मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न

रमताराम · · काथ्याकूट
(अलिकडेच मिपाकर चित्रगुप्त यांनी मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल चर्चा करणारा धागा काढला होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन निळोबांनी 'मृत्यूसमयीच्या व्यवस्थेबद्दल' चर्चा करणारा धागा काढला आहे. इजा झाला, बिजा झाला तर तिजा म्हणून मृत्यूपश्चात जीवनाबद्दल आपण धागा काढावा नि आपले अनेक दिवस मळमळणारे प्रश्न भळभळून विचारून टाकावेत असा विचार करून हा धागा टाकला आहे.) मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही (साला त्याबाबत वाद घालण्याची हुशारी पण आपल्यात नाही). पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष (हाण तिज्यायला, हे आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ऑपरेशनल बाजूबद्दल. आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती पुनर्जन्म असतो की नाही. नि आमच्या टकुर्‍यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्ही करंटेच. पण ते असो. निदान आता प्रश्न टकुर्‍यात आलेच आहेत तर निदान त्यांची उत्तरे मिळाली तर ते नुस्कान थोडे तरी भरून काढू म्हटलं नि हे प्रश्न त्या दोघांना विचारले. पहिला प्रश्न पुरा होण्याच्या आतच आमच्यासारख्या मूर्ख माणसाला पुनर्जन्म नसावा - निदान माणसाचा नसावा - याबाबत त्या दोघांचे ताबडतोब एकमत झाले. पुनर्जन्म असतो असा दावा करणार्‍याने माझ्याकडे कीव आलेल्या नजरेने पाहिले नि म्हटले ’तू फक्त आमचे ऐकत जा, जरा तरी अक्कल येईल उगाच तोंड उघडून आपले शहाणपण पाजळू नकोस.’ तर मंडळी मित्र हे असे, आमची ज्ञाननतृष्णा तर ज़ब्ब़र, प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर चैन पडणार नाही (भूत होऊन त्या दोघांच्या मानगुटीस बसतो झालं). मग काय आयतेच सापडलात तर राम जेठमलांनीना.... आय मीन त्यांच्या दहा प्रश्न रोज विचारण्याच्या परंपरेला स्मरून यातले दहा प्रश्न - उपप्रश्नांसह - तुम्हालाच विचारून टाकतो झालं. १. मागल्या जन्मातले आठवते असेच बरेचदा कुणी कुणी दावा करत असल्याचे अधून मधून ऐकायला मिळते. ही आठवण नेहमी मनुष्यजन्माचीच कशी असते? त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते त्यांना 'लक्ष-चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळण्याची लॉटरी लागलेली असते? तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे शरीराबरोबर मनालाही लकवा भरलेले लोक अश्लील-अश्लील म्हणून ओरडू लागतील*. तसाही तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर आमचा विश्वास आहेच. * पु.लं.च्या ’रावसाहेब” मधून साभार. २. मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही? ३. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का? ३.१ समजा वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार. भारताऐवजी मी बुर्किना फासो नावाच्या देशात जन्मलो तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार की की मी भारतीय कायद्याच्या 'ज्युरिस्डिक्शन' मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार? ४. आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या बाबत असे असेल तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का? ५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते ब्वा? ५.१ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही? ५.२. मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय.) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हज्बंड-वैफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का? ६. दोन जन्मांच्या मधे भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणतो. त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे. म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी- फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी- फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत 'टीडीआर' असतो का? लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात? रिलेटिविटीला स्मरून एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या तर त्याला मनुष्य जन्म मिळतो असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का? ६.१ प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात? ७. पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हा इक्विलिब्रियम अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची पावर आहे त्याला रेकमेंड करून) 'अकाउंट क्लोज्ड' चा शिक्का का मारत नाहीत? ७.१. पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते? ७.२ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते? ७.३. वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यू.ए. देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती? ७.४. माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का? ८. मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट मिळते का? याचे उत्तर 'हो' असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर - थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर - हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही 'मोक्षपत्र' करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल? ९. फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का? १०. पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 'सिविल सोसायटी'च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे - खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले - विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने? आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर 'सास भी कभी बहू थी' सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होतेच म्हणे ) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?

वाचने 26755 वाचनखूण प्रतिक्रिया 80

शाहिर Sun, 09/11/2011 - 17:53
अख्खा लेख वाचायसाठी पुर्न जन्म घ्यावा लागेल

राजेश घासकडवी Sun, 09/11/2011 - 18:09
आता तुम्हाला सुद्धा सगळं उसकटून सांगावं लागणारसं दिसतंय. तरी बरं, तुम्ही किमान ऑपरेशन्सविषयी विचारता आहात. देवाच्या अस्तित्वाची दखल घ्यायची की नाही असले पाखंडी प्रश्न पडत नाहीयेत तुम्हाला...
नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती,
तुम्ही मांडलेल्या या व इतर बहुतेक प्रॉब्लेम्ससाठी एक सोप्पं सोल्यूशन आहे, आणि देव ते मुक्तहस्ताने वापरतो. ते म्हणजे आत्म्यांसाठी शरीरांची अदलाबदल. नवराबायको जेव्हा लग्न करतात त्याच क्षणी त्यांची शरीरं तीच रहातात, पण आत्मे बदलतात. 'लग्नाआधी तू किती चांगला होतास/होतीस' असं इतक्या लोकांना वाटतं ते उगीच का? मुद्दा काय आहे, की हे सगळे गुण-दोष, पाप-पुण्य वगैरे आत्म्याला चिकटलेले असतात, व कपडे बदलावे तितक्या सहज आत्मा शरीरं बदलू शकतो. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम रहात नाही. हे सगळं म्यानेज करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्याच्यात बग्स असतात का वगैरे गोष्टी ट्रेड सीक्रेट्स आहेत, त्यामुळे त्याविषयी काही सांगता येत नाही. आयला, नाहीतर तुम्हीच एखादं नवीन विश्व वगैरे सुरू कराल.

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते Sun, 09/11/2011 - 18:20
आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या व्यक्तीने तोपर्यंत केलेल्या पापपुण्याचा हिशेब त्या शरीरात आलेल्या नव्या आत्म्याला ट्रान्सफर होतो का?

In reply to by नितिन थत्ते

राजेश घासकडवी Sun, 09/11/2011 - 18:31
अहो, नाडीपट्टीवरचा संदेश जसा आपोआप बदलतो तसाच आत्मा बदलतो. आणि पापपुण्यं शरीरं करत नाहीत, आत्मेच करतात. त्यामुळे रेकॉर्ड आत्म्यांच्याच नावावर रहातं.

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम Sun, 09/11/2011 - 19:38
आत्मा येकदम क्लियर टायटलवाला होताय आं, एकदम चोक्कस. पाण्याने भिजत नाही, वार्‍याने वाळत नाही वगैरे विसरलात की काय? आता पुन्हा मग 'मी कोण?' अर्थात 'कोऽहं' हा प्रश्न वेगळ्या संदर्भात समोर येतो.

In reply to by नितिन थत्ते

पापपुण्याचा हिशेब त्या शरीरात आलेल्या नव्या आत्म्याला ट्रान्सफर होतो का? होतो असे म्हणतात. महानुभावीयांच्या पंचकृष्णातील श्री चक्रधरस्वामींची याबाबत अशी आख्यायिका सांगितल्या जाते. पूर्वीचे श्री चक्रपाणिराउळांनी गंगेत आपले शरीर सोडून दिले आणि दुसरीकडे भडोच येथील राजाचा प्रधान विशालदेव याचा मुलगा हरिपालदेव याचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्याचे प्रेत स्मशानात आणलेले होते तेव्हाच श्री चक्रपाणींनी थेट हरिपाळदेवाच्या शरीरात प्रवेश केला. स्मशानात हरिपालदेव जीवंत झाला. आता नुसते शरीराची थोडीच देवाण-घेवाण झाली. पाप-पुण्य, मनावर झालेले संस्कार, शरीराचे धर्म या सर्वच गोष्टींचे आदान-प्रदान झाले असेल ना ! बाकी, रमताराम यांच्या 'पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न' या चर्चेत भाग घेईनच. आपला आवडता विषय आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by राजेश घासकडवी

रमताराम Sun, 09/11/2011 - 19:40
त्याच्यात बग्स असतात का वगैरे गोष्टी ट्रेड सीक्रेट्स आहेत, त्यामुळे त्याविषयी काही सांगता येत नाही. आयला, नाहीतर तुम्हीच एखादं नवीन विश्व वगैरे सुरू कराल. म्हणजे आमची बातमी खरीच होती तर. ते कंत्राट तुमच्या कुंपणीला मिळालं होतं तर, तरीच.....

नितिन थत्ते Sun, 09/11/2011 - 18:16
१. जश्या मारवाड्याकडे हिशोबाच्य दोन वह्या असतात तश्या चित्रगुप्ताकडेही असतात का? २. चित्रगुप्ताच्या वहीतले ब्यालंन्स 'आडजष्ट' करून देण्यासाठी जे एजंट* असतात त्यांच्या खात्यावर या कामाबद्दल क्रेडिट पडते की डेबिट? * हे प्रश्न १० चे उत्तर आहे.

श्रावण मोडक Sun, 09/11/2011 - 18:47
मला नेहमी काही जण गाढव म्हणतात. यात लौकीकदृष्ट्या गाढवाचा सन्मान आहे की माझा अवमान हे मला कधीही कळलेले नाही. कारण मी तर, सर्व चराचर 'तो'चेच आविष्कार आहेत, असं म्हणतात असं ऐकून त्यावर त्याघडीला क्षणीक का होईना विश्वास ठेवतो. पण मला असं म्हणतात, कारण वैद पौरुषेय आहेत, असं मी म्हणतो. वेद पौरुषेयच आहेत, असं मला का वाटतं? तर ते ररा, घासुगुर्जी, चिंतुगुर्जींसारखे ऋषी, ३.१४ (चुकून १३ हा आकडा लिहिला होता. क्षणात लक्षात आलं म्हणून बरं. नाही तर माझेच तीनतेरा वाजले असते. तर ते असो,) अदिती यांच्यासारखी ऋषीकन्या, ऋषीपुतणी वगैरे, नाईल (हा साला आहे निळ्या, पण स्पेलिंग असं करून ठेवलंय की नाईल असं म्हटलं जातं काहींकडून आणि उगाच उच्चस्थानी जाऊन बसतो) यांच्यासारखे ऋषीपुत्र-पुतणे वगैरे मंडळींनी केलेलं लेखन. म्हणजे, या मंडळींनी केलेलं लेखन वाचूनच माझी वेद पौरुषेय आहेत या धारणेवरची श्रद्धा (आली की च्यायला हीही...) दृढ होत जाते. ;) (आता कोणी म्हणेल का, की मला आधुनिकोत्तर लिहिता येत नाही!) तर मुख्य लेखनातले प्रश्न हे वेदोत्तर प्रश्न असल्याने मुख्य विषयावर पास. ;) वरच्या लेखनात मध्येच ठळक ठसा आहे, तो केला अशासाठी की, मी उगाच फाटे फोडतोय असं म्हणण्याची काही तिरकस धावणाऱ्यांना संधी मिळू नये.

अनिवासि Sun, 09/11/2011 - 18:52
व्वा! मस्त लेख आहे. पहिले म्हणजे आपली लिहिण्याची शैली आवडली. विषयसुद्धा सुन्दर! हे प्रष्न कोणाही विचार करणार्या व्यक्तिस पडणारे असावेत. माझ्या मित्रान्बरोबर ही चर्च्या करताना 'तु पाखन्डी' असे म्हणुन विषय सपतो. पण हे विचार फक्त हिन्दु लोकानाच येतात असे नाही. दोन दिवसापुर्वी माझा गोरा कथोलिक शेजारी गप्पा मारायला (आणि तीर्थ घ्यायला) आला असताना हाच विषय नीघाला. तो दोन वेळा भारतात जाउन आला आहे आणि त्याचे इतरही भारतिय मित्र आहेत. चर्चेतुन काहिहि निष्कष्र नीघाले नाहित पण गप्पा मात्र रन्गल्या. जाता जाता एक विनोद अठवला तो: ब्रिटीश राज्य असतानाची गोस्तः गोरा सारजन्टः काळ्या शीपायाला डिवचण्यासाठी: Are you going to tell me that when I die I will come back as a Pig in the next life? Soldiers: No sir. You cannot have the same life again.

प्रियाली Sun, 09/11/2011 - 19:19
भुतांविषयी आचकटविचकट प्रश्न विचारणार्‍या आणि आम्हाला प्रिय गरीब बिच्चार्‍या भुतांवर अविश्वास दाखवणार्‍या, त्यांची टर्र उडवणार्‍या प्रवृत्तींचा तीव्र निषेध! (भूतदयाळू) प्रियाली बिल्ला क्र.१३

In reply to by प्रियाली

आत्मशून्य Mon, 09/12/2011 - 12:26
कारण वरील वाक्य हे स्त्रियांचा धडधडीत अपमान आहे, हे नम्रपणे निदर्शनास आणू देऊ इछ्चितो.

५० फक्त Sun, 09/11/2011 - 19:46
;;फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का ? ररा, हे सगळ्यात आवडलं, आहे आहे अशी सोय आहे, फक्त आपण दिवाळे जाहीर करायचे बाकीचे अकाउंट क्लोज करण्याची सोय पाहतात. बहुधा सगळ्या चित्रपटातले व्हिलन हे करत असतात, फक्त ते दिवाळे बुद्धीचे असते. संदर्भ - आदिजोशींचे मिथुनायण. बाकी प्रश्नांची उत्तरे मी खरोखर शोधतो, खास करुन लग्नासंदर्भातले प्रश्न तर नक्की याच जन्मात सोडवावे असा विचार आहे, काय पुढं मागं एखादं कार्बन क्रेडिट विकत घेतल्यासारखी सोय असेल तर बघायला हवी.

बाप रे! रमताराम साहेब...हसुन हसुन मेलो...डोळे पाणावले...काय खतरनाक प्रश्नोपनिषद आहे तुमचं?...येक इनंती हाय...हे सगळे प्रश्न धर्मशास्त्रावर प्रवचन झोडत फिरणाय्रा गूरूंना व त्यांचे समोर बसणाय्रा त्यांच्या शिष्यांना मोफत वाटा...आफत आल्या प्रमाणे ते पळून जातील...बाकी आंम्ही शंका निरसन करण्याची गरजच नाही,घासकडवींनी एका फटक्यात केस हतावेगळी केलीये.''स्रुष्टीत प्रत्येक गोष्टीला प्रथम जन्म आहे, त्या जन्मातलं पाप/पुण्य -त्यामागे जन्म नसल्यानी-कुठुन आलं?''हा प्रश्न कर्मविपाक वाद्यांना नेहमी विचारावा...अतीशय मजेशीर उत्तरं ऐकायला मिळतात... @- तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय? :-D ह्हीह्हीह्ही हाहाहाहा ...आयायाया...या वाक्यावर तर आमी हसुन हसुन लोळलो... तुमच्या विलक्षण प्रतिभेला आमचा मनापासुन सलाम... --^--

श्रीयुत रमताराम राव, तुम्ही विचारलेल्या पुनर्जन्माच्या व्यवस्थेविषयी मिसळपाव व्यस्थापन किवा त्याचे सदस्य यांचेकडे काही उत्तर आहे असे दर्शनास आले नाही.परंतु या बाबतीत अधिक संशोधन होणे हि समस्त मिपा जातीची महत्वाची गरज आहे. याचसाठी त्या लोकात जाऊन श्रीयुत चित्रगुप्त यांचेशी चर्चा करून या विषयात अधिक संशोधन करण्यासाठी मिसळपाव फौन्डेशन तर्फे तुम्हाला शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे.त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची ( VISA ,राहण्याची सोय इत्यादी.) पूर्तता पण फौन्डेशन तर्फे केली गेली आहे तरी तुमच्या सोयीनुसार प्रस्थान करण्याची दिनांक व वेळ कळवणे.तुमच्या या अमूल्य संशोधनाचा समस्त मिपा जातीला निश्चितपणे फायदा होईल अशी अशा आहे. दरम्यानच्या च्या काळात तुमचे मिपा वरील खाते अबाधित राहील,तुमच्या माघारीनंतर त्याचा ताबा आपल्याकडे सोपविण्यात येईल हि नोंद घ्यावी, धन्यवाद.

५० फक्त Sun, 09/11/2011 - 23:19
वर श्री. रमताराम यांना पडलेले प्रश्न एकदा आयडिचे पुनर्जन्म या संदर्भात वाचुन पाहिले, बरेच संदर्भ लागले बरेच लागले नाहीत, कुणाचे बरे मार्गदर्शन घ्यावे आता या विचारात आहे.

श्रावण मोडक Mon, 09/12/2011 - 09:01
ररा, ही काही उत्तरे. " १. दोन्ही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी. पटत नाही? इथल्या काही संपादकांना विचारा. खासगीत ते नक्की सांगतील. ओव्हर टू संपादक. २. कारण, आपण तसे नव्हतोच; तरीही आपल्याला या जन्मातून हद्दपार केलं गेलं, असं त्यांचं म्हणणं असतं. पटत नाही? इथल्या काही संपादकांना आणि काही जिवांना विचारा. खासगीत ते नक्की सांगतील. ओव्हर टू... जाऊ द्या. नाव घेत नाही. तुम्हाला माहिती आहे. ३. हो. तसं काही जणांच्या बाबत झालं आहे. सरसकट सगळ्यांबाबत झालेलं नाही, हे खरं. पण इथल्या चित्रगुप्तांचा प्रयत्न असतो की नव्या जन्मावेळी त्याचं पूर्वसंचित समजून घ्यावं. ते त्यांना समजतं. ३.१ अनुभव घेऊन पहा. 'म'वरून किंवा 'उ'वरून 'मि'वर या. किंवा उलटे करा. जाता-येताना तुमचं पूर्वसंचित बरोबर असतंच. ४. समाज ही गुंतागुंतीचीच चीज आहे काका. समजून घ्या. ५. अभ्यास नाही. इथल्या काही संपादकांना विचारा. खासगीत ते नक्की सांगतील. ६. ओव्हर टू प्रियाली. ती संपादकही होती, आहे. जमल्यास अदितीही तिला मदत करू शकेल. बिका आहेच. ७. यमाला त्याचं आणि चित्रगुप्ताला त्याचं काम कायम ठेवायचं असतं. हे दोघंही आपापलं रिसोर्स लोडींग स्वतःच करतात. तपशिलांसाठी संपर्क नीलकांत आणि कंपनी. ७.१ पासून पुढचे सारे उपप्रश्न. सर्किटकाका अधिक उत्तर देऊ शकतात. सध्या ते येथे नाहीत. थोडा धीर धरा. ८. ते तुमच्याच नावे राहते. त्याचा उपभोग मात्र चित्रगुप्त, यम यांनाच होऊ शकतो. सबब, येथे व्यवस्था हे एक ब्लॅकहोल असते. ९. आहे. पण तशी वेळ येऊ दिली जात नाही. त्याआधीच अकाऊंट क्लोज करण्याचा निर्णय तो प्रोजेक्ट मॅनेजर घेतो. १०. ओव्हर टू परा. " आता दोन खणखणीत अवतरणं टाकूनही हा प्रतिसाद कुणी सिरियस घेतला तर माझा इलाज नाही.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम Mon, 09/12/2011 - 09:39
आमचेही एक अवतरण. "माझ्या लिखाणाचा हेतू थोडी थट्टा थोडे महत्त्वाचे प्रश्न समोर ठेवणे असाच आहे. त्याचे अर्थ कोणी कसे लावावेत हे माझ्या हाती नाही. माझ्यापुरता खुलासा असा की जालीय घडामोडींबद्दल चर्चा करणे नि त्याबद्दल लिखाण करणे हा माझा प्रांत नव्हे. या लेखाचा हेतू तो नव्हे." सहज एक दंतकथा आठवली ती सांगतो. एक धनुर्विद्या गुरू आपल्या शिष्यांसह एका वनातून चालले होते. थोड्या विरळ जंगलापाशी आल्यावर त्यांना तेथील अनेक झाडांवर बाण मारलेले दिसले. धनुर्विद्येच्या सरावासाठी तिथे वर्तुळे काढलेली होती नि प्रत्येक बाण अचूक त्यांच्या केंद्रात शिरलेला होता. इतके अचूक शरसंधान पाहून गुरुंच्या पट्टशिष्याला - ज्याला गुरूंनी जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचे आश्वासन दिले होते - असूया वाटली. आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ धनुर्धर इथे आहे हे पाहून त्याने गुरूंना त्याची भेट घेण्याचा, तो नक्की कोण हे पहावे असे सुचवले. थोडे पुढे चालत गेल्यावर त्यांना एका भिल्लाची झोपडी दिसली. त्या भिल्लाकडे चौकशी करता ते बाण त्याच्या बारा वर्षाच्या मुलाने मारले आहेत असे कळले. सर्वांना अधिकच आश्चर्य वाटले. तो मुलगा पलिकडे थोड्या मोकळ्या जागेत धनुर्विद्येचा सराव करतो आहे असे भिल्लाने सांगितल्याने सारे तिकडे गेले. तिथे जाऊन पाहतात तर तो मुलगा आपल्या धनुष्यातून झाडांवर बाण मारत होता नि तो जिथे रुतेल त्याला केंद्र ठेवून बाजूने वर्तुळ काढत होता. त्या छोट्या पठारावर असे 'अचूक वेध घेतलेले' अनेक बाण दिसत होते. तात्पर्य, मी धनुर्धारी नाही तर बारा वर्षाच्या भिल्लाच्या पोरासारखे मी निर्हेतुकपणे बाण झाडांवर मारले आहेत, वर्तुळांवर नव्हे. वर्तु़ळेदेखील मी काढलेली नाहीत. ती इतरांनी काढली तर ते माझेच लक्ष्य होते असे समजू नये इतकेच. इत्यलम्

In reply to by रमताराम

राजेश घासकडवी Mon, 09/12/2011 - 18:00
"माझ्या लिखाणाचा हेतू थोडी थट्टा थोडे महत्त्वाचे प्रश्न समोर ठेवणे असाच आहे. त्याचे अर्थ कोणी कसे लावावेत हे माझ्या हाती नाही. माझ्यापुरता खुलासा असा की जालीय घडामोडींबद्दल चर्चा करणे नि त्याबद्दल लिखाण करणे हा माझा प्रांत नव्हे. या लेखाचा हेतू तो नव्हे."
ही असली स्पष्टीकरणं देऊन तुम्ही मिपाला जालीय बौद्धिक चर्चांचं केंद्र बनवत आहात. तुमचा हेतू भले नेक असेल हो, पण एकदा असे सूचक विषय निघाल्यावर मोडकांसारखे काही दंगेखोर आयडी त्याला भलतंच वळण देऊन जालीय अर्थ काढणारच. तुमच्यासारख्या अनुभवी आयडीला हे कळायला हवं. की तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाताय? ऑ? आयडींचे मृत्यू व पुनर्जन्म या व्यवस्थापनाच्या आधिकारिक अधिकक्षेत येणाऱ्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल तुमचा निषेध.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम Tue, 09/13/2011 - 00:33
आम्ही कोणालाही दंगेखोर कुठे म्हटले ब्वॉ. आम्ही फक्त तुमच्या मूल्यमापनाशी अथवा दृष्टिकोनाशी आमचा संबंध नाही असे म्हटले यात दंगा करण्याचा संबंध कुठे येतो बुवा? जरा - वेळ असेल तर - आमचा प्रतिसाद वाचून आमच्या प्रतिसादात तुम्हाला दंगेखोर म्हटल्याचा निष्कर्ष कुठल्या वाक्यावरून्/वाक्यसमूहावरून निघतो ते सांगा बरं जरा. म्हणजे आम्हाला आमच्यात सुधारणा करता येतील. आमच्या बोलण्याचे भलते अर्थ कसे निघू शकतात ते ही समजेल. दोन मित्रांच्या संवादात दुर्लक्ष केल्याने गमावलेले ज्ञान पुनर्साध्य होईल, दूर होईल. अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी केल्याचे पुण्यही तुमच्या पदरी पडेल.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक Tue, 09/13/2011 - 00:43
ओ, मी तुमच्या प्रतिसादावर काहीही लिहिलेलं नाहीये. जे लिहिलंय ते घासुगुर्जींच्या प्रतिसादावर. का उगाच आमच्यावर खार खाताय?

In reply to by श्रावण मोडक

रमताराम Tue, 09/13/2011 - 00:58
राजेश तुम्हाला दंगेखोर म्हणाला हे वाचलंच नाही. राजेश स्पष्टवक्तेपणाबद्दल अभिनंदन रे. (झूऽऽऽम. पळा आता).

In reply to by रमताराम

श्रावण मोडक Tue, 09/13/2011 - 01:14
घासुगुर्जी, हे बघा... हे असंच माझ्या नावानं बिलं फाडण्याचे उद्योग होत असतात. मी काही केलं नाही, तरी माझी कळ काढली. का रे बाबा, म्हणून विचारलं तर उलट तुम्ही मला घातलेल्या शिव्याच कशा योग्य हे ऐकून घ्यायचं. आता काही बोललो तर लगेच दंगेखोर म्हणायला तुम्ही मोकळे. जगावं कसं आयडीनं अशावेळी?

In reply to by श्रावण मोडक

रमताराम Tue, 09/13/2011 - 01:28
खार खाणं म्हणजे काय होऽऽ? नाही म्हणजे तुम्ही तो वाक्प्रचार वापरला आहे म्हणजे अर्थ तुम्हाला ठाऊक असावा असा समज करून घेउन विचारतोय हां. आणखी काही अवतरणचिन्हे नका वापरू आता.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक Tue, 09/13/2011 - 12:28
खार खाणे म्हणजे तेच जे तुम्ही केलंत. रागावणे! अर्थात, हे रागावणं विशिष्ट पद्धतीचं असतं. या रागावण्यात वैमनस्य नसतं. प्रेमाचं रागावणं असंही म्हणू शकता. म्हणजे, इथं हे लिहिताना तुम्ही आमच्यावर माणूस म्हणून प्रेम करता हे गृहीत धरलं आहे. त्यात चूक असेल तर क्षमस्व.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम Tue, 09/13/2011 - 13:31
त्यात चूक असेल तर क्षमस्व. ती पायात चप्पल आहे - अहिंसक चामड्याचीच आहे ना* - ती घ्या नि हाणा टकुर्‍यात आमच्या. *प्रताधिकारः पुलदे द 'तुझे आहे तुजपाशी' फेम.

In reply to by नितिन थत्ते

भिल्ल राजपुत्र रमतालव्य ह्यांनी मिपाकंटक द्रोणेश घासकडवी ह्यांच्याकडे लक्ष न देता आपले कार्य असेच चालु ठेवावे अन्यथा अंगठा गमवायची वेळ यायची. सूर्यपुत्र पर्ण

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Tue, 09/13/2011 - 17:02
बोललातच ना परुनिमामा?... तुम्ही गांधार-३० मध्ये स्वस्थ बसलात तर काही महाभारतच घडणार नाही, समजलात ना?

In reply to by राजेश घासकडवी

मुनीवर, का उगीच माझ्यावर खार खात आहात ? मी आपला त्या गरीब निरागस भिल्ल कुमाराला चांगला सल्ला दिला तो बघवला नाही का तुम्हाला ? त्यानी मारलेला बाण लक्षात तसाच राहिला आणि तुम्ही मारलेला बाण काढून टाकला गेला म्हणून का हा राग आहे? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम Tue, 09/13/2011 - 20:26
मी आपला त्या गरीब निरागस भिल्ल कुमाराला चांगला सल्ला दिला तो बघवला नाही का तुम्हाला ? श्री राजकुमार यांनी बहुमोल सल्ला दिला आहे. अशा प्रोत्साहनामुळे ज्ञानसंपादनाला आम्हाला कसा हुरूप येतो. श्री राजकुमार आम्ही या पाठिंब्याबद्दल आपले आजन्म - पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म.... बास सध्या एवढी कमिटमेंट पुरे - उपकृत राहू. तुमच्या या 'प्रश्नांशी एकनिष्ठ रहा' या संदेशाशी आजन्म - ...- प्रामाणिक राहण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन. आपला कृपाभिलाषी शिष्य - ररा गटणे

In reply to by श्रावण मोडक

राजेश घासकडवी Tue, 09/13/2011 - 16:55
मी काही केलं नाही, तरी माझी कळ काढली.
वा वा, अर्वाच्य* विषय काढून चिखलात उडी मारायची आणि मग शिंतोडे उडले की वरून मी काहीच केलं नाही असा कांगावा करायचा हा शुद्ध बालीशपणा झाला. तरी बरं, तुम्ही असलं काहीतरी करणार हे माहीत होतं, नव्हे, तसं स्पष्ट दिसलं म्हणून मुळात मी रमतारामचा निषेध केला. स्वतःचा दंगेखोरपणा तुम्हीच सिद्ध केलात. वर रमतारामवर का खार खाताय? * वाच्यता करणं विशिष्ट परिस्थितीत शिष्टसंमत समजलं जात नाही ते

मूकवाचक Mon, 09/12/2011 - 09:27
ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने? ... शांभवी हा नाथपन्थी दीक्षेचा एक प्रकार आहे. तो शब्द बहुधा 'शिवाम्बू' असा हवा होता. अलीकडेच पाणिपुरीमधे 'पराम्बू' असल्याचा एक किस्सा गाजला होता. बाकी चू. भू. दे. घे.

Nile Mon, 09/12/2011 - 11:27
हसून हसून पडलो!!! आजपासून रराआजोबा आमचे 'स्केप्टिसीस्म्'चे गुर्जी!! बाकी अशा प्रकारचे प्रश्न जर लोकांनी स्वतःलाच विचारले तर आख्खं जग एका जन्मात नास्तिक होईल!!

गवि Mon, 09/12/2011 - 11:29
मस्त प्रश्न. मनात तर बर्‍याचदा येत असतात. पण शब्दात पकडणं कठीण.. ते तुम्ही जमवून आणलंत. बाकी प्रश्न पाडून घेण्यापूर्वी आता असाच विचार मनात येतो की मुळात जगणं हे "खरं" आहे की भास? कदाचित सगळंच परसेप्शन असेल आणि ते परसेप्शन आहे याची जाणीव होणं म्हणजे मरण असेल.

आत्मशून्य Mon, 09/12/2011 - 12:08
१) - आठवत नाहीत याचं स्पष्टीकरण असं दीलं जातं की मनूष्यैतर जन्म या फक्त भोग योनी मानल्या जातात. म्हणजेच विचार वा कृती (परीणामी आत्मप्रगती साधणे वगैरे)स्वातंत्र्य फारसे नसते वेळ आली वंश वाढवा भूक लागली शिकार करा वगैरे वगैरे करत जन्म जगणे इतपतच त्याचे कार्य असते म्हणून बूध्दीमत्ता व स्मृती यांचा प्रभाव अत्यल्प असतो . मागच्या जन्म मनूष्येतर असल्याच्या स्मृती पूराण कथात दील्या असल्या तरी आधूनीक काळात असे दावे कोणी करतना दीसत नाही हे खरं.... कदाचीत आपण म्हणता तसं जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे ..... २. - काही चांगलं केलं असेल तर तेही आठवत नाहीच.. खरं सांगायच तर या जन्मातल्या कीती गोश्टी तंतोतंत आठवतात ? सर्व काही पूसटच होत जांत जसं जसं ते "इरेलेवंट" बनत जातं. थॉडक्यात रेलेव्हंन्सी फॅक्टर महत्वाचा असतो... हो उगीच कूणी (आणि एकाच वेळी) असं म्हणायला नको की मागच्या जन्मी मीच अंबानी होतो आता मला माझा पैसा या जन्मात सगळाच्या सगळा परत करा...... ३. - थोडी संकल्पना सूस्पश्ट करूया, मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग न्हवे तर मागल्या अनेक जन्मात केलेल्या पापांचे/पूण्यांचे भोग या (अथवा यापूढील) जन्मी भोगावे लागतात. तसचं देशाचं सरकार एखादी गोश्ट राबवू शकत नाही म्हणून ’कर्मसिद्धांत’ खोटा म्हणता येत नाही कारण तो त्या सरकारची मक्तेदारी नाही. जन्मठेप पूर्ण होण्या आधी कोणी पोबारा केला व पून्हा तावडीत सापडले तर सरकार त्याची शीक्षा "कंटीन्यू" करेलच पण नवीन गून्हाही दाखल होइल. पण कर्मसिद्धांत हा मूळात मागील अनेक जन्मोजन्मीच्या आचरणाशी निगडीत असल्याने आपले कैद्याचे उदाहरण त्याच्या संपूर्ण व्याप्तीमधे बसत नाही. (बाकी कर्मसिंध्दांतावर ठाम अधीकार वाणीने फक्त भगवान श्रीकृष्णच बोलू शकतात व तो समजून त्याचा संपूर्ण पडताळा घेणे फक्त अर्जूनाचे काम होय.... इतरांनी फक्त हे असे सांगीतले आहे, ते तसे म्हटले आहे याचे दाखलेच द्यावेत इतपतच सामान्य व्यक्तीची क्षमता होय) ३.१ वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असल्याने, "इक्वीलीब्रीअम" होइ पर्यंत आपल्याला जन्म घेत जाणे कॅरी-फॉरवर्ड होत राहणार. कर्मसिध्दांत व त्याची व्याप्ती ही अनेक जन्मांशी निगडीत असल्याने त्याच्या "इक्वीलीब्रीअम" संकल्पना या मानवी नश्वर परीमाणामधे सूस्पश्ट करता येतीलच असे नाही. ४. फक्त नातू/पणतूचा का ? साहेब प्रत्यक्ष श्रीकृष्णाने अर्जूनाला आपण स्त्री-पूरूष अशा वीवीध चीत्रविचीत्र नातेसंबंधातही विवीध जन्मात वीवीध रूपाने बांधले गेलो होतो (पण आता त्याची स्मृती अज्ञानामूळे नाही) असं निसंदीग्धपणे सांगीतलं आहे. यात आश्चर्यही काही नाही सहज तर्काने जरी विचार केला तर नाते संबंध हे केवळ नश्वर शरीराशीच निगडीत असतात एकदा शरीराचा संबंध संपला की आपल्या अस्तीत्वाला कोणी वडील नाही कोणी मूलगा नाही... कारण जन्म देणार कशाला, कोणाला, का आणी कोण जर शरीरच अस्तीत्वात नाही ? नाते संबंध हे शरीराच्या अधीश्टानाने सूरू होतात व लोप पावतात. जोपर्यंत शरीर आहे तो पर्यंत या गोश्टी जास्त गोंधळ करणार्‍या वाटतील.. एकदा फक्त शरीराच अस्तीत्वाच नाही याची ठळक व सूस्पश्ट कल्पना करून बघा.. आता सांगा कोण तूम्ही ? कोण तूमचा मूलगा ? कोण मीत्र ? कोण शत्रू ? कोण स्त्री ? कोण पूरूष ? कोण आइ- कोण वडील ? सगळे तूमच्या शरीरामूळेच अस्तीत्वात आले.. शरीरच नसते तर यांना अस्तीत्व आले असते ? म्हणूनच "अ‍ॅज बिग पिच्चर" आपल्याच घराण्यात पून्हा जन्मण्यात अथवा न जन्मण्यात गूंतागूंत कोणतीही नाही. ५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट का असते यावर कधी विचारच केला नाही तेव्हां आपला पास. ६.जन्म म्हणजे मर्त्य शरीर धारण करने होय व फक्त हेच काऊंट होते. इतर गोश्टी या फक्त "आलीया भोगासी" साठी असतात. त्यातली कर्मे आपल्या कारण देहास** चिकटत नाहीत कारण मृत्यूसोबत त्याचा त्याग झालेला असतो. तसं नसतं तर आयूष्यभर कम्यूनीस्ट विचारसरणी ठेवा व मेल्यामेल्या लगेच हरीनामाला सूरूवात करा म्हणजे पूण्य वाढेल असं सांगीतलं गेलं नसतं काय ? ६.१ सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात असेच होय. पण कम्यूनीजम माहीत असेल तर त्यानूशंगाने All animals are equal some animals are more equals म्हणजे कसे वागणे होय, हे मला स्पश्ट करावे लागणार नाही. भुतांबाबत नेमके तेच घडते... न्हवे ही प्रवृत्तीच त्यांना अशा अवस्थांपर्यंत न्हेण्यास कारणीभूत होते. ७. अकांऊंट क्लोज्ड हा शिक्का बसलेला असतोच. कर्मयोग साधणे यालाच म्हणतात. म्हणून तर समाधी प्राप्त झालेल्या कीती तरी अवलीयांची उदाहरणे डोळ्या समोर आहेत. एकदा ती स्थीती मिळाली व नंतर झक मारली तरी त्याचे बरे-वाइट भोग भोगणे प्रारब्धी रहात नाही. कारण देह असतानाही ज्ञान प्राप्त होऊन त्यापलीकडे जाणे साधले गेलेले असते.... मग आता किर्तन करा नाहीतर तमाशा.... चिदानंद रूपम.. शिवोssssहं.. शिवोssssहं... अथवा बूल्लाह की जाणा मै कोण .. वा मला अग्नी जाळत नाही मृत्यू मारत नाही वगैरे ब्लाह ब्लाह ब्लाह ब्लाह ब्लाह... अनूभवणे ते हेच होय. ७.१ तूम्ही खरोखर कोण आहात हे आधी जाणा आणी सर्व (होय सर्वच्या सर्व) नियम मनासारखे वाकवा... फक्त आधी तूम्हे कोण हे जाणा... लक्षात घ्या... उत्तरे मीळणार नाहीतच.. तर प्रश्नच संपतील.. फक्त सतत विवीध प्रश्न निर्माण करणार्‍या चंचलता व शंका निर्माण करत बसणे हेच ज्याचे खरे स्वरूप व कार्य आहे त्या मन नामक यंत्रापासून संपूर्ण सूटका करा. नक्किच कळेल कोणत्या नीयमाची आवश्यक्ता आहे आणी कशाची नाही ते..... ७.२ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा मिळाण्यासाठी गूरू नामक प्रोसिजर असते. पण संभाळून भामटे लोक व एजंटापासून सावधान... खरतर तीव्र इछ्चा असेल तर सर्व प्रोसीजर टाळूनही सर्व काही करता येते... गौतम बूध्दाने गूरू नामक प्रोसीजर फाट्यावर मारून समाधी मीळवली होती... हिदू धर्माच्या वैदीकतेचा पाया(प्रत्येक ठीकाणी गूरू हवा/ कोणीतरी एजंट हवा) इतक्या सहजतेने व यशस्विपणे फाट्यावर मारून व त्याचा जगभर प्रसार करूनही गौतम बूध्दाचा त्याचकाळी खून कसा काय नाही झाला हेच मला न उलगडलेल सामाजीक कोडं आहे. अर्थात ओशो यूजी वगैरेचां अभ्यास केला तर अंदाज करता येतो पण बूध्दाच्या वेळचा हींदू संस्कृतीचा काळ हा जास्त प्रगल्भ असावा इतकच अनूमान काढता येतं. ७.३. इथे साध्य, साधन, साधक सर्व काही एकच हो.... फर्क आहे कूठे.. फक्त रंगमंच्यावरच्या दीलेल्या भूमीका निभावायचे इतकेच... कशाला उगीच फरक करायचा ? ७.४. तूमचं भूत हे तूम्ही तूमचं कूत्र मानता काय ? मग वेगवेगळी अकांट कशाला हो ? (तूमच्या भूताला दीलेल्या उपमेच्या शब्द रचनेबद्दल क्षमा सांगावी, हो तूम्हाला त्याबद्दल राग येणार नाही खात्री आहे, पण उगाच तूमचं भूत त्यावर खवळायला नको नाहीका ? म्हणून त्याची माफी मागतो ;) ) ८. ज्या व्यक्तीला समाधी प्राप्त होते तो अर्थातच समाधी अवस्थेत अथवा शरीर सोडल्या नंतर कायमचा मूक्त होतो. अर्थात समाधी लावणे व घेणे या वेगळ्या क्रीया होत. पण अशा परीस्थीती तो माणूस जरी जिवनमूक्त झाला तररीलौकेकार्थाने त्याची कर्मे चालूच असतात. व त्या अनूशंगाने पाप व पूण्य जमा होतच असतं. पण जेव्हा त्या व्यक्तीचा देहत्याग होते तेव्हां त्याला जड देह कारण देह लिंग देह , सूक्ष्म देह वगैरे वगैरे पासून मूक्तता मीळाल्याने त्याची फळे अथवा ते भोग हे त्याच्या पूजकांच्या व निंदकांच्या प्रारब्धाला चिकटतात. म्हणूनच परमार्थातील थोर व्यक्तीची पूजा करता आली नाही तरी निंदा करू नये असे म्हटले जाते. राहीली गोश्ट सामान्यांच्या चक्रवाढीची... तर कोणतेही कर्म हे देह सोबत करत आहे तो पर्यंतच पाप-पूण्य म्हणून गणले जाइल.. एकदा त्या पासून वेगळे झालात.. तूमच्या पूरता विषय संपला. ९. दिवाळे जाहीर करावे लागत नाही. ती निघालेले सर्वांना (समाजाला) अनूभवाला येते, मग ते पैसा, अक्कल अथवा मनःशांती वा इतर कोणत्याही स्वरूपाच्या दिवाळखोरीत जग जाहीर होते. १०. होय उपोषण चालूच असते. आणी ते भंगले तर भल्या भल्यांची दाणादाण उडते, म्हणून हे सर्व "पिपल्स" एखाद्या पोचलेल्या महात्म्याचे उपोषण कधी भंग होऊ नये म्हणून फार काळजी घेत असतात.. काही घपला मॅटर झालाच तर वेळीच योग्य ती सेटल्मेंट मारून पून्हा असं होऊ नये याचे काळजी घ्यायचा प्रयत्न करतात. _______________________________ आणी हो आपला हा लेख खरोखर चांगला आहे, अशा प्रकारचे प्रश्न जर लोकांनी फक्त स्वतःलाच विचारले तर आख्खं जग एका क्षणात नास्तिक होईल!! पण जर त्यांना त्याची उत्तरे नकोयत, प्रयत्न करावेसे वाटत नाही, कूतूहल निर्माण होऊ दीलं जात नाही तर कोल्ह्याला द्राक्षे अंबट या न्यायाने ते आस्तीकतेपासून दूरावतील , अर्थात असं डाविकडे झूकलेल्यांना आपल्यासारख्यांनीच समजून व सामावून घ्यायच आहे फक्त आधी त्याचं रूपांतर अतिशय नालायक कम्यूनीस्ट प्रवृत्तिंमधे कसं घडल आहे याची जाणीव करून देऊनच. म्हणून म्हणतो लेख मस्त आहेच.. तसाच दूधारी तलवारही....

In reply to by आत्मशून्य

रमताराम Tue, 09/13/2011 - 01:08
यवडं शिरेसली कशापाय घेतावं आं? जस्ट चिल यार. असो. १. मान्यता गेली खड्ड्यात. 'नक्की काय आहे' ते बोला. उगाच बाजारात तुरी नि .... कशाला. क्काय? २. या जन्माबद्दल तसेही कोणी ठामपणे बोलत नाही पण पुनर्जन्माबद्दल बोलतात, कारण ते दोन हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहे. ते चूक कसे असेल महाराजा. बाकी अंबानीबद्दलचा प्वाईंट एकदम भारी बर्का. जातोच आता मुकेश नि अनिल कडे (पण नको ती कोकिलाबेन आहे तोवर नको, भलतीच आफत....) ३. आमचा मुद्दा मोडतोड करून वापरल्याने प्रश्न पास. आम्ही या जन्मी बुर्किना फासोचे नागरिक आहोत, आता बोला. ३.१."इक्वीलीब्रीअम" संकल्पना या मानवी नश्वर परीमाणामधे सूस्पश्ट करता येतीलच असे नाही.असहमत. इक्विलिब्रियम हा नश्वर जगातच स्पष्ट करता येईल. पारलौकिक जगात ते गृहितकच असल्याने स्पष्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. ४. गुंतागुंत नाही हे तुमच्या उदाहरणातून स्पष्ट झालेले नाही हे नमूद करतो. मी आणि माझ्या पणज्याचे/आज्याचे काउंट एकच म्हटले तर मला माझ्या आज्याचे/पणज्याचे पाप/पुण्या उगाचच क्रेडिट्/डेबिट मिळते हे बरोबर नाय हां. माझे अकाउंट वायले का नसावे? बाकीचे कोऽहं संबंधित प्रश्नांची उत्तरे सापडली की सांगा, पुढचे प्रश्न विचारेन. ५. तुम्ही मधेच कम्युनिजम आणलेला असल्याने नि आमचा विरोध कम्युनिस्टांना असला तरी कम्युनिजमला नसल्याने तुमचा विरोध नक्की तत्त्वाला आहे की व्यक्तिसमूहाला हे समजेपर्यंत या प्रश्नाचे उत्तर राखून ठेवतो आहे. आणि पुन्हा 'सांगितलं नाही म्हणून' करून नये असा नियम आहे काय? न सांगता केलं तर काय शिक्षा असेल हे आधीच समजले तर त्यानुसार वर्तन ठेवता येईल. ६. कोऽहं? देह की आत्मा? देह माझ्या जाणिवेच्या कक्षेत आहे त्यामुळे ठाऊक आहे. आत्मा म्हणजे काय? नि हे सारे देहाचे नाही आत्म्याचे कर्म याला पुरावा काय. उद्या चित्रगुप्ताने वर गेल्यावर मला माझ्या देहाने केलेल्या पापाबद्दल डेबिट पडलेले दाखवले तर तुम्ही माझी केस लढायला (अर्थातच फी मिळणार नाही नि लायेबिलिटी तुम्हालाच उचलावी लागेल) तयार आहात काय? ७. मूळ प्रश्नाला बगल देऊन 'यू आर बीटिंग अराउंड द बुश'. तस्मात तुमचे उत्तर दुर्लक्षले गेले आहे. ७.१-७.३ मुद्दा क्र. ७ चे उत्तर पहा. ७.४. माझे कुत्रे, माझे भूत, माझा आत्मा, माझे आत्मशून्य सार्‍यांचे अकाउंट एकच असावे काय? नसल्यास माझ्या आत्मशून्याला माझ्या पापाचे भोग भोगायला भाग पाडता येईल का? ८. शाब्दिक खेळ आम्हाला भुलवू शकत नाहीत. स्पष्ट काय ते बोला. ९. आमच्या प्रश्नाचा 'स्कोपच' बदलला की राव तुम्ही. ए ना चॉलबे. हे उत्तर म्हणायचे की प्रश्न टाळणे? १०. हुश्शः. अखेर एक मुद्दा मिळाला सहमत व्हायला. असो. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार. आम्हाला लिखाणाला इतके सीरीयसली घेणारे कोणीतरी आहे हे पाहून भडभडून आले. ( लेखाच्या सुरवातीला मळमळीचा नि भळभळीचा उल्लेख आला आहेच). इतक्या तळमळीने आमचे अज्ञान दूर करणारे भेटलेले पाहून आम्हाला गहिवरून आले आहे. आमची कळकळीची विनंती की हे तळमळीचे ज्ञानदानाचे काम तुम्ही कळकळीने चालू ठेवावे अन्यथा आमच्यासारखे चळवळीच्या संभाव्य नेत्यांची चळवळ नि वळवळ निष्फळ होऊन जाईल.

In reply to by रमताराम

आत्मशून्य Tue, 09/13/2011 - 11:31
तूमी तर चिडलात की राव ?
शाब्दिक खेळ आम्हाला भुलवू शकत नाहीत. स्पष्ट काय ते बोला.
जेब्बात. स्पश्ट बोलायचं तर ? शाब्दीक खेळापासून सूटका नसते.... आपण गणीत शिकतो २+२=४ असं गूर्जी शीकवतात... पण हे जोपर्यंत आपण आत्मसात केलेले नसते तो पर्यंत गूर्जीचे फंडे केवळ शाब्दीक खेळच असतात/राहतात... आणी जेव्हां हे आत्मसात होते तेव्हां फक्त २+२ का ? इतर कोनत्याही संखेचं गणीत आपोआप गूर्जी शिवाय सोडवायला जमू लागते...मला तूम्हाला कोणत्याही शाब्दीक खेळात भूलवायची इछ्चा नाही एव्हडच स्पश्ट सांगतो... अरेरे.. हे सूध्दा शब्दांचाच वापर करून सांगावं लागतं नाही ?

In reply to by आत्मशून्य

रमताराम Tue, 09/13/2011 - 20:24
तूमी तर चिडलात की राव ? नाय ओ. उलट आम्हाला वाटलं तुम्ही हे प्रश्नोपनिषद फारच सीरीयसली घेता आहात. थोडा खाओ थोडा फेको*. :) * 'जाने भी दो यारो' आठवतो का?

In reply to by आत्मशून्य

राजेश घासकडवी Tue, 09/13/2011 - 02:30
आत्मशून्यांचा सगळा प्रतिसाद वाचला नाही, पण एक वाक्य चटकन डोळ्यात भरलं.
म्हणून तर समाधी प्राप्त झालेल्या कीती तरी अवलीयांची उदाहरणे डोळ्या समोर आहेत.
अवलियांना समाधी प्राप्त झाली? कधी? कुठे आहे ती? दर्शन घेता येईल का?

In reply to by आत्मशून्य

अर्धवटराव Tue, 09/13/2011 - 04:21
हिमेश रेशमियाला यंदा बालगंधर्व महोत्सवाचं आग्रहाच निमंत्रण आहे... असं त्याला मनापासुन वाटतय !! (पुनर्जीवीत) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य Tue, 09/13/2011 - 11:22
शक्य आहे या जगात काहीही शक्य आहे, पण गंमत इथचं आहे की सध्या जो तो केवळ हिमेश बनण्याच्याच मागे लागलाय.. आणी बालगंधर्वांना मात्र...

सहज Mon, 09/12/2011 - 15:51
देवा, तुमचा लेख आम्हाला तरी भरपूर पुनर्जन्म घेतल्याशिवाय पूर्णपणे समजायचा नाही. उत्तरे तर फार पुढची गोष्ट :-) _/\_

शुचि Mon, 09/12/2011 - 19:18
>> माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती? >> हाहाहा >> मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही? >> =)) =)) =)) फुटले या मुद्द्यावर तर :) >> मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात? >> मस्त!!!! खूप दिवसांनी निखळ मनोरंजन झाले :)

पिवळा डांबिस Mon, 09/12/2011 - 23:08
गेल्या जन्मी मी बहुतेक नरभक्षक वाघ/ चित्ता/ बिबळ्या वगैरेपैकी एक असावा.... त्याची शिक्षा म्हणून या जन्मात नरभक्षक प्राण्यांना खायला आवडेल असा एक गुबगुबीत माणूस झालो.... आता हेच रॅशनाल वापरलं तर पुढला जन्म बहुतेक पापलेटाचा मिळणार!!!! :)

In reply to by रमताराम

Nile Tue, 09/13/2011 - 01:55
म्हणजे इथल्या सगळ्या शाकाहारी काकवा, मावश्या अन आज्ज्या पुढल्या जल्मी काय भेंडी, गवार अन काकडी होणार का??

In reply to by Nile

नितिन थत्ते Tue, 09/13/2011 - 10:12
त्यांची इच्छा चवळी होण्याची पण असेल हो पण भोपळी मिरची होण्याची शक्यताच जास्त असावी. (पाशवी शक्ती तुटून पडतायत आता)

In reply to by नितिन थत्ते

Nile Tue, 09/13/2011 - 11:47
नाहीतर तुमचापण भोपळा व्हायचा पुढल्यावेळी अन पाशवी शक्त्या त्याचं भरीत करायच्या. ;-)

In reply to by नितिन थत्ते

रमताराम Tue, 09/13/2011 - 20:15
शंका का आली. प्रथम तुमचा 'पुढचा जन्म' लवकर मिळावा यासाठी हा जन्म फार लांबणार नाही याची तजवीज करतीलच ना. मग त्या पुढल्या जन्मी भरीत. दोन जन्मठेपेंची शिक्षा देणं म्हणजे काय ते समजलं का आता?

In reply to by पैसा

रमताराम Tue, 09/13/2011 - 20:36
इथेच मराठी माणूस मार खातो. फाऽऽऽर विचार करतो आपण. आता आमचेच बघा ना. हे ढीगभर प्रश्न पडलेत. चला यावरून आणखी एक गोष्ट आठवली. एक गोम तुरुतुरू चालली होती. तिचे अनेक पाय छान लयीत पडत होते. चालता चालता ती एका कासवाजवळ पोचली. तिला तुरुतुरू चालताना पाहून आपल्या संथ गतीबद्दल त्याला थोडी लाज वाटली नि तिच्याबद्दल असूया. त्याचबरोबर त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं की इतके सगळे पाय असताना नेमका कुठला पाय कधी उचलायचा नि कधी पुढे टाकायचा हे कसे जमत असेल तिला. न राहवून हा प्रश्न त्याने तिला विचारला. गोम विचारात पडली. दोन पावले (खरेतर अनेक पावले दोनदा) पुढे मागे चालत तिने निरीक्षणाद्वारे याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. बराच वेळ झाला तरी तिला याचे उत्तर सापडेना. कासव केव्हाच पुढे निघून गेले होते. आता त्या गोमीकडे पाय होते पण गती हरवली होती. :)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/15/2011 - 09:43
चुकीच्या वेळेस मेले होते मी! काय भारी धागा काढलाय रमतारामने ... मला मेलीला मरायला हीच वेळ सापडली होती! मला एक मिपा सदस्य आठवले ज्यांना या विषयात चांगली गती आहे असं वाटतं. पण ररांनी जेवण देऊन माझं तोंड बंद केलं आहे आणि ड्रींक देऊन हातही बांधले आहेत.

अप्रतिम Mon, 10/03/2011 - 12:33
अत्यंत खुमासदार,खुसखुशीत पण विचार करायला लावनारा लेख. मझा आला.

रमताराम Sat, 08/04/2012 - 12:12
पुनर्जन्माबाबत हल्ली संशोधन वगैरे करण्याचे बाष्कळ नि मनोरंजक दावे होऊ लागलेले ऐकून आमच्या या लेखाची आठवण झाली. यात 'असले स्वयंघोषित संशोधक मागल्या जन्मी कोण असावेत?' असा एक प्रश्न अ‍ॅड करावा असे वाटू लागले आहे.

डिजेबॉय गुरुवार, 05/02/2013 - 14:00
आपण खोरशेद भावनगरी यांचे "The laws of spirit world" हे पुस्तक वाचावे, त्यात सर्व उत्तरे मिळतील.

आनन्दा गुरुवार, 05/02/2013 - 16:20
ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?
णिसेध णिसेध णिसेध हा शंभू या शब्दाचा अपमान आहे... सौजन्य - फेसबुक पान - संभाजी ब्रिगेड!!

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 18:22
आहाहा हाच लेख कोणी लिहीलाय म्हणून मध्यंतरी खूप शोधत होते. भयंकर तार्कीक व अफलातून लेख आहे.

महेश नामजोशि Fri, 05/03/2013 - 16:21
पुनर्जन्म आहे कि नाही काही माहित नाहि. पण बर्याच वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती कि बंगालमधील एक मुलगी खूप लांबवर फिरायला गेली असताना तिला तेथील घर, तेथील माणसे ओळखीची वाटली. तिने माणसांची नावेही सांगितली. तिला आठवले कि ती लहान असताना नदीवर जात असे. तेथील लोकांनाही आश्चर्य वाटले इतकी माहिती तिने सांगितली. यावर चर्चा व्हायला हवि. आपल्याला मागच्या जन्माचे व पुढील जन्माचे समजले तर आश्चर्य होईल. मी एकदा मित्राबरोबर एका दक्षिणी माणसाकडे गेलो होतो. ती माणसे एखाद्याचे भूत, वर्तमान व भविष्य अगस्ती नाडी म्हणून जो त्यांच्याकडे जी पोथी असते ते बघून सांगतात. आश्चर्य म्हणजे बरेचसे तंतोतंत जुळत असते. अर्थात मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल. महेश नामजोशी

In reply to by महेश नामजोशि

बॅटमॅन Fri, 05/03/2013 - 16:29
ती माणसे एखाद्याचे भूत, वर्तमान व भविष्य अगस्ती नाडी म्हणून जो त्यांच्याकडे जी पोथी असते ते बघून सांगतात. आश्चर्य म्हणजे बरेचसे तंतोतंत जुळत असते.
नाडी नाडी धाग्या धाग्याते नाडी, पाडी पाडी जिल्ब्यांवर जिल्ब्या पाडी तेवढे नाडी सोडून बोला हो, उगा कुणाच्या नाडीला हात घालू नका.
अर्थात मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल.
विश्वास गया पाणिपतमे जी, काय्कू उस्कू वापस लाता जी तुमऽ?

In reply to by महेश नामजोशि

रमताराम Fri, 05/03/2013 - 17:36
मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल. >> आता कसं, माझे मागल्या जन्मी तुम्ही चारशे कोटी रूपये देणं होतात ते देऊन टाका बरं पटकन. अस्सं प्रामाणिक असावं माणसानं. रच्याकने तुम्हाला न कळणार्‍या गोष्टींवर विश्वास ठेवता? भलताच सोपा उपाय आहे राव. आधी सांगितला असतात तर सालं आयुष्य फारच सोपं झालं असतं, कारण आम्हाला जगण्यातलं सालं शष्प कळंत नाही.