मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

देवदत्त · · जनातलं, मनातलं
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात. बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची. दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral. ह्या बातमीत आत काय लिहिले होते? "विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे." त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले. अरे, काय चाललंय काय? एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय? मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील. पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे पहा. तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का? लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.

वाचने 13349 वाचनखूण प्रतिक्रिया 22

मुक्तसुनीत Wed, 12/26/2007 - 03:38
मला वाटते आपण सर्व गतानुगतिक बनून "पॉप कल्चर" अर्थात् , "चंगळप्रधान संस्कृति"च्या मागे जातो. (टॅब्लॉइड् ऑव्ह इंडिया मी सुद्धा सवयीचा परिणाम म्हणून बघतो. खोटे का बोला ?) . शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. एक महाकाय विनोद म्हणून त्याकडे पहावे आणि माहितीस्फोटाच्या या युगात योग्य त्या ठिकाणी जावे .... मी आउट्लुक , रीडीफ आणि बीबीसी पहातो. हिंदु सुद्धा आपला बोज राखून आहे. इतरानी त्यांची आवड्ती स्थळे सांगावीत अशी विनन्ती...

In reply to by मुक्तसुनीत

विसुनाना Wed, 12/26/2007 - 11:14
शेवटी आपला नीरक्षीरविवेक वापरून माहितीच्या योग्य स्त्रोताकडे जाणे योग्य. जे भंगार आहे ते आहेच आणि त्याला उत्तम बाजरपेठ आहे. अगदी हेच! कोणत्याही गोष्टीचा या ना त्या प्रकारे फायदा उठवला जाणार हेच अंतिम सत्य! आपण कोणत्या बाजारात जातो ती बाजारपेठ फक्त आपण ठरवू शकतो.

देवदत्त Wed, 12/26/2007 - 07:47
तुमचे म्हणणे काहीसे पटते. मला ही त्या बातमी मध्ये जास्त लक्ष घालावे असे वाटत नव्हते. मी परवा फक्त त्याची छापील आवृत्ती बघितली होती.(त्यांनी घातलेल्या सवयीचा परीणाम म्हणून वाचली असेल) पण काल जेव्हा संकेत स्थळावर आणखी काही बघितले तेव्हा राहविले नाही.

विसोबा खेचर Wed, 12/26/2007 - 08:18
लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख. देददत्तराव, अगदी उत्तम केलंत! तेजी बच्चन यांच्या मृत्युचा, निरनिराळ्या वाहिन्यांवरही दिवसभर जो काय तमाशा चालला होता तो पाहून खरं तर मला या लाचार वाहिन्यावाल्यांची, त्यातल्या वृत्तनिवेदकांची आणि वृत्तप्रतिनिधींची कीव आली! तात्या.

छोटा डॉन Wed, 12/26/2007 - 23:53
दोष एकटया मिडियाचा नाही..... या लोकांना ही सवय लावण्यात काही सेलेब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्ती कारणीभूत आहेत. खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ..... समजा चूकून एखाद्यादिवशी यांना प्रसिध्धी मिळाली नाही अथवा कुठे नाव आले नाही तर यांना चैन पडत नाही ........ "पेज थ्री " चित्रपटामध्ये म्हणजे या प्रवॄत्तीचा पडदा फाडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे............. तेव्हा हे स्वाभाविकच आहे.......... लोड नाही घ्यायचा !!!!!

In reply to by छोटा डॉन

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 07:33
खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो .... मला नाही वाटत की अमिताभ चा ह्यात समावेश होतो. अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. स्वतःच्या आईच्या मरणानंतर ते प्रसिद्धीकरीता मिडीया ला बोलवतील हे मला नाही वाटत. कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. (मी मुद्दामच हा लेख चर्चा अथवा काथ्याकुट ह्या सदरात टाकला नाही आहे)

शब्दवेडा गुरुवार, 12/27/2007 - 16:12
खरोखर, तेजी बच्च्चन यांच्या अंत्यविधिचा सर्व वाहिन्यांनी जो तमाशा चलविला होता तो अतिशय घृणास्पदच म्हणावा लागेल्....एका वाहिनीवर तर चक्क तिरडी बांधण्याच्या सोपस्कारांचे यथेच्छ चित्रण चालले होते.....

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 17:53
या सर्व माध्यमांना बाहेरुन खुप पैसा मिळतो त्यांना यादेशातील लोकांना भ्रामक दुनियेत रमवायचे आहे (मेट्रीक्स) त्याला हातभार अमेरिकेतले देसी लावतात उपाय खुप सोपा पण अवघड आहे तो म्हणजे डोलर इकोनोमी तोडणे नाना

सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 18:32
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल.

In reply to by सुधीर कांदळकर

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:36
जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात श्रद्धावंताच्या श्रद्धांचे व बावचळलेल्या पेज थ्री संबधितांचे एकत्र मुल्यमापन करु नका श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका नाना

In reply to by सुधीर कांदळकर

देवदत्त गुरुवार, 12/27/2007 - 23:08
परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. हे असते. परंतु इथे जास्त वाद नाही आहे. मला त्याची प्रसिद्धी करायची म्हणून मी इथे लिहिले नाही. (असे वाक्य मी आधीच लेखात लिहिले होते. पण नंतर काढून टाकले.) लेखात जे काही लिहिले तो तर कहरच. त्यावर ती मूळ बातमी त्यांच्या संकेत स्थळावर "मनोरंजन" ह्या विभागात होती. (आता अमिताभ, अभिषेक, विवेक ओबेराय मनोरंजन क्षेत्रात आहेत म्हणून काय ही बातमी तिथे टाकावी. असो, पुन्हा उगाच वाद नको :( )

छोटा डॉन गुरुवार, 12/27/2007 - 20:02
"श्रद्धावंताना त्यांच्या श्रद्धांच्या एवजी दुसरे तुम्ही देवु शकत नसाल तर त्यांच्या श्रद्धांवर हल्ला करु नका" श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... श्रध्दाळू [छोटा डॉन]

In reply to by छोटा डॉन

अवलिया Fri, 12/28/2007 - 16:15
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. माहीमची खाडी, गणपतीचे दूध पिणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देतच मोडतात .......... जरा श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक समजावुन सांगता..? पुराव्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असते तेव्हा तर्क चालत नसतो. म्हणजेच डोळसपणे श्रद्धा असणे हि अतार्किक गोष्ट आहे. श्रद्धा मुळातच अंध असते विकृत श्रद्धा म्हणु शकता पण पुन्हा प्रश्न विकृत कशाला म्हणायचे? तेव्हा ज्याच्या त्याच्यावर सोडवुन देणे उत्तम गिधाडे. दुसरे काय? प्रेषक सुधीर कांदळकर ( गुरू, 2007-12-27 18:32) . परंतु ब-याच वेळा वादग्रस्ततेमुळे अनावश्यक प्रसिद्धी मिळते. प्रस्तुत लेखक तसेच प्रतिक्रिया देणारे हे सर्व सुसंस्कृत लोक आहेत. टा ऑ इं मधील प्रस्तुत बातमीची आपणांसारख्या माननीय व सुसंस्कृत लोकांकडून प्रतिक्रिया घेण्याची लायकी नाही. अशा बातम्या वेगळ्या लोकांसाठी आहेत जे माहीमच्या खाडीचे गोड पाणी चाखतात गणपती दूध पितो त्याचे समर्थन करतात. अशा बातमीला आपणांसारख्यांनी अनुल्लेखाने मारावे हे श्रेयस्कर ठरेल. मुळात श्रद्धेचा संबध नसताना वरती सलणारा उल्लेख आला म्हणुन उत्तर. नाना

In reply to by छोटा डॉन

सखाराम बाइंडर Sat, 12/29/2007 - 12:48
श्रध्देचे जरूर समर्थन करू पण अंधश्रध्देचे कदापी नाही. तुम्हि कोन टिकोजीराव लागले जे श्रद्धेचे समर्थन करु लागले? म्हणे श्रध्देचे जरूर समर्थन करू गरज काय तुमच्या समर्थनाची........ खरा डॉन (बाकीचे क्लोन)

इनोबा म्हणे Sat, 12/29/2007 - 15:28
च्या... हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?अभिनेता म्हणून तो कसाही असो!पण माणूस म्हणून तो 'कसा' आहे हे स्वतः त्याच्या भावाने एक पुस्तकात प्रसिद्ध केले आहे.तेव्हा त्याचे समर्थन करण्याची गरज नाही असे वाटते.(बोफोर्स घोटाळा विसरू नका) प्रसारमाध्यमांची 'आगीत वांगे भाजण्याची त-हा' संपुर्ण देशाला कळली आहे,विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. प्रसारमाध्यमांचा स्वार्थीपणा आता लपून राहिलेला नाही आणी त्यांची खरी गरज असलेला तथाकथीत 'पेज थ्री' वर्ग ही समाजापुढे नागडा पडला आहे,अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?अमिताभ त्याच्या आईची कशी सेवा करत होता आणी त्याच्या आईबापावर त्याचे किती प्रेम आहे ही 'बातमी' होऊ शकते याचेच आश्चर्य वाटते.शिवाय त्यांच्या अंत्यसंस्काराला येणारा 'पेज थ्री' वर्ग आणी त्या निमीत्ताने त्यांना बघायला आलेला 'पंखा' वर्ग ही या सर्व अधःपतनाला जबाबदार आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अवलिया Sat, 12/29/2007 - 18:36
ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय? माझ्यामते तो अनिवासी भारतीय होता अमेरीकन नागरिकत्व घेतले नव्हते अनिवासी भारतीय कुणिपण तुम्ही सुद्धा होवु शकता जर तुमचे वास्तव्य कायद्यातिल तरतुदी नुसार भारताबाहेर काहि कअलाकरता झाले असेल तर अनिवासी भारतीय होणे काही गैर नाही कारण आपले अनेक आय टी मधील भारतीय अनिवासी भारतीय म्हणुन गणले जातात यात प्राप्तीकर चुकविणे नसुन करनियोजन म्हणता येइल जे अजिबात गैर नाही विषयाला सोडून तुम्ही लोक 'श्रद्धा आणी अंधश्रद्धा' या 'कोंबडी आधी का अंडे आधी' सारख्या 'काश्मीर प्रश्न्नावर' भांडीआपट करत आहात. श्रद्धेचा विषय मी आणला नाही पण ज्या पद्धतीने पेज थ्री व कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवणारे यांची जी तुलना केली ती अत्यंत घृणास्पद व चीड आणणारी होती नाना

देवदत्त Sat, 12/29/2007 - 23:33
"ज्या अमिताभने केवळ प्राप्तीकर चूकवण्यासाठी अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले त्याला काही लोक सहानुभूती दाखवतात म्हणजे काय?" "अमिताभची आई असण्याशिवाय तेजी बच्चन यांचे निराळे कर्तुत्व ते काय्?असे असताना त्यांच्या मृत्यू आणी अंत्यसंस्काराची एवढी जाहिरातबाजी कशाला हवी?" हे जरा वैयक्तिक होते आहे असे मला वाटते. त्या दैनिकात ते कोणी लिहिले त्या माणसाशी मला काही घेणे देणे नाही. मी जे काही लिहिले ते 'एखाद्या व्यक्तीवर' आक्षेप घेण्यासाठी लिहिले नाही. माझे अमिताभ बच्चन किंवा कै. तेजी बच्चन ह्यांच्याशी काही जवळीक असेल म्हणून मी ते लिहिले नाही. माझे म्हणणे फक्त 'त्या दर्जाहीन वृत्ती'विषयी होते. ज्यात एखाद्या माणसाच्या (मग तो कोणीही असो) घरी सूतक असताना हे लोक स्वत:च्या कामाकरीता कुठल्याही थरावर जाऊन विचित्र निरीक्षणे करून काहीही विधाने छापतात त्याच्या विरोधात होते. (अवांतरः सध्या संपादनात अक्षरे ठळक/तिरके करणे उपलब्ध नाही. म्हणून दुसर्‍यांची विधाने "अवतरणात" टाकली आहेत. नंतर संपादित करेन.)

इनोबा म्हणे Sun, 12/30/2007 - 00:12
नाना व देवदत्त या सदस्य मंडळींच्या चरणी डोके आपटून... माझ्या लिखाणातला अर्थ समजून घेण्याऐवजी तुम्ही त्याचा जो 'सबसे तेज' अनर्थ केला त्याबद्दल बोलू,ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात?देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? आपल्या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखे भिषण प्रश्न्न असताना 'मिडीया' नामक भस्मासूराने जो काही उच्छाद मांडला आहे,मी त्याच्याबद्दलच बोललो आहे.प्रस्तूत लेखानंतर काही प्रतिक्रीया या विषयाला सोडून अमिताभ यांचे समर्थन करणार्‍या होत्या म्हणूनच मला काही विधाने जाणीवपुर्वक करावी लागली. नाना यांनी माझ्या ज्या विधानावर आक्षेप घेतला ते विधान मूळातच ज्यांनी या विषयात 'श्रद्धेच्या' विषयाची मिसळ केली त्यांना उद्देषून होते.राहता राहिले 'अनिवासी भारतीय' या मुद्याचे तर अमिताभ यांना देव मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे,असे असताना केवळ 'कर चूकवण्यासाठी' केलेली ही कृती समर्थनीय आहे असे मानने चूकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्ष काढल्यानंतरही ज्या अमिताभने आजपर्यंत पंढरपूरसाठी एक रूपयाची ही मदत केली नाही त्या अमिताभने केवळ 'कर' चूकवण्यासाठी(पुन्हा तेच) तिरूपती बालाजी देवस्थानला नऊ कोटी रूपयांची देणगी दिली याला काय म्हणावे?

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त Sun, 12/30/2007 - 00:56
ज्या विषयावर देवदत्त यांनी लिखाण केले आहे तो विषयच मूळी वैयक्तीक स्वातंत्र्याशी निगडीत आहे,असे असताना ते 'हे जरा वैयक्तीक होते आहे' असे कसे म्हणू शकतात? मी लेखात तेच लिहिले होते की एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात घुसण्याचा त्यांना(पत्रकारांना) काही अधिकार नाही. अमिताभ किंवा अभिषेक बच्चन चांगले आहेत त्यांचा वैयक्तिक छळ मांडू नका असे नाही म्हटले. देवदत्त यांनी केलेले 'खेदाने म्हणावे लागते की अमिताभ चा पण समावेश या लोकात होतो ....' हे विधान व्यक्तीकेंद्रीत नव्हते काय? तुम्ही नीट वाचले तर कळेल की ते विधान मी केले नाही.(तुम्ही मोबाईलमध्ये वाचताय का? त्यात, निदान माझ्या मोबाईलमध्ये तरी, तिरपी/ठळक अक्षरेही सरळ ,मुख्य प्रवाहातील वाटतात) मी त्या विधानाच्या विरोधात लिहिले होते. आता त्यात वाटले असेल की मी अमिताभ ला समर्थन देण्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया लिहिली होती. तरीही अभिषेकच्या लग्नानंतर ही अमिताभ ह्यांनी मिडीया ची माफी मागितली हेही मला पटले नाही. ह्यात अमिताभ पेक्षा कोणीही झाल्याप्रकाराबद्दल मिडियाची माफी मागणे पटत नाही. त्यातील पुढील वाक्य कृपया उगाच वाद निर्माण होऊ नये हे पहा. हे ही मीच लिहिले होते. त्याचा अर्थ ही तोच होता की असल्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता ह्यात मी वैयक्तिक विधानांवर थेट आक्षेप घेतला नाही, एक मत देऊन सुचवणी केली व नंतर दुसर्‍या विधानांवर थेट आक्षेप घेतला असे नको हे पुढील वेळी मी ध्यानात ठेवीन. :) असो, ते म्हणतात काय ते 'बाल की खाल' हा प्रकार होऊ नये असे मला वाटते म्हणून हे स्पष्टीकरण.