बलुचिस्तानची तोंडओळख
लेखनप्रकार
बलुचिस्तानची तोंडओळख
लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx
‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल. या लेखाद्वारे मी बलुचिस्तान या पाकिस्तानमधील एका धगधगत्या प्रश्नाचा ढोबळ परिचय करून देणार आहे.
बलुचिस्तानच्या प्रश्नाला, त्यातही भारत जिथे ‘लुडबूड‘ करत आहे या शंकेला पाकिस्तान किती महत्त्व देतो, हे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्या अलीकडील वक्तव्यावरून सहज लक्षात येईल. ‘पाकिस्तान डे‘निमित्त 23 मार्च, 2016 रोजी आयोजित एका समारंभामध्ये जनरल शरीफ यांनी पाकिस्तानच्या 4600 कोटी डॉलरच्या चीन-पाकिस्तानच्या आर्थिक महामार्गामध्ये (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) (*1) अडथळे आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांबाबत गंभीर व बिनबुडाचे आरोप केले. ‘चीन-पाकिस्तानमधील आर्थिक युतीमुळे या भागातील अनेक देश अस्वस्थ झालेले दिसतात व आपल्या शेजारी राष्ट्राने-भारताने, या आर्थिक युतीला आव्हान दिले आहे,‘‘ असे बिनबुडाचे आणि खोटे आरोप कुठलाही पुरावा न देता जनरल शरीफ यांनी यावेळी केले. पाकिस्तानने नुकताच पकडून कैदेत टाकलेला एक भारतीय नागरिक भारताच्या परदेशांत हेरगिरी करणाऱ्या ‘रॉ‘ या संघटनेतील अधिकारी आहे, असा आणखी एक बिनबुडाचा आरोप करत जनरल शरीफ पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न भारत करत आहे, हे या अटकेमुळे उघड झाले आहे. पण अशा अडथळा आणण्याच्या आणि बंडाळी निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना पाकिस्तान मुळीच यशस्वी होऊ देणार नाही.‘‘ पाकिस्तानने अटक केलेला ‘तो‘ भारतीय नागरिक आपल्या नौदलातील एक माजी अधिकारी असल्याचे भारतानेच जाहीर केले; पण तो भारताच्या गुप्तहेर खात्यात काम करतो, हा आरोप सपशेल धुडकावून लावला.
‘बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी बंडखोरांना भारत समर्थन देत असून कराचीमध्ये सध्या चाललेल्या कलहाला व संघर्षाला खतपाणी घालत आहे,‘ असे आरोप पाकिस्तान बऱ्याच वर्षांपासून करत आला आहे; पण भारताने अशा आरोपांना साफ आणि स्पष्ट नकार दिला आहे. याउलट काश्मीरमधील भारतीय लष्कराशी लढणाऱ्या दहशतवाद्यांना आणि बंडखोरांना, भारतात इतरत्र हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि अफगाणिस्तानमधील तालिबान या संघटनेला आर्थिक-नैतिक आणि राजनैतिक समर्थन पाकिस्तानच देत आलेला आहे, हे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणले आहे. ‘काश्मीरमधील मुस्लिम जनतेच्या ‘लढ्या‘ला आर्थिक, नैतिक आणि राजनैतिक समर्थन देतच राहणार,‘ हे पाकिस्तानने उघडपणे मान्यही केले आहे.
काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेल्यामुळे आणि नेल्यानंतर त्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने दिलेला निर्णय आपण अंमलात आणू न शकल्यामुळे काश्मीरचा प्रश्न धगधगताच राहिलेला आहे आणि या आगीमध्ये पाकिस्तान सातत्याने तेल ओततही आला आहे. बलुचिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानचे तसेच काहीसे झाले आहे. फक्त काश्मीर प्रश्नात पाकिस्तान जेवढी लुडबूड करत आहे, तेवढीच आणि तशीच लुडबूड आपल्या ‘संत-महंत‘ नेतृत्वाने बलुचिस्तानच्या प्रश्नात आजवर तरी केलेली नाही. उलट तो प्रश्न सोडविण्याची जबाबदारी भारताने बलुची लोकांवरच टाकली होती.
वास्तविक, बांगलादेशला स्वतंत्र करण्ण्यात भारताने जशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, तशीच बलुचिस्तानच्या बाबतीतही करून बलुचिस्तानला भारताने ‘आझादी‘ मिळवून दिली पाहिजे. तो हेतू मनात ठेऊन सध्याचे सरकार या संदर्भातील धोरणात योग्य तो बदल करेल, अशी आशा मला वाटते. आता ग्वादार बंदराचे महत्त्व चीनला असल्यामुळे असा निर्णय घेणे भारताला नक्कीच जास्त अवघड असेल; पण जसा अमेरिकेच्या मैत्रीचा फायदा बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात झाला नाही, तसाच या युद्धातही चीनच्या मैत्रीचा फायदा पाकिस्तानला होणार नाही, या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक पावले उचलली पाहिजेत. असे केल्यास ‘स्वतंत्र बलुचिस्तान‘ ही पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीने भारताला दिलेली एक देणगीच ठरेल. मोदी अक्कलहुशारीने हे पाऊल लवकरच उचलतील आणि मूळ पाकिस्तानचा अर्धा भाग (पूर्व पाकिस्तान) जसा आपण 1971 मध्ये तोडून काढला, तसाच उरलेल्या पाकिस्तानचा अर्धा भाग येत्या दोन-तीन वर्षांत भारत तोडून काढेल, अशी मला आशा आहे. (उरल्या-सुरल्या पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के जमीन बलुचिस्तान व्यापून आहे.)
आता हा प्रश्न केवळ ‘बलुचिस्तानचे स्वातंत्र्य‘ एवढाच उरलेला नसून त्याला स्वतंत्र होण्यास मदत करून आपण पाकिस्तानबरोबरच चीनलाही एक आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.
बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्येला असलेला प्रांत आहे. इराणच्या पठाराच्या आग्नेय बाजूचे ते टोक आहे. बलुचिस्तानची सीमा पश्चिमेला इराण, उत्तरेला अफगाणिस्तान आणि पूर्व व उत्तरेला पाकिस्तानला लागून आहे. दक्षिणेला अरबी समुद्र आहे. पाकिस्तानच्या सर्वांत पश्चिमेला आपल्या भगव्या ध्वजाच्या आकाराचा दिसणारा भाग म्हणजे बलुचिस्तानचे पश्चिम टोक. या प्रांतात प्रामुख्याने बलुची लोकांची वस्ती असून ते या सीमेला लागून असलेल्या इराणच्या ‘सिस्टन‘ या भागात आणि त्यांच्या क्वेट्टा या शहराच्या उत्तरेला असलेल्या अफगाणिस्तानच्या भागातही वसलेले आहेत. बलुचिस्तानच्या ईशान्य भागात पठाण लोकांची वस्ती आहे. या भागाचे क्षेत्रफळ कमी असले, तरीही लोकवस्ती दाट असल्याने इथल्या पठाण जमातीची लोकसंख्या बलुचिस्तानच्या लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के आहे.
(आकृती क्रमांक 1 आणि 2)
बलुचिस्तानची मेहरगढ संस्कृती खूप प्राचीन असून सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीपेक्षा ती जुनी आहे. ख्रिस्तपूर्व 7000 वर्षे आधीपासून येथे शेती केली जात असल्याचे इतिहास सांगतो. पहिल्या ते तिसऱ्या ख्रिस्तोत्तर शतकात आणि त्याआधीच्या दोन ख्रिस्तपूर्व शतकांत-आज ज्याला बलुचिस्तान म्हणून ओळखले जाते- त्या प्रदेशावर ‘पारत राजस‘ या राजघराण्याची सत्ता होती. हे राजघराणे इंडो-पर्शियन वंशाच्या लोकांचे होते. हा वंश पारशी लोकांचा आहे. पर्शिया म्हणजे आजचा इराणचा प्रदेश. त्याच्या सर्वोच्च वैभगाच्या काळात पर्शिया साम्राज्य युफ्रेटिस नदीच्या उत्तर किनाऱ्यापासून (म्हणजेच आजच्या पूर्व तुर्कस्तानपासून) ते पार इराणच्या पूर्वेपर्यंत पसरलेले होते. म्हणजेच रोमन साम्राज्याच्या भू-मध्य समुद्रावरील किनाऱ्यापासून चीनच्या ‘हान‘ साम्राज्याला जोडणाऱ्या आणि व्यापार-व्यवसायात आघाडीवर असलेल्या ‘सिल्क रूट‘वर मोक्याच्या जागी हे साम्राज्य होते. त्यामुळे अल्पावधीतच ते व्यापार आणि व्यवसायातील एक प्रमुख केंद्र बनले होते.
बलुचिस्तानवर मुस्लिम शक्तींचा विजय
इसवी सन 636 मध्ये सिंधवर राज्य करणाऱ्या ‘राय चाच‘ या सिंधच्या राजाने पश्चिमेला आक्रमण करून ‘मकरान‘ या प्रांतावर विजय मिळविला. राय या बौद्ध धर्मीय राजघराण्याने इ. स. 416 ते 644 अशी 143 वर्षे सिंध भागावर राज्य केले. हे राजघराणे हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मांचे आश्रयदाते होते. आज पाकिस्तानमध्ये असलेल्या सुक्कूर या शहरात त्यांनी त्या काळी एक मोठे शिवमंदिरही बांधले होते. त्या काळी राजघराणी एकापेक्षा जास्त धर्मांचे उपासक असत. (याबाबतची माहिती सम्राट अशोक व सम्राट हर्ष यांच्या ऐतिहासिक नोंदींतही सापडते, असा उल्लेख ‘विकिपीडिया‘वर आहे.)
पूर्वेला काश्मीर, पश्चिमेला मकरान व देबल बंदर (आजचे कराची शहर), दक्षिणेला सूरत बंदर आणि उत्तरेला कंदाहार, सुलेमान, फर्दान व किकनन पर्वतराजीपर्यंत पसरलेल्या सहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या भागात या राजघराण्याची सत्ता होती. पण इ. स. 644 च्या सुरवातीस खलिफा उमर याने सुहेल इब्न अदी याला सीरिया-जॉर्डन सीमेवरील बोस्रा या ठिकाणाहून इराणच्या कर्मन भागावर ताबा मिळविण्यासाठी पाठविले. तो भाग जिंकल्यानंतर सुहेल इब्न अदी पश्चिम बलुचिस्तानमध्ये घुसला आणि त्याने इराणच्या सीमेजवळील भाग जिंकला. त्याच वर्षी सिस्टनच्या मोहिमेत बलुचिस्तानच्या नैऋत्येकडील भागही त्याच्या अधिपत्याखाली आला.
अशा तऱ्हेने अरबी आक्रमकांका सातव्या शतकात बलुचिस्तानवर सत्ता स्थापन केली आणि दहाव्या शतकाच्या शेवटपर्यंत त्यांची सत्ता तिथे टिकून राहिली. या 400 वर्षांत त्यांनी बलुची लोकांचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केले. अरबांच्या सत्तेच्या बलुचींना एक फायदा झाला आणि तो म्हणजे आपापल्या जमातींचा कारभार करण्याबद्दलची काहीशी स्वतंत्र अशी पद्धती ते पक्की करू शकले. (त्यांची त्यावेळेपर्यंतची प्रचलित असलेली जुनी पद्धत खूप वेळा जास्त बलवान अशा जमातींकडून धोक्यात येत असे.)
दहाव्या शतकात अरबांची सत्ता संपुष्टात आली. त्यावेळी त्यांना तुरान (खुजदार राजधानी असलेले झालावान राज्य; आकृती क्रमांक 3, 4 व 5 पाहा) आणि नुधा किंवा बुधा (काछी) हेच भाग माहीत होते. इ. स. 977 च्या सुमारास इब्न हौकाल या लेखकाने लिहिलेल्या ‘सूरत अल अर्द‘ या पुस्तकात खुजदार येथे कैकनन या ठिकाणी राहणाऱ्या (या ठिकाणाचे आजचे नाव ‘नाल‘ असावे) व खुजदारवर राज्य करणाऱ्या अरबी गव्हर्नरचा उल्लेख आहे.
(आकृती क्रमांक 3)
पंधराव्या शतकात मीर चकर खान रिंद हा पाकिस्तानी व अफगाण-बलुचिस्तानचा पहिला सरदार बनला. हुमायून या तिमुरिदच्या राजाशी त्याची जवळीक होती. मीर चाकर खानानंतर कलातची खानशाही तिथे राज्यावर आली आली. ते मोंगल सम्राटाशी एकनिष्ठ होते. पुढे नादीरशहाने सिंध प्रांतातील सिबी-काची भागातील कालहोरा हा भाग पूर्व बलुचिस्तानमधील कलातच्या खानशाहीला बक्षीस देऊन त्यांची स्वामीनिष्ठा मिळविली. पुढे अहमद शहा दुराणी या अफगाणी साम्राज्याच्या संस्थापकानेही कलातच्या या खानशाहीची स्वामीनिष्ठा प्राप्त केली.
(आकृती क्रमांक 4 व 5)
पाकिस्तानमध्ये 1948 मध्ये झालेले बलुचिस्तानचे सामिलीकरण
पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल जिना यांनी मीर अहमद यार खान या कलातच्या खानसाहेबांना सामिलीकरणाच्या कागदपत्रांवर सही करण्याची जबरदस्ती केली, असे राष्ट्रवादी बलुची जनता मानते. पण कलातच्या खानसाहेबांनी जिना यांच्या मृत्युनंतरही पाकिस्तानचे समर्थन घेऊनच राज्य केले, या मुद्यावरून अनेक टीकाकार या वास्तवास व जिना यांच्या लोकप्रियतेला सोडून केलेला दावा मानतात. पण खानसाहेब कधीच सर्वेसर्वा सम्राट नव्हते, तर त्यांना कलातच्या राज्यघटनेनुसारच राज्यकारभार चालविणे भाग होते.
खानसाहेबांच्या राज्याचे सामिलीकरण झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक निदर्शने व सभा झाल्या. पाकिस्तानच्या विरोधात भडकलेल्या भावना काबूत आणण्यासाठी पाकिस्तानी सेनेला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले. यापुढे कलातच्या खानशाहीचे प्रशासन पूर्वी ब्रिटिशांच्या काळात होते तसेच राहील, हा जिना यांचा निर्णयही खानसाहेबांना कळविण्यात आला आणि 15 एप्रिल, 1948 पासून या खानशाहीचे प्रशासन पाकिस्तानी सरकारने पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणले. महंमद अमिन खोसा आणि अब्दुल समद अचाकझाई यांच्यासह अनेक बलुची नेत्यांना अटक झाली आणि ‘अंजुमन-ई-वतन‘ या कॉंग्रेसधार्जिण्या पक्षाला बेकायदेशीर ठरविण्यात आले.
(आकृती क्रमांक 6)
बलुचिस्तान पाकिस्तानकडून स्वातंत्र्य का मागत आहे?
‘क्योरा‘ या संकेतस्थळावरील लेख मी नियमितपणे वाचतो आणि तेथील बऱ्याच विषयांवर लिहितोही. तेथील काही वाचकांच्या या विषयावरील मतांचा मी इथे गोषवारा घेत आहे. ‘क्योरा‘वर नियमित लेखन करणारे पाकिस्तानचे (*2) हसन काझी म्हणतात, की ‘या विषयावर चर्चा करताना सर्वांत आधी अशा चर्चांमध्ये अनाहूतपणे घुसणारे ‘दहशतवादी राष्ट्र‘ किंवा ‘भारताचे कारस्थान‘ वगैरे बाबी बाजूला ठेवून आणि मुख्य बाबींकडे लक्ष केंद्रीत करून चर्चा केली पाहिजे.
पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी बलुचिस्तान 47 टक्के जमीन व्यापून आहे आणि तरीही या राज्याचा विकास नगण्यच आहे. वरवर पाहता बलुचिस्तान वैराण प्रदेश वाटतो; पण वस्तुस्थिती तशी नाही. 75 चौ. कि.मी. विस्तार असलेला ‘लास बेला‘ हा भाग सुपीक आहे. ईशान्येकडील क्वेट्टाजवळील भाग (नकाशा पहा) फळांसाठी उपयुक्त आहे. शिवाय तेथे खनिजसंपत्तीही भरपूर आहे. ‘सिबी‘ सब-डिव्हिजनमधील ‘सुई‘जवळ नैसर्गिक वायूचा प्रचंड साठा आहे. झोब शहराजवळ ‘अँन्टिमनी‘ हा धातू मिळतो. ‘कोह-ए-सुलतान‘ येथे गंधक मिळते. रेकोडिक/सैंदक येथे सोन्याच्या व तांब्याच्या खाणी आहेत. पण ही नैसर्गिक संपत्ती फारशी वापरत आणली गेलेली नाही किंवा तिने बलुची लोकांचा फारसा फायदा झालेला नाही. उदाहरणार्थ: नैसर्गिक वायू जरी बलुचिस्तानमध्ये मिळत असला, तरीही तो बलुची लोकांना फारसा न मिळता पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील अनेक उद्योग-धंद्यांनाच दिला गेलेला आहे.
आता ग्वादारकडे व बलुचिस्तानमधील पायाभूत सुविधांकडे वळू. बलुचिस्तानमध्ये रस्त्यांची सोय नावालाच आहे. कराची-क्वेट्टा-इराण हा एकच लोहमार्ग येथे आहे. इतकेच काय, पण मकरान किनारपट्टीवर लोहमार्ग उभा करायला कुठलीही तांत्रिक अडचण नसूनही इथे लोहमार्ग झालेला नाही. ग्वादार उद्या ‘दुबई‘ बनू शकतो; पण ग्वादार प्रकल्पाचा मोठा फायदा बलुचींना मिळले, असे वाटत नाही.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराची दादागिरी सतत चालू आहे. येथील अनेक लोक ‘बेपत्ता‘ झाले आहेत आणि आजही होत आहेत. 1946 मध्ये जिना यांच्या कालखंडात आणि नंतर 1970 च्या दशकात भुट्टो यांच्या कालखंडात व अगदी अलीकडे 21 व्या शतकात परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीमध्ये पाकिस्तानी लष्करी मोहिमांद्वारे बलुची जनतेवर अपरिमित अत्याचार केले गेले. पाकिस्तानी सीमारक्षक दलाने अनेकांचे अपहरण केले आणि ‘ते बेपत्ता आहेत‘ असे जनतेला सांगितले गेले. कित्येक वर्षांनंतर त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकलेले मिळाले.
पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये बलुचिस्तानला फारसे प्रतिनिधित्व नाही. कारण बलुचिस्तानची लोकसंख्या अत्यंत कमी आहे; पण पश्चिमेच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील भागात अमेरिकेने जशी लोकवस्ती वसविली, तसा प्रयत्न पाकिस्तानने केलाच नाही. बलुचिस्तानचा आवाज, त्यांचा निषेध सातत्याने दडपला गेला आहे. त्यांच्या नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या मामा कादीर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. मानवतावादी कारणांसाठी निधी गोळा करण्यासाठी न्यूयॉर्कला जात असताना मामा कादीर यांना विमानात चढूच दिले गेले नव्हते.
(आकृती क्रमांक 7)
थोडक्यात सांगायचे, तर बलुचिस्तानला स्वातंत्र्य हवे आहे; पण ते त्यांना मिळणे कठीण दिसत आहे.
बलुचिस्तानला स्वातंत्र्य न मिळण्याची कारणे :
• दक्षिणेकडील अरबी समुद्राची सीमा सोडल्यास बलुचिस्तानच्या इतर सीमा खुल्या नाहीत. बलुचिस्तानच्या प्रत्येक सीमेवर मोठे भूप्रदेश आहेत. पश्चिमेला इराण आहे, उत्तरेला अफगाणिस्तान आणि पूर्व, उत्तरेला उर्वरित पाकिस्तानच पसरला आहे. या उलट बांगलादेश सर्व बाजूंनी भारताने वेढलेला देश होता. त्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या ‘मुक्तीवाहिनी‘ या स्वातंत्र्यसेनेला भरघोस मदत करणे भारताला शक्य झाले.
• बलुचिस्तानची लोकसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मोठ्या लष्कराशी ते एकटे लढू शकत नाहीत.
• यासाठी भारताला इराणची मदत घेऊन त्यांच्या सिस्टन या राज्यात आपली लष्करी उपस्थिती निर्माण करावी लागेल. सुदैवाने, सध्या याच भागातील ग्वादारपासून केवळ 170 किलोमीटर अंतरावर असलेल्या (*3) चाबहार या बंदराच्या विकासकार्यात भारत इराणला मदत करत आहे. वेगाने मदत करून तेथील सरकारला खुष करून तिथे आपली लष्करी तळासारखी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न भारताने करायला हवा. (आकृती क्रमांक 7 पाहा)
• स्वार्थासाठी का होईना, पण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहीलच. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळवून देणे बांगलादेशच्या लढ्याएवढे सोपे नाही. पण बलुची जनतेला पूर्ण समर्थन देण्याचे वचन देऊन आणि ते वचन निभावून हे नक्कीच करता येऊ शकेल.
• पण तरीही येत्या तीन-चार वर्षांत बलुचिस्तान स्वतंत्र होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. कदाचित, ‘विशफुल थिंकिंग‘ म्हणा हवं तर!
‘क्योरा‘वरील दुसऱ्या वाचक-लेखिका आहेत अक्सा मिर्झा. (*2) या स्वत:ला ‘प्राऊड पाकिस्तानी‘ म्हणवून घेतात. त्या म्हणतात, ‘स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी बलुचिस्तानच्या कलातस्थित नवाबांनी बलुची लोकांना न विचारताच बलुचिस्तानच्या सामिलीकरणास संमती दिली. बलुचींना पाकिस्तानपासून विभक्त असा स्वायत्त देशच हवा होता. त्यामुळे सामिलीकरणाच्या निर्णयामुळे क्रोध आणि वैफल्याची एक लाटच बलुची लोकांत पसरली.
बलुचिस्तान हा नैसर्गिक संपत्ती व कष्टाळू बलुची जनता यांनी समृद्ध असा देश आहे, यात काडीचीही शंका नाही. पण दुर्दैवाने, स्वातंत्र्यापासून त्यांची सातत्याने आणि कठोरपणे पिळवणूक होत आहे. ‘खंडणी‘साठी त्यांना पळविले जात आहे. स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ दडपण्यासाठी अनेक लष्करी मोहिमा राबविल्या जात आहेत. ‘संदकगोल्ड‘सारखे विविध प्रकल्प परदेशी गुंतवणुकदारांना दिले जात आहेत आणि त्यातील कामगारही बलुची न नेमता उपरेच आणले जात आहेत. बलुचिस्तानमध्ये चांगल्या दर्जाचे एकही विद्यापीठ नाही. पायाभूत सुविधांच्या नावानेही ठणठणाटच आहे आणि या सर्वांवर कळस म्हणजे बलुची जनता ‘बेपत्ता‘ केली जात आणि पक्षपाताने त्यांची पिळवणूक केली जात आहे.
हे सारे येथील परिस्थितीचे एक सर्वसाधारण वर्णन आहे. पण सर्वांत वाईट क्षण कधी व कसा येईल, हे सांगणे सोपे नाही.
‘अभिमानी हिंदुस्तानी‘ व ‘हिंदू‘ असे वर्णन करणारे ‘क्योरा‘वरील एक वाचक अंकित वशिष्ठ लिहितात, ‘स्वातंत्र्याची मागणी त्यांच्यावरील मानवाधिकारांच्या पायमल्लीतून आली आहे. पाकिस्तानी मुलकी सरकार तिथेच उगम पावलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या भ्रष्ट पाकिस्तानी लष्कराला काबूत ठेवू शकत नाही. त्यामुळे काही काळ जाऊ दिल्यानंतर या दहशतवादी संघटना अधिकच बलवान बनतात. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील काश्मिरी जनतेला व बलुचिस्तानमधील बलुची जनतेला पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांना समर्थन देणारे जिहादी कसे वागवतात, हे ‘यू-ट्युब‘वर कुणीही पाहू शकेल. हे वर्णन वापरून शोधल्यानंतर इथे मिळालेल्या असंख्य चित्रफितींमध्ये पाकिस्तानात मानवाधिकार कसे शून्यावर आहेत, हे दिसून येते. अलीकडे सरकारी समर्थनाखाली चाललेल्या बलुची राजकीय नेत्यांच्या पाकिस्तानमधील निर्घृण हत्येच्या निषेधात कॅनडातील बलुची जनतेने टोरांटोमध्ये पाकिस्तानी झेंडा जाळला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने ‘बलोच नॅशनल मूव्हमेंट‘ या बलुचिस्तानच्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे महासचिव डॉ. मन्नन बलोच यांची हत्या केली. दहशतवाद्यांना किंवा भ्रष्ट पाकिस्तानी लष्कराला तोंड द्यायला पाकिस्तानी लष्कर समर्थ नाही, हेच बलुची लोकांच्या किंवा पाकव्याप्त काश्मीरमधील काश्मिरी जनतेच्या सद्यपरिस्थितीबद्दलच्या नाराजीचे मुख्य कारण आहे. कारण त्यामुळे काश्मिरी आणि बलुची जनतेला शांततामय जीवन जगणे कठीण जात आहे.
‘मी पाकिस्तानचा अर्थ लावू शकतो‘ असे सांगणारे ‘क्योरा‘वरील एक वाचक आणि बलुचिस्तानमधील एक लोकप्रिय लेखक उस्मान काझी (*2) म्हणतात, ‘पाकिस्तानने बरीच वर्षे ब्रिटिशांच्या थाटात बलुचिस्तानवर राज्य केले. नेमला गेलेला कुणी सनदी नोकर ब्रिटिशांच्या काळातील ‘पॉलिटिकल एजंट‘ची भूमिका घेई आणि बलुची जमातीच्या मुखियाबरोबर थेट संपर्क ठेवी. कधी कपटाने तर कधी अक्कलहुशारीने बऱ्याचदा ते मुखियाला सरकारी धोरणाच्या बाजूने जरी वळवित असले, तरीही सरकारकडून होऊ शकणाऱ्या हिंसक हल्ल्याची भीती त्यामागे असायचीच. त्यामुळे हे कधीच सुरळीतपणे चालले नाही. कलात खानशाहीच्या मुखियाने आपल्या प्रांताचे पाकिस्तानी लष्कराने केलेले ‘हरण‘ कधीच मान्य केले नाही. पाकिस्तानी लष्कराने कधी स्वत: तर कधी कधी इराणच्या मदतीने या मुखियांची बंडाळी दडपण्याचे प्रयत्न चालू ठेवले. परिणामत: तुलनेने सुखा-समाधानात राहणारा बलुची मध्यमवर्ग्ग तिथे कधीच उभा राहिला नाही. अनेक सत्ताधारी गट बलुची राजकीय नेत्यांना आपल्याला हवे तसे त्यांच्या तालावर नाचवत होते आणि त्यात पाकिस्तानी सरकार सर्वांत वर होते. बलुची आणि सिंधी लोकांमध्ये खूप दृढ संबंध होते; पण बलुची आणि पंजाबी बुद्धिजीवी लोकांत असे संबंध जुळलेले कुणालाच-अगदी पाकिस्तानलाही नको होते. (असे का, ते मला स्पष्ट झालेले नाही : सुधीर काळे)
बलुची लोकांत निर्माण झालेला एक अज्ञात भयगंड आणि ‘आपण फसविले जात आहोत‘ हा त्यांच्या मनातील सल हा त्याचाच परिपाक आहे. पाकिस्तान सरकारला वाटते, की दादागिरी करून ते सारे सुरळीत करू शकतील. पण इतर राष्ट्रांतील जुलमी हुकूमशहांनाही असेच वाटत आलेले आहे; पण शेवटी ते दिवास्वप्नच ठरले, हे गडाफी, सद्दाम हुसेन, होस्नी मुबारक यांच्या उदाहरणांतून जगाने पाहिले आहेच.
आखाती अरब राष्ट्रे ‘जुंडुल्ला‘सारख्या शियाविरोधी पिसाट गटांना समर्थन देताना दिसतात. इराणला आपले स्वत:चे हितसंबंध सांभाळायचे आहेतच. भारतही बलुचिस्तानमध्ये लुडबूड करत आहे व अफगाणिस्तानमध्ये उभ्या केलेल्या आपल्या संबंधांचे व सैन्याचे जाळे तिथे नक्कीच वापर आहे. (हे मत या पाकिस्तानी लेखकाचे!)
बलुचिस्तानात तृणमुळापासून उभी असलेली लोकशाही प्रस्थापित करणे, हा एक चांगला उपाय आहे. उर्वरित पाकिस्तानमधील वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असे करण्याबाबत बराच उत्साह असला, तरीही बलुचिस्तानमधील टोळक्यांच्या मुखियांचे महत्त्व कमी करणारा हा उपाय त्यांना फारसा रुचणारा नाही. पण अलीकडेच झालेल्या राज्यघटनेतील बदलांमुळे आता सर्व प्रांत आपापल्या धोरणांची अंमलबजावणी आपणच निवडलेल्या विधासभांद्वारे स्वत: करू शकतात. या नव्या बदलामुळे बलुचिस्तानला सध्या आशेचा किरण दिसत आहे. पाकिस्तानचे प्रत्येक राज्यातील हितसंबंध देशाच्या पातळीवर सांभाळण्याचे काम आज लष्कराकडे आहे. पाकिस्तानी फौजेत सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर बलुची लोकांची संख्या वाढविण्याकडेही लक्ष पुरविले जात आहे. तरीही आजपर्यंत कुठलाही बलुची माणूस लष्करात उच्च स्थानावर बसलेला दिसत नाही.
जिब्रान मोहेंजो हे हैदराबाद (सिंध) येथील पाकिस्तानी वाचक (*2) लिहितात, ‘बलुची लोकांना त्यांचा स्वत:चा देश द्यायला हवा. कारण त्यांची संस्कृती आणि परंपरा अगदी वेगळी आणि स्वत:ची आहे. त्यांचे पूर्वजही अरबस्तानाशी जास्त जुळते आहेत. याविरुद्ध सिंध, पंजाब आणि काश्मीर हे प्रदेश भारतात विलीन व्हायला हवेत कारण आपणा सर्वांचे पूर्वज भारतीय वंशाचे आहेत. पाकिस्तानचा उत्तरेकडील भाग खैबर पख्तुनवा आणि वझिरिस्तान हा भाग एकतर अफगाणिस्तानमध्ये सामिल करावा किंवा त्याचे एक स्वतंत्र राष्ट्र करावे.
असे केल्यासच या वेगवेगळ्या विभागांच्या सीमा नक्की होतील, दहशतवाद्यांच्या कारवाया कमी होतील, या भागांचा विकास सुरू होईल आणि येथे शांती नांदेल. कारण या विभागणीमुळे प्रत्येक वंशाच्या जनतेला सन्मानाने राहता येईल आणि आपली संस्कृती, परंपरा पाळत विकासाच्या दिशेने पाऊल टाकता येईल.
‘माझे हृदय हिंदुस्तानी आहे‘ असे सांगणारे हेलमुट झिगलर हे वाचक (नावावरून जर्मन असावेत) म्हणतात, ‘भारताने बलुची लोकांच्या या स्वातंत्र्य युद्धाला नक्कीच पाठिंबा द्यायला हवा.‘ त्याची कारणे सांगताना ते म्हणतात, की 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानचा अपमानास्पद आणि संपूर्ण पराभव केला. पाकिस्तानच्या जनरल नियाझी यांना 97,000 सैनिकांसह लेखी शरणागती पत्करावी लागली. युद्धात दोन्ही बाजुंचे नुकसान झाले असले, तरीही जास्त प्रमाणात हानी पाकिस्तानचीच झाली. यावरून स्पष्ट झाले, की समोरासमोरच्या आणि परंपरागत शस्रास्त्रांसह लढलेल्या युद्धात पाकिस्तानच्या विजयाची अजिबात शक्यता नाही. म्हणून भारतातील परिस्थिती अस्थिर ठेवून त्याच्या विकासाच्या मार्गात अडचणी उभ्या करण्याचा एकच मार्ग पाकिस्तानकडे उरतो. तो म्हणजे भारतातील बंडाळींना समर्थन द्याय चे आणि भाडोत्री दहशतवादी वापरून घातपाताच्या कारवाया घडवून आणायच्या. हेच धोरण पाकिस्तानने पंजाबमध्ये राबविले आणि आजही तो पाकिस्तानमध्ये याच धोरणाचा उघडपणे वापर करत आहे.
आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये व बलुचिस्तानमध्ये काय घडत आहे? पाकिस्तानी फौजांनी बंगाली वंशाच्या लोकांना ज्या तऱ्हेने छळून काढले, तीच तऱ्हा आता बलुची, पठाण वंशाच्या, जनजातीच्या लोकांशी वागताना किंवा शिया पंथीयांष्ही वागताना ते वापरत आहेत. त्यांच्या संस्कृतीला दडपून टाकत त्या सर्वांवर अत्याचार सुरू आहेत. बलुची लोकांना ‘निकृष्ट दर्जा‘चे नागरिक मानून त्यांना अपमानास्पद पद्धतीने वागणूक दिली जात आहे. त्यामुळे बलुची नागरिकांचे निषेध मनापासून आहेत आणि आता ते रस्त्यांवरही दिसत आहेत.
एखाद्या बलुची व्यक्तीला ‘उचलणे‘, त्याला नाहीसा करणे, अमानूष हाल करणे, त्याचे अवयव तोडून टाकणे आणि शेवटी त्याची हत्या करणे अशा पद्धतीचे आरोप सीमारक्षक दल, लष्कर ए झांगवी, आयएसआय ही गुप्तहेर संघटना आणि तशाच काही इतर संघटनांवर गेल्या दहा वर्षांपासून होत आहेत. ‘बलुची लोकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करण्यासाठी आयएसआय जबाबदार आहे,‘ असे ‘ह्युमन राईट्स वॉच‘ या संघटनेनेही नमूद केले आहे. या अहवालात शेकडो राष्ट्रवाद्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ‘बेपत्ता‘ होण्यास आयएसआयलाच जबाबदार धरले आहे.
2008 या एकाच वर्षभरात 1102 बलुची राष्ट्रवादी व कार्यकर्ते नाहीसे झाले आहेत. त्यांचा क्रूर छळ झाल्याच्याही तक्रारी आहेत. मलिक सिराज अकबर या वार्ताहराच्या मते 2015 च्या मे महिन्यापर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून दररोज डझनावारी लोकांच्या हत्या बलुचिस्तानमध्ये होत आहेत. डोक्यात गोळ्या घालून ठार केलेल्या बलुची नागरिकांची प्रेते रस्त्याच्या कडेला फेकलेली दिसत आहेत.
‘यावर आपण भारतीय काय करू शकतो‘ याविषयी झिगलर म्हणतात :
• जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाकिस्तानी सुरक्षा दले उघडपणे साह्य करत असेल, तर आपणही (भारत) बलुची आणि पठाण लोकांच्या स्वातंत्र्य युद्धांना राजकीय, लष्करी आणि वित्तीय मदत उघडपणे केली पाहिजे.
• भारताने अफगाणिस्तानमधील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या पाहिजेत आणि ‘जशास तसे‘ या न्यायाने बलुची स्वातंत्र्ययोद्ध्यांना लष्करी मदत व प्रशिक्षण देण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
• संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने बलुची लोकांचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण त्यांना सक्तीने पंजाबी-सिंधी संस्कृतीचा अवलंब करावा लागत आहे.
• भारताने अफगाणिस्तानमध्ये आपले लष्करी तळ स्थापले पाहिजेत आणि तेथील लढवय्यांना पाकिस्तानी लष्कराशी भिडण्यासाठी तयार केले पाहिजे.
• बलुची लोकांच्या स्वातंत्र्य युद्धासाठी भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आवाज उठविला पाहिजे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवून दिले पाहिजे.
• बलुचिस्तानमधील अशांततेचा भारताने फायदा करून घेतला पाहिजे.
‘असे केल्याने भारताचे काय फायदे होतील‘ याविषयी झिगलर म्हणतात :
1. ‘जशास तसे‘ या न्यायाने पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या वागणुलीमध्ये फरक पडेल. केवळ संयुक्त राष्ट्रांतच नव्हे, तर आपल्याविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान तेथील बंडखोरांना जसे प्रशिक्षण देत आहे, त्याविषयीही पुनर्विचार करत त्यांना आपले पाऊल मागे घ्यावे लागेल.
2. सध्याच्या आक्रमक धोरणाची जागा सबुरीच्या धोरणात होईल. ते काश्मीरबद्दल चिंता करणे सोडून बलुचिस्तान आपल्याकडे कसा टिकवून धरायचा, याबद्दल विचार करू लागतील.
3. पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानची लष्करी उपस्थिती कमी होईल; कारण त्यांना बलुचिस्तानमधील बंडाळीला काबूत ठेवण्यासाठी आपली लष्करी उपस्थिती वाढवावी लागेल.
4. दहशतवादी आणि विभक्तवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट होईल.
पाकिस्तान स्वत:च एका दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसलेला आहे. त्यांची वाट लावण्यासाठी एक ठिणगी पुरेशी आहे, याची आठवण आपण सातत्याने त्यांना करून दिली पाहिजे. बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करून भारत तेथील बंडखोरांना सक्रिय मदत करत असल्याचे आरोप आणि कराचीत अस्थिरता पसरवित असल्याचे आरोप पाकिस्तान नेहमीच करत आला आहे. पण ‘निराधार, बिनबुडाचे आणि खोटे‘ असे सांगत भारत हे आरोप फेटाळत आला आहे. याउलट भारताने सातत्याने पाकिस्तानवर आरोप केले आहेत, की तो देश तेथील जिहादी तरुण काश्मीर आणि इतरत्रही घुसवून भारतीय सैन्यावर हल्ले चढवित असतो आणि तालिबानतर्फे अफगाणिस्तानमधील सुरक्षा दलांवरही हल्ले करत असतो.
‘काश्मीरमधील लढ्याला नैतिक, आर्थिक आणि राजनैतिक पाठिंबा देत आहे,‘ असे पाकिस्तान जाहीरपणे सांगत असतो. मग ‘आपण बलुचिस्तानच्या लढ्याला नैतिक, आर्थिक आणि राजनैतिक पाठिंबा देणारच,‘ असे आपले नेतृत्व रोखठोकपणे का सांगत नाही?
विक्रम यशस्वी नावाचे एक लेखक (यांची मते बलुचिस्तानमध्ये खूप वाचली जातात, असे दिसते) म्हणतात, की बांगलादेशने ज्या कारणांसाठी स्वातंत्र्य मागितले होते (आणि मिळविलेही) अगदी त्याच कारणांसाठी बलुचिस्तानही स्वातंत्र्य मागत आहे. ‘उरल्या-सुरल्या‘ पाकिस्तानच्या क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ बलुचिस्तानने व्यापलेले आहे आणि त्यांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ पाचच टक्के आहे, तिथे भरपूर नैसर्गिक संपत्ती आहे, हे आपण याआधी पाहिले आहेच. पाकिस्तानने ही नैसर्गिक संपत्ती भरपूर ओरबाडली आहे; पण सैनिकांकडून होणारे जुलूम, निदर्शकांचे खून याशिवाय त्यांना काहीच चांगले दिलेले नाही. म्हणूनच पाकिस्तानपासून वेगळा होऊन बलुचिस्तान स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र होऊ पाहत आहे.
पाकिस्तानच्या एकूण ‘जीडीपी‘च्या 30 टक्के वाटा सिंध प्रांत देतो. पण त्याबदल्यात सिंधला फारसे काही मिळत नाही. त्यामुळे सिंध व बलुचिस्तान हे दोन्ही प्रांत आर्थिकदृष्ट्या नाडले गेलेले असून त्या दोन्ही प्रांतांत स्थानिक जनतेविरुद्ध पोलिस आणि लष्कराच्या कारवाया सातत्याने सुरू असतात.
या दोन प्रांतांशिवाय, तेथील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील आदिवासी भाग (फेडरली ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एजन्सी- फाटा) केव्हाच पाकिस्तानमधून बाहेर पडल्यातच जमा आहे. तिथे सध्या यादवी युद्ध भडकले असून पाकिस्तानी लष्कर 2014 च्या जूनपासून ‘जर्ब-ए-अझब‘ या नावाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहे. पण या मोहिमेत त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही आणि तेथील भागावर अद्याप पाकिस्तानची सत्ता प्रस्थापित झालेली नाही.
झुबिन दरबारी (*2) म्हणतात, की बलुचिस्तान व सिंध यांमध्ये बराच फरक आहे. सिंध प्रांत स्वखुषीने पाकिस्तानमध्ये सामील झाला आणि जोडण्यात आला; पण बलुचिस्तानचा ताबा जबरदस्तीने घेण्यात आला. लष्करात आणि इतरत्र पंजाबींचे महत्त्व वाढू लागले आणि ‘आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे‘ असे सिंधी लोकांना वाटू लागले. यातूनच स्वतंत्र होण्याची इच्छा सिंध प्रांतात निर्माण झाली. मात्र, या मागणीने अद्याप जोर धरलेला नाही.
बलुचिस्तानची परिस्थिती अगदीच वेगळी आहे. त्यांना कधीच पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे नव्हते. पण त्यांच्यावर जुलुमाने पाकिस्तानी सत्ता लादली गेली. बलुचिस्तानमधील नैसर्गिक संपत्ती पंजाब प्रांत आणि चीन ओरबाडून नेत आहेत. बलुचींना त्यात काही मिळत तर नाहीच; वर त्यांच्या नागरिकांच्या हत्याही होत आहेत. त्यांची प्रेते दरदिवसाआड बेवारस असल्यासारखी दिवसाढवळ्या रस्त्यांच्या कडेला फेकली जात आहेत. अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडताच ही सर्व परिस्थिती पाकिस्तानसाठी अत्यंत खडतर होणार आहे.
..........................................................................................................................
टीपा :
*1 : या महामार्गामुळे चीनमध्ये निर्माण झालेला तयार माल तिबेटमधून पाकिस्तान ओलांडून ग्वादार या बलुचिस्तानमधील पाण्याची भरपूर खोली असलेल्या बंदरातून मध्यपूर्वेला निर्यात करता येईल. तसेच, चीनला लागणारा मालही याच मार्गाने चीनला नेता येईल. शिवाय हिंदी महासागर आणि अरबी समुद्र यांना वगळून पश्चिमेला जाणारा एक नवा पर्यायही चीनला मिळेल.
*2 : ही सारी मते पाकिस्तानी व्यक्तींची आहेत.
*3 : सरळ रेषेत हवाई मार्गाने गेल्यास.
वाचन
27118
प्रतिक्रिया
0