Skip to main content

'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग




ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे फारच 'लोडेड' वाक्य आहे; कारण ह्यात ध्यान, ज्ञान आणि मार्ग (विपश्यना) ह्या तीन वेगवेगळ्या संकल्पनांचा उल्लेख येतो. प्रत्येक संकल्पना हा एक मोठा अभ्यासाचा विषय असल्याने ह्या तिन्ही संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेतली की त्यांचा परस्पर संबंध, जो विपश्यनेचा गाभा आहे, त्याचे रसग्रहण करण्याचा ह्या लेखाचा मानस आहे.

सर्वात आधी ज्ञान म्हणजे नेमके काय ते बघू या...

शाळा-कॉलेजात शिकलेले, आजूबाजूच्या वातावरणात रममाण होऊन आत्मसात केलेले, स्वानुभवातून आलेले, असे अनेक प्रकारे मिळवलेले कौशल्य आणि माहिती, हे आपण ज्या भौतिक जगात वावरतो त्याबद्दलचे भौतिक ज्ञान झाले. ते ज्ञान आपल्याला रोजच्या जगात तग धरून राहण्यासाठी (Survival) गरजेच आणि तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन आपण सगळे एका कैफात जगत असतो.

दृश्य भौतिक जगातल्या सर्व वस्तू ह्या जड (Solid) असतात, हा न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचा (Classical Physicsचा) पाया आहे. पदार्थ हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे ज्ञान Classical Physicsनुसार प्रमाणित झाले होते. ते पुढे क्वांटम फिजिक्सने आमूलाग्र बदलून टाकले. क्वांटम फिजिक्सच्या विविध थिअरींनुसार, सर्वात सूक्ष्म कण तरंगलहरी (Waves) असतात आणि 'ऑब्झर्व्हर इफेक्ट'नुसार ते जड स्वरूपात प्रकट होतात, असा सिद्धान्त मांडला आहे. हे सर्व सूक्ष्मात जाणे कशासाठी? तर, हे विश्व कसे बनले आहे, आपण कसे बनलो आहोत, आपल्या अस्तित्वाच्या मागच्या कोणत्या शक्ती आहेत हे ज्ञान मिळवण्यासाठी! पण हे सगळे बाह्य, जड आणि दृश्य प्रकाराने मिळवलेले ज्ञान फक्त अस्तित्वाचा मागोवा घेणार आहे आणि अस्तित्वाच्या भौतिक सुखासाठीच आहे. अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातले दु:ख संपले का? तो समाधानी झाला का? त्याचे विकार संपले का? तर नाही, उलटपक्षी तो अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झाला आणि नेणिवेत जगू लागलाय.

मनुष्य, अज्ञानामुळे (Ignoranceमुळे) इंद्रियसुखांच्या मागे लागून, ‘इंद्रियसुख’ हेच अंतिम सत्य मानून बसला आहे. त्यासाठी भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून तो सुखलोलुप होण्यात धन्यता मानतो आहे.


images-4

ज्ञानं तेसहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेह भूयोसन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते

भगवतगीतेतल्या ह्या श्लोकात (७.२) कृष्ण सांगतो - ज्ञान दोन प्रकारचे आहे, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. आपण ज्याला विज्ञान (Science) समजून बसलो आहोत ते प्रत्यक्षात आहे प्राकृत जगताचे ज्ञान (प्रत्यक्ष ज्ञान). कृष्ण ज्याला दिव्य ज्ञान म्हणतो आहे हे आहे खरे विज्ञान, जाणिवेचे (Consciousnessचे) आकलन. हे विज्ञान म्हणजेच, जडावस्थेच्या (gross reality) पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली (subtle reality) अनुभूती घेत जाणिवेचे (consciousness) होणारे ज्ञान!

आता प्रश्न पडेल की ह्या दिव्य ज्ञानाची (विज्ञान) गरजच काय? भौतिक जगात सुखसोयीयुक्त (Luxurious) आयुष्य मजेत चालले आले की! त्या सुखाबरोबर दु:खही असतेच आणि त्यामुळे येणारे चढउतार मान्य करूनच आयुष्याचा गाडा मजेत चालू आहे. काय गरज आहे ह्या असल्या सूक्ष्मावस्थेची आणि जाणिवेची? प्रश्न रास्त आहे. जन्म झाल्यापासून ते आताच्या क्षणापर्यंत आपल्या जगण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे, तो शरीर आणि मन ह्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतो. आपण सतत बाह्य जगाकडून, ५ इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संदेशांवर प्रतिक्रिया देत असतो. आणि हे इतके यंत्रवत झालेले असते की आपण आपल्या नकळत रीअ‍ॅक्ट होत असतो, निरंतर. आपल्या रोजच्या अनुभवांमधून आपण आपला जगण्याचा पॅटर्न सतत सुधारत, अधिकाधिक साचेबद्ध, ठरावीक आणि यांत्रिक करत असतो, आपल्या नकळत. हे सगळे अतिशय सूक्ष्म पातळीवर चाललेले असते, अविरत.

पण आयुष्यात एखादी वेळ अशी येते की त्या परिस्थितीला कसे हाताळायचे हे ज्ञान आपल्याकडे नसते. त्या वेळी मनुष्य उन्मळून पडतो, उद्ध्वस्त होतो. बरेच जण म्हणतील की अशी परिस्थिती फक्त कमकुवत मनाच्या लोकांबाबत होऊ शकते, कणखर मनाचे लोक कुठलीही परिस्थिती हाताळू शकतात. हा आत्मविश्वास आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून आलेला असतो. पण वृद्धावस्था, मोठे आजारपण किंवा मृत्यूची चाहूल ह्या आत्मविश्वासाला तडे देते, कारण ह्या परिस्थितींचा अनुभव नसतो आणि सूक्ष्म पातळीवर मन आणि शरीर ह्यांच्या परस्पर संबंधाच्या शास्त्राचे ज्ञान नसते आणि तेव्हा दु:खाशी सामना होतो, जो आतापर्यंत झालेला नसतो.

तर, मन आणि शरीर म्हणजेच आपण की आपण ह्या मन आणि शरीरापासून वेगळे आहोत? जर वेगळे आहोत, तर मग आपण म्हणजे नेमके कोण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? आणि अंतिम सत्य काय? हे जाणिवेच्या सूक्ष्म (विज्ञान) पातळीवरून समजून घेणे म्हणजे ज्ञान.

आता ध्यान म्हणजे काय ते बघू या.

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः।।

भगवद्गीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.७) कृष्ण सांगतो की ज्याने मन जिंकले आहे, त्याला शांती प्राप्त झाली आहे. अशा मनुष्यासाठी सुख-दु:ख, मान-अपमान, शीत-उष्ण हे समान असतात आणि तो मनुष्य कोणत्याही स्थितीत शांतच असतो.

ते मन का जिंकायचे आणि कसे जिंकायचे, त्याआधी हे मन म्हणजे काय आणि कसे काम करते हे समजून घ्यावे लागेल.

मज्जातंतुशास्त्राच्या सिद्धान्तांनुसार मानवी मेंदूची कार्यपद्धती, बाह्य जगतातून मिळालेल्या कुठल्याही संदेशाला ‘उपलब्ध माहितीच्या आधारे प्रतिक्षिप्त होणे (react)’ अशी असते. ही उपलब्ध माहिती आपण जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत, पाच इंद्रियांच्या - कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा यांच्या साहाय्याने बाह्य जगतातून मिळवलेली असते. पंचेंद्रिये त्यांच्या कार्यपरिप्रेक्ष्यातल्या, बाह्य जगतातल्या प्रत्येक जड आणि सूक्ष्म गोष्टींच्या नोंदी घेत असतात आणि मेंदूतल्या स्मृतिकोशांमधे साठवून ठेवत असतात, चोवीस तास,अविरत. आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, घटना, घटनास्थळे, घटनांच्या वेळा, त्या त्या वेळी त्या त्या व्यक्ती आणि घटनांवर व्यक्त केलेल्या / झालेल्या भावना, क्रिया-प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टी ‘स्मृती’ म्हणून स्मृतिकोशांमध्ये साठवल्या जातात.. बिग डेटाच म्हणा ना! ह्या व्यक्ती, ठिकाण, भौतिक वस्तू आणि वेळ ह्या संदर्भातल्या अनुभूती ज्या आपल्या स्मृती बनल्या आहेत, त्या आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात, वर्तणूक ठरवतात. रोज रोज आपण त्याच-त्याच व्यक्तींच्या संपर्कात येतो, उदा. नातेवाईक, बॉस, सहकर्मी, मित्र, शेजारी, वगैरे; त्याच त्याच वस्तू हाताळतो, उदा., टूथब्रश, टॉवेल, कार, कपडे, बूट, वगैरे; त्याच त्याच ठिकाणी जातो, उदा., ऑफिस, कॉफीशॉप, बाग, देऊळ, थिएटर, बार, रेस्तराँ, वगैरे; त्याच त्याच गोष्टी करतो, उदा., ऑफिसमध्ये पाट्या टाकणे, फेसबुकवर मतांच्या पिंका टाकत बसणे, बिचिंग करणे, कुचाळक्या करणे, जप करणे, मंत्र म्हणणे, भजन करणे, वगैरे. हे होताना, आपल्या मनात विविध भावना निर्माण होतात आणि त्याही स्मृतिकोशांमधे साठवल्या जातात. ह्या स्मृतींशी निगडित भावनांवर आरूढ होऊन अंतःपटलावर सतत उगम पावणारे विविध विचार हेच आपले मन.

आता कल्पना करा, एखादा खडूस सहकर्मी तुम्हाला अजिबात आवडत नाही, कारण तुम्हालाही स्पष्ट सांगता येत नाही, पण तो तुम्हाला आवडत नाही. तो समोर आला की तुम्ही त्याच्याशी नजरानजर टाळता. हे सगळे स्मृतिकोशांमधे साठवलेले आहे. एके दिवशी ऑफिसामध्ये तुम्ही एक आवाज ऐकता, कान तो आवाज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवतात. तिथे तो आवाज ओळखला जातो आणि स्मृतिकोशातून त्या आवाजाचा मालक तुमचा खडूस सहकर्मी आहे हे कळते. आता लगेच त्याच्याविषयी असणाऱ्या भावनांचे मज्जातंतूचे जाळे (neural network) उद्दीपित होऊन त्या भावना शरीरभर पसरतात. हे झाल्या झाल्या तुमचे मन प्रतिक्षिप्त क्रिया करते आणि तुमचा चेहऱ्यावर नाराजी झळकू लागते. त्याच्याबद्दलच्या जुन्या आठवणी विचारांच्या स्वरूपात अंतःपटलावर उमटू लागतात, ज्या कटू असतात. ह्या विचारांमुळे उद्दीपित झालेल्या भावना आणखी तीव्र होऊ लागतात. त्या आवाजाची कुजबुज अजूनही चालूच आहे. कान ती कुजबुज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवत राहतात आणि विचार येत राहणे आणि भावना उद्दीपित होत राहणे हे दुष्टचक्र चालू राहते. हे इतक्या प्रचंड वेगात होत असते की हे होतेय ही जाणीवच आपल्याला नसते. मग भावनेचा प्रचंड उद्रेक होऊन तुम्ही आवाजाच्या दिशेने जाऊन, "शांत बसा!" असे जोरात ओरडता. पण ओरडून झाल्यावर तुमच्या लक्षात येते की तो तुमचा खडूस सहकर्मी नसतोच मुळी, नवीनच रुजू झालेला एक नवीन कर्मचारी असतो. नवीन असल्यामुळे तो हळू आवाजात बोलत असतो.

ह्या उदाहरणावरून लक्षात येते की पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या बाह्य जगतातील उत्तेजना (stimuli) आपल्या मनाचा ताबा घेतात आणि मन यांत्रिकपणे जुन्या स्मृतींच्या आधारे शरीराकडून प्रतिक्षिप्त क्रिया करून घेत, आपल्या नकळत. वरच्या उदाहरणात नेमका प्रॉब्लेम कुठे सुरू झाला? स्मृतिकोशातील मज्जातंतूंच्या जाळ्यातून मिळालेल्या माहितीवरून तर्कबुद्धी जेव्हा त्या आवाजाचा मालक खडूस सहकर्मी आहे हे ठरवते तेव्हा? नाही, मनाला अजूनही प्रतिक्षिप्त व्हायला अजूनही उत्तेजना (stimuli) मिळाली नाहीये. पण ज्या क्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याच क्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरतात. ह्या संवेदनाच ओरडण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होण्यास कारणीभूत असतात, कारण मन फक्त आणि फक्त संवेदनांवरच प्रतिक्षिप्त होतं.


images-2

ह्या संवेदना बारा महिने चोवीस तास शरीरभर लहरत असतात. मन अविरत ह्या संवेदना वाचत असते आणि त्यांच्यावर प्रतिक्षिप्त क्रिया करत असते. हे होत असते, कारण आपण जाणिवेत नसतो. मोहाचा (ignoranceचा) पडदा पडल्यामुळे आपण नेणिवेत गेलेलो असतो आणि बाह्य जगातील घडामोडींमुळे उद्दीपित होऊन, मनाचा तोल जाऊन, मन शरीराकडून ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ करून घेत राहते, आपल्या नकळत.

मनाचे दोन भाग असतात. पंचेंद्रियांकडून माहिती मिळवत राहून ती मेंदूतल्या ज्ञानकेंद्रांकडे प्रोसेसिंगसाठी पाठवत राहणे हे काम करणारे मन 'चेतन मन' असते. त्या माहितीचे ज्ञानकेंद्रात प्रोसेसिंग करून प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणण्याचे काम करणारा भाग 'अचेतन मन'. हे अचेतन मन १२ महिने २४ X ७ कार्यरत असते, अगदी आपण झोपेत असतानाही. आपल्या वर्तणुकीला हेच अचेतन मन जबाबदार असते आणि संवेदनांवर प्रतिक्षिप्त होत असते . ह्या अचेतन मनाचा तोल ढळू न देणे आणि हे मन जे ‘आपल्या’ नकळत प्रतिक्षिप्त क्रिया करून घेतेय ते ‘आपण’ म्हणजे कोण? हेच ज्ञान मिळविण्यासाठी ध्यान करायचे.

ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाला ताब्यात ठेवून, प्रतिक्षिप्त क्रिया करू देण्याऐवजी, जाणिवेत ठेवून, ‘सुनियंत्रित क्रिया’ करायला शिकवायचे. ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाचे ‘रिप्रोग्रामिंग’ करायचे. हे ध्यान करणं अतिशय शास्त्रआधारित तंत्र आहे. ह्यात काहीही धार्मिक नाही, संप्रदायी नाही, दैवी नाही किंवा स्पिरीच्युअल नाही. ध्यान करणं आध्यात्मिक जरूर आहे कारण अध्यात्म म्हणजे स्वतःचं तटस्थ निरीक्षण, ह्यात आत्मा वगैरे काही नाही. मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधांचे शास्त्र अनुभवण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान!

आता ज्ञान आणि ध्यान म्हणजे काय हे कळल्यावर ध्यानाचा मार्ग, विपश्यनेकडे वळूयात...

आपलं मन चंचल असतं, ते शरीरावरील संवेदना पकडून, स्मृतीकोशांतील आठवणी काढून भूतकाळात रमलेलं असतं नाहीतर भविष्यातलं स्वप्नरंजन करण्यात मग्न असतं. नीट विचार करून बघा, मन वर्तमानात रमत नाही. ते वर्तमानात थांबायलाच तयार नसतं. जर मनाच रिप्रोग्रामिंग करायचं तर मन ताब्यात आणून त्याला वर्तमानात स्थिर करणं ही पहिली आणि गरजेची पायरी आहे. जर बाह्य संदेश मिळत राहिले तर मन आपला चंचल राहण्याचा धर्म पूर्ण करत राहणार म्हणजे हे बाह्य संदेश थांबावयाला हवेत. इथून थियरी संपून प्रॅक्टिकल (मार्गक्रमण) सुरू होते.

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: | सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||

भगवतगीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.१३) सांगितलेल्या स्थितीत शरीर, मान आणि डोके उभ्या सरळ रेषेत धरून डोळे बंद करून मांडी घालून स्थिर बसायचे. डोळे बंद केल्यास आपण बाह्य जगताशी संबंध तोडू शकतो आणि अंतर्मुख होण्याची ती पहिली पायरी आहे. त्यानंतर मन एकाग्र करून त्याला वर्तमानात थांबून ठेवल्यास ते शांत होऊ लागत. जितकी मनाची एकाग्रता जास्त तितके ते अधिकाधिक शांत होत जाते. मनाला सतत काहीतरी काम लागत ते स्वस्थ बसत नाही. पण आता बाहेरचे मन उद्दीपित करणारे संदेश येणं बंद झालंय आणि मन वर्तमानात स्थिर झालंय, ही झाली समाधीवस्था. ह्या अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विकार बाहेर येतात, विचारांच्या रूपात आणि ते विचार शरीरावर संवेदना पसरवतात. बस्स, मनाला ह्या संवेदनाच हव्या असतात, त्याचं ‘प्रतिक्षिप्त होणं’ हा जन्मसिद्ध अधिकार बजावायला. पण इथेच आपल्याला रिप्रोग्रमिंग करायचेय मनाचे. शरीरावर होणाऱ्या संवेदनांचं तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं, अजिबात रीअ‍ॅक्ट न होता.

संवेदनाचं तटस्थ निरीक्षण म्हणजे काय? आपण परत वरचं उदाहरण बघूया. ज्याक्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याक्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरल्या होत्या. म्हणजे नेमकं काय झालं होतं? सर्वप्रथम श्वासाची लय बदलते, नॉर्मल लयीतला श्वास जड होतो. त्यानंतर हाताच्या तळव्यांना कंप सुटतो, चेहऱ्याचं एकंदरीत तापमान वाढतं, जशा भावना तीव्र होत जातात तसं शरीरभर कंप जाणवू लागतो. ह्या साऱ्या संवेदना आहेत. हे जर त्यावेळी कळलं असतं आणि त्यावेळी जर श्वासावर आणि शरीरभर पसरत असलेल्या संवेदनांवर जर लक्ष केंद्रित केलं असतं तर जाणिवेत राहता येऊन जी प्रतिक्षिप्त क्रिया केली गेली, ती न होता, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.

मनाची एकाग्रता आणि संवेदनांचे तटस्थ निरीक्षण हाच विपश्यना ध्यानप्रक्रियेचा गाभा आहे. विपश्यना शब्दाची फोड वि + पश्यना अशी आहे. पश्यना म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. थोडक्यात स्वतःच्या आत डोकावणे!

विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!


images-3

ह्या प्रवासात संवेदनांवर प्रतिक्षिप्त न होणं हेच असतं मनाचं रिप्रोग्रमींग! जितक्या नियमितपणे विपश्यना साधना केली जाते, तितके मनाच्या खोल भागात दबून ठेवले गेलेले विकार विचारांच्या स्परूपात वर येऊन शरीरभर संवेदना पसरवतात. त्या संवेदनांवर रीअ‍ॅक्ट झाले नाही तर त्या संवेदना क्षीण होऊन विरून जातात आणि मनाची त्या विकारांपासून मुक्तता होते.

विपश्यनाध्यानाची निरंतर साधना हेच सर्व विकारांपासून मुक्त होण्याचे गुपित, म्हणजेच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग!


20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 65134
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

नीटनेटकी मांडणी आणि विषय पटवून देण्यासाठीची कळकळ जाणवली त्यामुळे एक लेख म्हणून नक्कीच आवडला. लेखावरील चर्चाही वाचली. बाकी विपश्यनाच नव्हे तर कुठल्याच साधनेत रुची नसल्याने माझाही पास. ज्यांना ज्याची आवड असेल, त्यांच्या बुद्धीला पटेल ते त्यांनी करावे...त्यातून त्यांना मिळणारी बरी-वाईट अनुभूतीही त्यांनाच लखलाभ. असो, संबंधित विषयात रस, गती असलेल्या काही परिचितांना लेखाची लिंक पाठवली आहे. (विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, रेकी, ब्रम्हविद्या, ओशो, आसारामबापू, अनिरुध्दबापू, एक तुही निरंकार, गुरुराणी नागकन्या (योगीनी), जिम्मी नागपुत्र (योगीराज), माता अमृतानंदमयी, सत्य साईबाबा, गुरमीत राम रहिम सिंग, राधे माँ - अशा सर्वांपासून सहस्त्र योजने अंतर राखून असलेला) टर्मीनेटर

सोकाजी, खूप छान व सविस्तर मांडणी केली आहे. या मार्गाने कोणाला जायचे असेल, त्याला नक्कीच फायदा होईल कारण तो ही साधना थोडीफार समजून उमजून स्विकारेल. तुम्ही जे लिहिले आहे ते सर्व नामस्मरणानेपण मिळू शकते. मात्र त्याला खूप वेळ लागतो. विपश्यनेसारख्या उपासना या पायरी पायरीने चढायच्या असतात. त्यामुळे आलेला अनुभव किंवा प्रगती जाणवते कारण एकदम एका पायरीची प्रगती होते. हाच या पध्दतीचा फायदा आहे. तसेच अनुभव आल्याने साधनेबद्दल विश्वास वाटायला लागतो. मात्र जर घसरण झाली तर गडगडायला होऊन एका पायरीपेक्षा जास्त घसरण होऊ शकते. मात्र नामस्मरण हे अनुस्यूत चढणी सारखे आहे व आपण चढ चढत आहोत, हे अजिबात जाणवणार नाही अशी या चढणीची तिव्रता असते. हे वेळ लागण्याचे कारण आहे. त्यामुळे नामस्मरणावर पटकन विश्वास बसत नाही. इतकेच नव्हे तर यात काही अर्थ नाही असे वाटून नामस्मरण सोडून देणारे बहुसंख्य असतात. मात्र चढण अशी नसल्याने ते गडगडत नाहीत तर तिथेच थांबल्यासारखे होते. _/\_

In reply to by शाम भागवत

नक्कीच! ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत. साधकांनी आपापल्या अनुभूतीनुसार योग्य तो मार्ग अनुसरायचा असतो. अमुक एक मार्गच योग्य किंवा अयोग्य असं अजिबातच नसतं. नामस्मरण भक्तीयोगातले मार्गक्रमण आहे, भक्तीयोग अनुसरलेल्यांना नामस्मरण करून येणारी अनुभूती हे त्यांच त्यांना गवसलेलं सत्य आहे. अध्यात्म (अधि + आत्म = स्वतः सम्बन्धी) हे नेहमी फक्त आणि फक्त स्वतःची अनुभूती असते. - (ज्ञानयोगी) सोकाजी

In reply to by सोत्रि

ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत हे तुम्ही बरोबर सांगितले. पण ते फक्त सुरवातीला. नंतर ज्ञानमार्गातच सगळे एकत्र येतात. त्यावेळी नामावर लक्ष ठेवत आतून येणारे विक्षेपच ओलांडत बसायचे असते. (संवेदनांना प्रतिसाद देत बसायचे नसते) या प्रक्रियेला “निवांत होणे” अस म्हटले जाते. ही प्रक्रिया ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठात पुढील ओवीत स्पष्ट केली आहे. कैसेनी दैवत । प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत । शिणसी वाया ।।४.२।। पण नुसते दैवत प्रसन्न होऊन चालत नाही. मी व दैवत असे द्वैत राहतेच. मग त्याच्या पुढच्या टप्यात हळूहळू नामच साधन व साध्य दोन्हीही बनून जाते. त्याला नाम नामी अभेद सिध्दांत म्हणतात. मग मात्र सोहं साधनेत त्याचे रूपांतर व्हायला लागते. हे दोन टप्पे विपश्यनेत आहेत का?

In reply to by शाम भागवत

निवांत होणं हे पहिल्या टप्प्यात (आनापान सती) होतं जेव्हा मनाची एकाग्रता साधली जाते. द्वैत जाऊन अद्वैताची अवस्था साधनेच्या दुसऱ्या टप्प्यात, विपश्यनेत येते. ही अवस्था महत्वाचं स्टेशन आहे एकंदरीत साधनामार्गावरचं. >> नंतर ज्ञानमार्गातच सगळे एकत्र येतात. अलबत! तेच साध्य असते. - (साधक) सोकाजी

पुण्यात स्वारगेटजवळ एक केंद्र आहे. स्वारगेटलाच जाताना जीव नकोसा होतो, तिकडे त्या मुठेच्या नाल्याशेजारी जाऊन दहा दिवस घालवायचे धाडस उभ्या जन्मात घडणार नाही. फावल्या वेळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या काही कवीमित्रांनी आणि नाट्यवेताळांनी विपश्यनेबद्दल बरंच काही सांगितल्याने माझी उत्सुकता चाळवली होती. तेव्हा एका जवळच्या मित्राला कोर्सांती "जर मी संमोहित होऊन कायच्या काय अशक्य बडबड करायला लागलो तर पंधरा दिवसांत मला ताळ्यावर आण" अशी जिवाशिवाची आणि आईरक्ताची शपथ घालून विपश्यनेसाठी मी भारतातच कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. कारणं - मला रामलिंगचा परिसर आवडतो. पाऊस सरत आल्यानंतरचा निसर्ग(जरी सरकारी मोनोकल्चरने वाट लावलेली असली तरी). मोर. बहुतेक मित्रांनी तिकडं प्रपोगंडा नसतो, बुवाबाजी नसते असं सांगितलं होतं. रागाच्या भरात मी पॅनिक मोडवर जातो. भावनावेगात मी खूपदा टोकाचे निर्णय घेतले आहेत. (मद्याच्या अंमलात मी अबोल-शांत-सुस्वभावी-प्रसन्न किंवा करुण-निर्मल-भूतदयावादी-संमजस वगैरे होतो. त्यामुळे माझ्यासोबत मद्यपान हे माझ्या मित्रांसाठी नीरस आणि माझ्यासाठी अत्यंत खाजगी आनंदनिधान आहे.) हे टाळण्यासाठी काही करता येईल का म्हणून मी विपश्यनेकडे एक थेरपी म्हणून पाहिलं. झालंच तर पोटही कमी होईल. भारतीय अध्यात्म परंपरेत ज्ञानमार्गावरून चालणार्‍या अनेक लोकोत्तर व्यक्तींबद्दल मला आदर आहे. घरातून पळून जाण्याची/ प्रपंचविन्मुख होण्याची एक खूप मोठी धाडसी परंपरा भारतात चालत आलेली आहे. भारतीय अध्यात्म, संगीत, आरोग्य अशा अनेक सांस्कृतिक बाबींत अशा रनअवे लोकांनी पायाभूत काम करून ठेवले आहे. खूपदा ही मंडळी तत्कालिन सामाजिक संकेतांत न मावणारी असतात. मला वाटतं, अनेक आध्यात्मिक परंपरा आणि प्रथा अशा "ब्लॅक शिप" लोकांना प्रतिष्ठितपणे प्रापंचिक जबाबदार्‍या तोडता याव्यात यासाठीच घातल्या गेल्या आहेत. तर भारतात बरीच शतके "परमसत्य", "विश्वाची गुरुकिल्ली", "ब्रह्म" इत्यादी गूढ नावांखाली दडलेलं "काहीतरी" जाणून घ्यायचा existential महाकंड सुटत आलेला दिसतोय. या काहीतरीला एक ब्लँकेट टर्म "परमसत्य" असं या प्रतिसादापुरतं म्हणू. माझ्या निरिक्षणानुसार चार प्रकारचे लोक विपश्यना कोर्सला आलेले दिसतात : १. परीक्षार्थी : कॉन्सनट्रेसनवादी (मुख्यत्वे तरुण किंवा टीनेजर्स) अगदी थेट ध्येय - परीक्षा पास होणे. २. पेनकिलर्स : शारिरिक व्यथा आणि वेदना सहन करण्याची शक्ती मिळवायला आलेले (मुख्यत्वे थेरडी) ३. प्रेमभंगी/निराश/मनोरुग्ण : ही मंडळी मन शांत करायला, टेम्परवारी किंवा परमनंट दु:ख विसरायला आलेली किंवा थेरपी साठी आलेली. ४. हौशे-नवशे-गवशे : ही जरा रुंद कॅटेगरी आहे. ह्यातले काही लोक इतरांचं ऐकून वरील पैकी एखादं ध्येय घेऊन येतात. काहीजण-सतत तोंडाचा चंबू करून वावरणारे-परमसत्य शोधायला आलेली असतात. काहीजण केवळ उत्सुकता म्हणून येतात. काहीजण (मुख्यत्वे गोर्‍या कातडीचे) बुडा बुडा म्हणत अध्यात्मसागरात बुडायला आलेले. बर्‍याच लोकांना इतके दिवस न बोलता राहायचं हेच एक मोठं अ‍ॅडवेन्चर वाटत असतं. ह्यांना असल्या बंधनांचीच धुंदी चढलेली असते. जे लोक विपश्यना यशस्वीपणे पार पाडतात त्यातले खूप लोक दहा दिवसांच्या ह्या असल्या बंधनातून पार पडलोय आणि काहीतरी जगावेगळं करून आलोय या आवेशात गावभर बोलत सुटलेले दिसतात. प्रवासाचा दिवस: १. "आते-जाते" हे मैंने प्यार किया ह्या चित्रपटातले गाणे आणि रेडिओहेडचं बर्न द विच कान फुटेस्तोवर ऐकले. एअरपोर्टवर मित्र घ्यायला आलेला. आधी त्याच्याबरोबर रामलिंगला गेलो. मग जरा सेंटरच्या गेट बाहेर रेंगाळलो. आत गेल्यावर त्या राजेंद्र बर्व्यांना आला तसला कुठलाही तुटकपणा नोंदणी करणाऱ्यांमध्ये दिसला नाही. उलट आलेल्या लोकल बायकांना जमेल तसे हास्य विनोदात गुंतवत नोंदणीचा कार्यभाग पटापट उरकण्याचा कोल्हापुरीपणा दिसला. तेवढ्यात एका नवख्याने माहिती दिली. "हिंदी मराठी" कोर्सला असल्याच बाया येत्यात. "हिंदी इंग्लिशला" जरा शहरातल्या येत्यात. तिसऱ्या दिवसापासून बडबड सुरु करतील ह्या बायका. नंतर त्याचे बोलणे शतश: खरे ठरले. एकंदरीत पुरुष विभागात जे गांभीर्य होतं ते महिला विभागात अजिबात नसावं असं जाणवलं. हे सांगण्याचा उद्देश हा - "प्रतिभा रानडे की कोण नामक एका स्त्रीने दुर्गाबाई भागवातांशी ऐसपैस गप्पा मारल्या. त्याचं जे पुस्तक आहे त्यात दुर्गाबाई बुद्धाविषयी एक खुलासा करतात. बुद्ध स्त्रियांना संघात प्रवेश द्यायला सुरुवातीला अनुत्सुक होता. आनंद वगैरेंनी कन्विन्स केल्यावर तो तयार झाला. हे वाचून दुर्गाबाईंना धक्का बसला." बहुतेक कंठाळ्या स्त्रीवाद्यांना बुद्धाला बोट दावायला हे पुरेसं ठरू शकेल म्हणून मी एक गोष्ट स्पष्ट करतो. कदाचित संघाच्या शिस्तीत महिला फिट बसणार नाहीत असं बुद्धाला वाटत असावं किंवा शीलांतलं ब्रम्हचर्य हे ही एक कारण असू शकतं. पण एकंदरीतच स्त्रियांना परमसत्य वगैरे भानगडीत रस कमीच असावा अशी त्याची समजूत/खात्री/विश्वास असेल का? काय ठाऊक. मला व्यक्तिश: स्त्रियांना परमसत्य जाणून घेणं तेवढंच आवडत असावं असं वाटतंय. परंतु, त्या प्रामुख्याने पुरुषवर्गात परमसत्यमार्गातली धोंड अशी समजूत असल्याने असले घोळ झाले असावेत. किंवा असं काही झालं नसेलच आणि वरील कथा केवळ काल्पनिकच असेल. २. माझ्या मनात असले अभद्र विचार यायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात माझ्या नोंदणीप्रक्रियेत एका साधकाशी गाठ पडली. नुकताच त्याच्या अंगावरून डिमेंटर (तमपिशाच्च) फिरला असल्यासारखा नीरस निरुत्साही चेहरा. निरासक्त चेहऱ्यावरची शांतता नव्हती ती. निरासक्तीचं फ्रस्ट्रेशनशी कॉकटेल झाल्यावर जे नीरस शैथिल्य अंगप्रत्यंगात येतं तसलं काहीतरी गंडॅक्स झालंय असं त्याच्याकडे पाहून वाटलं मला. मी माझ्या मित्राला मनातल्या मनात शपथेची आठवण करून दिली. मग आर्य मौनाला सुरुवात झाली. नाश्ता सुंदर होता. दिवस पहिला :

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अशाच खुसखुशीत स्टाइलमध्ये दहा दिवसांची गोळाबेरीज लिहिणार असाल तर वेगळा धागा काढा, असं सुचवते. सगळं बैजवार लिहा, पण अशाच हलक्याफुलक्या शैलीत लिहा. हे मस्त लिहिलंय. उगा हा धागा कशाला हायजॅक करायचा म्हणते मी.

In reply to by यशोधरा

पुढेही असल्या फाल्तुगीरीचे न घाबरता विश्लेषण करावे ही विनंती. असल्या भंपक विचारांचे समर्थकही पुढे येतील आणि विरोधकही, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने तुमचे विचार वाचायला आवडतील.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दिवस पहिला : १. दिवसभर काय करायचं हे सकाळी सांगितलंच असतं. त्यामुळे मी त्यात खोलात शिरत नाही. शरीराला, मनाला काही गोष्टींची सवय नसते. त्यामुळे त्रास होतोच. मुद्दा हा आहे, हा त्रास कसा वर्थ आहे हे पटवून देण्या घेण्याचा. हे पटवणं मात्र मी स्वत:हूनच करायला लागलो. म्हणजे शिबिर सोडायचा विचार बिचार नाही. गुरुजी नाहीतर तप, पुरुषार्थ असले ओजस्वी शब्द वापरून ह्या त्रासाला वर्थनेस देण्याचा प्रयत्न करतातच. २. बुद्धाचं लोकोत्तरत्त्व मला खोलात जाऊन कधीही समजून घ्यावंसं वाटलं नव्हतं. सातवीला प्राचीन भारताबद्दल इतिहासाच्या पुस्तकांत जितकं गायडी ज्ञान/माहिती होतं त्यावरून तृष्णा-अपेक्षाभंग-दु:ख किंवा पंचशील हे प्रकार ठाऊक होते. जुजबी माहिती अभावी पहिल्याच दिवशी असलं चिंतन नाही झालं. साधनेची गुरुजींनी सांगितलेली उद्दिष्टे मनात घोळवत बराच विचार चालला होता. ३. कोणत्याही प्रतिमेशी, शब्दाशी, भावनेशी, विचाराशी श्वासाला न जोडता तो आला गेला हे जाणत राहायचे. जिनीअस. एकाग्रतेसाठी इतकं सोपं टूल. खरी मजा विचारविहीन अवस्थेमध्ये जाण्याच्या प्रयत्नात येते. मनाची चंचलताच पटवून देण्यासाठी हा दिवस जातो. येणं जाणं हा श्वासाचा जसा स्थायी भाव आहे, तसा चंचल असणं मनाचा स्थायीभाव नाही का? स्थायी नसला तरी निदान एकांदा तरी भाव असलेच ना. मग त्याला ताळ्यावर आणण्याचा/ एकाग्र करण्याचा खटाटोप का करायचा? असले लॉजिकल विचार दूर सारून श्वास मॉनिटर करत बसलो. खरेतर रिकामं बसल्यावरच माझं मन चंचल होतं. एखादं चित्र काढत असताना, एखादा प्रोग्राम लिहित असताना, ते बराच काळ एकाग्र असतेच की. हा प्रतिसाद लिहित असताना ते बऱ्यपैकी एकाग्र आहेच की. ४. मला इतरांच्या घोरण्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे तसला रूम पार्टनर मिळू नयी ही फार इच्छा होती. ती पूर्ण झाली होती. मात्र समूहध्यानाच्या वेळी नंतर इतरांच्या होली कफांचे, चोंदलेल्या नाकांचे आवाज त्रास देऊ लागले. ह्या त्रासाबरोबर स्वत:च्या दोन्ही नाकपुड्या क्लीन अ‍ॅज फक आहेत, श्वास काय स्मूथ लोण्यासारखा डायफ्रामच्या ट्रॅम्पोलीनला टेकून सर्कशीतल्या कसरतपटूसारखा उड्या मारत फुफुसांत चालला आहे असे अभिमानात्मक विचार यायला लागले. सगळा प्रकार क्लोजपच्या जाहिरातींसारखा स्वच्छ, फ्रेश इत्यादी इत्यादी. (तरीही इतरांच्या असभ्यपणाचा राग मंगल मैत्रीचा दिवस उलटला तरी गेला नाही.) ५. पहिला दिवस संपला. आमचे आचार्य जरा कडकच दिसत होते. तळपायाची हाडं काड काड वाजवत अनवाणी चालतानादेखील पॅरागॉन घालून चालल्याचा आवाज काढणाऱ्या एका उत्तरमध्यमवयीन धम्मसेवकाकडे जळजळीत कटाक्ष टाकून स्वत:ला आणि मला ऐहिकात आणलंच होतं त्यांनी. त्यात ते कन्नड. त्यामुळे प्रश्नोत्तरांच्या वेळेस वेगळीच मजा आली. ६. विपश्यनेचा कोर्स एक तप आहे आणि तो खूप गांभीर्याने करायचा आहे हे प्रत्येक प्रवचनाच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं. दुसरी गोष्ट ही की तुम्हाला “एकला चलो रे”पणाची गहनगंभीर जाणीव करून दिली जाते. समूहात राहून एकट्या अस्तित्त्वाची जाणीव भारतीय लोकांना क्वचितच करून दिलेली असते. त्यामुळे काहीजणांना हे पटतच नाही. नजरानजरदेखील नाही. एकाच खोलीत झोपून एकमेकांचं अस्तित्त्व अमान्य करणे हे खूप खूप कठीण आहे. मला वाटतं ९९% लोकांना एकटं होता येत नाही. मी मानसिकदृष्ट्या म्हणत नाही, जैविक आणि सामाजिक दृष्ट्या म्हणतोय. एकमेकांकडे पाहणे, लाईट चालू बंद करण्यासाठी खाणाखुणा करणे, एकमेकांचा विचार करणे, एकमेकांना पारखणं हे होतंच होतं. केवळ बडबड थांबवणे अवघड नाही. एकटं होणं फार अवघड आहे. तुम्ही म्हणाल आपला स्वार्थ आपल्याबरोबर सतत जागा असतोच. त्यात काय विशेष? स्वत:विषयी विचार करताना मुख्यत्वे आपण स्वत:च्या आवडी निवडी आणि सुखदु:खं यांच्याच संदर्भाने विचार करतो. स्वास्तित्त्वाची निवळशंख जाणीव आपल्याला क्वचितच होते. ही जाणीव सेंद्रिय आहे. जैविक आहे. ही जाणीव करून देणे हे विपश्यनेचे एक मुख्य साध्य असावे. पण इथेच एक मेख आहे. ही जाणीव “विवेकी स्वार्थ” या नावाखाली करून दिली जाते. म्हणजे एकला चलो रे, पण कुठं? तर मुक्तीकडे. मुक्तीसाठी स्वार्थाची जाणीव ही विवेकी स्वार्थाची जाणीव आहे. म्हणजे आपल्या शुद्ध अस्तित्त्वाच्या जाणिवेचे काय? जवळ जवळ सर्व साधकांच्या मनात हे मुक्तीचं ध्येय पेरलं आणि त्यासाठी एकला चलो रे ही हाक देऊन एकटेपणाची जाणीव करून दिली की आपण फिरून फिरून तिथंच येतो. मला वाटतं इथेच विपश्यनेच्या मूळ उद्देश्यालाच हरताळ फासण्यासारखं आहे. दिवस दुसरा‌ व तिसरा.: १. दुसरा दिवस कालच्या दिवसाचंच एक्स्टेन्शन होता. २. माझ्या ग्रुपचे शंकासमाधान : एक नमुना - स. आचार्य : काय होतंय का मन एकाग्रता? एक तरुण : सारखं सारखं म्हागचं आठवायलंय. एकच घटना. रिव्हेंज घिऊ वाटतुयं. मडर्र् मडर्. स. आचार्य : आठवू दे. चांगलं हाय की मग. सगळं राड यायलंय आता बाहेर. यिऊ दे की. ३. श्वासावर सारं चित्त केंद्रित झाल्यावर/होताना श्वासनलिकेतल्या काही भागांत जिकडे आवर्जून कधीही लक्ष जात नाही तिथेही श्वासाचा प्रवाह जाणवू लागला. अचिव्हमेंट. पण, पण मनातलं राड काही बाहेर येईना. एका क्षणी जरासा जोरात श्वास घेतल्यावर मन हायपर केंद्रित झालं, तीन चार मिनिटं नाकात भिरभिरत राहिलं आणि डोकं बधीर होऊ लागलं. हायला. एका क्षणी “गेट आऊट” पिक्चर सारखं‌ च्यायला आपण आतच कोसळलो का काय असं वाटलं आणि अक्षरश: घाम फुटला. उठून मोकळ्या हवेत गेलो. मनातलं राड काही बाहेर येत नाही म्हणत मीच हॉलबाहेर आलो. ४. लोल. आजच्या अतिंद्रिय अनुभवाच्या पाण्यानं मनातल्या राडीवर मुक्तीच कमळ उगवणार म्हणून मी भलताच खूश होतो. अनुभव अतिंद्रिय होता हे मात्र मीच (उजवी) छातीठोकपणे समजावलं. ५. ह्या दिवसांची प्रवचने मनाचे चांचल्य विस्तृतरित्या सांगितली जातात. मनमाकड ताब्यात आणलं पाहिजे हे ठसवलं‌ जातं. मनाच्या भटकण्याची शास्त्रीय फोड सांगितली जाते. म्हणजे मन भूतकाळातली घटना आठवणे किंवा स्वप्नरंजन या दोनच प्रकारच्या गोष्टी करत असते. त्यांचे ब्रॉड व्हर्टिकल्स म्हणजे दु:खभाव आणि आणि आनंद हे होत. हे दोन्हि टाळून फक्त सध्या म्हणजे येत्या जात्या श्वासावर मन केंद्रित करणं म्हणजे खऱ्या अर्थाने वर्तमानात राहणं. मला हे कैच्या कै सपाट वाटलं. स्वप्नरंजन आणि शारिरिक सुखांचं नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेलं किंवा टिकलेलं प्रयोजन नसतं तर मुलंच जन्माला आली नसती. माणसंच नसतील तर मग कसली मुक्ती आणि कसलं काय? इथे खूप लूपहोल्स आहेत. डार्विनतात्यानं सगळी मजाच घालवली मुक्त होण्याची. दुसरी गोष्ट भूतकाळ आणि कल्पना यांच्याच अभूतपूर्व संयोगातूनच माणसाच्या मनात एक महत्त्वाची गोष्ट निर्माण होते. ती म्हणजे सृजनशक्ती. त्याबद्दल एक अवाक्षरही काढले जात नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

२. माझ्या ग्रुपचे शंकासमाधान : एक नमुना - स. आचार्य : काय होतंय का मन एकाग्रता? एक तरुण : सारखं सारखं म्हागचं आठवायलंय. एकच घटना. रिव्हेंज घिऊ वाटतुयं. मडर्र् मडर्. स. आचार्य : आठवू दे. चांगलं हाय की मग. सगळं राड यायलंय आता बाहेर. यिऊ दे की. आगागा ! पहिल्या विपश्यना ओएसच्या इंस्टालेशनचा सेटअप चुकला की सगळी सिस्टीम गंडते खरी :D :D :D

एकूण कुणाला चांगले अनुभव येत असतील तर त्याला ती गोष्ट पुन्हा करावीशी वाटणारच. सर्व प्राणिमात्रांना भरपूर ज्ञान असतेच यावर माझा पूर्ण विश्वास.

विपश्यना एकदा तरी करुन बघायची होती. मात्र तिथे एकेक वर्ष अगोदर करावे लागणारे बुकींग पाहून तो विचार दुर सारला. त्यातूनही पुढे जायची तयारी केली मात्र विपश्यना कालात तुमची नेहेमीची नित्यपुजा केलेली चालत नाही असे कळाल्यामुळे तो विचार रहित करावा लागला. अवांतर : तिथे मिळणारे जेवण हे सात्विक शाकाहारी असते की कसे ? कांदा / लसूण सारखे पदार्थ जेवणात असतात काय ? याची माहिती मिळाली तर आनंद होईल.

In reply to by धर्मराजमुटके

आहार सन्यास धारण केलेल्यांसाठी आणी गृहस्थासाठीही मिळतो, सेंटर नुसार पदार्थ वैविध्य असू शकते. एकेक वर्षे आधी बुकिंग ? काय बोलता ? बाकी नित्य शारीरिक कर्मे सोडली तर बाकी काहीच नेहमीचे करू दिले जात नाही, तसेही विपश्यनेला जाऊन देवपूजा करणे म्हणजे पंढरपूरला वारीला जाऊन घरातील देवघरही सोबत न्हेउन विठोबाच्या मंदिराबाहेर ते पूजत बसणे होय.

सोप्या भाषेत मांडलेला छान लेख. चर्चाही खुसखुशीत अन् खास. बाकी, फक्त विपश्यनाच नाही तर कोणतीही एखादी साधना का करायची ह्याची भूमिका कशी तयार होत असेल.. असा प्रश्न पडला. कारण ठाम ध्येय माहित असून त्यानुसार साधनमार्ग चोखाळणारे खरंच मोजके असतात. बाकी बहुतेक सर्वजण माझ्यासारखे सामान्यच. कुणाला शांतता हवी म्हणून, तर कुणी एखाद्याला आलेला अनुभव मलाही येईल म्हणून साधन करायला सुरुवात करतात. कुणाला आपण काहितरी वेगळं करतोय हे दाखवायचं असतं.. तर कुणाला एखाद्या प्रापंचिक अडचणी पासून मुक्तता हवी असते. कुणी एखाद्याला माझ्या साधनानं आनंद मिळेल यासाठी साधन करतात तर कुणी एखाद्यानं सांगीतलं म्हणूनही करतात. परिक्षेत चांगले मार्क मिळावेत, चांगली नोकरी मिळावी म्हणून, धंद्याला बरकत यावी म्हणून, लग्न व्हावे म्हणून, मुलबाळ व्हावे म्हणून वगैरे तर खास कारणं आहेत, कोणतेही साधन करायचे. यातही, "माझेच साधन चांगले/योग्य" असं म्हणत वाद घालणारेही उदंड असतात. हे म्हणजे अगणित पायर्‍या जिथं चढायच्यात, तिथं बाकीच्यांपेक्षा एक पायरी मी जास्त की कमी या स्पर्धेत लागणं झालं. :-) त्यामुळे ज्यानं ज्या कारणानं साधन सुरु केलं.. त्याला तसा अनुभव येणार असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एखादं साधन सहजतेनं होण्यासाठी जी पात्रता लागते ती ही - साधन चांगलं होण्याची तळमळ असण्यापेक्षा, त्यात मिळणार्‍या/न मिळणार्‍या अनुभवांची तळमळ असण्यापेक्षा, ध्येय प्राप्तीसाठीची तळमळ लागली पाहिजे. आता ध्येयच ठरलं नसेल तर साधन सहजतेनं होणार कसं? जागरुकतेनं ध्येय स्वीकारता आलं पाहिजे, साधन त्यासाठी ध्येय आपसूक करून घेईल. अर्थात् ध्येय स्वीकारणं म्हणजे काही साधं काम नाही. काया-वाचा-मने ते स्वीकारायला आयुष्याची पूंजी लागते आणि एक कृपा नावाची, इवलीशी, गोष्ट लागते!

In reply to by राघव

@ राघव,
आता ध्येयच ठरलं नसेल तर साधन सहजतेनं होणार कसं?
माझ्या बाबतीत अगदी उलट आहे. जेंव्हा जेंव्हा मी अमूक एक ध्येय धरून काही केलं, तेंव्हा त्यात हटकून अपयश आलं. मात्र काहीतरी नवीन, वेगळं कळल्यावर सहज, चला गंमत म्हणून हेही करून बघू, जमलं तरी ठीक, नाही जमलं तरी ठीक ... अश्या वृत्तीनं जे जे केलं, त्यातूनच माझं जीवन घडत गेलं, आणि कधी कल्पनाही न केलेल्या गोष्टी मिळत/घडत गेल्या... विपश्यनेचा कँपही त्यातलाच एक प्रयोग. गंमत म्हणजे तो मी शेवटपर्यंत न करता दोन दिवस आधीच तिथून न सांगता पळूनही आलो होतो. असाच एक दुसरा, सहज गंमत म्हणून केलेला आणि विलक्षण परिणामकारक ठरलेला प्रयोग म्हणजे वीस-पंचवीस दिवस फक्त भाज्या-फळांचा ताजा रस पीणे, आणि त्यातून अनपेक्षितपणे झालेली रोगमुक्ती.

In reply to by राघव

नक्की ध्येय असलंच पाहिजे असंही नाही. एक प्रयोग म्हणून करून पाहायला काय हरकत आहे? आणि कोणत्याही साधनाने माणसाला मन:शांती आणि समाधान मिळाल्याशी कारण. अमुक ठिकाणीच जायचं आहे म्हणूनच फिरायला पाहिजे असे नाही. निरुद्देश भटकंती सुद्धा भरपूर आनंद देऊन जाते. मायाबंदरच्या( उत्तर अंदमान) जंगलात काय आहे ते तर पाहू म्हणून नुसतेच भटकून आलो तर इतक्या विविध तर्हेची झाडे पक्षी दिसले आणि इतकी शांत मानवी लुडबुडी पासून मुक्त जागा किती समाधान देऊन जाते ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

अमुक एक ठिकाणी नसलेली किंवा निरूद्देश जरी असली तरीही ध्येय भटकंती असते! >> कोणत्याही साधनाने माणसाला मन:शांती आणि समाधान मिळाल्याशी कारण. इथेही मन:शांती आणि समाधान हेच ध्येय आहे! - (ध्येयवादी) सोकाजी

हा लेख अम्मळ सावकाशीनं वाचायचा असल्याने अजून पूर्ण वाचलेला नाही, तरिही प्रतिसाद देतो आहे. मी अनेक वर्षांपूर्वी विपश्यनेचा कोर्स केला (त्यात आणखी एक म्हटले तर विनोदी, म्हटले तर शिरेस, अशी एक निराळीच भानगड झाली, तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे) मी समग्रतेने हा कोर्स केला, आणि पाचव्या दिवशी विपश्यना करता करता अचानक माझी अनेक वर्षांपासूनची पाठदुखी बरी झाली, ती आजतागयत. त्या विशिष्ट क्षणी मला आपली पाठदुखी बरी झाल्याचे तात्काळ कळले, हेही विशेष. घरी परतल्यावर माझ्या आरोग्यात लक्षणीय फरक घडून आला होता, असे 'हि'चे मत. .... मात्र त्या नंतर आजतागायत एकदाही विपश्यना केली नाही हेही खरे.

मला वाटतं कोणत्याही साधनेचे प्रकार योग्य किंवा अयोग्य नसतात. त्या साधनेचे ग्रहण करणारा मनुष्यच ते ज्ञान ग्रहण करण्यास अपात्र असेल तर तो मनुष्य अपात्र आहे, ती साधना नाही. मी कितीतरी अशी स्वताला आध्यात्मिक म्हणवणारी, साधना-ध्यानधारणा करणारी माणसे पाहिली आहेत जी केवळ देवासमोर किंवा धार्मिक कार्यात नम्र पणाने वागतात. पण हीच माणसे सार्वजनिक जीवनात अत्यंत दुराग्रही, दुसऱ्यांना पटकन दुखवणारी, स्वार्थी वागताना दिसतात (थोडक्यात माणूसकीने न वागणारी). याउलट एखादा साधा सरळ मनुष्यही कोणतेही अवडंबर न माजवता देवाचे करतो, माणूसकीने वागतो व मनाने समाधानी असतो. असो. हा न संपणारा विषय आहे.

In reply to by श्वेता२४

मला वाटतं कोणत्याही साधनेचे प्रकार योग्य किंवा अयोग्य नसतात. त्या साधनेचे ग्रहण करणारा मनुष्यच ते ज्ञान ग्रहण करण्यास अपात्र असेल तर तो मनुष्य अपात्र आहे, ती साधना नाही.
परफेक्ट! अनेक साधनामार्ग आहेत, साधकाची जशी पात्रता असते त्याप्रमाणेच एखाद्या साधनामार्गावर साधक मार्गक्रमण करू शकतो. - (साधक) सोकाजी

अवांतर : कंजूस,
विपश्यना ही अध्यात्मिक मार्केटिंग असते.
अध्यात्म हे प्रत्यक्षकृतीचं शास्त्र आहे. त्यामुळे शब्दांत सांगितलेलं अध्यात्म हे मार्केटिंगच असतं. अगदी गीतादेखील एक जबरदस्त टिमकी (= sales pitch) आहे. Arjun is the product and Arjun is the customer. That cheeky salesman Shrikrushna sold Arjun to himself ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Arjun is the product and Arjun is the customer Shrikrushna sold Arjun to himself !
द्या टाळी! हेच गीतेचं सार. - (प्रोडक्ट आणि कस्टमर असलेला) सोकाजी

In reply to by गामा पैलवान

आणी हो गरजवंत समोर असल्यावर विक्रेत्याला त्याच्या ग्राहकास येड्यात काढायची गरजही नसते कारण म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसंही पाहता येऊ शकतं. फक्त एक अडचण आहे. ती म्हणजे अर्जुनास आपल्याला नेमकी कसली गरज आहे ते माहीत नव्हतं. पण तशीच परिस्थिती आजच्या कस्टमरचीही असते. त्यामुळे गीता ही सर्वोत्कृष्ट क्रयघोषांपैकी ( = सेल्स पिच) एक म्हणायला हरकत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अर्जुनास आपल्याला नेमकी कसली गरज आहे ते माहीत नव्हतं.
असं कोण म्हणतं ? अर्जुन श्रीकृष्ण ? महाभारतकार ? तुम्ही ? की एखादा विवेचनकार ? सदोष गीता कृष्णाने खपवली यात त्याचे कौशल्य अमान्य करायचा प्रश्नच उपस्थित नाही.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क, मी म्हणतो. कारण की 'सीदन्ति मम गात्राणि'असं अर्जुन म्हणतोय. यावरून त्याला स्वत:ची गरज ओळखता येत नव्हती असं वाटतंय. बाकी गीता सदोष असू शकते हे मान्य. पण काये की मी अर्जुनासारखा व/वा श्रीकृष्णासारखा पराक्रमी नसल्याने मला नीटसं सांगता येत नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पण काये की मी अर्जुनासारखा व/वा श्रीकृष्णासारखा पराक्रमी नसल्याने मला नीटसं सांगता येत नाहीये.
अध्यात्मिक तळमळ असूनही जेंव्हा प्रत्यक्ष प्रगती वा अनुभूती शून्य अथवा उणे असते तेंव्हा आणी फक्त तेंव्हाच धार्मिक कट्टरता जन्माला येउ शकते. त्यासाठीच्या सुपीक जमीनीचे प्रतिक म्हणजे ते तुम्ही म्हणत असलेल्या अर्जुनासारखे गोंधळलेले मन. राम असो की कृष्ण शेवटी झगडा त्यांनी भौतिककार्यभागासाठीच केला, की गितोपदेषही अर्जुनाला संन्यासी बनवायला केला नाही, म्हणूनच तर क्षमता राखूनही कृष्ण, राम धार्मिकदृष्ट्या कधी कट्टरवादी बनू शकले नाहीत. ते गोंधळलेले सत्पुरुष कधीच न्हवते. पण आजकाल धर्म न्हवे कट्टरता दिसते, कारण तुम्ही अर्जुन आहात हे तुम्हास माहीत आहे, तत्वज्ञानाच्या सदोषतेकडे परंपरागत दुर्लक्ष करायच्या वृत्तिमुळे आता तुम्हाला मार्गदर्शन श्रीकृष्ण करत नाही हेच मुळी मान्य होत नाही.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क, तुमच्या भाष्यावरची माझी मतं सांगतो. १.
राम असो की कृष्ण शेवटी झगडा त्यांनी भौतिककार्यभागासाठीच केला,
माझ्या मते त्यांनी कर्तव्यपूर्ती म्हणून झगडा केला. तसंही पाहता काही कारण वा कर्तव्य असल्याशिवाय झगडा करणे हा मूर्खपणाच होय. २.
कारण तुम्ही अर्जुन आहात हे तुम्हास माहीत आहे, तत्वज्ञानाच्या सदोषतेकडे परंपरागत दुर्लक्ष करायच्या वृत्तिमुळे आता तुम्हाला मार्गदर्शन श्रीकृष्ण करत नाही हेच मुळी मान्य होत नाही.
हे ज्या कोणाला उद्देशून आहे तो अर्जुन नाही. कारण तो / ती अर्जुनाइतका पराक्रमी नाही. निदान सांप्रतकाळी तरी. गीता सदोष असू शकते. पण तिच्यात जर खोड काढायची असेल तर आगोदर अर्जुनासारखा पराक्रम गाजवून दाखवावा. अन्यथा कावळ्याने सूर्यावरचा डाग दाखवल्यासारखं होईल. आ.न., -गा.पै.

In reply to by जॉनविक्क

भगवतगीतेवर एक धागा लवकरच लिहायचा विचार आहे. तिथे त्या विषयावर चर्चा करूयात. इथे चर्चा फक्त विपश्यना आणि ध्यानमार्ग ह्यापुरतीच ठेवूया. - ( साधक) सोकाजी

हे असं कोणी भौतिक सोडुन आदीभौतिकाबद्द्ल बोलयला लागलं ना की भुतकाळात मिपावरच्या काही लोकांनी उचलेल्या पावलांबद्दल आठवुन घाबरायला होतं. सभ्यजनहो सांभाळुन रहा इतकीच विनंती.

In reply to by इरसाल

आपणास घाबरायला लागू नये म्हणून पावले तुम्हाला उचलावी लागतील. इतरांना दिलेले सल्ले वा परखड बोल कामी येत नाहीत असाच अनुभव आहे.

In reply to by इरसाल

आदीभौतिकाबद्द्ल
तुम्हाला अधिभौतिक म्हणायचं आहे का? तस असेल तर अधिभौतिक (अधि + भौतिक) म्हणजे भौतिकासंबंधीच. तुम्हाला बहुतेक आधिदैविक (अधि + दैविक) किंवा अध्यात्मिक (अधि + आत्म) असं म्हणायचं असावं. तस असेल तर लेखात विपश्यना ही साधनापद्धती अजिबात दैवी, धार्मिक किंवा संप्रदायी नाही हेच स्पष्ट करायचा प्रयत्न आहे. - (अध्यात्मिक) सोकाजी

तुम्ही ( लेखक सोत्रि) मुंबई ठाणे आसपास राहात असाल तर एक कट्टा करता येईल. यासाठी उत्तम जागा - युसुफ मेहेरली केंद्र - पनवेल पेण रस्ता, कर्नाळा जवळ . (गोग्रीन नर्सरीच्या बाजूला) खाणे,जेवण, झाडाखाली पारावर बसणे इत्यादी छान व्यवस्था आहे. राहाण्यासाठी हॉलही देतात. तुमच्या विषयाची छान चर्चा होईल. -------- इतर कट्टेकरीही येऊ शकतात. मुलांसाठी ही खादीग्रामोद्योग प्रात्यक्षिक बघायची सोय आहे. पक्षीनिरिक्षणही होईल.

In reply to by कंजूस

कौला लंपूर, मलेशिया हे सध्याचं कर्मक्षेत्र आहे. डिसेंबरमध्ये सुट्टीवर येणार आहे त्यावेळी कट्टा करायला नक्कीच आवडेल! - (कट्टर कट्टेकरी) सोकाजी

प्रश्न हा होता की ध्यान, भजन, नामस्मरण, विपश्यना वा अध्यात्म साधना हे जन्म मृत्यूप्रमाणे अथवा एखाद्या शास्त्रीय नियमानुसार आपोआप का होत नाहीत ते आपल्याला प्रयत्नपूर्वक करावे का लागते, विनाकारण यामुळे आपल्याला भरकटनेही वारंवार वाट्याला येउ शकते, पण आज त्याचे समाधान मिळाले. वरील बाबी आपण अतींम सत्यपाशी पोचायला अनुसरत असतो, असे सत्य ते कशाशी बांधील नाही, मुक्त आहे स्वयंपूर्ण आहे. याच्या जवळ जितके आपण जाऊ तसे आपल्यातही बदल होऊ लागतात म्हणूनच तर याला आपण मुक्तीचा मार्गही संबोधतो, आणि ही मुक्ती तेंव्हाच उपलब्ध असेल जेंव्हा आपण मुक्त झालेलो असू आणी ही मुक्ती जर आपोआप घडली तर ती मुळातच मुक्ती असणार नाही तर ते फक्त एखाद्या शास्त्राचे अथवा कायद्याचे बंधनकारक नियम अनुसरणे ठरेल. पण जी गोष्ट बंधन आहे ती मुक्ती कशी ठरू शकेल ? म्हणूनच मुक्तीचा मार्ग हा आपली free will आहे, ती आपली निवड असणे अपेक्षित आहे, ते एखादे लादलेले ओझे न्हवे, म्हणूनच ते आपोआप घडणे नैसर्गिक ठरणार नाही कारण ती तुमची निवड नसेल, म्हणून मोक्षप्राप्तीच्या साधना कोणीही आपल्याकडुन आपोआप न घडता कराव्या लागणे हीच खऱ्या मुक्ततेकडे जाणारी प्राथमिक पायरी ठरते. जेंव्हा जेंव्हा अध्यात्म मार्गात आपण कोणावरही अथवा प्रत्यक्ष अस्तित्वात असेल तर जगतनियंत्यावरही आपला भार सोडून देऊ तर ईश्वराने बहाल केलेले आपले मुक्तीचे स्वातंत्र्यही आपण तिथेच अमान्य करू मग जीवनमुक्ती वा मोक्षावस्थेसारख्या संपुर्ण स्वतंत्र अवस्थेत/व्यवस्थेत स्थिर होणे लांबच राहिले. थोडक्यात अध्यात्म हे बालपण, तरुणपण, प्रौढत्व आणी म्हातारपणाप्रमाणे अथवा जन्ममृत्यू वा दिवस रात्र प्रमाणे आपोआप होणार नाही तर ते योग्य साधना सातत्याने अनुसरून सिद्ध करावे लागेलं कारण ती तुमची free will असेल आणी जी गोष्ट free will आहे तीच मुक्तीचा मार्गही आहे

In reply to by जॉनविक्क

म्हणूनच मुक्तीचा मार्ग हा आपली free will आहे, ती आपली निवड असणे अपेक्षित आहे
सुपर्ब! Bow Down - ('फ्री वील' वापरणारा) सोकाजी

हा प्रतिसाद आपल्या इतर /इतरत्र दिलेल्या प्रतिसादांच्या स्वभावधर्मापेक्षा निश्चितच वेगळा आहे असं एक निरिक्षण नोंदवावे म्हणतो. :-) असो. आपण मांडलेले मुद्दे आणखी विस्तृतपणे समजून घेण्यासाठी काही प्रश्नः - मुक्त असणं म्हणजे काय? कशापासून मुक्त व्हायचं? कारण काय? - जी साधनं आपण उल्लेखलीत, त्यांनी साधकात असा नक्की कुठे/काय/कसा फरक पडतो की ज्यामुळे तो, तुम्ही म्हणता त्या, अंतीम सत्याच्या जळ पोहोचू शकतो? - तुम्ही म्हणता ती फ्री विल [मुक्त ईच्छा?] जर अगदी लहानपणापासून अशी असेल की त्या अंतीम सत्याचा बोध करून घ्यावा, तर तो मार्ग आपोआप निवडला गेलाय की विचारपूर्वक निवडला आहे? यातला कोणताही पर्याय असला तर त्याचा साधनेच्या फळावर काय परिणाम होणार? - कुणावरही भार टाकणे म्हणजे मुळात काय? त्यातलं पथ्य काय? संत/गुरु यांना दिलेली "कुलमुखत्यारी", हा शब्द काय बोध देतो? हे प्रश्न तुम्हाला/कुणाला हिणवण्यासाठी घातलेले नाहीत. ते कुणा एका साधनेशी बांधीलही नाहीत. पण ते साधक प्रश्न आहेत. आपणांकडून सविस्तर व गहन उत्तराची अपेक्षा आहे.