे त्यावर इथे आधीच मत देऊन झालेले आहे

In reply to by कोहंसोहं१०

माहिती नाही असा प्रतिसादाचा अर्थ आहे. तुम्ही ज्या जैविक स्मृती म्हणतायं त्या अनैच्छिक शारिरिक क्रिया करतात त्यातून शून्य कर्मविपाक होतो. प्रतिसाद पुन्हा वाचा. सर्व कर्ता प्रभावित ऐच्छिक क्रियांची स्मृती मेंदूत असते. तुमच्या आधीच्या प्रतिसादाला नंतर उत्तर देईनच.

In reply to by संजय क्षीरसागर

आता मुद्दा खोडला गेल्यामुळे तुम्ही चर्चा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करताय (नेहमीप्रमाणे). मी आधीच्या प्रतिसादात लिहिलेच आहे कि माझ्या त्या प्रतिसादाचा विषय कर्मविपाकाशी निगडित नाहीच आहे. तुम्ही स्मृतींविषयी जे वाक्य लिहिले होते ते कसे अयोग्य होते हे मी दाखवून दिले होते इतकेच. तुम्हाला प्रतिसाद पुन्हा वाचण्याची गरज आहे. तुम्हाला जर तुम्ही म्हणताय ती स्मृती केवळ कर्मविपाकापूरती अपेक्षित होती तर ते प्रत्यक्षपणे तसे नमूद करायला पाहिजे होते. तुम्ही म्हणताना सरसकट स्मृती म्हणणार आणि घेताना शब्दाचा केवळ तुम्हाला जो अपेक्षित अर्थ आहे तोच घेणार यावरून तुमच्या लेखन आणि विचार मर्यादा स्पष्ट होतात. आता कर्मविपाक बद्दल बोलायचे झाल्यास त्यावरही मी आधी प्रतिसाद लिहिलेलाच आहे. आधी म्हणल्याप्रमाणे तुमची झेप फक्त भौतिक स्तरावरची आहे आणि अध्यात्म भौतिकातून सूक्ष्म आणि नंतर त्याही परे जाते. तुम्ही तुमची भौतिक पातळी काय सोडायला तयार नाही आणि तुमच्या प्रतिसादातून दिसतेच की तुमचा अध्यात्माचा अभ्यासही नाही. तुमच्याशी चर्चा करण्याचाही काही उपयोग नाही हेही एका प्रतिसादात सांगितले आहेच. एक कॉमन सेन्स जो मी पाळतो- जर ऐकायचच असेल तर ज्याचा एखाद्या विषयातील अभ्यास आणि अनुभव आहे त्याचं ऐकतो. समजलेले समोरचा उत्सुक असेल तर त्यासही सांगतो पण त्याने विश्वास ठेवलाच पाहिजे हा दुराग्रह धरत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या विषयातला माझा फारसा अभ्यास नाही किंवा अनुभव नाही त्याबद्दल केवळ मला वाटते म्हणून तेच बरोबर म्हणत इतरांवर माझी मते दुराग्रहीपणे लादत बसत नाही. बाकी अध्यात्माचा काडीचाही अभ्यास नसताना तुमच्या त्याबद्दलच्या धारणा, कल्पना म्हणजे पहिलीतल्या मतिमंद मुलाने आईस्टाईन किंवा न्यूटनला भौतिकशास्त्रातील निर्बुद्ध व्यक्ती म्हणण्यासारखे आहे.

In reply to by कपिलमुनी

Additionally, if the pig leaves the town, dont invite it again because, true to its nature, it will create a mud pond and provoke everyone into wrestling.

धर्माधारीत दाव्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मला योग्य वाटत नाही. धर्म आणि विज्ञान म्युचुअली एक्सकलुसिव्ह आहेत असे मला नाही म्हणायचे, पण जनुकामध्ये किंवा इतरत्र साठवली गेलेली माहिती म्हणजेच पूर्वसंचिताची कल्पना आहे हे म्हणणे मला अतार्किक वाटते. पूर्वसंचिताची कल्पना ही नाही आहे काय ?- माणसाने केलेल्या कृतीचे संचय (साठा) होत असतो, आणि हा संचित पाप आणि पुण्य ह्या दोन भागात विभागले जातो. ह्या संचिताचा परिणाम तुमच्या भावी आयुष्यात/ पुढच्या जन्मात होतो. सोनम कपूर म्हणते तसं- कदाचित तिचे पूर्वसंचित असल्यामुळे ती मोठ्या कलाकारापोटी जन्माला आली. ह्याचाच दुसरा परिणाम हा आज दुःखी अवस्थेत असलेल्या लोकांच्या दुःखाचे कारण त्यांचे आधीच्या जीवनातील/सद्य जीवनातील "दुष्कृत्ये" आहेत. हीच कल्पना समाजमान्य नाही आहे काय ? त्यामूळे जुनी आणि वेल डिफाइन्ड कल्पना घेऊन त्याला काही वेगळे म्हणणे, मात्र त्याच नावाने... हे मला आनंदाने स्वतःच्या बोलण्याचा विपर्यास होऊ देणे वाटते. प्रत्येक गोष्टीचा काहीना काही रेकॉर्ड असतो, हे म्हणणे वेगळे आणि हेच पूर्वसंचित आहे म्हणणे फार वेगळे. वरील विवेचन कोणाला सद्यकाळात मान्य असेल असे वाटत नाही. इथे जी चर्चा होत आहे तिथे काहीच डिफाईन झालेलं नाही. पूर्वसंचित आणि कर्मविपाक हे वर म्हणल्याप्रमाणे आहे, का नाही, हे स्पष्टीकरण गरजेचे वाटते. त्यातच परत हा प्रश्न येतोच. जर पूर्वसंचित हा एक नैसर्गिक नियम आहे, तर काय दुष्कृत्य, काय पापकर्म आणि काय पुण्यकर्म हे काय नियमांवर ठरवले जाणार आहे? ही नैसर्गिक ऑर्डर हा फरक कसा करते ? पापपुण्याची कल्पना ही सामाजिक स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हती काय ? ह्याकडे आजही नैसर्गिक सत्य म्हणून पहिले जावे काय ? प्रत्येक चांगल्या कृतीने चांगले फळ मिळते किंवा वाईट कृतीचे वाईट फळ मिळते हे म्हणायला काय कारण आहे, हा दावा धर्माधारीत असण्याव्यतिरिक्त ? असे माझे एकूण म्हणणे.

In reply to by शा वि कु

जनुकामध्ये किंवा इतरत्र साठवली गेलेली माहिती म्हणजेच पूर्वसंचिताची कल्पना आहे हे म्हणणे मला अतार्किक वाटते.
इतक्यात अतार्किक वाटून घेऊ नका. क्वांटम फिजिक्सच्या क्वांटम एन्टॅन्गलंमेंट आणि क्वांटम फील्ड ह्या संकल्पना समजून घेतल्याखेरीज असे मत बनवू नका!
पापपुण्याची कल्पना ही सामाजिक स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हती काय ?
अगदी! पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाही. मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. कर्म म्हणजे काय हे नक्की केल्याशिवाय (टू बी ऑन सेम पेज) संवाद न होता वादच होऊ शकतो. (अर्थात, ज्यांना फक्त वादच करायचा आहे त्यांना वगळून). --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- क्वांटम फिजिक्सच्या संकल्पनांवर एक लेखमालिका लिहायचा मानस आहे, अभ्यास चालू आहे. हा प्रतिसाद आणि एका लेखाच्या पलीकडचा आवाका आहे, ह्यावरही एक लेखमालिका लिहायचा मानस आहे. - (क्वांटम साधक) सोकाजी

In reply to by शा वि कु

जनुकामध्ये किंवा इतरत्र साठवली गेलेली माहिती म्हणजेच पूर्वसंचिताची कल्पना आहे हे म्हणणे मला अतार्किक वाटते.
इतक्यात अतार्किक वाटून घेऊ नका. क्वांटम फिजिक्सच्या क्वांटम एन्टॅन्गलंमेंट आणि क्वांटम फील्ड ह्या संकल्पना समजून घेतल्याखेरीज असे मत बनवू नका!
पापपुण्याची कल्पना ही सामाजिक स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हती काय ?
अगदी! पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाही. मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. कर्म म्हणजे काय हे नक्की केल्याशिवाय (टू बी ऑन सेम पेज) संवाद न होता वादच होऊ शकतो. (अर्थात, ज्यांना फक्त वादच करायचा आहे त्यांना वगळून). --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- क्वांटम फिजिक्सच्या संकल्पनांवर एक लेखमालिका लिहायचा मानस आहे, अभ्यास चालू आहे. हा प्रतिसाद आणि एका लेखाच्या पलीकडचा आवाका आहे, ह्यावरही एक लेखमालिका लिहायचा मानस आहे. - (क्वांटम साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे.
execution of free will वगैरे कितीही शब्दात कर्माची डेफीनेशन पकडतो म्हटलं तरी कर्म हि इतकी गहन संकल्पना आहे कि मती गुंग व्हावी. होऊन जाऊ दे फक्कड लेखमाला.