राम राम मंडळी,
आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन!
खरं सांगायचं तर आजचा दिवस उजाडल्यापासून, आज ५ सप्टेंबर म्हणजे 'शिक्षक-दिन' आहे इतकीच माहिती मला होती. 'तसे अनेक दिन असतात त्यापैकी हा एक' एवढीच माझी भावना होती. परंतु आजच्या दिनाचं माहात्म्य काय, मोल काय, हे मला समजायला, किंबहुना अनुभवायला संध्याकाळ उजाडावी लागली!
अर्थात, अद्याप माझी पिढी तेवढी मुर्दाड बनली नाहीये हेही तितकंच खरं! प्रांजळपणे सांगायचं तर आज सकाळी उठल्यापासून मला माझ्या कोणत्याही शिक्षकाची याद आली नाही, आठवण झाली नाही. परंतु त्याचसोबत हेही तितकंच खरं की 'शिक्षक' नावाच्या माणसावर माझी खूप श्रद्धा आहे. सुदैवाने माझ्या पिढीला अगदी चांगले, डिव्होटेड शिक्षक मिळाले की ज्यांचं नांव घेतलं किंवा आठवण निघाली की मनामध्ये आजही केवळ आदरभाव उत्पन्न होतो. इथे मिपावर माझ्या पिढीतले अनेक जण आहेत त्यांनाही कमीअधिक फरकाने हा अनुभव येत असणार, त्यांना लाभलेल्या डिव्होटेड शिक्षकांची आठवण येत असणार! हे सगळं लिहायचं कारण इतकंच की आजच्या पिढीत शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी नातं हे तेवढंच सेन्सेटिव्ह आहे का हो? मला तरी शंका आहे! आजची दुनिया खूप फास्ट आहे, इन्स्टंट आहे, कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही, जी काही नाती आहेत ती केवळ सर्व प्रोफेशनल आहेत ही सर्व या शंकेमागची कारणं आहेत! असो, या विषयावर आजही दोन्ही बाजूंनी लिहिता येईल तेव्हा आजचा शिक्षक-विद्यार्थी संबंध हा या लेखाचा हेतू नाही!
मग या लेखाचं कारण काय? तर ते असं, की आज अचानक आमच्या घरी 'शिक्षक-दिन' साजरा झाला. एका निवृत्त शिक्षिकेच्या आयुष्यात कृतकृत्य वाटावं, आयुष्याचं सार्थक वाटावं असा आजचा दिवस होता!
माझी म्हातारी
(आमच्याकडे आईस 'म्हातारी'च म्हणायची पद्धत आहे बरं का!) वैदेही अभ्यंकर ही निवृत्त शिक्षिका. आयुष्याची २९-३० वर्ष ती एका प्रामाणिक, डिव्होटेड आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचं आयुष्य जगली आणि निवृत्त झाली. तिच्या शिक्षकी पेशाची सुरवात तिने भिवंडी येथील छबिलदास समुहाच्या प रा विद्यालयापासून केली. आमच्या म्हातारीनं शिकवलेले १९६८ सालचे, म्हणजे आजपासून बरोब्बर ४० वर्षांपूर्वीचे ३ विद्यार्थी आणि १ विद्यार्थीनी आज पत्ता शोधत शोधत शिक्षक दिनानिमित्त 'अभ्यंकर बाईं'ना भेटायला आले होते, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले होते!
आता ४० वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे चेहेरे माझ्या म्हातारीस थोडेच आठवणार? परंतु त्या विद्यार्थ्यांनीच माझ्या म्हातारीला आपापली ओळ्ख करून दिली आणि "बाई, तुम्ही आम्हाला भिवंडीच्या प रा विद्यालयात १९६८ साली 'मराठी' हा विषय शिकवायला होतात!" अशी आठवण करून दिली. सर्वांनी अभ्यंकर बाईंना वाकून नमस्कार केला!
गप्पांच्या ओघात एका विद्यार्थ्याने (आज तो विद्यार्थी एक चांगला डॉक्टर आहे!),
"बाई, आजही माझ्या डोळ्यासमोर तुमचा मराठीचा तास जसाच्या तसा आहे! तुम्ही कविता इतकी सुंदर शिकवायचात!"
अशी आठवण करून दिली आणि माझ्या म्हातारीच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू उभे राहिले! मी ते सर्व दृष्य नि:शब्द होऊन पाहात होतो!
थोड्या वेळाने त्या विद्यार्थी-विद्यार्थींनींनी आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या शिक्षिकेचा निरोप घेतला!
"बाई, तब्येतीची काळजी घ्या बरं का! आम्ही सर्व तुम्हाला पुन्हा भेटायला अगदी नक्की येऊ! आमच्या बॅचचे अजूनही दोघंतिघं जण आहेत जे आज काही कारणांनी येऊ शकले नाहीत!"
"नक्की या रे...!"
आमची म्हातारी चुकून "नक्की या रे बाळांनो!" असं म्हणणार होती! परंतु समोर उभ्या असलेल्या ५०-५५ वयाच्या आता अनोळखी झालेल्या विद्यार्थ्यांना 'बाळांनो' तरी कसं म्हणायचं हा तिला प्रश्न पडला होता! :)
एक छानसा पुष्पगुच्छ आणि एक उत्तम महागाईची साडी देऊन त्या विद्यार्थ्यानी आमच्या म्हातारीचा निरोप घेतला!
उजवीकडे दोन विद्यार्थी, डावीकडे एक विद्यार्थीनी आणि एक विद्यार्थी आणि मधोमध त्यांची शिक्षिका! माझी म्हातारी, वैदेही अभ्यंकर! :)

विद्यर्थ्यांनी 'अभ्यंकर-बाई'ना कौतुकाने घेतलेली नारायणपेठ साडी आणि पुष्पगुच्छ! :)

ते विद्यार्थी गेल्यावर माझी म्हातारी मला इतकंच म्हणाली,
"मला आयुष्यात लाखो कऱोडो रुपये काही मिळवता आले नाहीत परंतु ही साडी आणि हा जो पुष्पगुच्छ आहे ना, त्याची किंमत माझ्याकरता करोडो रुपायांपेक्षाही अधिक आहे, अनमोल आहे!"
-- तात्या अभ्यंकर.
वा.. फार छान