Skip to main content

कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म : प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे शंकानिरसन

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 12/10/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
1

मित्रांनो, नुकतेच निपाणीला जाणे झाले. त्यावेळी प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांची आवर्जून भेट घेतली. त्यावेळी नवीन काय लेखन केलेले आहे या विचारणेवर सरांनी ‘प्रज्ञालोक' नियतकालिकामधे प्रकाशित झालेल्या लागोपाठ 4 लेखांची 40 पानी झेरॉक्स मला वाचायला दिली. सुरवात अंक क्रमांक २४२ मध्ये पहिल्या लेखात प्रा. के. वा. आपटे यांनी संचित व प्रारब्ध कर्माचे स्थान, नाश व प्रारब्ध कर्माची फलोन्मुखता? याविषयी पुढील प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील भाग 4 मधील एक प्रश्न वाचकांना रंजक वाटून त्यावर आपापली मते मांडायला प्रवृत्त करतील असे वाटून त्यातील एक प्रश्न सुटाकरून सादर केला आहे. त्यांच्या भागातील उरलेली प्रश्नोत्तरे आणि नियतकालिकाच्या अनुक्रमानुसार भाग 1 ते 3 इथे वाचकांच्या उत्सुकतेनुसार यथावकाश सादर केले जातील. ( अवांतर माहिती - 40 पानी झेरॉक्स एका दिवसात टाईप करणे माझ्यासारख्या हळू हळू टंकलेखन करणाऱ्याला गूगलमामांच्या ड्राईव्हवर चाळीस पानी टंकलेखन किरकोळ चुका वगळता चुटकी सरशी करून दाखवले. त्या लेखनात त्यांच्या मजकुराला पुरक होईल अशी माहिती फोटो मी नेट वरून शोधून सादर केली आहेत. ) अनेक नव्याने सदस्य जालेल्या मिपाकरांना ह्या गाढ्या विचारकाची ओळख नसेल. त्यांच्या ब्लॉगच्या लिंक 1लिंक 2 वरून ती करून घेता येईल. स्वतः प्रखर बुद्धिवादी असून देखील विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा लावायचा यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. भानामती केसेसच्या मुळाशी जाऊन त्या घटना खरेच कोण करते यावर त्यांचे विशेषत्वाने लेखन आहे.

प्रश्न : जगाची निर्मिती म्हणजे विषमतेची निर्मिती हे मान्य करता येईल. पण माणूस ईश्वराच्या हातातील कळसूत्री बाहुली आहे. त्याला स्वत:चे कसलेच इच्छास्वातंत्र्य नाही, हे मान्य करणे मात्र कठिण आहे. मी माझ्या इच्छेनुसार बोलतो, वागतो, कर्म करतो आणि हा माझा स्वत:चा प्रत्यक्ष अनुभव आहे. माझा हा अनुभव खोटा आहे, भ्रम आहे हे मी मान्य करू शकत नाही. मग गीता व क्वाँटम सिद्धांत काही म्हणो. उत्तर : कार्यकारणसंबंध स्थानिक आहे हाही प्रत्येकाचा अनुभव आहे ना ? पण तो अनुभव भ्रम असल्याचे क्वाँटम सिद्धांतातील प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले. कोणत्याही गोष्टीच्या सत्यासत्यतेचा निर्णय, एकादा अनुभव भ्रम आहे की सत्य, याची निश्चिती वैज्ञानिक प्रयोगाशिवाय होऊ शकत नाही. कार्यकारणभावाच्या अनुभवाप्रमाणेच माणसाचा स्वतःला इच्छास्वातंत्र्य असल्याचा अनुभव हा सत्य आहे की भ्रम आहे, याचा निर्णयही वैज्ञानिक प्रयोगानेच होऊ शकतो. हा वैज्ञानिक प्रयोग संमोहनाचा असून तो येथे थोडक्यात देतो. टॉम नावाच्या व्यक्तीवर एका व्यावसायिक हिप्नॉटिस्टने केलेला प्रयोग आहे. हा संमोहनाचा प्रयोग त्याच्यावर करून शेवटी त्याला सूचनेने संमोहनातून बाहेर आणले (जागे केले) पण संमोहनातून बाहेर आणण्यापूर्वी त्याला अशी सूचना केली की, संमोहनातून बाहेर आल्यानंतर त्याला त्याची लॉरा नावाची किशोरी वयाची मुलगी (जी तेथे उपस्थित होती) अदृश्य बनेल. नंतर तो बसलेल्या खुर्चीसमोर टॉमच्या त्या मुलीला उभी करून टॉमला संमोहन अवस्थेतून बाहेर आणले - जागे केले आणि त्याला विचारले की त्याला त्याची मुलगी लॉरा कुठे दिसते का ? टॉमने खोलीत सभोवार व समोरच्या आपल्या मुलीच्या शरीरात आरपार दृष्टी गेल्याप्रमाणे आपली नजर फिरवली व तो म्हणाला, 'नाही'. हिप्नॉटिस्टने पुन्हा खात्री करून घेण्यास सांगितले व टॉम आपल्या मुलीच्या जास्तच खिदळणाच्या हास्याचा आवाज जणू कानावर पडला नसल्याप्रमाणे पुन्हा म्हणाला, 'नाही'. नंतर हिप्नॉटिस्टने आपल्या खिशातील घड्याळ गुपचुपपणे काढून लॉराच्या पाठीला ते कोणालाही दिसणार नाही अशा रीतीने दाबून धरले व ती वस्तू कोणती हे ओळखण्यास सांगितले. टॉम पुढे वाकून व लॉराच्या जणू पोटात पाहिल्याप्रमाणे पाहून म्हणाला की ती वस्तू घड्याळ आहे. हिप्नॉटिस्टने ‘बरोबर' म्हणून मान हलवली व त्यावर काय लिहिले आहे हे वाचून सांगशील काय, असे विचारले. टॉमने नज़र बारिक करून व प्रयत्नपूर्वक वाचून त्यावर लिहिलेला मजकूर व त्या घड्याळाच्या मालकाचे नाव सांगितले. नंतर हिप्नॉटिस्टने खोलीत जमलेल्या सर्व प्रेक्षकांना ती वस्तू घड्याळ असल्याचे हात उघडून दाखवले व त्यावरील मजकूर व त्याच्या मालकाचे नाव टॉमने बरोबर वाचले असल्याचे सर्वांनी खात्री करून घ्यावी म्हणून प्रेक्षकांमधून ते घड्याळ फिरविले. (The Holographic Universe (1991) Michael Talbot p.141) येथे टॉमच्या दृष्टीला त्याच्या लॉरा या मुलीचे शरीरच म्हणजे भौतिक सत्यच (physical reality) नाहीसे झाले आहे ! ही गोष्ट तो तिच्या पोटातून तिच्या पाठीला दाबून धरलेले घड्याळ (तिच्या शरीरातून आरपार) पाहू शकला यावरून सिद्ध होते. तेही संमोहनातून बाहेर आल्यानंतर, जागेपणी ! संमोहनात दिलेल्या सूचनेमुळे संमोहन अवस्थेतून बाहेर आलेल्या, म्हणजे जागे झालेल्या माणसाचे भौतिक जग (येथे लॉराचे शरीर) सत्य असूनही असत्य (भ्रम) ठरू शकते, ही गोष्ट या प्रयोगातून सिद्ध होते. त्याचप्रमाणे अस्तित्वात नसलेली वस्तूही (उदा. साप) संमोहनातील सूचनेमुळे प्रत्यक्ष दिसू शकते ! (हा प्रयोग प्रस्तुत लेखकाच्या माहितीतील एका हिप्लॉटिस्टने सार्वजनिकरित्या केला आहे.) हा संमोहनाचा प्रभाव म्हणजे मानसिक अज्ञानाचाच प्रभाव असून ईश्वराची द्वंद्व स्वरूपातील सृष्टीनिर्मिती म्हणजे ईश्वराचा एक मानसिक अज्ञाननिर्मितीचा मुलभूत वैश्विक संमोहन प्रयोगच आहे ! ही गोष्ट श्रीकृष्णाने गीतेत पुढीलप्रमाणे सांगितली आहे. 'इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेनभारत । सर्व भूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ।।' (गीता ८.२७) म्हणजे हे अर्जुना जगदुत्पत्तीच्या वेळी (सर्गे) इच्छाद्वेषरूपी भ्रामक द्वंद्वाच्या निर्मितीतून सर्व प्राणी संमोहाला (अज्ञानाला) प्राप्त होतात. त्यामुळे सर्व (मनुष्य) प्राणी हृदयस्थ ईश्वरच सर्व कर्मे करीत असताना ते असत्य (खोटे) समजतात व मीच कर्म करतो ही जाणीव, जी असत्य आहे (अज्ञान आहे) तेच सत्य (ज्ञान) समजतात ! अर्थात् तुम्ही संमोहनाचा हा वैज्ञानिक प्रयोग अनुभवाच्या विरुद्ध आहे म्हणून न मानू शकता. पण त्यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही; जसे एखाद्याने सूर्यच आकाशातून (पृथ्वीभोवती) फिरतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, असे म्हटल्याने वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही ! मात्र ‘मम माया दुरत्यया ।' (माझी माया जबरदस्त आहे) हे श्रीकृष्णाचे म्हणणेच त्यातून तुम्ही सिद्ध करता !

वाचने 18703
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला उमजला असेल तरीही तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे अवघड आहे. मग श्रोता म्हणतो " तुम्ही महान, तुम्ही म्हणता तसे असणार." कितीही उदाहरणे दिली तरी त्याची प्रचिती येत नाही. गीता, क्वांटम सिद्धांत समजणे कठीण तर त्याच्याशी तुलना कशी समजणार?

In reply to by शशिकांत ओक

का सादर झाले 'काही समजत नाही' ! सासबहू सीरियल मधे एक शॉट ३ वेळा दाखवतात तसा भास झाला! कंजूष जी, काही समजत नाही हे लक्षात आले तरी खूप झाले! असे तिथे खाली लिहिले होते... असो.

डॉ विद्याधर ओक यांचे पुनर्जन्मावर नुकतेच एक पुस्तक आले आहे. त्यात अविश्वसनीय वाटाव्यात अशा गोष्टी आहेत. अर्थात डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. फ्री विल हा विषय संशोधनाचा विषय आहे. अनेक फॅक्टर सर्वस्वी आपल्या हातात नसतात हे विज्ञानालाही मान्य आहे. गोफ जन्मांतरीचे हे डॊ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे पुस्तक यावर उत्तम भाष्य करणारे आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नवे लेखन डॉ विद्याधर ओक यांनी केले आहे हे नुकतेच समजले. मानवी बुध्दीला जे आकलन होते तेच खरे असे मानणारे लोक गळतगे सरांच्या वैचारिकतेला कठोर विरोध करत राहतात. आपल्याला याचा अनुभव आहे. चमत्कार होत नाहीत... हे त्यांचे कथन चमत्कारांचे वास्तव या भागातून समजून येते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. आपले "अनिरुद्ध बापू" सुद्धा. ते सुद्धा अविश्वसनीय अशा अनेक गोष्टी सांगतात/ करून दाखवतात (असे त्यांचे शिष्य सांगताना ऐकलंय).

In reply to by प्रकाश घाटपांडे

डॉ ओकांचा तर्क "समान चेहरेपट्टी आणि समान गुणवैशिष्ट्ये आहेत म्हणून पुनर्जन्माची शक्यता आहे असे मला वाटते" हा आहे. गंमतीचा भाग म्हणजे डॉ ओकांनी जी पुनर्जन्माची प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे. कर्माच्या सिद्धांतालाच आधारभूत धरुन काहीशे वर्ष जाती व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून जगणं नाकारलेलं होतं. आपण काहीतरी कृती केली म्हणजे त्या कृतीचे पडसाद उमटण्याची शक्यता असतेच. मात्र त्यातील एखादी कृती "चांगली" म्हणून ती तुमच्या पुण्यसंचयात वृद्धी करणार किंवा एखादी कृती "वाईट" म्हटल्यावर ती तुमच्या पापसंचयात वृद्धी करुन पुढच्या जन्मी तुम्हाला त्या दुष्कर्माची फळे भोगावी लागणार ही कवी कल्पना आहे. काय चांगलं काय वाईट हे स्थलकालव्यक्तीपरत्वे बदलत जातं. आज हास्यास्पद वाटणार्‍या कित्येक गोष्टी शे दोनशे वर्षांपूर्वी पापकर्मात गणल्या जात होत्या हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्माच्या सिद्धांताच्या ज्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात त्यांच्याकडे मनोरंजन कथा म्हणून पाहावे असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी क्वांटम फिजिक्स, वेव्हज आणि पार्टिकल वगैरे गोष्टी भौतिक शास्त्रज्ञांपेक्षा "पॅरानॉर्मल" वाल्यांना अधिक चांगल्या कळतात असं वाटू लागलं आहे. ;)

In reply to by सतिश गावडे

त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे.>>>>>बहिणाबाई चोधरी व सिन्धुताई सपकाळ यांच्य उदाहरणात ते पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य या पुस्तकात म्हणतात कि पुर्वनियोजित सम्भाव्य उदाहरण असु शकते ज्यात आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो..... आता बोला:)

सडेतोड आणि लख्ख शास्त्रीय पुरावा मांडून उत्तमरीत्या मुद्दे सिद्ध केले आहेत. एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट या वैज्ञानिकाने टॉमला संमोहित करून बाहेर काढून नंतर टॉमने लॉराच्या मागे दडलेलं घड्याळ पाहिलं हा एका साली एके ठिकाणी झालेला प्रसिद्ध शास्त्रशुद्ध प्रयोग हे सिद्ध करायला पुरेसा आहे. "क्वांटम फिजिक्स"ची हीच खासियत आहे. त्यातून काही शंका जर अवैज्ञानिक चमत्कारप्रेमी छिद्रान्वेषी लोकांच्या मनात उरलीच तर शा. मायकेल टॅलबॉट या दिग्गज क्वांटम फिजिक्स शास्त्रज्ञाच्या होलोग्राफीक युनिव्हर्स या पदार्थविज्ञान विषयातील संदर्भपुस्तकात या प्रयोगाचा उल्लेख आहे एवढ्याने त्यांची तोंडे बंद व्हावीत.

In reply to by गवि

समजा तुम्ही मला संमोहित केले ( म्हणजे तुम्ही ते केलेच आहे) आणि भर रस्त्यावर ट्राफिक मधे आणून सोडले आणि म्हणालात की प्रा.डॉ. रस्त्यावर अजिबात ट्राफिक नाही तुम्ही आता रस्त्याने एकटे जात आहात तर मला वाहनांचा धक्का लागेल का ? आणि लागलाच तर मला ज़ाणवेल का ? की सर्व वाहने माझ्या आरपार जातील ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही फार शंकिष्ट आहात. वैज्ञानिक दृष्टिकोनाची तुमच्याकडे अत्यंत कमतरता आहे. तुम्ही समग्र मायकेल टॅलबॉट वाचून घ्या एकदा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, वाहनांचे धक्के लागून तुम्ही मराल. पण तुम्हाला ते जाणवणार नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

गाडी आरपार जायची तर ड्रायव्हरचं क्वांटम संमोहन श्री. "एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट" यांच्याकरवी केलं पाहिजे, पादचाऱ्याचं नव्हे.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, गाडी आरपार जाणे हा काय प्रकार आहे? संमोहित व्यक्तीस तसं वाटू शकतं. पण बाकीच्यांना नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

........की सर्व वाहने माझ्या आरपार जातील? काहीही विचारता, राव! संमोहित तुम्हाला केलंय, वाहनांना नव्हे!

यांनी दिलेला एक संदर्भ इथे आला आहे. आगे आगे देखो... पाश्चात्य आणि भारतीय तत्त्वचिंतकांच्या संदर्भातून विषयवार सादरीकरण ही खासियत आहे गळतगे सरांची.

आणिबाणीच्या काळात बहुतेक पेपरांना/ नियतकालिकांना विषय मिळत नव्हते. त्यांनी बाबा,महात्मे,महाराज हा विषय घेतला. आन्ध्रमधल्या बाबाकडे संपादक महाशय ( बहुतेक एम व्हि कामथ, इल० वीकलीचे) आणि एकदोन पत्रकार गेले. बरेच अनुनायी, भाविक होतेच. महाराज/बाबांनी सगळीकडे एक नजर फिरवली. हात वर केला आणि एक सोन्याची अंगठी हवेतून निर्माण केली. संपादकाना दिली. ( हे बाबा हवेतून सोन्याच्या साखळ्या काढतात आणि भक्तांना वाटतात याचीच वार्ता घेण्यासाठी वीकलीची टीम गेली होती. ते खरं निघालं.) " मला अंगठी नको, बाबा" - संपादक. " मग काय देऊ? - बाबा. " इथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला एकेक भाकरी द्या." " ते शक्य नाही , त्यांच्या कर्मात नाही." या घटनेनंतर ते सोन्याच्या साखळ्या वाटणे बंद झालं. दैवाने दिलं, कर्मानं नेलं. एक लेख मिळाला साप्ताहिकाला पण साखळ्या कर्मानं गेल्याच.

जड विषय आणि मांडणी तुटक प्रश्नोत्तरीतील असूनही इतके बोलके प्रतिसाद मिळत आहेत. पुढील भाग लवकर सादर करायला उत्साह आला.

जड विषय आणि मांडणी तुटक प्रश्नोत्तरीतील असूनही इतके बोलके प्रतिसाद मिळत आहेत. पुढील भाग लवकर सादर करायला उत्साह आला.

पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. म्हणुन या प्रयोगावीशयी अधीक जाणुन घ्यायला आवडेल. या प्रयोगा संदर्भात अधीक माहीती, शास्त्रीय लिखाण किंवा यु-ट्युब व्हिडीओ उपलब्ध आहे का?

In reply to by नेत्रेश

पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. तुम्हाला अतींद्रिय शक्ती बद्दल काय माहिती आहे? त्यात लोकांना प्रकाशच नव्हे तर "अंधार"ही दिसतो. (असं ऐकलंय)

वेल्शमधला जादुगार डाइनमो ( स्टिवन फ्रैन) पाण्यावर चालतो, काचेतून जातो, पाण्यावर चालतो, कारंज्यातल्या पाण्याचं बर्फ करतो पण त्याने कधीही कर्मसिद्धात मांडला नाही. वाराणसीत पाण्यावरचे दिवे पेटवले पण घाटावरच्या साधुंनी आश्चर्याने ढुंकुंनही पाहिलं नाही. त्याचं मार्केटिंग कमी पडतय. त्याच्या आजोबांनी जादू शिकवली आणि सांगितलं की जगातल्या गरीबांसाठी काम कर. जादू ही फक्त मनोरंजन आहे.

प्रकाश घाटपांडे,
.... आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो.....
देह व आत्मा यांना जोडणारा एक दुवा म्हणजे स्मृती. आत्म्याची स्मृती ठळक असू शकते, हे डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्या पुनर्जात बालकांवरच्या संशोधनावरून सिद्ध झालं आहे. तितू नामे एका बालकाने पूर्वजन्मीचा खूनही अचूकपणे वर्णिला आहे. याच्या उलट प्रकार म्हणजे देहाची स्मृती ठळक राहणे. मेंदूमृत मनुष्याचे अवयव जिवंत माणसात प्रत्यारोपित केलेल्या काही प्रसंगांत ग्राहकांच्या आवडीनिवडी दात्यानुसार बदललेल्या आढळून आल्या आहेत. एक उदाहरण इथे आहे : https://www.barnesandnoble.com/w/a-change-of-heart-claire-sylvia/101441… तर सांगायचा मुद्दा असा की सत्य या दोन बिंदूंच्या मध्ये कुठेतरी लटकतं असू शकतं. आत्म्याने चालू देह सोडण्यापूर्वी नवीन देहावर प्रभाव टाकलेला असू शकतो. एक देह = एक आत्मा हे समीकरण पूर्णपणे अचूक नसू शकतं. आ.न., -गा.पै.

माझ्या मते खिशात ( स्वत:च्या ) हात घातल्यावर हवे तेवढे पैसे लागणं हे सत्य. नसल्यास तेवढे देणारे हितचिंतक पुढे सरसावणे हे कर्म. पुनर्जन्माशी काही संबंध नाही. मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.

In reply to by कंजूस

मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.
पण वैज्ञानिक स्वस्थ बसत नाहीत. त्यांना जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाहीत. ते ऐषारामापुरता॑ विचार करत नाहीत त्यामुळे ते चिकित्सा करतात. तोच त्यांचा कर्मसिद्धांत :)

१.माणूस प्रथम जन्माला आला तेव्हा त्याला पूर्वकर्म नव्हते. अशा वेळी काही माणसे दुष्ट तर काही सुष्ट कशी झाली? २. एक कुत्रा लूत झालेला असतो दुसरा निरोगी निरोगी असतो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? हा भाग २ लेख सादर केल्यानंतर चर्चा अधिक रंगतदार होईल असे वाटते.

In reply to by शशिकांत ओक

एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?
देवा, मला काय वाटतं की जो दगड पायरी म्हणून तुडवला जातो त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ३५% पेक्षा कमी असावी आणि ज्या दगडाची मूर्ती बनवून पूजा केली जाते त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त असावी.

In reply to by सतिश गावडे

अरे वा मस्तच! दगड हा देखील एक सचेतन आहे. त्यातील अणुरेणु मधे चैतन्य आहे. त्यामुळे तो ही कर्माला बांधील आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणुया थोकडा | तुका आकाशा एवढा || :)

In reply to by शशिकांत ओक

"एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?" हा प्रश्नच चुकीचा किंवा गैरलागू आहे. कोणता तरी एक दगड पायरी बनून तुडवला जातो, कोणता तरी दुसरा दगड देव बनून पूजिला जातो, एवढेच त्यातील सत्य विधान. आपण सर्वच जण कोणत्याही घटनेचे जे काही अर्थ काढतो किंवा जे विश्लेषण करतो ते ती घटना घडून गेल्यानंतरचे असते. ह्याबद्दल अतिशय सुंदर आणि तितकेच वाचनीय विवेचन नसीम तालेब या लेखकाने Fooled by Randomness व Black Swan या पुस्तकांत केले आहे. ज्या कुणाला घटनांचा अन्वयार्थ लावण्यात किंवा समजून घेण्यात रस असेल (यात share market चे analysis ही आले) अशा प्रत्येकाने ही दोन पुस्तके वाचावीत असे मला वाटते.

In reply to by रविकिरण फडके

Fooled by Randomness व Black Swan ही दोन्ही पुस्तकं अफलातून आहेत. याच पठडीतील अजून एक पुस्तक Leonard Mlodinow चे The Drunkard's Walk: How Randomness Rules Our Lives हे आहे.

असं धरून चालू की पूर्वकर्माने आताची प्राणीमात्राची परिस्थिती असमान, किंवा वाइट आहे. त्यासाठी कोणताही सिद्धांत सांगून त्यास हिणवण्यापेक्शा ती सुधारणारे लोक हवे आहेत.

वैज्ञानिक लोकांना कोणतीही गोष्ट आलेख काढून समजवण्याची भारी हौस. एखाद्याचं कर्म कसं वाढत गेलं दाखवणारी रेषा मग कागदातील चौकडी तोडून सटाककन बाहेर जाते तेव्हा तो पूज्य होतो. छप्पर फाडके कर्म असणारे.