मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या

माहितगार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मराठी मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्याचे प्रयत्न मागच्या काळात म.टा. आकाशवाणी, आंतर्नाद मासिक अशा माध्य्मातून केले गेल्याचे पाहण्यात होते तसे मराठीतील (अतीदीर्घ काव्ये सोडून) कवितांची अशी या पुर्वी कुणी निवड केली असल्यास माहिती वाचण्यास नक्कीच आवडेल. अर्थात या धागा लेखाचा मुख्य विषय मराठीमधील आणि/अथवा मिपावरील तुम्हाला आवडलेल्या सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या ? सर्वोत्कृष्ट १००/५०/१०/५/१ साठी तुम्ही कोणत्या कविता निवडाल ? आपण निवडलेली कविता आपल्याला उत्कृष्ट का वाटते ? (कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :)) धागा लेखाचा एक अंतःस्थ हेतु हा की काही चांगल्या कविता आपल्या वाचनातून सुटल्या असू शकतात त्यांच्याशी परिचय व्हावा. या विषयात एक सर्वासामान्य वाचक म्हणून रुची असली तरीही मी 'जाणकार' या विषयास पात्र नाही त्यामुळे नोंदवलेल्या कवितातून अधिक सामायिक स्वरुपाची निवड मी स्वतः पात्र ठरत नसल्यामुळे करणार नाही, इतर काव्य रसिक/ जाणकार नोंदवल्या गेलेल्या कवितातून सर्वोत्कृष्ट कविता निवड करू इच्छित असल्यास आनंद होईल. कवितांचे दुवे आणि संदर्भ नमुद करावेत संपूर्ण कविता या कॉपीराइटेड असू शकतात. (ज्या कविंचा मृत्यू इ.स. १९५५ पुर्वी झाला आहे त्यांच्या कविता प्रताधिकार मुक्त असू शकतात तरीही कविचे नाव नमुद करणे अभिप्रेत असते) कवितेचे एखादे कडवे का आवडले ते सांगणे, रसग्रहण अथवा अगदी टिकाही कॉपीराइट कायद्यातून सुटका होण्याचे राजमार्ग असू शकतात, म्हणून नुसते कडवे कॉपी पेस्ट करण्या पेक्षा ते का आवडले हे सोबत लिहिणे प्रशस्त. लिहिण्यासाठी वेळ नसल्यास कविता-कवीचे नाव काव्य संग्रह अथवा ऑनलाईन दुवा एवढे जरी नमुद केले तरीही पुरेसे आहे. असा धागा मिपावर या पुर्वी झाला असल्यास त्याचाही दुवा द्यावा. सहभागासाठी आभार.

वाचने 14952 वाचनखूण प्रतिक्रिया 57

कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल.:
अशी अट घातल्यामुळे माझा पास. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 11/01/2016 - 15:10
अशी अट घातल्यामुळे माझा पास.
अगदी अगदी तुमचं दु:ख्ख समजू शकतो कारण याच कारणाने मी स्वतः कविता नोंदवल्या नाहीत १/५/१०/५०/१०० सर्वांसाठी मला केवळ माझ्याच कविता दिसल्या म्हणून मीही स्वतःसुद्धा पास दिला :) सो इट इज क्वाईट ओके अर्थात डु आयडीचा मार्ग आहेच की ! डु आयडी वरून सहभागी व्हा -डुआयडीचां समर्थक माहितगार

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 12/01/2016 - 22:19
पैजारबुवा अगदीच मनाला लावून घेऊ नका तुमच्या सगळ्या कविता वाचल्या नाहीत पण ज्या वाचल्या त्यातून त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय कवितेची चांगली कविता म्हणून विशेष नोंद घेत आहे. बाकी 'हवाबाण हरडे प्रेम' कवितांचे क्रमांकन कसे करावे ? हा अवघड प्रश्न आहे :)

" भले बुरे जे घडुन गेले , विसरुन जावु या क्षणभर, जरा विसावू , या वळणावर, या वळणावर " ही कविता मला खुपच छान वाटते. त्यातही शेवटची ओळ " डाव मांडीता मनासारखा, कुठली शंका , कुठले काहूर " फारच आवडते. आयुष्यात ' तडजोड " किती महत्वाची हे या कवितेत सांगीतले आहे.

In reply to by जयन्त बा शिम्पि

माहितगार 12/01/2016 - 22:25
आंजावर गीतकार-सुधीर मोघे, संगित-सुहासचंद्र कुलकर्णी, गायिका-अनुराधा पौडवाल अशी माहिती येते आहे बरोबर आहे ना ?
आयुष्यात ' तडजोड " किती महत्वाची हे या कवितेत सांगीतले आहे.
गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर ह्या भूमिकेत जराशी तडजोड आणि 'प्रीतिची झालर' मुळे बरीचशी सकारात्मकता आहे असे वाटते का ?

In reply to by लव उ

माहितगार 12/01/2016 - 22:29
संदर्भा साठी मोकलाया दाहि दिश्या"> दुवा. परंतु मला माझ्या धाग्याचा उद्देशाचे विस्मरण होण्याची भिती वाटते आह ती अनाठायी ठरु नये म्हणजे झाले. ;)

मारवा 11/01/2016 - 20:48
मिसळपाव वर कवितामंध्ये पालीचा खंडोबा यांच्या जवळ जवळ सर्वच कविता फार आवडतात. शरदीनी यांची प्रत्येक कविता निराकार गाढव यांची एक कविता विशाल कुलकर्णी यांच्या जुन्या कविता ( सध्याच्या व विडंबने सोडुन ) फार आवडतात. एक ती कविता संजोपरावांची जुनी आवडतात

In reply to by मारवा

माहितगार 12/01/2016 - 22:41
*पालीचा खंडोबा यांचे लेखन शरदीनी, विशाल कुलकर्णी, आणि संजोपरावांच्या त्या कवितांचे दुवे मिळवता येतील का ? मी प्रयत्न केला मला निटसे जमले नाही.

In reply to by माहितगार

पैसा 12/01/2016 - 22:50
http://www.misalpav.com/user/3637/authored या दुव्यावर विशालच्या मिपावरील कविता आणि इतर सर्व लेखन मिळेल. त्याचा उत्कृष्ट ब्लॉग आहे. मध्यंतरीचे काही लेखन मिपावर नाही. ते तिथे मिळेल. शरदिनीच्या कविता म्हणजे नुसते एकापुढे एक ठेवलेले नादमय शब्द असतात हे माझे वैयक्तिक मत. जुने संतसाहित्य वगळून अर्वाचीन सर्वोत्कृष्ट मराठी कविता शोधायला गेले तर कुसुमाग्रज आणि बा.भ.बोरकर ही हिमालयाची शिखरे. बाकी चांगले लिहिणारे होते, आहेत तसे. पण या दोघांपुढे मग सगळ्याची उंची मोजली जाते. बघितले तर मला आचार्य अत्र्यांची झेंडूची फुलेही आवडतात आणि इंदिरा संतांच्याही कविता आवडतात. कधी ग्रेस, तर कधी आरती प्रभू. वेळोवेळी बरेच काही आवडत असते. एकदम याद्या करणे तसे कठीणच.

In reply to by पैसा

माहितगार 13/01/2016 - 00:05
निव्वळ काथ्या कुटण्यात वेळ घालवताना कितीतरी चांगल वाचायचे सुटून गेले आहे हे लक्षात येते. सर्वांना सर्वच कवितांचे वाचन शक्य होते असे नाही त्या शिवाय काव्य लेखनातील टप्पे वगैरे लक्षात यावेत असाही एक अंतस्थ हेतु. विनोदा पेक्षा कवितेस अधिक स्थायीत्व असते तरीही स्थल-काल-व्यक्ती परत्वे काय अधिक आवडले यात फरक पडतोच. सहज आठवले म्हणून, 'शुभम करोती कल्याणम' हे मला आजही भारतीय संस्कृतीने दिलेले सर्वोत्कृष्ट काव्या पैकी एक वाटते, पण एक प्रश्न विचारायचा राहून जातो ते संस्कृत आहे का मराठी ? आणि त्याचे कवि अथवा कोणत्या ग्रंथातून ते आले असावे ?

In reply to by पैसा

माहितगार 13/01/2016 - 00:15
सर्वोत्कृष्ट कवितां निवडीचा विचार मनात येण्याचे एक कारण हेही की आपल्या शालेय जिवनात आणि घरात आसपास ऐकु येणार्‍या वाचनात येणार्‍या काव्यातून खूप काही मिळाले आहे, हे नव्या पिढीत दिसत नाही, किमान कोणत्या कविता नवीन पिढी पुढे ठेवता येतील कोणत्या कवितांचे अनुवाद मराठी ते इंग्रजी घडवले तर इंग्रजाळल्ल्या पिढीला मराठी काव्याची ओळख वाढण्यास मदत होईल असाही एक विचार आहे, असो.

आदूबाळ 11/01/2016 - 21:42
आणखी एकः झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु | सूड http://www.misalpav.com/node/31370

सतिश गावडे 11/01/2016 - 22:48
अविनाश ओगलेंचं पर्जन्याष्टक त्यातलं हे अप्रतिम पहिलं कडवं:
खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या तसा मी खिडकी बंद करायला धावलो... तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला! दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस. पावसात भिजलेली तू तुझी आर्जवी ओंजळ ओंजळीत विरघळणा‍र्‍या गारा... मी पहातच राहिलो- पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!

In reply to by सतिश गावडे

माहितगार 12/01/2016 - 22:51
एक चांगली कविता वाचण्याचा योग आला. पहिले कडवे छान आहेच सहावे कडवे कवितेचा अर्थपूर्ण क्लायमॅक्स खरेचं ग्रेट आहे, पण मला वाटते तो संपूर्ण कविते सोबतच वाचावयास हवा जरुर वाचावा, काव्य वाचनाची मजा जाऊ नये म्हणून येथे देत नाही.

In reply to by स्पा

माहितगार 12/01/2016 - 22:59
या दोघांच्याही कविता वाचण्याचा योग अद्याप आलेला नाही. पण आता वाचेन * मिका म्हणजे प्रेषक, मिसळलेला काव्यप्रेमी बरोबर ना ? त्यांच्या लेखनाचा दुवा * चाणक्य यांच्या लेखनाचा दुवा

माहितगार 12/01/2016 - 14:26
माझे सगळ्यात आवडते गाणे/कविता म्हणजे मंगेश पाडगावकरांची "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" चाल आणि गाणी लक्षात राहणे हा माझा स्वभाव नाही परंतु त्याला अपवाद ही कविता नुसती वाचली तरीही अरुण दातेंचा आवाजातल गाण आपसूक आठवते, मी हे गाणे आवडीचे असूनही रेकॉर्ड करून/घेऊन कधीच ऐकले नाही.(आठवणीतील गाणी संस्थळावरील उल्लेखानुसार संगित यशवंत देव यांचे आणि राग खमाज) अचानक कधीतरी ऐकु येणारा या गाण्याचा सूर आणि जीवनाचा मोह घालणारे, जीवनाची पुन्हा उभारी देणारे हे जीवन सुंदर आहे असे सांगणारे शब्द चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती ते या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी अर्थात पहिली ओळ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि शेवटची ओळ इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.. यातील पिंपळपान हे रुपक बर्‍यापैकी कविंच्या कवितांमध्ये येत असावे असे गुगलल्यावर दिसते. विकि आणि ज्ञानकोशीय संकेतांचे पालन होण्यासाठी बर्‍याचदा आपली भूमिका कठोरपणे मांडण्याचा प्रसंग मराठी विकिपीडियावर बर्‍याचदा येतो; पिंपळपान हे रुपक असलेल्याच कवयित्री इंदिरा संतांच्या माझ्या आवडत्या दोन ओळी मी मराठी विकिपीडियावरील माझ्या सदस्य पानावर लावलेल्या आहेत त्या अशा कातरवेळेवरती थबकून, ऐकतील जर पिंपळपाने उत्तरातला कडू गोड मध, शोषतील ती तीक्ष्ण सुईने पिंपळपान हे रुपक कुणी विवीध कवितांच्या माध्यमातून उलगडून दाखवले तर वाचण्यास आवडेल. तसेच वैदर्भीय कवि ज्ञानेश वाकुडकर यांच्या मनाचा खुलेपणा जोपासण्याचे आव्हान अगदी चपखल वर्णन करणारी खालील चारोळी सुद्धा मला आवडते तीही मी माझ्या विकि-सदस्य पानावर क्वोट करता यावी म्हणुन वाकुडकरांची फेसबुकव्यनिच्या माध्यमातून खास परवानगी घेतली होती.
खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर (१०/०६/२०१२)
मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? या विषयावर मी लावलेली मिपा धागा चर्चा मात्र अद्यापही प्रतिसादांसाठी ताटकळते आहे, असो.

In reply to by माहितगार

माहितगार 12/01/2016 - 14:52
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे बद्दल अजून लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीए.
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
जीवनातल एक एक दु:ख जिवंताणी मनाला मरणप्राय यातना देऊ शकते, पाडगावकर अशी अनंत मरणप्राय दु:ख्खे इथल्या जगण्यासाठी झेलण्याचा विश्वास जागवतात. प्रत्येक काळ्याकुट्ट ढगालाही सोनेरी किनार असते असे म्हणतात तेच विचार पाडगावकर ' काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली' अशा मस्त शब्दात मांडतात; अशी 'अनंत मरणे झेलुन घ्यावी' असे मानवी जिवनात काय आहे याचे सुरेख उत्तर पाडगावकरांनी कवितेतून आधीच दिलेले असते. मानवी हळव्या स्मृतींची ओढ "फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे" आणि "बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते" या ओळीतून व्यक्त होते. तुमची प्रिय व्यक्तीची सोबत अनुपस्थीतही कशी असते याचे वर्णन पाडगावकर "बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते, वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते, नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे" या ओळीतून करतात. आणि नाती दु:ख्ख या सर्वांच्या पलिकडे जाऊन "रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?" "सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे" तुमची सोबत करणार्‍या निसर्गाची आणही कवि देतो. मस्तचं

माहितगार 12/01/2016 - 15:30
बालकवींची 'आनंदी आनंद गडे' आणि साने गुरुजींची 'खरा तो एकचि धर्म' मराठी काव्य वेलीवरची सर्वात मधूर फळांपैकी असावीत. 'खरा तो एकचि धर्म' लिहिताना सानेगुरुजींंच्या बॅक ऑफ माईंड बालकवींची 'आनंदी आनंद गडे' सुद्धा राहीली असू शकेल का ? खरा तो एकचि धर्म मध्ये साने गुरुजी म्हणतात ..... भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे आणि आता बालकवींच्या 'आनंदी आनंद गडे' च्या कवितेतील या ओळी पहा स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ || या ओळींना साने गुरुजींच्या ओळी काही सांगताहेत असे वाटते का ? एनी वे 'आनंदी आनंद गडे' आणि 'खरा तो एकचि धर्म' या दोन्ही कविता कुणाला च्योप्य पेस्त कराव्या वाटल्यातर तसे हरकत नाही कारण बालकवी आणि साने गुरुजी दोघांचेही साहित्य प्रताधिकार मुक्त आहे.

होबासराव 12/01/2016 - 17:08
http://www.misalpav.com/node/30460?page=2 हा योगायोग म्हणावा कि काय ! आजच हि कविता शोधत होतो and now Nominating for the best मिपा कविता. @चिमण आठवते ना रे हि कविता :)) थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू!

विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही झुरते बन माडांचे, आणि शुक्रतारा भरतीचे स्वप्न बघत, विकल का किनारा रंग रंग विरले रे, खिन्न दिशा दाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही सांजवेळ, संथ डोह, हाक जीवघेणी शब्दाविण डोळ्यांनी, वाचिली कहाणी तो वेडा स्पर्श काय, छळिल रे तुलाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही का, चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी का जपले दवहळवे, गीत तुझ्यासाठी सूरसूर बुडले रे, अदय या प्रवाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही सूर मनांतिल कधिही, आणु नये ओठी लावु नये जीव असा, कधिच कुणासाठी निर्माल्यच ये करात, गंध उडुन जाई विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही मंगेश पाडगावकर प्रेम कविता म्हणुन मला ही मंगेश पाडगावकरांची कविता खुप आवडते. राग आला की ही कविता माझ्या अंगात येते. काही भेटू नको्स बोलू नकोस. विसरुन जा मला. विसर सर्व घडलेलं. जीव लावू नकोस. सांजवेळ नको, सांजवेळीचे ते हातातले हात नको, भेटीच्या आठवणी नको, तो स्पर्श नको, या जन्मातच आपलं जमत नै तर पुढच्या जन्माच्या गोष्टी कशाला. तुझं गाणं नको, तुझे सूर नको, उगाच भेटलो. मी तुझा कोणी नाही अन तु माझी कोणी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/01/2016 - 22:07
पाडगावकरांच्या (तशा कुणाही कविच्या) कविता कधी कविता संग्रह घेऊन वाचणे झाले नाही, शालेय अभ्यासक्रमातील आणि लोकप्रीय गाण्यातील काव्य अधिक सहज माहिती पडते. पाडगावकरांची आपण उल्लेखलेली अर्ध्यावरती डाव मोडला, या जन्मावर अशी विवीध गीते पाडगावकरांनी लिहिली पाडगावकरांच्या प्रेम गीतांना काही विशीष्ट संगती वगैरे आहेत का ? की त्या रँडमच आहेत ?

In reply to by माहितगार

मला वाटतं अशी काही संगती नाही. आणि ती बर्‍याच कवींच्या कवितेतही नसते. नवकवीच्या कवितेत तसं असू शकतं. आता कवितेचा विषय निघाला म्हणजे तुम्ही काढला ( तुम्हाला लोकांना कामाला लावायचा बेक्कार नाद आहे) म्हणुन मी कवी अनिल यांचा दशपदी काव्यसंग्रह चाळायला घेतला. (वाचायला नाही) कविता चाळतांना असं लक्षात आलं की विशिष्ट अशी कवितांची संगती नाही. 'एक दिवस' अशा शीर्षकाची कविता सुरु झाली ती प्रेम कविता आहे. चार ओळी पेश करतो. (तुम्ही काय इतकं सहज थोडी सोडाल) जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो कधी अधूनमधून केव्हा लागोपाठे भेट देतो अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास घर उदास बाग उदास लता उदास फुले उदास वाट्ते आयुष्य अवघे चार दिसांचेच झाले. आता ही कविता पूर्ण झाली की दुसरी कविता 'आणीबाणी' या शीर्षकाची आहे. तीही प्रेम कविताच आहे. त्यानंतरची कविता 'तळ्याकाठी' आणि 'खेळणी' या वेगळ्या आशयाच्या कविता आहेत. आपल्याला शुभ रात्री म्हणण्यापूर्वी मला त्यांची आवडलेली एक कविता डकवतो. आपण अनेकदा ती ऐकली आहे. पण ही अनिलांची कविता आहे हे अनेकांना माहित नसेल म्हणुन पुन्हा चार ओळी. वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो मिसळुन मेळ्यात कधी एक हात धरुनि कधी आपलीच साथ कधी करित चाललो. शुरा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/01/2016 - 23:51
वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो मिसळुन मेळ्यात कधी एक हात धरुनि कधी आपलीच साथ कधी करित चाललो.
मस्तचं लहानपणी मोठे लोक हे गाणे का गुङगुणतात हा प्रश्न पडत असे समजायला लागले तसे तसे हे गाणे आवडू लागले. :) हे गाणे कवि अनिलांचे आहे हे माहित नव्हते. इतर वाचकांच्या माहितीसाठी आत्माराम रावजी देशपांडे ( म्हणजे कवि अनिल) यांच्या बद्दलचा मराठी विकिपीडियावरील लेख दुवा.

बोका-ए-आझम 12/01/2016 - 21:56
मज कृष्ण भेटला नाही ही अप्रतिम कविता; विशाल कुलकर्णींची ' अरे पांडुरंगा '; त्याचं टवाळ कार्टा यांनी केलेलं ' अरे पांडुब्बा ' हे विडंबन; पालीचा खंडोबा यांच्या जवळपास सर्व कविता; शरदिनींची डुडुळगावचा गोलंदाज; एक एकटा एकटाच यांची पण आई म्हणते की या काही अफाट कविता आहेत. पण मला मिपावरचं आणि तसंही गद्य लिखाण जास्त आवडतं. कविता समजत नाहीत आणि करताही येत नाहीत.

In reply to by प्रचेतस

माहितगार 12/01/2016 - 23:12
आत्मबंध यांचे काव्य अद्याप वाचण्यात आले नाही, आता वाचेन. * आत्मबंध यांच्या लेखनाचा दुवा

सूड 12/01/2016 - 22:55
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल! अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल! मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर; तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल! विसरशील सर्व सर्व अपुले रोमांचपर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल! सहज कधी तू घरात लावशील सांजवात; माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल! जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल! जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत, माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुद; माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

In reply to by सूड

माहितगार 12/01/2016 - 23:17
प्रथमच वाचली, छान आहे. कवि सुरेश भट हो ना ? त्यांच्या संस्थळावरील कवितेचा दुवा. कॉपीराइटच्या दृष्टीने रसग्रहणाशिवाय पुर्ण कविता कॉपीपेस्ट योग्य नव्हे तेव्हा काही कडवी ठेऊन उर्वरीत कडवी कापलेली योग्य राहील असे वाटते.

मरवा पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे; पिसाहुनी सुकुमार काहिसे देता घेता त्या थरारे. मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला; देता घेता उमटे काही, मिना तयाचा त्यावर जडला. असेच काही द्यावे... घ्यावे... दिला एकदा ताजा मरवा देता घेता त्यात मिसळला गंध मनातिल त्याहून हिरवा - इंदिरा संत (कवितासंग्रह = मेंदी)

बोका-ए-आझम 13/01/2016 - 11:14
रक्तामध्ये ओढ मातीची मनात मातीचे ताजेपण मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन ही सुंदर कविता आहे. माहितगार साहेब, मोदकभौंनी आम्हा घरी धन नावाचा धागा सुरु केला होता. त्यावर अनेक कविता आहेत.

१. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा उडत चालले टणाटणा २. गणपत वाणी बिडी पितांना चावायचा नुसती काडी ३. देणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने घेत जावे. ४. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी ५. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील ६. किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. ७. ने मजसी ने परत मातृभूमीला ८. जयो स्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे ९. दिवस सुगीचे सुरु जाहले ... ओला चारा बैल माजले १०. श्रावण मासी हर्ष मानसी

(कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :)) ही (कंसातली) अट नस्ती तर माझीच्च्च कविता ब्येष्टेष्ट होती. पण आता जौंदे :)

माहितगार 13/01/2016 - 23:57
मंडळी विकिसंदर्भाने कॉपीराइट बद्दल लेखनात दोनचार दिवस इतरत्र व्यस्त असल्याने माझ्या प्रतिसादांना विलंब होईल. परंतु चर्चा चालू राहू द्यात, आपणा सर्वांच्या चर्चा सहभागासाठी आभारी आहे.