Skip to main content

ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 20/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
अनुक्रमणिका | १. इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | २. मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | ३. कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | ४. हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | ५. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | ६. बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | ७. युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ८. ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | ९. थायरॉइड हॉरमोन्स आणि त्यांचा गोतावळा आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत: ग्लुकोज मेदाम्ले ग्लिसेरॉल किटोन बॉडीज अमिनो आम्ले यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते. बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो. आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते. कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच. पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो: १. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो २. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि ३. ४०% चे रुपांतर मेदात होते. ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो. आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो. शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात. आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात. शरीरातील ग्लुकोजचे कार्य १. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर २. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते. ३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते. ४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते ५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात. या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे. ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते. जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो. समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात. रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते. आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते. बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा: १. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी: अ) इन्सुलिनची कमतरता आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance) इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही. मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो. २. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी: अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि रक्तपातळी नको इतकी कमी होते. आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो. जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते. .....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो. ***************************************************************************** टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45341
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by Nitin Palkar

धन्यवाद. थोडी भर घालतो : ...आणि खलनायक म्हणजे सर्व इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स.

In reply to by चाणक्य

अहो चाणक्य, तुमच्या आस्थेवाईक प्रतिसदाबद्दल तितक्याचे वेळा आभारी आहे!! एका विषिष्ट कल्पनेत गुंफलेल्या लेखांची ही माला थांबवत आहे, माझे लेखन नाही ! पुरेशा लेखन-विश्रांती नंतर स्वतंत्र आरोग्य-लेख जरूर लिहीन. लोभ असावा

श ल भ आणि एस, आभार! आता काही काळ मला लेखन - विश्रांती घेऊ द्यावी ही विनंती ☺

@ कुमार१, उत्तम लेख. उपोषणाच्या परिणामांबाबत सांगितलेत त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. परिचयातले काही लोक फक्त पाण्यावर राहून आठवडा-पंधरवडा असा उपास करतात ! मधुमेहींनी हे अजिबात करू नये ना?

In reply to by अनिंद्य

मधुमेहींनी हे अजिबात करू नये ना?>>> बरोबर, करू नये. त्यांचा एकूण चयापचय व हॉर्मोन्स चा समन्वय बिघडलेला असतो

अगदी हेच म्हणतो. मी हे सर्व लेखन माझ्या कुटुम्बियांना ही वाचून दाखवतो य.

प्रशांत ( सा सं ) यांचेशी संपर्क कसा करावा ? कोणी सांगेल का? अनुक्रमणिकेचे काम आहे

पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये, काही कारणाने त्यांना एक/जास्त दिवस उपाशी राहावे लागले, तरी सुटलेल्या पोटाच्या आकारात काहीच बदल होत नाही. तसंच चरबी ऐवजी स्नायू जाळून शरीरासाठी ऊर्जा मिळवली जाते, ह्याचे काही कारण स्पष्ट झाले आहे का ?

मजेदार उपयुक्त माहिती. विश्रांती घ्याच. एखादा लेख फक्त प्रश्नांसाठी( कोणताही रोग/इलाज) काढता येईल. मग त्यांची उत्तरे ओडिओफाइलमध्ये MP3 देता येईल॥ लिहिण्याचा त्रास वाचेल.

@ तेजस : अगदी तुम्ही म्हणता तसे नाही होत. उपोषणाचा कालावधी किती त्यानुसार घडामोडी अशा होतात : सुरवातीस बघा. मुख्य हेतू असतो ‘नव-ग्लुकोजनिर्मिती’. त्यासाठी दोन पर्याय असतात: १. स्नायुतील प्रथिने >> त्यांचे विघटन >> १९ प्रकारची अमिनो आम्ले सुती होऊन यकृतात जातात >> त्यांपासून ग्लुकोज तयार होतो. २. मेदसाठ्यांचे विघटन >>> ग्लीसेरोल + मेदाम्ले .यातील फक्त ग्लीसेरोलचेच ग्लुकोज होते. आता लक्षात येईल की १९ अमिनो आम्ले वि. एकटा ग्लीसेरोल यात आम्लांचा वाटा खूप आहे. म्हणजेच त्यासाठी जास्त स्नायू-प्रथिन विघटीत होते. पण..... जेव्हा उपोषणाचा कालावधी बराच वाढेल तेव्हा मात्र स्नायूंना spare करून मेदसाठ्यांचे विघटन अधिक होईल.

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. अजून एक प्रश्न विचारतो... समजा एखादा माणूस दुर्घटनेत सापडून एका निर्जन बेटावर/ पर्वतावर अडकला. ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही. अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. तो ते खाऊन नक्कीच जिवंत राहील पण चौरस आहार न मिळाल्याने कमतरतेमुळे काही आजार / प्रश्न होतील ना? हीच परिस्थिती फक्त मधाची पोळी (खायला त्या बेटावर फक्त मध आहे) असे समजूया तर मग शरीर त्या मधाचे कशाकशात रूपांतरण करेल? सहज म्हणून विचारले....

In reply to by तेजस आठवले

ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही. अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. >>>>>> शरीराची उभारणी आणि पोषण मुख्यतः तीन घटकांवर होते : कर्बोदक, मेद आणि प्रथिन. यापैकी कर्बोदक व मेद हे कार्बन व हायड्रोजनने बनलेले आहेत. प्रथिने तयार करताना मात्र त्याहून अधिकचा नायट्रोजन लागतोच. वरच्या कथेत तो माणूस फक्त कर्बोदके खातोय. त्यामुळे उर्जा व मेद निर्मिती होत राहील व तो जिवंत राहील. पण, पुरेसा नायट्रोजन (डाळी, दूध, अंडे इ.) न मिळाल्याने प्रथिन-निर्मिती मार खाईल. परिणामी शरीर-सांगाड्याची बळकटी आणि प्रतिकारशक्ती दुबळी होईल. शेवटी आपले हिमोग्लोबिन व इम्म्युनोग्लोब्यूलिनस मजबूत असतील तरच दणकट आयुष्य जगता येते. (कृपया हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि.)

रक्तपातळी नको इतकी कमी होते रक्तपातळी नव्हे ग्लुकोजपातळी

कृपया या सूचनेचा विचार करावा. मिपा प्रशासनानेही अशी छान छान माहिती मिपाच्या नावानिशी whats app वर पाठवता येईल याचा विचार करावा.

In reply to by कलंत्री

मला असे वाटते की इथला लेख whats app वर पाठवण्याऐवजी त्याचा फक्त दुवा तिकडे द्यावा. यामुळे आपण काही नवे वाचक मिपाकडे वळवू शकू.

गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे.

In reply to by अनुप ढेरे

गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे. >>>> माझ्या मते तथ्य नाही. आता बघा, तूप आणि दूधात सुद्धा कर्बोदके आहेत ना ! मग एकूण ग्लुकोज जास्तच गेला ना पोटात ?

अगदी तरुणपणापासून मला एक प्रॉब्लेम आहे पण तो hypoglycemia नव्हे हे नक्की तर तो काय व कशामुळे? मला giddy वाटू लागते, हातपाय थरथरतात, मी घामाघूम होतो. (हे सामान्यतः संध्याकाळी घडते, सकाळी जवळजवळ नाहीच.) अशा वेळेस मला फक्त भूक ही एकमात्र जाणीव असते, त्यापलीकडे काही नाही. त्यावर एकच उपाय असतो; काहीतरी खाणे. मौज अशी की ही अवस्था एकाएकी निर्माण होते, अचानक spike यावी, तसे. बरे, हे होण्याआधी काही दमवणाऱ्या वगैरे गोष्टी घडलेल्या असतात असेही नाही. खुर्चीत अगदी स्वस्थ बसून वाचन करतोय, अशा वेळीही हे होऊ शकते. त्यामुळे चटकन तोंडात टाकण्याजोगे काहीतरी नेहमी - अगदी गाडी चालवितानासुद्धा - मी ठेवतो. केळे, बिस्कीट, लाडू, इ. ह्यापैकी काहीही तोंडात टाकले की दोन-चार मिनिटात मी ठीक होतो. चहा मिळाला तर छानच. आतापर्यंत एक-दोनदाच असे झाले की माझ्याकडे काहीच खायला नव्हते, व खाण्याची संधीही. मग मी तसाच स्वस्थ बसून राहिलो. आणि बऱ्याच वेळानंतर जरा सावरलो. आपल्या मते glucose ची लेव्हल अशी अचानक आणि झपाट्याने खाली कशी जाऊ शकते? PS. my fasting and PP sugar levels are normal.

In reply to by रविकिरण फडके

मागच्या ४ / ५ वर्षापासून हीच समस्या झाली आहे. दुपारी ४ वाजता काहीतरी खावेच लागते. त्यात थोडाही उशीर झाला तर, अस्वस्थ वाटते. घाम येतो, तोंडाची चव जाते. हे लक्षात आल्यापासून मीही काहीतरी खायचे ठेवतोच. फुटाणे, मूरमूरे, एखादे फळ ही अश्यावेळेस चालते. अश्यावेळेस पाण्याच्या घोटानेही बरेच दिलासा मिळतो. वैद्यांना विचारले असता त्यांनी सांगितली की हे सर्व नैसर्गिकच आहे.

In reply to by कलंत्री

खरे आहे काही वेळेस स्पष्टीकरण देता येत नाही. उपचार घेणाऱ्या मधुमेहींच्या बाबतीत असे होऊ शकते

my fasting and PP sugar levels are normal. ">> याचा स्पष्ट अर्थ आहे की ती ग्लुकोज-कमतरता नाही. फिजिशियन ला दाखवून योग्य त्या तपासण्या केल्यावर प्रश्नाचे उत्तर देता येईल

उत्तम लेख .....

१६/१०/२०१७ ला इन्सुलिनच्या लेखाने सुरवात केलेली ही मालिका आज समाप्त करीत आहे. या लेखनामागची भूमिका अशी होती. सध्या अनेक माध्यमांतून बरेच आरोग्य लिखाण चालू असते. त्यातील बरेचसे हे 'आजार-केंद्रित' असते. त्याचीच री मला ओढायची नव्हती. म्हणून या मालेत मी थोडा वेगळा प्रयोग केला. त्यातील विषय ( इन्सुलिन, कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन, बिलिरुबिन, ग्लुकोज , इ.) पाहता हे लक्षात येईल. प्रत्येक लेखात शरीरातील एखाद्या महत्वाच्या रासायनिक पदार्थाला मध्यवर्ती भूमिका दिली होती. म्हणजेच ही माला 'पदार्थ-केंद्रित' होती. त्या पदार्थाची मूलभूत माहिती, इतिहास आणि मग संबंधित आजाराचा थोडक्यात आढावा असा येथे दृष्टीकोण होता. या लेखनाचे आपण स्वागत केलेत तसेच चर्चेत सहभागी झालात याबद्दल मी आपला आभारी आहे. बऱ्याच सदस्यांनी सातत्याने प्रोत्साहन देऊन मला लेखनाची स्फूर्ती दिली. तसेच लेखमाला थांबवायचा निर्णय घेतल्यावर काहींनी तसे न करण्याची आग्रही व प्रेमळ विनंती केली. आपणा सर्वांचा मी ऋणी आहे. लेखकाने एकाच धाटणीतले लेखन दीर्घकाळ न करता काही वेगळे करावे हे माझे मत. कारण वाचकाला सतत काहीतरी नाविन्यपूर्ण हवे असते. दरम्यान काही मिपाकरांनी काही आरोग्य विषय लेखनासाठी सुचवले आहेत. ते स्वतंत्रपणेच हाताळायचे आहेत. त्यातील एका विषयाच्या मी प्रेमात पडलो आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सध्या मी त्याचा गृहपाठ करीत आहे. माझे पुरेसे समाधान झाल्यावरच लेखनाला हात घालेन. या लेखमालेदरम्यान अनेक मिपाकरांनी वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या आजारांची माझ्याशी चर्चा केली याचे खूप समाधान वाटते. त्यामुळे मिपा हे माझे एक विस्तारित कुटुंब झाल्याची सुखद भावना जाणवली. तसेच याच दरम्यान ‘मिपा-पुणे कट्टा’ झाला व मला आपल्यातील काहींच्या भेटीचा आनंद मिळाला. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मनापासून लेखन करता आले. प्रशासक आणि साहित्य संपादक यांचेही आभार. लोभ असावा

In reply to by हेमंतकुमार

दैनिक सकाळ मध्ये डॉ एम वाय बापये हे लेख लिहित. मला ते लेख आवडत. एका नातेवाईकाच्या दुखण्याच्या निमित्ताने त्याना भेटण्याचा योग आला त्यावेळी लेख यायचे थांबले होते. मी त्याना विचारले की आपण आता लिहित का नाही ? त्यावर त्यांचे मिशकील उत्त्तर असे की " मध्ये थांबलेले बरे.. नाहीतर लोक म्हणतात .. रिकामा असतो वाटते दवाखाना हल्ली ... !

प्राधान्याने शरीर जर ग्लुकोज रक्तातील वापरीत असेल तर .. मी असे विधान करीन की कमीतकमी मधुमेही लोकांनी सकाळी उठल्यावर चालत जाणे बंद करून दोन वेळच्या मुख्य भोजना नंतर दोन तासांनी ( स्वादुपिंडाने शरणा गती पत्करल्यावर ) चालण्याचा व्यायाम करावा . ही वेळ साधारण पणे अशी येईल दुपारी तीन ते चार व रात्री दहा ते साडेदहा . दोन्ही वेळा गैरसोयीच्या आहेतच पण सैधान्तिक रित्या बरोबर !

चौरा, सहमत. विशेषतः ज्यांची PP ग्लुकोज जास्त वाढते त्यांना हे अगदी उपयुक्त. अनिंद्य, तुमच्याही आगामी लेखनाची प्रतीक्षा !

शब्दात मांडत आहात ही माहीती. समजावून सान्ग्ण्याची हातोटी छान आहे. सोदाहरण मस्त समजावता!! धन्यवाद

अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! आपणा सर्वांना आरोग्य्-सुख लाभू देत आणि आपण तुमच्यासारखेच सुखी राहू !

केटोजेनिक’ आहार : १) यात कर्बोदकांचे प्रमाण बरेच कमी व प्रथिनाचे मध्यम असते. या आहाराचे प्रयोग बऱ्याच मधुमेहींवर केले गेले आहेत आणि त्याचे फायदे दिसून आले आहेत. अशा नियमित आहारानंतर पेशींमधील घडामोडी अशा होतात: कमी कार्बोदके >>> कमी ग्लुकोज पुरवठा >> शरीरातील मेदसाठ्यांचे अधिक विघटन >> आता ग्लुकोज ऐवजी मेदाम्ले ही प्रमुख इंधन होतात >>> वजन कमी होते आणि ग्लुकोजची रक्तपातळीही कमी. तसेच मधुमेह-औषधांचेही प्रमाण कमी होऊ शकते. या प्रकारच्या उपचाराला nutritional ketosis म्हणतात. २) अलीकडे अजून एक नवीन प्रयोग निरोगी व्यक्तींवर करण्यात आले. त्यात ग्लुकोज खाण्यापूर्वी अर्धा तास आधी ते लोक 'केटो-पेय' पितात. त्याने ग्लुकोज- इन्सुलिन समन्वय सुधारतो आणि ग्लुकोज पातळी आटोक्यात राहते. पण या पेयाची चव अतिशय घाण (अगदी याक-थू !) असते. अद्याप हा प्रयोग पुरेशा मधुमेहींवर झालेला नाही.

वाटणारी लेखमाला संपन्न होत आहे. हुरहूर लागलीच. माझ्या मते पूर्णविराम देऊं नका. अर्धविराम द्या. याच अनुषंगाने कितीही काळानंतर आणखी एखादा विषय सुचला की जरूर लिहा. आणखी पाचदहा लेख वर्षादोनवर्षात सहज येऊन जातील.

आभार ! नुकतीच माझी नवी लेखमाला 'तंदुरुस्त का नादुरुस्त?' ही मिपावर सुरू झाली आहे. तेव्हा आरोग्य लेखन चालू आहे ☺

अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल आभार. अगदीच बाळबोध शंका(काहीतरी चुकतंय माहित आहे :) ) जर ४०% ग्लुकोजचे रुपांतर नेहमीच मेदात होते, आणि उपाशी राहण्याची वेळच आली नाही, तर मग मेद बेसुमार वाढतच राहणार नाही का? आपली नेहमीची जीवनशैली आणि मर्यादित व्यायाम(!) पुरेसा आहे का हे मेद वापरण्यासाठी? की इथेच मग व्यायामाची गरज सुरु होते?

@ लई भारी, तुमचे एकदम बरोबर आहे. याबद्दल अजून थोडेसे: • मानवाच्या आदिम अवस्थेत शारीरिक श्रम भरपूर होते आणि अन्न मात्र मोठ्या कष्टाने मिळवावे लागे. • म्हणून तेव्हा अन्न कधीतरी मिळायचे. त्यामुळे आपल्या जनुकांमध्ये इंधन हे मेदरुपात साठवण्याची प्रक्रिया नोंदली गेली, जेणेकरून जर काही दिवस अन्न मिळाले नाही तरी आपण जिवंत राहू. • आज बघा काय झालंय! अन्नाची मुबलकता, खूप खायची सवय आणि व्यायामाचा मात्र अभाव. • म्हणून आपले मेदसाठे सातत्याने वाढतात. • मेदपेशींचे वैशिष्ट्य बघा. सुरवातीस जसा मेद वाढू लागतो तसा त्यांचा आकार वाढतो. पण हे एका मर्यादेपर्यंत होते. मग पुढचा मेद स्वीकारण्यासाठी त्या पेशींचे विभाजन होऊन दुप्पट पेशी बनतात. • एकदा का पेशीसंख्या वाढली की ती कधीही कमी होत नाही. • परिणाम –लठ्ठपणा !

उत्तम आणि अतिशय उपयोगी लेखमाला. दिवसभरात आहार किती वेळा घ्यावा, याविषयी दोन (परस्परविरुद्ध) मते प्रचलित दिसतात. १. दिवसभरात सात-आठ वेळा थोडे थोडे खावे. २. दिवसातून फक्त दोन वेळा, कडकडून भूक लागली असता खावे. या दोन्हीतील फायदे-तोटे काय काय आहेत ? कुणाकुणासाठी कोण-कोणती पद्धत हितकारक आहे? इन्सुलिन निर्मिती, रक्त शर्करेची पातळी, चरबी साठणे-शरीराचे वजन वगैरेंचा या पद्धतींशी काय संबंध आहे , वगैरेंबद्दल खुलासा करावा ही विनंती.

दिवसातून कितीदा खायचे यावर मत देणारे 2 गट आहेत ते अगदी आस्तिक / नास्तिक प्रमाणे ठाम आहेत ! माझे 2 पैसे: १. तारुण्यात जेव्हा सगळे काही तंदुरुस्त आहे तेव्हा दणकून व्यायाम करावा व आवडेल तितक्यावेळा खावे २. 40 नंतर रात्रीचे ‘जेवण’ न करता फक्त थोडेसे खावे, न्याहरी व दुपारचे जेवण यथास्थित घ्यावे. ३. जाड लोकांच्या बाबतीत : जर एका वेळेस मजबूत खायची सवय असेल तर ती वाईट कारण अतिरिक्त ग्लुकोजचे मेद होत राहते. ४. मधुमेहींबाबत : जर PP पातळी बरीच वाढत असेल तर मग अनेकदा थोडेथोडे खावे ५. फक्त दोनदा आणि मजबूत खाणे हे श्रमजीवीना योग्य. ….. मतभेद राहणारच. प्रयोग करून आपापले ठरवावे

@कुमार१. आभार. आतापर्यंत मी दिवसभर खात रहावे या प्रमाणे जगत आलो, सध्या वय ६६ आहे. गेल्या चाळीसेक वर्षात कडाडून भूक लागणे हे ठाऊकच नाही कारण पोट नेहमी भरलेलेच असते. अडीच वर्षांपूर्वी मी इथे शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? या धाग्यात लिहील्याप्रमाणे प्रयोग करून एकंदरित आरोग्य मिळवले. आता वयानुरूप जीवनशैलीत आणखी बदल काय करावेत याचा शोध घेताना डॉ. जग्न्नाथ दिक्षित यांचा व्हिडियो बघण्यात आला, त्यात फक्त दोनदा जेवण्याचे महत्व सांगितलेले आहे. माझे वडील फक्त सकाळी दहा आणि संध्याकाळी ५ वाजता जेवत असत, बाकी वेळी काहीही खात पीत नसत. त्यांचे आरोग्य ८०+ वयातही उत्तम होते, हे उदाहरण माझ्यासमोर असल्याने आता तो प्रयत्न करावा असा विचार आहे, अर्थात दिवसभर खात रहाण्याची सवय सोडणे जरा कठीणच आहे. आपण डॉ. दिक्षित यांनी इन्सुलिन बद्दल जे सांगितले आहे, त्याबद्दल लिहील्यास चांगले होईल.

डॉ. दिक्षित यांनी इन्सुलिन बद्दल जे सांगितले आहे,">>> असेच मत डॉ श्रीकांत जिचकार यांचे होते. पण ते सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केले होते. सध्याची वैद्यक पुस्तके 'small frequent meals' चा पुरस्कार करतात. एकूणच या मुद्द्याचे सरसकटीकरण अवघड आहे. पुन्हा डॉक्टर व आहारतज्ज्ञांचेही एकमत नाही.

कोविद१९ ने मरण पावलेल्या रुग्णांत बऱ्याच जणांना पूर्वीचा मधुमेह होता, हे एव्हाना माहिती आहे. अन्य काही रुणांच्या अनुभवातून अजून काही माहिती समोर येत आहे. कोविद्चे काही रुग्ण असे होते की त्यांना पूर्वी मधुमेह नव्हता. मात्र आताच्या आजारात रुग्णालयात दखल केल्यानंतर त्यांची ग्लुकोज पातळी खूप वाढत गेली. हे पाहता अशी एक शक्यता व्यक्त केली गेली आहे. करोना २ हा विषाणू स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींनाही इजा पोचवत असावा. अर्थात हे सध्याचे केवळ गृहीतक आहे. अधिक अनुभवातूनच पुढील चित्र स्पष्ट होईल.

नुकताच आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने प्रौढांच्या मधुमेहासंदर्भात एक जागतिक अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी 144 देशांमधील मधुमेह विदा अभ्यासण्यात आला. त्यातील ठळक मुद्दे असे : १. सध्या जगातील दर १० व्यक्तींमागे १ व्यक्ती मधुमेही आहे. २. सुमारे 24 कोटी लोक हे मधुमेहाने बाधित असण्याची शक्यता आहे परंतु त्यांचे निदान झालेले नाही, तर 32 कोटी लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. ३. एकूण मधुमेहींच्या तीनचतुर्थांश लोक अल्प व मध्यम आर्थिक उत्पन्न असलेल्या देशांमधले आहेत ४. २०२१ मध्ये ६७ लाख मृत्यू हे मधुमेहाशी संबंधित गोष्टींमुळे झाले. त्यापैकी एक तृतीयांश जण हे साठ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. ५. भविष्यकाळात या आजारात जागतिक वाढ होणार असून ती प्रामुख्याने आफ्रिका, जागतिक मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियात होणार आहे.

उपयुक्त माहिती . काही शंका - १. रक्त तपासणी मधील डी३ , बी१२ , कॅल्शिअम , सीबीसी - हिमोग्राम , शुगर , लोह , प्रो थॉम्बिन , एस पातळी हे घटक एकमेकांवर अवलंबुन असतात का ? २. रक्तातील लोह पातळी कशी मोजतात ? ३. लिव्हर , फुफ्फुस आणी किडनी यांची कार्य क्षमता एकमेकांवर अवलंबुन असते का ?

In reply to by सिरुसेरि

१. डी३ , बी१२ , कॅल्शिअम >>> हे ३ हाडांच्या आरोग्याचे संदर्भात एकमेकांशी निगडित आहेत. सीबीसी - हिमोग्राम , लोह >>> हे रक्तघटक एकमेकांशी निगडित आहेत. ग्लुकोज >>> याचा स्वतंत्र प्रांत आहे. प्रोथॉम्बिन >>>> रक्त गोठण्याबाबत याचा स्वतंत्र प्रांत आहे.

In reply to by हेमंतकुमार

रक्तातील लोह पातळी कशी मोजतात
त्यासाठी शिरेतून रक्त काढतात. ते बाटलीत गोठू दिल्यावर त्यातून सेरुम नावाचा द्रव पदार्थ पाझरतो. त्या द्रवामध्ये लोहाची मोजणी प्रयोगशाळेत करता येते. त्याच्या जोडीने टीआयबीसी ही तपासणी देखील करतात. अर्थात ह्या मोजण्या तशा पुरातन आहेत आणि अलीकडे त्यांना सर्वसामान्य रुग्णांमध्ये विशेष महत्त्व दिले जात नाही. हिमोग्लोबिनची पातळी आणि सीबीसी यांच्या एकत्रित अभ्यासावरून आपल्याला शरीरातील लोहासंबंधी पुरेशी माहिती मिळते. रक्ताच्या ठराविक आजारांत लोहाकडे स्वतंत्र लक्ष दिले जाते.

In reply to by हेमंतकुमार

सेरुम >>> सिरम असे वाचावे.

In reply to by हेमंतकुमार

यकृत , फुफ्फुस आणी मूत्रपिंड यांची कार्य क्षमता एकमेकांवर अवलंबुन असते का ?
>>>> यकृत व मूत्रपिंड यांचे एकमेकाशी जवळचे नाते आहे. शरीरातील चयापचयात यकृत मध्यवर्ती भूमिका निभावते. चयापचयात तयार झालेले त्याज्य पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे तितकेच महत्त्वाचे काम मूत्रपिंड करते. या दोघांपैकी एकाचे कार्य बिघडल्यास दुसऱ्यावर देखील कालांतराने परिणाम होतो. फुफ्फुस हे श्वसनाशी संबंधित असल्यामुळे वरील दोघांपेक्षा वेगळ्या विभागात मोडते. त्याचा वरील दोन इंद्रियांशी तसा थेट संबंध नाही. (मात्र सर्व महत्त्वाच्या इंद्रियांचा एकमेकांशी अप्रत्यक्ष संबंध कुठेना कुठे येतो).

मधुमेह (प्रकार1) असलेल्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन उपचार घेत राहावे लागतात. अशा दीर्घकालीन इंजेक्शन्स पासून सुटका होण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केली काही वर्षे चालू आहे. त्यातील अलीकडे चालू असलेले संशोधन म्हणजे मूळ पेशींचा वापर. यामध्ये शरीरात त्वचेखाली विशिष्ट मूळ पेशी रोपित केल्या जातात. शरीरात पुढे त्यांचे रूपांतर स्वादुपिंडाच्या बी पेशींमध्ये होते आणि मग ह्या नव्या पेशी इन्शुलिन निर्मिती करू लागतात. सध्या या अभ्यासाचे दुसऱ्या टप्प्यातील प्रयोग चालू आहेत. तूर्त अशा रुग्णांना हे उपचार केल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी काही औषधे द्यावी लागतात. हा तोटा आहे. परंतु भविष्यात यावरही मात करायचा विचार चालू आहे. त्यासाठी अशा मूळ पेशींची निर्मिती केली जाईल की, ज्या रोपित केल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे घ्यावी लागणार नाहीत. येत्या काही वर्षात हे संशोधन यशस्वी होऊ शकेल.

मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी वारंवार करावी लागते. त्यासाठी बोटाला सुई टोचण्याचा अप्रिय उद्योग करावा लागतो. यापासून सुटका करण्यासाठी विविध प्रकाचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. नुकतेच एका कॅनेडियन उद्योगाने एक नवे उपकरण बनवले आहे ज्यात रुग्णाच्या बोटाला सुई टोचण्याचा प्रकार नाही. रुग्णाने फक्त उपकरणाच्या भागावर एक मिनिट बोट ठेवायचे आहे. या उपकरणात ईसीजी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला नवप्रज्ञेची जोड दिलेली आहे. या उपकरणाचे प्रारूप नुकतेच एका परिषदेत सादर झाले. यथावकाश ते औषध प्रशासनाच्या मान्यतेसाठी दाखल होईल.

रक्तातील ग्लूकोज पातळी जाणून घेण्यासाठी आता सुई थेट रक्तवाहिनीत जाण्याची गरज नाही. यासंदर्भात नुकतेच जाहीर झालेले कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन इथे आहे यामध्ये काही सूक्ष्म सुया एका पापुद्र्यावर लावतात आणि तो एका छोट्याशा इ- डबीत ठेवून ती डबी दंडावर सतत लावून ठेवता येते. सूक्ष्म सुयांच्या मदतीने त्वचेखालील पेशीद्रवामध्ये ठराविक रसायनाची पातळी मोजता येते. सध्या या उपकरणात त्यांनी ग्लूकोज, अल्कोहोल आणि लॅक्टेट या तिघांची पातळी सतत समजत राहील अशी योजना केली आहे. त्यासाठी या छोट्या उपकरणाला मोबाईलमधील ॲपची जोड द्यावी लागते. आता हे तीन घटक एकत्र का, असा प्रश्न पडेल. ज्या मधुमेहींना बऱ्यापैकी मद्यपानाचे व्यसन असते त्यांच्यात ग्लूकोज पातळी एकदम कमी होण्याचा धोका असतो. त्यानंतर जे काही बदल शरीरात होतात त्यात लॅक्टेट हा नकोसा घटकही वाढतो. या तिन्ही पातळ्या एकत्रित समजल्याने अशा रुग्णांना मद्यपान नियंत्रणात ठेवता येईल.