मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

मन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपुन मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं ...श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह. वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान्-मोठे ,डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज. अशाच वेळी जाताना मनोबाला दिसलं कुणीसं रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षाखाली बसलेलं.... एक शांतचित्त प्रसन्नमुख दाढीधारी शुभ्र व्यक्तिमत्व. मनोबा सहजच तिकडं ओढला गेला. त्यानं मनोबाला गंभीर्,पण प्रसन्न आवाजात विचारलं "कुठं चाललात मनोबा? कुठुन येताय? " "झेंडावंदनाहुन येतोय." लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानच तोंडात टाकत मनोबा पुढं म्हणाला:- "आज भारताचा पन्नासावा स्वातंत्र्यदिन." "म्हणजे नक्की काय?" नीट मनोबाकडं निरखत योग्यानं विचारलं. "म्हणजे..म्हणजे बरोब्बर पन्नास वर्षापुर्वी .... १)ह्याच दिवशी परकिय राज्यकर्ते देश सोडुन गेले. आणि----- २)देश स्वतंत्र झाला." मनोबानं फाटकन् आत्ताच ऐकलेल्या भाषणातलं उत्तर दिलं. "ह्यातलं पहिलं पुर्ण अचुक. पण........"--योगी "पण काय ?"-- डाव्या बाहीनं नाक पुसत, गोड शेंबुड गिळत निरागस पोर विचारतं झालं. "दुसरं तितकसं बरोबर नाही."-- मोठ्ठे डोळे आकाशात लावत, आपल्याच तंद्रित योगी बोलला. "म्हणजे?" मनोबा. योगी काहिच न बोलता चालु लागला.आणि त्याच्या मागोमाग मनोबा! थोडसं पुढं जाताच एक मोक्ळी जागा, छोटासं मैदान लागलं. एक मोकळा बैल तिथं फिरत होता. "अरेच्चा! हा मोकळा असुनही गोल गोल का फिरतोय?"--चकित मनोबा. "हा पुर्वी पासुनच घाण्याला जुंपला होता. नुकताच सोडवुन कुणीतरी आणलाय इथं. सध्या त्याच्यावरची साखळी,दोरी घाणा ही बाह्य बंधनं काढुन टाकण्यात आली आहेत. " "आणि म्हणुनच हा स्वतंत्र झालाय्...बरोब्बर??"खुश होत मनोबा वदला. "तुच ठरव ते." गंभीर आवाजात बोलत योगी हळुहळु लुप्त झाला. मनोबा दिङ् मूढ होत (मट्ठ बैलाबद्दल कुतुहलान विचार करत)लुप्त होणार्‍या तेजाकडं बघु लागला....

वाचने 2806 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अवलिया 18/08/2009 - 14:22
उत्तम रुपककथा. आवडली. --अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती 18/08/2009 - 14:44
लघुकथा आवडली. (मनोबाचं वर्णनही विशेष आवडलं, चित्र समोर उभं राहिलं) अदिती

बाकरवडी 18/08/2009 - 14:51
छान ! आवडली कथा !! :) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

लिखाळ 18/08/2009 - 15:41
"अरेच्चा! हा मोकळा असुनही गोल गोल का फिरतोय?"--चकित मनोबा. :) छान कथा ! खरेतर भारतीय मनोवृत्तीशी आणि स्वातंत्र्याशी याची सांगड मला कळाली नाही पण रूपकाची योजना आणि कथेची पद्धत आवडली. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 18/08/2009 - 19:12
आवडली कथा !

धनंजय 18/08/2009 - 20:37
गमतीदार कथा. **मात्र दृष्टांत माझ्या बघण्यातला नाही. (म्हणजे घाण्यावरून सोडल्यानंतरही बैल गोल फिरत राहातो, हे मी बघितलेले नाही किंवा ऐकलेले नाही.) चक्षुर्वै अनुभवाचा "दृष्टांत" मला अधिक भावतो, आणि त्यातून सांगितलेला बोधही अधिक पटतो.**

In reply to by धनंजय

मन 18/08/2009 - 22:05
म्हणण तर खरय. पण इथं (कथेला) आवश्यक तितकाच कंटेंट(मराठी शब्द??) उघड करायची "writer's Liberty" घेतली आहे. मनोबानं पाहिलेला बैलोबा गोल गोल फिरत होता. (तसं म्हटलं तर तो कुठल्याही कारणानं फिरु शकतो. कदास्चित त्यानं ,कुठल्याही नॉर्मल बैलानं सुद्धा एखाद -दोन गिरक्या घेणं अगदिच अशक्य नाही.) "बैल घाण्यातुन सुटुन आलाय " असं त्याला सांगण्यात आलय. त्याचा ठाम निष्कर्षसुद्धा दिलेला नाही. दिलेला आहे तो निव्वळ उलब्ध विदा/डेटा ... तो असा:- १. समोर एक बैल आहे. २.तो बैल फिरताना दिसलाय. ३. तो नुकताच घाण्यातुन सुटुन आलाय. असं मनोबाला सांगण्यात आलय. मनोबाला मिळालेला विदा इतकाच. बाकी,मनोबा अजुनही विचार करतोच आहे.संभ्रमित आहे. निष्कर्षाप्रत कथेत(आणि अजुनही) मनोबा पोचलेला नाही. केवळ एक निरिक्षण आणि त्यात (वास्तवात खरी) वाटु शकणारी एक लिंक दिसते आहे. म्हणजे, जर दोन विधाने आहेतः- वाक्य १.काल ओसामाला हृदय्विकाराचा झटका आला. वाक्य २.काल ओसामाचा मृत्यु झाला. ह्यात एक वाक्य न लिहिताही (मानवी मनाच्या उपजत प्रवृत्तीमुळे,दर घटनेत लिंक लावण्यामुळे) एक वाक्य अध्याहृत धरण्यात येतं ; ते म्हणजे :- वाक्य १+ २ =वाक्य १.५ ="काल ओसामाचा हृदयविकाराच्या (तीव्र?) झटाक्याने मृत्यु झाला." वस्तुस्थिती प्रत्यक्षात मात्र कैक पटीनं वेगळे असु शकते. ती अशी:- वाक्य १. काल ओसामाला हृदय्विकाराचा झटका आला. वाक्य १.१ओसामाला आलेला झटका सौम्य होता. वाक्य १.३ तो झटका ओसरत नाही तोवरच त्याच्यावर छापा मारण्यात आला. वाक्य १.४ छाप्यादरम्यान झटापटित त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच :- वाक्य २. काल ओसामाचा मृत्यु झाला. आणखी एक विचित्र उदाहरण म्हणजे काल "क्ष च्या आइचं निधन झालं." असं वाक्य ऐकु आलं तर डोळ्यासमोर पटकन काय चित्र येतं? क्ष कितीही वयस्कर असला तरी त्याच्या आइची प्रतिमा ही "क्ष पेक्षा अधिक वयाची स्त्री " अशीच येते. त्याच्या सावत्र आईचं वय त्याच्याहुन कमी असुन तिचा मृत्यु झालाय. ही सुद्धा एक शक्यता असु शकते. हे सामान्य मानवी विचारप्रवाहात येतच नाही. आपण तिथेही "वय" हा घटक अध्याहृत धरलेला असतो. इथही , मानवी मनाचा हाच गुण पकडण्यात आलाय. दिसलेल्या हरेक गोष्टीत शक्य तशी तर्क संगती मानवी मन लावायचा प्रयत्न करते. निसर्गातील हरेक घटनेलास हरेक वेळेला तर्क संगती असेलच असे नाही.(या विरुद्ध मताची आहे "chaos Theory " पण विषयांतर भयानं त्याचे डीटेल्स टाळतोय.) म्हणजे बाकी, अजुन थोडी एखादी ओळ भर म्हणुन घालाविशी वाटत आहे. ती कथेचं "अपेंडिक्स"(उपसंहार??) म्हणुन टाकतोय लवकरच. तस्मात , अगदी सुरुवातेलाप्रतिसादा दिलेल्या वाक्य क्र. २ आणि ३ मध्ये लिंक आहेच. आणि असलीच तर ती(च) एक अचुक लिंक आहे असा लेखकाचा दावा नाही. पण त्यानं घटनेला अर्थ मिळावा ह्यासाठिच ही "फट" हा "गॅप" मुद्दाम ठेवलेला असु शकतो. हवं तेवढं सत्य दाखवणं आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे सोयीचं नसलेलं "ग्रे एरियात" टाकणं/दुर्लक्ष करणं किंवा लपवणं हा यशस्वी लेखन्,पत्रकारिता,राजकारण आणि एकुणच यशस्वी व्यवहाराचा शॉर्टकट आहे असं मानणारा आपलाच, लब्बाड आणि विचित्रविचारी मनोबा