Skip to main content

ये रे ये रे पावसा! भाग - २

लेखक रेवती यांनी शुक्रवार, 28/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ये रे ये रे पावसा! भाग - १ पूर्वसूत्र -आदल्या दिवशीच्या माळीकामामुळे इतके दिवस सुखेनैव नांदत असलेले हे सगळे बेघर होउन इतक्या एकोप्याने खिडकीच्या काचेवर बसलेत असं वाटलं. पण असा एखादा साप पाहून बरेच लोक ओरडतील यावर विश्वास बसत नव्हता. --------------------------------------------------------------------- चतुरंगानं आता बाहेर काय चाललय हे बघायचं ठरवलं आणि हॉलकडे जाताजाता एकदम म्हणाला "अगं ऊठ पाणी आलंय, रात्री चुकून नळ चालूच राहिल्यानं सगळ्या घरभर पाणीच पाणी झालंय." मी ताड्कन उठून पाणी भरण्यासाठी नळाकडे पळाले. "कुठंय पाणी?" मी गोंधळलेली. " आणि हे काय? नळाला पाणी अजून आलंच नाहीये तरी....." मी. हॉलमध्ये घाईघाईने जाऊन बघितले तर जमिनीवरचे सगळे सामान पाण्याने गच्च भिजलेले. आणि त्या नव्या गाद्या......भिजून आणखी जड झालेल्या. अस्ताव्यस्त पडलेले पॅकिंग मटेरियल पाण्यावर तरंगत होते. अजून एखाद्या मिनिटात टि. व्ही. ठेवलेल्या टेबलाच्या पायावर पाणी चढले. चतुरंगाने खिडकी उघडली तर बाहेर पार्क केलेली स्कूटर पडायच्या बेताला आलेली. "अरे! चाललंय तरी काय?" दोघेही आश्चर्याने थक्क! स्वयंपाकघरात जाऊन मागचे दार उघडल्यावर दिसलेले दृश्य हादरवून टाकणारे होते. सहा फूटी, मजबूत वाटणारी भिंत रात्री कधीतरी पाण्याच्या लोंढ्याने चक्क वाहून गेली होती! परसदारातल्या चार पायर्‍यांपैकी अगदी वरच्या पायरीपासून ते नजर पोहोचेल तिकडे फक्त पाणीच होते .......चहाच्या रंगाचे गढूळ पाणी! लांबवर दिसणार्‍या एका बिल्डिंगचा पहिला मजला पाण्याखाली गेल्याने तिथले लोक गच्चीवर जाऊन बसले होते. वीज रात्री कधी तरी गेलेली. आमच्याकडे साधा फोन व सेलफोनही नव्हता. नक्की काय चालले आहे याचा पत्ताच लागत नव्हता. पाण्याला जोर तर एवढा की मोठी झाडे, घरांना छप्पर म्हणून वापरलेले पत्रे, लोकांचे सामान सगळे वाहून चाललेले. मी एका जागी फक्त खिळून उभी! घराचा उंबरठा ओलांडून पाणी आत शिरले आणि मग भानावर आले. काय करावे ते सुचेना. त्यातल्यात्यात ओळख असलेला आधार म्हणजे पाशाकाकू! चार वेळा हाका मारल्यावर लक्षात आले की सगळेजण रात्री लग्नाला जाणार ते चार दिवसांनीच येणार होते. तेवढ्यात चतुरंगाने परसदार लावून घेतले व काही सूचना दिल्या. पिण्याच्या पाण्याची एक बाटली, समोर दिसले ते बिस्किटांचे पुडे, रेनकोट्स एवढे एका पिशवीत कोंबून, छत्री हातात देऊन मला त्याने गच्चीवर जाण्यास सांगितले. एकीकडे आमची स्कूटर जमेल तशी व्हरांड्याच्या कठड्याला बांधून टाकली. सुदैवाने रात्री सगळी महत्वाची कागदपत्रे, पासपोर्टस व जरा जास्तीचे 'असलेले बरे' या विचाराने घेतलेले पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवले होते ते सगळे पुडके काखोटीला मारून हा दारापाशी आला तर मी तशीच उभी! दोन चार मिनिटांत पाणी घरात शिरायला सुरुवात झाली होती. बाथरूममधूनही पाणी उलटे घरात आले होते. "अगं बाई जा की!" नवरा ओरडला. माझा काही धीर होत नव्हता. पाय टाकताना जरा जरी अंदाज चुकला तर सरळ नाल्यातल्या मुख्य प्रवाहाला जाऊन मिळणार, कारण मला अडवायला ती मजबूत भिंत होतीच कुठे? आणि पोहायला यथातथाच येत असल्याने थरथर कापत, रडत तशीच उभी होते. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता म्हणून नवर्‍याने मला बाहेर काढून घराचे मुख्य दार बंद केले. एकमेकांच्या आधाराने बेताने अंदाज घेत घेत पावले टाकायला सुरुवात केली. चारच पावलांचे अंतर खूप वाटले त्यावेळेस! गच्चीवर पोहोचेपर्यंत पाऊस सुरु झाला होता. आता आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला व जरा विचार करायला वेळ मिळणार होता. पाशाकाकूंच्या घराची अवस्था आमच्या घरापेक्षा फार वेगळी नव्हती. त्यांचीही कंपाऊंड वॉल पडल्याने बागेत ठेवलेल्या सगळ्या वस्तू, बागकामाची हात्यारे, मुलांची खेळणी, सायकली सगळे आमच्या डोळ्यादेखत वाहून गेले होते. पहाटे येणारा ओरडण्याचा आवाज हा उजवीकडच्या घरातून येत होता कारण त्यांचे सगळे घरच वाहून गेले होते. सुदैवाने कुटुंबातील माणसे जवळच्या बिल्डिंगमध्ये सुखरूप होती. इतके दिवसात समोरच्या घरी फारशी ओळख झाली नव्हती. ते सगळे त्यांची नवी क्वालीस गाडी कशी वाचवावी या विचारात होते. घरातल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या दिसणार्‍या मुलाने एकदाची ती गाडी बंगल्याच्या आवारात घेतली व सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता आम्ही त्यांच्याशी संवाद साधणे भाग होते. आतेभावाला, वहिनीला व मामेसासर्‍यांना 'आम्ही ठीक आहोत' हे कळवावेसे वाटत होते व त्यांच्याबद्दलही विचारपूस करायची होती. आत्ता जो पूर आलाय तो नक्की कशामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता. दोनेक दिवसात मिळून चार शिंतोड्यांपेक्षा जास्त पाऊस झाला नव्हता, मग असे कशामुळे झाले असावे? मनात बरेच प्रश्न होते पण हाय रे दैवा! समोरच्या कुटुंबाला तेलुगु व थोडेसे इंग्लीश शब्द याशिवाय बाकी कुठल्याही भाषेचे ज्ञान नव्हते. त्यांच्या क्वालीसवर तिरूपती बालाजीचे स्टीकर व 'रामीनेनी' असे लिहिले होते. ते त्यांचे नाव आहे की आणखी कुठला शब्द? की बालाजीच्या अनेक नावांपैकी एखादे? कशाचाही पत्ता लागत नव्हता. कशाबशा बोटांनी खुणा करून फोन नंबर सांगितला व "वुइ आर फाइन" असे सांगितले. क्वालीस चालवणार्‍या उत्साही मुलाने तिथेच मोठा घोळ करून ठेवला. त्यानं आतेभावाकडे फोन करुन "टँक ब्रोकन, वाल वाश्ड आफ अँड वाटर येवरीवेअर!" असा निरोप दिला. त्यासरशी ते कार घेऊन निघाले कारण त्यांना असे वाटले की घराच्या वरची पाण्याची टाकी फुटून अपघात झालाय व त्यामुळे कंपाऊंड वॉल वाहून गेली आहे. त्यांच्या घरापासून जेमतेम पाव किलोमीटर अंतर आल्यावर त्यांना पाण्याचा लोंढा दिसला. आता ते पूर्णच गोंधळून गेले की घराचा टँक फुटला असेल तर एवढे पाणी कसे? पुन्हा घरी जाऊन कार ठेवून ते चालत आले तर आमच्या घरापासून २००-३०० मीटर परिघात त्यांना चार फूटांपर्यंत पाणी दिसले. आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. समोरचे 'रामीनेनी' (हे त्यांचे आडनाव होते ते नंतर समजले) घराबाहेर बसून पाण्याच्या लोंढ्याकडे हताशपणे बघत होते. मधूनच 'ब्रदर कमींग' असे म्हणत होते. त्यांचा ब्रदर थोड्याच वेळात येताना दिसला. दिडेकशे फुटांचे अंतर पार करण्यासाठी त्याला पंधरा मिनिटे लागली. हातातली जड बॅग डोक्यावर घेऊन तो चालायचा प्रयत्न करत होता. नंतर समजले की त्यात बरीच रोख रक्कम होती. आम्ही व आमच्या सारखी शेकडो कुटुंबे पाणी कमी होण्याची वाट बघत होतो. सकाळी दहाच्या सुमारास आमच्या घराची पायरी दिसू लागली. पाणी ओसरते आहे हे पाहून अतिशय आनंद झाला. मधेच चतुरंगाने घरात जाऊन फोल्डिंगच्या दोन खुर्च्या गच्चीवर आणल्या. अजून किती तास असे काढायचे हे माहित नसल्याने त्यावेळी खुर्ची असणे ही चैन वाटत होती. त्यानंतर विचार सुरू झाले ते आमच्या भिजलेल्या सामानाचे, घराच्या झालेल्या नुकसानाचे. सगळ्या परिसरात भरपूर चिखल व घाण झाली होती. घराघरातल्या सामानाचे ढीग रस्त्यावर आले होते. साधारण बारा वाजता पाणी बरेचसे कमी झाले व जवळजवळ आठ दहा तास अडकून पडलेले लोक बाहेर आले. पुढचे अनेक दिवस, अनेक महिने पुरेल इतके काम समोर दिसत असतानाही सगळ्यांना जगल्यावाचल्याचा आनंद झाला होता. आम्हीही टेलीफोन बूथ शोधायला बाहेर पडलो. खरंतर मुसळधार पाऊस झाल्याने हा पूर आला नव्हता. सिकंदराबादच्या उत्तरेला असलेल्या जीडीमेटला तलावाची भिंत खचल्याने आमच्या घरामागचा नाला व त्याच्या आसपासचा बराच मोठा भाग मुख्यत्वे पुरग्रस्त झाला होता. हवाई दल व नौदलाच्यामदतीने बर्‍याच लोकांना वाचवण्यात यश आले असले तरी गेलेल्या लोकांचा आकडा मनाला त्रास देणारा होता. नंतर आठवडाभर पुराच्या बातम्यांनी हैद्राबादचे वर्तमानपत्र चर्चेत होते. हळूहळू सगळ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन घरे, बागा साफ केल्या. पडलेल्या भिंती उभ्या राहिल्या. पाशाकाकूंचे कुटुंबही प्रथमदर्शनी बसलेल्या धक्क्यातून सावरले. पूर येऊन गेलेला असला तरी नेहेमीच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी 'ये रे ये रे पावसा!' अशी मनधरणी करण्यावाचून हैद्राबादकरांना गत्यंतर नव्हतेच. माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते. (समाप्त) रेवती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13207
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

बापरे! नवीनच एखाद्या ठिकाणी गेल्यावर, आणि पुन्हा भाषेच्या वगैरे अडचणी असताना हे असलं अनुभवायला मिळालं, म्हणजे किती घबारायला होईल गं रेवती!

In reply to by यशोधरा

पाउस खत्तरणाक !! रवती मैडम .. आपण एक फॅन निर्माण केलाय !! जरा कंटिण्यु लिहा हो :) (अर्थात .. वेळ मिळेल तसं )

हुश्श... मध्ये उगाच भीती वाटून गेली. पण इतकं होईतो तुम्ही गाढ झोपेतच कसे? भिंत वाहून गेली असा लोंढा आला तरी आवाज झाला नाही? जाग आली नाही?

बाप रे ! खरोखर भयानक अनुभव ! * कोल्हापुरात पुराचा अनेक वेळा अनुभव घेतलेला राजे !

रेवती, अगदी भयानक अनुभव. त्यातून फारसे नुकसान न होता वाचलात हे भाग्यच. मला तर २६ जुलै २००५ची आठवण झाली. अंधेरी पश्चिमेला माझ्या मामाच्या घरात जवळ जवळ ५-७ फूट चढलेल्या पाण्याची आठवण झाली. संसार धुऊन निघणे म्हणजे काय ते कळले तेव्हा. नंतर ८ दिवस घर साफ करत होतो. अतिशय घाण असे नाल्याचे पाणी घरात घुसले आणि त्यात परत कुजलेल्या सामानाचा वास. आजही अंगावर काटा येतो. घरातले सगळे सामान अगदी फ्रिजसुध्दा पाण्यात तरंगत होते मस्त पैकी. आणि नेमकी म्हातारी आजी घरी एकटी होती आणि सुदैवाने शेजार्‍यांच्या लक्षात आले म्हणून काही मुलांनी तिला हातावर उचलून पहिल्या मजल्यावर नेले आणि ती वाचली. मामेभाऊ तर अगदी घराजवळ पोचूनही रात्रभर एका बिल्डिंगच्या कंपाऊंड वॉलवर बसून राहिला. तो अजूनही गंमतीने म्हणतो की चालत रोजच घरी यायचो. पोहत पोहत घरी यायचा योग एकदाच आला. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी त्या दिवशी बॅन्ड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधुन चालत निघाले होते. ३-४ 8| तासानी शिवाजि पार्क ला पोहोचले. चुचु

हादरवुन टाकणारा अनुभव..! डॉल्बी सिस्टीम स्टाईल लेखनशैली... सर्व काही डोळ्यासमोर घडतेय असे वाटले..!! (ह्या निमित्ताने काही सरकारी अनुभव ही आले असतील ना.?(कॉम्पेनसेशन..) अथवा घरमालकासोबत नुकसानभरपाईसंबंधात बोलणी.इ.इ.... ते ही वाचायला आवडतील.) (पोहु नव्हे तरंगु शकणारा) योगेश.

मुंबईतला २६ जुलै आठवला. आम्ही पहिल्या मजल्यावर रहात असल्याने आमच्या घरात पाणी शिरले नाहि मात्र खालच्या चारहि घरांत टिव्ही पर्यंत पाणी .. खालच्या कार, रिक्षा पूर्ण पणे पाण्याखाली.. रात्री ३ ला दारावर थाप पडली व खालची चारही बिर्‍हाडे आमच्याकडे राहिली होती. पुढे त्यांची घरे साफ करण्यात आठवडा गेला होता. दुसर्‍या दिवशी फ्युज काढून ठेवले होते त्यामुळे मुणबत्त्यांचा दुष्काळ होता. मी ५ किमी चालत जाऊन बोरीवलीतून अख्ख्या सोसायटीसाठी अश्या गरज पडल्या तर असूदे म्हणून चांगल्या १० डझन मेणबत्त्या आणल्या होत्या. (लोडशेडींग नसल्याने आता त्या लागतच नाहित.. तेव्हा लोक त्या अजूनही वापरतात :) ) यात काहि फार सांगण्यासारखं आहे असं नाहि पण असं काहि वाचलं की हे सगळ आठवतं... असो..
माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते.
+१ फारच छान लिहिलंय.. चित्रदर्शी! ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून ४७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता"ओळखलंत का सर मला, पावसांत आला कोणी...."

भयानकच ग, २६ जुलै आणि त्याआधी २००० सालच्या आषाढी एकादशीला अडकलेले नातेवाईक आणि आमची होणारी घालमेल यांची आठवण साहजिकच झाली. माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते. अगदी खरं.. अनुभव उत्तम शब्दबध्द केला आहेस, जरा नियमित लिहायचे मनावर घे. स्वाती

अगाबाब्बो!!! :SS अशा वेळी सरपटणार्‍या प्राण्यांचा (जास्त करुन साप) त्रास होण्याची शक्यता जास्त. अशावेळी मनात भिती बसतेच. घडलेल सगळ परत परत रिवाइन्ड होत जेव्हा जेव्हा जोराचा पाउस दिसतो. हो ना?

बापरे....कसला भयानक अनुभव आहे .... पण फार मस्त लिहिले आहे...डोळ्यासमोर सगळं दृश्य तरळुन गेलं

बापरे. भयंकर अनुभव. आणि हो चित्रदर्शी लेखनशैली. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

दोन्ही भाग आताच वाचले. जबरा ! लेखन शैली सुरेख. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

दोन्ही भाग आताच वाचले. जबरा ! लेखन शैली सुरेख.
- सहमत आहे.
माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते.
- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


बापरे! काय भयानक अनुभव आला तुम्हाला! त्यातून सुखरुप फार नुकसान न होता वाचलात.. खरच भाग्य! अनुभव कथन उत्तम झाले आहे. तुमचा कसा गोंधळ झाला असेल ते सगळे डोळ्यासमोर उभे केलेस. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

सहमत आहे. भयानक अनुभव. लिहिले छान आहे. -- लिखाळ. आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)

नविन ठिकाणी आल्याआल्या कसला भयानक अनुभव. वाचतानाच मला कसेसे झाले.

नविन जागेत गेल्यावर पुढे काय वाढून ठेवलं असेल याची कल्पनाही नसेल तुम्हाला. वाचूनच अंगावर काटा आला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हा अनुभव खतरनाक होता. न विसरण्याजोगा !!! मीनल.

गंभीर अनुभव! सुरेख चित्रण!!! अवांतरः बाकी हे लिखाण क्रमशः लिहिल्याबद्दल अभिनंदन!!! (क्रमशः तितुका मेळवावा.. क्रमशःधर्म वाढवावा) ;)

प्रतिक्रियांबद्दल आपणा सर्वांचे आभार! वाचनमात्र असलेल्यांचेही आभार! आता घडून गेलेल्या घटनेची भीती कमी झालीये. घाबरगुंडी उडाल्याबद्दल नंतर थोडे हसूही आले. श्रावण मोडक यांनी विचारलेले प्रश्न बर्‍याचजणांनी विचारले. आम्हाला जाग आली नाही एवढेच सांगू शकते. भिंत पडल्याचा आवाज झाला नाही कारण पाण्याच्या लोंढा बराच जोरात आला असावा. नंतर पडलेल्या दगडांचे अवशेष काही मिळाले नाहीत. योगेश, या प्रसंगानंतर घरमालकांनी आम्हाला तात्पूरते कंपाऊंड तातडीने बांधून दिले. चोरी होऊ नये म्हणून महिनाभरात पक्की भिंत बांधायला सुरूवात झाली होती. मालकीणबाईंनी अठवडाभर पिण्याचे स्वच्छ पाणी घरी आणून दिले कारण रोगराई पसरण्याची हीच वेळ असते. श्री. व सौ. कृपेश्वरांनी तक्रार करण्यास जागा ठेवली नाही. थोडीफार गैरसोय तर सगळ्यांचीच झाली. दरम्यानच्या काळात दोन तीन चोर्‍या झाल्याच. स्वातीताई, नियमीत लिहीण्याइतका धीर गोळा करतीये. सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे ते जमेल असे वाटते. पुन्हा सगळ्यांचे आभार! रेवती

रेवतीताई,तुमची शैली अतिशय चित्रदर्शी आहे. हे सगळं वाचतांना आम्हीही तिथेच होतो ह्याचा पदोपदी भास होत होता. तेव्हा आता इतर सगळ्यांनी म्हटलंय त्याला 'मम' म्हणतो. असेच नियमित लेखन करत चला. मिपावर आता तुमचाही 'फॅणक्लब'(टारूशेठच्या भाषेत)तयार झालाय.....त्याचा मीही एक सदस्य आहे. :) खुदके साथ बातां: बाकी रंगाशेठचे सगळंच कुटुंब साहित्यिक दिसतंय.फावल्या वेळात आपापले कोपरे आणि संगणक पकडून हे लोक बहुदा वाचन/लेखनच करत असावेत असं दिसतंय. :) माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

लेख आताच वाचला. ओघवत्या शैलीतले उत्तम लिखाण. अशा प्रसंगांची आठवण कधी न पुसणारीच. परंतु त्यावेळच्या मनःस्थितीचे , एकंदर परिस्थितीचे चित्रण सुरेख आले आहे. आणि होय, सस्पेन्स तर शेवटच्या परिच्छेदापर्यंत चांगलाच राखलाय. असे अनुभव काय शिकवितात असा प्रश्न मला पडला. आजूबाजूला पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि इथे पूरामुळे माणसे बळी जाणे यातली विसंगती विशेष जळजळीत आहे. आणि मग अर्थातच नेहमीचा प्रश्न : झाल्या घटनेचे उत्तरदायित्व. या गोष्टीला मात्र कसलेच महत्व नसणार , साधी चौकशी देखील झाली असेल की नाही कोण जाणे. लेख दीर्घकाळ स्मरणात राहील असा.

In reply to by मुक्तसुनीत

>लेख दीर्घकाळ स्मरणात राहील असा. सहमत.

फारच भयानक अनुभव आला तुम्हाला.वाचताना चित्रच उभे राहिले समोर.

कसला विचित्र आणि भयानक अनुभव आहे! वाचूनच अंगावर काटा आला. लिखाण खूपच आवडलं. चित्रदर्शी आणि ओघवतं. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

जबरा अनुभव, सुंदर लेखन.. तात्या.

आधीच अनोळखी ठिकाण त्यात असला अनुभव भयाण ! पुण्यातल्या आमच्या सोसायटीच्या मागे एक ओढा आहे. पावसाळ्यात त्या ओढ्याचं पाणी वाढून पार आमच्या घराच्या पायरीपर्यंत यायचं ... ५-६ घरं पार करून ... सगळी घरं जीव मुठीत घेऊन.... त्या आठवणी जाग्या झाल्या. रंग्या मात्र एकंदर प्रसंगावधानी दिसतोय.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार! टार्‍या, प्रमोदकाका, 'फॅनक्लब' म्हणून मला लाजवू नका! मुक्तभाऊ, घटनेची साधी चौकशीही झाली नाही. नुकसानभरपाई वगैरे विसलेली बरी.....कुठले उत्तरदायीत्व आणि काय? लिंक देण्यासाठी जालावर त्या घटनेवर लिहिलेले काहीही सापडले नाही ज्यामुळे तारीख, वार देउन लेखात आणखी नेमकेपणा आणता आला असता. धन्यवाद! रेवती