आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
१९ डिसेंबर १९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. भारतीय लष्कर पणजीच्या सचिवालयात पोचले तेव्हा गव्हर्नर जनरल तिथे नव्हते! त्यांच्या केबिनमध्ये कागदपत्रे पसरलेली होती आणि टेबलावर अॅचस्पिरिनच्या गोळ्या पडलेल्या होत्या. श्री. वामन राधाकृष्ण आपल्या "मुक्तीनंतरचा गोवा" या पुस्तकात म्हणतात, "विचार करून त्यांची डोकेदुखी वाढली असावी आणि त्यानी गोळ्या घेतल्या असाव्यात. पोर्तुगीजांची डोकेदुखी वाढली खरी पण गोव्यातली आणि भारतीय जनतेची डोकेदुखी मात्र कमी झाली."
भारताचे तेव्हाचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन म्हणाले, "आम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली. सामोपचाराची बोलणी केली. संधी दिली आणि अखेर आम्हाला कारवाई करावी लागली. कुठल्याही राष्ट्राच्या सार्वभौमत्त्वाला आम्ही बाधा आणली नाही. पोर्तुगालवर हल्ला केला नाही." पण आंतर्राष्ट्र्रीय प्रतिक्रिया मात्र अतिशय उद्बोधक होत्या! यावेळेला रशियाने अधिकृत रीत्या भारताचं समर्थन केलं, तर चीनने भारताच्या बाजूने किंवा विरुद्ध अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आयुबखान म्हणाले, "भारताचा जर फायदा होणार असेल, आणि दुसरा पक्ष दुबळा असेल, तर भारत त्याच्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहाणार नाही, हे आम्हाला आधीच माहिती होतं!!!" आफ्रिकेतल्या अनेक देशानी भारताला आपला पाठिंबा दर्शवला. लंडनमधल्या "डेली टेलीग्राफ" या दैनिकाने गोव्यात झालेल्या सत्तांतराची तारीफ केली. गोव्यातील ज्या संस्था विविक्षित जातीच्या किंवा समाजाच्या कल्याणासाठी चालवण्यात येतील, त्याना प्रशासनाकडून कोनतीच मदत होणार नाही असं गोव्याच्या प्रशासनाने जाहीर केलं.
गोवा मुक्तीपूर्वी गोव्यातील लुझो इंडियन (अर्ध पोर्तुगीज) समाजाला बर्यााच सवलती होत्या, गोवा मुक्तीनंतर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातील या भीतीमुळे गोवा मुक्त झाला हे लुझो इंडियन समाजाला आवडलं नाही. त्यांची पोरं सालाझारचा जयजयकार करत फिरू लागली पण गोव्यातील आम जनतेने त्यांचा आवाज बंद पाडला. तरी 'हेराल्ड' हे पणजीतलं पोर्तुगेज दैनिक भारतविरोधी प्रचार करतच राहिलं. हेराल्डच्या विरोधकांनी आणि हेराल्डच्या बाजूच्या लोकांनी एकाच वेळी मोर्चे काढले. पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. पोर्तुगीजांच्या खोट्या प्रचाराला उत्तर म्हणून गोव्यातील २००० हून जास्त नागरिकांनी सह्या करून युनोच्या सरचिटणिसांना एक निवेदन सादर केलं. त्यात गोव्यातील जनतेची पोर्तुगीज अत्याचारांपासून सुटका केल्याबद्दल पंडित नेहरुंचे आभार मानले होते, आणि आनंद व्यक्त केला होता.
पंडित नेहरूनी एक निवेदन केलं की, " पोर्तुगीज स्थानबद्धाना गोव्यातून इतरत्र हलवून मग गोव्यातील सैन्य काढून घेतलं जाईल. प्रजासताकदिनाला म्हणजे २६ जानेवारी १९६२ ला गोवा दीव दमण इथल्या सर्व राजकीय कैद्याना माफी देण्यात आली. तर फोंडा इथे ठेवलेल्या सर्व पोर्तुगीज युद्धकैद्याना २ मे ते १५ मे च्या दरम्यान दाबोली ते कराची विमानाने आणि तिथून पुढे पोर्तुगालाकडे बोटीने पाठवण्यात आले. शेवटच्या फेरीत पोर्तुगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल व्हासाल द सिल्व्हा हे होते. या मुक्त केलेल्या युद्धकैद्यांबरोबर लुझो इंडियन लोकही पोर्तुगालला निघून गेले.
गोवा मुक्त झाल्याबरोबर गोव्याची भाषा कोणती याबद्दल वाद चालू झाले. मराठीवादी नेते लष्करी राज्यपालाना भेटले, तर कोकणीवाद्यानी आपली परिषद घेतली. तसंच गोवा कुठल्या राज्यात समाविष्ट करावा याबद्दलही चर्चा सुरू झाल्या. या वादात महाराष्ट्र आणि कर्नाटकानेही उडी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्या कुंपणावरच्या जागेवरून म्हणाले "विलीनीकरणाचा प्रश्न सध्या नको." तर म्हैसूरचे मुख्यमंत्री कंठी म्हणाले, " गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातले अधिकारी नेमू नयेत." गोव्याचे वेगळे अस्तित्व राहिले पाहिजे असं वाटणारा एक गट गोव्यात मूळ धरत होता, तर नॅशनल काँग्रेस (गोवा) या संस्थेला गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा असं वाटतं होतं. या संस्थेने तसा ठरावही ११ मार्च १९६२ या दिवशी केला. गोवा, दमण आणि दीव या प्रदेशात जन्मालेल्या लोकाना भारताचे नागरिकत्व दिल्याची घोषणा भारत सरकारने ९ एप्रिल १९६२ या दिवशी केली.
गोवा मुक्त झाला तरी अजूनही गोव्यात प्रवेश करायला परवाना लागत होता. हा परवाना म्हणजे नागरिकत्वाचा आणि भारताच्या एकात्मतेचा अपमान आहे असं म्हणून १० मे ला आपण परवाना न घेता गोव्यात जाणार असं मधू लिमयेनी जाहीर केलं. मधल्या संक्रमण काळात समाजविघातक लोकांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून ती व्यवस्था होती असा खुलासा केंद्र सरकारने केला. १० मेला ठरल्याप्रमाणे श्री मधू लिमये परवान्याशिवाय गोव्यात आले आणि लागलीच केंद्र सरकारने परवाना पद्धत बंद केली. ७ जून १९६२ ला लष्करी राजवट संपली आणि श्री टी शिवशंकर यानी गोव्याचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कारभाराची सूत्रे हातात घेतली. याच दरम्यान गोवा मुक्तीसाठी लढलेल्या नॅशनल काँग्रेस (गोवा) या संघटनेच्या समितीने गोव्याचे वेगळे अस्तित्व ठेवावं आणि मराठी व कोकणी दोन्ही भाषांना गोव्यात उत्तेजन मिळावं असं निवेदन पंतप्रधान पं. नेहरू याना दिलं. गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं की महाराष्ट्रात सामील व्हायचं यावरून चर्चा सुरूच होत्या.
२१ फेब्रुवारी १९६३ ला संसदेत केंद्रशासित प्रदेशाना कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ देणारं विधेयक आलं आणि गोव्यात विधानसभा आणि मंत्रीमंडळ येणार हे स्पष्ट झालं. नॅशनल काँग्रेस (गोवा) ही संघटना ज्या हेतूने स्थापन झाली होती, तो आता साध्य झाला होतात्यामुळे ती विसर्जित करून गोव्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शाखा स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. पुरुषोत्तम काकोडकर हे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले. २० मे १९६३ ला पं नेहरू गोव्यात आले. "गोव्याचे वेगळे अस्तित्व ठेवावे असं आमच्या सरकारने ठरवलं आहे, आणि या निर्णयाविरुद्ध चळवळ केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही." असं त्यानी सांगितलं.
यावेळेला एक आगळी घटना घडली. पंडितजी मंगेशीच्या देवळात गेले होते. गोव्यात हरिजनांना सगळ्या मंदिरात प्रवेश अजूनही मिळत नाही. पंडितजी देवळात जात असताना 'आम्हाला मंदिर प्रवेशाला मदत करा' असे बोर्ड घेऊन काही हरिजन देवळच्या रस्त्यात उभे होते. पंडितजीनी त्यावर काही प्रतिक्रिया त्या वेळी दिली नाही. पंडितजी देवदर्शन घेऊन परत येत असताना एक हरिजन पंडितजीना म्हणाला," पंडितजी आपका दर्शन हुआ, भगवान का दर्शन नही हुआ." पंडितजी त्याला म्हणाले, "मैं आपसे सहमत हूँ." या वेळी "हरिजनांना मंदिर प्रवेश करू द्या" असं पंडितजीनी म्हणायला पाहिजे होतं असं अनेक लोकांना वाटलं. हे एक गालबोट वगळता पंडितजींचा गोवा दौरा यशस्वी झाला.
याच दरम्यान प्रजासमाजवाद्यानी गोव्यात आपली शाखा स्थापन केली आणि कम्युनिस्टानी 'शेतकरी पक्ष' या नावाचा एक पक्ष गोव्यात स्थापन केला. सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या नावामुळे तिकडे आकर्षित व्हायला लागली होती. यावेळी श्री दयानंद म्हणजेच भाऊसाहेब बांदोडकर हे राजकारणात नव्हते. ते एक दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले खाण मालक होते. भाऊंचा जन्म १२ मार्च १९११ चा. म्हणजेच या वेळेला ते ५२ वर्षांचे होते. काँग्रेसचे सरचिटणीस के.के.शहा पणजीला मांडवी हॉटेलात उतरले होते. आपणही काँग्रेसला मदत करावी या उद्देशाने भाऊ श्री के.के. शहा याना भेटायला मांडवीत गेले. या वेळेला शहा काही लोकांशी चर्चा करत होते. भाऊना कोणी बसा सुद्धा म्हटले नाही. ते थोडा वेळ ताटकळत बाहेर उभे राहिले. एवढ्यात बा.द. सातोस्करानी भाऊंना बाहेर उभे असलेले पाहिले. त्यानी भाऊना लगेच शहांकडे नेलं. पण आता भाऊसाहेब चिडले होते. ते म्हणाले, "मी काँग्रेसला मदत करायला आलो होतो, पण मला काँग्रेसमधे अशी वागणूक मिळणार असेल, तर तुम्ही सामान्य लोकांना कशी वागणूक द्याल हे समजलंच."
गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईतील काही लोकांनी 'महाराष्ट्रवादी' पक्ष स्थापन करायचं ठरवलं होतं. भाऊसाहेबांनी या पक्षाला सर्वतोपरीची मदत केली आणि ६ मार्च १९६३ ला म्हार्दोळ इथे 'महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षा'ची स्थापना झाली. खरं पाहता गोव्यातील भा.रा. काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात विलीनिकरण करण्याचा विचार असलेली मंडळी बहुमतात होती, पण पंडितजींच्या भूमिकेमुळे त्यांना जाहिरनाम्यात तसं म्हणता येईना! गोव्याचे महाराष्ट्रात विलीनिकरण होऊ नये असं बहुसंख्य ख्रिश्चन लोकांना वाटत होतं. त्यांच्यापैकी काहीनी एकत्र येऊन युनायटेड गोवन्स पक्ष स्थापन केला. गोव्यातलं पहिलं मराठी दैनिक 'गोमंतक' २४ मार्च १९६२ ला सुरू झालं तर पहिलं इंग्लिश दैनिक 'नवहिंद टाईम्स' १८ फेब्रुवारी १९६३ ला सुरू झालं. अशातच निवडणुका जाहीर झाल्या.
एस. एम. जोशी नेते असलेल्या प्रजासमाजवादी पक्षाबरोबर मगोपने युती करून निवडणूक लढवली आणि २८ पैकी १४ जागा जिंकल्या. २ प्रजासमाजवादी जिंकले आणि युनायटेड गोवन्स चे १२ जण निवडून आले. कोंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.या निवडणुकीएत एक मजेशीर गोष्ट घडली. काँग्रेसचं प्रचारसाहित्य घेऊन वसंतराव नाईक गोव्यात आले, आणि राहिले ते भाऊसाहेबांच्या घरी! काँग्रेसच्या कमिटीत याला आक्षेप घेतला गेला. त्यावर वसंतराव नाईक म्हणाले," भाऊसाहेब माझे मित्र आहेत. त्यांच्या घरी रहाणे म्हणजे मगोप चा प्रचार नव्हे!" तर मगोप विजयी होताच भाऊसाहेब 'कोणाला मुख्यमंत्री करावे' याचा सल्ला घेण्यासाठी धावले ते वसंतराव नाईकांकडे! काँग्रेसच्या वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री होण्यासाठी मगोपच्या भाऊसाहेब बांदोडकरांचे मन वळवले.
२० डिसेंबर १९६३ ला भाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याचं पहिलं मंत्रीमंडळ स्थापन झालं. मगोपचा विजय हा विलीनीकरणवाल्यांचा विजय अशी घोषणा भाऊसाहेबांनी केली. तर काँग्रेसच्या नेत्यांनी विलीनीकरणाचा प्रश्न १० वर्षे पुढे ढकलावा अशी भूमिका घेतली. युनायटेड गोवन्सने विलीनिकरण नकोच अशी भूमिका घेतली. वास्तविक निवडून येताच ६ महिन्यात मगोपच्या सर्व आमदारानी राजीनामे देऊन राजकीय पेचप्रसंग निर्माण करायचा असं निवडणुकांपूर्वीच ठरलं होतं. पण कुठेतरी माशी शिंकली आणि मगोपचं सरकार सुरू राहिलं. २३ जानेवारी १९६५ ला गोव्याच्या विधानसभेत गोव्याचं महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावं अशा आशयाचा ठराव मंजूर झाला. तर महाराष्ट्र विधानसभेने १२ मार्च १९६५ ला गोव्याचं असं विलीनीकरण व्हावं आणि त्यानंतर गोव्याला विशेष दर्जा द्यावा असा ठराव मंजूर केला.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )/em
वाचने
15983
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
निवांत वाचण्यासारखा लेख.
सध्या केवळ पोच.
In reply to निवांत वाचण्यासारखा लेख. by प्रचेतस
असेच म्हणतो. माहितीचे उत्तम भरताड आहे, सध्या केवळ पोच. :)
In reply to निवांत वाचण्यासारखा लेख. by प्रचेतस
+१
असेच म्हणतो.
या सुंदर लेखमालेचे एक पुस्तक काढता आले तर छान होईल. किमान पक्षी सर्व लेख एकत्र करून "नमस्कार" / दिवाळी अंका सारखे बाजूस ठेवता आले तर चालू शकेल.
माहिती वाचताना गुंगून गेले. चांगली लेखमाला चाललीये. भाग फार लांबलच्क होतायत का? जरा लहान टाकता येणार नाहीत का? पंडीतजींनी सगळ्यांना देवळात प्रवेश मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचा वापर करायला हवा होता. निदान सुरुवात तरी झाली असती.
In reply to माहिती वाचताना गुंगून गेले. by रेवती
पंडीतजींनी सगळ्यांना देवळात प्रवेश मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचा वापर करायला हवादुर्दैवाने, हे कायद्याने करता येत नसावे. कारण देवळे ही तशी खाजगी मालमत्ता असतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी आमरण उपोषण सुरू केले होते. तेव्हाही अशी सरसकट (सर्व देवस्थांनात) प्रवेश-परवानगी मिळाली नव्हती. पुरीच्या मंदीरात तर इंदीरा गांधींना प्रवेश नाकारला गेला होता (पारशाशी विवाह केल्यामुळे) आता बोला!!!
In reply to मंदीर प्रवेश by सुनील
गोव्यात जी देवले पुरातन वास्तू म्हणून सरकारच्या ताब्यात आहेत ती सोडता बाकी सगळी खाजगी मालकीची आहेत. त्यांचे खूप कडक (आपल्याला विचित्र वाटले तरी) नियम आहेत. आणि हल्ली तर दक्षिणेतल्या देवळांप्रमाणे काही देवळांत ड्रेस कोड, चपला खूप लांब कुठेतरी काढून ठेवायची जागा, सभामंडपात बायकांनी एका ठराविक बाजूला बसणे असे अनेक प्रकार सुरू झालेले पाहिले आहेत. विशेष म्हणजे हे गेल्या ५/७ वर्षांत जास्त पहायला मिळत आहे.
अनेक फॉरेनर टुरिस्ट येतात त्यांना मात्र ड्रेस कोड लागू केलेला पाहिला नाही. ते पाव चड्ड्या घालून सगळीकडे फिरत असतात. तसेच भारतीय लोकांच्या अंगावर "फोटो काढू नका" म्हणून गुरगुरणारे भटजी फारेनर लोकांना मात्र गाभार्याजवळ नेऊन फोटो काढायला देतात हेही पाहिले आहे.
गोव्याचा इतका व्यवस्थित सांगितलेला इतिहास प्रथमच वाचतोय. फारच छान आणि ओघवत्या लकबीने वर्णने केले आहे.
शेवटपर्यंत उत्सुकतेने वाचले.
पुभाप्र.
लेखमाला चांगली सुरू आहेच.
गोव्याचे राजभाषा विधेयक म्हणजे सर्वांना खुष करण्याच्या प्रयत्नात कोणीच खुष नाही, असा प्रकार आहे!
कोंकणी ही राजभाषा, पण देवनागरी लिपीतील. त्यामुळे ख्रिश्चनांना हवी असलेली रोमी लिपी बाद. म्हणून ते नाराज. तर मराठीला समान दर्जा असला तरी प्रत्यक्ष राजभाषेची मोहोर नाही. म्हणून मराठीवादी नाराज!
असो, हा वाद आता पिढ्या न पिढ्या सुरू राहणार, असेच दिसते!
पुभाशु
हा भाग चांगला उतरला आहे. गोव्याच्या स्वातंत्रोत्तर कारभाराचा (प्रगतीचा असे म्हणायचे आहे पण जीभ रेटत नाही!!)चांगला आढावा घेतला आहे.
गोव्याच्या राजकारणाची पेशालिटि म्हणजे आमदारांची पक्षांतरं! पक्षांतरबंदी कायदा यायच्या आधी तशी सर्वच राज्यात थोडीफार पक्षांतरं होत पण गोव्यातली पक्षांतर एक वेगळ्याच अद्वितीय लेव्हलवर होत असत. आमदार पक्षांतर हे वैयक्तिक लाभासाठी करतात पण बर्याच वेळा त्याला तोंडदेखला का होईना पण तात्विक मुलामा लावतात. पण गोव्यात मात्र बिंदास आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारची पक्षांतरं होत. त्यावेळेस श्री. सादिक अली हे गोव्याचे नायब राज्यपाल होते. तेंव्हा गोमंतक ह्या गोव्याच्या प्रमुख वृत्तपत्रात आलेला "अलीबाबा आणि चाळीस चोर" (गोव्याच्या विधानसभेत चाळीस आमदार आहेत!) ह्या शीर्षकाचा अग्रलेख अजून आठवतो!!!:)
खरं तर आजही गोव्याला श्री. मनोहर पर्रीकरांसारखा शिकलेला आणि कळकळीचा नेता लाभलेला आहे. पण त्याचा उपयोग करून घ्यायचं गोवेकरांच्या मनी येत नाही हे दुर्दैव!! असो.
In reply to हा भाग चांगला उतरला आहे. by पिवळा डांबिस
दुरुस्ती: ती स्मायली ही दुसर्या परिच्छेदाच्या अखेरीस हवी ती चुकीच्या ठिकाणी पडली आहे, पण स्वसंपादनाची सोय नसल्याने तशी मानून घ्यावी....
In reply to दुरुस्ती by पिवळा डांबिस
घ्या काका!
In reply to घ्या काका! by स्पंदना
धन्यवाद.
वाचते आहे..
स्वातंत्र्यानंतरच्या गोव्याचा अतिशय रोचक आणि तपशीलवार इतिहास मांडण्यासाठी टीम गोवाला धन्यवाद.
हा भाग पण सुंदर आहे. वाचन खुण म्हणुन साठविला आहे
हाही भाग बराच माहितीपर(तुम्ही लोक ललित म्हणत असलात तरी.).
बाकी कोकणी आणि मराठी ह्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणार्या भाषांत मध्ये असली भपूर्वीपाहून आश्चर्य वाटलं.
(माझे कोकणी मित्र मराठी बोलू लागले तर त्यांची मातृभाषा मराठी नाही* हे ओळखणं अशक्य ठरावं.)
.
मराठी आणी कोकणी वेगळ्या आहेत हे ह्यात गृहितक आहे.
In reply to वाचतोय... by मन१
भाषांमधल्या जवळिकीबद्दल एक लेख पुढे येणार आहे. सुरुवातीला बरीच वर्षे कोंकणी ही मराठीची बोलीभाषा समजली जात होती. शाळांमधे शिक्षणाचे माध्यम आणि पत्रे वगैरे लिखित दस्तावेज मराठीत तर रोजच्या बोलण्यात कोंकणीचा उपयोग अशी विभागणी सुरुवातीपासून होती. अजूनही गोव्यातले बहुसंख्य लोक मराठी माध्यमाच्या शाळांना पसंती देतात. तुझ्या बरोबरचे कोंकणी लोक मराठी चांगले बोलतात याचे कारण ते मराठी माध्यमात शिकले असणार हे आहे.
वैर हे भाषांमधे कधीच नसतं. तर वादांचा गैरफायदा घेणार्या वृत्ती असे वैर विनाकारण तयार करतात आणि वाढवतात.
In reply to कोंकणी मराठी by पैसा
प्रसिद्ध लिंग्विस्ट एस एम कत्रे यांनी "फॉर्मेशन ऑफ कोंकणी" हे पुस्तक लिहिल्यावर कोंकणीची एक वेगळी भाषा म्हणून ओळख जास्त पक्की झाली असे वाचलेय.असो.
अवांतरः मराठीमधील सर्वांत जुना शिलालेख म्हंजे श्रवणबेळगोळचा
"श्री चावुंडराजें करवियलें | श्री गंगराजे सुत्ताले करवियलें |" हा लेख होय. कोंकणी भाषेच्या विकी आर्टिकलवर काही मूर्खांनी हा शिलालेख कोंकणी भाषेतील आहे असे लिहिलेय, मी दोन-तीनदा त्याचे मराठी केले तरी ते नंतर कोंकणीच केल्या गेलेय. अधोरेखित शब्दांमुळे तो लेख कोंकणी आहे असे त्यांना वाटते. अवघड आहे.बाकी अजूनही गमतीजमती आहेत त्या पेजवर.
In reply to प्रसिद्ध लिंग्विस्ट एस एम by बॅटमॅन
अस्सल कोंकणीवादी तो लेख कोंकणी भाषेत आहे असं समजतात. महाराष्ट्री प्राकृतपासून मराठी आणि कोंकणी उद्भवल्या असा एक समज आहे. कोंकणी शौरसेनीला जास्त जवळची काही वेळा वाटते. तसेच कोंकणी भाषेतील काही वाक्प्रयोग ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभावातील प्राकृताशी जवळीक दाखवतात. पण "करवियले" आणि "सुत्ताले" हे काही कोंकणीचे उदाहरण नक्कीच नाही.
In reply to त्याचं कारण by पैसा
महाराष्ट्री प्राकृतपासून मराठी आणि कोंकणी उद्भवल्या असा एक समज आहे.हा समज बरोबर आहे.
तसेच कोंकणी भाषेतील काही वाक्प्रयोग ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभावातील प्राकृताशी जवळीक दाखवतात.हे माहिती नाही, पण अशी उदाहरणे सिमिलर केसेसमध्ये सापडली आहेत. महाराष्ट्री प्राकृताची एक ब्रँच कोकणात गेली, डोंगराळ प्रदेशामुळे महाराष्ट्र प्रदेशाशी दळणवळणास तादृश अडथळा असल्याने मराठीभाषकांपेक्षा समुद्रमार्गे गुजराती किंवा अन्य भाषकांशी संपर्क जास्त सोपा होता, सबब ती ब्रँच पुढे एक वेगळी भाषा म्हणून विकसित झाली. तमिऴ आणि मलयाळम या भाषाद्वयींबद्दल असेच घडलेले आहे. कोणे एके काळी मलयाळम ही तमिऴची बोलीच समजत असत, नंतर मग ती हळूहळू स्प्लिट होत गेली. तीच गोष्ट बंगाली-असमिया आणि कदाचित स्पॅनिश-पोर्तुगीजबद्दल म्हणता यावी.
पण "करवियले" आणि "सुत्ताले" हे काही कोंकणीचे उदाहरण नक्कीच नाही.अच्छा, हे स्पेसिफिकलि माहिती नव्हते. माहितीकरिता धन्यवाद :)
In reply to प्रसिद्ध लिंग्विस्ट एस एम by बॅटमॅन
layman's languageमध्ये सांगतो. एक भाषा दुसरीपासून संपूर्ण वेगळी आहे का, कुठल्या जातकुळीत येते हे कळणे कर्मकठीण आहे. ते आपण भाषाशास्त्रींवर सोडूयात.
मी इतकेच म्हणतो आहे की समोरचा माणूस जर हळूहळू कोकणी बोलत असेल तर समोरच्या मराठी माणसाला ती कळायची शक्यता किती? बरीच असावी.(माझा तरी तसा अनुभव आहे.) किंवा मराठी माणसाला कोकणी किंवा व्हाइअसे व्हर्सा करायला फारसे कष्ट पडत नसावेत.
.
कन्नड शिकण्यापरीस मराठी माणसाला कोकणी शिकणे सोपे पडावे.
बाहेरुन येउन गोव्यात/कोकणात स्थायिक झालेल्यांचे मत वाचायला आवडेल.
.
बाकी सदर शिलालेख कोंकणी असण्याची शक्यता रोचक आहे खरी.
.
अजून एकः- मधे अजून कुठला तरी शिलालेख ह्याच्याहून जुना होता तो सोलापुरात सापडला होता ना म्हणे, त्याचे काय झाले पुढे?
In reply to हम्म... by मन१
एक भाषा दुसरीपासून संपूर्ण वेगळी आहे का, कुठल्या जातकुळीत येते हे कळणे कर्मकठीण आहे. ते आपण भाषाशास्त्रींवर सोडूयात.भाषाशास्त्रींवर सोडा, पण हे काम अगदी कर्मकठीण नाही.
मी इतकेच म्हणतो आहे की समोरचा माणूस जर हळूहळू कोकणी बोलत असेल तर समोरच्या मराठी माणसाला ती कळायची शक्यता किती? बरीच असावी.(माझा तरी तसा अनुभव आहे.) किंवा मराठी माणसाला कोकणी किंवा व्हाइअसे व्हर्सा करायला फारसे कष्ट पडत नसावेत.नक्कीच!!! वेगळी भाषा जरी असली तरी मराठीला सर्वांत जवळची संस्कृतोद्भव भाषा म्हणजे कोंकणीच आहे, त्याचे कारण दोन्ही भाषांची आई एकच आहे. :) वेगळी भाषा म्हणजे वर्षानुवर्षे फरक साठत आल्याने वेगळी झालेली एकेकाळची बोली असे म्हटले तरी चालावे. पण ज्या अर्थाने मराठी आणि बंगाली वेगळ्या भाषा आहेत त्याअर्थाने मराठी आणि कोंकणी नाहीत. मराठी आणि बंगालीची आजी-पणजी एक आहे त्यामुळे काही शब्दांपेक्षा जास्त साम्य आढळल्यास आश्चर्य वाटू शकणे स्वाभाविक आहे, तर मराठी-कोंकणीची आई एकच आहे, सबब तिथे अत्यधिक साम्य आढळल्यास आश्चर्य वाटू नये.
अजून एकः- मधे अजून कुठला तरी शिलालेख ह्याच्याहून जुना होता तो सोलापुरात सापडला होता ना म्हणे, त्याचे काय झाले पुढे?मला माहिती नाही. श्रवणबेळगोळपेक्षा जुने म्हणून एक कोल्हापूर जिल्ह्यातील चिकुर्डे गावातला एक शिलालेख आणि सातारा जिल्ह्यात सापडलेला कुणा विजयादित्य चालुक्य राजाचा एक ताम्रपट यांबद्दल वाचलं होतं. पण पुढे अजून माहिती पाहता दिसून आले, की चिकुर्डे शिलालेख निव्वळ मराठीत नाही, तर चुकीच्या संस्कृतात असून मधूनमधून मराठी-कन्नड-सदृश शब्द आहेत. आणि तो ताम्रपट संस्कृत-प्राकृतात आहे. ताम्रपट मराठीत नाही एवढे पक्के, पण भाषा संस्कृत की प्राकृत ते आता आठवत नाही, पहायला पाहिजे.
In reply to एक भाषा दुसरीपासून संपूर्ण by बॅटमॅन
मराठीतला सर्वात जुना शिलालेख शं. गो. तुळपुळ्यांच्या मते अक्षीचा गधेगाळ आहे.
शके ९३४ मधला हा शिलालेख आहे.
तुळपुळ्यांनी याचे वाचन पुढीलप्रमाणे केले आहे.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्री कोंकणा चक्री- वर्ती। स्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
याचा सारांशः
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
याच्या शेवटी गधेगाळातील शापवाणी लिहिली आहे.
उत्तर कोकणच्या शिलाहार वंशातला हा केशीदेवराय पहिला याचे दुसरे नाव अरिकेसरी हे असून हा स्वतःला पश्चिमसमुद्राधिप आणि कोंकण चक्रवर्ती असे संबोधीत असे.
In reply to मराठीतला सर्वात जुना शिलालेख by प्रचेतस
पूर्ण शिलालेखाच्या पाठासाठी धन्यवाद रे वल्ली. :)
आता, शके ९३४ म्हंजे इसवी सन ९३४+७८=१०१२. पण श्रवणबेळगोळचा शिलालेख, किमानपक्षी त्यातली पहिली ओळ तरी इ.स. ९८१ ची आहे असे वाचल्याचे आठवते. दुसरी ओळ इ.स. १११८ मध्ये लिहिली गेली असावी, कारण ज्यूल्स ब्लॉखच्या पुस्तकात श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. १११८ सालचा आहे असे लिहिलेय. पण श्रवणबेळगोळबद्दल तुळपुळ्यांचे म्हणणे काय आहे?
In reply to पूर्ण शिलालेखाच्या पाठासाठी by बॅटमॅन
तुळपुळ्यांच्या मते श्रवणबेळगोळचा शिलालेख शके १०३९ चा असण्याची शक्यता बरीच जास्त आहे.
त्यातल्या दोन्ही ओळी एकाच कालखंडात लिहिल्या गेल्या असाव्यात असे याच्या पूर्वीच्या एका वाचनावरून आणि घेतल्या गेलेल्या ठशांवरून तुळपुळे म्हणतात.
शिवाय या चामुंडराय आणि त्याचा राजा गंगराजा रचमल्ल यांचे सर्व ज्ञात ताम्रपट/शिलालेख बहुधा कन्नड वा तेलगूत आहेत. (पण मी याबाबत ठामपणे सांगू शकत नाही)
In reply to तुळपुळ्यांच्या मते by प्रचेतस
अच्छा, धन्यवाद :) पाहिले पाहिजे. महाराष्ट्र सारस्वतात तरी श्रवणबेळगोळच जुने आहे असे म्हणताहेत, त्यामुळे त्या इन्स्क्रिप्शनचे वाचन कुठे मिळाले तर पाहतो. च्यायला उगी विसंबून रहायलाआ नको बाकी कुणावर, बघतोच थांब आता. :) "आक्षी" ब्येस ;)
कन्नड शिकण्यापरीस मराठी माणसाला कोकणी शिकणे सोपे पडावे.>>>
याचं कारण खूपच सरळ आहे.कन्नड ही 'द्रविडियन' कुटुंबातील भाषा आहे.मराठी व कोंकणी 'इंडो-आर्यन' आहेत.
'फॉर्मेशन ऑफ कोंकणी' मध्ये कत्रेसरांनी कोंकणीच्या उत्पत्तीच्या दृष्टीने विचार केलेला आहे.ध्वनिविचार्,शब्दविचार अशा गोष्टी त्यात मांडल्या आहेत. आणि या आधुनिक इंडो-आर्यन भाषेचा उगम कुठल्या मध्य इंडो-आर्यन प्राकृतांपासून झाला तेही मांडले आहे. पण तरीही मी म्हणेन की 'ती मराठीची बोली आहे का' यावरचं त्यांचं मत हे अभ्यासपूर्ण असलं तरी व्यक्तिगत मत आहे.कारण भाषाशास्त्राकडे बोली आणि भाषा यांची कोणतीही काँक्रीट व्याख्या नाही. त्यांनी कोंकणीला भाषा मानून तिचा अभ्यास केला. पण अन्य कुणी तिला बोली म्हणूनही ते करू शकेल. आणि दोघांचंही मत भाषाशास्त्र तेवढंच ग्राह्य मानेल.
याचं कारण खूपच सरळ आहे.कन्नड ही 'द्रविडियन' कुटुंबातील भाषा आहे.मराठी व कोंकणी 'इंडो-आर्यन' आहेत.
हा या खालील वाक्याला प्रतिसाद होता..
कन्नड शिकण्यापरीस मराठी माणसाला कोकणी शिकणे सोपे पडावे.
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना टीम गोवा तर्फे धन्यवाद!
पुढचा भाग http://www.misalpav.com/node/23826
निवांत वाचण्यासारखा लेख.