मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आईस पत्र

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं. हाय आई, आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्‍या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं. कालपर्यंत तू मला डोस पाजत होतीस, पण आतातरी निदान तू मला माझा स्वतंत्र विचार करू देशील असं वाटलं होतं. तो मी तसाही करतेच, पण ते तुला समजेल अशी अपेक्षा होती. मानापमान - माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात. डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत आणि म्हणूनच चुकूनसुद्धा डोस पाजायचा आव आणायचा नसतो. संस्कार - संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतात, तू मला आंबा समजून खत घालत असशील याची शक्यता तू कधी विचारात घेतली आहेस का? तुझ्या तरूणपणची मूल्यं, समाज, समज वेगळे असतील आणि माझी वेगळी असतील याची तुला थोडीतरी जाणीव आहे का? विचार - तू म्हणतेस पैसा खर्च करताना नेहेमी फेरविचार कर. सक्षमपणे निर्णय घेण्यासाठी आधी स्वतंत्रपणे विचार करू दिला पाहिजे. जबाबदारी हा शब्द मला नीट कळण्यासाठी कधी चुकूनतरी तू माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस का? आणि मी नाही पैसे खर्च करणार तर कोण करणार, खर्च नाही करायचे तर मिळवायचे कशाला पैसे? काय वाईट आहे पैसे खर्च करण्यात? स्तुती - स्तुतीमुळे किती चांगल्या गोष्टी होतात हे तुला माहित आहे का? जेव्हा आपला आपल्यावरही विश्वास नसतो तेव्हा आपल्या लोकांनी केलेल्या तोंडदेखल्या स्तुतीमुळेसुद्धा खूप आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्याची एखादी गोष्ट खरोखरच चांगली वाटली तरी तुझ्या या उपदेशामृतामुळे कोणी सांगणार नाही. कष्ट - कोणाचे कष्ट विनमोल घेऊ नकोस हे ठीक आहे. पण आपल्याच लोकांसाठी किंवा लोकांनी काही केलं तर काय त्याचं मूल्यमापन करायचं का? मैत्रीसारखी सुंदर नाती वगैरे फक्त बोलण्याची गोष्ट नाही आई, वेळ पडली की निभावून नेण्याची गोष्ट आहे. आणि हे घरापासून दूर राहिल्यानंतर मी शिकले आहे. घरात उपदेशामृत मिळतं आणि बाहेर प्रत्यक्ष अनुभव. वाचा - मला कोणी काही बोललं तर मी का ऐकून घेऊ? माझी चूक नसेल तरीही मी पडतं का घ्यायचं? वाईट शब्दच वापरायला पाहिजेत असं नाही, पण स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं न मांडताच का निघून जायचं मी! हे लोकं मला खायला घालत नाहीत, मी माझ्या कष्टांनी कमावून खाते, उगाच का कोणाचं ऐकून घ्यायचं? तू नेहेमीच प्रवचन देतेस, हजार गोष्टी सांगतेस. पण त्यापेक्षा कधी माझ्यावर थोडी जबाबदारी टाकली असतीस, मला माझं आयुष्य जगण्याचं, माझ्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देऊन मागे उभी राहिली असतीस ना, तर एक अक्षर न बोलताही तू मला खूप गोष्टी शिकवू शकली असतीस. "काय हे उपदेशामृत" असा उद्वेग वाटला नसता, तू माझी मैत्रीण होऊ शकली असतीस. मी तुझ्याशी काही बोलत नाही, शेअर करत नाही कारण माझ्या एका वाक्यावर तुझे दहा बुलेट्स येतात. आता पत्रातूनच काय ते लिही. टंकाळा केलास तर निदान मला वाचण्याचा त्रास कमी होईल. तुझी(?) दिया स्वानुभवावर आधारित.

वाचन 22427 वाचनखूण प्रतिक्रिया 63

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/19/2011 - 03:16
तु जेव्हा (जर) आई होशील ना! तेव्हा ( तर) तुझी मुलगी तुला अस्सच ( काल्पनिक) पत्र लिहिल बरं! ;)

In reply to by विनायक प्रभू

पिवळा डांबिस गुरुवार, 05/19/2011 - 18:26
सध्या गुणगुणणं सुरू आहे.... येईल हां गुईं आवाज लवकरच!!! :) प्रभूआजोबा, जरा धीर धरा!! बाकी पत्र वाचून (आम्हाला मुलगी नसल्याने) सॉल्लीड करमणूक झाली! मुलगा काही वेगळं बोलणार आहे अशातला भाग नाही, पण त्याला टोणगा समजून प्रभूआजोबांकडे समुपदेशनाला धाडता येईल.... ;)

टारझन गुरुवार, 05/19/2011 - 04:02
आम्ही आमच्या आईचे कोणते ही सल्ले ऐकुन घेतो. आई ला उलटे बोलणे आमच्या स्वप्नातही होत नाही . आई ला आमुक करु नको , तमुक करु नको किंवा आई ने कसे वागावे असे सांगणे म्हणजे आमच्या साठी गंभीर गुण्हा आहे :) असं म्हणतात ( आणि तसंच आहे) आईला आपली मुलं नेहमी लहाणंच रहातात. त्यामुळे ती जे काही सांगेल ते कळकळीने च सांगेल . समजा आईने सांगितलेलं चुकीचंच असेल किंवा पटत नसेल तर तसं वागत नाही .. पण आईचा उपमर्द होइल असे कोणतेही कृत्य आम्ही करत नाही. :) अर्थात कोणी आपल्या आईशी कसं वागावं हा ज्या त्या पाल्याचा प्रश्न आहे , आम्ही स्वतःबद्दलंच बोलु शकतो. असो ! बाकी आणंदयात्रींची (जर ते बोर झाले तर ) आगाऊ माफी मागतो :) - ( आईला "आई"चे स्थाण देणारा) टारझन आम्ही आईला शहाणपणा शिकवायचा शहाणपणा करत नाही :)

In reply to by टारझन

आनंदयात्री गुरुवार, 05/19/2011 - 11:48
सहमत आहे. >>असो ! बाकी आणंदयात्रींची (जर ते बोर झाले तर ) आगाऊ माफी मागतो आम्ही दंतविमा अस्थिविमा काढावा असे सुचवताय का ;)

दत्ता काळे गुरुवार, 05/19/2011 - 04:26
'आईला पत्र लिहावे' हा विचार मनात येणं हासुध्दा एक संस्काराचाच भाग आहे. हवंतर त्याला संस्कारीत विचार म्हणता येईल.

नरेशकुमार गुरुवार, 05/19/2011 - 04:51
आई वडीलांकडे अधुन मधुन जाने होतेच. पत्र/ईमेल्स वगेरे लिहायला वेळ मिळत नाही. काही funny mails forwards करत असतो. (पन आई ते पहाते का नाही, ते माहीत नाही). काही महत्वाची बिलं आनि काही बातम्या आई मलाच email करत असते. आपले पत्र वाचले. चोप्य पस्ते करुन आईला पाठविन.

रमताराम गुरुवार, 05/19/2011 - 05:10
मुळात आईने मुलीला किंवा मुलीने आईला पत्र लिहायची वेळ आली हे परस्पर-संवाद संपुष्टात आल्याचे द्योतक म्हणावे का असा प्रश्न पडला आहे. ड्यांबिस (पिवळा नव्हे) मोड ऑन> तो फोन हाय ना घरात, हज्जार हज्जार रुपये महिन्याला देताय ना अंबानींच्या अनिल ला किंवा मित्तलांना? मग उचला तो नि डायरेक बोला की, उगा लिवण्याची तुम्हाला नि वाचण्याची आम्हाला शिक्षा काय म्हणून. ड्यांबिस (पिवळा नव्हे) मोड ऑफ> पत्रातील बहुतेक मुद्यांशी तत्त्वतः सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/19/2011 - 05:18
मुळ विचार स्विकारार्ह आहेत पण ते ज्या कठोर शब्दात मांडले आहेत ती पद्धत रुचली नाही. आपल्या भावना आईचा उपमर्द न करताही आईपर्यंत पोहोचवत्या आल्या असत्या. आता आईच्या मुलीस (दूसर्‍या) पत्राची वाट पाहात आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/19/2011 - 05:53
आता आईच्या मुलीस (दूसर्‍या) पत्राची वाट पाहात आहे.
नSSSSSSSSSSSहीSSSSSSSSSSSSS कशाला कशाला उगाच..... विचार आवडले. पत्रलेखीकेने स्वतःच्या मताने / अनुभवाने / विचाराने पत्र लिहिलेल्या असल्याने तिच्या विचारांचे प्रतिबिंब म्हणुनच पत्र वाचले.

In reply to by प्रभाकर पेठकर

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/19/2011 - 06:35
मुळ विचार स्विकारार्ह आहेत पण ते ज्या कठोर शब्दात मांडले आहेत ती पद्धत रुचली नाही. आपल्या भावना आईचा उपमर्द न करताही आईपर्यंत पोहोचवत्या आल्या असत्या.
"भावनाओं को समझो" विचारांची पक्की पाईक असल्यामुळे सहमती नाही, पण हे शब्द काही लोकांना कठोर वाटू शकतात याची जाणीव आहे. साधारण नोकरी लागते तेव्हा, २४-२५ व्या वर्षी, तरूण मुला-मुलींच्या भावना अशा प्रकारे शब्दांकित होऊ शकतात हे (दुसर्‍यांच्या अनुभवातून) पाहिलेलं आहे. आईचं बोलणं कटू वाटलं तरी ते भल्यासाठीच असतं, याच पद्धतीने या शब्दांकडेही पहाता येईल. काय बोललं आहे यापेक्षा कोण बोललं आहे यालाच महत्त्व का द्यावं?
आता आईच्या मुलीस (दूसर्‍या) पत्राची वाट पाहात आहे.
अगदी.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ गुरुवार, 05/19/2011 - 07:01
लेखाच्या शेवटी स्वानुभवावर आधारित. इकडे (दुसर्‍यांच्या अनुभवातून) अवांतरः परवाच एका कुस्तीत पाठ टेकलेला आणि जिंकलेला असे दोन्ही पैलवान कुस्ती मारल्याचा आव आणून नाचताना पाहिले. शेवटी पंचांनी एकाचा हात वर केल्यावर प्रेक्षकांना समजले. असतात काही लोक. काय करणार?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ गुरुवार, 05/19/2011 - 07:40
बळंचकर....? अपेक्षित लोळण. (ओळखा पाहू कुठला पैलवान?) आपल्या सहानुभूतिला योग्य जागी पोचवण्यात आलेले आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/19/2011 - 08:20
पण हे शब्द काही लोकांना कठोर वाटू शकतात याची जाणीव आहे. धाग्यावरच्या प्रतिक्रिया पाहता 'काही' नाही पण अनेकांना हे शब्द कठोर वाटलेले जाणवत आहे. तरीही त्यांना फक्त 'काही'त मोजायचे असेल तर प्रश्नच मिटला. २४-२५ व्या वर्षी, तरूण मुला-मुलींच्या भावना अशा प्रकारे शब्दांकित होऊ शकतात मी १०-१२ वर्षाचा असतो तर वरील वाक्य माझा प्रतिक्रियेला लागू होते. पण, २४-२५ वयोगटातून मीही गेलो आहे. आणि त्यावयातील भावना मी जाणतो. भावना व्यक्त करायला खूप वेळा शब्दांचा आधार घ्यावा लागतो. ते जर विचारपूर्वक निवडले नाहीत तर शस्त्राप्रमाणे धारदार होऊन समोरच्या व्यक्तीला घायाळ, प्रसंगी जन्मभराकरीता जायबंदी करू शकतात. आपल्या हातून आपल्या आई-वडिलांवर (शाब्दीक) शस्त्र चालविणे कुठल्याच वयात समर्थनिय नाही. हे मुद्दाम केले जात नाही, अनवधानाने होते. पण त्याबद्दल खेद वाटण्या ऐवजी त्याचे समर्थन करणे गैर आहे. काय बोललं आहे यापेक्षा कोण बोललं आहे यालाच महत्त्व का द्यावं? विचारांना वयाचं बंधन नसलं तरी आई-मुलीच्या नात्यात नुसत्या वयाचाच नाही तर आईच्या प्रती आदराचा भागही असतो. आईनेही कटू शब्दांचा वापर करू नये पण कधी कधी एखाद्या मुलीच्या हटवादी स्वभावाची जाणीव असल्याने तिच्या आईने कटू शब्दांचा अवलंब करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मुलीने कमीत कमी आईचे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन तरी आपल्या भावना नम्रपणे, सौम्य शब्दात आईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, अशी आपली संस्कृती आहे.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 05/19/2011 - 13:14
ख्याक्क :D :D न्हाय आपल्यासारखे सॉफ्टवेअर कारकुन लागतात एकविसाव्या वर्षी नोकरीला, बाकी काही भारी करायचे असेल तर थोडे ४-२ वर्स होतात की मागंफुडं .. - (समजुतदार) आंद्या

In reply to by प्रभाकर पेठकर

चिंतामणी Fri, 05/20/2011 - 16:40
मुळ विचार स्विकारार्ह आहेत पण ते ज्या कठोर शब्दात मांडले आहेत ती पद्धत रुचली नाही. आपल्या भावना आईचा उपमर्द न करताही आईपर्यंत पोहोचवत्या आल्या असत्या. आता आईच्या मुलीस (दूसर्‍या) पत्राची वाट पाहात आहे. सहमत. परन्तु प्रत्येकाची भावना व्यक्त करायची पध्दत त्याच्या लाईफ स्टाइलप्रमाणे बनते.

In reply to by इंटरनेटस्नेही

जयंत कुलकर्णी गुरुवार, 05/19/2011 - 08:02
बबडूस, सद्या चि. इ. लिवले तर लई राग येतो लेकरांना म्हनूनशान हे असं लिवलय. लई दिवसापासून तुला पत्र लिवीन लिवीन म्हनतोय, पण हिकड येळच मिळत नाही काय करनार ! साहेबांची तुरुंगातसुधा शेवा करावी लागती बाबा ! आणि साहेबबी कसं हायती.. स्वत:च्या दाढीचं केसबी कापत नाय साला. असो पण आपल्याला काय करायचं हाय ? पैसे मिळत्यात ना मग झाल तर. ग्वाड मान्हून रहायच. परवाच तुझ्याआयचा फोन आला होता. (तिच्यायलाहिच्या) तिला आता भिकंच डोहाळं लागल्यालं दिसत्यात. मला सांगत व्हती की बबड्याला आता शिक्षण पूर्न कर म्हनाव. आता शिकून (तसलं हो) काय उपयोग होणार हे तूच तिला समजावून सांग. मी तुला काय काय शिकवलं हाय हे तिला न्हाय समजणार.. पण मी सांगितलं तर तिला आजिब्यात पटणारबी न्हाही, उगाचच भांडनं व्हतील. उगाच शेजार्‍याना तमाशा साला.. नाय नकोच ते. ती आता तुझ्या मागं लगीन कर म्हनून लई भुनभुन लावल.. पन तू तिला म्याट्रीक झाल्याबिगर नाही असं ठासून सांग म्हणजे ती गप बसंल आणि तुबी जिंदगीभर लगिन न करता पोरी उडवायला मो़कळा... हाय की नाय तुझ्या बाची आयडीया.? आता तूझ्यासाठी मी साहेबांच्या मदतीन तुझी पदवी करायला टाकली हाय. ती तुझ्या आयच्या नजर्स पडायच्या आत लपव. तसा तुला त्याचा उपयोग न्हाय म्हणा पण साहेबच म्हनाले पुढच्या ’ऑलिंपीक्स भारतात भरवायच्या आहेत तवा उपयोगी येईल. एक लोन प्रकरन करून टाकू म्हनाले. ५००एक मारूतीच्या टॅक्सीच घेऊन टाकू साला... कटकट नको.. साहेबांनी आत्तापाचनच तयारी करायला सांगितली आहे म्हनजी कोणाच्या डोळ्यावर यायला नगं. लोग फार वाईट असतात रं बाबा....हे तुझ्या आयला सांगू नकोस. ती येड्यागत बोंबलत सूटेल. तुझ्या लहानपनच्या सगळ्या विच्छा मी आता पूर्न करणार. परवाच वाघ नख्या असलेल्या आनि पट्याच्या खाली लोंबणार्‍या सोन्याच्या हे एवढ्याला जाड साखळ्याची ऑर्डर येथूनच दिली आहे. ते सगळं सोने अंगावर घातल्यावरची तुझी छबी डोळ्यासमोर उभी राहून डोळ्यातून पानी आलं बघ. हे सोने लई जड असते रं बाळा. जरा व्यायाम करत जा आणि आता हातभट्टीची लावायची बंद कर. साहेबांच्या पंपावर स्कॉचचा स्टॉक ठेवला आहे तो बिनधास वापर. बहूदा सायब आता येनार न्हाईत. काळजी नाय. समजतयका मी काय म्हनतोय ते ...... शक्यता कमीच हाय... तुही साला तुझ्या आयसारखा बावळट... परवा तू आमच्या इज्जतीचा फार फालूदा केलास म्हनं. IG चा फोन आला होता सायबांना. तू म्हणं फक्त १०० रु. च्या नोटेतून चरस ओढत होता.... मला एक सांग कुठे गावली तुला ही १००ची नोट ? आपल्या घरात ? तेही त्या बावळटीचे काम असणार. कितीवेळा सांगितले की बबडूच्या नजरंस १००० हून कमीची नोट पडता कामा नये. तुझे ह्रदय परिवर्तन का काय म्हणत्यात.. ते झालं म्हणजे आम्ही काय आपल्या शेतावर परत जायाच की काय..... आज साला तुझी फारच आठवण येऊन राहिलीय... तिकडे तुला उचक्या लागल्यात कारे भाड्या ?..... लागल्या असतील तर ताबडतोब तो खंबा तोंडाला लाव नाहीतर आम्ही साले इकडे उचकून मरायचो..... आनि एक आठवलं.... आम्ही येथेच खपलो तर काळजी करायची नाही....साहेबांच्या सगळ्या धंद्यात आता आमचीबी पार्टनरशीप आहे हे लक्षात ठेव. आपला शिए आहे त्याच्या कडे जा. तोही साला नालायकच आहे..... त्याची ती फाईल घेऊन जा म्हणजे तो वठणीवर येईल... झेरॉक्स. वरिजनल नको... आज नको नको ते विचार मनात येऊन राहिलेत.... एकच काळजी हाय र पोरा... आमच्या नंतर तुझ्या त्या आयनं तुला परत शाळंत घातलं तर कस होणार रं तुझऽऽऽऽऽऽऽऽऽऽ. तुझाच बाप.

मन१ गुरुवार, 05/19/2011 - 07:06
छान मांडलेत विचार. पण वरती पेठकर काका म्हणतात तसं इतक्या कठोर पद्धतीनच सांगितले गेले पाहिजेत का, असा प्रश्न पडला. --मनोबा

कवितानागेश गुरुवार, 05/19/2011 - 07:30
अर्ध-असहमत . अर्ध-सहमत. कुठलीही सरळ-साधी आई काय विचार करेल, याबद्दलचा अंदाज बांधून दिलेले (काल्पनिक) आईचे उतरः काय गं हे? आता तरी कळेल , नंतर तरी कळेल आणि मग तरी तुझे भांडणाचे कढ थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता तू नोकरीनिमित्ताने दुसर्‍या ठिकाणी गेलीस तरीही तू मलाच अजून एक नंबरची शत्रूच समजते आहेस! अशा वेळी तरी तुला तुझं लहान वय आठवेल असं वाटलं होतं. कालपर्यंत तू माझ्यावर सगळा राग काढत होतीस, पण आतातरी निदान तू माझा हेतू लक्षात घेशील असं वाटलं होतं. तसाही मी नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेच, पण ते तुला आता तरी समजेल अशी अपेक्षा होती. डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत >> डॉक्टरनी कडू औषधाचा डोस दिला तर आजार्याचा अपमान होतो काय गं? तू मला आंबा समजून खत घालत असशील याची शक्यता तू कधी विचारात घेतली आहेस का?>> माझ्या मते तू आंबाच आहेस! त्याप्रमाणे मी खत घातले, पण तुला कुंपण नाही घातले! तुला मीठच हवे असेल, तर ते तू आताही सहज मिळवू शकतेस. सक्षमपणे निर्णय घेण्यासाठी आधी स्वतंत्रपणे विचार करू दिला पाहिजे. >> स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी आधी स्वतंत्र व्हायला पाहिजे! फेरविचार प्रत्येकानीच करायचा असतो, मीसुद्धा करते हज्जारदा, तुला काही सांगण्याआधी! जेव्हा आपला आपल्यावरही विश्वास नसतो तेव्हा आपल्या लोकांनी केलेल्या तोंडदेखल्या स्तुतीमुळेसुद्धा खूप आत्मविश्वास निर्माण होतो. >>> तू लहान असताना कितीही कळकट होऊन आलीस तरीही मी तुला जवळ घेऊन, 'कित्ती छुन्दड छुन्डद' असे म्हणायचे! हा तुझा आत्मविश्वास त्यातूनच आलाय बरे का! तितके जुने आता तुला आठवायचे नाही. तुझी पचवण्याची ताकद वाढली, त्याप्रमाणेच तुला पुढचे पुढचे कडू डोस देत गेले मी. कोणाचे कष्ट विनमोल घेऊ नकोस हे ठीक आहे. >> त्यांची आठवण तरी ठेव. तितके पुरे. वाचा - मला कोणी काही बोललं तर मी का ऐकून घेऊ? माझी चूक नसेल तरीही मी पडतं का घ्यायचं? वाईट शब्दच वापरायला पाहिजेत असं नाही, पण स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं न मांडताच का निघून जायचं मी! हे लोकं मला खायला घालत नाहीत, मी माझ्या कष्टांनी कमावून खाते, उगाच का कोणाचं ऐकून घ्यायचं?>> भान्डनानी माणसे दुखावतात. आपणही समोरच्याला लागेल असे बोललो, मग फरक काय राहिला, समोरच्या माणसात आणि आपल्यात? विरोध ना दर्शवणे याचा अर्थ 'सर्व मान्य करणे' असा होत नाही. बाकी तुला तुझे स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणूनच लांब जाऊ दिले ना. मी सदहेतूंनी ४ चांगल्या गोष्टी सांगण्याचे काम केले. आता वागण्याचे काम तुझे. - माया :)

In reply to by कवितानागेश

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/19/2011 - 08:01
कुठलीही सरळ-साधी आई काय विचार करेल, याबद्दलचा अंदाज बांधून दिलेले (काल्पनिक) आईचे उतरः
अर्र, साधी सरळ आई होय; म्हणजे बहुदा अलका बुकल, आशा काळे, निरूपा रॉय, जुनाट पिक्चर्स आणि/किंवा कादंबर्‍यांमधली सोशिक सून, इ.इ. माफ करं गं लीमाउजेट, हे माझ्या बुद्धीपलिकडचं आहे. इथे असहमतीबद्दल सहमत होणंच इष्ट! (एक स्वतंत्र व्यक्ती) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कवितानागेश गुरुवार, 05/19/2011 - 08:21
कुठल्याही नात्यात, एखादी गोष्ट टोचली तरीही, त्या व्यक्तीचा मूळ हेतू 'टोचणे' असेलच असेही नाही, असा माझा अनुभव आहे. सिनेमा कादंबर्यातल्या आया वगरै मला माहित नाहीत. (मला हे असले छंद नाहीत!) :) तिथे स्टिरिओटाइप्स असतात. अशा प्रकारच्या खर्‍या आया मला सापडल्या नाहीत. पण प्रत्यक्षातल्या, खर्‍या-खर्‍या आयांमध्ये पण विविधता असते. त्यातली मला प्रामुख्यानी दिसलेली कॅटेगरी 'साधी-सरळआई' आहे. त्यांची भूमिका काय असु शकते, यचा विचार करुन उत्तर लिहिले आहे. ही वरची कॅटेगरी सोडून इतर काय म्हणतील, याचा विचार करायचा झाला, तर बरीच उत्तरे लिहावी लागतील, जाउ दे.

नितिन थत्ते गुरुवार, 05/19/2011 - 08:06
कुठेतरी वाचलेली प्रेमचंद यांची एक गोष्ट (बहुधा शरू रांगणेकरांच्या पुस्तकात). दोन भाऊ असतात. मोठा ९ वीत धाकटा ७ वीत. लहान भावाला खेळताना पाहून मोठा भाऊ म्हणतो, "खेळत काय बसलास? अभ्यास कर." लहान भाऊ ऐकतो. परीक्षेत मोठा भाऊ नापास होतो. लहान भाऊ पास. असे पुन्हा होते. शेवटी लहान भाऊ ९ वी पास होतो मोठा नापास. पुढच्या वर्षी मोठा भाऊ ९ वीत असतो धाकटा दहावीत. पुन्हा मोठा भाऊ धाकट्याला म्हणतो, "अभ्यास कर". धाकटा विचित्र नजरेने त्याच्याकडे बघतो. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, "मला माहिती आहे, तू काय विचार करतो आहेस. मी नापास झाल्यामुळे तुला काही सांगण्याचा अधिकार गमावला आहे असे तुला वाटते आहे. पण तसे नाही. मला तुझ्याबद्दल आस्था (concern) वाटते तोपर्यंत अभ्यास कर असे सांगणारच".

राजेश घासकडवी गुरुवार, 05/19/2011 - 08:18
थोडं धारदार झालंय, पण आवडलं. मला तुमच्या लेखणीतून जयंत कुलकर्णींनी वरती लिहिलं त्या धर्तीचं चंट पोरीचं पत्रही वाचायला आवडेल. आणि गरीब लोकांच्या भावना दुखावण्याविषयी मुद्दा पटला की काय? :)

In reply to by राजेश घासकडवी

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/19/2011 - 09:35
... चंट पोरीचं पत्रही वाचायला आवडेल.
जमणार नाही, आमचं कल्पनादारिद्र्य केवढं हो! तेवढं जमलं असतं तर दोन-चार कथा कादंबर्‍या नसत्या का पाडल्या! ;-) (बाकी चंट पोरींची पत्रं कसली वाचता! पथ्य पाळा त्यापेक्षा! ;-) )
गरीब लोकांच्या भावना दुखावण्याविषयी मुद्दा पटला की काय?
कोणाचा? कोणता? मूळ पत्रातला, अजिबातच नाही!

प्रियाली गुरुवार, 05/19/2011 - 09:07
पत्रातले विचार चांगले आहेत परंतु आताच्या जमान्यात मुलगी आईला पत्र लिहिल हेच पटले नाही. ;) गेले, गेले ते दिन गेले. आता समस लिहा. वरील पत्र मुलगी आईला एस.एम.एस्.द्वारे कसे पाठवेल ते लिहा बघू. ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा गुरुवार, 05/19/2011 - 10:43
mom, forget it. i'm already ruined..get over it. -Piya. (काडी टाकून झालेली आहे. आता शेकोटी कवा प्येटती त्ये बगत बसतूया.)

पंगा गुरुवार, 05/19/2011 - 09:14
संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतात
या दोन वाक्यांच्या परस्परसान्निध्यातून (juxtaposition) काही भलतेच संकेत डोक्यात चमकून गेले. "लेखन 'धारदार' झाले आहे" या (बहुतेक) श्री. घासकडवींच्या म्हणण्याशी सहमत.

In reply to by पंगा

आनंदयात्री गुरुवार, 05/19/2011 - 11:56
पंगाशेठ आज कोणता शर्ट घातला ?????? >>"लेखन 'धारदार' झाले आहे" या (बहुतेक) श्री. घासकडवींच्या म्हणण्याशी सहमत. अचानक विनोदाचा हा दण्णका पंच मिळाल्याने हसुन खुर्चीतुन पडायला झालं !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

रेवती गुरुवार, 05/19/2011 - 11:42
आजकाल मुली आईला असं पत्र लिहित असतील यावर विश्वास/ अविश्वास दाखवत नाही कारण तसा अनुभव नाही. माझ्या लग्नाच्या वेळी दहा वर्षाच्या आसपास लहान मुली असणार्‍या भाच्या, पुतण्या नुकत्याच नोकरीला लागल्यात आणि फेसबुकावर त्यांचे पार्ट्यांचे फोटू पाहून मला भोवळ आली होती ते आठवले. अंगभर कपडे घालायची फ्याशन कधीच गेली असे वाटले. या मुली आईला कसे पत्र लिहितील हा विचार करणे गमतीशीर असेल. माझ्या पुतण्याने नुकतीच इमेल लिहून त्याच्या काकाला (माझ्या नवर्‍याला) अमूक एका हिरव्या युनिव्हर्सिटीबद्दल विचारले. साधारण खर्च त्याला समजला होता पण अजून जरा खर्चाचा अंदाज घेऊन डायरेक्ट बाबांना कळवून टाक रे काका! यावर आम्ही आश्चर्याने हसलो होतो. सुट्टीत काय करतोय्स म्हणून विचारल्यावर "फ्लायींग क्लब जॉइन केलाय" असे म्हटल्यावर आम्ही आमच्या मुलाच्या शैक्षणिक्/अशैक्षणिक/क्षणिक अश्या सगळ्या खर्चांचा पुनर्विचार सुरु केला आहे. पत्र मजेशीर आहे. त्यातला जबाबदारी टाकण्याच्या मुद्द्याशी सहमत.

दैत्य गुरुवार, 05/19/2011 - 12:31
पत्र आवडलं.....कधीकधी असे विचार येणं स्वाभाविक आहे, असं लिहिल्यामुळे आईवरचं प्रेम कमी झालं आहे/कमीच आहे असं नाही वाटत..... शिवाय पहिला मुद्दा- माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात.: खूप पटला.... ह्या पत्रातली आई म्हणजे 'आपल्याला जिने जन्म दिला ती' असा टिपिकल अर्थ न घेता कोणी एक व्यक्ती म्हणून विचार केला तर वाचन अधिक सुसह्य होइल!

वेताळ गुरुवार, 05/19/2011 - 13:29
शेवटी पोरगी पत्र लिहण्याचे हत्यार उपसते ह्याचा अर्थ आईने तिला उपदेशाचे डोस पाजुन जाम बोअर केले आहे.

धनंजय गुरुवार, 05/19/2011 - 16:47
पत्र आणि प्रतिक्रिया. लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् । प्राप्ते तु षोडषे वर्षे पुत्रीं मित्रवदाचरेत् ॥ या जुन्या ढोबळ धोरणाचा व्यत्यास असा : पहिली पाच वर्षे लाड करून घ्यावेत, (वय वर्षे ०-५) त्यानंतर दहा वर्षे शिस्त लावतात ती लावून घ्यावी, (वय वर्षे ६-१५) त्यानंतर दहा वर्षे आई-वडील हे परिपूर्ण नाहीत हे समजून रागवायचे, (वय वर्षे १६-२५) त्यानंतर दहा-वीस आई-वडील हे स्खलनशील मानव आहेत, पण प्रेमळ मानव आहेत हे समजायचे. (वय २५-४५) त्यानंतर मग आपणही त्याच प्रकारचे स्खलनशील मानव आहोत, हे समजायचे. (वय ४५+)

In reply to by धनंजय

आनंदयात्री गुरुवार, 05/19/2011 - 17:02
छान सुभाषित, पण खालील गोष्टी कळल्या नाहीत. >>प्राप्ते तु षोडषे वर्षे पुत्रीं मित्रवदाचरेत् ॥ या एका ओळीत हा खालचा आख्खा अर्थ कसा कव्हर केला आहे ?? त्यानंतर दहा वर्षे आई-वडील हे परिपूर्ण नाहीत हे समजून रागवायचे, (वय वर्षे १६-२५) त्यानंतर दहा-वीस आई-वडील हे स्खलनशील मानव आहेत, पण प्रेमळ मानव आहेत हे समजायचे. (वय २५-४५) त्यानंतर मग आपणही त्याच प्रकारचे स्खलनशील मानव आहोत, हे समजायचे. (वय ४५+) प्राप्ते म्हणजे पंचवीस का ? मग सोळा ते पंचवीस वर्षापर्यंत मुलीशी मैत्रीपुर्ण नात्याने वागावे असा अर्थ होत नाही का ? (मित्रवदाचरेत् = मित्रवत + आचरेत)

In reply to by आनंदयात्री

धनंजय गुरुवार, 05/19/2011 - 19:07
व्यत्यास* *व्यत्यास आणि पाल्हाळ! आईवडलांनी १५व्या वर्षापासून मित्र म्हणून वागवावे खरे. पण त्या एकतर्फी मित्रत्वाच्या काळात मुलांचे आईवडलांविषयी मत तीन टप्प्यांनी बदलत जाते.

पक्या Fri, 05/20/2011 - 16:14
लेखातील विचार पटले नाहीत . आमच्या आईने मला आणि माझ्या बहिणीला नेहमीच अनेक चांगल्या गोष्टीसाठी उत्तेजन दिले आहे. उपदेशाचे डोस पाजले नाहीत असे नाही पण तिने अनेक गोष्टीत काळाप्रमाणे स्वतःमधे बद्ल केलेले आहेत त्यामुळे आमच्यावर तिने जुने , बुरसट विचार लादले असे कधीच झाले नाही. लहानपणी आणि कॉलेजात गेल्यावरही अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही भावंडे आपापला निर्णय घेऊनच करायचो. तिचा पाठिंबा असायचाच आणि अगदिच आमचा निर्णय अयोग्य वाटला तरी सरळ नकारा ऐवजी चर्चेतून त्यावर काही तोडगा काढला जायचा. कोणत्या आईला आपली मुले स्वतंत्र , जबाबदार, स्वावलंबी झालेली आवडणार नाहीत? काही आया अती काळजी करणार्‍या असतातही पण पत्रात लिहील्याप्रमाणे स्वतःच्या मुलीबाबत विचार करणारी आई अजून तरी पाहण्यात नाही. कदाचित ती मुलगीही (पत्र लिहीणारी) आईला समजून घेण्यात कमी पडलेली असेल म्हणून तिचे तसे विचार असतील.

विजुभाऊ Sat, 05/21/2011 - 14:55
जिंदगी तेरे दर पर मै हजार ठोकरे खाउं हर ठोकर पर अपनी जीत का एहसास जताउं ये क्या हो रहा है आज जमाने को ; ये सबको सुनाऊं कल यहां हमने भी यही किया था ये कैसे बताउं

चित्रा Sat, 05/21/2011 - 17:40
पत्र छान आहे. ज्या वयात जबाबदारी कळते अशा वयात लिहीलेले हे पत्र छान आहे. मात्र वेळेचे महत्त्व, कामाचे महत्त्व कळत नाही अशा वयात, दिवसरात्र फेसबुकावर बिजी असलेल्या मुलीला, जातायेता मित्रमैत्रिणींना समस करणार्‍या मुलीला तिच्या त्याच वयात प्रवचन दिले गेले नाही तर फारसे बिघडते असे नाही, पण मुलीचा तो वेळ (कधीकधी वर्षेही) मात्र जातो. शिवाय आईने मुलीची मैत्रिण होण्याचा अट्टाहास कशाला हे मला कळत नाही. यातून मैत्रिणीचे नाते श्रेष्ठ, आईचे कमी असे काही सूचित होते आहे. मैत्रिण होणे म्हणजे काय? आई राहणे म्हणजे काय? एकत्र राहता येणे, बोलता येणे, एकमेकांबरोबर असताना काही गोष्टी आनंदाने करता येणे हे मोकळेपणाने करणे हे आई-मुलांच्या नात्यातही अपेक्षित असते.