पंचमचे पहिले गीत
लेखनप्रकार
तसे म्हटले तर चित्रपटांतील प्रत्येक गीत एक स्वतंत्र प्रकल्पच असतो. कधी गीत आधी लिहीले जाते व त्याबरहुकूम चाल बसवली जाते, तर कधी चालीची फ्रेम प्रथम तयार असते, व गीतकार त्यावर गीत लिहीतो. काही असले तरी त्या दोघांचा सुंदर मिलाप झाला व ते प्रथितयश गायकांनी/ गायिकांनी निपुण साजिंद्यांच्या साथीने गायले की एक वेगळीच बहार निर्माण होते. ह्यापूढे त्याचे चित्रीकरणही त्या गीताच्या साजेश्या तर्हेने झाले तर ते गीत प्रेक्षणीयही ठरते, पण अनेकदा हे असे होतेच असे नाही. तरीही (आणि पूर्वीच्या काळातील गाण्यांच्या बाबतीत हे विशेषरित्या लागू आहे) ते गीत इतके श्रवणीय असते, की चित्रपट बघतांना डोळे मिटून ऐकावे.
हे सर्व आताच आर. डी. बर्मन उर्फ पंचमचे पहिले गीत बघतांना/ ऐकतांना प्रकर्षाने जाणवले. अनेक वर्षे ते आपल्या वडिलांना संगीत दिग्दर्शनात मदत करत होते. वडिलांनी हिंदी चित्रपटसृष्टित मानाचे पान पटकावले होते, त्यांना त्यांचा समर्थ हातभार होता, पण तो पडद्यामागूनच-- एक सहाय्यक म्हणून. शेवटी त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करण्याचे ठरवले तेव्हा पहिले गीत अर्थातच लताबाईंकडून गाऊन घेतले. 'घर आजा घिर आए, बदरा सांवरिया' हे ते गीत. नेहमीचीच सिच्युएशन आहे-- 'तो' मित्रांसोबत कोठीवर रमला आहे, व अर्धी रात्र उलटून गेली तरी तो काही घरी आला नाही, म्हणून 'ती' त्याची वाट बघत आहे. ह्यावर शैलेंद्रने आपली कमाल शब्दात अशी दाखवली आहे -
घर आजा, घिर आये, बदरा सांवरिया,
मोरा जिया धक धक रे, चमके बिजुरिया
सुना सुना घर मोहे, डसने को आये रे
खिडकी पे बैठे बैठे सारी रैन जाये रे
टप टिप सुनत मै तो भयी रे बांवरिया
कसमत जियरा, कसक मोरी दुनी रे
प्यासी प्यासी अंखियों की कलिया है सुनी रे
जाने मोहे लागे किस बैरन की नजरिया
पंचम साहेबांचे तालवाद्यांवर प्रभुत्व होते, आणी तालांशी, लयीशी खेळ करण्याचे त्यांचे कसब लाजवाब होते. 'छोटे नबाब' ह्या च्चित्रपटापासून सुरू झालेल्या त्यांच्या पुढील कारकीर्दीत त्यांनी अनेक पाश्चात्य धर्तीची तालवाद्ये व त्याबरहुकूम ठेके प्रामुख्याने व अत्यंत कुशलतेने वापरले. पण ह्या पहिल्याच स्वतंत्रपणे दिलेल्या गाण्यास त्यांनी खास भारतीय अशा सात मात्रांच्या रूपक तालात बांधले आहे. हेच मुळात एक धार्ष्ट्य होते, कारण सर्वसाधारणपणे कुठलाही संगीतकार पहिली वहीली गीते साध्या चार मात्रांच्या केहेरवा अथवा सहा मात्रांच्या दादरा ह्या तालांत बांधतो. इथे सगळाच अनोखा प्रकार. आणि त्याहीपुढे वैशिष्ठ्य म्हणजे त्या सात मात्रांच्या ठेक्यातून त्यांनी काही अनोखी रूपे दर्शवली आहेत. उदा. मुखड्याच्या दुसर्या ओळीतील 'धक धक' , तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण!! रूपकचे इतके बहारदार इंटर्प्रिटेशन दुसरे माझ्या ऐकण्यात नाही.
आणि हे गीत लताबाईंनी त्यांच्या नेहमीच्या संयत शैलीने गायले आहे. हे गीत कुठल्या रागावर आधारित आहे, ह्याबद्दल तात्यांसारख्या जाणकाराने सांगावे.
उत्सुकतेने हे गीत येथे पाहिले, आणि त्याचे चित्रीकरण मात्र अत्यंत ढोबळ वाटले. पण पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे.
वाचने
4204
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
गाणे ऐकले..
In reply to गाणे ऐकले.. by प्राजु
रुपक
In reply to रुपक by केशवराव
अरे हो की..
वा!
In reply to वा! by ऋषिकेश
+१
In reply to +१ by चित्रा
+२
In reply to +२ by धनंजय
+३
छान...
सुरेख रसग्रहण
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान लेख
वा!
धन्यवाद
फार सुंदर गीत
In reply to फार सुंदर गीत by संजय अभ्यंकर
ह्या
एम पी ३