Skip to main content

पेशवाईतल्या गमतीजमती

पेशवाईतल्या गमतीजमती

Published on 16/02/2018 - 06:03 प्रकाशित मुखपृष्ठ
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :). १) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे. त्यातले गमतीशीर उतारे - काही नावांवर असा विचित्र संस्कार घडतो कि त्यावरून तो इंग्रजीतला शब्द आहे याचा संशयही येणार नाही. उदाहरणे - अँडरसन चा इंद्रसेन - नारंज चा नारद - थॉमसन चा तामसेन (तानसेनाचा जुलै भाऊ शोभावा !) - सार्टोरियस चा सरताऊस - मॅडॉक चा मंडूक - मेडोज चा मंडूस - रॉड्रिक चा रुद्रक - कारमायकेल चा कर्मखल - रॉस लॅम्बर्ट चा रासलंपट पूर्ण मूळ यादीच इथे खाली जोडली आहे. pic1 कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका) २) नारायण गोविंद चापेकर यांच्या 'पेशवाईच्या सावलींत' या पुस्तकाचा उल्लेख मागे केला आहे. त्यातले काही निवडक उतारे. चिपळूणकर सावकारांविषयी (हुंडीच्या लेखात अरविंद कोल्हटकरांनी त्यांचा उल्लेख केला आहे तेच हे चिपळूणकर) ------- चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे. तो निराळा राहत असावा. कारण त्याचा अन्नखर्च निराळा पडला आहे (शर. १७४७). दाजी गंगाधराला बापूजी गंगाधर नांवाचा भाऊ होता असें वाटते. गंगाधरशास्त्रयास पंढरपूर येथे देवदर्शनास येण्याविषयी श्रिंबकजी डेगळ्याने बोलावणे पाठविले त्या वेळीं बापूजी गंगाघरशास्त्र्यांच्या घरीं त्यांच्याजबळ बोलत बसला होता. ... ... कर्ज देण्याधैण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे, खुद्द सरकार व त्यांचे सरदार दरकदार ह्यांना नेहमी कर्ज सावकारी काढावें लागत असल्यामुळे सावकारी घंदा करणाऱ्या व्यवहार पेढ्यांचे जाळें राज्यांत निर्माण झालें. ब्राह्मण सावकारही पुष्कळ होते. लाखो रुपये एका रकमेने ते कर्ज देत, रकम फार मोठी अखल्यास तीन चार सावकार मिळून समायिक कर्ज देत, हातावर कर्जाऊ रकमा देत, परंतु बहुधा खतें लिहून घेऊनच कर्ज देण्याचा प्रघात होता. वचनचिठ्ठीचा प्रकार मात्र आढळत नाही. कर्जरोखे व गहाणखते हीच मुख्यतः असत. तारण गहाण असे तर्सेंच कबजे गहाण असे. “व्याजाच्या ऐवजी मोजे मजकूरचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून घ्यावा” कर्ज फेडण्याची मुदत नमूद केलेली असे, रासमाथा ( सुगीवर ), आळदीची यात्रा अशासारखी मुदत असे. हातावरील कर्जाला थोड्या महिन्यांची मुदत ठेवण्यांत येई. मुदतीत कर्जफेड न झाल्यास सावकार खतांत नमूद केलेली मिळकत आपल्या कब्जात घेई. स्थावर मिळकत व कुळकरणासारखीं वतने कर्जाकरता गहाण टाकीत. जंगम मालात सोनं, पागा, तरवार, कापड ही गहाण टाकलेली आढळतात, कुळकरण गहाण टाकल्याचे उदाहरण: ४०० रु. जमा भगवंतगव देशपांडे. . . मल्हार ब्राब्राजी तट यार्थ कुळकरण मोजे डोबले गहाण होतें ते सोडवून सीवाजी नारायण यांजकडे ठेवून वगैरे... .... सोनं गहाण ठेवल्यास आठ आणि व्याजाने पैसे मिळत. एरव्ही १, १।,१॥, १॥, २, २। स. दरमहा दर शेकडा अशा दराने व्याज द्यावें लागे. सयाजीराव गायकवाडला लाख रुपयांच्या कर्जाला १। रु. दराचे व्याज होतें. किरकोळ रकमांना व्याजादाखल धान्य देत. “बाजार निरखापेक्षा १ शेर रुपयास जाजती'. हेच व्याज, तेल्यास कर्जाऊ रक्कम दिल्यास ठरलेल्या भावाने ठरीव मुदतीपर्यंत तेल घेत. भाव उतरल्यास उतरत्या भावाने पण चढल्यास कराराच्या भावाने अशी शत घालीत , ज्या नाण्यांत कर्जाची रक्कम दिली असेल त्याच नाण्यांत ती परत करण्याचा करार कधी कधी करीत. कर्ज देतांना मनोती कापून घेत. मनोतीचा दर शेकडा १ पासून २ रुपयापर्यंत असे. कर्जफेडीच्या वेळीं सूट देण्यांत येई; तथापि बिनसुटीची शर्त असल्यास सूट देत नसत, कर्जफेडींत मामलत लावून घेण्याचाहि प्रघात होता. “दीड महिन्यांत एकोत्रा व्याजाने व्याज मुद्दलसुद्धा रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी." प्रामाणिकपणा बर्‍याच प्रमाणांत होता. दंग्याच्या भीतीने दुसऱ्यापार्शी ठेव ठेवीत. अशा ठेवी तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्त्रीने कबूल करून परत दिल्याची उदाहरणे नमूद आहेत. पण कर्ज वसूल करण्यास हल्लीप्रमाणे कोर्टे नव्हर्ती, फार करून सावकारालाच वसुलीचा उपाय करावा लागे. हा उपाय म्हणजे धरणें बसणें हा होय. लोकांच्या त्या वेळच्या समजुतींवर ह्या उपायांची उभारणी केलेली दिसते. सावकार कर्ज मागण्यास कुळाकडे आपला नोकर अथवा इतर कोणी पाठवी. हा मनुष्य कुळाच्या घरांत चोवीस तास उपाशी बसून राही. ओटीच्या पुढल्या दरवाजांत बसे, घरांत कोणी उपाशी राहिल्यास घरांतील माणसांनाहि उपवास पडे. आपणांस उपोषण घडते व दुसरा उपवासाने तळतळत आहे द्याचा परिणाम आपणांस भोगावा लागेल ह्या भीतीने कूळ हरप्रयत्न करून कांही तरी वसूल देई, कधी कधी स्वतः यजमान धरणें घरून बसे, कुळाने चटकन पैसे द्यावे म्हणून घरण्याकरता परजातीच्या माणसाचा उपयोग करीत (१३०). ऋणकोस उपोषण पाडणे याला क्षेत्र करणे म्हणत. चिपळूणकर आपल्या कैफियतींत लिहितात “नंतर आम्ही कासीकर याचे दुकानी जातीनिसी (घरांतील) थोर थोर मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास तीन दिवस उपाशी बसून .. ". एका माणसाकडे चिपळूणकरानी २० क्षेत्र केलीं. "कांही वेळां उपोषित मजबरोबर बसले होते व काही वेळां जेवले?” एका भिक्षुकानी आपले पैसे वसूल होत ना हें पाहून गणपर्तांच्या देवळांत उपोषणे करण्यास सुरवात केली. ही वार्ता श्रीमंतांच्या कातावर गेली, तेव्हा “आज्ञा जाली की भट्जीचे रुपये (कुळाकडून) देववावे'' ३) प्रवासाची साधने घोडीं व डोल्या ही मनुष्याच्या प्रवासाचीं साधनें होत. मालाची ने आण उंट व बैल यावरून होई. बैलगाड्या फारशा प्रचारांत नव्हत्या. नागपुरास जाण्यास डोलीला खंडित रुपये ८५ ठरले होते, परंतु कुंभकोणमचें भाडे २० रुपयेच दिसते. गुळसुंद्यादून पुण्यास जाण्यास डोली व घोंडी मिळून ११ रु. भाडे पडलें होते. चालण्याच्या कामांत घोड्याशीं माणसें स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसांत करणारे लोक होते. नेवाशाहून दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १।। रुपया इनाम मिळाले आहे. परिस्थितीमुळे गुण उत्पन्न होतात आणि परिस्थितीमुळेच नष्ट होतात. घोडा दुसऱ्याला वाहून नेतो पण मनुष्य आपल्यालाच वाहून नेतो ही गोष्ट खरी. तथापि निरोप जलद पोचावा असा हेतू असल्यास थोडक्या पैशांत मनुष्य पाठवूनच तो हेतु साध्य होतो. म्हणून डाकेवर जासुदांची योजना होत असे. सर्व हिंदुस्थानभर पेशव्यांच्या फौजा फिरत असल्यामुळे इकडून तिकडे बातमी पोचविण्याची व्यवस्था करणे भाग होतें. त्यामुळे टपाल ठिकठिकाणीं लोक ठेवून पत्रे पाठविण्याची योजना अमलात आली होती. बातम्या आणण्यापोचवण्यासाठी मुद्दाम माणसे ठेवीत त्यास डाक ठेवणें म्हणत. कोकणांत बातम्या आणण्यासाठी मचवे ठेवलेले असत त्यास बातमीचे मचवे म्हणत ( पे. रो. पुस्तक ८, पान २२० ). अमुक दिवशी मचवे परत आलेच पाहिजेत किंवा अजूरदाराने अमुक मैल चाललेंच पाहिजे असा नियम असे. सरकारच्या जरुरीकरता डाकेची पद्धति प्रथम अस्तितवात आली; खासगी खुषालीची पत्रे पाठाविण्याची अडचण तेव्हा लोकांना भासत असे, यात्रेला निघाल्यावर मात्र घरची खुशाली आपल्याला व आपली खुशाली घरच्या माणसांना कळवावी अर्सें वाटणे स्वाभाविक होते. ही गरज 'भागाविण्यासाठी आठवले ह्यांची काशी ते पुणे डाक स्थापन झाली असावी. सरकारी व सावकारी अशा दोन डाका निर्माण झाल्या. ह्या पुस्तकांत डाकेचा पहिला उल्लेख हा, १७०१ मधील आहे. ह्या पुस्तकांत कल्याण ते काशी, कल्याण ते मुंबई, पुणे ते नाशिक, ग्वाल्हेर-सातारा इतक्या डाकांचा उल्लेख आलेला आहे, पत्रे तोलून वजनावर हाशील घेत. चार आणे तोळा असे 'हाशील' असे. सावकारी डाकेत विमा उतरून जिन्नस पाठविण्याची रीत होती ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. मालाच्या किंमतीवर शेकडा दोन रुपये एक आणे हा विम्याचा दर होता. जिथे डाक नसेल अगर डाकेचें हाशील भरमसाट असेल तेथे जासूद पत्रे देऊन पाठवीत. एका जासुदाजवळ अनेक लोकांचीं पत्रें असत. ज्याला पत्रे पाठविलीं असतील तो पत्रे घेऊन येणाऱ्या जासुदाला पैसे देई. पत्रे पाठविणाराने कांही द्यावयाचे नाही. ही सवयच पुढे नाटपेड पत्रे पाठविण्यास कारणीभूत झाली असावी. पत्राचा मालक मिळाला नाही आणि त्यामुळे पत्र परत आलें तर निराळें हाशील द्यावे लागे; उदाहरणार्थ 'हशील डाकेचे, पुण्याहून लखोटा मुंबईस पाठविला होता तो तेथे स्वारी नाही म्हणून पुन्हा पुण्यास आला, त्याबद्दल देणें आठवले यास'. पत्ते लिहिण्यांत पत्र पाठविणारांना बरीच सवलत असे. थत्त्यांना पाठविलेल्या पत्राच्या लखोट्यावर 'थत्ते न मिळाल्यास चिपळूणकरांनी त्यांस ते असतील तेथे पाठवावा' असा मजकूर आहे ४) गुन्हे चोरी, मारामारी, खून, शिवीगाळी, व्यभिचार, बेअब्रू करणें, अतिक्रमण, आत्महत्या, मनुष्य पळवून नेणे, नोकरीचा करार मोडणे, मुक्या जनावरांस इजा करणें, बळत्याचीं कामे न करणें, गांव सोडून जाणे, सरकारी कायदे मोडणे (उ. परवानगीवांचून तंबाखू कापणे अगर खरीपाचा माल तयार करणें), गाय नांगराला धरणे, वजनमापांत फसवणे, दुसरे गांवची सोयरीक करणें अशा प्रकारचे गुन्हे तर होतेच परंतु खोटीं भुते घालणे अथवा भुत घातल्याचा खोटा आरोप करणें हेहि गुन्हे मानले जात. मुलाने आपल्या आईजवळ गैरसनदी कटकट केली ह्या दोषामुळे त्याला आठ आणि दंड झाला आहे. कोणाला न कळत दुसऱ्याकडून इजा झाल्यास त्याची पैसे देऊन समजूत करण्यांत येत असे, खाजगीवाल्यांचा बारगीर घोड्यावर बसून हजेरीस जात असतां एका कुणबिणीस धक्का लागला आणि ती पडली सबब तिला एक रुपया देण्यांत आला. ५) धाग्याचे नाव जरी गमतीजमती असले तरी जुन्या काळचे सगळेच तपशील मनोरंजक नाहीत. एक अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह प्रकार म्हणजे गुलामगिरी. मनुष्याची खरेदीविक्री पेशवाई अखेरपर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीहि विक्री कदाचित होत असे, परंतु हे पुरुष बहुधा मुसलमान असावे. 'सिद्दी सुंबरखा ह्याला कर्जीत घेतला होता तो ९० रुपयांना विकला.' बायकांची खरेदी-विक्री फारच मोठया प्रमाणाबर होई, अर्थात ह्या अविवाहित स्त्रिया असत, पोरी थोरी कोणत्याहि वयाच्या स्त्रिया विकत मिळत. ह्या दरिद्री स्त्रिया असत. स्त्रियात हिंदूंचा भरणा जरी विशेष असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि ह्या मुसलमानींनासुद्धा कुणबिणी म्हणत. ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई, घरकामाकरता तसेंच उत्तरकार्यात दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अमलदारांना कमाविसात कधी कधी कुणबिणी मिळत. म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत. ज्या पदार्थाची खरेदी करतां येते तो पदार्थ गहाणहि टाकत येतो, बाळाजीपंत नातूंचा नोकर गाडेकर नांवाचा होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु, कर्ज दिलें होतें आणि तेही इ. स. १८२२ साली म्हणजे ब्रिटिश अमदानींत. भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीही वांटून घेत, एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई, गुलामगिरीतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत. सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाहि देण्यांत येई. सरकारी कुणबिणी दुसर्यास पैसे घेऊन कामास देत. ६) इंग्रजी काळातले आर्थिक शोषण राज्य घेण्यापूर्वी इंग्रजांनी मराठ्यांचा बाजार जिंकला, हातचा व्यापार जात चालला ह्याची मराठी राज्यांत एकानेहि फिकीर केली नाही. व्यापार हस्तगत केल्याने इंग्रजांना पैसा तर मिळालाच पण शिवाय मराठ्यांमध्ये देशाभिमान नाही व दृरदृष्टीहि नाही हेहि त्यांस कळून चुकले, ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला, इ. स. १७४५ पासून (हया पुस्तकांतील नोंदीप्रमाणे ) आमच्या बाजारांत सर्वत्र इंग्रजी माल खेळूं लागला. कापड, कागद, लोखंडी सामान ( चुका, कुलप, मेखा वगेरे ), काचेचे सामान (आरसे, फाणस, तावदाने वगेरे), तर्सेच घड्याळे, चहादाण्या इत्यादि पदार्थ ह्यांनी बाजार फुलून गेले, ज्योतिषी पंचाग इंग्रजी कागदावर लिहू लागले; इनामपत्रे लिहिण्यास विलायती कागदांवाचून अडू लागलें; घरांतील मोडलेली विळी दुरुस्त करण्यास “इंग्रज” येऊन बसला; इंग्रजी पोलादाशिवाय तोफांचे काने भरणें अशक्य झाले; बायका व पुरुष छिटी कापडाने आपलीं शरीरे विभूषित करू लागलीं. त्याबरोबर मांजरपाट, जगन्नाथी हे शब्दहि आमच्या तोंडांत ठाणे मांडून बसले, सोप बाजारांत आलाच पण भाषेतही घुसला. ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला. मूळ पुस्तक इथे मिळेल. 'पेशवाईच्या सावलीत' https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit
लेखनप्रकार

याद्या 22061
प्रतिक्रिया 67
ह्म्म. काहि शतकांनी आपण चीनच्या बाबतीत देखील हेच म्हणणार असं दिसतय. बाकि तुमच्या लेखणीची तारीफ करावी तितकी कमीच.

रोचक किस्से आहेत एकेक. गुलामगिरीची प्रथा शिवाजी महाराजांनी बंद केली होती ना? मग परत केव्हापासून सुरु झाली? संभाजी राजांनीही पोर्तुगीजांना गुलामगिरीवरुन सज्जड दम दिल्याचे एक पत्र वाचल्याचे स्मरते.

In reply to by प्रचेतस

मला जेवढं आठवतंय त्याप्रमाणे आपल्या मुलुखातून माणसे पकडून गुलाम बनवण्यास घेऊन जाणे यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी एका पत्रात मनाई केली होती. सरसकट सर्व प्रकारची गुलामगिरी बंद होती का ते मला माहित नाही.

In reply to by मनो

छत्रपतींनी ६० 'बटकी' स्त्रिया पुण्यातून 'विकत' घेऊन सातारच्या महाली पाठवाव्यात असे पत्र माधवराव पेशव्यांना धाडले असे नक्की वाचले आहे. बरेच दिवस हे काम न झाल्यामुळे रिमाइंडर सुद्धा पाठवले होते. बटकी म्हणजे दासी / स्त्री गुलाम असे असेल तर गुलाम व्यापाराची प्रथा तत्कालीन समाजात बराचकाळ असावी. संदर्भ नक्की आठवत नाही :-(

In reply to by मनो

अतिशय उत्तम धागा. मि.पा.वर ईतिहासाचे धागे यायला लागलेत हे बघून बरे वाटले. तुमचे मागचे धागे वाचायचे राहिलेत, तेव्हा त्यावरच्या प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो. बाकी गुलामगिरीविषयी लिहायचे तर शिवकालात अरबी लुटारू कोकणातल्या किनार्‍यावरच्या स्त्री-पुरुषांना पकडून एडनच्या बाजारात गुलाम म्हणून विकायचे. शिवाजी महाराजांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मराठे पाठवून त्या अरबी चाच्यांना पकडले आणि वासोट्यावर कैदेत ठेवले. वासोट्याची हवा खाल्यानंतर त्या अरबचाच्यांची अक्कल ठिकाणावर आली आणि हा प्रकार बंद झाला.

गुलामगिरीची प्रथा हि माधवराव पेशवे यांच्या काळापर्यंत चालु होती . रामशास्त्री यांच्या विनंतीवरुन श्रीमंत माधवराव पेशवे यांनी हि प्रथा बंद केली ऐसे ऐकीवात आहे .

कारमायकेल चा कर्मखल !! आणि Achmuty चा एकमुठी ! रॉस लॅम्बर्ट चा रासलंपट :-) :-) :-) खूप हसलो. हाशील चा अर्थ नव्याने कळला. एक प्रश्न :- 'मनोती' म्हणजे काय ?

In reply to by अनिंद्य

मनोतीचा अर्थ शब्दकोशात असा आहे - व्याजाखेरीज दिलेला जास्त मोबदला . रक्कम घेतांनाच कापून घेतलेलें व्याज . पु ल देशपांड्याचं 'टपाल हशील निराळे' वालं माझे पौष्टिक जीवन तुम्ही वाचलेलं वा ऐकलेलं दिसत नाही :)

In reply to by मनो

हाशील हा शब्द माझी आजी वापरत असे. अजूनही (किमान) पुण्याच्या ग्रामीण भागात ७०+ वय असलेल्या लोकांकडून हा शब्द सर्रास वापरला जातो. हा शब्द साधारण असा वापरला जातो:स्वारगेटहून भोरला हाशिलाला (प्रवासाचं तिकीट) 30 रुपये लागतात.

In reply to by मनो

हशील / हाशील शब्दाचे फारसी आणि उर्दूतील 'हासिल' शब्दाशी खूपच साम्य दिसते आहे. उर्दू हासिल चा अर्थ प्राप्ती, मोबदला असा आहे आणि तोही थोडा जुळतो आहे :-) आभार - अनिंद्य

इंग्रजानी बाजार काबीज केला. व्यापाराच्या परवानग्या संबंधित संस्थानिक , राजेमहाराजानी दिल्या. त्यामोबदल्यात इंग्रजांकडून पैसेही घेतले जात होते. व्यापाराच्या मोबदल्यात राजे कर्जही घेत होते. सुरुवातीला कपडे , फण्या , भांडी अशा वस्तू विक्रीस ठेवल्या जात होत्या. जनतेला त्या आकर्षकच वाटत होत्या. कालांतराने कातडी वस्तू , मांस , कत्तलखाने इ व्यवसायातही इंग्रज शिरु लागले , अन मग जनमत विरोधात गेले. https://en.m.wikipedia.org/wiki/Bundelkhand_Agency

खूप माहिती मिळते आहे. गुलामी प्रथेचे वाईट वाटल.

In reply to by गवि

भिक्षुकाचा मुलगा सावकार झाला म्हणजे शब्दश: पेशव्यांना कर्ज देण्याइतका बडा सावकार झाला असे नाही. त्या काळात ज्याच्याकडे काही थोडीफार बचत असेल ती गरजूंना व्याजावर उसनी द्यायची सर्रास पद्धत होती. आमच्या घरातील जुन्या कगदात माझ्या आजोबांच्या बहिणीने कोणासतरी छोटी रक्कम व्याजावर उसनी दिल्याची एक चिठ्ठी होती आणि ती मी लहानपणी पाहिल्याचे स्पष्ट आठवते. आता माझी ही आजी काही मोठी सावकार नव्हती. तसेच कोणा भिक्षुकाने काही किरकोळ रक्कम उसनी दिली असावी असे वाटते.

In reply to by अरविंद कोल्हटकर

पण इथे हा उल्लेख चिपळूणकारांच्या बाबतीत आल्याने ही शंका स्पेसिफिक आहे.
चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे.

In reply to by गवि

पेशव्यांचे पूर्वाजसुद्धा असेच गरिबीतून वर आले होते. घरातल्या एखाद्या कोणी सरकारी नोकरी मिळवून थोडेफार पैसे कमावले की घराला ऊर्जितावस्था येत असे. मग ते जमिनी कसायला घेणे, खोती मिळवणे असे करत श्रीमंत झाले असतील. दर वेळी दुसऱ्याच्या माना मुरगळून किंवा लबाडी करून माणूस पैसे मिळवतो असे नाही.

In reply to by पैसा

भिक्षुक हा शब्द साधारणतः भिक्षुकी करणार्‍यांसाठी वापरला जातो. भिक्षुकी करणे म्हणजे भिक्षा मागणे नव्हे. पौरोहित्याला सुद्धा भिक्षुकी असाच शब्द वापरला जाई/अजुनही वापरला जातो. आणि त्यात बर्‍यापैकी उत्पन्न असे. त्यातुनही पेशवाईत तर भटा-ब्राह्मणांना बरेच बरे दिवस असावेत.

In reply to by एमी

माझ्या पाहण्यातला/तोंड ओळखीचे मुळशीचे करोडपती गुंठा मंत्राचे वडील अजून देखील लोकल ने येऊन दुधाचा रतीब घालतात. मुलाचे काहीतरी कर्तृत्व असेल आणि वडील त्यापासून अलिप्त राहिले असतील, असे काहीतरी असेल का ?

In reply to by एमी

तो पण सावकारच असावा. हौस म्हणून भिक्षुकी करत असेल. आताच्या काळात पण चांगले मोठ्या हुद्द्यावरचे लोक भिक्षुकी करतात पार्टटाईम.

In reply to by एमी

दाजींच्या भट या नावावरून लेखक चापेकर यांनी भिक्षुक असावेत असा अंदाज केला आहे, ती काही पक्की माहिती नाही. पेशवाईत अनेक कुटुंबे उच्चपदास चढली, श्रीमंत झाली, त्यामुळे भिक्षुकाचा मुलगा सावकार झाला असेल तर त्यात फार काही आश्चर्य नाही. पेशवाईतल्या तुळशीच्या लग्नाला आजच्या खऱ्या लग्नापेक्षा थाटमाट आणि खर्च केल्याचे उदाहरण आहे.

खूपच मनोरंजक प्रकरण आहे. शिवाजी आणि संभाजी महाराजांनी आपल्या प्रजाजनाना गुलाम म्हणून पकडून नेऊ नये अशी पत्रे बहुधा पोर्तुगिज आणि सिद्दी यांना लिहिली होती. नेमका संदर्भ शोधावा लागेल. परंतु नातेवाईक लोकांनी गुलाम म्हणून विकणे हा प्रकार थांबला होता का याबद्दल कल्पना नाही. कदाचित त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात गुलामगिरी बंद झाली असेल पण इतर भारतभर चालूच असणार. हे दोघे गेल्यानंतर वतने चालू झाली तशी गुलामगिरी पुन्हा सुरू झालेली असू शकते. माधवराव पेशव्यांनी वेठ पद्धत बंद केली असे नुकतेच वाचले. पुन्हा संदर्भ हाताशी नाही. >>> कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी>>> कॅप्टन halley, बॅक्स्टर, कॅलिगरी, सॅक्स्पेल, जॉर्जेस असू शकतील. कारानिदार जरा विचार करते. :)

रोचक आणि रंजक लेख. बटकी किंवा कुणबीण ही प्रथा इंग्रजांच्या काळातही होती असे दिसते.

कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका)
हालकी = Halkirk (एक गेलिक आडनाव) बष्टर = Buster कारनीदर = Cornelian कालकिराफ = ? सिकसिपेल = ? जुरस फिरंगी = jours fériés (हा फ्रेंच होता का?)

In reply to by आदूबाळ

कालकिराफ: मला कार्कारॉफ आठवला हॅरी पॉटरमधला... पण हे 'कार्ल क्रॉफ्ट' वगैरे असू शकेल. सिकसिपेल हा कुणीतरी 'बेल' असेल. ही सगळी नावं मराठी भाषेतील उपलब्ध ध्वनी, आणि इंग्रजी लोकांचे उच्चार याचा ताळमेळ घालत बनली आहेत. त्या काळात मराठी लोकांना इंग्रजीची गरज नव्हती हे जाणवून वेगळंच वाटलं... बाकी लेख रोचक.

पेशव्यांचे सरदार अण्णा खासगीवाले यांच्या विषयी हा किस्सा ऐकला आहे. त्यांना व्यायामाचा शोक होता. खासगीवाले एकदा पेशव्यांच्या कडच्या पंगतीत जेवायला बसले होते . त्यांना खूप भूक लागली होती, पण वाढायला उशीर होत होता. शेवटी वाढप्या साखरभाताची परात घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचला. त्यांनी त्याच्या हातातील परात खेचून घेऊन सगळा साखरभात आपल्या ताटात वाढून घेतला. जेवण सम्पल्यावर त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने पाणी प्यायचे चांदीचे भांडे दाबून त्याचे मुटकुळे करून ठेवले.

In reply to by manguu@mail.com

वाढप्या साखरभाताची परात घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचला तेव्हा ताटात मावण्याइतकाच (किंवा त्यापेक्षा कमी) माल परातीत उरला असेल :)

In reply to by खटपट्या

असेच अजून जिनसीवाले हे एक नाव आहे. राजेलोकांचे सरकारचे आणि खाजगी हिशेब (अकौटिंग) वेगळे असत. आता कंपनीचा आणि त्या कंपनीच्या मालकाचा एक individual म्हणून वेगळा अकाउंट असतो तसे. खाजगी खात्याचा हिशेब बघणारे ते खाजगीवाले असे वाटते.

In reply to by गवि

सैन्यातली आघाडीची तुकडी == बिनी, बिनीची फळी असा शब्दप्रयोग आहे. त्यानुसार सैन्यांत आघाडीस राहणारे ते बिनीवाले. जप्तीवाले हे नांव मी इतिहासात वाचलेलं नाही त्यामुळे माहीत नाही.

In reply to by मनो

पूर्वी गायकाची साथसंगत करायला बीन वाद्य वापरत .. म्हणजे सारंगी सारखे तंतुवाद्य . ( ते अमरिशपुरी श्रीदेवीवाले बीन वेगळे ) .. ते वाजवणार्याना बिनिवाले म्हणत.

In reply to by manguu@mail.com

वीणा हे त्या वाद्याचे मूळ नाव आहे. त्याचा अपभ्रन्श होऊन बीना आणि नन्तर बीन झाले असावे . आपल्याकडे, विशेषतः बंगालींत, व च्या ऐवजी ब सर्रास वापरला जातो. सरोदवादक अमजद अली यांचे वडील ग्वाल्हेर दरबारात बीनकार ( वीणा वादक ) या पदावर होते.

In reply to by रमेश आठवले

बीना - वीणा हे डोस्क्यातच आले नाही.. मी गुगल इमेजवर बीन नावाचे तंतुवाद्य शोधत बसलो होतो. धन्यवाद.

In reply to by मनो

बघणे ह्याकरता फारसीमधे जो धातू आहे त्याचे वर्तमानकालीन रुप बीन असे होते. मिबीनम म्हणजे मी पहातो. दुर्बीन (मराठीत दुर्बीण) हा फारसी शब्द त्यावरूनच आला आहे. त्यामुळे बिनीची तुकडी म्हणजे जी प्रथम दिसते ती म्हणून सर्वात पुढे असे असणे शक्य आहे.

In reply to by हुप्प्या

फारसी मराठी अनुबंध म्हणून एक यु म पठाण यांचे पुस्तक आहे इंटरनेट वर. त्यात असे अनेक शब्द दिले आहेत. तिथे शोधून पाहतो काही दिलंय का.

In reply to by परिंदा

बिनीवाले यांच्या संदर्भात हा मूळ मोडी कागद धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळात आहे. बिनीवाले हा सैन्याशी संबंधित हुद्दा होता.

ह्या ब्लॉगमध्ये पुढील माहिती मिळाली - "शनिवारवाड्याचे बांधकाम पुण्याच्या खाजगीवाल्यांकडे होते. शिवराम गणेश आणि जिवाजी गणेश हे इचलकरंजीकर घोरपड्यांच्या चाकरीत होते. व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी अनुबाई ही बाजीराव पेशव्यांची सख्खी बहिण. खाजगीवाल्यांच्या यादीत शनिवारवाड्याचे बांधकाम केल्याचा पुढील उल्लेख आहे. "बाजीरावसाहेब पेशवे यांणी घोरपडे यांजवल आमचे वडील शिवराम गणेश व जिवजी गणेश हे बहुत शाहाणे मोठे कामाचे, हरएक जाणोन मागोन घेऊन त्यांजकडे सरकारातून मामलती प्रथम सांगोन नंतर पुण्यातील शनवाराचे थोरले सरकारचे वाड्याचे काम सांगोन दरोबस्त दौलतीची खाजगी सांगितली ". यामूळेच या घराण्याला 'खाजगीवाले' असं म्हणू लागले."

दीक्षित-पटवर्धन हे असेच एक मोठे सावकार पेशवाईमध्ये होऊन गेले. त्यांच्या अनेक वर्षांच्या सावकारी व्यवसायाच्या वह्या भाइसंमंमध्ये होत्या/आहेत अणि ’पेशवाईच्या सावलीत’ ह्या पुस्तकामध्ये त्यांचाहि उल्लेख असावा. जुने लेखक वि.मा. दी. पटवर्धन हे त्यांच्याच वंशातील आणि म्हणून त्यांचे नाव वि.मा.दीक्षित पटवर्धन म्हणजेच वि.मा. दी. पटवर्धन असे ते वापरत असत असे ऐकले आहे. ह्यांचा राहता वाडा शनिवारवाड्यासमोर उजव्या बाजूस होता. ह्यांची कोथरुडास बाग/शेती होती तेथेच आधुनिक काळात मध्यमवर्गीय वसाहत झाली आहे आणि तिचे नाव ’पटवर्धन बाग’असे पडले आहे. ह्यांचे मुंबईतील दुकान ताडदेव भागामध्ये होते. तेथेच नंतर ’ब्राह्मणसभा’ नावाची ब्राह्मणांची - मुख्यत्वे कोकणस्थ - वस्ती निर्माण झाली. ही सर्व माहिती कानावर आली तशी लिहिली आहे.

तुमचा लेख खूप आवडला. तुम्ही दिलेली लिंक काही प्रमाणात रुक्ष वाटली तरी अनेक चांगल्या, उपयुक्त माहितीचा संग्रह आहे. पेशवेकालीन भाषा, परिभाषा ह्याचा चांगला वेध घेतला आहे. परिभाषेत अनेकदा ढिसाळपणाही दिसतो. तालुका, प्रांत, परगणा, कसबा हे शब्द कुठे आणि कसे वापरले गेले आहेत ह्याबद्दल एकवाक्यता नाही. इतिहास संशोधन हे कसे खाचखळग्यातून जाते हे ह्यामुळे कळते. ठिपक्या ठिपक्यातून धूसर दिसणारे, काही वेळा चुकीचे ठिपके खोडून, एखाद्या घटनेचे, काळाचे चित्र इतिहाससंशोधक कसे कौशल्याने पूर्ण करुन आपल्यापर्यंत पोचवतात हे अधोरेखित होते. त्या काळच्या विविध भाषा, त्यांचा एकमेकावर प्रभाव हे सगळे ह्या लेखातून दिसते. हौशी इतिहास अभ्यासकाकरता ही एक मेजवानीच! धन्यवाद.

ईंग्रजी नावात इष्टुर फाकडा राहिला की! हा Stuart Falkner चा अपभ्रंश होता

'बिनीवाले' ह्या आडनावाच्या निर्मितीबद्दल वर अनेक तर्क करण्यात आले आहेत. केतकर कोशामध्ये त्याबाबत ही माहिती आहे -
बिनीवाले - या घराण्याचा मूळ पुरुष विसाजी कृष्ण होय. याचें मुख्य ठिकाण कोंकणांत राजापूरप्रांतांत तेरवण गांब होय. हा जातीचा क-हाडा ब्राह्मण, आडनांव चिंचाळकर. विसाजीचा वडील भाऊ पुण्यास सावकारी करी. विसाजीनें हुजुरातींत नोकरी मिळविली. कर्नाटकांत कडाप्पाच्या स्वारीस बळवंतराव गणपतराव मेहेंदळे यांजबरोबर विसाजी कृष्ण यास पाठविलें. या स्वारींत त्याच्या शूरत्वाचा लौकिक होऊन त्याची बढती झाली. स्वारी होऊन आल्यावर पेशव्यांनीं बिनीचें काम मुक्रर सांगितलें. तेव्हांपासून यास बिनीवाले म्हणूं लागले. इ.स. १७६९ त माधवराव पेशव्यानीं याच्या हाताखाली ५० हजार फौज देऊन महादजी शिंदे, तुकोजी होळकर व रामचंद्र गणेश यांसह हिंदुस्थानच्या स्वारीवर याची रवानगी केली. तेव्हां त्यानें जाट व रजपूत राजे यांपासून खंडणी गोळा करून (१७७०) बहुतेक सर्व दुआब प्रांत पादाक्रांत केला (१७७१); व नंतर शहाअलम यास दिल्लीच्या तख्तावर बसवून त्याच्या अनुमतीनेंच रोहिल्यांचें पारिपत्य केलें(१७७२). पुढें बादशहास मराठयांचा कंटाळा येऊन त्यानें नजीबखानास मराठयांवर पाठविलें. तेव्हां त्यानें त्याचा पराभव केला. (१९ डिसें. १७७२) व बादशहास तह करावयास लाविलें. याच सुमारास नारायणराव पेशव्यांची दक्षिणेंत निघून येण्याविषयीं यास आज्ञा झाल्यावरून स्वारीचें काम संपवून इ.स. १७७३ च्या पावसाळयाअखेर हा पुण्यास आला. व पुढें राज्यांत अनेक कामें करून स. १७८५ त मृत्यु पावला. नंतर पेशवाईअखेरपर्यंत याच्या वंशजाकडे तैनात चालली होती. (वाड-कैफियती; म. रि. मध्यविभाग ४ )

खूप छान माहिती.