मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

Anand More · · जनातलं, मनातलं
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल. ------------------------------------- जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो. काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार. तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे. सत्य निश्चिती / प्रस्थापना लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत. १) सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे. २) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत. ३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत. ४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य. ५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू लागते. यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते. परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या. परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो. सत्याचे अन्वेषण / आकलन या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत. सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे. त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही. आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो. सत्याचे प्रकटीकरण जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth) नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते. जंगल वाटांवरचे कवडसे चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे. इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया. या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे. भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना. क्रमश

वाचन 41066 वाचनखूण प्रतिक्रिया 104

बोका-ए-आझम Fri, 02/12/2016 - 19:03
यात अजून एक मुद्दा हा मांडावासा वाटतो की सत्य जाणून घ्यायचा हेतू काय आहे? दुस-या शब्दांत - सत्य का जाणून घ्यायचं? जर माझ्या आयुष्यात सत्य काय हे जाणून घेतल्यामुळे फरक पडत असेल तर मी जरुर त्यासाठी प्रयत्न करीन पण जर मला काहीही फरक पडत नसेल तर सत्य काय आणि असत्य काय - हे दोन्हीही माझ्यासाठी सारखेच. मी जर उंदीर असेन तर एखादं मांजर प्रकाशात कसं दिसतं हे जाणून घेण्याने मला फरक पडतो. मी जर माणूस असेन (मांजर हा ज्याचा भक्षक नाही असा प्राणी या अर्थाने हा शब्द घ्यावा) तर who cares?

In reply to by बोका-ए-आझम

एस Fri, 02/12/2016 - 19:36
सत्य शोधण्यामागचे कारण हे वैयक्तिक असायलाच हवे असे नाही. सत्य जाणून घेण्यामागच्या जिज्ञासेच्या मुळाशी मानवी जीवात नैसर्गिकरित्या असलेले कुतूहल आहे. यात माझ्या जीवनात काय व किती फरक पडला हा इतर अनेक उद्देशांपैकी एक उद्देश असू शकतो, परंतु एकमेव नाही.

In reply to by एस

बोका-ए-आझम Fri, 02/12/2016 - 21:11
हाच सामान्य आणि असामान्य माणसांमधला फरक आहे. अर्थात नोबेल पारितोषिक आणि इतर मानमरातब मिळवणं हा हेतूही आज असू शकतो. पूर्वी जेव्हा असं काही नव्हतं तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी ज्ञान या एकाच उद्देशाने संशोधन केलं. मेंडेलीफने सर्व मूलद्रव्यांची आवर्तसारणी बनवली किंवा गॅलिलिओने Law of Falling Bodies ची प्रयोगाने सिद्धता दिली त्यामागे तुम्ही म्हणताय तशी निरपेक्ष वृत्ती असावी. रच्याकने युक्लिडने भूमितीची रचना आमचा छळ करण्यासाठी केलेली आहे असं शाळेत वाटायचं. आता अर्थात त्याचं महत्व समजतं. :)

In reply to by बोका-ए-आझम

Anand More Sat, 02/13/2016 - 10:45
सत्य जाणून घ्यायचा हेतू कुतूहल हाच असावा. आणि कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे माझ्या लेखी सत्यशोधन ही देखील मुळातील नैसर्गिक प्रवृत्तीच ठरते. कुतूहलाच्या मागे आपले अस्तित्व टिकवणे ही आदिम प्रेरणा असावी. इतर प्राण्यांप्रमाणे आपण केवळ नैसर्गिक निवान जगत नसून आपण सामाजिक जीवन जगत असतो, त्यामुळे आपल्या कुतूहलाच्या मागे अस्तित्व टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेबरोबरच इतरही अनेक प्रेरणा काम काम करीत असतात . वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधन ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे मान्य झाल्यास ती सर्व प्राण्यात त्यांच्या आयुष्याच्या लांबीप्रमाणे आणि अस्तित्व टिकवून ठेवायला लागणाऱ्या धडपडीप्रमाणे आढळून येते हे मान्य करायला सोपे जाईल. पण सत्यप्रस्थापन हा मात्र सामाजिक जीवन जगणाऱ्या मनुष्य प्राण्याचा गुणविशेष आहे. एकाच समाजात राहणाऱ्या आणि परस्परावलंबी असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सत्यशोधनानंतर त्यांना जाणवलेले सत्य जेंव्हा ते प्रकट करतात तेंव्हा त्या व्यक्त सत्याचे रूप एकच रहात नाही तर ते वेगवेगळे दिसते. मग कुठले सत्य खरे हा प्रश्न पडतो आणि सत्य प्रस्थापना हा एक नवीनच उद्योग मानवाला करावासा वाटतो. आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात. रमतारामांची आणि माझीलेखमाला मुख्यत्वे या सत्यप्रस्थापनेबाबत आणि त्यात येणाऱ्या अडचणीबाबत आहे. शक्य झाल्यास माझ्या याच लेखातील "सत्याचे अन्वेषण / आकलन" आणि "सत्याचे प्रकटीकरण" या शीर्षकाखाली लिहिलेले परिच्छेद पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला या लेखनामागची भूमिका जाणवेल.

In reply to by Anand More

Anand More Sat, 02/13/2016 - 11:32
वरच्या माझ्या प्रतिसादातील, "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." या वाक्याला "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य त्यांना पटले तर तेच अंतिम मानून उरलेल्या इतरांनीदेखील त्याला मान्य करावे, जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." असे वाचा, ही विनंती.

In reply to by Anand More

सटक Wed, 02/17/2016 - 02:30
सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला आहे आपण. सत्य हे तुम्ही सांगितलेल्या मर्यादांनी बाध्य आहेच परंतु इतर सर्व गोष्टी बरोबर असतानाही सत्याचे आकलन हवे तसेच होईल असे म्हणणे धाडसाचे आहे. सत्य हा शेवटी संवाद आहे असे मला वाटते. घटनाक्रमाचे सुसुत्रीकरण करण्यासाठी आपण जे framework बनवतो त्याला ढोबळमनाने सत्यान्वेषण असे म्हणता येइल. ह्या अर्थाने ती आदिम प्रेरणा आहे हे बरोबर आहे आणि नाईलाजाने मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ते अस्तित्वात येते. तरीही सत्य हे personal असतेच. वैज्ञानिक सत्याचा येवढा बोलबाला असण्याचे कारण असे आहे की ते काही विशिष्ठ स्थितींमध्ये पुनर्गठित होऊ शकते. कितीही अवघड आणि हास्यास्पद वाटले तरी. वानगीदाखल म्हणायचे तर JFK assassination ज्या प्रसिद्ध single bullet theory चा वापर करून विषद केले गेले ती प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवली होती (म्हणे!). पण येवढा एकच निकष सत्याला लावता येत नाही. "मी रात्री २ वाजता फलाटावरून बाहेर आलो..चिटपाखरूही नव्हते..काय करणार ह्या विचारात असतानाच स्वामींनीच रिक्षा पाठवली!" हे ही सांगणार्‍याच्या द्र्ष्टीने सत्यच आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा सत्य आकलन होण्यात आपण "उपस्थित" असणे हा ही महत्वाचा भाग आहे..ज्ञानेंद्रिये उत्तम काम करत असली तरी आपण गाडी चालवत चालवत घरी येतो आणि कसे आलो ते आठवत नाही हा ही सार्वत्रिक अनुभव आहे. सत्याचे आकलन हे अजूनही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. उदाहरणादाखल Thumbs Up ची खूण आपल्याकडे ठेंगा दाखवणे अशी वापरली जात असल्याने तिचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि पाश्चातत्य लोकांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगवेगळे आहेत; हा झाला सांस्कृतिक गोंधळ! (हे उदाहरण साक्ष देण्याच्या दृष्टीने वाचावे. कुणी कुणाला अंगठा वर करून दाखवला तर भारतीय माणूस म्हणेल की तो त्याला वाकुल्या दाखवत होता आणि पाश्चात्य म्हणेल की त्याला प्रोत्साहन देत होता) Total Blackout नावाच्या एका कार्यक्रमात अंधारामुळे माणसाच्या आकलनशक्तीत कसे फसवे बदल होतात ह्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळते. याच मर्यादांनी बाध्य सत्याचे प्रकटीकरणही असणे ओघाने आलेच! मुद्रा ज्यांना कळत नाहीत त्यांना भारतीय नृत्यातून काही सांगण्याचा प्रयत्न करणे(म्हणजे काही कळण्याची अपेक्षा करणे) अवघडच! त्यामुळे, प्रत्येक सत्य हा सादरकर्त्याचा स्वतःचा अविष्कार असते असे मला वाटते. आता हे आपणास महिती असलेले सत्य दुसर्‍यास सांगणे ह्या अर्थाने पाहिले तर अर्थातच ते बदलणार! म्हणजे बदलेलच असे नाही पण बदलणार नाहीच असे कसे म्हणणार? प्रत्येक कलाकार स्वतःच्या कलाकृतीमधून दर्शकाला (प्रेक्षकाला) आपल्याला जाणवलेल्या सत्याचे दर्शन घडवत असतो. दुर्बोधता ही केवळ lack of reference असते असे मला वाटते. येथे जाणवलेले हा शब्द ह्यासाठी की ते सत्य त्याला व्यक्त पातळीवर कळले असेलच असे नाही, पण जाणवणे शक्य आहे. (म्हणजे मातेचा स्तन जवळ आल्यावर तान्ह्या बाळाला आता स्तनपान करायचे आहे हे जाणवते तसेच.) कलाकार जेवढा प्रेक्षकाच्या frame of reference च्या बाहेर जातो तेवढा तो अधिकाधिक abstract किंवा दुर्बोध होत जातो. (येथे किंवा हा शब्द either/or असा नाही तर..आकळला तर abstract आणि नाकळला तर दुर्बोध असा वापरला आहे) महत्वाची गोष्ट अशी की आकळणे आणि नाकळणे ह्या दोन्ही गोष्टी दर्शकावर (प्रेक्षकावर) अवलंबून आहेत. कलाकारावर नाहीत. अंततः सत्य हे संवादाशिवाय अस्तित्व राखत नाही असे वाटते. जे मला जाणवले तेच माझ्यासाठी सत्य! अगदी नैसर्गिक सत्य जरी घेतले तरी ते निसर्ग व साक्षी (nature and observer) ह्यांचा संवाद आहे. म्हणूनच कितीही सफरचंदे पडत असली तरी त्यामागचे गुरुत्वाकर्षण न्यूटनला जसे कळले तसे इतरांना नाही कारण इतरांचा संवाद नाही. आता येते सामाजिक सत्य प्रस्थापन. हे तर केवळ सोय आहे! ज्या समूहाला जे जे ज्या ज्या वेळी सोयीचे वाटते ते सामाजिक सत्य म्हणून स्वीकारण्यात येते. सर्व धर्म हे ह्या प्रकारच्या सत्याची प्रमुख उदाहरणे आहेत. सामाजिक सत्याला सत्य (पुराव्याने शाबित करता येण्यासारखे या अर्थाने) ह्या दृष्टीने फारसे महत्व नाही. अर्थात हे तेव्हा चूक ठरते जेव्हा अश्या एखद्या सत्याचा अंगिकार केलेला समाज दुसर्‍या एखाद्या समाजाच्या दु:खाला कारणीभूत होतो. मग त्याच्या विरोधात अजून सत्ये मांडली जातात आणि त्यांचा पुरस्कारही होतो. पुन्हा हे ही सत्य संवादात्म झाले. टीपः हे सर्व केवळ आपला लेख व प्रतिसाद वाचून लिहिले आहे..मूळ चित्रपट पाहिलेला नाही आणि लेखही वाचलेले नाहीत.

In reply to by सटक

Anand More Wed, 02/17/2016 - 22:46
आपण छान विचार मांडलेत. इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी सत्य अन्वेषणाबद्दल काहीही बोललो नसून सत्याचे आकलन आणि नंतर त्याचे प्रकटीकरण याबद्दल माझे विचार मांडले आहेत. तुमचा सत्य म्हणजे संवाद हा विचार देखील त्याच अंगाने जातो. जमल्यास चित्रपट पहाल का ? आणि माझे लेखन पण एकदा नजरेखालून घालून त्यावर प्रतिसाद दिलात तर वाचायला आवडेल मला.

In reply to by Anand More

सटक Wed, 02/17/2016 - 23:42
सत्यशोधन ही जर का नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर मग सत्याचे आकलन हे सत्याच्या अन्वेषणाचे फलितच असेल असा विचार माझ्या लेखनामागे होता. सत्याचे अन्वेषण आधी आणि मग आकलन हा नैसर्गिक ओघ आहे. आकलनात अन्वेषण अंतर्भूत आहे असे आपणास वाटत नाही का? प्रकटीकरणावरही मी त्याच अंगाने बोललो आहे. अन्वेषण-आकलन-सात्मीकरण-प्रकटन हा माझ्यामते जास्ती पटणारा Process Flow असावा. सात्मीकरणाशिवाय प्रकटन शक्य नसल्याने आकलन झालेले सत्य आणि नंतर प्रकट होणारे सत्य ह्यात फरक अपेक्षित आहे. असो. चित्रपट बघून काही वेगळेही वाटू शकेल कदाचित.

In reply to by सटक

Anand More गुरुवार, 02/18/2016 - 13:12
तुमचे टोपणनाव असे आहे की मी तुम्हाला दादा, साहेब, ताई, बाई, वहिनी, जी वगैरे काहीही अतिरिक्त संबोधन लावू शकत नाही. म्हणून केवळ टोपणनाव वापरून संबोधतोय. त्यात कुठेही एकेरीवर यायचा इरादा नाही. आपल्याबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल पूर्ण आदर राखूनच मी प्रतिसाद देतो आहे. माझ्या या लेखमालेत सत्यशोधन हा मुद्दा कधीच नव्हता. आता मागे वळून बघताना मी एका मुद्द्याला शीर्षक म्हणून "सत्याचे अन्वेषण / आकलन" हा शब्द प्रयोग केला तो चुकला असे मला वाटू लागले आहे. त्या शीर्षकाखाली माझे सगळे मुद्दे केवळ "सत्याचे आकलन" या संकल्पनेभोवतीच गुंफलेले आहेत. एकदा वाटले की संपादकांना विनंती करून ते शीर्षक बदलून घ्यावे. पण त्याने अनेक प्रतिसाद निरर्थक वाटले असते म्हणून मी तशी विनंती करीत नाही आहे. मी सत्य शोधन एक नैसर्गिक प्रवृत्ती मानतो आणि तुम्ही आधी मांडलेला, संवादाचा आणि सत्याच्या व्यक्तिगत आविष्काराचा मुद्दा मला पूर्णपणे पटलेला आहे. किंबहुना, माझा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी मी असे म्हणीन की, नैसर्गिक सत्यांबद्दल सत्यशोधन ही विचारपूर्वक केलेली गोष्ट नसावी. याउलट, स्वभावानुसार, ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेसनुसार, आणि बाह्य वातावरणानुसार माणसाला अशी नैसर्गिक सत्ये जाणवत असावीत. नंतर माणूस त्याबद्दल जो काही विचार करतो ते त्या सत्याच्या प्रकटनाची त्याच्या मनात झालेली सुरवात असते. थोडे अलंकारिक बोलायचे झाले तर मी "नैसर्गिक सत्य जाणवणे ही बर्फाचा कडा तुटण्यासारखी अचानक घडणारी घटना मानतो. त्यात शोधन किंवा अन्वेषण याचा भाग कमी आणि केवळ त्या क्षणाला साक्षी असणे हीच त्या माणसाची मोठी उपलब्धी मानतो" असे म्हणेन. आता रहाता राहिला या लेखाचा, चित्रपटाचा आणि लेखमालेचा मुद्दा. ह्या तीनही गोष्टी गुरुत्वाकर्षण, आण्विक बल अश्या संकल्पनांच्या नैसर्गिक सत्याबद्दल बोलत नाहीत. याउलट एका घटनेचा वेगवेगळ्या लोकांनी कसा लावला आणि प्रत्येकाला आपली बाजूच सत्य आहे असे वाटते, या बद्दल बोलत आहेत. या सर्व लोकांपैकी कोण सत्य बोलतोय? कोण असत्य बोलतोय? याबद्दल स्वत: कुरोसावा, नंतर ररा आणि त्यानंतर मी कुणीच काहीही भाष्य केलेले नाही आहे. तर ज्या गोष्टी आपण करतो किंवा आपण बघतो त्याबद्दलचे आपले मत (ज्याला आपण आपले वैयक्तिक सत्य म्हणू शकतो) ते मूळ सत्यापासून भिन्न असू शकते. त्यात आपल्या स्वप्रतिमेचा, स्वप्रतिमाप्रेमाचा, संस्कारांचा, पूर्वग्रहांचा, आयुष्यातील तत्कालीन गरजांचा किती मोठा प्रभाव असतो त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खून झालाय ही एक सत्य घटना आहे. पण तो का झाला? त्यामागची भूमिका काय होती? तो होण्यापूर्वी कोण कसे वागले याबद्दलचे सर्व लोकांचे आकलन पूर्णतया भिन्न आहे. कारण हे सर्व लोक, मी वर उल्लेखिलेल्या प्रभावांपासून मुक्त नाहीत. जेंव्हा मनुष्य कोणत्याही व्यवस्थेची उभारणी करतो, तेंव्हा त्यासाठी मूळ घटक जर निर्जीव असेल किंवा असल्या प्रभावांपासून मुक्त असेल तर ती व्यवस्था उभी करणे आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात ठेवणे सोपे असते. पण जर ती व्यवस्था कुटुंबाची किंवा समाजाची असेल तर तिचा लघुत्तम एकक म्हणजे मनुष्य असतो आणि तो या प्रभावांपासून कधीच मुक्त नसतो. त्यामुळे अश्या व्यवस्थांमध्ये सत्य कायमच धूसर असते आणि जाणवलेले सत्य (Realized Truth) आपोआप मागे पडून उत्पादन केलेले सत्य (Manufactured Truth) बाजी मारते असा या पहिल्या लेखाचा सूर आहे. आणि असे का होत असावे त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण मी तिसऱ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी तुम्हाला चित्रपट पहा आणि तीनही लेख वाचा अशी विनंती केली होती.

In reply to by Anand More

सटक गुरुवार, 02/18/2016 - 20:54
म्हणजे माझे संदर्भाविरहित स्पष्टीकरण झाले तर.. ;) आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले.. दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील. तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही. असो, आपले विचार पटताहेत, थोडे fine tuning सोडल्यास. पुढील लेखनास शुभेच्छा! आणि संबोधन जाऊद्या हो..संवाद महत्वाचा!

In reply to by सटक

Anand More Fri, 02/19/2016 - 11:32
शेवटी "असो" म्हणून थांबलात तरीही काही सांगावेसे वाटले म्हणून लिहितोय.
आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील.
हे तुमचे मत मला पटले आहे.
तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही.
कदाचित मी थोडा धाडसी असीन ;-) सात्मीकरणात देखील व्यक्ती आपल्या पूर्वानुभवांना आणि कल्पनेला वापरून सत्याचे एक सुसंगत चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असते असे मला वाटते. म्हणजे इथे आपले आकलन इतरांपुढे प्रकट करावे की नाही याचा विचार जरी नसला तरी ते आकलन विचारांच्या सहाय्याने सुसंगत करून स्वतःच्या मनात प्रकट करणे सुरु होते. म्हणून मी त्याला प्रकटीकरणाची पहिली पायरी असे म्हटले. आपले विचार थोड्या ट्युनिंग च्या फरकाने बरेचसे जुळतात अश्या अर्थाचे तुमचे विधान मला पटले आहे. आपल्याशी संवाद करून आनंद झाला.

In reply to by Anand More

सटक Sat, 02/20/2016 - 00:13
संवादाची अशी गंमत आहे पहा. रेषा येत रहातात आणि आकृती उमटत रहाते! तर..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
तुमची ही भूमिका स्पष्ट केलीत हे फार छान केलेत. आकलन हे मी ह्यापूर्वी estimate/calculate अश्या अर्थाने वापरलेले जास्ती पाहिले आहे. त्यामुळे सहजलब्ध झालेले ज्ञान अशी आपण जी त्याची फोड करता आहात ती मला दिसली नाही चटकन. आकलनामध्ये कार्य अपेक्षित आहे. म्हणजे माहिती ताडून बघणे, त्यावर आधारित अदमास बांधणे इ. इ. शोधन ह्या शब्दाचेही तसेच आहे. "धातू शोधन" हे जास्ती वेळा वाचल्याने, शोधणे हा मराठी अर्थ मी त्याला सहसा लावलेला पाहिलेला नाही. शुद्धीकरण असाच जास्ती. आपण म्हणता त्याप्रमाणे अपघाती मिळालेले ज्ञान ह्याला वेगळा शब्द सुचवू म्हणेन तर तो ही चट्कन आठवत नाही! वेगवेगळ्या माणसांनी बघितलेले एकच दृश्य ही संकल्पना वापरून Vantage Point नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जमल्यास बघा. चांगला आहे. अर्थात तुम्ही भरपूर खोल संकल्पनेबद्दल बोलताय. तुम्ही आता पुरेसे कुतुहल वाढवल्यामुळे मी आता राशोमान बघेन. जमल्यास सांगेन कसा वाटला ते. सत्याचे सुसंगत चित्र, हम्म्म्म..चांगली संकल्पना आहे! शक्य आहे. प्रत्यक्ष दृश्य असेल तर मग तर नक्कीच! अवांतर: आपल्या शेवटच्या वाक्यातले आनंद आवडले...येवढे लिहून मी ही 'सटक"तो!

In reply to by सटक

Anand More Sat, 02/20/2016 - 13:11
तुम्ही माझे लेखन बारकाईने वाचले आहे हे जाणवून खूप बरे वाटले. असे जाणकार वाचक असतील तर मी शब्द अधिक विचार करून वापरायला हवेत हे देखील जाणवले. तुम्ही सांगितलेले शब्दार्थ पटले आहेत पण माझ्या प्रतिसादामुळे, माझ्या शब्द प्रयोजनाच्या मागील भूमिका समजून, माझ्या विचारांची दिशा लक्षात येत असावी असे वाटते आणि माझे शब्दप्रयोग अगदीच मूर्खपणा वाटत नसावेत याची खात्रीदेखील वाटते आहे. तुम्ही ज्या दृष्टीने हा पहिला लेख वाचला त्यामुळे थोडासा धीट होऊन, मी तुम्हाला तिसरा भाग वाचण्याची विनंती करीन. कारण तो लिहिल्यानंतर माझा मीच खूप खूष झालो होतो. त्यावरच्या प्रतिसादांमध्ये सिरुसेरी यांनी कमल हसनच्या "वीरुमंडी" (सांदीयार)या तामिळ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तो तू नळीवर शोधून ठेवला आहे. पण बघायचा बाकी आहे. आता त्या बरोबर Vantage Point पण बघीन. धन्यवाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंत कुलकर्णी Fri, 02/12/2016 - 19:24
त्यातून काही वेगळा अर्थ निघतोय का पहा....पण मला आवडलेली एक गोष्ट ती असी की तुम्ही त्यावर एवढ्या गंभीरपणे विचार करताय ते. श्री रमताराम यांनीही fantastic| लिहिले आहे यात काही शंकाच नाही....

In reply to by जयंत कुलकर्णी

Anand More Sat, 02/13/2016 - 11:39
श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल धन्यवाद आणि कौतुकाबद्दल देखील. आपले लेखन वाचले. खूप छान आहे. आपण राशोमोनचे भारतीयीकरण अतिशय समर्थपणे केले आहे. पण मी अजून राशोमोनच्या धुंदीत असल्याने मला तो शेवटचा झिरना गेटचा सांधा मनात मूळ गोष्टीशी जुळवता आला नाही. ही लेखमाला संपल्यावर पुन्हा वाचीन आणि माझे विचार मांडेन. तोपर्यंत तुमची त्या शेवटच्या भागाच्या सांध्याची भूमिका मांडलीत तर माझ्या विचाराला दिशा मिळू शकेल.

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 15:11
तरीही इतकी भुक्कड लेखमाला मी त्यापूर्वी कधीही वाचली नव्हती. आता विषय निघालाच आहे तर लिहीतो, सत्यशोधन म्हणजे फॅक्ट फाइंडींग नव्हे. एक काल्पनिक कथा घेऊन त्यावर आठ क्लिष्ट भाग लिहून, सतरा बाजूंनी डोकेफोड करायची आणि पुन्हा `सत्य तुम्हीच शोधा' असा भोंगळपणा करत, वाचकांची वाट लावायची याला थोर कलाकृती म्हणत नाहीत. कलेनं लोकरंजन झालं पाहिजे, रसिकांनी तुमच्यासाठी स्वतःचा वेळ दिलायं, त्यांना आनंद मिळायला हवा असं माझं मत आहे. लेखकानं भारंभार लिहून किंवा त्यावर चित्रपट वगैरे काढून, स्वतःचं कन्फ्यूजन वाचकांच्या माथी मारणं आणि त्याला `सत्यशोधन वगैरे म्हणणं ही केवळ भंकस आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 16:37
सदर चित्रपटात उत्तर प्रेक्षकांवर सोडून काय मनोरंजन साधलंय ? खुद्द रमतारामांनी शेवटच्या लेखात, स्वतःच्या प्रतिसादातच स्वतःचा मानसिक गोंधळ नकळतपणे उघड केला आहे : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल. कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न? त्याला न आगा ना पिछा. आणि पुढे तर हद्दच केली आहे! त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणजे मर्म अजून यांना सुद्धा गवसलेलं नाही! आणि अपेक्षा काय तर वाचकांची पुरती काशी झाल्याशिवाय त्यांना `मर्म' कळणार नाही. पण इतका पसारा बघून, इथले सदस्यही बावरलेले दिसतात. मूळ प्रश्नाचीच जर उकल होत नाही तर नवे प्रश्न (आणि तेही मूलभूत?) निर्माण करुन काय मनोरंजन साधलंय? थोडक्यात, मूळ प्रश्न टांगणीला आणि नवे `मूलभूत प्रश्न' जोपर्यंत वाचकांच्या मनाचा `ताबा' घेत नाही तोपर्यंत त्यांना, लेखकानं `ओरिजनल' काशी काय घातलीये तेच कळणार नाही! याला तुम्ही लोकरंजन म्हणता?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Sun, 02/14/2016 - 16:44
मी मला जे हवं ते घेतो... कधी कधी ते समोरच्याने दिलेही नसेल..त्या बाबतीत मी एकलव्य आहे... तुम्ही माझा तिसरा लेख वाचला का? रमतारामांना दिसलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या गोष्टी मला दिसल्या असे मी नमूद केले आहे... ते देखील तुम्हाला आवडलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 16:50
चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणि ररांच्या या प्रतिसादाबद्दल तुम्हाला प्रामाणिकपणे काय वाटतं? पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल.

In reply to by विवेक ठाकूर

जयंत कुलकर्णी Sun, 02/14/2016 - 17:00
श्री ठाकूर, जो चित्रपट जगात आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना भुरळ पाडत आला आहे, आणि जो चित्रपटसृस्टीतील एक माईलस्टोन म्हणून ओळखला जातो त्या सिनेमाला भुक्कड म्हणणे याला काय म्हणावे हे कळत नाही. शिवाय प्रतिसादात "घंट्याचे" "काशी घालणे" या असल्या शब्दांचा मी निषेध करत आहे. असो. अर्थात याचा उपयोग होणार नाही याची कल्पना आहे पण सगळ्यांनीच हे चालवून घेतले असे उद्या कोणी म्हणायला नको म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 17:47
तुम्ही ररांच्या प्रतिसादाबद्दल किंवा चित्रपटाच्या शेवटा बद्दल जर काही पटेलसे लिहू शकलात तर मी सुद्धा उपरोक्त शब्दांचा पुनर्विचार करीन . ररांच्या नांवामुळे सदस्य बोलले नसतील इतकंच . एनी वे , वरच्या प्रतिसादाबद्दल तुमचं किंवा आनंदश्रींच मत काय आहे ?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Sun, 02/14/2016 - 18:01
आनंदश्री.... मला तर कुस्तीचा फड मारून आल्यासारखं वाटतंय... अहो ठाकूर साहेब माझं मत मी खाली दिलं आहे.. आणि मी तितकंच सांगू शकेन असे मला वाटते.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 18:16
तुम्ही माझ्या तीन साध्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? १) तुम्हाला चित्रपट नक्की काय सांगतो ते कळलंय का? २) `त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा' हे प्रश्न कुठले? ३) त्या प्रश्नांनी मनाचा ताबा घेण्याचा (कारण ते चित्रपटाचा भागच नाहीत) आणि चित्रपट समजण्याचा काय संबंध आहे? आणि तुमच्याकडे उत्तरं नसतील तर ते प्रामाणिकपणे मान्य कराल का?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Sun, 02/14/2016 - 18:42
देतो की, 1) नाही 2) ररांच्या मनातले प्रश्न मी ओळखू शकलो नाही 3) प्रश्न कुठले हेच ओळखले नाही तर त्यांचा चित्रपटाशी संबंध काय ते मी सांगू शकत नाही.. हत्ती आणि सात आंधळ्याच्या गोष्टीतील मी एक आंधळा म्हणून घ्यायला तयार आहे..

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Sun, 02/14/2016 - 21:35
खालच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय तसा तुमची पीसं वगैरे काढण्याचा अजिबात उद्देश नव्हता. ररांनी लोकांना उगीच गुगली टाकून स्वतःचं अज्ञान झाकण्याचा प्रयत्न केला होता अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही तसं काही केलं नाहीत. तुमच्या हलक्या फुलक्या लेखनाचे इथे अनेक फॅन्स आहेत. तुमच्याकडे सुरेख शैली आणि उत्तम मांडणी आहे. तस्मात, तुम्ही तुमच्याच स्टाइलनं लिहीत राहा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !

Anand More Sun, 02/14/2016 - 17:03
ररांना जे भावले ते त्यांनी लिहिले..मला हा चित्रपट समजला आहे... या तुम्हालापण समजावतो आणि मी सांगीन तोच त्याचा अंतिम अर्थ आहे असा त्यांचा अभिनिवेश मला कुठे जाणवला नाही... आणि मी थोडा गुण गाईन आवडी वर विश्वास ठेऊन व्यक्त होणारा आहे... त्यामुळे माझे विचार त्याच दिशेने धावतात

जयंत कुलकर्णी Sun, 02/14/2016 - 17:10
श्री मोरे, तुम्हाला जे भावले, जे आवडले त्याबद्दल आपण लिहीत रहा. आपण म्हटलेलेच आहे की ते सगळ्यांना आवडावेच असा तुमचा आग्रह नाही आणि ते शक्यही नाही. असे वितंडवाद घालणारे प्रतिसाद आले तर त्याला उत्तर देत बसू नका. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....

In reply to by जयंत कुलकर्णी

मारवा Mon, 02/15/2016 - 12:54
कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे.... मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.

In reply to by सिद्धेश महाजन

Anand More Sun, 02/14/2016 - 17:30
मिपावरच्या लेखमालेच्या पहिल्या भागाची लिंक माझ्या वरील लेखाच्या सुरुवातीला दिली आहे... आणि ही ररांच्या ब्लॉगची लिंक http://ramataram.blogspot.in/2012/02/blog-post.html?m=1

Anand More Sun, 02/14/2016 - 19:17
तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे... पण ठाकूरांचे आडनाव बदललेले त्यांना चालेल का? चला... जाऊद्या हो... मला आपलं वाटलं, हलकं फुलकं न लिहिता, ज्याला सगळे पटकन वैचारिक, तात्विक, विश्लेषणात्मक वगैरे म्हणतील आणि मग माझी किर्ती वाढेल असे काही पोस्टून थोडा भाव खावा... पण तुम्ही तर माझी पिसंच काढलीत... तरीदेखील, अगम्य असल्याने इतरांनी दुर्लक्षिलेला माझा हा धागा तुमच्या प्रतिसादांमुळे वर येतोय, म्हणून धन्यवाद :-)

Anand More Sun, 02/14/2016 - 23:06
तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून हुरूप वाढलाय म्हणून थोडे लिहितोय. पण मला पुस्तकांची आणि चित्रपटांची आवड आहे. त्यांचे मी दोन प्रकारात वर्गीकरण करतो. १) जे विशिष्ट प्रश्न मांडून त्याचे उत्तर देतात. त्यामुळे ते अर्थवाही असतात. सुखांत किंवा दु:खांत असतात. त्यांचे निष्कर्ष आपल्याला पटणे किंवा न पटणे इतकेच होऊ शकते. २) जे केवळ गोष्टी मांडतात. प्रश्न पण आपले आपण ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण आपली आपणच ठरवावीत अशी काहीशी त्यांची योजना असते. त्यामुळे ते अनेकांना निरर्थक वाटतात. वेळकाढू देखील. अशी दुसऱ्या प्रकारची पुस्तके वाचणे किंवा चित्रपट पाहणे आणि नंतर त्यावर विचार करणे म्हणजे ढगात प्राणी किंवा विविध आकार शोधण्यासारखे खुळचट आहे असे अनेकांना वाटू शकते. पण ज्यांना तो खेळ आवडतो त्यांना मात्र त्यात खूप मजा येते. मला स्वतःला दुर्बोध कविता कमी कळतात आणि त्यांना अर्थ लावण्याचे प्रयत्न आनंददायी वाटत नाहीत. तसेच काहीसे नृत्य आणि शिल्प आणि नवचित्रकलेच्या बाबतीत. याचा अर्थ फक्त इतकाच की मला त्यांची भाषा कळत नाही. त्या कलाकाराला त्या कलाकृतीतून त्याला पडलेला प्रश्न आणि त्याचे त्याला गवसलेले उत्तर मांडायचे असेल तर मी त्याचा रसास्वाद घेऊ शकतो. पण या कलांच्या कलाकाराला, मीच प्रश्न ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण मीच शोधावीत असे वाटत असेल तर मात्र मी तिथून पळ काढतो. मला न कळलेल्या चित्राला जेंव्हा कोणी देहभान विसरून पहात राहिलेला दिसतो तेंव्हा मी पण त्या रसिकावर, त्या कलाकृतीवर आणि त्या कलाकारावर थोडा वैतागतो. आणि थोडासा जळतो देखील. पण ते तितकेच. कारण त्याचा अर्थ मी उत्क्रांतीमध्ये किंवा रसिकपणामध्ये कुठे कमी आहे असा होत नाही. फक्त आपल्याला ती भाषा येत नाही असे समजून मी शरणागती पत्करतो आणि जी जमते तिच्याकडे पुन्हा वळतो. मला संगीत आवडते पण कोणी रागांची नावे, सम, मिंड, ताल वगैरे बोलू लागला, किंवा फक्त रागाची आलापी ऐकवू लागला की मी बहिरा असल्यासारखा त्याच्याकडे बघत राहतो. कारण त्या रागाच्या आलापीत मला आनंद आपोआप मिळत नाही आणि तो शोधताही येत नाही. कदाचित या चित्रपटाने अनेकांना ढगात प्राणी आणि आकार शोधण्याचा आनंद दिला असेल आणि तितक्याच अनेकांना आपली फसगत झाली, हाती काहीच आले नाही असा वैतागवाणा अनुभव देखील दिला असेल. ज्यांना आनंद दिला त्यांना ढगात सारखेच प्राणी दिसले असतील याची खात्री ते लोक स्वतः पण देऊ शकत नाहीत. पण याचा अर्थ त्यांचा आनंद खोटा ठरत नाही. ररांना आणि मला या चित्रपटाने वेगवेगळे रूप दाखवले आहे हे तुम्ही वाचलेच असेल. पण त्यामुळे ररांचे किंवा माझे आकलन अंतिम ठरत नाही. त्यात कोणी उजवे किंवा डावे ठरत नाही. आणि दोन आकलने निघाली म्हणून चित्रकृती दुय्यम ठरत नाही. फक्त कुरोसावाने चित्रपट जगासमोर मांडला. तर आधी ररा आणि मग मी आमचे स्वतंत्र आकलन मिपावर मांडले. ते तुम्हाला भिडले नाही इतकेच. त्यात चांगले - वाईट, रसिक - अरसिक, परिष्कृत - अपरीष्कृत असे काहीच नाही. माझा खेळ मला अजूनही आवडतो. पण तो तुम्ही पण आवडून घ्या त्याला चांगले म्हणा अशी माझी काही जबरदस्ती नाही. त्याला वाईट म्हणायचे की नाही, आणि मला किंवा माझ्यासारख्यांना खुळ्यात काढायचे की नाही तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही दोघांनी स्पष्टपणे तुमचा मुद्दा मांडलात त्यामुळे तुमच्याशी बोलता येईल असा विश्वास वाटला. आणि माझ्या, तीन लेखात विभागलेल्या कल्पनाविस्ताराला जोड म्हणून हा एक लांब प्रतिसाद दिला आहे. तुमच्याशी बोलून आनंद वाटला.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Mon, 02/15/2016 - 12:24
कोणत्याही कलाविष्कारात कलाकार आणि रसिकांची कनेक्टीविटी प्राथमिक आहे. ती नसेल तर विषयच संपला ! माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते. जर अनुभव सच्चा असेल तर साध्या शब्दातून सुद्धा तो रसिकांना भिडतो. फर्स्ट हँड अनुभवाला दुर्बोधतेचं डेकोरेशन लागत नाही. अर्थात, उक्तट अनुभवासमवेत सौंदर्याचा परिपोष करणारी अभिव्यक्ती असेल तर ती अविस्मरणीय ठरते.

मारवा Mon, 02/15/2016 - 12:47
माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते
आपण बर्यापैकी सुबोध आहात तर आपल्या मते वरील प्रकारात मोडत असलेल्या कलाकारांची एखाद उदाहरणे द्याल का ?

मारवा Mon, 02/15/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

मारवा Mon, 02/15/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

In reply to by मारवा

विवेक ठाकूर Mon, 02/15/2016 - 14:33
कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते कवितेतल्या पहिल्या तीन कडव्यांमधे बालकवी आणि वाचक यांच्या अनुभवविश्वात फारसा फरक नसतो. ते एक साध्या शब्दात केलेलं, लयबद्ध आणि उत्तम असं, चित्रदर्शी निसर्गचित्रण आहे. ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. अनुभवांची फारकत या कडव्यात आणि त्यातल्या त्यात, शेवटच्या ओळीत होते : झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर. आणि इथे बालकवी दुर्बोध होत नाहीत तर अभिव्यक्तीशी इमान राखून व्यक्तीगत होतात. म्हणजे त्यांची निसर्गाशी इतकी तद्रुपता साधते की त्यांना औदुंबर ही व्यक्ती वाटते. त्याहूनही थोर म्हणजे कवितेत, `असला औदुंबर' ही `जळात बसला'शी, बालकवींनी साधलेली शब्दांची लयकारी! मूळात ही कविता दुर्बोध नाही तर मोनालिसाच्या हास्यासारखी गूढ आहे. कारण `झाकाळुनी जळ गोड काळिमा' ही ओळ, जीवनातल्या सर्वात रहस्यमयी काळ्या रंगाचा निर्देश करते. आणि कवितेच्या शेवटाला सॉलिड स्पेस निर्माण करुन देते. जर बालकवींची मुलाखत घेतली असती आणि त्यांनाच अर्थ विचारला असता, तर इतकी सरळ कविता लिहीणार्‍यानं मनातलं सरळ सांगून टाकलं असतं. मग या कवितेचे रसिकांनी वेगवेगळे अर्थ काढले सुद्धा नसते. किंवा तुम्ही म्हणता तसा स्वतःच्या अर्थाचा आग्रह कुणी धरला नसता. तस्मात, प्रश्न अर्थाच्या दुराग्रहाबद्दल नाही, अभिव्यक्तीच्या दुर्बोधतेबद्दल आणि कलाकारनं ती, कोणतंही क्लॅरिफिकेशन न देता, हेतुपुरस्सर तशीच ठेवून, रसिकांना चकवण्याबद्दल आहे.

पिलीयन रायडर Mon, 02/15/2016 - 14:40
दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा आणि? ग्रेस दुर्बोध म्हणजे वर जे वर्णन केलय तसे "फेक" होते? की मोनालिसा सारखे गुढ? हे कोण ठरवणार? त्यांनीच एका कवितेत "दुर्बोधतेची बेसरबिंदी" असा शब्दप्रयोग केलाय..

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर Mon, 02/15/2016 - 17:19
मोनालिसाचं हास्य गूढ आहे त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यावर ते हास्य कळत नाही असं नाही, तर तिच्या हास्याची अनेक कारणं वाटतात. ती प्रत्येक वेळी दर्शकाच्या मूडप्रमाणे बदलत जातात. पिकासोची चित्रं दुर्बोध आहेत, कितीही वेळा पाहिली तरी पिकासोला काय व्यक्त करायचंय, ते नक्की काहीच कळत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

पिलीयन रायडर Mon, 02/15/2016 - 17:44
ग्रेसची कविता काय आहे मग? तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ गुढ? ते स्वतः तर दुर्बोध आहे म्हणतात.

पिलीयन रायडर Mon, 02/15/2016 - 14:41
मोरे.. मला तुमचा लेख खरंच फारसा कळला नाहीये. मुळ रमताराम ह्यांचाही लेख वाचलेला नाही. मला जेव्हा जमेल तेव्हा हे वाचुन मी तुमच्या लेखावर प्रतिसाद देईन. सध्या तरी माझा पास!

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. Mon, 02/15/2016 - 15:10
हायला. मला वाटले पिरातैला तरी कळले असेल. तिला माहीती असते बरीच. मी प्रस्तावनेनंतर हात वर केले. सविस्तर वाचायचीच कॅपॅकिटी नाही माझी कळणे लांबच राहिले.

In reply to by पिलीयन रायडर

Anand More Mon, 02/15/2016 - 15:15
हो. ह्या लेखाचा संदर्भ लागण्यासाठी ररांचे मूळ लेखन वाचल्याने जास्त मदत होईल कारण हा लेख त्यांच्या मुलाच्या आठ भागांच्या लेखमालेतल्या पहिल्या लेखावरचे माझे विचार आहे. आणि माझे हे तीनही लेख म्हणजे ररांच्या मूळ लेखनावर मी दिलेला प्रतिसाद आहे. त्यामुळे चित्रपट बघणे, ररांचे मूळ लेखन वाचणे आणि मग माझे विचार वाचले तर कदाचित तुम्हाला संदर्भ जवळून जाणवतील. या चित्रपटाचे माझे आणि ररांचे आकलन वेगळे आहे, जे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात मांडले आहे. त्यामुळे या लेखमालेताला हा पहिला भाग सोडून देणे आणि फक्त चित्रपट बघून दुसरा आणि तिसरा भाग वाचणे हा देखील एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे.

In reply to by Anand More

पिलीयन रायडर Mon, 02/15/2016 - 15:24
हो, ते लक्षात आलं की आधी ररांचे लेख वाचावे लागतील. पण मुळात ते ही समजायला इतक्या क्लिष्ट भाषेतलं काही समजायला हवं. तुम्ही कुठल्या तरी प्रतिसादात लिहीलय की लेख दुर्लक्षित राहिला आहे. तुम्हाला कदाचित त्याची काही खंत नसेलही, पण उगाच सांगावं वाटलं की तुमचे लेख आवर्जुन वाचले जातातच. पण किमान मला तरी इतकं Abstract / दुर्बोध (मला चपखल शब्दही सापडत नाहीये!) समजत नाही. किंवा त्यात एवढा रस वाटत नाही. कदाचित बर्‍याच जणांचे तसेच होत असावे. पण तुम्ही लिहीलाय म्हणुन प्रयत्न करायची इच्छा होतेय. थोड्या शांत मनाने प्रयत्न नक्की करेन!

In reply to by पिलीयन रायडर

Anand More Mon, 02/15/2016 - 15:51
तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच Oscar मिळाल्यासारखं वाटतंय. पण "किंवा त्यात एवढा रस वाटत नाही." हे तुमचे वाक्य मला पटते. माझे पण असे अनेकदा होते. एखादे पुस्तक आणून ठेवतो. पहिली काही पाने वाचून रस नाही वाटला तर ठेवून देतो. नंतर पुस्तक परत बोलावते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लेखनात रस वाटला नाही तर मी दुर्लक्ष न करता विषयाची मनात नोंद करून बाजूला ठेवतो. मग ते यॊग्य वेळी परत बोलावतेच.

Anand More Mon, 02/15/2016 - 15:07
Abstract कला आणि अंतहीन किंवा अनेकांत रचना यांच्याशी कसे जुळायचे हा प्रश्न थोडा कठीण आहे. मी स्वतः abstract कथा, कविता यांच्याशी झटकन एकरूप होऊ शकत नाही. पण अंतहीन किंवा अनेकांत रचनांशी जुळवून घ्यायला मला किंचित सोपे जाते. याचा अर्थ प्रत्येक अंतहीन किंवा अनेकांत रचना मला भावतीलच अशी खात्री मी देऊ शकत नाही. अंतहीन कथा कादंबऱ्या खूप वाचल्या आहेत. त्याची सुरवात झाली ती अनंतमूर्तींच्या संस्कार पासून. मग भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्या देखील वाचल्या आणि मग हळू हळू सवय होत गेली. पण याचा अर्थ अनंतमूर्तींचे भैरप्पांचे सर्वच साहित्य आवडले असे नाही. पण एखाद्या लेखकाचे सर्वच साहित्य आपल्याला आवडलेच पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही. तसा कुठला करार कलाकार आणि रसिकांमध्ये असतो असे मला वाटत नाही. त्यामुळे कलाकारावर लोकरंजनाचे दडपण राहू नये आणि रसिकांवर कलेने भुरळ घालावी, कलाकाराच्या कीर्तीने नव्हे अश्या मताचा मी आहे. भैरप्पा माझे आवडते लेखक असून त्यांची तीन चार पुस्तके मला अत्यंत सुमार वाटतात आणि ३-४ वर्षापूर्वीचे आवरण तर मला प्रचारकी वाटते. अनंतमूर्तींचे संस्कार प्रचंड आवडून देखील त्यांची बाकीची पुस्तके मला संग्रही ठेवण्यासारखी वाटली नाहीत. आणि माझे दैवत पु. ल. देशपांडे यांनी केलेला Old Man and the Sea चा एका कोळियाने हा अनुवाद फसलेला आहे असे माझे मत आहे. जी ए कुलकर्णी यांची सर्व ग्रंथसंपदा संग्रही असून त्यातील सर्वच कथा मला सारखाच आनंद देतात असे नाही. आणि गो नी दांडेकरांचे अजुनी नाही जागे गोकुळ हे पुस्तक मला त्यांच्या इतर पुस्तकांपुढे सुमार वाटते. पण मी हे देखील मान्य करतो की भैराप्पांची, अनंतमूर्तींची, देशपांडेंची, कुलकर्णींची जी पुस्तके / कथा मला भिडत नाहीत ती कदाचित इतरांना अतीव सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतात. कुरोसावाच्या या चित्रपटाने मला भुरळ घातली याचा अर्थ इतकाच की मी त्याची पुढील कलाकृती बघायला उत्सुक असेन. पण म्हणून ते आवडलीच पाहिजे अशी माझ्यावर कुठली सक्ती नाही. आणि ती नाही आवडली नाही तर कुरोसावाने माझी फसगत केली असेही नाही. जी कलाकृती मला आवडली ती मला ज्या कारणांमुळे आवडली त्याचा कारणांमुळे इतरांना आवडावी असा माझा आग्रह नाही. आणि जी कलाकृती मला आवडणार नाही तिने इतरांना आनंद देऊच नये असेही नाही. एक मात्र खरे की कलेच्या प्रांतात दुर्बोधतेची झूल पांघरून आपली सुमार प्रतिभा लपवणारे अनेक कलाकार असतात. पण तसे ते सर्वच क्षेत्रात असतात. मी वर कुठेतरी सांगितल्याप्रमाणे, मी "गुण गाईन आवडी" अश्या स्वभावाचा असल्याने, माझ्या मते ज्यांनी दुर्बोधतेची झूल पांघरली आहे ते देखील मला न कळू शकणारा एखादा सौंदर्याविष्कार करत असतील असे मानण्यास मी तयार असतो. आणि हो, ररां बद्दल माझे मत तुमच्या त्यांच्या बद्दलच्या मला जाणवलेल्या मतापेक्षा खूपच जास्त अनुकूल आणि उजवे आहे, इतके सांगून मी थांबतो.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Tue, 02/16/2016 - 13:16
नित्शे या प्रसिद्ध तत्ववेत्त्याचं एक सुरेख वचन आहे : `टू यूज द अदर इज द हायेस्ट इम्मोरॅलिटी' (दुसर्‍याला वापरणं ही सर्वात मोठी अनैतिकता आहे). अंतहीन रचना जर केवळ लेखकाला पडलेले प्रश्न मांडून, उत्तराची प्रामाणिक विचारणा करण्याऐवजी, ते प्रश्नच किती उच्च आहेत आणि शोधा तुम्ही उत्तरं असा आव आणत असेल तर ते `स्वतःच्या मानसिक गुंत्यासाठी दुसर्‍याला वापरणं आहे. राशोमोनच्या संदर्भात तुम्ही याविषयी काय म्हणाल?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Tue, 02/16/2016 - 15:48
नीत्शे असं पण म्हणाला होता की, You have your way. I have my way. As for the right way, the correct way, and the only way, it does not exist. त्यामुळे ररांबद्दल बोलणे आपण थांबवूया. कारण नीत्शे हे पण म्हणाला होता की Anyone who has declared someone else to be an idiot, a bad apple, is annoyed when it turns out in the end that he isn't. त्यामुळे ररा माझ्या अंदाजापेक्षा कमी वाईट किंवा जास्त चांगले निघाले तर मला दु:ख होऊ शकते, आणि मला दु:खी व्हायला आवडत नाही. तो हे पण म्हणाला की, There are no facts, only interpretations. आणि तो हे पण म्हणाला होता की All things are subject to interpretation whichever interpretation prevails at a given time is a function of power and not truth. म्हणजे मी त्याची ही वाकये राशोमोन च्या समर्थनार्थ वापरू शकतो मी तर त्याच्या The surest way to corrupt a youth is to instruct him to hold in higher esteem those who think alike than those who think differently.या अवतरणावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे कुरोसावाचे, ररांचे, तुमचे आणि माझे मत वेगळे असू शकते आणि तरीही आपल्यापैकी कोणीही वाईट नाही हे मी जाणून आहे. मला वाटते पहिल्या कमेंटच्या शीर्षकात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ररा इथे नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे आपण थांबवूया. तुम्हाला चित्रपट आवडला नाही त्यावर मी भारंभार लिहून मिपाच्या सर्व्हरवर भार आणला आहे असे तुम्हाला वाटण्याचीही शक्यता आहे. पण सोडलेला बाण, निघालेला शब्द आणि पोस्ट केलेला धागा परत घेता येत नाही त्यामुळे ह्या नकोश्या झालेल्या तीन भागाच्या लेखमालेचे अस्तित्व सहन करा किंवा हिच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. जमलं तर मी काहीतरी हलकं फुलकं घेऊन येईन. तिथे आपण सगळे मिळून हसूया. :-)

In reply to by Anand More

पिलीयन रायडर Tue, 02/16/2016 - 15:57
मोरेजी.. आपने दिल जीत लिया!! खुप आवडला तुमचा हा प्रतिसाद! ही सगळीच अवतरणे विचार करण्याजोगी आहेत..

In reply to by Anand More

जयंत कुलकर्णी Tue, 02/16/2016 - 16:51
आणि शिवाय एकदा या जगात आलो की आईच्या दुधापासून ते तिरडीपर्यंत आपण किती जणांचा वापर करतो याचा हिशेब परमेश्र्वराच्या बापालाही शक्य नाही त्यामुळे त्यातून उदभवणारी नैतिकता/अनैतिकता हाच एक मोठा भ्रम आहे..... :-)

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Tue, 02/16/2016 - 17:23
तुम्ही चर्चा वेगळ्या वळणावर नेली आहे. ज्या अंतहीन कलाविष्काराबद्दल तुम्ही लिहीलंय, त्यात कलाकार रसिकांना वापरतो का ? असा प्रश्न आहे.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Tue, 02/16/2016 - 19:47
विवेक, मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते. परंतु चित्रपट आणि या लेखमाला या दोघांनीही मला आनंद दिलेला असल्याने मला त्यातला फोलपणा जाणवणे अशक्य होते आणि अजूनही अशक्यच आहे. तुम्ही म्हणता ते कलाकाराने रसिकांना वापरणे मला सर्वत्र दिसते. काही वेळा ते मला आवडते आणि काही वेळेला नाही. राशोमोन, मेट्रिक्स यासारख्या चित्रपटात मला ते आवडले तर अजय देवगणचा ओमकारा, नंदिता दासचा फायर किंवा क्रिस्तोफर नोलान चा Inception चित्रपट बघून मला माझी फसगत झाली असे मला वाटले होते. पण मला त्या कलाकृती जास्त भावल्या नाहीत, याचा अर्थ त्या कलाकृतीचा मी जाहीर पणे निषेध करावा असे काही मला वाटले नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Wed, 02/17/2016 - 16:54
मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्‍याची मदत लागत नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे मला तत्त्वज्ञानात सुतराम रस नाही. कारण तुम्ही किंवा ररांनी फॅक्ट फाइंडींगचे जे पाच की सहा विकल्प कल्पिले आहेत, तो निव्वळ वेगवेगळ्या संकल्पनांचा खेळ आहे. त्यातून जीवनोपयोगी किंवा ठोस असं काहीही निघू शकत नाही. तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे. ते, `आध्यात्मिक सत्यशोधन' म्हणजे `फाइंडींग द अब्सोल्यूट' नव्हे. तर तो केवळ फॅक्ट फाइंडींग करता किंवा सगळंच कसं `व्यक्तिगत आहे' आणि म्हणून सगळंच आधांतरी (खरं तर `चूक') आहे, हे दाखवण्याचा आटापिटा आहे. तरीही एक वेगळा अँगल म्हणून तुमचा शेवटचा लेख नक्की वाचीन.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More Wed, 02/17/2016 - 22:38
।।।तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे.।।। मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही. तो शब्द, बोका - ए - आझमच्या प्रतिसादामुळे झालेल्या चर्चेत आला आहे. ती चर्चा मूळ लेखापेक्षा वेगळ्या दिशेने गेली आहे. मूळ लेखात "अन्वेषण / आकलन" असा शब्द असला तरी त्याखाली मांडलेले मुद्दे आकलन या शब्दाच्या अनुशंगानेच आले आहेत. त्यापुढे देखील मी सत्याच्या प्रकटीकरणाबद्दल बोललो आहे. अन्वेषण आणि शोधन यांच्याभोवती माझी मांडणी नाही. मी वर कुठल्या तरी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. पण त्यामागे सत्यशोधन असा कुठला ही हेतू नव्हता तर कुरोसावा नावाच्या माणसाने बनवलेली एक चित्रकृती होती जी त्याने का बनवली त्याचे कारण कुणालाही ठाऊक नसावे, आणि जी मला का आवडली, त्याचे कारण देखील तसेच अज्ञात आहे. तुमच्या तिसरा लेख वाचण्याच्या आश्वासनामुळे मी खरोखरच आनंदी झालो आहे. (आता यापुढचे मी सगळे विनोदाने लिहित आहे. आवडले नसल्यास कृपया सोडून द्या) कारण पहिल्या भागाच्या दैदिप्यमान यशानंतर दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे अगदीच रया गेलेला बहादूरशहा जफर सारखा शेवटचा नामधारी सम्राट वाटतो आहे. तुमच्या आश्वासनामुळे मी घाबरलो नाही आहे. उलट तुमच्यात मला एक हक्काचा वाचक लाभल्याचे समाधान मिळाले आहे. तुमच्या निरंतर मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे तिसऱ्या भागाचा धागा देखील आता वर येईल अश्या रोमांचकारी कल्पनांमुळे माझे हृदय थडथडू लागले आहे. आणि मी माझ्या तिसऱ्या लेखाच्या अभ्यासाला लागलो आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर Wed, 02/17/2016 - 23:03
सत्य निश्चिती / प्रस्थापना या खाली सर्व ठिकाणी : एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत..... असाच उल्लेख आहे... पुढे सत्याचे अन्वेषण / आकलन आणि सत्याचे प्रकटीकरण वगैरे आहे. पण तुम्ही म्हणतायं त्याप्रमाणे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. असे असेल तर ओके.

In reply to by स्पा

Anand More Mon, 02/15/2016 - 16:35
हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही. अगदी साप भी मरे और लाठी भी न टूटे ची आठवण झाली. असू द्या की. आपल्याला आवडेल तितके घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. आपण कुठे वट सावित्रीचे व्रत करणार आहोत. आणि हो, एकाचा मनमिळावू दुसऱ्याचा हुछभ्रू असू शकतो.

In reply to by Anand More

मुक्त विहारि Tue, 02/16/2016 - 23:20
जमल्यास "स्पा"चा खालील लेख वाचलात तर फार उत्तम http://www.misalpav.com/node/28293 त्यांच्या कॅमेरातून पण असेच बोल येतात.

पैसा Mon, 02/15/2016 - 17:17
वाचते आहे. एक गोष्ट अनेकांनी आपाआपल्या दृष्टीकोनातून पाहून मांडावी हेच तर राशोमानमधे आहे ना? मग दुसर्‍याने लिहिलेल्या लिखाणाला शेलकी विशेषणे लावून लोकांना कसला आनंद मिळतो देवजाणे! ररा आजोबा, आतातरी या आणि मौन सोडा. हल्लीच्या अनेक धाग्यांप्रमाणे हा धागाही "जाना था जापान पँहुच गये चीन" झाला आहे. आनंदबुवा ट्यार्पीसाठी खुश व्हा!

In reply to by पैसा

Anand More Mon, 02/15/2016 - 17:27
खरे तर मी पण हेच म्हणणार होतो.... की एकच गोष्ट कुणाला आनंद देऊन लिहायला प्रवृत्त करते आणि कुणाला ती भंपक वाटते.... हा देखिल राशोमोनचा एक अन्वयार्थ लावता येईल.... आणि ट्यार्पी साठी मी कालच आभार मानले आहेत.... आता तुमचेही मनःपूर्वक आभार

सतिश गावडे Mon, 02/15/2016 - 22:58
ररा कुठे गायबलेत? पूर्वी कधीतरी त्यांच्याशी गाठभेट व्हायची एकाच एरीयात राहत असल्याने. असो, यानिमित्ताने मी हा सिनेमा पाहिला. छान आहे सिनेमा.

विवेक ठाकूर गुरुवार, 02/18/2016 - 10:39
असं दिसतंय. ररांचा प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल ररांनी शेवटापर्यंत मालिका रेटत नेली आणि वाचकांना, काही तरी फार अनमोल आणि कल्पनेच्या पलिकडचं रहस्य उलगडणार आहे, अशा भ्रमात ठेवलं. आनंदनी इतक्या प्रतिसादांनंतर तरी, हा जो प्रामाणिकपणा दाखवला आहे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. तो न दाखवणं, याला मी `वाचकांना वापरणं' म्हणतो आणि नित्शे त्यालाच हायेस्ट इम्मॉरॅलिटी म्हणतो. तस्मात, आनंदनी वरच्या प्रतिसादात जे काही तत्वज्ञानाचे उतारे दिलेत ते मुद्याशी असंबधित ठरतात. ररा शेवटी हाइट करतात : कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणून मी म्हंटलं होतं की कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न ? आणि त्यांच्या सोडवणूकीचा चित्रपट समजण्याशी काय संबंध! निषेध नोंदवणार्‍यांना आता तरी, शब्दापलिकडे जाऊन, मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More गुरुवार, 02/18/2016 - 12:14
तुम्हाला माझे विनोद कळतात आणि आवडतात असे गृहीत धरून मी म्हणेन, "किती लिहिता हो तुम्ही ठाकूर साहेब; आणि ते सुद्धा मागे पिवळा रंगबिंग लावून. कसले मजबूत हात असतील हो तुमचे. शोलेच्या पटकथेत थोडा बदल करून मी लिहीन, ये हाथ मुझे दे दो ठाकूर … आपके हाथ मुझे दे दो ।" अहो मी ढगात प्राणी शोधण्याच्या माझ्या निरर्थक खेळाबद्दल प्रामाणिकपणे इतक्या प्रतिसादानंतर आत्ता नाही, फार आधी म्हणजे दिनांक १४/२/२०१६ रोजी २३:०६ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादातच बोललो आहे. त्यामुळे मी या चर्चेमध्ये पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे हे सत्य पुराव्याने शाबीत होते. मी दिनांक १६/०२/२०१६ रोजी १५:४८ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ररां बद्दल बोलणे थांबवले आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत केवळ ते स्वतःच बदलू शकतात. आणि त्यांच्या बद्दल असलेल्या तुमच्या मताला बदलण्याच्या बाबतीत ते स्वतःदेखील असमर्थ असतील अशी माझी आता खात्री पटली आहे. त्यामुळे तो आधीच संपलेला विषय मी पुन्हा एकदा संपला आहे असे जाहीर करतो. मला कल्पना आहे की, माझे असे एकतर्फी जाहीर करणे तुम्हाला आवडणार नाही. आणि तुम्ही नाही-नाही म्हणत पुन्हा तोच विषय काढाल. पण सध्या मला विनोदी लेखन करण्यास कुठलाच विषय सुचत नाही आहे. (मी अल्प प्रतिभेचा मनुष्य आहे. किंवा कदाचित तुम्ही सर्व आखुडशिंगी, बहुदुधी मिपा कर माझ्या सारख्या लंगड्या गायीचे, "नवीन" म्हणून कौतुक करीत असाल अशी मला दाट शंका आहे) त्यामुळे "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" या दुव्यावर टिचकी मारीत राहणे, आणि एक नवीन प्रतिक्रिया आली अशी सूचना मिळाली की अधाश्यासारखे तिथे टिचकी मारून, ती तुमचीच आहे हे पाहून, स्मित हास्य करून, मग ती वाचून, विजयी वीराच्या मुद्रेने, पाताळविजयम मधल्या राक्षसासारखा हसत, मी माझी दीर्घ प्रतिक्रिया लिहित बसतो आहे. मला तर असे वाटू लागले आहे की आपण दोघेही विक्रम वेताळ चा खेळ खेळत आहोत. आता, "विक्रम कोण? आणि वेताळ कोण?", या सत्याच्या बाबतीत आपले दोघांचे आकलन वेगवेगळे असू शकते. त्यावर कोणी नवा कुरोसावा नवा चित्रपट काढू शकतो. त्याबद्दल कोणी नवीन ररा आठ भागांची नवीन लेखमाला लिहू शकतो. त्यावर प्रतिक्रिया म्हणून कोणी नवीन आनंद मोरे आपली तीन भागातील दीर्घ प्रतिक्रिया लिहू शकतो. आणि मग त्यावर कोणी नवीन विवेक ठाकूर साद प्रतिसादांची सरबत्ती चढवू शकतो. ही साखळी अशीच अनेकांत किंवा अंतहीन चालू राहू शकते. आणि याला कुणी ढगात प्राणी शोधण्याचा निरर्थक खेळ असे म्हणू शकतो तर कुणी दुसऱ्याला वापरणारी सर्वात मोठी अनैतिकता देखील म्हणू शकतो. अश्या प्रकारे बाकी मिपाकरांना कायम डब्बल फोडणी घातलेली मिसळ खायला मिळत राहील. मला वाटते आपण दोघे आता मिपाकरांकडून करमणूक कर देखील घेऊ शकतो. बोला करूया का पार्टनरशिप? या सिरीजवरचे माझे इतर दोन लेख तुमची आतुरतेने वाट पहात आहेत. त्या दोनी ल्येकारांकडेबी लक्ष असू द्या वो ठाकूर सायब. लई गुणाची हायती माजी ल्येकरं. मला लई जीव लावलंया बगा त्येंनी. तुमास्नी बी लावतीलाच बगा. आन न्हाय लावला तर म्हारू नगा बरं का त्येस्नी. अजून धाकली हायत. वाईच वाट बगा. ती जरी फुडे थोरली न्हाय जाली तरीबी तुम्ही कनवाळू होशीला आणि माज्या बरूबर गमती कराया येशीला असं माला उगा वाटून ऱ्हायलंया बगा.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर गुरुवार, 02/18/2016 - 12:25
तुमच्या निरागस प्रामाणिकपणाचा चाहता आहेच, ररांबद्दल तुमच्या प्रेमाचाही आदर आहे. तुमचे दोन्ही लेख वाचून, आवडले तर निश्चित प्रतिसाद देईन. एखादा नवा आयाम कळला तर पूर्वग्रहसोडून, मनसोक्त दाद देण्याचा माझाही स्वभाव आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अभ्या.. गुरुवार, 02/18/2016 - 12:41
इस खुशीके मौकेपर पूरे कायनात मे जश्न मनाया जाये. इत्र के दिप जलाये जाये, पटाखोंकी आतिषबाजीसे फलकमें सैकडो तारोंकी ......................................काय ते करा एकदाचे..............

In reply to by अभ्या..

विवेक ठाकूर गुरुवार, 02/18/2016 - 13:05
तेरे हुस्नकी तारीफ़ ना करूं, तो ये नज़र किस काम की, तेरे जलवोंसे रोशन ना हो, तो ये जिंदगी किस काम की |

पैसा गुरुवार, 02/18/2016 - 13:28
आनंद, मिपावरच्या 27000 मेंबर्स ना न जमलेली गोष्ट केल्याबद्दल तुम्हाला एखादे चक्र देऊन टाकले!!