Skip to main content

"काय झालं प्रिन्सदादा?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 08/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत. त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं. आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली. टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरनं गेली आन तुमची खानदानी इज्जत थेट गटारात घातली. जगणं सोपं काय वाटलं आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो. वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली. त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7869
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

:(

बाकी अख्या जगाला फाट्यावर मारून संसार फुलवनारी, आयुष्यात स्वतःच्या कर्तबगारीन पुढं जाणारी, एका साध्या खेडेगावातून येऊन स्वतःच्या पायावर उभी राहणारी मांजर नाहीच. वाघीणचं ती.

शेवट सांगून टाकलात तर ..

तुकडे करताना हात थरथरला नसणारच. विचार मनात आणताना जर मन थरथरलं नसेल तर हाताची काय मातब्बरी! :(

In reply to by बोका-ए-आझम

आणि जव्हेरगंजानी लेखणी झिअजवावी अशी त्या "प्रिन्सांची" लायकी पण नाही. किमान १०-१२ ९६ कुळींना "सैराट" बद्दल विचारल्यावर "छ्या अस्म काही होतं नाही म्हाराष्ट्रात (तुम्च्या युपी-बिहारात असल) जरा जास्तीच दावलयं अशी "प्रिन्स"वाणे ऐकलीय. १०-१२ पैकी किमान निम्मे उच्चशिक्षीत आणि आञ्टीवाले आहेत.(आणि त्याच पट्ट्यातले कोल्हापुर ते थेट बाश्री उस्मानाबाद) मोठ्या(म्हतार्या,अनुभवी) माणसांनी वेळीच हात धरला नाही आणि हात थरथर्ला पाहिजे अस्म कधी वाटूच दिलं नाही तर खानदान कशी "हळवी+बहिणीची माया असलेली" निपजणार !!! थेट रोखठोक नाखु
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बहीण व तिच्या पतीचा खून केल्याच्या घटनेमुळे करवीरनगरीच्या पुरोगामित्वाला धक्का बसला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नगरीत घडलेल्या या हत्याकांडामुळे सामान्यजन हादरून गेले आहेत. तर दुसरीकडे पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना मात्र या घटनेनंतरही शांत आहेत. शालेय शिक्षण घेत असल्यापासून प्रेमसंबंध असलेल्या मेघा पाटील व इंद्रजित कुलकर्णी या दोघांचा प्रेमविवाह मान्य नसल्याबद्दल मेघाच्या भावांनी तिचा आणि तिच्या पतीचा बुधवारी रात्री अत्यंत निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सहा महिन्यापूर्वी याच जिल्ह्य़ात बहिणीने ‘जिन्स पॅन्ट’ घातली म्हणूनही तिची हत्या केली गेली होती. या अशा घटनांनी सामान्यजन हादरून गेले असताना एरवी पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना या अशा घटनांबाबत मात्र शांत आहेत. दुहेरी खून प्रकरणास दोन दिवस झाले तरी या घटनेचा साधा निषेधही झालेला नाही. एरवी पुरोगामित्वाला आव्हान देणारी छोटीशी घटना घडली तरी ढिगभर पत्रके, मोच्रे, आंदोलने, रस्त्यावर उतरुन मोडतोड अशी टोकाची प्रतिक्रिया उमटत असते. त्या पाश्र्वभूमीवर ही शांतता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनाही धक्का देणारी वाटते. सामाजिक कार्यकर्त्यां साधना झाडबुके म्हणाल्या, जातीअंताच्या लढय़ाला प्रेरणा देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या नगरीत घडलेला हा प्रकार लज्जास्पद आहे. प्रेमविवाह झालेला मुलगा ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून पुरोगामी कार्यकत्रे रस्त्यावर उतरले नसावे की काय, ही पण एक भीती वाटते आहे. आंतरजातीय, धर्मीय विवाहाची चळवळ सुरु करणारे सामाजिक कार्यकत्रे डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले,की प्रगतीकडे समाज जाताना दिसत असला तरी मी मी म्हणणारे अजूनही जातीशी कसे चिकटून आहेत, हेच या घटनेतून दिसते. सामाजिक कार्यकर्त्यां स्मिता पानसरे यांनी समाजामध्ये जातीअंताची भाषा केली जात असली तरी घराणे, जात याच्या प्रतिष्ठेत अजूनही एक वर्ग अडकला असल्याकडे लक्ष वेधले. सोळाव्या शतकाप्रमाणे अजूनही महिलांनी वागले पाहिजे, अशी परंपरा राखू पाहणाऱ्या प्रवृत्तींकडून या घटना घडत असून ती समाजाच्या चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी समाजाला धक्का घडवणारी घटना घडूनही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त न होण्यास पुरोगामी कार्यकत्रे जबाबदार असल्याची कबुली दिली. ज्या गावास शाहुमहाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे, त्या गावात हा प्रकार मन विषण्ण करणारा आहे. ही घटना आंतर जातीय व आंतर धर्मीय स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत गुन्हेगारांना शिक्षा करणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगित - See more at: http://www.loksatta.com/kolhapur-news/honour-killing-in-kolhapur-117358…
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग - दोघा भावांचे कृत्य; तिघांना अटक कोल्हापूर - आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहीण व तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली सख्ख्या दोन भावांनी दिली. याप्रकरणी त्यांच्यासह शाहूपुरी पोलिसांनी काही तासांत तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची कोठडी दिली. अटक केलेल्या संशयितांची गणेश महेंद्र पाटील (वय 20), त्याचा भाऊ जयदीप (19, दोघे रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) आणि नितीन रामचंद्र काशीद (22, रा. सातवे, ता. पन्हाळा) अशी नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कसबा बावडा गणेश कॉलनीत राहणाऱ्या इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय 23) व त्याची पत्नी मेघा (22) यांचा काल रात्री भोसकून खून झाला. या दुहेरी खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूपुरी पोलिसांनी तातडीने छडा लावला. याप्रकरणी तिघांना अवघ्या काही तासांत लग्नाच्या वरातीतून अटक केली. बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे गावात कुटुंबाची मानहाणी झाली. याच रागातून सख्खी बहीण मेघा व तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली गणेश व जयदीप पाटील यांनी दिली. थेरगाव येथे महेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांची मुलगी मेघा हिने बीएस्सीचे शिक्षण वारणा येथील महाविद्यालयात पूर्ण केले. मुलगा गणेश हा पेठ नाका येथील महाविद्यालयात पॉलिटेक्‍निकचे तर जयदीप हा कोल्हापुरातील महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेतो. त्यांच्या गावाशेजारील बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) मध्ये इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. सुरवातीला तो एका दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून नोकरीस होता. शाळेत त्याची मेघाशी मैत्री होती. कालातंराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दीड वर्षापूर्वी दोघांनी पळून जाऊन विवाह केला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोतोली पोलिस ठाण्यात पाटील कुटुंबीयांनी दिली होती. पण मेघाने पतीसोबत येऊन आपला विवाह झाल्याचे पोलिस ठाण्यात सांगितले होते. यामुळे गावात आपली नाचक्की झाल्याचा राग गणेश व जयदीपच्या मनात होता. बहीण मेघा व तिच्या पतीला संपविण्याची शपथ त्या दोघांनी घेतली होती. कसबा बावडा गणेश कॉलनीतील वंदना माधव यांच्या घरात भाडेकरू म्हणून कुलकर्णी दांपत्य सहा महिन्यांपासून राहत होते. मेघा डी मार्ट येथे तर इंद्रजित खासगी नोकरी करत होते. दरम्यान, रक्षाबंधन व भाऊबीजेच्या सणाचे निमित्त काढून गणेश व जयदीप या दोघांनी तिच्या घराचा पत्ता आणि परिस्थितीचा अंदाज घेतला होता.

काल त्या दोघांच्या चुलत मामाच्या घरी लग्नकार्य होते. या लग्नात बहिणीचा पळून जाण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यामुळे ते दोघे संतप्त झाले.

त्यांनी मेघा व तिच्या पतीचा काटा काढण्याचा कट रचला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश, जयदीप आणि त्यांचा साथीदार नितीन काशीद हे तिघेजण मोटारसायकलवरून बावड्यात आले. कुलकर्णी यांच्या घरापासून काही अंतरावर मोटारसायकल घेऊन नितीन थांबला; तर गणेश व जयदीप हे दोघे कुलकर्णी यांच्या घरात आले. त्यांनी बहिणीला (मेघा) चहा करण्यास सांगितला. त्याच वेळी तिचा पती (इंद्रजित) हा दूध आणण्यासाठी दुकानात गेला. दरम्यान, या दोघांनी मेघावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केले. ती ओरडू नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचे बोळे घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेघाला त्यांनी छोट्याशा बाथरूमध्ये टाकले. त्यानंतर तिच्या पतीची वाट पाहत बसले. काही वेळातच तो तेथे आला. त्याच्यावरही त्या दोघांनी चाकूने वार करून त्याला दारातच टाकून पळ काढला. त्यांना पळून जाताना वंदना माधव यांनी पाहिले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून त्या दोघांना अटक केली. तसेच चरण (शाहूवाडी) येथून मिळालेल्या माहिती आधारे नितीन काशीद याला अटक केली. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, शाहूपुरी पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित आदींनी केली. चाकूसह कपडेही आणले होते... बहीण व तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी दोन चाकू सोबत घेतले होते. काटा काढल्यानंतर अंगावरील कपडे बदलण्यासाठीही सोबत घेतले होते. काम फत्ते केल्यानंतर ते घाटात फेकून दिल्याची कबुली अटक केलेल्या तिघांनी पोलिसांना दिली.

In reply to by नाखु

सुन्न करणारं आहे नाखुकाका हे... तमिलनाडूत अशाच प्रकरणातील भर रहदारीच्या रस्त्यावर हत्येचा सीसीटीवी विडियो बघून बरेच दिवस अस्वस्थ होतो, सैराट पाहून ती अस्वस्थता अजून वाढली.

In reply to by टवाळ कार्टा

:( मला तर ते मेसेजेस फिरत होते ना की आपल्या मुली बैनी अशा प्रेमात सैराट झाल्या तर चालतील का टैप, ते अशा कृत्यांना मूक संमती देणारे आहेत असेच वाटत होते. पालकांची मुलांबाबतची का़ळजी कबूल पण मुलांपेक्षा इज्जतीची काळजी जास्त असते बहुसंख्य लोकांना असेही वाटते.

In reply to by तर्राट जोकर

meme

सैराट पाहिला आणि शेवट मात्र एकदम सुन्न करणारा आहे. माझ्या मुलीने शेवटी असे का म्हणून विचारले नाही सांगू शकलो तिला.

सैतानी प्रवृत्ती असलेल्यांचा हात थरथरत नाही. शेवट डोळ्यातून पाणी आणणारा.

सैराट बघितलेला नाही.. बघणारही नाही.. रादर.. बघवणार नाही.. कारण आता शेवट काय असेल ह्याची कल्पना आली आहे. तेव्हा नंतर प्रचंड अस्वस्थता येते हे माहिती आहे. सहन होत नाही.. जात ह्या मुद्द्यासोबतच अशी मानसिकता कमालीच्या पुरुषप्रधानेतुन येत असावी. केवळ मी भाऊ किंवा बाप आहे म्हणुन माझ्या मानापमानासाठी मी हिचा जीवही घेऊ शकतो ही फार विकृत विचारसरणी आहे. सगळं गणित मुळातुनच चुकलंय आपल्या समाजाचं असं वाटतं कधी कधी...

अवांतर : मला आणि माझ्या बायकोला 'सैराट' बघायचाय. तो मेघालयात प्रदर्शित होण्याचा चान्स नाही आणि त्यामुळे थेटरात पाहण्याचा प्रश्नच नाही. पायरेटेड प्रिंट नकोय. ऑनलाईन किंवा ऑथराईज्ड सिडी मिळू शकते का? धन्यवाद..