✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बलुचिस्तानची तोंडओळख

स
सुधीर काळे यांनी
Mon, 07/18/2016 - 07:17  ·  लेख
लेख
बलुचिस्तानची तोंडओळख लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx ‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्‍नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल. या लेखाद्वारे मी बलुचिस्तान या पाकिस्तानमधील एका धगधगत्या प्रश्‍नाचा ढोबळ परिचय करून देणार आहे. बलुचिस्तानच्या प्रश्‍नाला, त्यातही भारत जिथे ‘लुडबूड‘ करत आहे या शंकेला पाकिस्तान किती महत्त्व देतो, हे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्या अलीकडील वक्तव्यावरून सहज लक्षात येईल. ‘पाकिस्तान डे‘निमित्त 23 मार्च, 2016 रोजी आयोजित एका समारंभामध्ये जनरल शरीफ यांनी पाकिस्तानच्या 4600 कोटी डॉलरच्या चीन-पाकिस्तानच्या आर्थिक महामार्गामध्ये (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) (*1) अडथळे आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांबाबत गंभीर व बिनबुडाचे आरोप केले. ‘चीन-पाकिस्तानमधील आर्थिक युतीमुळे या भागातील अनेक देश अस्वस्थ झालेले दिसतात व आपल्या शेजारी राष्ट्राने-भारताने, या आर्थिक युतीला आव्हान दिले आहे,‘‘ असे बिनबुडाचे आणि खोटे आरोप कुठलाही पुरावा न देता जनरल शरीफ यांनी यावेळी केले. पाकिस्तानने नुकताच पकडून कैदेत टाकलेला एक भारतीय नागरिक भारताच्या परदेशांत हेरगिरी करणाऱ्या ‘रॉ‘ या संघटनेतील अधिकारी आहे, असा आणखी एक बिनबुडाचा आरोप करत जनरल शरीफ पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न भारत करत आहे, हे या अटकेमुळे उघड झाले आहे. पण अशा अडथळा आणण्याच्या आणि बंडाळी निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना पाकिस्तान मुळीच यशस्वी होऊ देणार नाही.‘‘ पाकिस्तानने अटक केलेला ‘तो‘ भारतीय नागरिक आपल्या नौदलातील एक माजी अधिकारी असल्याचे भारतानेच जाहीर केले; पण तो भारताच्या गुप्तहेर खात्यात काम करतो, हा आरोप सपशेल धुडकावून लावला. ‘बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी बंडखोरांना भारत समर्थन देत असून कराचीमध्ये सध्या चाललेल्या कलहाला व संघर्षाला खतपाणी घालत आहे,‘ असे आरोप पाकिस्तान बऱ्याच वर्षांपासून करत आला आहे; पण भारताने अशा आरोपांना साफ आणि स्पष्ट नकार दिला आहे. याउलट काश्‍मीरमधील भारतीय लष्कराशी लढणाऱ्या दहशतवाद्यांना आणि बंडखोरांना, भारतात इतरत्र हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि अफगाणिस्तानमधील तालिबान या संघटनेला आर्थिक-नैतिक आणि राजनैतिक समर्थन पाकिस्तानच देत आलेला आहे, हे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणले आहे. ‘काश्‍मीरमधील मुस्लिम जनतेच्या ‘लढ्या‘ला आर्थिक, नैतिक आणि राजनैतिक समर्थन देतच राहणार,‘ हे पाकिस्तानने उघडपणे मान्यही केले आहे. काश्‍मीर प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांत नेल्यामुळे आणि नेल्यानंतर त्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने दिलेला निर्णय आपण अंमलात आणू न शकल्यामुळे काश्‍मीरचा प्रश्‍न धगधगताच राहिलेला आहे आणि या आगीमध्ये पाकिस्तान सातत्याने तेल ओततही आला आहे. बलुचिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानचे तसेच काहीसे झाले आहे. फक्त काश्‍मीर प्रश्‍नात पाकिस्तान जेवढी लुडबूड करत आहे, तेवढीच आणि तशीच लुडबूड आपल्या ‘संत-महंत‘ नेतृत्वाने बलुचिस्तानच्या प्रश्‍नात आजवर तरी केलेली नाही. उलट तो प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी भारताने बलुची लोकांवरच टाकली होती. वास्तविक, बांगलादेशला स्वतंत्र करण्ण्यात भारताने जशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, तशीच बलुचिस्तानच्या बाबतीतही करून बलुचिस्तानला भारताने ‘आझादी‘ मिळवून दिली पाहिजे. तो हेतू मनात ठेऊन सध्याचे सरकार या संदर्भातील धोरणात योग्य तो बदल करेल, अशी आशा मला वाटते. आता ग्वादार बंदराचे महत्त्व चीनला असल्यामुळे असा निर्णय घेणे भारताला नक्कीच जास्त अवघड असेल; पण जसा अमेरिकेच्या मैत्रीचा फायदा बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात झाला नाही, तसाच या युद्धातही चीनच्या मैत्रीचा फायदा पाकिस्तानला होणार नाही, या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक पावले उचलली पाहिजेत. असे केल्यास ‘स्वतंत्र बलुचिस्तान‘ ही पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीने भारताला दिलेली एक देणगीच ठरेल. मोदी अक्कलहुशारीने हे पाऊल लवकरच उचलतील आणि मूळ पाकिस्तानचा अर्धा भाग (पूर्व पाकिस्तान) जसा आपण 1971 मध्ये तोडून काढला, तसाच उरलेल्या पाकिस्तानचा अर्धा भाग येत्या दोन-तीन वर्षांत भारत तोडून काढेल, अशी मला आशा आहे. (उरल्या-सुरल्या पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के जमीन बलुचिस्तान व्यापून आहे.) आता हा प्रश्‍न केवळ ‘बलुचिस्तानचे स्वातंत्र्य‘ एवढाच उरलेला नसून त्याला स्वतंत्र होण्यास मदत करून आपण पाकिस्तानबरोबरच चीनलाही एक आश्‍चर्याचा धक्का देऊ शकतो. बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्येला असलेला प्रांत आहे. इराणच्या पठाराच्या आग्नेय बाजूचे ते टोक आहे. बलुचिस्तानची सीमा पश्‍चिमेला इराण, उत्तरेला अफगाणिस्तान आणि पूर्व व उत्तरेला पाकिस्तानला लागून आहे. दक्षिणेला अरबी समुद्र आहे. पाकिस्तानच्या सर्वांत पश्‍चिमेला आपल्या भगव्या ध्वजाच्या आकाराचा दिसणारा भाग म्हणजे बलुचिस्तानचे पश्‍चिम टोक. या प्रांतात प्रामुख्याने बलुची लोकांची वस्ती असून ते या सीमेला लागून असलेल्या इराणच्या ‘सिस्टन‘ या भागात आणि त्यांच्या क्वेट्टा या शहराच्या उत्तरेला असलेल्या अफगाणिस्तानच्या भागातही वसलेले आहेत. बलुचिस्तानच्या ईशान्य भागात पठाण लोकांची वस्ती आहे. या भागाचे क्षेत्रफळ कमी असले, तरीही लोकवस्ती दाट असल्याने इथल्या पठाण जमातीची लोकसंख्या बलुचिस्तानच्या लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के आहे. (आकृती क्रमांक 1 आणि 2)   बलुचिस्तानची मेहरगढ संस्कृती खूप प्राचीन असून सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीपेक्षा ती जुनी आहे. ख्रिस्तपूर्व 7000 वर्षे आधीपासून येथे शेती केली जात असल्याचे इतिहास सांगतो. पहिल्या ते तिसऱ्या ख्रिस्तोत्तर शतकात आणि त्याआधीच्या दोन ख्रिस्तपूर्व शतकांत-आज ज्याला बलुचिस्तान म्हणून ओळखले जाते- त्या प्रदेशावर ‘पारत राजस‘ या राजघराण्याची सत्ता होती. हे राजघराणे इंडो-पर्शियन वंशाच्या लोकांचे होते. हा वंश पारशी लोकांचा आहे. पर्शिया म्हणजे आजचा इराणचा प्रदेश. त्याच्या सर्वोच्च वैभगाच्या काळात पर्शिया साम्राज्य युफ्रेटिस नदीच्या उत्तर किनाऱ्यापासून (म्हणजेच आजच्या पूर्व तुर्कस्तानपासून) ते पार इराणच्या पूर्वेपर्यंत पसरलेले होते. म्हणजेच रोमन साम्राज्याच्या भू-मध्य समुद्रावरील किनाऱ्यापासून चीनच्या ‘हान‘ साम्राज्याला जोडणाऱ्या आणि व्यापार-व्यवसायात आघाडीवर असलेल्या ‘सिल्क रूट‘वर मोक्‍याच्या जागी हे साम्राज्य होते. त्यामुळे अल्पावधीतच ते व्यापार आणि व्यवसायातील एक प्रमुख केंद्र बनले होते. बलुचिस्तानवर मुस्लिम शक्तींचा विजय इसवी सन 636 मध्ये सिंधवर राज्य करणाऱ्या ‘राय चाच‘ या सिंधच्या राजाने पश्‍चिमेला आक्रमण करून ‘मकरान‘ या प्रांतावर विजय मिळविला. राय या बौद्ध धर्मीय राजघराण्याने इ. स. 416 ते 644 अशी 143 वर्षे सिंध भागावर राज्य केले. हे राजघराणे हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मांचे आश्रयदाते होते. आज पाकिस्तानमध्ये असलेल्या सुक्कूर या शहरात त्यांनी त्या काळी एक मोठे शिवमंदिरही बांधले होते. त्या काळी राजघराणी एकापेक्षा जास्त धर्मांचे उपासक असत. (याबाबतची माहिती सम्राट अशोक व सम्राट हर्ष यांच्या ऐतिहासिक नोंदींतही सापडते, असा उल्लेख ‘विकिपीडिया‘वर आहे.) पूर्वेला काश्‍मीर, पश्‍चिमेला मकरान व देबल बंदर (आजचे कराची शहर), दक्षिणेला सूरत बंदर आणि उत्तरेला कंदाहार, सुलेमान, फर्दान व किकनन पर्वतराजीपर्यंत पसरलेल्या सहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या भागात या राजघराण्याची सत्ता होती. पण इ. स. 644 च्या सुरवातीस खलिफा उमर याने सुहेल इब्न अदी याला सीरिया-जॉर्डन सीमेवरील बोस्रा या ठिकाणाहून इराणच्या कर्मन भागावर ताबा मिळविण्यासाठी पाठविले. तो भाग जिंकल्यानंतर सुहेल इब्न अदी पश्‍चिम बलुचिस्तानमध्ये घुसला आणि त्याने इराणच्या सीमेजवळील भाग जिंकला. त्याच वर्षी सिस्टनच्या मोहिमेत बलुचिस्तानच्या नैऋत्येकडील भागही त्याच्या अधिपत्याखाली आला. अशा तऱ्हेने अरबी आक्रमकांका सातव्या शतकात बलुचिस्तानवर सत्ता स्थापन केली आणि दहाव्या शतकाच्या शेवटपर्यंत त्यांची सत्ता तिथे टिकून राहिली. या 400 वर्षांत त्यांनी बलुची लोकांचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केले. अरबांच्या सत्तेच्या बलुचींना एक फायदा झाला आणि तो म्हणजे आपापल्या जमातींचा कारभार करण्याबद्दलची काहीशी स्वतंत्र अशी पद्धती ते पक्की करू शकले. (त्यांची त्यावेळेपर्यंतची प्रचलित असलेली जुनी पद्धत खूप वेळा जास्त बलवान अशा जमातींकडून धोक्‍यात येत असे.) दहाव्या शतकात अरबांची सत्ता संपुष्टात आली. त्यावेळी त्यांना तुरान (खुजदार राजधानी असलेले झालावान राज्य; आकृती क्रमांक 3, 4 व 5 पाहा) आणि नुधा किंवा बुधा (काछी) हेच भाग माहीत होते. इ. स. 977 च्या सुमारास इब्न हौकाल या लेखकाने लिहिलेल्या ‘सूरत अल अर्द‘ या पुस्तकात खुजदार येथे कैकनन या ठिकाणी राहणाऱ्या (या ठिकाणाचे आजचे नाव ‘नाल‘ असावे) व खुजदारवर राज्य करणाऱ्या अरबी गव्हर्नरचा उल्लेख आहे. (आकृती क्रमांक 3)  पंधराव्या शतकात मीर चकर खान रिंद हा पाकिस्तानी व अफगाण-बलुचिस्तानचा पहिला सरदार बनला. हुमायून या तिमुरिदच्या राजाशी त्याची जवळीक होती. मीर चाकर खानानंतर कलातची खानशाही तिथे राज्यावर आली आली. ते मोंगल सम्राटाशी एकनिष्ठ होते. पुढे नादीरशहाने सिंध प्रांतातील सिबी-काची भागातील कालहोरा हा भाग पूर्व बलुचिस्तानमधील कलातच्या खानशाहीला बक्षीस देऊन त्यांची स्वामीनिष्ठा मिळविली. पुढे अहमद शहा दुराणी या अफगाणी साम्राज्याच्या संस्थापकानेही कलातच्या या खानशाहीची स्वामीनिष्ठा प्राप्त केली. (आकृती क्रमांक 4 व 5)   पाकिस्तानमध्ये 1948 मध्ये झालेले बलुचिस्तानचे सामिलीकरण पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल जिना यांनी मीर अहमद यार खान या कलातच्या खानसाहेबांना सामिलीकरणाच्या कागदपत्रांवर सही करण्याची जबरदस्ती केली, असे राष्ट्रवादी बलुची जनता मानते. पण कलातच्या खानसाहेबांनी जिना यांच्या मृत्युनंतरही पाकिस्तानचे समर्थन घेऊनच राज्य केले, या मुद्यावरून अनेक टीकाकार या वास्तवास व जिना यांच्या लोकप्रियतेला सोडून केलेला दावा मानतात. पण खानसाहेब कधीच सर्वेसर्वा सम्राट नव्हते, तर त्यांना कलातच्या राज्यघटनेनुसारच राज्यकारभार चालविणे भाग होते. खानसाहेबांच्या राज्याचे सामिलीकरण झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक निदर्शने व सभा झाल्या. पाकिस्तानच्या विरोधात भडकलेल्या भावना काबूत आणण्यासाठी पाकिस्तानी सेनेला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले. यापुढे कलातच्या खानशाहीचे प्रशासन पूर्वी ब्रिटिशांच्या काळात होते तसेच राहील, हा जिना यांचा निर्णयही खानसाहेबांना कळविण्यात आला आणि 15 एप्रिल, 1948 पासून या खानशाहीचे प्रशासन पाकिस्तानी सरकारने पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणले. महंमद अमिन खोसा आणि अब्दुल समद अचाकझाई यांच्यासह अनेक बलुची नेत्यांना अटक झाली आणि ‘अंजुमन-ई-वतन‘ या कॉंग्रेसधार्जिण्या पक्षाला बेकायदेशीर ठरविण्यात आले. (आकृती क्रमांक 6)  बलुचिस्तान पाकिस्तानकडून स्वातंत्र्य का मागत आहे? ‘क्‍योरा‘ या संकेतस्थळावरील लेख मी नियमितपणे वाचतो आणि तेथील बऱ्याच विषयांवर लिहितोही. तेथील काही वाचकांच्या या विषयावरील मतांचा मी इथे गोषवारा घेत आहे. ‘क्‍योरा‘वर नियमित लेखन करणारे पाकिस्तानचे (*2) हसन काझी म्हणतात, की ‘या विषयावर चर्चा करताना सर्वांत आधी अशा चर्चांमध्ये अनाहूतपणे घुसणारे ‘दहशतवादी राष्ट्र‘ किंवा ‘भारताचे कारस्थान‘ वगैरे बाबी बाजूला ठेवून आणि मुख्य बाबींकडे लक्ष केंद्रीत करून चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी बलुचिस्तान 47 टक्के जमीन व्यापून आहे आणि तरीही या राज्याचा विकास नगण्यच आहे. वरवर पाहता बलुचिस्तान वैराण प्रदेश वाटतो; पण वस्तुस्थिती तशी नाही. 75 चौ. कि.मी. विस्तार असलेला ‘लास बेला‘ हा भाग सुपीक आहे. ईशान्येकडील क्वेट्टाजवळील भाग (नकाशा पहा) फळांसाठी उपयुक्त आहे. शिवाय तेथे खनिजसंपत्तीही भरपूर आहे. ‘सिबी‘ सब-डिव्हिजनमधील ‘सुई‘जवळ नैसर्गिक वायूचा प्रचंड साठा आहे. झोब शहराजवळ ‘अँन्टिमनी‘ हा धातू मिळतो. ‘कोह-ए-सुलतान‘ येथे गंधक मिळते. रेकोडिक/सैंदक येथे सोन्याच्या व तांब्याच्या खाणी आहेत. पण ही नैसर्गिक संपत्ती फारशी वापरत आणली गेलेली नाही किंवा तिने बलुची लोकांचा फारसा फायदा झालेला नाही. उदाहरणार्थ: नैसर्गिक वायू जरी बलुचिस्तानमध्ये मिळत असला, तरीही तो बलुची लोकांना फारसा न मिळता पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील अनेक उद्योग-धंद्यांनाच दिला गेलेला आहे. आता ग्वादारकडे व बलुचिस्तानमधील पायाभूत सुविधांकडे वळू. बलुचिस्तानमध्ये रस्त्यांची सोय नावालाच आहे. कराची-क्वेट्टा-इराण हा एकच लोहमार्ग येथे आहे. इतकेच काय, पण मकरान किनारपट्टीवर लोहमार्ग उभा करायला कुठलीही तांत्रिक अडचण नसूनही इथे लोहमार्ग झालेला नाही. ग्वादार उद्या ‘दुबई‘ बनू शकतो; पण ग्वादार प्रकल्पाचा मोठा फायदा बलुचींना मिळले, असे वाटत नाही. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराची दादागिरी सतत चालू आहे. येथील अनेक लोक ‘बेपत्ता‘ झाले आहेत आणि आजही होत आहेत. 1946 मध्ये जिना यांच्या कालखंडात आणि नंतर 1970 च्या दशकात भुट्टो यांच्या कालखंडात व अगदी अलीकडे 21 व्या शतकात परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीमध्ये पाकिस्तानी लष्करी मोहिमांद्वारे बलुची जनतेवर अपरिमित अत्याचार केले गेले. पाकिस्तानी सीमारक्षक दलाने अनेकांचे अपहरण केले आणि ‘ते बेपत्ता आहेत‘ असे जनतेला सांगितले गेले. कित्येक वर्षांनंतर त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकलेले मिळाले. पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये बलुचिस्तानला फारसे प्रतिनिधित्व नाही. कारण बलुचिस्तानची लोकसंख्या अत्यंत कमी आहे; पण पश्‍चिमेच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील भागात अमेरिकेने जशी लोकवस्ती वसविली, तसा प्रयत्न पाकिस्तानने केलाच नाही. बलुचिस्तानचा आवाज, त्यांचा निषेध सातत्याने दडपला गेला आहे. त्यांच्या नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या मामा कादीर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. मानवतावादी कारणांसाठी निधी गोळा करण्यासाठी न्यूयॉर्कला जात असताना मामा कादीर यांना विमानात चढूच दिले गेले नव्हते. (आकृती क्रमांक 7)  थोडक्‍यात सांगायचे, तर बलुचिस्तानला स्वातंत्र्य हवे आहे; पण ते त्यांना मिळणे कठीण दिसत आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य न मिळण्याची कारणे : • दक्षिणेकडील अरबी समुद्राची सीमा सोडल्यास बलुचिस्तानच्या इतर सीमा खुल्या नाहीत. बलुचिस्तानच्या प्रत्येक सीमेवर मोठे भूप्रदेश आहेत. पश्‍चिमेला इराण आहे, उत्तरेला अफगाणिस्तान आणि पूर्व, उत्तरेला उर्वरित पाकिस्तानच पसरला आहे. या उलट बांगलादेश सर्व बाजूंनी भारताने वेढलेला देश होता. त्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या ‘मुक्तीवाहिनी‘ या स्वातंत्र्यसेनेला भरघोस मदत करणे भारताला शक्‍य झाले. • बलुचिस्तानची लोकसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मोठ्या लष्कराशी ते एकटे लढू शकत नाहीत. • यासाठी भारताला इराणची मदत घेऊन त्यांच्या सिस्टन या राज्यात आपली लष्करी उपस्थिती निर्माण करावी लागेल. सुदैवाने, सध्या याच भागातील ग्वादारपासून केवळ 170 किलोमीटर अंतरावर असलेल्या (*3) चाबहार या बंदराच्या विकासकार्यात भारत इराणला मदत करत आहे. वेगाने मदत करून तेथील सरकारला खुष करून तिथे आपली लष्करी तळासारखी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न भारताने करायला हवा. (आकृती क्रमांक 7 पाहा) • स्वार्थासाठी का होईना, पण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहीलच. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळवून देणे बांगलादेशच्या लढ्याएवढे सोपे नाही. पण बलुची जनतेला पूर्ण समर्थन देण्याचे वचन देऊन आणि ते वचन निभावून हे नक्कीच करता येऊ शकेल. • पण तरीही येत्या तीन-चार वर्षांत बलुचिस्तान स्वतंत्र होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. कदाचित, ‘विशफुल थिंकिंग‘ म्हणा हवं तर! ‘क्‍योरा‘वरील दुसऱ्या वाचक-लेखिका आहेत अक्‍सा मिर्झा. (*2) या स्वत:ला ‘प्राऊड पाकिस्तानी‘ म्हणवून घेतात. त्या म्हणतात, ‘स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी बलुचिस्तानच्या कलातस्थित नवाबांनी बलुची लोकांना न विचारताच बलुचिस्तानच्या सामिलीकरणास संमती दिली. बलुचींना पाकिस्तानपासून विभक्त असा स्वायत्त देशच हवा होता. त्यामुळे सामिलीकरणाच्या निर्णयामुळे क्रोध आणि वैफल्याची एक लाटच बलुची लोकांत पसरली. बलुचिस्तान हा नैसर्गिक संपत्ती व कष्टाळू बलुची जनता यांनी समृद्ध असा देश आहे, यात काडीचीही शंका नाही. पण दुर्दैवाने, स्वातंत्र्यापासून त्यांची सातत्याने आणि कठोरपणे पिळवणूक होत आहे. ‘खंडणी‘साठी त्यांना पळविले जात आहे. स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ दडपण्यासाठी अनेक लष्करी मोहिमा राबविल्या जात आहेत. ‘संदकगोल्ड‘सारखे विविध प्रकल्प परदेशी गुंतवणुकदारांना दिले जात आहेत आणि त्यातील कामगारही बलुची न नेमता उपरेच आणले जात आहेत. बलुचिस्तानमध्ये चांगल्या दर्जाचे एकही विद्यापीठ नाही. पायाभूत सुविधांच्या नावानेही ठणठणाटच आहे आणि या सर्वांवर कळस म्हणजे बलुची जनता ‘बेपत्ता‘ केली जात आणि पक्षपाताने त्यांची पिळवणूक केली जात आहे. हे सारे येथील परिस्थितीचे एक सर्वसाधारण वर्णन आहे. पण सर्वांत वाईट क्षण कधी व कसा येईल, हे सांगणे सोपे नाही. ‘अभिमानी हिंदुस्तानी‘ व ‘हिंदू‘ असे वर्णन करणारे ‘क्‍योरा‘वरील एक वाचक अंकित वशिष्ठ लिहितात, ‘स्वातंत्र्याची मागणी त्यांच्यावरील मानवाधिकारांच्या पायमल्लीतून आली आहे. पाकिस्तानी मुलकी सरकार तिथेच उगम पावलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या भ्रष्ट पाकिस्तानी लष्कराला काबूत ठेवू शकत नाही. त्यामुळे काही काळ जाऊ दिल्यानंतर या दहशतवादी संघटना अधिकच बलवान बनतात. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्‍मीरमधील काश्‍मिरी जनतेला व बलुचिस्तानमधील बलुची जनतेला पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांना समर्थन देणारे जिहादी कसे वागवतात, हे ‘यू-ट्युब‘वर कुणीही पाहू शकेल. हे वर्णन वापरून शोधल्यानंतर इथे मिळालेल्या असंख्य चित्रफितींमध्ये पाकिस्तानात मानवाधिकार कसे शून्यावर आहेत, हे दिसून येते. अलीकडे सरकारी समर्थनाखाली चाललेल्या बलुची राजकीय नेत्यांच्या पाकिस्तानमधील निर्घृण हत्येच्या निषेधात कॅनडातील बलुची जनतेने टोरांटोमध्ये पाकिस्तानी झेंडा जाळला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने ‘बलोच नॅशनल मूव्हमेंट‘ या बलुचिस्तानच्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे महासचिव डॉ. मन्नन बलोच यांची हत्या केली. दहशतवाद्यांना किंवा भ्रष्ट पाकिस्तानी लष्कराला तोंड द्यायला पाकिस्तानी लष्कर समर्थ नाही, हेच बलुची लोकांच्या किंवा पाकव्याप्त काश्‍मीरमधील काश्‍मिरी जनतेच्या सद्यपरिस्थितीबद्दलच्या नाराजीचे मुख्य कारण आहे. कारण त्यामुळे काश्‍मिरी आणि बलुची जनतेला शांततामय जीवन जगणे कठीण जात आहे. ‘मी पाकिस्तानचा अर्थ लावू शकतो‘ असे सांगणारे ‘क्‍योरा‘वरील एक वाचक आणि बलुचिस्तानमधील एक लोकप्रिय लेखक उस्मान काझी (*2) म्हणतात, ‘पाकिस्तानने बरीच वर्षे ब्रिटिशांच्या थाटात बलुचिस्तानवर राज्य केले. नेमला गेलेला कुणी सनदी नोकर ब्रिटिशांच्या काळातील ‘पॉलिटिकल एजंट‘ची भूमिका घेई आणि बलुची जमातीच्या मुखियाबरोबर थेट संपर्क ठेवी. कधी कपटाने तर कधी अक्कलहुशारीने बऱ्याचदा ते मुखियाला सरकारी धोरणाच्या बाजूने जरी वळवित असले, तरीही सरकारकडून होऊ शकणाऱ्या हिंसक हल्ल्याची भीती त्यामागे असायचीच. त्यामुळे हे कधीच सुरळीतपणे चालले नाही. कलात खानशाहीच्या मुखियाने आपल्या प्रांताचे पाकिस्तानी लष्कराने केलेले ‘हरण‘ कधीच मान्य केले नाही. पाकिस्तानी लष्कराने कधी स्वत: तर कधी कधी इराणच्या मदतीने या मुखियांची बंडाळी दडपण्याचे प्रयत्न चालू ठेवले. परिणामत: तुलनेने सुखा-समाधानात राहणारा बलुची मध्यमवर्ग्ग तिथे कधीच उभा राहिला नाही. अनेक सत्ताधारी गट बलुची राजकीय नेत्यांना आपल्याला हवे तसे त्यांच्या तालावर नाचवत होते आणि त्यात पाकिस्तानी सरकार सर्वांत वर होते. बलुची आणि सिंधी लोकांमध्ये खूप दृढ संबंध होते; पण बलुची आणि पंजाबी बुद्धिजीवी लोकांत असे संबंध जुळलेले कुणालाच-अगदी पाकिस्तानलाही नको होते. (असे का, ते मला स्पष्ट झालेले नाही : सुधीर काळे) बलुची लोकांत निर्माण झालेला एक अज्ञात भयगंड आणि ‘आपण फसविले जात आहोत‘ हा त्यांच्या मनातील सल हा त्याचाच परिपाक आहे. पाकिस्तान सरकारला वाटते, की दादागिरी करून ते सारे सुरळीत करू शकतील. पण इतर राष्ट्रांतील जुलमी हुकूमशहांनाही असेच वाटत आलेले आहे; पण शेवटी ते दिवास्वप्नच ठरले, हे गडाफी, सद्दाम हुसेन, होस्नी मुबारक यांच्या उदाहरणांतून जगाने पाहिले आहेच. आखाती अरब राष्ट्रे ‘जुंडुल्ला‘सारख्या शियाविरोधी पिसाट गटांना समर्थन देताना दिसतात. इराणला आपले स्वत:चे हितसंबंध सांभाळायचे आहेतच. भारतही बलुचिस्तानमध्ये लुडबूड करत आहे व अफगाणिस्तानमध्ये उभ्या केलेल्या आपल्या संबंधांचे व सैन्याचे जाळे तिथे नक्कीच वापर आहे. (हे मत या पाकिस्तानी लेखकाचे!) बलुचिस्तानात तृणमुळापासून उभी असलेली लोकशाही प्रस्थापित करणे, हा एक चांगला उपाय आहे. उर्वरित पाकिस्तानमधील वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असे करण्याबाबत बराच उत्साह असला, तरीही बलुचिस्तानमधील टोळक्‍यांच्या मुखियांचे महत्त्व कमी करणारा हा उपाय त्यांना फारसा रुचणारा नाही. पण अलीकडेच झालेल्या राज्यघटनेतील बदलांमुळे आता सर्व प्रांत आपापल्या धोरणांची अंमलबजावणी आपणच निवडलेल्या विधासभांद्वारे स्वत: करू शकतात. या नव्या बदलामुळे बलुचिस्तानला सध्या आशेचा किरण दिसत आहे. पाकिस्तानचे प्रत्येक राज्यातील हितसंबंध देशाच्या पातळीवर सांभाळण्याचे काम आज लष्कराकडे आहे. पाकिस्तानी फौजेत सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर बलुची लोकांची संख्या वाढविण्याकडेही लक्ष पुरविले जात आहे. तरीही आजपर्यंत कुठलाही बलुची माणूस लष्करात उच्च स्थानावर बसलेला दिसत नाही. जिब्रान मोहेंजो हे हैदराबाद (सिंध) येथील पाकिस्तानी वाचक (*2) लिहितात, ‘बलुची लोकांना त्यांचा स्वत:चा देश द्यायला हवा. कारण त्यांची संस्कृती आणि परंपरा अगदी वेगळी आणि स्वत:ची आहे. त्यांचे पूर्वजही अरबस्तानाशी जास्त जुळते आहेत. याविरुद्ध सिंध, पंजाब आणि काश्‍मीर हे प्रदेश भारतात विलीन व्हायला हवेत कारण आपणा सर्वांचे पूर्वज भारतीय वंशाचे आहेत. पाकिस्तानचा उत्तरेकडील भाग खैबर पख्तुनवा आणि वझिरिस्तान हा भाग एकतर अफगाणिस्तानमध्ये सामिल करावा किंवा त्याचे एक स्वतंत्र राष्ट्र करावे. असे केल्यासच या वेगवेगळ्या विभागांच्या सीमा नक्की होतील, दहशतवाद्यांच्या कारवाया कमी होतील, या भागांचा विकास सुरू होईल आणि येथे शांती नांदेल. कारण या विभागणीमुळे प्रत्येक वंशाच्या जनतेला सन्मानाने राहता येईल आणि आपली संस्कृती, परंपरा पाळत विकासाच्या दिशेने पाऊल टाकता येईल. ‘माझे हृदय हिंदुस्तानी आहे‘ असे सांगणारे हेलमुट झिगलर हे वाचक (नावावरून जर्मन असावेत) म्हणतात, ‘भारताने बलुची लोकांच्या या स्वातंत्र्य युद्धाला नक्कीच पाठिंबा द्यायला हवा.‘ त्याची कारणे सांगताना ते म्हणतात, की 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानचा अपमानास्पद आणि संपूर्ण पराभव केला. पाकिस्तानच्या जनरल नियाझी यांना 97,000 सैनिकांसह लेखी शरणागती पत्करावी लागली. युद्धात दोन्ही बाजुंचे नुकसान झाले असले, तरीही जास्त प्रमाणात हानी पाकिस्तानचीच झाली. यावरून स्पष्ट झाले, की समोरासमोरच्या आणि परंपरागत शस्रास्त्रांसह लढलेल्या युद्धात पाकिस्तानच्या विजयाची अजिबात शक्‍यता नाही. म्हणून भारतातील परिस्थिती अस्थिर ठेवून त्याच्या विकासाच्या मार्गात अडचणी उभ्या करण्याचा एकच मार्ग पाकिस्तानकडे उरतो. तो म्हणजे भारतातील बंडाळींना समर्थन द्याय चे आणि भाडोत्री दहशतवादी वापरून घातपाताच्या कारवाया घडवून आणायच्या. हेच धोरण पाकिस्तानने पंजाबमध्ये राबविले आणि आजही तो पाकिस्तानमध्ये याच धोरणाचा उघडपणे वापर करत आहे. आज पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये व बलुचिस्तानमध्ये काय घडत आहे? पाकिस्तानी फौजांनी बंगाली वंशाच्या लोकांना ज्या तऱ्हेने छळून काढले, तीच तऱ्हा आता बलुची, पठाण वंशाच्या, जनजातीच्या लोकांशी वागताना किंवा शिया पंथीयांष्ही वागताना ते वापरत आहेत. त्यांच्या संस्कृतीला दडपून टाकत त्या सर्वांवर अत्याचार सुरू आहेत. बलुची लोकांना ‘निकृष्ट दर्जा‘चे नागरिक मानून त्यांना अपमानास्पद पद्धतीने वागणूक दिली जात आहे. त्यामुळे बलुची नागरिकांचे निषेध मनापासून आहेत आणि आता ते रस्त्यांवरही दिसत आहेत. एखाद्या बलुची व्यक्तीला ‘उचलणे‘, त्याला नाहीसा करणे, अमानूष हाल करणे, त्याचे अवयव तोडून टाकणे आणि शेवटी त्याची हत्या करणे अशा पद्धतीचे आरोप सीमारक्षक दल, लष्कर ए झांगवी, आयएसआय ही गुप्तहेर संघटना आणि तशाच काही इतर संघटनांवर गेल्या दहा वर्षांपासून होत आहेत. ‘बलुची लोकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करण्यासाठी आयएसआय जबाबदार आहे,‘ असे ‘ह्युमन राईट्‌स वॉच‘ या संघटनेनेही नमूद केले आहे. या अहवालात शेकडो राष्ट्रवाद्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ‘बेपत्ता‘ होण्यास आयएसआयलाच जबाबदार धरले आहे. 2008 या एकाच वर्षभरात 1102 बलुची राष्ट्रवादी व कार्यकर्ते नाहीसे झाले आहेत. त्यांचा क्रूर छळ झाल्याच्याही तक्रारी आहेत. मलिक सिराज अकबर या वार्ताहराच्या मते 2015 च्या मे महिन्यापर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून दररोज डझनावारी लोकांच्या हत्या बलुचिस्तानमध्ये होत आहेत. डोक्‍यात गोळ्या घालून ठार केलेल्या बलुची नागरिकांची प्रेते रस्त्याच्या कडेला फेकलेली दिसत आहेत. ‘यावर आपण भारतीय काय करू शकतो‘ याविषयी झिगलर म्हणतात : • जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांना पाकिस्तानी सुरक्षा दले उघडपणे साह्य करत असेल, तर आपणही (भारत) बलुची आणि पठाण लोकांच्या स्वातंत्र्य युद्धांना राजकीय, लष्करी आणि वित्तीय मदत उघडपणे केली पाहिजे. • भारताने अफगाणिस्तानमधील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या पाहिजेत आणि ‘जशास तसे‘ या न्यायाने बलुची स्वातंत्र्ययोद्‌ध्यांना लष्करी मदत व प्रशिक्षण देण्यात पुढाकार घेतला पाहिजे. • संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने बलुची लोकांचा प्रश्‍न उपस्थित केला पाहिजे. कारण त्यांना सक्तीने पंजाबी-सिंधी संस्कृतीचा अवलंब करावा लागत आहे. • भारताने अफगाणिस्तानमध्ये आपले लष्करी तळ स्थापले पाहिजेत आणि तेथील लढवय्यांना पाकिस्तानी लष्कराशी भिडण्यासाठी तयार केले पाहिजे. • बलुची लोकांच्या स्वातंत्र्य युद्धासाठी भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आवाज उठविला पाहिजे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवून दिले पाहिजे. • बलुचिस्तानमधील अशांततेचा भारताने फायदा करून घेतला पाहिजे. ‘असे केल्याने भारताचे काय फायदे होतील‘ याविषयी झिगलर म्हणतात : 1. ‘जशास तसे‘ या न्यायाने पाकिस्तानच्या काश्‍मीरबाबतच्या वागणुलीमध्ये फरक पडेल. केवळ संयुक्त राष्ट्रांतच नव्हे, तर आपल्याविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान तेथील बंडखोरांना जसे प्रशिक्षण देत आहे, त्याविषयीही पुनर्विचार करत त्यांना आपले पाऊल मागे घ्यावे लागेल. 2. सध्याच्या आक्रमक धोरणाची जागा सबुरीच्या धोरणात होईल. ते काश्‍मीरबद्दल चिंता करणे सोडून बलुचिस्तान आपल्याकडे कसा टिकवून धरायचा, याबद्दल विचार करू लागतील. 3. पाकव्याप्त काश्‍मीरमधील पाकिस्तानची लष्करी उपस्थिती कमी होईल; कारण त्यांना बलुचिस्तानमधील बंडाळीला काबूत ठेवण्यासाठी आपली लष्करी उपस्थिती वाढवावी लागेल. 4. दहशतवादी आणि विभक्तवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट होईल. पाकिस्तान स्वत:च एका दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसलेला आहे. त्यांची वाट लावण्यासाठी एक ठिणगी पुरेशी आहे, याची आठवण आपण सातत्याने त्यांना करून दिली पाहिजे. बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करून भारत तेथील बंडखोरांना सक्रिय मदत करत असल्याचे आरोप आणि कराचीत अस्थिरता पसरवित असल्याचे आरोप पाकिस्तान नेहमीच करत आला आहे. पण ‘निराधार, बिनबुडाचे आणि खोटे‘ असे सांगत भारत हे आरोप फेटाळत आला आहे. याउलट भारताने सातत्याने पाकिस्तानवर आरोप केले आहेत, की तो देश तेथील जिहादी तरुण काश्‍मीर आणि इतरत्रही घुसवून भारतीय सैन्यावर हल्ले चढवित असतो आणि तालिबानतर्फे अफगाणिस्तानमधील सुरक्षा दलांवरही हल्ले करत असतो. ‘काश्‍मीरमधील लढ्याला नैतिक, आर्थिक आणि राजनैतिक पाठिंबा देत आहे,‘ असे पाकिस्तान जाहीरपणे सांगत असतो. मग ‘आपण बलुचिस्तानच्या लढ्याला नैतिक, आर्थिक आणि राजनैतिक पाठिंबा देणारच,‘ असे आपले नेतृत्व रोखठोकपणे का सांगत नाही? विक्रम यशस्वी नावाचे एक लेखक (यांची मते बलुचिस्तानमध्ये खूप वाचली जातात, असे दिसते) म्हणतात, की बांगलादेशने ज्या कारणांसाठी स्वातंत्र्य मागितले होते (आणि मिळविलेही) अगदी त्याच कारणांसाठी बलुचिस्तानही स्वातंत्र्य मागत आहे. ‘उरल्या-सुरल्या‘ पाकिस्तानच्या क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ बलुचिस्तानने व्यापलेले आहे आणि त्यांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ पाचच टक्के आहे, तिथे भरपूर नैसर्गिक संपत्ती आहे, हे आपण याआधी पाहिले आहेच. पाकिस्तानने ही नैसर्गिक संपत्ती भरपूर ओरबाडली आहे; पण सैनिकांकडून होणारे जुलूम, निदर्शकांचे खून याशिवाय त्यांना काहीच चांगले दिलेले नाही. म्हणूनच पाकिस्तानपासून वेगळा होऊन बलुचिस्तान स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र होऊ पाहत आहे. पाकिस्तानच्या एकूण ‘जीडीपी‘च्या 30 टक्के वाटा सिंध प्रांत देतो. पण त्याबदल्यात सिंधला फारसे काही मिळत नाही. त्यामुळे सिंध व बलुचिस्तान हे दोन्ही प्रांत आर्थिकदृष्ट्‌या नाडले गेलेले असून त्या दोन्ही प्रांतांत स्थानिक जनतेविरुद्ध पोलिस आणि लष्कराच्या कारवाया सातत्याने सुरू असतात. या दोन प्रांतांशिवाय, तेथील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील आदिवासी भाग (फेडरली ऍडमिनिस्टर्ड ट्रायबल एजन्सी- फाटा) केव्हाच पाकिस्तानमधून बाहेर पडल्यातच जमा आहे. तिथे सध्या यादवी युद्ध भडकले असून पाकिस्तानी लष्कर 2014 च्या जूनपासून ‘जर्ब-ए-अझब‘ या नावाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहे. पण या मोहिमेत त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही आणि तेथील भागावर अद्याप पाकिस्तानची सत्ता प्रस्थापित झालेली नाही. झुबिन दरबारी (*2) म्हणतात, की बलुचिस्तान व सिंध यांमध्ये बराच फरक आहे. सिंध प्रांत स्वखुषीने पाकिस्तानमध्ये सामील झाला आणि जोडण्यात आला; पण बलुचिस्तानचा ताबा जबरदस्तीने घेण्यात आला. लष्करात आणि इतरत्र पंजाबींचे महत्त्व वाढू लागले आणि ‘आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे‘ असे सिंधी लोकांना वाटू लागले. यातूनच स्वतंत्र होण्याची इच्छा सिंध प्रांतात निर्माण झाली. मात्र, या मागणीने अद्याप जोर धरलेला नाही. बलुचिस्तानची परिस्थिती अगदीच वेगळी आहे. त्यांना कधीच पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे नव्हते. पण त्यांच्यावर जुलुमाने पाकिस्तानी सत्ता लादली गेली. बलुचिस्तानमधील नैसर्गिक संपत्ती पंजाब प्रांत आणि चीन ओरबाडून नेत आहेत. बलुचींना त्यात काही मिळत तर नाहीच; वर त्यांच्या नागरिकांच्या हत्याही होत आहेत. त्यांची प्रेते दरदिवसाआड बेवारस असल्यासारखी दिवसाढवळ्या रस्त्यांच्या कडेला फेकली जात आहेत. अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडताच ही सर्व परिस्थिती पाकिस्तानसाठी अत्यंत खडतर होणार आहे. .......................................................................................................................... टीपा : *1 : या महामार्गामुळे चीनमध्ये निर्माण झालेला तयार माल तिबेटमधून पाकिस्तान ओलांडून ग्वादार या बलुचिस्तानमधील पाण्याची भरपूर खोली असलेल्या बंदरातून मध्यपूर्वेला निर्यात करता येईल. तसेच, चीनला लागणारा मालही याच मार्गाने चीनला नेता येईल. शिवाय हिंदी महासागर आणि अरबी समुद्र यांना वगळून पश्‍चिमेला जाणारा एक नवा पर्यायही चीनला मिळेल. *2 : ही सारी मते पाकिस्तानी व्यक्तींची आहेत. *3 : सरळ रेषेत हवाई मार्गाने गेल्यास.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
27001 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

आकृत्या, चित्रे कशी चढवायची?

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 07:21 नवीन
मी आकृत्या चढवू शकलो नाहीं! Image URL म्हणजे काय? WidthXHeight म्हणजे काय? Alternative Text म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

मला चित्रे कशी चढवायची हे शिकायचे आहे.

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 07:29 नवीन
मला चित्रे कशी चढवायची हे शिकायचे आहे. तोवर आकृत्या पहाण्यासाठी सकाळवरील लेख वाचावा!
  • Log in or register to post comments

मला चित्रे कशी चढवायची हे शिकायचे आहे.

मुक्त विहारि
Mon, 07/18/2016 - 10:27 नवीन
कृपया, खालील लिंक बघा. http://www.misalpav.com/node/13573 तरी पण काही अडलेच तर मला व्यनि केलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सकाळमधील जे पहिले चित्र आहे

शाम भागवत
Mon, 07/18/2016 - 15:12 नवीन
सकाळमधील जे पहिले चित्र आहे त्या चित्रावर राइट क्लिक करा. कॉपी इमेज अ‍ॅड्रेस हा पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला त्या चित्राची लिंक मिळेल. ती अशी असेल. http://www.esakal.com/esakal/20160517/images/5761476394443584250 /4659171028562036584_Org.jpg ती तुमच्या मजकुरात चिकटवा. त्या लिंकच्या अगोदर < img src=" असे टाइप करा. व शेवटी "> असे टाइप करा. अगदी असेच करून मी ते चित्र खाली दाखवले आहे. टीपः येथे दाखवलेली लिंक नीट दिसावी म्हणून मी ती एका ओळी ऐवजी दोन ओळीवर दाखवलेली आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

शाम भागवत जी.....

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 22:32 नवीन
भागवत-जी, तुम्ही लिहिलेले कळले व मी एक लिंक तशी बनवलीसुद्धा! पण हे करायला 'एडिट मोड'मध्ये कसे जायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

निसटत्या बाजू आणि साशंकता

माहितगार
Mon, 07/18/2016 - 10:29 नवीन
बलूचीस्तानची ओळख करुन देणे ठिक आहे. सिंध स्वखुशीने सामील झाला हे अर्धसत्य एवढ्यासाठी की १९४०च्या दशकात काँग्रेस आणि हि.महासभेने राजकीय घोडचूका सिंधच्या बाबतीत केल्या. नाहीतर पूर्वपंजाब सोडला तर पाकिस्तान निर्मितीची बाजू बलुचीस्तान सिंध आणि नॉर्थवेस्ट प्रभाग या तिन्ही प्रांताबाबत लंगडी होती. बंगाल भारतापासून तुटण्या मागे बिहारी मुस्लिमांचे उत्पातमुल्य होते. अर्थात हा झाला इतिहास. आज पाकीस्तानसुद्धा एक आण्विक शस्त्रे बाळगणारे राष्ट्र आहे हे श्री सुधीर काळे यांचा लेख लक्षात घेताना दिसत नाही, त्यामुळे बलुचिस्तानी आणि सिंधी जनतेला मदत करणे वेगळे आणि आण्विक युद्धाची शक्यताच लक्षात न घेणे वेगळे. बलुचिस्तान हा प्रदेशही तिबेटप्रमाणे विरळ लोकसंख्येचा आहे पाकीस्तानी लष्कराला पुरुन उरेल एवढे स्वतःचे लष्करही ते उभे करु शकणार नाहीत आणि अफगाणी पठाणांचा लढाऊ कडवेपणाही त्यांच्यात नाही म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्व्हमेंट भारतीय फौजांचीच लागेल आणि भारतीय फौजा इन्व्हॉल्व करणे म्हणजे आण्विक युद्धाच्या शक्यतेचा विचार दूरकरणे कठीण त्यामुळे लेखात सुचवलेल्या बलुचिस्तानला तोडण्याच्या सुचनेत दम नाही. फार फार तर इराण आणि पाकिस्तानचे संबंध टोकाचे ताणले गेले तर इराण त्यांची फौज पाकीस्तानच्या सिमेवर नेऊन झोप उडवू शकते पण इराणही आण्विक शस्त्रे असलेल्या पाकिस्तानशी मर्यादे बाहेर पंगा घेऊ शकणार नाही. सामरीक आणि लष्करी तंत्रज्ञानात क्षमतेत भारत आजही आमेरीकेसारखा बलवान नाही. पाकिस्तानला त्यांची अण्वस्त्रे आमेरीकी भूमीवर नेता येत नाहीत भारतीय भूमी त्यांना दूर नाही अणव्स्त्रे असलेले विमान त्यांच्या स्वत:च्याच भूमीवर कोसळले अथवा भारताने आधी अण्वस्त्र हल्ला पाकीस्तानवर केला तरी भारतीय भूमीवरही अण्वस्त्रांचा परिणाम होईल एवढे पाकीस्तान भारताला खेटून आहे.
  • Log in or register to post comments

बलुचिस्तानची आझादी

गॅरी ट्रुमन
Mon, 07/18/2016 - 11:03 नवीन
मस्त लेख. इतर मुद्द्यांवर नंतर लिहितो पण सध्यापुरते एकाच मुद्द्यावर लिहितो:
वास्तविक, बांगलादेशला स्वतंत्र करण्ण्यात भारताने जशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, तशीच बलुचिस्तानच्या बाबतीतही करून बलुचिस्तानला भारताने ‘आझादी‘ मिळवून दिली पाहिजे.
मला याच्या उलटे वाटते. बांगलादेश कधीनाकधी पाकिस्तानातून फुटणे क्रमप्राप्त होते.आपण युध्दात बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामुळे ती प्रक्रिया लवकर झाली.म्हणजे समजा १९७१ चे युध्द झाले नसते तरी भविष्यकाळात-- १९७५-७६ पर्यंत कदाचित बांगलादेश फुटलाच असता.पण तसे झाले असते तर पाकिस्तानच्या मागे बांगलादेशची अंतर्गत कटकट आणखी काही वर्षे लागून राहिली असती आणि पाकिस्तानची जास्त शक्ती आणि लक्ष त्या कटकटीमध्येच गेले असते. पाकिस्तानचा आणखी शक्तीपातही या प्रकारात झाला असता. शत्रूला त्याच्या घरातील अंतर्गत कटकट निर्माण होणे आणि शत्रूचे सगळे लक्ष त्यातच लागणे ही कोणासाठीही खूपच चांगली परिस्थिती असते. पण १९७१ मध्ये आपण बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामुळे झाले असे की शत्रूच्या पोटातील कॅन्सरची गाठ शस्त्रक्रिया करून आपण एका फटक्यात काढून दिली.वास्तविक शत्रूच्या पोटातील ती गाठ अधिक काळ ठसठसत राहिली असती तर त्याचा शत्रूला जास्त त्रास झाला असता. १९७१ मध्ये आपणच युध्दाच्या दृष्टीने पावले उचलत होतो-- विशेषतः मार्च १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराची बांगलादेशात दडपशाही सुरू झाली आणि भारतात निर्वासितांचा लोंढा येऊ लागला तेव्हापासून. किंबहुना इंदिरा गांधींना लवकरच युद्ध सुरू करायचे होते पण पावसाळा संपेपर्यंत सबुरी ठेवा असा सल्ला सॅम मानेकशाँनी दिला होता असेही वाचले आहे. माणेकशाँच्या सल्ल्यानंतर आपण युध्द सुरू करण्यापेक्षा शत्रूने युध्द सुरू करायची वाट बघणे इंदिरा गांधींना श्रेयस्कर वाटले. त्याप्रमाणे ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हवाईदलाच्या तळांवर हल्ले केल्यानंतर प्रत्यक्ष युध्द सुरू झाले.तेव्हा माझा मुद्दा हा की त्यावेळीही आपण पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यापुरती आणि बांगलादेश स्वतंत्र न करता आपली कारवाई मर्यादित ठेवली असती तर बरे झाले असते. एकतर शत्रूच्या पोटातील कॅन्सरची गाठ आपण काढायला मदत केलीच आणि नंतरच्या काळात बांगलादेश आपल्या बाजूने उभा राहिल अशी अपेक्षा आपली असेल तर ती पण तितकी पूर्ण झालेली दिसत नाही.बांगलादेशानेच पूर्वोत्तर भारतातील दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन आणि पाठबळ कित्येक वर्षे दिलेच होते.शेख हसिनांना त्यांच्या प्रयत्नांत पूर्ण यश यावे हीच सदिच्छा. बलुचिस्तानात परिस्थिती अजून बांगलादेशइतकी चिघळलेली नाही.बलुचिस्तानमध्ये लोकसंख्या फार नाही (त्याउलट बांगलादेशातील परिस्थिती होती) हे पण एक कारण असेलच.ती परिस्थिती अजून चिघळावी म्हणून आपण मदत करत आहोतच हे म्हणायला नक्कीच जागा आहे.ही परिस्थिती जास्तीत जास्त चिघळत राहावी आणि पाकिस्तानची शक्ती आणि वेळ जास्तीत जास्त त्यातच खर्च व्हावा--शत्रूच्या पोटात कॅन्सरची नवी गाठ निर्माण व्हावी आणि ती दूर करायला आपण मदत करू नये--म्हणजेच बलुचिस्तानात परिस्थिती चिघळवायला जरी आपण मदत करत असलो तरी बलुचिस्तान स्वतंत्र करायला मात्र मदत करू नये असे मला वाटते.नाहीतर भविष्यात बलुचिस्तान हा दुसरा बांगलादेश होईल. त्यापेक्षा बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग म्हणून पण पाकिस्तानला सततच्या कटकटी निर्माण करणारा असलेला कधीही चांगला असे मला वाटते. अर्थात मला काहीही वाटण्या-न वाटण्यामुळे "भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अमेरिकेला सज्जड दम" अशी बातमी आल्यानंतर अमेरिकेत जितका परिणाम होत होता त्यापेक्षाही कमी परिणाम होणार आहे याची पूर्ण कल्पना आहे. तरीही एक भारतीय नागरिक म्हणून माझे हे मत आहे.
  • Log in or register to post comments

:)

माहितगार
Mon, 07/18/2016 - 11:23 नवीन
अर्थात मला काहीही वाटण्या-न वाटण्यामुळे "भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अमेरिकेला सज्जड दम" अशी बातमी आल्यानंतर अमेरिकेत जितका परिणाम होत होता त्यापेक्षाही कमी परिणाम होणार आहे याची पूर्ण कल्पना आहे. तरीही एक भारतीय नागरिक म्हणून माझे हे मत आहे.
:) इथे मला एवजी आपल्याला शब्द वापरला तरी चालण्यासारखे असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

काही भावनिक विश्लेषणे सोडली

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/18/2016 - 11:32 नवीन
काही भावनिक विश्लेषणे सोडली तर एक उत्तम माहितीपूर्ण लेख. १९७१ च्या आणि आताच्या राजकीय व सामरिक परिस्थितीत जमीनास्मानाचा फरक आहे आणि म्हणूनच तेव्हाची धोरणे (स्ट्रॅटेजी) आज उपयोगी नाही. पण हातावर हात ठेऊन परिस्थिती आपल्याला हवी तशी बदलणार नाही. मात्र, इतर अनेक उपाय आहेत (मल्टी-प्राँग्ड् अप्रोच) यात वाद नाही. पंधराव्या शतकात मीर चकर खान रिंद हा पाकिस्तानी व अफगाण-बलुचिस्तानचा पहिला सरदार बनला. पंधरावे शतक म्हणजे पाकिस्तान आस्तित्वात येण्याअगोदरचा ५००-६०० वर्षे अगोदरचा काल असल्याने वरच्या वाक्यातला त्याचा उल्लेख नजरचुकीने झाला असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

अमेरिकी मदत

तिमा
Mon, 07/18/2016 - 16:34 नवीन
लेख आवडला. पण मतांशी सहमत नाही. कुठलेही दु:साहस करण्यापेक्षा, अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे बंद केले किंवा भारत हा निर्णय अमेरिकेच्या गळी उतरवू शकला तर इतर काही करायची जरुर नाही. पाकिस्तान कोलमडून पडेल आणि त्याची आपोआप शकले होतील.
  • Log in or register to post comments

लेख माहितीपूर्ण आहे. पण

विशाखा पाटील
Mon, 07/18/2016 - 16:50 नवीन
लेख माहितीपूर्ण आहे. पण भारताला या प्रश्नात उघडउघड ढवळाढवळ करणे शक्य नाही. काश्मीर आणि बलुचिस्तान या दोन्ही प्रश्नांचे स्वरूपही वेगवेगळे आहे.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच अभ्यासू व

श्रीगुरुजी
Mon, 07/18/2016 - 19:38 नवीन
नेहमीप्रमाणेच अभ्यासू व माहितीपूर्ण लेख! बांगलादेश व बलुचिस्तान मधील परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहेत. भारत बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फार काही करू शकेल असे वाटत नाही. तालिबानविरूद्ध लढणार्‍या ताजिकांचा नेता अहमदशहा मसूदला भारत गुपचूप शस्त्रास्त्रांची मदत देत होता. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नव्हता. शेवटी तालिबानचा नि:पात जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्यामुळे अमेरिकेने केला. भारत बलुचीस्तानच्या लोकांना गुपचूप मदत करू शकेल. परंतु अमेरिकेसारख्या दादा राष्ट्राने मनावर घेतले तरच ते स्वतंत्र राष्ट्र बनू शकेल.
  • Log in or register to post comments

१९७१ आणी आजच्या परिस्थितीत

अभिजीत अवलिया
Mon, 07/18/2016 - 20:43 नवीन
१९७१ आणी आजच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे बलुचिस्तान वेगळे करणे एवढे सोपे नाही. भारताने तसा प्रयत्न केल्यास पाकिस्तान चीनच्या (प्रत्यक्ष अप्रत्यक्ष) मदतीने भारतावर हल्ला करू शकतो असे मला वाटते. चीन शी पंगा घेण्याएवढे लष्करी बळ भारताकडे असेल असे सध्या तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

आम्ही बलोचीस्तान वेगळा करु

खटपट्या
Mon, 07/18/2016 - 21:17 नवीन
आम्ही बलोचीस्तान वेगळा करु अशा उघड दर्पोक्त्या करुन भारत अडचणीत येउ शकतो. कोणत्याही सार्वभौम देशाचे तुकडे करण्यात आमचा हात आहे हे उघड करणे म्हणजे पाकीस्तानला नसते आरोप करुन देण्यासाठी एक हत्यार दील्यासारखे आहे. जरी पाकीस्तान काश्मीरात उघड ढवळाढवळ करत असला तरी त्यांनी अजुन जाहीररीत्या कधीच मान्य केले नाही. त्यामुळे बलोचीस्तानला छुपा पाठींबा ठीक आहे पण उघड वक्तव्ये करणे मुत्सद्देगीरीला मारकच ठरेल.
  • Log in or register to post comments

खटपट्यासाहेब.....

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 22:12 नवीन
पहिला मुद्दा: पाकिस्तान दिवसाआड "आमचे काश्मिरी जनतेला नैतिक, आर्थिक व राजकीय समर्थन होते, आहे व राहील" अशा घोषणा करत असतो, तेवढ्या तरी आपण सुरू केल्या पाहिजेत. बलुचिस्तानचे पाकिस्तानात सामिलीकरण (सिंधसारखे) स्वखुषीने झाले नव्हते तर दादागिरी, फसवेगिरी व खोटी आश्वासने देऊन झाले होते व म्हणूनच आपणही "आमचे बलुची जनतेला नैतिक, आर्थिक व राजकीय समर्थन होते, आहे व राहील" अशा घोषणा उघडपणे करणे सुरू केले पाहिजे असे माझे मत आहे. दुसरा मुद्दा: आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत हे पाकिस्तानला माहीत असूनही तो कुरापती काढतोच आहे. "नको रे बाबा, भारताकडे अणूबाँब आहे! आपल्यावर अण्वस्त्राचा हल्ला करेल" असा विचार करताना दिसत नाहीं. मग आपणच म्यांव-म्यांव करत कां बसायचे? प्रत्येक दहशती हल्ल्यानंतर मुजफ्फराबादच्या आसपासची प्रशिक्षणकेंद्रेंआपण उध्वस्त करायला हवीत. अशा बाबतीत सारे जग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या बाजूला असेल. आज जे जिहादी हल्ले अमेरिकेत, बेल्जियम, पॅरिस, नीस, वगैरे ठिकाणी होत आहेत ते पहाता सारे जग कमीत कमी आपल्या विरुद्ध व पाकिस्तानच्या बाजूने तरी नक्की बोलणार नाहीं. जर भीतभीतच जगायचे असेल तर आपण सर्व अण्वस्त्रे व प्रक्षेपणास्त्रे निकामी करून टाकू! फालतू कटकट मेली!
  • Log in or register to post comments

काळेसाहेब...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/18/2016 - 22:25 नवीन
काळेसाहेब... दुसर्‍या मुद्द्यासंबंधाने... १. भिंत पाडण्यासाठी भावनाचश होऊन तिच्यावर डोके आपटण्याऐवजी; जॅक हॅमर जवळ असलेल्यांची मदत घेणे किंवा भिंतीच्या पायाला सुरुंग लावणे या गोष्टी जास्त फायद्याच्या, कमी धोक्याच्या आणि यशासाठी जास्त खात्रीच्या असतात. २. एकही गोळी न झाडता युद्धाचे सर्व उद्द्येश सफल करणारे युद्ध सर्वोत्तम युद्ध समजले जाते... कारण इतर प्रकारच्या युद्धात जेता व जित या दोघानांही क्षती (बर्‍याचदा अपरिमित क्षती) पोहोचते. २. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारणे जास्त फायद्याचे असते. बाकी, तुम्ही सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

आपणही "आमचे बलुची जनतेला

खटपट्या
Mon, 07/18/2016 - 22:47 नवीन
आपणही "आमचे बलुची जनतेला नैतिक, आर्थिक व राजकीय समर्थन होते, आहे व राहील" अशा घोषणा उघडपणे करणे सुरू केले पाहिजे असे माझे मत आहे.
हे सर्व केंद्रातील डीप्लोमॅट कसे करायचे ते ठरवतीलच पण पाकीस्तानला नसते कोलीत मिळू नये एवढीच आशा. थोडे दीवसांनी पाकीस्तान "आधी तुम्ही बलुचीस्तानचा पाठींबा थांबवा मग आम्ही काश्मीरातील कारवाया थांबवू" असे बोलायला चालू करेल. शेवटी एकदाच नांगी ठेचणे हा एकच उपाय आहे हे मान्य. भारत ती धमक कधी दाखवणार हा कळीचा मुद्दा आहे. मोदींनी वातावरण तर तयार केलेच आहे. भारत पाकीस्तानबरोबर युध्द नेहमीच जिंकतो पण मुसद्देगीरीमधे नेहमी मागे पडतो असा पुर्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

डॉ सुहास म्हात्रेसाहेब.....

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 22:45 नवीन
मी बर्‍याच ठिकाणी लिहिले आहे कीं ट्रंप यांचा ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला कीं भारताने अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड (ANZUS), द, कोरिया, व्हिएतनाम, फिलिपीन्स, तैवान व तत्सम देशांशी सर्वांशी दादागिरी करणार्‍या (bully) चीनविरुद्ध वापरण्यासाठी एक नवी लष्करी संघटना तयार करण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे! त्यातून पाकिस्तानला डच्चू देण्याची अट महत्वाची! हे जर ट्रंप, आबे व मोदी करू शकले तर एकदम बल्ले-बल्ले होईल! अशी treaty व्हायलाच हवी. या treatyला पर्यायच नाहीं. अमेरिकेलासुद्धा ती हवी आहे. जपान, ऑस्ट्रेलिया व भारत या सर्वांना हवी आहे व बाकीची छोटी-छोटी राष्ट्रें नक्की सामील होतील.
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/18/2016 - 22:53 नवीन
+१ अमेरिकन काँग्रेसमधली सद्याची हवा पाहता ट्रंप अथवा हिलरी कोणीही निवडून आले तरी पाकिस्तानला कठीण दिवस येत आहेत असेच दिसते आहे. नुकतीच काँग्रेसच्या एका हियरिंगमध्ये पाकिस्तानला ज्या (शालजोडीतल्या नाही खर्‍याखुर्‍या) चपला पडल्या आहेत ही घटना त्याची नांदी दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

काही मुद्दे

लिओ
Mon, 07/18/2016 - 22:55 नवीन
१९७१ आणी आजच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे पण बलुचिस्तानला भारताने मदत करण्यास अनेक पर्याय आहेत बलुचिस्तानमध्ये जसा पाकीस्तान द्वेष आहे तसाच चीन द्वेष पसरावा. इस्लाम देश समुहात बलुची नेत्यास प्रवेश मिळण्यास भारताने मदद करणे. चीन मधील मुस्लिम नेते व बलुचि नेते यान्ची युती करणे. इत्यादी.... @ श्रीगुरुजी

तालिबानविरूद्ध लढणार्‍या ताजिकांचा नेता अहमदशहा मसूदला भारत गुपचूप शस्त्रास्त्रांची मदत देत होता. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नव्हता.

एक योगायोग ११/९ हल्लाच्या काही दिवस आधी अल कायदाने अहमदशहा मसूदला कपटी फिदायीन हल्ल्यात मारले. कारण अहमदशहा मसूदची मदद अमेरीकेला बिलकुल मिळु नये म्हणुन. आपला मित्र जो आपल्या कट्ट्र शत्रुशी लढत असताना फायद्याचा विचार करु नये असे माझे मत.

परंतु अमेरिकेसारख्या दादा राष्ट्राने मनावर घेतले तरच ते स्वतंत्र राष्ट्र बनू शकेल.

हि मानसिकता आपण बदलायला हवी.....
@अभिजीत अवलिया चीन शी पंगा घेण्याएवढे लष्करी बळ भारताकडे असेल असे सध्या तरी वाटत नाही.
कोणत्या आधारावर आपण बोलत आहात ??????????? जरा चीन - तैवान , चीन-तिबेट वाचण्याएवजी चुशुल चे युध्द (१९६२) गुगलवर वाचा आणि मग बोला.
  • Log in or register to post comments

लिओ साहेब,

अभिजीत अवलिया
Mon, 07/18/2016 - 23:26 नवीन
लिओ साहेब, तुम्ही 1962 च्या लढाईचे उदाहरण देत आहेत. 1962 साली युद्धे पारंपारिक शस्त्रांनी लढली जात असत. आजची युद्धे ही 1962 च्या शस्त्रांनी लढली जात असतील असे मला वाटत नाही. एकूण फायटर विमानांची संख्या, पाणबुड्या, फ्रिगेट्स, वापरात असलेले लष्करी विमानतळ, रणगाडे व जे जे काही काही युद्धात वापरले जाऊ शकते ह्यांची दोन्ही देशांकडे असलेली संख्या जी मला जालावर मिळाली (ही खरी असेलच असे मला मूळीच म्हणचे नाही) पाहून मी ही शक्यता बोलून दाखवली आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या चीन भारताच्या उजवा असल्याने जास्त दिवस युद्ध चालू ठेवू शकतो असे माझे मत आहे. अर्थात सर्व लष्करी सामग्री चीन पेक्षा कमी असून देखील जर भारत चीन ला भारी पडू शकत असेल तर मला आनंदच वाटेल. पण काही असले तरी डॉ. म्हात्रे म्हणतात तसे 'एकही गोळी न झाडता युद्धाचे सर्व उद्द्येश सफल करणारे युद्ध सर्वोत्तम युद्ध समजले जाते... कारण इतर प्रकारच्या युद्धात जेता व जित या दोघानांही क्षती (बर्‍याचदा अपरिमित क्षती) पोहोचते.' ह्याच्याशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

बलुचिस्तानला आजाद करणे इतके सोपे नाहींच!

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 23:34 नवीन
"१९७१ आणी आजच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे बलुचिस्तान वेगळे करणे एवढे सोपे नाही." "कुठलेही दु:साहस करण्यापेक्षा, अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे बंद केले किंवा भारत हा निर्णय अमेरिकेच्या गळी उतरवू शकला तर इतर काही करायची जरुर नाही. पाकिस्तान कोलमडून पडेल आणि त्याची आपोआप शकले होतील." माझ्या लेखात मी खालील मुद्दे लिहिलेच आहेत.
  1. दक्षिणेकडील अरबी समुद्राची सीमा सोडल्यास बलुचिस्तानच्या इतर सीमा खुल्या नाहीत. बलुचिस्तानच्या प्रत्येक सीमेवर मोठे भूप्रदेश आहेत. पश्‍चिमेला इराण आहे, उत्तरेला अफगाणिस्तान आणि पूर्व, उत्तरेला उर्वरित पाकिस्तानच पसरला आहे. या उलट बांगलादेश सर्व बाजूंनी भारताने वेढलेला देश होता. त्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या ‘मुक्तीवाहिनी‘ या स्वातंत्र्यसेनेला भरघोस मदत करणे भारताला शक्‍य झाले.
  2. बलुचिस्तानची लोकसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मोठ्या लष्कराशी ते एकटे लढू शकत नाहीत.
  3. यासाठी भारताला इराणची मदत घेऊन त्यांच्या सिस्टन या राज्यात आपली लष्करी उपस्थिती निर्माण करावी लागेल. सुदैवाने, सध्या याच भागातील ग्वादारपासून केवळ 170 किलोमीटर अंतरावर असलेल्या (*3) चाबहार या बंदराच्या विकासकार्यात भारत इराणला मदत करत आहे. वेगाने मदत करून तेथील सरकारला खुष करून तिथे आपली लष्करी तळासारखी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न भारताने करायला हवा. (आकृती क्रमांक 7 पाहा)
  4. स्वार्थासाठी का होईना, पण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहीलच. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळवून देणे बांगलादेशच्या लढ्याएवढे सोपे नाही. पण बलुची जनतेला पूर्ण समर्थन देण्याचे वचन देऊन आणि ते वचन निभावून हे नक्कीच करता येऊ शकेल.
चीनला China Pakistan Economic Corridor साठी ग्वादार बंदर हवेच आहे. त्यामुळे तो नक्कीच मधे पडणार. पण तो इतक्या दूरून फारसे काय करू शकणार आहे?
  • Log in or register to post comments

अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात आहे तोवर पाकिस्तानचा मलिदा चालूच..

सुधीर काळे
Mon, 07/18/2016 - 23:44 नवीन
अमेरिकेचे सैन्य जोपर्यंत अफगाणिस्तानात आहे तोपर्यंत (तरी) अमेरिका पाकिस्तानची मदत बंद करून त्याला दु़खावणार नाहींखाम्हणूनच पाकिस्तान अमेरइका व तालीबान यांच्यात सख्य होऊ देत नाहींय. त्यामुळेच ओबामांनी अमेरइकन सैन्याला परत आणण्याची प्रक्रिया नुकतीच धीमी केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मलिदा चालूच रहाणार आहे.
  • Log in or register to post comments

सरदार पटेल यांचे एक भाषण. हे

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 02:21 नवीन
सरदार पटेल यांचे एक भाषण. हे जर पंतप्रधान झाले असते तर...
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

अर्धवटराव
Tue, 07/19/2016 - 03:04 नवीन
पण दिवास्वप्न. पाकिस्तान एक देश म्हणुन जगायला तसाहे तयार नाहि. अण्वस्त्रधारी बलदंड इस्लामी आर्मी, अत्यंत पाताळयंत्री गुप्तहेर संघटना, पैसा पुरवायला जगातल्या श्रीमंत शक्ती सतत तयार, आंतरराष्ट्रीय हितसंबंध व्यवस्थीत जोपासणारे पहिल्या फळीचे नेतृत्व, लष्कर-राजकारणी-उद्योगपती-धार्मीक नेते या सर्वांना भरगोस उत्पन्नाची सोय, तोंडी लावायला भारताचे शत्रुत्व, भारताचा बिमोड करायला ड्रेगनसारखा गॅरेण्टर. अशा भरभक्कम आधारावर पाकी राजकरण उभं आहे. ज्यांना तसंही जनतेचं-देशाचं भलं व्हावं, सुख-शांती नांदावी वगैरे भानगडी आठवत नाहि त्यांना कसली भिती दाखवणार भारत? जे काहि करता येईल ते गुपचुप करत असेलच भारत सरकार (सर्वकालीन). पण असे विकतचे दुखणे उजागिरीने अंगावर घेण्याची आवष्यकता नाहि, कि ते भारताला मानवणार सुद्धा नाहि.
  • Log in or register to post comments

खटपट्यासाहेब.....

सुधीर काळे
Tue, 07/19/2016 - 03:46 नवीन
तुमच्याकडे या भाषणाची = प्रतिलेख (transcript) आहे काय? कारण आवाज नीट ऐकू येत नाहींय!
  • Log in or register to post comments

माझ्याकडे भाषणाचा प्रतिलेख

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 04:08 नवीन
माझ्याकडे भाषणाचा प्रतिलेख नाही. हेड्फोन लाउन भाषण ऐकल्यास उत्तम ऐकू येते. त्या काळच्या रेकॉर्डींग तंत्रज्ञानानुसार ध्वनिमुद्रीत केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

क्रुपया मला साहेब म्हणू नका..

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 04:09 नवीन
क्रुपया मला साहेब म्हणू नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

ओके

सुधीर काळे
Tue, 07/19/2016 - 04:40 नवीन
ओके, खटपट्या-जी!
  • Log in or register to post comments

लेख पाहिल्यावर हे साल २०१६

मदनबाण
Tue, 07/19/2016 - 09:33 नवीन
लेख पाहिल्यावर हे साल २०१६ आहे का ? तर परत परत चेक केले. ;) गँरी भाउंच्या मताशी सहमत, बलुचिस्तान कॅंसर होउन पाकड्यांच्या जीवावर उठावा ! बाकी आपलं काश्मिरी धगधगतय...अतिरेक्याच्या जनाज्याला परत परत जनसागर लोटतो. :( { अतिरेक्यांची बाजु घेणार्‍यांचा धर्म फार वेगळा असतो बरं का ! }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not
  • Log in or register to post comments

तुमचा लेख वाचला

धर्मराजमुटके
Tue, 07/19/2016 - 13:34 नवीन
तुमचा लेख वाचला. तुमच्या देशभक्तीचा आणि व्यासंगाचा आदर आहेच. मात्र लेखात उल्लेखिलेले सर्व उपाय हे सरकारने करावयाचे आहेत. एक सामान्य माणूस म्हणून मी फक्त मनातल्या मनात मांडे खाऊ शकतो. यापेक्षा जास्त काही नाही. मग एक सामान्य माणूस म्हणून मी काय करु शकतो ? १. ? मी चिनी मालावर बहिष्कार घालू शकतो काय ? नाही. तसे करणे मला प्रॅक्टीकली शक्य नाही. २. जे अशा प्रकारे विरोध करतात त्यांना कमीत कमी मी वैचारिक पाठींबा देऊ शकतो काय ? नाही. कारण तसे केले तर मी मागासलेल्या विचाराचा समजला जातो. जग हे छोटे खेडे बनले आहे यावरील चर्चा मला ऐकाव्या, वाचाव्या, पहाव्या लागतात. ३. मी पाकीस्तानी कलाकारांचा निषेध करु शकतो काय ? नाही. तेव्हा लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे गळे काढून रडतात. कलेला, कलाकाराला कोणत्याही मानवी सीमांचे बंधन नसते असे विचार माझ्या कानीकपाळी सतत आदळतात. शिवसेनेसारखी संघटना ( भलेही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी) असे करते तेव्हा ते मुर्ख समजले जातात. ४. मला बॉलीवूडची गाणी / चित्रपट फुकटा डाऊनलोड करुन हवी असतात. मग मी साँग्स.पीके या वेबसाईटवर जाऊन ती फुकटात डाऊनलोड करतो. त्यावेळी मला देशहितापेक्षा गाण्याची, चित्रपटाची महती सर्वाधिक असते. थोडक्यात काय तर मी सामान्य माणूस म्हणून काय काय करु शकतो ? १. बेंबीच्या देठापासून "भारतमाता की जय" एवढेच बोलू शकतो. न बोलणार्‍यांनी पाकीस्तानात जावे असे सांगू शकतो. २. क्रिकेट खेळतांना भारतीय संघाने पाकीस्तान ला हरविले तर "पाकड्यांची कशी जिरविली" म्हणून खुश होऊ शकतो. ३. भारताने बांग्ला देश पाकीस्तानपासून तोडला ह्यातून खुश होऊन नेहमीप्रमाणे भुतकाळात रममाण होऊ शकतो. ४. "दुध मांगेंगे तो खीर देंगे, कश्मीर मांगेंगे तो चीर देंगे" अशी आवेशपुर्ण घोषणा देऊ शकतो. याव्यतिरीक्त सामान्य माणसाने आचरणात आण्याचे पर्याय असतील तर कोणीतरी इथे मांडा. शक्य असल्यास आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments

आकृती क्र. १

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आकृ्ती क्र. २

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आकृती क्र. ३

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आकृती क्र. ६

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आकृती क्र. ७

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

डॉ सुहास म्हात्रेसाहेब

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 00:42 नवीन
डॉक्टरसाहेब, चौकशीअंती असे कळले कीं एके काळी उपलब्ध असलेली स्वसंपादनाची सोय सध्या उपलब्ध नाहीं व ती कांहीं अधिकार्‍यांकडेच उपलब्ध आहे व आपण त्यातले एक आहात. तरी कृपया मी आताच पोस्ट केलेल्या आकृती क्र. १, २, ३, ६, व ७ योग्य जागी पोस्ट कराल तर मी आपला ऋणी राहीन. धन्यवाद! सुधीर काळे
  • Log in or register to post comments

तुमच्या लेखातल्या आकृत्या दोन

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/20/2016 - 05:13 नवीन
तुमच्या लेखातल्या आकृत्या दोन दिवसांपूर्वीच टाकल्या आहेत. दिसत नसल्यास कळवा... काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

हे गँरी भाऊ कोण बुवा?

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 03:28 नवीन
“गँरी भाउंच्या मताशी सहमत”! हे गँरी भाऊ कोण बुवा?
  • Log in or register to post comments

नामकरण

गॅरी ट्रुमन
Wed, 07/20/2016 - 10:43 नवीन
हे गँरी भाऊ कोण बुवा?
काळेकाका, मी पूर्वाश्रमीचा क्लिंटन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

डॉ सुहास म्हात्रेसाहेब

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 22:32 नवीन
डॉक्टरसाहेब, फक्त ४ व ५ योग्य जागी दिसत आहेत. १, २, ३, ६ व ७ योग्य जागी डकवता येतील काय? धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आता सर्व चित्रे दिसावित. न

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/20/2016 - 22:48 नवीन
आता सर्व चित्रे दिसावित. न दिसल्यास परत एकदा स्क्रिन रिफ्रेश करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

क्लिंटन

सुधीर काळे
Wed, 07/20/2016 - 22:34 नवीन
'हॅरी'चा 'गॅरी' कसा झाला?
  • Log in or register to post comments

डॉ सुहास म्हात्रे

सुधीर काळे
Fri, 07/22/2016 - 06:50 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

शांती, प्रेम आणि सहिष्णूता.

कलंत्री
Fri, 07/22/2016 - 17:41 नवीन
सर्व लेख आणि प्रतिक्रिया या डावपेच आणि युध्दाच्या मार्गानेच किंवा एकमेकाच्या कूरघोडीनेच प्रश्न सुटु शकतो असे वाटावे अशी मांडणी होत आहे. भारत, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणीस्तान, बर्मा, सिलोन आणि नेपाळ या देशातील शांतता प्रेमींचा जर एक दबाबगट अस्तित्वात आला तर आपले एक चांगले महासंघ उभे राहु शकते. भारताने याबाबत नेतृत्व करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

शांतता प्रेमींचा दबाबगट

सुधीर काळे
Sat, 07/23/2016 - 10:14 नवीन
कलंत्री-जी, जोपर्यंत पाकिस्तानात मुलकी सरकार लष्करची दादागिरी बंद करून त्याला बराकीत धाडत नाहीं तोवर हे होणे अशक्य वाटते. आणि पाकिस्तानी लष्करशहांना आपल्याशी असलेल्या वैरामुळे खूप महत्व प्राप्त होते, ऊपरकी कमाई होते व शेवटी सेवानिवृत्तीनंतरही बल्ले-बल्ले असते! म्हणून ते असे होऊ देणार नाहींत. शिवाय त्यांना फूस द्यायला चीनही आहेच!
  • Log in or register to post comments

लेख आवडला

पैसा
Sat, 07/23/2016 - 15:37 नवीन
लेख आवडला. मात्र हे बरेच सगळे जर तरवर अवलंबून वाटते.
  • Log in or register to post comments

चाबहार बंदराच आज उदघाटन होत

शाम भागवत
Sun, 12/03/2017 - 20:51 नवीन
चाबहार बंदराच आज उदघाटन होत आहे. पाकीस्तानी राजकारणाला शह देणारी या दशकातील एक अत्युत्तम खेळी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा