मेडिकल इन्शुअरन्स २०१८-१९
( वाढत्या वयाला आरोग्य विमा चालू ठेवावा का?)
आरोग्यविमा म्हणजे आजारी पडलो, अॅक्सिडंटमध्ये दुखापत झाली, अपेन्डिक्स, ताप इत्यादि अचानक उद्भवणारे रोग झाल्याने हॅास्पिटलमध्ये भरती /दाखल होऊन उपचार करताना जो खर्च येतो तो "आरोग्य विमा" देणाऱ्या कंपन्या थोडाफार परत देतात.
जे लोक कोणत्यातरी मोठ्या कंपनीत स्थिर नोकरीत असतात तिथे त्यांना कंपनीकडून परस्पर खर्च भरपाईची सोय होते परंतू सर्वचजण अशा काही नोकरीत नसतात आणि त्यांना स्वत: विमा हप्ते भरून एकेक वर्षासाठी विम्याचे संरक्षण घ्यावे लागते.
मागे एकदा असा सल्ला मिळालेला की नोकरी कायमची नसते आणि मग तुम्ही बाहेरून विमा काढायला गेलात आणि वय पन्नासच्या पुढे असेल तर अडचणी वाढतात. शिवाय काही रोगांना पहिल्या तीनचार वर्षांपर्यंत भरपाईसाठी मागणी करता येत नाही म्हणून पन्नाशी अगोदरच एक लहान रकमेची पॅालसी घेऊन ठेवा. त्याप्रमाणे पंधरा हजार रु प्रत्येकी अशी कुटुंबाची पॅालसी घेतली होती. ( न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.) पुढे ती प्रत्येकी रु एक लाख विमा कंपनीनेच करायला लावली. हप्ता एकलाखाला(x3) सहा सात हजार बसत होता व दरवर्षी थोडाथोडा वाढायचा. रिन्युअलच्या वेळी ब्लॅन्क चेक देत असे. मागच्या वर्षी बारा हजार रु होता. यावेळी अचानक अठ्ठावीस हजार रु कापले गेले ( साडेतीन हजार जीएसटी धरून) तेव्हा चौकशी केल्यावर कळले आताचा तीन महिन्यांपुर्वी हप्ते भरमसाठ वाढवले आहेत. मला एकजण म्हणाला एक महिन्याच्या आत कॅन्सल केलास तर जिएसटी वजा जाऊन काही रक्कम परत मिळेल. पण आता आणखी एक घोडचूक नको ठरवले.
दुसरे एक नातेवाइक( ७० -७५ वय)- दोघांचे चौदा हजार भरलेले मागच्या वर्षी त्यांना चाळीस हजारांचा हप्ता सांगण्यात आला. त्यांचे एक ओपरेशन सहा महिन्यांपुर्वी झालेले तेव्हा हॅास्पिटलचे बिल पासष्ट हजार पेमेंट करून पेपर्स घेतले तेव्हा डॅाक्टरनेच सांगतले यातले तुम्हाला ही न्यु इंडिया कंपनी फक्त तेवीस हजारच देईल. तसेच झाले. त्यांचा तर वीस वर्षांत एकही क्लेम नव्हता. बोनस मरू दे पण एका अचानक झालेल्या रोगाचे जर पूर्ण पैसे मिळणार नसतील तर कशाला काढायचा विमा या विचाराने त्यांनी रिन्यु नाही केला.
काही माहिती इथे पाहा -
झी न्युज बातमी पाहा.
या ब्लॅागवर माहिती वाचली. वाढत्या वयाला ( साठनंतर) प्रिमिअम भयानक वाढत जातो तो चार्ट दिला आहे आणि सरळ पॅालसी बंद करण्याचा सल्ला आहे.
हा लेख नकारात्मक प्रसिद्धीसाठी लिहीत नाही, वाढत्या वयाबरोबर आरोग्य विमा चालू ठेवायचा का नाही या विचारासाठी आहे. एका कंपनीने तीस हजार रु हप्ता सांगितला तर इतर कंपन्या काही एकदम आठदहा हजारावर येतील ही शक्यता अजिबात वाटत नाही.
प्रतिक्रिया
6 Aug 2018 - 11:26 am | ट्रम्प
आयडी प्रमाणे वागून पैसे वाचणार नाहीत हो काका , उलट उपचारासाठी भरपूर जातील .
उतरत्या वयात पैसे गाठीला असून फायदा नाही, मेडीक्लेम कम्पन्या लुटणार आहेत हे माहीत असून त्यातल्या त्यात कमी धारधार सूरी निवडणे हे आपल्या हातात आहे .
महत्वाचा धागा पण बाकीचे मिपाकर अमृत पिऊन जीवन जगत आहेत .
6 Aug 2018 - 7:16 pm | कंजूस
धागा चुकून काथ्याकुटमध्ये पडलाय, जनातलं_मनातलंमध्ये हवा होता.
6 Aug 2018 - 11:38 am | कंजूस
>>उपचारासाठी भरपूर जातील .>>
पासष्ट हजार बिलाचे तेविस मिळणार असतील किंवा अमक्या तमक्या रोगासाठी एवढेच असं होणार असेल तर काय उपयोग?
6 Aug 2018 - 2:27 pm | मोहन
मला देखील हाच प्रश्न पडला आहे. विम्याचे ३-४ हप्ते फंडात गुंतवले तर मुळ विम्या इतकीच रक्कम जमा होइल की हो ?!
6 Aug 2018 - 3:29 pm | पाषाणभेद
चहाचे अनेक प्रकार आहेत. साधा चहा, स्पेशल चहा, उकाळा आदी आदी. त्यातही चहा कोठे आणि किती जण घेतात त्यावर दर अवलंबून आहेत.
टपरी वरचा चहा, चांगल्या एरीयातली टपरीवरील चहा, बस स्टँडवरील चहा, रेल्वेतील कन्सेशन असलेला चहा, अमृततूल्य, ताज हॉटेलातील कस्टमाईज चहा यामधे चहाचा दर आणि दर्जा वेगवगळा असतो.
परत कुणाला कोणता चहा आवडतो त्यावरही चहा कुणाकडे घ्यायचा हे ठरते.
आपण दिलेल्या वरील उदाहरणातील व्यक्ती आणि त्यांची वये काय आहेत? तसेच त्यांनी किती लाखाची पॉलीसी काढली होती याचा उलगडा झाल्यावरच पुढचे बोलणे होवू शकते.
6 Aug 2018 - 7:13 pm | कंजूस
पहिल्यामध्ये ५८-६०, दुसऱ्यात ७०-७५, प्रति एक लाख.
ब्लॅागमधला चार्ट पाहा.
6 Aug 2018 - 6:36 pm | कपिलमुनी
मुद्दा हा आहे की पुर्वीपासून पॉलिसी असेल तरीही प्रेमियम चा स्लॅब वाढवत असतील तर तो वाढत्या वयानुसार परवडायला हवा .
6 Aug 2018 - 7:56 pm | पाषाणभेद
वरील मुळ पोष्ट अजिबात पटलेली नाही. प्रचंड गैरसमजूतीवर आधारलेली आहे.
मिपावरील लेखन पुढील काळात कुणीही वाचू शकतो आणि याचा संदर्भ घेवून कुणीही आरोग्यविम्याविषयी दिशाभुल करू शकतो म्हणून मुद्दाम प्रतिसाद द्यावा लागतो आहे.
आपल्याला किंवा आपण दिलेल्या उदाहरणातील व्यक्तींची वये, विम्याची रक्कम आदी विदा नसल्याने त्याबाबत भाष्य करणे चुकीचे होईल.
तसेच क्लेम्स चे पैसे कमी कसे मिळाले हे ती केस स्टडी केल्याशिवाय यावर देखील भाष्य करता करणे चुकीचे आहे.
बाकी राहता राहीला प्रश्न की प्रिमीयमचे दर इतके कसे?
हॉस्पिटलचा खर्च वाढलेला आहे. सर्व्हिस टॅक्स वाढलेले आहेत. गोळ्या औषधांचा दर वाढलेला आहे. याचा परिणाम विमा प्रिमीयमवर होतो.
कोणताही विमा हा सर्व लोकांचे पैसे जमा होवून त्यात खर्च दिला जाणे या तत्वावर असतो. विमाकंपनी काही धर्मदाय काम करायला बसलेली नसते. नो लंच इज फ्री.
आरोग्यविम्यात जास्त फ्रॉड क्लेम्स येतात हे आपणाला माहीत आहे काय?
आपण काही हौस म्हणून आजारी पडत नाही. आणि आरोग्यविम्याचे पैसे वसूल करण्यासाठीदेखील आजारी पडत नाही. झालेला पैशांचा खड्डा भरून निघावा हिच अपेक्षा असते. एखादा व्यक्ती निराळाअ असल्यास अपवाद समजावा. तसे असते तर मग जिवनविम्याचे पैसे वसूल होण्यासाठी प्रत्येकजण आत्महत्या का नाही करवून घेत?
आणि आरोग्यविमा नको म्हणणारा ब्लॉग लेखकाने त्याचा स्वत:चा आरोग्यविमा नाकारला आहे काय याचे डिटेल्स दिले आहेत काय?
6 Aug 2018 - 8:45 pm | कंजूस
पाषाणभेद, तुमचा मुद्दा - हप्ता/सेवादर याबाबत पटला आहे.
पण हा लेख दिशाभूल करण्यासाठी, विमा कंपनीस वाइट दाखवण्यासाठी लिहिलेला नाही. ठराविक वयानंतर - ६०-६५ नंतर विमाहप्ते जर एवढे वाढणार असतील तर विचार करावा लागतो आहे.
ब्लॅागवाल्यानेही मत मांडलं आहे ते वाचा - खूप हप्ता पडत असेल तर विमा न घेताही फायद्यात ठरू शकते.
विमा घेऊ नका असा प्रचार नाही.
शिवाय हा लेख काथ्याकूटमध्ये पडला आहे तो जनातलं_मनातलं मध्ये टाकायचा होता.
6 Aug 2018 - 9:16 pm | पाषाणभेद
ठिक आहे. तसेही ६०-६५ नंतर जायची तयारी करायचीच आते. मग पैसे का वाया जावू द्या.
8 Aug 2018 - 10:38 pm | चौथा कोनाडा
या ही मुद्द्यामध्ये तथ्य वाटतेय.
6 Aug 2018 - 9:20 pm | चौथा कोनाडा
पोस्ट मध्ये तथ्य वाटतेय.
आरोग्यविमा गरजेचाच आहे, पण ......
विमा हप्ता हा मुख्यत्वे करुन पॉलिसीधारकाच्या उत्पन्नावरच आहे, जेव्हढे उत्पन्न जास्त (किंवा काळमानानुसार वाढत जाणारे) तेव्हढं वाढत जाणारे हप्ते सोयीस्कर पडतात. अन वर वेगवेगळे प्रकार (रायडर्स) घेता येतात. सेवानिवृत्त, ज्यांना बर्यापैकी (अथवा वाढत जाणारे) निवृतीवेतन मिळते, त्यांच्यासाठी देखिल वाढणारे हप्ते चिंतेचा विषय ठरायला नको.
परंतु जे पन्नाशीतच निवृत झालेत व नियमित वेतन गडबडले आहे त्यांच्यासाठी विमाहप्ता हा अतिशय संवेदनाशील विषय आहे.
विमाहप्ताच परवडणारा नसेल तर नाईलाजास्तव आरोग्यविमा बंद करावा लागणार .....! आणि जशी परिस्थिती असेल तसा सामना करावा लागणार !
6 Aug 2018 - 10:02 pm | पाषाणभेद
हे असे तर दररोजच्या जगण्याच्याबाबतीतही होवू शकते, नाही का?
6 Aug 2018 - 10:54 pm | चौथा कोनाडा
हो, बरोबर आहे.
... आणि मग या दररोजच्या जगण्याच्या अनेक तडजोडीपैकी हा आरोग्यविमा महत्वाचा मुद्दा.
12 Aug 2018 - 10:45 am | प्रकाश घाटपांडे
अगदी खर ! विमा आणि शनी यांना भयापोटी दखलपात्र करावे लागते
6 Aug 2018 - 10:06 pm | पाषाणभेद
अन आरोग्यविमा किती सम ॲश्यूअर्ड चा घेता त्यावरही प्रिमीयम अवलंबून असतो. एखाद्याचे उत्पन्न कमी असेल तर तो एक कोटीचा विमा उतरवू शकतो काय?
जसा खिसा तसा खर्च.
आणखी एक कुठलाही विमा हा सुरुवातीच्या वयात कमी हप्त्याचा असतो. आरोग्य विम्यात वेटिंग पिरिअड तसेच जुने आजार हि देखील अट असते.
7 Aug 2018 - 7:43 am | कंजूस
अमच्याकडे एक खासगी आरोग्य सेवा केन्द्र आहे तिथे उत्तम सेवा योग्य पैशात ( जवळपास तिप्पट पाचपट स्वस्त) मिळतात. क्लेमसाठी बिलवगैरे मिळत नाही. जर अशी सेवा मिळतेय तर क्लेमची गरज भासतच नाही. योग्य आणि गरजेच्या तपासण्या करून ओपरेशनवगैरे करतात. रुग्ण काम झाल्यावर तिथल्या पेटीत दान टाकतात.
हप्ते भरलेले नसल्यास इकडे किंवा कुठेही जाण्यास आपण मोकळे राहतो.
7 Aug 2018 - 12:30 pm | सुबोध खरे
मी आजकाल तरुण मुलांना एक सल्ला देतो तो म्हणजे वयाच्या २५ पासून किंवा नोकरीला लागल्यापासून दर वर्षी १०,००० रुपये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये टाकत राहा. १५ वर्षांनी तेच खाते अजून ५ वर्षे वाढवता येते. असे २० वर्षांनी मिळणारे पैसे अधिक दर वर्षी १०,०००/- इतर म्युच्युअल फंडात किंवा तत्सम वित्तीय गुंतवणुकीत गुंतवा. हे पैसे कोणत्याही इतर कामाना अजिबात वापरू नका तर हेच पैसे आपल्याला उत्तर आयुष्यात वैद्यकीय सुविधेसाठी कामास येतील. आणि हे पैसे मरेपर्यंत वैद्यकीय उपचार सोडून दुसऱ्या कोणत्याही कामासाठी अजिबात वापरायचे नाहीत.
रोख पैसा हातात आला तर त्याला लगेच अनेक पाय फुटतात. २५ ते ४५ या काळात PPF मधून पैसे काढणे सहज सोपे नसल्यामुळे आपोआप बचत होईल आणि त्यावरील करहि वाचेल. ४५ वयानंतर माणसे थोडी शांतपणे आरोग्याचा विचार करू लागतात.
मेडिक्लेमच्या वाढत्या हप्त्याला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
7 Aug 2018 - 1:16 pm | टवाळ कार्टा
समजा वयाच्या 25 ते 45 वर्षांपर्यंत दर वर्षी 10000 PPF आणि 10000 म्युच्युअल फंडात गुंतवले (एकूण 20000 दर वर्षी) तर
20 वर्षांनंतर PPF मधून मिळणारे पैसे 557645 (व्याज दर 9% प्रत्येक वर्षी)
20 वर्षांनंतर म्युच्युअल फंडातून मिळणारे पैसे 1178106 (व्याज दर 15% प्रत्येक वर्षी)
एकूण 1735751
यात व्याजदर अंदाजे घेतलेले आहेत....ज्या हिशोबाने वैद्यकीय खर्च वाढतोय आणि ज्या हिशोबाने मेडिक्लेम पॉलिसी दाखवल्यावर सढळ हस्ते महाग औषधे वापरली जातात त्यानुसार 20 वर्षांनंतर मिळालेली रक्कम कदाचित 2-3 वर्षेच पुरेल
7 Aug 2018 - 4:37 pm | चिनार
टका...
पीपीएफ आणि म्युच्युअल फंड ह्यांची तुलना केल्यास परताव्याच्या बाबतीत म्युच्युअल फंड वरचढ आहेत ह्यात वाद नाहीच.
पण पण पण..इथे मुद्दा काय आहे ? तर उतारवयात आपल्या वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे.
पीपीएफला पंधरा वर्ष लॉक इन पिरियड आहे त्यामुळे इच्छा असूनही पैसे काढता येत नाही. किंवा काढलेच तर फार कमी काढता येतात. त्यामुळे आपोआप पैसा साठत राहतो.
याउलट म्युच्युअल फंडाचा लॉक इन पिरियड जास्तीत जास्त तीन वर्षे असतो ( तोसुद्धा फार कमी फंडांचा).
म्युच्युअल फंडाचा इतिहास बघितला तर जास्तीत जास्त पाच वर्षात ती गुंतवणूक बाजारातून फायद्यासहित काढून घेण्यात येते. भारतात असं करणाऱ्या ग्राहकांची संख्या ९५% टक्के असेलच. कारण जर असं नसतं तर साधारण १९९८-९९ साली म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे आज करोडपती झाले असते. असं खरंच झालंय का ते तपासून बघ. एका मोठ्या म्युच्युअल फंड AMC च्या माहितीनुसार केवळ पाच टक्के लोकं आपली फंडातली गुंतवणूक दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवतात.
अर्थात हा सगळा मानसिकतेचा भाग आहे. वैद्यकीय खर्चाची तरतूद म्हणून म्युच्युअल फंडात २० वर्षे गुंतवणूक करण्याची आर्थिक शिस्त आणि नियंत्रण आपल्याजवळ असेल तर उत्तम !!
7 Aug 2018 - 5:57 pm | टवाळ कार्टा
माझा मुद्दा इतकाच होता की गुंतवणूक कुठेही आणि कितीही केली तरी मेडिक्लेमला पर्याय नाही
7 Aug 2018 - 2:45 pm | कंजूस
मी तरुण असताना माझ्या काकांनी हाच PPF चा सल्ला दिलेला. आता माझ्या अकाउंटला तीस वर्षं होताहेत. विद्ड्राअल नाही आणि शक्यतो फुल लिमिट डिपॅाझिट्स टाकली. कंपनीचा अकाउंटंट नेहमी चिडायचा " तुमच्या 80CC चे लिमिटवर तुम्ही ppf मध्ये कशाला पैसे भरता? त्याचा टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. "
पण PPF ही गुंतवणूक नाही, दुभती म्हैस आहे. EEE TYPE ( Deposites & Interests & Withdrawal - all Exempt.)
म्युट्युअल फंडची मला माहिती नाही.
सुबोध खरे आणि टका धन्यवाद.
धाग्याचा उद्देश निरनिराळे पर्याय माहिती व्हावे, चर्चा होत रहावी, ते होत आहे.
टॅक्सेशन, गुंतवणूक, इन्शुअरन्स आणि इलेक्ट्रॅानिक्स यांचे धागे दरवर्षी मे -जूनमध्ये नवीन यावेत.
7 Aug 2018 - 3:19 pm | टवाळ कार्टा
माझ्यामते PPF हा EEE टाइप असला तरी SIP चा परतावा टॅक्स भरूनसुद्धा जास्त असतो...SIP गुंतवणूक 20 वर्षे सलग केली असे मानून
7 Aug 2018 - 6:45 pm | सुबोध खरे
PPF चा पर्याय सुचविण्याचे कारण एकच आहे कि त्यात दरवर्षी एकदा तरी पैसे भरावेच लागतात आणि ते सहजासहजी काढता येत नाहीत. त्यामुळे २५ ते ४० किंवा ४५ या काळात त्या पैशाला हात लागत नाही. ज्यांना आर्थिक शिस्त आहे आणि ज्यांना पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे समजते त्यांनी इतर यापेक्षा चांगले मार्ग नक्की शोधावेत. पण २५ वयाला हि समज फार कमी लोकांना असते.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे कि आपले भांडवल संपूर्ण सुरक्षित राहते. दर पाच वर्षात एकदा स्थिती अशी असते कि भांडवली बाजार गाळात असतो अशा वेळेस आपले म्युच्युअल फंडातील पैशाचे भांडवल सुद्धा निघणार नाही हि स्थिती येते. दुर्दैवाने या काळातच नेमके आपल्याला मोठे आजारपण आले तर दुष्काळात तेरावा महिना हि स्थिती येते.
7 Aug 2018 - 6:57 pm | टवाळ कार्टा
पहिल्या भागासाठी सहमत
दुसरा भाग PPF सारखाच आहे, हात दगडाखाली अडकलेले असतात
5 Sep 2018 - 4:48 pm | II श्रीमंत पेशवे II
बरोबर
7 Aug 2018 - 1:59 pm | आनन्दा
माझ्या आत्याच्या मिस्टरांचा अनुभव, न्यू इंडियाचाच
फेब 2016 मध्ये गावी काम करताना वूड कटर हातावर गेला, मनगटाची नस तुटली. रक्ताचा पुर आला.
तिथे प्रथमोपचार करून तातडीने पुण्याला आणले. दीनानाथ मंगेशकर मध्ये प्लास्टिक सर्जरी वगैरे सगळे केले. 8 दिवस स्पेशल रूम मध्ये मुक्काम होता..
खिशातून जवळ जवळ एक पैसा देखील गेला नाही. वय होते 68..
7 Aug 2018 - 3:03 pm | कंजूस
आनन्दा तुमचा अनुभव चांगला आहे.
डॅाक्टर लोक केसपेपर, ट्रिटमेंट, टेस्टिंग, प्रिस्क्रिप्शन ,हॅस्पिटल खर्चातले व्हिजिट फी, नर्सिंग चार्जेस, ओपरेटिंग चार्जेस कसे लिहितात यावरही क्लेममधला परतावा अवलंबून असतो.
माझ्या पत्नीचा एकच क्लेम २००६मध्ये झाला होता. हॅास्पिटलच्या अकाउंट क्लार्कने बिल रिसीट दिल्यावर मी माझ्याकडचे रेवन्यु स्टॅम्प्स लावून डॅक्टरच्या पुन्हा सह्या घेतल्या होत्या. सर्व पेपर्स तारखेप्रमाणे लावून वडाळ्याला क्लेम सेटल करणाऱ्या कंपनीत गेलो. तिथल्या डॅाक्टरने फाइल पाहून पाच मिनिटांत सांगितलेले की हे सर्व पैसे मिळतील. फक्त पाचशे रु अडमिशन फी लिहिली आहे ती बाद आहे.
काही लोक हे काम एजंटचे काम आहे तो करेल म्हणून त्यावर सोपवतात. तो नंतर उगाच भाव खातो किंवा बघा मी तुमचे ८५% मिळवून दिले इत्यादि. स्वत: केल्यास फर्स्ट हँड माहिती मिळते.
7 Aug 2018 - 3:30 pm | खटपट्या
माझा न्यु इंडीया अशुरन्स कंपनीचा अनुभव चांगला आहे.
आतापर्यन्त तीनवेळा क्लेम केला, तीनही वेळेला पूर्ण पैसे मिळाले.
यावर्षी हप्ता थोडा वाढवला आहे. वर सांगितल्याप्रमाणे पुनर्विचार करावा लागेल...
7 Aug 2018 - 4:08 pm | सुधीर कांदळकर
माहिती नसलेल्यांसाठी माहिती देतो:
१.
अपवादात्मक आहे. माझ्या पत्नीच्या मनगटाचे हाड २०१० मध्ये मोडले होते. बाहेरून स्टील ब्रॅकेट बसवले होते. पॉलिसीच्या अटींप्रमाणे अपघात झाल्याबरोबर इन्शुरन्स कंपनीला कळवले होते आणि सर्व बिले व्यवस्थित स्टेटमेन्ट देऊन पाठवली होती. इन्शुरन्स कंपनीच्या यादीतले कॅशलेस इस्पितळ जवळ नव्हते म्हणून दुसर्या जवळच्या इस्पितळात ठेवले होते. रु. ४८ हजार खर्च आला. ४५ हजार मिळाले. ३ हजाराच्या टेस्टचे रीपोर्ट लावले नव्हते म्हणून ते कापले. आज मेडिकल इन्शुरन्स आणि अपघात विमा अत्यावश्यकच आहे. अपघात आजारपण काही सांगून येत नाहीत. आजच्या इस्पितळ आणि औषधपाणी खर्चानुसार प्रत्येक व्यक्तीस कमीत कमी ५ लाखांचा अपघात विमा आणि ५ लाखांचा मेडिकल इन्शुरन्स आवश्यक आहे.
२. मेडिकल इन्शुरन्स कुटुंबाचा घेतल्यास ५ ते १५ टक्के डिस्काउंट मिळतो. पहिला चेक देण्यापूर्वी आपण काढणार आहोत तशा दुसर्या कोणाच्या तरी पॉलिसीच्या टर्म्स आणि कन्डिशन्स एजंटकडून मागवून त्या वाचून घेणे गरजेचे आहे. त्यात इन्क्लूजन्स आणि एक्सक्लूजन्स मधील रोगांची तसेच विविध उपचारांसाठी बिलाची अपर लिमिट्सची वर्णने नीट वाचावीत. गंभीर रोगांचा अंतर्भाव असल्यास वार्षिक प्रीमिअम अर्थातच जास्त पडतो. हवे तर तज्ञांचे मत घ्यावे.
३. मुले नोकरीला लागल्यावर त्यांना कौटुंबिक पॉलिसी घ्यायला सांगावे आणि आपली कौटुंबिक पॉलिसी बंद करावी. प्रीमियम थोडाफार कमी पडतो. मोलाच्या नोकरीच्या कंपनीची पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीत डिपेन्डन्ट म्हणून आपले नाव घालून इन्शुरन्स कंपनीचे ओळखपत्र घ्यावे. ते सहज मेलवर मिळते.
४. अपघात विम्याचा वेगळा फायदा म्हणजे अपघातात दुर्दैवाने काही काळासाठी पंगुत्त्व आले आणि रजा संपली असली तर तेवढ्या काळातले वेतन मिळते. कायम पंगुत्त्व आले तर पूर्ण विमा रक्कम मिळते. इस्पितळाच्या बिलाच्या २० टक्के किंवा पॉलिसीत उल्लेख असल्याप्रमाणे औषधाचा खर्च मिळतो.
५. विमा कंपनीत या वर्षी एकून किती विमा रक्कम जमा झाली आणि किती क्लेम रक्कम दिली याच्या गुणोत्तरावर राष्ट्रीय मध्यवर्ती विमा संस्था पुढील वर्षीचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीचा प्रतिलाख प्रीमियम रक्कम ठरवते. मोतीबिंदूचे ऑपरेशन असल्यास डॉक्टरचा पहिला प्रश्न असतो की विमा आहे काय. विमा नसेल तर एका डोळ्याचे १५,००० रु. आणि असेल तर ३३,००० रु. असा दर बहुतेक डॉक्टर निर्लज्जपणे लावतात. त्यामुळे दरवर्षी विमा प्रीमियम रक्कम मोठ्या प्रमाणात वाढते.
६.
मी नोकरीत असतांना प्रत्येक कामगाराला अशा पोलिसीज दाखवा नाहीतर नवी घ्या अशी हुकूमशाही केली होती. तेव्हा बर्याच शिव्या पडल्या. पण एकदा एका कामगाराच्या पायावरून बेस्टची डबल डेकर बस गेली आणि १४ महिने तो घरी होता आणि १४ महिन्याचा पगार त्याला ग्रूप अॅक्सीडेन्ट विम्यातून मिळाला.
तेव्हा आयुर्विम्यासारखाच मेडिकल आणि अपघात विमा देखील अपरिहार्य आहे.
7 Aug 2018 - 5:59 pm | टवाळ कार्टा
पॉईंट नंबर 5 मध्ये किमतीत जो फरक आहे त्यामुळे जे मेडिक्लेम प्रीमियम भरतात त्यांना पद्धतशीरपणे लुटले जाते
10 Aug 2018 - 7:56 pm | पाषाणभेद
त्याची झळ इतर पॉलिसी धारकांना बसते.
10 Aug 2018 - 10:29 pm | नाखु
धोरण सर्रास विज महामंडळ गळतीमुळे होणारे आणि बुडीत असलेली तूट प्रामाणिकपणे बील भरणार्या ग्राहकांकडून कुठल्यातरी वेगळ्याच नावाने वसूल करते.
प्रामाणिक करदात्यांना पिडणे हा आवडता हातखंडा खेळ आहे.
मराविम झळग्रस्त नाखु पांढरपेशा
13 Aug 2018 - 1:18 pm | चौथा कोनाडा
+१ खरंय नाखुसा !
असेच पैसे वाहनांच्या बिनकामाच्या पीयुसीच्या नावांखाली उकळले जातात !
पीयुसीचीड फालतूपैसेउकळूगुंड्ग्रस्त चौको
4 Sep 2018 - 8:23 pm | सुबोध खरे
विमा नसेल तर एका डोळ्याचे १५,००० रु. आणि असेल तर ३३,००० रु. असा दर बहुतेक डॉक्टर निर्लज्जपणे लावतात.
काही डॉक्टर विमा असेल तर एक दर लावतात आणि काही डॉक्टर नाही.
हा फरक का येतो ते समजून घ्या. डोळ्यात जे भिंग बसवले जाते ते एक तर UNIFOCAL असते किंवा MULTIFOCAL.
UNIFOCAL भिंग लावल्यास आपल्याला लांबचे स्वच्छ दिसते पण जवळचे स्वच्छ दिसण्यासाठी (चाळीशीचा)चष्मा लावावा लागतो. याची किंमत किमान २००० (स्वदेशी) ते कमाल १०००० रुपये( आयात केलेले) आहे.
MULTIFOCAL लावले तरआपल्याला कोणताही चष्मा लावावा लागत नाही. त्याची किंमत किमान १२००० (स्वदेशी) ते कमाल ३०००० रुपये( आयात केलेले) आहे.
स्वदेशी आणि परदेशी भिंग यात गुणात्मक दृष्ट्या १९ -२० चा फरक असतो( कदाचित नसेलही).
परंतु सामान्यतः ज्याचा आरोग्य विमा आहे तो माणूस विचार काय करतो कि एकदा शल्यक्रिया करायची आहे तर उगाच धोका कशासाठी घ्या/ सर्वोत्तम भिंग बसवा.
माझ्या आईला दोन्ही डोळ्यात असेच MULTIFOCAL भिंग बसवले आहे. ज्यामुळे आईला ७६ व्या वर्षी सुद्धा कोणताही चष्मा लावावा लागत नाही. यासाठी विमा कंपनीने झालेले बिल देण्यास नकार दिला होता त्यावर आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात लढाई देऊन तिचा संपूर्ण खर्च परत मिळवला होता
https://www.misalpav.com/node/28999 येथे ते वाचता येईल.
ज्याचा आरोग्य विमा नाही तो माणूस स्वस्तातले भिंग वापरण्याचा पर्याय स्वीकारतो. ( त्यामुळे खरं तर फारसा काही फरक पडत नाही). हे जेनेरिक औषध आणि ब्रँडेड औषध असा फरक आहे.
त्यातून हि भिंगे अतिशय नाजूक असतात आणि शल्यक्रिया करताना त्याला इजा किंवा घडी पडण्याची शक्यता असते. असे नुकसान झाले तर ते भिंग फेकून दुसरे वापरावे लागते आणि हा खर्च डॉक्टरच्या बोडक्यावर बसतो. जितका अनुभव जास्त तितका डॉक्टरच्या हातीं भिंग खराब होण्याची शक्यता कमी असते. परंतु जितका डॉक्टर अनुभवी तितके त्याच्या कौशल्याचे पैसे जास्त यामुळे एकंदर भिंगाच्या किंमतिच्या तीन ते चार पट इतके पैसे आपल्याला शल्यक्रियेसाठी द्यावे लागतात.
आपली मोतीबिंदूची शल्यक्रिया सरकारी रुग्णालयात ७-८ हजारापासून ते पंच तारांकित रुग्णालयात एक लाखापर्यंत जाते. यातील भिंगाची किंमत एक चतुर्थांश ते एक तृतीयांश असते.
4 Sep 2018 - 6:30 pm | अभिजित - १
एक हि क्लेम नाही. तरी हि दर वर्षी वाढत वाढत , आता हप्ता १५,००० पर्यंत पोचला. पुढच्या वर्षी २० पण करतील. काय सांगता येत नाही. मी आता सरळ हि पोलिसी बंद करणार आहे. काय आहे ८० D मध्ये पैसे वाचतील टॅक्स चे आणि परत इन्शुरन्स हि मिळेल म्हणून लोक हि अवदसा गळ्यात बांधून घेतात. हळू हळू ती डोईजड होते. टॅक्स पैसे वाचले नाही तरी चालतील. पण हा इन्शुरन्स नको.
कारण उद्या खरीच गरज लागली तर कितपत कामाला येईल हि मोठीच शंका आहे. इतक्या वर्षाचे भरलेले पैसे पाण्यात ..
4 Sep 2018 - 6:39 pm | अभिजित - १
परत मोदी द्वेषाची कावीळ झालीय असे लोक म्हणतील. पण खरे काय चालले आहे ते तर सांगायलाच पाहिजे. इथे आपण लोक नको तो विमा म्हणतो. पण मोदी ५० कोटी जनतेचा मेडिकल इन्शुरन्स काढणार आहेत. प्रत्येकी ५ लाख रु चा. हप्ता भरणार सरकार. थोडक्यात आपणच !!
उद्या हे गोरगरीब अडाणी खरेच पोचले हॉस्पिटल मध्ये त्यांना विमा मिळेल काय ? मुंबई / पुणे सोडा. देशातील खेड्या मध्ये तो मिळेल काय ? कि हे फक्त इन्शुरन्स कंपनी चे पोट भरणायचे धंदे. आणि परत गोरगरिबांना पण आत्मिक समाधान .. सरकार दयाळू आहे. काहीतरी करतंय आपल्या करता म्हणून ...
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5...
4 Sep 2018 - 9:58 pm | कंजूस
मी फक्त विमा हप्ता साठनंतर भरमसाठ वाढू लागला तर घ्यायचा का नाही हा विचार केला. (विमा असला/नसल्याने लागणारा खर्च हा मुद्दा घेतला नाही.)हेल्थ इन्शुअरन्स - १५०००प्रिमिअम रिबेट - वेळप्रसंगी ओपरेशन्सचा खर्च यामध्ये बरेच फाटे फुटतील. नाव मोठे असले तरी खर्च परतफेड ही महिन्याच्या गोळ्यांसाठी नसते आणि आता बरेचजण यामध्ये येतात. या सततच्या औषधांच्या रतिबामुळेच रिटायर झाल्यावर गावी जाउन शांतपणे राहू म्हणणारे गावी जात नाहीत.
7 Sep 2018 - 2:38 am | दिपस्तंभ
ह्या कंपनी बद्दल ऐकलंय की प्रिमियम कमी आहेत
23 Oct 2018 - 4:51 pm | खट्याळ पाटिल
माझ्या स्वानुभवरून , वयक्तिक इन्शुरन्स , खास करून जेष्ठ लोकांच्या आजारपणात कामाला येत नाहीत. इन्शुरन्स कंपन्या काहीतरी तांत्रिक करणे देऊन दवाखान्याचे जास्त खर्च देत नाहीत. आणि जर दिलेच तर ते मिळवण्या ची प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे इन्शुरन्स चे पैसे भरून आजारपणात जेव्हा उपयोगी येत नाही तेव्हा विकतचा पश्चाताप घेतल्या सारखे आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात पण माझ्या अनुभवातून आणि जवळच्या लोकांच्या बघितलेल्या उदाहरण वराऊन, इन्शुरन्स कंपनी ग्राहकांना लुटते असेच दिसले आहे. बाकी ज्याचा त्याचा निर्णय.
25 Oct 2018 - 10:41 pm | चौथा कोनाडा
माझ्या ओळखीतले आहेत (ते सुरुवातीला दोन चार वर्षे वैद्यकिय विमा देखिल विकायचे)
बारा चौदा वर्षांनंतर एकदा अपघातामुळे हॉस्पिटल दाखल झाले होते, मी भेटायला गेल्यावर म्हणाले, गेल्या बारा चौदा जेव्हढे विम्याला हप्ते रक्कम भरली, त्याची पाव रक्कम पण वसूल झाली नाही, काही फरक पडत नाही वैद्यकिय विमा नाही घेतला तर)
26 Oct 2018 - 6:31 pm | सुबोध खरे
विमा ( आरोग्य विमाच नव्हे तर कोणताही विमा) हि गोष्ट गाडीच्या एअर बॅग्स सारखी आहे. ती वापरली गेली नाही तर उत्तमच.
मग दहा वर्षे कार वापरली पण एअरबॅग्स चा वापर झाला आंही म्हणजे पैसे फुकट गेले असे म्हणताना मी तरी कुणाला आजतागायत पाहिलेले नाही.
परंतु जर अशी अपघाता सदृश्य स्थिती आली तर एअरबॅग नसण्यापेक्षा असणे जास्त सुरक्षित.
बाकी वर्षानुवर्षे रेल्वे रूळ ओलांडणारे --"मी इतकी वर्षे ओलांडत आलो आहे, कधीच काही झाले नाही" -- म्हणतातच.
ता क - मी कोणताही विमा विकत नाही आणि माझा कोणताही जवळचा नातेवाईक या व्यवसायात नाही.
26 Oct 2018 - 10:27 pm | चौथा कोनाडा
खरं आहे डॉ खरे साहेब. अतिशय समर्पक उदाहरण दिलेय तुम्ही !
पण, सर्वच लोक असा विचार करतात असे नाही.
27 Oct 2018 - 7:13 am | कंजूस
एर बॅग हे सुरक्षिततता यासाठी आहे. कारमध्ये ती सोय असते,बसमध्ये नसते. एवढी महत्त्वाची वस्तु बसमध्ये लावून लोकांच प्राण वाचले असते हे फार पटणारे नाही. बसची समोरून येणऱ्या वाहनाशी टक्कर किंवा बस दरीत कोसळणे अशासारख्या अपघातात एरबॅगचे सुरक्षा कवच उपयोगी पडेल का?
हे उदाहरण आरोग्यविम्याला अजिबात सुसंगत नाही.
वाढत्या वयाला बसणारा विमा हप्ता आणि प्रत्यक्ष आजारपणात तीचचाळीस टक्के रक्कम देऊन वाटेला लावणे या मुद्द्यावर लेख आहे. सर्व बिल काही कारणे देऊन परत देतच नसण्याचा अनुभव आहे तर हप्ते भरण्यापेक्शा शिल्क ठेवणे हाच योग्य विचार ठरतो. रुग्ण त्याच्याकडचे पैसे भरून कमी पैशात उपचार घेणारच आहे.
27 Oct 2018 - 10:27 am | सुबोध खरे
दुर्दैवाला कोणाकडेही उत्तर नाही.
बस दरीत कोसळणे यात जसे एअर बॅग्स कामी येत नाहीत तसेच आणि हृदयविकाराने मृत्यू आल्यास आरोग्यविमा कामास येणार नाही.
जोवर कर्करोग, मूत्रपिंडे निकामी होत नाहीत तोवर आरोग्यविम्याच्या हप्त्याचा उपयोग झाला नाही असे म्हणण्यासारखे आहे. एकदम दहा लाख रुपये खर्च आला तर आपली शिल्लक संपण्याची स्थिती येते आणि पुढच्या उपचारासाठी मुलांकडे /नातेवाईकांकडे हात पसरावे लागण्याची असंख्य उदाहरणे मी पाहिली आहेत.
शिवाय खिशात पैसे नाहीत आरोग्य विमा नाही यामुळे आधुनिक उपचार असूनही ते घेता येत नाहीत म्हणून "इतर" अशास्त्रीय उपचार घ्यावे लागण्याची स्थिती आलेली अनेक उदाहरणे पाहत आलो आहे.
इतक्या वर्षात भरलेले पैसे दुर्दैवाने एक जरी मोठे आजारपण आले तरी वसूल होतील अशी स्थिती आहे.
माझा स्वतःचा( वय वर्षे ५३) १५ लाखाचा अख्ख्या कुटुंबाच्या विम्याचा हप्ता २५ हजार रुपये वर्षाला आहे. सुरुवातीला १२ वर्षपूर्वी हाच हप्ता १३ हजार होता)
27 Oct 2018 - 2:01 pm | कंजूस
मागच्या महिन्यातच स्टेट बँक प्रायोजित ( सध्या इतर बँकाही हेच करत आहेत. ) फुकट रक्तदाब, शुगर चेकप करवतात. तिथे मग बँकेचा माणूस अमचाही आरोग्य विमा आहे - माहिती देतो. अमचा हप्ता कितीपडेल विचारल्यावर अठ्ठावीस हजार सांगितले. मी म्हटले माझा २४ गेलाय. तर स्टेट बँकेचाही न्यु इंडियाशीच टाइअप आहे म्हणाला.
मूत्रपिंडे निकामी होण्यात अगोदरचे दुसरे कोणते उपचारच कारणीभूत असतात त्याचे साइडइफेक्ट्स असतात बऱ्याचदा.
27 Oct 2018 - 8:22 pm | सुबोध खरे
मूत्रपिंडे निकामी होण्यात अगोदरचे दुसरे कोणते उपचारच कारणीभूत असतात त्याचे साइडइफेक्ट्स असतात बऱ्याचदा.
पूर्ण गैरसमज
It has also been estimated that about 60% to 70% of chronic kidney disorder cases are offshoots of diabetes and hypertension.
https://health.economictimes.indiatimes.com/news/industry/indian-society...
27 Oct 2018 - 2:05 pm | कंजूस
मूत्रपिंड,कॅन्सर,हार्ट या संबंधित फार मोठे रोग आहेत पण हर्निया, अपेन्डिक्सचेही बिल पन्नास टक्के कापण्याचे कोणतेही समर्थन पटणार नाही.
26 Oct 2018 - 6:42 pm | सुबोध खरे
आयुर्विमा किंवा आरोग्य विमा याची एक न दिसणारी पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने मिळणारी "मानसिक शांती."
याची किंमत शून्य रुपये पासून अब्जावधी किंवा अनमोल असू शकते. हि किंमत प्रत्येकाच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे.
ज्याला कंपनी तर्फे वैद्यकीय खर्च परत मिळणार असेल त्याला याची किंमत शून्य असू शकते आणि एकटा कमावता माणूस ज्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे त्याच्यासाठी "हि" अनमोल असते.
सरकारी नोकरीत असताना माझा कोणताही विमा नव्हता. ( नौदलाने काढलेला गट विमा सोडला तर).
पण नोकरी सोडल्यावर पहिल्याच महिन्यात मी हे दोन्ही विमे (आरोग्य आणि आयुर्विमा) काढले (आणि वेळोवेळी त्याची रक्कम काळाप्रमाणे वाढवली आहे.) कारण घर आणि दवाखाना यासाठी कर्ज घेतलेले होते शिवाय कुटुंबाची जबादारी होती. अशा वेळेस आजारपण किंवा अपघात कुटुंबाची वाताहत करू शकते.
आता १२ वर्षात दोन्ही गोष्टींचे मूल्य बरेच कमी झाले आहे. पण (सुदैवाने) १२ वर्षात एकदाही विमा वापरावा लागला नाही म्हणून त्याची किंमत शून्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही.
26 Oct 2018 - 9:03 pm | कंजूस
मुद्दा पटला आहे खरे साहेब. वीस वर्षं मन:शांती मिळवली. एकदाही क्लेम केला नाही /करायची वेळ आली नाही तिघांपैकी दोघांना.
पण
पण
आता साठीनंतरचे त्यांचे चौपट हप्ते न भरल्यानेही तेवढीच शांती मिळेल असं वाटतं. तीन वर्षांत ( न भराव्या लागलेल्या हप्त्यांचे) एक लाख रु शिल्क राहिल्याने कुठेही कोणताही उपचार घेण्याचे स्वातंत्र्य वाढेल हे नक्कीच.