मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा बसप्रवास

पैसा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्‍यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो. हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्‍याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?” मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्‍या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो. म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं. पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्‍या गावाहून येणार्‍या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्‍या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज! मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंडक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!

वाचने 45499 वाचनखूण प्रतिक्रिया 99

मेघवेडा Sun, 08/29/2010 - 03:16
हा हा हा! मस्तच! बाकी त्या कंडक्टरांची "पोन्जे, पोन्जे" आरडण्याची लकब भारीच! आणि बसेसची नावंही एकेक शॉल्लेट! प्रवासात समोरून येणार्‍या, स्टॅण्डावर उभ्या असणार्‍या वगैरे शक्य तेवढ्या बसेसची नावं वाचणे आणि आणि कुठल्या बसेस कुठल्या मार्गावर धावतात ते शक्य तितके लक्षात ठेवणे हा लहानपणीचा आवडता उद्योग होता! बाकी 'गोव्यातील खाजगी बसेस' हा थीसीसचा विषय ठरू शकतो नक्की! अजून येऊ द्या! :) -- 'पणजी-वाळपई-पणजी' एक्स्प्रेस 'कामधेनु', 'मंगलधेनु', 'गोधन', 'शिवम' वगैरेंचा चाहता.

In reply to by मेघवेडा

पैसा Sun, 08/29/2010 - 09:28
या बसवर "पणजी फोंडा" असा बोर्ड असला तरी ती उलट दिशेने जाणारी पण असते बरेचदा! आणि अधल्या मधल्या गावांची नावे कोणत्याही क्रमाने कुठेही लिहिलेली असतात. ते गणित समजणे नवख्या माणसाला अवघड आहे!

यशवंतकुलकर्णी Sun, 08/29/2010 - 04:12
जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. =) =) मंगेश तेंडूलकरांची गोव्याची व्यंगचित्रे

विलासराव Sun, 08/29/2010 - 11:53
गोव्याचा हा अनुभव घेतलाय. ४-५ वेळा जाणं झालय गोव्याला. तरिपण........हॅः एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. मि एकदा कर्जतला एका माणसाने हात दाखवुन लोकल थांबवलेली पाहिली होती. लिहीण्याची शैली खासच.

अगदी बारकाईंने केलेले वर्णन वाचताना असे वाटू लागेले की आपणही "पोन्जे पोन्जे" घोषणा ऐकत आहोत की काय ! पणजीच्या टाईम्स कार्यालयात नोकरी करणारा आणि बाम्बोलिन (की बाम्बोलिम?) येथे राहणार्‍या मित्राने गोव्यातील खाजगी बस वाहतुकीचा हा (अगदी याच धर्तीचा) किस्सा मला एकदा कळविला असल्याने कोल्हापूर ते पणजी असा "पावलो" ट्रॅव्हल्सचा प्रवास झाल्यानंतर तिथून गोवा युनिव्हर्सिटीला जायचे म्हणून कदंबाच्या "नादाला" लागलेले बरे (कारण रिक्षावाल्याचा भरवसा नव्हता) म्हणून त्या भूरभुर पडणार्‍या पावसात (कोळंबींचा वास घेत) बराच वेळ उभा होतो आणि खाजगी बसवाल्यांच्या पुकार्‍याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत होतो. पण हे कदंब महाराज काय प्रसन्न व्हायला तयार नव्हते. शेवटी तिथेच उभ्या असलेल्या आणि कॉलेजकुमारसम दिसत असलेल्या एका ग्रुपकडे गेलो व त्याना विचारल्यावर "या दोघांचाही नाद करू नका. थांबा" असे म्हणून तिथे बाजुलाच उभ्या असलेल्या "खाजगी टू व्हीलर" (येझडी मोटारसायकल होती) ड्रायव्हरला कोकणीत काहीतरी सांगितले आणि त्याने झटकन आपली गाडी माझ्यासमोर आणली. मजा आली या पद्धतीची कारण पणजीपासून विद्यापीठाचे अंतर बर्‍यापैकी लांब आहे पण येझडीवरून व त्या सुंदर रस्त्यावरून (खरोखरीच त्या रस्त्यामुळे पणजीच्या प्रेमात कोल्हापूरकर पडतोच पडतो...) ती हिरवीगार वनराईसदृश्य निसर्गनवलाई पाहताना इतका आनंद झाला की कदंबा येथील वाट पाहणे बिलकुल विसरून गेलो. विद्यापीठ आल्यानंतर त्यास बिल विचारले तर एवढ्या अंतराचे त्याने फक्त २० रुपयेच घेतले, हाही एक सुखद असा धक्काच होता. (थोडेसे अवांतर : तुम्ही बसचा उल्लेख केला, पण ही टू व्हीलरची सर्व्हीस "फीमेल" साठी पणजीत लागू आहे का?) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पैसा Sun, 08/29/2010 - 12:28
१. त्या गावाचे खरे नाव "बांबोळी" आहे २. टू व्हिलर ड्रायव्हर्सना " पायलट " असे नामाभिधान आहे! ३. रु. २०/-? तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केले असावे. आता १ कि.मी. साठी २० रु. घेतात! (अवांतरः कळविण्यास वाईट वाटते, पण यांचे प्यासिंजर "फीमेल" असू शकतात पण आजपर्यंत मी कधीही "फीमेल " पायलट बघितलेली नाही! प्यासिंजरांची संख्या ४ पर्यंत असू शकते!)

"(अवांतरः कळविण्यास वाईट वाटते, पण यांचे प्यासिंजर "फीमेल" असू शकतात पण आजपर्यंत मी कधीही "फीमेल " पायलट बघितलेली नाही! प्यासिंजरांची संख्या ४ पर्यंत असू शकते!)" इथे काहीसा तुमचा गोंधळ झाल्यासारखे वाटत आहे. मी "पायलट" फीमेल असू शकतात का हे विचारलेले नाही. माझे म्हणणे असे की, अशा टू व्हीलर्सवरून "मुली" पॅसेंजर बनून प्रवास करतात का? हे विचारण्याचे कारण म्हणजे मागील डिसेंबरमध्ये पणजीत "वर्ल्ड फिल्म फेस्टीव्हल" झाला त्यावेळेस येथील दहाजणांचा (मुले-मुली) ग्रुप स्थानिक फिल्म क्लबतर्फे गेला होता. त्यावेळीही फेस्टिव्हल टाईमटेबलव्यतिरिक्त अन्य वेळेत त्या मुलींना मार्केटिंगसाठी फिरताना अनियमित बस सर्व्हिसेसचा काहीसा त्रास झाला होता. आता २०१० च्या फेस्टिव्हलसाठीही आमचा असा एक ग्रुप पणजीत येणारच आहे. तर वर विचारल्याप्रमाणे "त्या" पायलटच्या मागे मुली पॅसेंजरच्या रूपात (पणजीत) कुठेही निर्धास्तपणे जाऊ शकतात का? हे विचारण्याचा उद्देश होता. (स्थानिक जातात काय?) माझ्या वाक्य मांडणीच्या पद्धतीमुळे तुमचा थोडा गैरसमज झाला असे दिसते. असो. २. रुपये २०/- ~~ होय. ती फी ऐकून माझाही विश्वास बसला नव्हता, कारण कदंबा डेपो ते युनि.ऑफिस अंतर तसे खूपच वाटले. अर्थात मी २००४-०५ चा अनुभव सांगत होतो. आता रेट नक्कीच वाढले असणार.

In reply to by इन्द्र्राज पवार

पैसा Sun, 08/29/2010 - 15:18
अगदी खुशाल. भारतातल्या इतर बर्‍याच शहरांपेक्षा पणजी बरंच सुरक्षित आहे. संध्याकाळी उशिरासुद्धा तुम्ही खुशाल पायलटबरोबर (अगदी मुलीसुद्धा) जाऊ शकता. ग्रुप असेल तर प्रश्नच नाही. जास्त काळजी म्हणून सगळ्या मोटरसायकलींचे नंबर टिपून ठेवा. शिवाय गोव्यात प्रवाशाला "घुमविणे" हा भीषण प्रकार नाही (मी पुण्यात अनुभवला आहे). मी उत्तर काहीसं मजेत म्हणून लिहिलं होतं. (नो ऑफेन्स इंटेंडेड). रिक्शा हाही एक पर्याय आहे. दर मात्र महाराष्ट्रापेक्षा काहीसे महाग आहेत. फि.फे. साठी जरूर गोव्यात या. काही लागलंच तर मला कळवा. स्वागतच आहे.

In reply to by पैसा

>>गोव्यात प्रवाशाला "घुमविणे" हा भीषण प्रकार नाही (मी पुण्यात अनुभवला आहे). काहीही बोलू नका!!! पुण्यात असे कुठे काय होते? तुम्ही नक्की दुसऱ्या शहरात घेतला असणार हा अनुभव. पुण्यात सगळे चांगलेच असते हो (अगदी रिक्षावाले सुद्धा) असो, गोव्याला अनेक वर्षात जाणे झाले नाही. ही सिस्टम मजेदार दिसते आहे आणि उपयोगी पण.

"(नो ऑफेन्स इंटेंडेड)" नोप; लाईकवाईज आय डिड्न्ट मीन एनिथिंग इन दॅट लाईन.. फर्गेट इट. माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पणजीतील कला अकादमी (आणि त्यातही ती जेटीजवळील सुंदरशी बैठक व्यवस्था) आणि समुद्रकाठी तासनतास तिथे बसून कॉफीचे घुटके घेत बोटीतील टूरिस्टांच्या फेर्‍या पाहणे, हा एक सुखद आनंददायी अनुभव आहे. कला अकादमीजवळ मात्र कार्सचा भरपेट मारा/मुक्काम बारा महिने असतोच असतो असे स्थानिकांचे म्हणणे दिसले. फिफेच्या अगत्यपूर्वक निमंत्रणाबद्दलही आभार. इन्द्रा

jaypal Sun, 08/29/2010 - 17:52
गोव्याल गेलो नाही पण आगदी त्या बस ने प्रवास केल्याचा भास होतोय. पुढील लिखाणास शुभेच्छा bus

ऋषिकेश Sun, 08/29/2010 - 22:42
गेल्या नव्हेंबरात गेलो होतो मित्रमंडळींबरोबर माझ्या बॅचलर पार्टीसाठी.. तेव्हा अश्याच बसने कळंगुट पर्यंत गेलो होतो.. तो प्रवास आठवला (आणि बॅचलरहूडचे शेवटचे दिवसही ;) ) लिहिण्याची शैली धमाल आहे.. पुढील लेखनास शुभेच्छा आणि मिपावर स्वागत

सुनील Sun, 08/29/2010 - 22:45
छान. खुशखुशीत लेख! जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. हे मस्तच. पण गोव्यातील खासगी बशी केवळ चढू पाहणार्‍या पॅसिंजरासाठीच नाही तर उतरणार्‍या पॅसिंजरसाठीही कुठेही थांबतात. आपले घर जवळ आले की जरा आवज चढवून, "राब रे" अशी हाळी दिली की बस थांबते!

समंजस Mon, 08/30/2010 - 14:23
झक्कास आहे लेख. नेहमीचं ते पुणे,मुंबई किंवा कोल्हापुर या ऐवजी गोव्या बद्दल वाचून मजा आली ;)

नंदन Wed, 03/21/2012 - 11:31
:) लेख आवडला. जवळजवळ विरार लोकलएवढ्या खच्चून भरलेल्या बशीतून केलेले मांद्रे-पणजी प्रवास आठवले.
या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!
अच्च सुशेग गोंयकार :)

किचेन Sun, 03/25/2012 - 18:18
मागच्या पावसाळ्यात गोव्याला गेलो होतो.तेव्हा बस प्रवास केला.आमच्या हे काही वर्ष गोव्यामध्ये होते.त्यामुळे त्यांना बस प्रवासाचा अनुभव होता.मिरामारच्या थोड अलीकडे आम्हाला बघून बस वाल्याने स्वथाहुनच बस थांबवली.स्टोप तर बराच पुढे होता.डोंना पोलाला निघालो.कंडक्टर ने दोघांचे मिळून पाच रुपये घेतले.तिकीट मिळाल नाहीच. तरीहि मी त्याला ४-४ द २ डोना-पोला सांगत होते.एवढ्या अंतराचे पुण्यात एकाचे ७ रुपये तरी नक्कीच झाले असते. त्याच रात्री हॉटेल कोकणला नौ वाजता गेलो.मस्त सी फूड अगदी चापून चोपून खाल्ला.अगदी उठवास्देखील वाटत नव्हत इतक पोट जड झाल होत.जेव्हा उठले तेव्हा कळलं कि आम्ही त्या हॉटेलचे शेवटचे गिर्याईक आहोत.बाहेर आलो तर एकदम शुकशुकाट...गाड्या सोडा बाहेर मानस पण कमीच होती.तीन साडेतीन किलोमीटर पायपीट करत परत आलो.साडे नौ वाजता गोव्यामध्ये एवढी सामसूम असेल अस वाटलाच नव्हत.

In reply to by किचेन

शैलेन्द्र Sun, 03/25/2012 - 18:55
कोकण किणारा का? गोव्यात असताना बेस्ट वे म्हणजे भाड्याने बाइक घेणे,.. २००-२५० रुपये दिवसाला आणी पेट्रोल आपलं.. पण गोव्यात फिरायचा हा मस्त पर्याय आहे..

In reply to by किचेन

शैलेन्द्र Mon, 03/26/2012 - 19:33
कोकण किणारा नावाचं हॉटेलच आहे.. कमीशनर ऑफीसजवळ, पुढच्या वेळी गेलात की ट्राय करा.. स्वस्तात मस्त आहे..

पिवळा डांबिस Mon, 03/26/2012 - 00:30
अ‍ॅक!! बरी पिशि गो तू पैसाबाय! बस नको म्हंटा! सामकी शूर मां गो तू? मगे आशी भिवपां कितें जातां? :) लेख आवडला. बाकी आणखी म्हणजे जेंव्हा गोव्यातल्या एखाद्या चिंचोळ्या रस्त्यावर जेंव्हा दोन भल्यामोठया बसेस समोरासमोर येतात आणि वाट देण्यासाठी कुणी गाडी पाठी घ्यायची यासंबंधात जो त्या दोन बसच्या ड्रायव्हरमध्ये लाडिक परस्परसंवाद होतो त्याला तोड नाही!!! परस्परांच्या बाईल, आवंय, आणिक चेडवां याचें जे लडिवाळ उल्लेख होतात ते ऐकूनच कोकणीप्रेमाचं भरतं येतं!!!! अखंड गोवाप्रेमी, बस्त्यांव द फस्त्यांव :)

मी-सौरभ Mon, 03/26/2012 - 16:38
हा लेख अन प्रतिक्रिया वाचून गोव्यात गेल्याएवढचं फ्रेश वाटलं :)

गोव्याबद्दलचा लेख असून प्री-मो चा एकही प्रतिसाद नाही? किंवा असं आहे, एक गोंयकर दुसर्‍या गोंयकराच्या लेखास प्रतिसाद देत नाही? ;) पैसातै, लेख झक्कास हो. इथे चेन्नईतपण अशा खाजगी मिनीबसेस असतात. त्यांना 'मॅक्सी-कॅब' असे एकदम सेक्सी नाव आहे :) कुठेही थांबवता येते हात दाखवून. गच्च भरली असली तरीही ते बसमधल्या प्रवाशांना 'उल्ला पो, उल्ला पो'(अजून आतल्या बाजूला जा) असं म्हणत तुमच्यासाठी किमान पाय ठेवता येतील एवढी तरी जागा करतातच. तुमचा स्टाप आला की त्याला 'इंगे निपाडिंग अन्ना' असं म्हणायचं, गाडीत टेप कितीही मोठ्या आवाजात लावलेला असला तरी त्या डायवर ला ऐकू जातं मात्र. गोव्यास अजून गेलो नाहिये एकदाही. पण जायचंय नक्की. बघूया कधी मुहूर्त लागतोय ते.

प्रभाकर पेठकर Wed, 10/28/2015 - 12:23
हा सुंदर लेख वाचनातून सुटला होता तो आज पुन्हा वाचनात आला. मस्त आहे. एकदा गोव्याला धावती भेट दिली आहे. आता पुन्हा डिसेंबरात ६-७ तारखेस गोव्याला येणार आहे. तेंव्हा जास्त फुरसतीत गोव्यात भटकीन म्हणतो.

बाबा योगिराज Wed, 10/28/2015 - 13:44
. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. ख्या ख्या ख्या.

मित्रहो Wed, 10/28/2015 - 13:58
पेठकर काका धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. मस्त वर्णन आहे गोव्याच्या बसचे. लॉफ्टर चॅलेंज मधे कुणीतरी एमपीच्या बसचेही जबरदस्त वर्णन केले होते ते आठवले. आधी बऱ्याचदा पणजी ते साकली, बिचोलीम असा प्रवास बसने केला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे तो कंडक्टर पुढे सर, पुढे सर, मागची (मासे का माणसे देव जाणे) पुढे सर म्हणायचा. मी सर्वात आधी गोव्याला गेलो असताना म्हापशाच्या फिश मार्केट मधे गेलो होतो. तेथे गोव्यातली सौदेबाजी काय असते याचा अनुभव घेतला होता. काही वर्षानी बस करुन दक्षिण गोवा फिरत असताना आमची बस रस्त्यावरच चुकीची पार्क असलेल्या सुमोला घासून गेली. सार काही थांबल. आता निवांत आहे काही वेळाने एक काका म्हणाले "लवकर मिटतेय प्रकरण. तो मेकॅनिक आलाय. सातशे रुपये म्हणतोय." मी म्हटल "फक्त सातशेत तो सुमोवाला तयार होन शक्यच नाही." माझ्या डोक्यात ते फिश मार्केट होत. तेच झाले त्या मेकॅनिकलाला काही कळत नाही म्हणून परत पाठविण्यात आले दुसरा आला. त्याने पाच हजार सांगितले. मग आमच्या साठी दुसरी बस बोलावून आमची सुटका करण्यात आली त्यामुळे ते प्रकरण केवढ्यात मिटले ते कळले नाही.

In reply to by बोका-ए-आझम

प्रीत-मोहर गुरुवार, 10/29/2015 - 07:01
पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस कमी चालतात/चालायच्या. आताही थोडीफार तशीच परिस्थिती आहे पण कानपिटिसन वाढलोय..

In reply to by प्रीत-मोहर

प्यारे१ गुरुवार, 10/29/2015 - 15:23
>>> कानपिटिसन आधी म्हटलं काही गोव्याचं पेश्शल दिसतंय. नंतर पेटली. शब्दसंग्रहात वाढ केल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

चांदणे संदीप गुरुवार, 10/29/2015 - 07:23
भन्नाट लिहिलय पैसाताई. अजून येऊ द्या! रच्याकने, कोकण-गोवा कडची माणसे हॅप्पी-गो-लकी टाईप असतात अस ऐकलय. मग ती बसची मंडळी फक्त नसतात काय तशी?

In reply to by चांदणे संदीप

पैसा गुरुवार, 10/29/2015 - 11:47
हॅप्पी गो लकीच की! बस ड्रायव्हर आणि कंडक्टर पिकनिकला निघाल्यासारखेच सुशेगात असतात बहुतेकवेळा. मात्र हापिसला जाणार्‍यांना तो ऑप्शन नसतो ना! मग त्यांची चिडचिड होते! गोव्यात टुरिस्ट लोक सोडता बाकी सगळे सगळीकडे असते तसेच आहे!

नमकिन गुरुवार, 10/29/2015 - 09:09
मडगांवात ४ महिने वास्तव्यास असताना ठाणेकर मित्र मंडळी गोवा फिरण्यास आलेली. तेव्हा सार्वजनिक बसने सगळे फिरलो, मजा म्हणजे बस स्थानकावर सारे वाहक "म्हासा डारे म्हासा डारे" "ए डारे डारे डारे" अशा आरोळ्या ठोकत प्रवासी"पकडायचे" व प्रेमाने त्याला चढवायचे. तेव्हा मित्राने विचारले हे कुठे मासाडारे ला चाललेत का? आणि हे डारे डारे काय? उकलुन सांगितल्यावर पुढील ४ दिवस जो तो "डारे डारे" म्हणायचा व सर्व हसायचो, दिवाळीनंतर ४ दिवस गोवा जाणे विचारी आहे.

In reply to by नमकिन

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/29/2015 - 09:27
हे कुठे मासाडारे ला चाललेत का? आणि हे डारे डारे काय? आम्हालाही सांगा की त्याचा अर्थ.

नीलमोहर गुरुवार, 10/29/2015 - 17:12
गोव्यात बसने प्रवास केला होता, मडगाव - कोलवा बहुतेक, तेव्हा तुम्ही सांगताय तशीच परिस्थिती होती. फुल भरलेली बस, नशिबाने आम्ही आधीच बसलेलो होतो. मासे, भाज्या इ.खचाखच भरलेल्या टोपल्या घेऊन चाललेल्या अनेक दणकट काकू बसमधे होत्या . मात्र अशा प्रवासात होणारे गोवा दर्शन खूप प्रसन्न आणि नेत्रसुखद असते. कधी जायला मिळणार परत गोव्याला..

अभिजीत अवलिया गुरुवार, 10/29/2015 - 21:51
लेख आवडला. आमच्या गावापासून (कणकवली) गोवा जवळ असल्याने बर्याचदा जाणे झालेले आहे. आणी पैसा ताई ह्यांनी लिहिलेले आहे त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे.

In reply to by मीउमेश

नमकिन गुरुवार, 11/05/2015 - 06:47
गोवा म्हणजे मंदिरे, समुद्र, ईसाई मंदिरं त्यातली ममी, मांडवी नदी, त्यातल्या होड्या व मासे इ. इ. शांतादुर्गा- फोंडा, मंगेशी, जुने गोवा चे युनेस्को जागतिक वारसा यादीतले चर्च ⛪, नदी तील तराफे, अगोदा किल्ला, समुद्र किनारे व तेथील "नयनरम्य" सौंदर्य. एकंदर, बरीच मजा आहे बॅा १ माणसाची!

In reply to by नमकिन

मीउमेश गुरुवार, 11/05/2015 - 08:56
मला तर खूप अडचण वाटते आहे, मी शुद्ध शाकाहारी आहे. मुख्य म्हणजे मला फिश चा वास जर सुद्धा सहन होत नाही. शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं का तिकडे ? मुद्दाम रेसोट ऐवजी मी अपार्टमेंट घेतली आहे. काहीच शाकाहारी नाही मिळालं तर maggie किव्हा तत्सम नुडल वर जगावं लागेल. पैसा ताई काही माहिती द्या या वर

In reply to by मीउमेश

पैसा गुरुवार, 11/05/2015 - 09:09
गोव्यात शाकाहारी जेवण अतिशय उत्तम मिळतं. बहुतेक देवळांच्या कॅन्टीनमधे कांदा लसूण सुद्धा न घातलेलं तरी चविष्ट जेवण मिळतं. गावोगावी एखादे तरी प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल आहे. घरगुती खानावळी आहेत. उडप्यांची हॉटेल्स तर आहेतच आहेत. नमकीन यांनी म्हटलेल्या गोव्याशी आम्ही जे गोव्यात नेहमी रहातो त्यांचा रोजच्या आयुष्यातल्या आवश्यक कामांव्यतिरिक्त काही फारसा संबंध नाही. गोव्याची खरी माहिती हवी असेल तर आमचे गोंय ही आमची लेखमालिका वाचा. टुरिस्टांसाठी संपूर्ण वेगळे जग अस्तित्त्वात आहे. खरे सांगायचे तर कोणत्या हॉटेलात खाऊ, किंवा कुठे राहू असे विचारले तर मी गोंधळून जाते. कारण गोवा टुरिझमच्या सरकारी हॉटेल्सशिवाय मी कोणालाही कोणते हॉटेल सांगू शकत नाही. @नमकिन, नयनरम्य ची तुमची व्याख्या काय यावर बरेच काही अवलंबून असते. गोवा नयनरम्य आहेच. पण कमी कपड्यातल्या फॉरेनर्स बद्दल बोलत असाल तर पसंद अपनी अपनी. गोव्याची ही "खाओ पिओ मजा करो" प्रतिमा व्हायला कारण आधीच्या काही सरकारांची पापे आहेत. तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मात्र गोव्यातल्या सामान्य स्त्रियांबद्दल तरुण तेजपालने काढलेले उद्गार लक्षात ठेवून गोव्यात आलात तर त्याच्यासारखेच काहीतरी होऊन बसेल याची खात्री बाळगा! गोव्यातले लोक मुंबईसारखे कॉस्मोपोलिटन किंवा फुडारलेले नाहीत. अगदी स्थानिक ख्रिश्चनसुद्धा बरीच जुनाट नीतीमूल्ये मानणारे आहेत. इत्यलम.

In reply to by पैसा

नमकिन Sun, 11/08/2015 - 20:44
जाता जाता. बाकी"खानपान" शाकाहारी भोजन सर्वत्र उपलब्ध. माझे सलग ४ महिने वास्तव्य असताना (२०००-०१) साली व नंतर इतर अनेक १०-१२ फेरफटके केले असता स्त्री -पुरुष समानता तसेच कष्टकरी स्त्रीया सर्वत्र आढळल्या. मला तरी कुठेही अप्रिय अनुभव /प्रसंग पाहण्मात नाहीं, दैवकृपेने.

बिचारी पै तै!!! प्रथम गोव्याला गेलो होतो ते आठवले "फोण्याहुन बसला का सायबां" असा विलक्षण व्यक्तिगत अदर अन बेदरकार प्रश्न विचारणारा कंडक्टर आठवला

In reply to by अक्षया

बॅटमॅन Fri, 11/06/2015 - 17:02
गोव्याचं माहिती नाय पण कर्नाटक बसप्रवासाबद्दलही हे तितकेच खरेय. रादर महाराष्ट्र सोडून कुठेही. ;)

चतुरंग Sun, 11/08/2015 - 22:23
बसप्रवासाला कंडक्टरच्या 'कर्करोगाने' असं ग्रासलं जावं हे बाकी भलतंच मनोरंजक! :) (कर्कांंची माळफुले अजुनि क्दंबात) ;) -कर्करंग

In reply to by चतुरंग

पैसा Sun, 11/08/2015 - 22:35
=)) नशिबाने कदंबाचे कंडक्टर चांगले शिस्तीचे असतात. पॉइंट टू पॉईंट कदंबा बसेसमधे तर कंडक्टर नसतातच. हा कर्करोग खाजगी बसगाड्यांनाच! =))

कंजूस Mon, 02/26/2018 - 21:17
कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी वाक्ये लवकर द्या. कोकणीतले संवाद का दिले नव्हते? आता ते देऊन २७-२८ फेब्रुवारीच्या बोलीभाषा नवीन मालिकेत द्याच.

In reply to by कंजूस

पैसा Mon, 02/26/2018 - 22:34
प्रीमो कोचिंग क्लास धागे आहेत. तरी ही घ्या. हांगा यो - इकडे ये थंय वच - तिकडे जा तुजें नाव कितें - तुझे नाव काय तू खंय रावतां - तू कुठे रहातोस्/रहातेस मात्सो रांव - जरा थांब नुस्त्याक कितलें पयशे - माशाला किती पैसे शीत दी - भात दे आमी पणजें या - आम्ही पणजीला जाऊया. हा, पण गोंयकाराना मराठी छान कळते आणि बरेच जण बोलतात सुद्धा. गोंयकाराना हिंदीपेक्षा मराठी जास्त येते. बाहेरून आलेल्या लोकाना मात्र (भय्ये, नेपाळी, केरळी वगैरे) हिंदी समजते.

सुधीर कांदळकर Mon, 09/16/2019 - 11:14
या लेखाच्या रूपाने मिळाला. मजा आली. पण माझा अनुभव मात्र चांगला आहे. चारपाच वर्षांपूर्वी. आमच्या सौ.ला कोणीतरी सांगितले की कोरगावची शांतादुर्गा ही कांदळकरांची शांतादुर्गा. मंदिरावर तसा उल्लेख आहे. मग मापशाला उतरलो. तीसगाव नाका जाणारी बस पकडली. कन्डक्टर सौ.ला कोंकणीत म्हणाला की मावशी कोरगांवला जाणारी बस यायला वेळ आहे. उगीच रस्त्यावर उभे राहण्यापेक्षा नाका आला तरी उतरू नका. बस परत येतांना उतरा. जास्त भाडे नको. त्या दुष्काळी वर्षी नेमका धो धो पाऊस कोसळत होता. येतांना उतरलो. तिथून ४ किमीवर कोरगांव. दुकानात चौकशी केली. बसला अजून ४० मिनिटे होती. एकही रिक्षा नाही. थोड्या वेळाने एक पायलट येऊन उभा राहिला. माणशी साठ रुपये, रिटर्न आणून सोडणार. पाच मिनिटे लागतील. मी तयार झालो. सौल. ला सोडून ये मग मला ने म्हणालो. तर तो म्हणाला दोघांनाही नेतो. दर्शन करा, मी थांबतो. परत आल्यावर सोडतो. त्याच्या अंगावर रेनकोट होता. पाऊस थोडा कमी होऊन भुरभुर झाल्यावर त्याने नेऊन आणून सोडले. फक्त १०० रु. घेतले. घनदाट ढगांमुळे प्रकाश कमी होता पण नाईट व्हीजनवर टाकून प्रचि मस्त निघाली. SHANTADURGA KORGAON धन्यवाद.