माझा बसप्रवास

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
29 Aug 2010 - 1:21 am

तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”

तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्‍यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो.

हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता.

गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्‍याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?”

मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्‍या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो.

म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं.

पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्‍या गावाहून येणार्‍या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्‍या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज!

मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंडक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!

प्रवाससमाजअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

19 Sep 2019 - 10:44 am | सुबोध खरे

गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी प्रशस्त, शांत आणि बजबजपुरी नसलेली आहेत. (आपण उत्सवाच्या वेळेस गेलो तर कदाचित वेगळे चित्र दिसेल.)

शांता दुर्गा (कवळे,फातोर्फा, कुंकळी) नागेशी, मंगेशी किंवा इतर बहुतेक मंदिरे मी उत्सव नसताना पाहिली.

त्यामुळे तेथे शांत पवित्र असे प्रसन्न करणारे वातावरण नेहमीच पाहायला मिळाले.

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 11:18 am | सुधीर कांदळकर

ती शांतादुर्गा आमची नव्हतीच. आमची कांदोळीला. गेल्या वर्षी तिथे गेलो. चारजण होतो म्हणून मग कारने गेलो. मग बहीण आली तिला पण जायचे होते. पग पुन्हा कांदोळीची वारी. मुलाचे लग्न झाल्यावर सुनेच्या निमित्ताने मग पुन्हा एकदा.

चौकस२१२'s picture

16 Sep 2019 - 2:47 pm | चौकस२१२

लहानपणी ( वोल्वो च्या आधीच काळ) पणजी ला जायचो तेव्हा तेथे राहणाऱ्या भावाचा फार हेवा वाटायचा कारण तेव्हा महाराष्ट्रात फक्त तांबडी यष्टी हि एकमेव , लक्झरी फार कमीच त्यामानाने गोव्यात भरपूर रंगबिरंगी लक्झरी बघायला मिलाळायचा आणि नुकतेच कदमब सुरु झाली होती त्यामुळे त्यागाड्या एकदम नवीन.. त्यामुळे भाऊ फुशारकी मारायचा ,
गोव्यात अजूनही जुना गोडवा आहे का हो? जुने गुत्ते, सध्या खानावळी का आत जेथे तेथे टुरिष्टांसाठी तंदूर चिकन आणि चिनी च्या गाड्या ?
फार वर्षांनी सिंगडावर गेलो होतो आणि तेथील जेवण तसेच मराठ मोळे ठेवले आहे हे पाहून बरं वाटलं पण कॉस्मोपोलिटिन पुण्यातील "क्राऊड" मात्र " idhar तंदुरी मिलेगी क्या ?" हे विचारत फिरत होता आणि कीव आली पामरांची ( मला तंदुरी आवडते पण ते सिंहगडावर भाकरी पिठलं असताना नाही)

जॉनविक्क's picture

16 Sep 2019 - 9:58 pm | जॉनविक्क

एक पैसा ये पैसा
दो जैसा है कैसा
तीन नहीं कोई ऐसा
चार जैसा ये पैसा
पाँच ये हो मुसीबत
छह ना हो मुसीबत
हो मुसीबत ना हो मुसीबत
सात आठ नौ दस

किल्लेदार's picture

18 Sep 2019 - 3:19 pm | किल्लेदार

चटपटीत आणि मजेदार !!!

अनिंद्य's picture

19 Sep 2019 - 11:24 am | अनिंद्य

हे वाचले नव्हते, मजेदार प्रकरण आहे :-))

BTW लेखिका बऱ्याच दिवसात दिसल्या नाहीत. त्यांनी ही गोवा सिरीज पुढे नेली तर वाचायला मजा येईल.

आधी वाचला होताच, परत वाचून पण मजा अली. हडपसर ते पुणे अशा २ वर्ष बस प्रवासाच्या सुखद (??) आठवणी आल्या :P . 

धर्मराजमुटके's picture

20 Sep 2019 - 11:13 pm | धर्मराजमुटके

एव्हाना मुंबईतल्या बशींचे भाडे अर्ध्याने कमी झाल्यामुळे बेस्टीच्या बशींना सुगीचे दिवस आलेत. कंडक्टरला मनसोक्त ओरडून घेता येतं पब्लीकवर...