Skip to main content

---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------

लेखक अर्थहीन
मंगळवार, 06/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------ गांधीबाबांची जयंती. सुट्टी. लॉन्ग वीकेंड. घरी जायचं म्हटलं की आजही तेवढाच आनंद. पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. जगताप-डेरीच्या नवीन BRTस्टॅंड वर कानात हेडफोन अडकवुन प्रसन्न मनानं बसची वाट पाहतो. गाणं चेंज करेस्तोर 5 मिनटातच -हादरा बसताना फ़क्त चुंयि-चुंयि असा आवाज करणारी वातानुकुलीत BRT येते. स्वयंचलित दरवाजातून प्रवेशतो. संपूर्ण भला मोठा अन व्यवस्थित लेन्स आखलेला गुळगुळीत प्लेन रोड. प्रवास म्हणजे सु:ख! आत बसल्यावर बस हालली तरी फ़क्त हत्तीच्या पाठीवर इकडून-तिकडे मऊ झुलल्यासारखं वाटावं इतका मऊपणा.. जीव खुष!! ....... अशा कापसाच्या मौऊ ढिगावर बसून- काल रात्री शिवाजी नगरच्या सेन्ट्रलला केलेली शॉपिंग आठवतो. तो चकचकाट, पुष्कळ लायटिंग, महागडे ब्रैंड्स, आउटफिट्स, परफ्यूमस, वॉचेस, गॉगल्स, जैकेट्स, बैग्स, शूज --प्रत्येक गोष्ट अशी पाच-पाच वेळा पुसून कस्टमरसाठी रॅक मधे व्यवथीत आपापल्या सेक्शन मधे ठेवलेली. ईमारतभर पसरलेला AC. शुभ्रचक वातावरण. तिथलाच Leeचा एक आवडलेला शर्ट घेतो. काउंटर पासून दोन पावले चालेस्तोर मोबाइलवर msg येतो- Your a/c no.XXXXXX5116 is debited for Rs.2800.00 on 01-10-15. ...(एके काळी 2800 मधे 2 शर्ट- 2 पँट अशे चार कपडे घेणारा मी --दोन मिनिट Leeच्या या महागड्या मुलायम धाग्यात स्वत्:चा खरबडीत भुतकाळ गुरफटवून घेतो.) कंडक्टरने 'तिकीट' महटल्यावर परत भुतकाळातुन बसमधे येतो. नेहमीसारखं स्टेशनवर खुप गर्दी आहे. नेहमीसारखं गाडीतही खुप गर्दी आहे. नेहमीसारखं एक हल्कासा हिस्का देऊन भारतीय रेल्वे डॉट ९:३० वाजता सुरु होते. (तरिही पोचताना मात्र नेहमीसारखं ती अर्धा तास उशिराच् पोचेल..... निव्वळ विशेषता!!!) गाड़ीत जागेसाठी दोनतीन ठिकाणी कोणाचीतरी कचकच चालु आहे. याला नेहमीच्या प्रावासाचा एक भाग म्हणून मी हसून स्वीकारतो. अशा या गर्दीत तरिही कालच्या चकचकीत सेंट्रलची शॉपिंग आठवतो. स्वत:ला खुश ठेवायचा प्रयत्न करतो. दौंडच्या पुढे आलो अन 'ही' फाटक्या कपड्यातली छोटी पोरगी आपल्या थोड्या मोठ्या बहिणीसोबत हातातलं ते दगडाच्या चिपळीचं कस्टमाईज्ड वाद्य टिकिक-टिकिक वाजवत मस्त गाणं गातेय. म्हणता-म्हणता एक शब्द चुकली अन लाजत तिने आपली जीभ चावली. (ते- खुप-खुप. खुप जास्त नैसर्गीक अन स्पॉनटॅनियस होतं.) शहरातल्या किंवा एखाद्या स्टेज शो मधे मस्त छानसा गोड फ्रॉक घालून पाठ केलेलं गाणं गाताना एखादा शब्द चुकल्यावर पटकन विंगेतल्या आपल्या मम्माकड़े पाहत जीभ चावणारी छोटी शहरी मुलगी अन या रेल्वेतल्या मुलीच्या गाण्यात काय फरक आहे?? ही छोटी आपल्या "पोटासाठी" गातेय. एवढाच!! तिला ते अजुन नीटसं कळतही नसेल इतकं कोवळं वय. हे पाहूनही तरी मी उसना का होईना पण गोड हसायचाच प्रयत्न केला, कारण भारतासारख्या देशात राहून असल्या अनाथ अनवाणी छोकरयांबद्दल तुमच्या संवेदनशील मनाने वाईट वाटून घ्यायचं ठरवलंत तर तुमचं काम निव्वळ तमाम आहे. असल्या घटना पाहुनही तुम्ही नॉर्मल राहु शकलात तरच तुम्ही खुप नशीबवान आहात समजा. --Cheers!! (परवा रात्री मुंबईच्या नेहरू प्लेनोटेरिउम मधे त्या थंड-शांत-काळ्याकुटट-मिस्टेरियस सिम्युलेशनमधे बसल्यावर, आपल्याला मोठी वाटणारी पृथ्वी ही वास्तिविक सूर्य-गुरुच्या अवाढव्य आकारासमोर फ़क्त एक बारिक ठिपका कशी आहे. अन पृथ्वीसमोर महाकाय वाटणाऱ्या या सूर्यासारखेही यूनिवर्स मधे अशे हजारो-लाखो सूर्य कसे पसरलेले आहेत हे ऐकल्यावर--- आपण अस्तित्वहीन असून, एका खोल काळ्या डोहाच्या तळ-गर्भात कोंडले जाऊन- तिथुन काहिबाहि लिहून- या बधिर जगाला आपलं अस्तित्व जाणवुन द्यायचा कसा आटोकाट प्रयत्न करतोय पण बाहेर कोणालाच कसं त्याचा कण देखील समजत नाहिये-- असं वाटायला लागलेलं...) हाच विचार करत कसा बसा थोड़ा थकुन expectedly अर्धा तास लेट झालेल्या रेल्वेतून उतरलो. वास. कुर्डवाडी स्टेशन बाहेर नेहमी आसपासच्या गावाला जायला जुन्या कमांडर जीपा थांबतात. त्यांची वाट बघत थांबलो. भयानक ऊन. घाम-घाम नुसता. अर्धा तास झालं साली एक पण जीप नाही आलीय. एस्ट्यांची तर अपेक्षाच करत नाही. थोड्या वेळाने कोन्तरी म्हणलं की RTOने 'अवैध' वाहतूक बंद केलिये. (सरकारला अधुन मधून अशी 'आण्णा हजारे' व्हायची हुक्की येते हे मला माहितेय.) आता तुम्हाला वाटेल की अवैध वाहतूक म्हणजे काहीतरी वाईट अन खरंच अवैध वगैरे असतं. तर तसं काही नसतं. म्हणजे सरकारचं विशेष वाटतं की कित्येक खेड्यात अजुन फ़क्त सकाळी एक अन रात्री एक अशा दोनच एसटया असतात. मधे-आधे तालुक्याला किंवा दुसरया गावाला जायचं म्हटलं की प्रवासाच्या साधनाअभावी सगळं गाव पांगळं. मग गावातलंच कोणीतरी कर्ज काढून अशी जुनी -फ़क्त-चाकं-शिल्लक-असलेली- खटारा कमांडर विकत घेतं अन लोकांची ने-आण करतं. त्याच्या कुटुंबाचंही पोट भरतं अन मुख्य म्हणजे लोकांची सोय होते. पण सरकारला लोकांनी ही आपापल्यात केलेली अरेंजमेंट का खपत नसावी देव जाणे. (म्हणजे एस्टीची एक्सट्रा फेरीही द्यायची नाही अन वरून आहे तेहि सोय बंद करायची...) तर अशा तरहेने जीपा बंद होत्या. शेवटी एडजस्टमेंट म्हणून एक रिक्शावाला आम्हाला कुडूवाडी ते माढा असं 15 किमी न्यायला तयार झाला. पुढे दोन बसलेले (पैकी मी एक) अन मागे 3 असं आमचं वरहाड़ निघालं. माढयात पोचलो. 1 तास वाट बघितल्यावर आमची वैराग गाडी आली. शेतकरयाने पावसाची वाट बघावी अन एकदाचा रपरप पाऊस यावा तसा खुश झालो. गाडी सुरु होऊन 15 मिनटच झाली असतील. त्या प्रचंड खड्डे पडलेल्या अस्ताव्यस्त रोडचं अन महामंडळाच्या स्टॉक मधे ऊरलेल्या त्या सर्वात जुन्या (एक-बैलच्या एडक्यालाही लाज वाटेन्) अशा एसटीचं-- असं काही कॉम्बिनेशन जमलं होतं की एसटी महामंडळ अन PWD -अशा दोन्ही खात्यातला भृष्टाचार प्रवाशांच्या कानाला अन गांxला दोन्हीकडे समान जाणवत होता. एवढा खाड-खाड आवाज होता की..... च्या आयला उपमा सुद्धा सुचत नाहिये- (खांडेकर वाचावे लागतील बहुतेक). 3च तासापूर्वी उतरलेलो ती गुबगुबीत BRTची बस अन तो कापसाचा प्रवास आठवत होतो. स्वतंत्र्याच्या 60 वर्षातला बेगडीपणा मनात- अन त्या तंद्रीला भंग करणारा एस्टीचा तो खाड-खाड आवाज कानात- साठवत कसाबसा त्या भारताच्या राजनैतिक अपयशात बसुन गावाकडे प्रवासत होतो. कितीही ढकललं तरी -न उघडलेल्या त्या एसटीच्या खिड़कीच्या काचेतून शेवटी हार मानून बाहेर बघत बसलो. मधे एक कोणतंतरी -तालुका, जिल्हा, राज्य, देश, अन जग यांच्या दृष्टिनं अस्तित्वहीन असलेलं खेडं लागलं. त्या गावात एकूण दोनच गोष्टी फ्रेश अन रंगीत दिसल्या. एक - यात्रेमुळं नुक्ताच मंदिराला दिलेला रंग. दुसरं -थोडं पुढं आलं की गावाबाहेर सरकारने बांधुन दिलेल्या स्मशानाचा ताजा रंग. (सरकारला किती काळजी असते- लोकांचा शेवटचा प्रवास तरी सुखाचा व्हावा याची.) सुकून गेलो होतो. सगळा उत्साह मावळला होता. आमच्या गावाच्या अलिकडे इर्लेवाडी गाव आहे. इथल्या भोगावती नदीला कधीकाळी इतकं पाणी होतं की पुर आल्यावर आम्ही सायकलवर त्या पाण्यातनं वाहत आलेले साप अन पुलावरुन वाहत असलेलं पाणी बघायला जायचो. आता त्या नदीत बाष्पीभवनाने वाळू सुद्धा उडून जाईल इतका शुष्कपणा अन नुसती पोकळ हवा भरुन वाहते. पाण्याविणा शेतकर्यांच्या होत असलेल्या अवस्तेची कल्पना मनाला करपवून- उभ्या आडव्या भेगा पाडून जाते... आता माझं गाव जवळ आलंय. ओळखायची खून सोप्पी आहे. "इथल्या नारळाच्या उंच-उंच झाडांची बाग". शंभर शंभर नारळाचे घड़ लागलेली गर्भश्रीमंत पिकं. म्हणजे हे 10 वर्षापुरवीचं. कारण आता इथं एकही फाटा नसलेली वाळलेली उंच 10-12 खोडं फ़क्त शिल्लक आहेत. --आपलं गाव आल्याचं ओळखायची खुणच अशी सुकून जाणं वाईट असतं मित्रांनो--. इथंच कामगारांना रहायसाठी कारखान्याने पत्र्याची -चाळ स्वरुपात घरे बांधलेली आहेत. 100 घरांच्या या चाळीत आता मोजून 7-8 कुटुंब उरलीत. आता हा कारखानाच भ्रष्टाचाराच्या आगीत जळाल्यामुळे ती घरं इतर कशाही पेक्षा कामगारांच्या ह्रदयालाच पडलेली घरं जास्त वाटतात. पुण्यातल्या फ्लॅट पासून निघताना बदललेल्या 4-5 गाड्या BRT-रेलवे-रिक्शा-बस आठवत माळेच्या या शेवटच्या मण्यातुन सुकल्या मनाने घराजवळ खाली उतरलो. पायरयांवर आई बसलेली. तिला बघुन ओठ कसे बसे हसवले. पण मन आतून चरकलेलंच. जेवून वगैरे आवरून सगळं विसरून आराम टीवी पाहत बसलो. बरोबर 6ला लाईट गेली. आईला म्हटलं हे काय?? -गेल्या आठवड्यात तर लाईट रहायची. पाऊस पण झालाय, आता का लाईट बंद?? आई महटली "गणपति पुरती लाईट सोडलेली. लोड शेडिंग चालूच आहे. आता रात्री 10ला येईल. अन परत पहाटे 5ला जाऊन सकाळी 9ला येईल." म्हणजे एकूण टोटल 8 तास जेव्हा सर्वात-जास्त-गरज-असते अशा ऐन वेळेला रोज लाईट बंद. अंधार. ना स्वयपाकाला लाईट ना पहाटेची काही कामे करायला. हतबलतेने शेवटी रेडियो लावून त्या भयानक अंधारात बसून काल रात्री पुणे सेन्ट्रलला केलेली शॉपिंग आठवत बसलो. तो चकचकाट -झगमगाट, पुष्कळ लायटिंग, ते महागडे ब्रैंड्स, आउटफिट्स, परफ्यूम, वॉचेस, गॉगल्स, जैकेट्स, बैग्स, शूज प्रत्येक गोष्ट अशी पाच-पाच वेळा पुसून कस्टमरसाठी रॅक मधे व्यवथीत आपापल्या सेक्शन मधे ठेवलेली. ----------------------------------------------------- ---------------------------------------------------- पुणे ते गाव -मोजून 4 तासाचा प्रवास. पण या चार तासात फ्रेम बाय फ्रेम आक्खं जग बदलतं. जस-जसं तुम्ही move व्हाल तस-तसा स्वातंत्र्याच्या 60 वर्षातला फोलपणा तुम्हाला इथं स्पष्ट असा डोळ्यासमोर गडद--गडद दिसायला लागतो........... ..............................या लेखाला शेवट नाही. किंवा मला तो करायचाही नाही. हे असं ओपन एंडेड-- राहिलं तरच मन शांत राहील......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8225
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

ह्म्म...

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

असंच.. फक्त हम्म.. बाकी काही शब्द नाहीत बोलायला. (प्रत्येक वेळी शब्द असावेच लागतात का? शब्दांच्या पलिकडे काहीतरी असतं, जे अव्यक्त राहतं)

खदखद आणि अस्वस्थता नेमकेपणाने व्यक्त झाली आहे!

नेहमीसारखं एक हल्कासा हिस्का देऊन भारतीय रेल्वे डॉट 18.00 वाजता सुरु होते.
कुर्डवाडी स्टेशन बाहेर नेहमी आसपासच्या गावाला जायला जुन्या कमांडर जीपा थांबतात. त्यांची वाट बघत थांबलो. भयानक ऊन.
संध्याकाळी सहाला पुण्यातनं निघून कुर्डुवाडीला नक्की किती वाजता पोचला म्हणे, की भयानक ऊन पडले होते? चुका काढायला आवडतं असं नाही, पण अशा गोंधळामुळे वाचायचा फ्लो -जो तुमच्या ह्या लेखात तुम्ही बहुतेक जाणीवपूर्वक तुटक ठेवलेला आहे- तो आणखी तुटतो.

In reply to by असंका

लेख आवडला... पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. आणि नंतर..नेहमीसारखं एक हल्कासा हिस्का देऊन भारतीय रेल्वे डॉट 18.00 वाजता सुरु होते. नक्की प्रवासाची सुरुवात केव्हा झाली...?

In reply to by योगी९००

इंटरसिटी (सकाळी ९.३०) आणि हुतात्मा (सायंकाळी ६.००) मधे गल्लत झाली वाटतं त्यांची. पण लेख छान आहे. भिडला.

In reply to by असंका

थोडीशी चूक झाली... टाईम ९:३० आहे... नेहमी संध्याकाळी ६ च्या रेल्वेने जातो... यावेळेस सुट्टीमुळे सकाळच्या गाडीने गेलो... लक्षात आणून दिल्याबद्दल खूप धन्यवाद... करेक्शन केला आहे .. :)

In reply to by अर्थहीन

मी जी गोष्ट पॉइंट आउट केली होती, तीच आता तिथे नैये, तर माझी कॉमेंट इर्रीलेवंट झाली आहे. ती क्मेंट उडवा/मिटवा/डीलीट करा. (ह्या कमेंटसकट). हे तुम्ही करू शकताल का?

लेख आवडला, स्वाती

ह्म्म सत्यकथन असेल, तर तातडीने घरी एक इन्वर्टर / जेनसेट बसवायचं बघा....

In reply to by असंका

हे जनरल आहे. ज्यन्चि परिस्थिती नाहि त्यन्च काय??

In reply to by अर्थहीन

जनरल असेल तर मग तर फारच वाईट...घरी इन्वर्टर न घेता पोरगा ३००० रुपयाचा शर्ट घालून मिरवतोय ही कल्पनाच माझ्या अंगाचा तीळपापड करणारी आहे. आपला नायक चांगलेच पांग फेडतोय मग आईबापाच्या कष्टाचे ...

In reply to by असंका

जनरलचा अर्थ तुम्ही काय घेतलात माहित नाही... मी हे म्हणतोय कि खेड्यातल्या कित्येक घरांची परिस्थिती अशी आहे कि ते लोक inverter घेऊ शकत नाहीत -त्यांनी काय करायचा ??? अजून एक... तुम्ही माझ्यावर का घसरताय समजत नाही? आपली काही दुष्मनी आहे का हो?? आई बापाचे पांग वगैरे शब्द वापरताय तुम्ही??

In reply to by अर्थहीन

मी अर्थ घेतला की ही स्पेसिफिकली आपली गोष्ट नसून एक जनरल गोष्ट आहे. जर तसे नसेल तर आपण शब्द वापरताना अधिक काळजी घ्यावी अशी विनंती करून मी दिलगिरी व्यक्त करणे भाग आहे. कृपया खरे काय ते सांगावे. त्याप्रमाणे मी प्रतिसाद देइन. मी मुळीच तुमच्यावर घसरलेलो नाही. वर म्हणल्याप्रमाणे आपण हे सत्यकथन नसून जनरल वर्णन असल्याचे सांगितल्यावर मी गृहित धरले की कथेतील नायक आपण स्वतः नाहीत. त्यामुळे मी जे बोलतो ते आपल्या कथाशैलीबद्दल आणि कथेतील पात्रांच्या मांडणीबद्दल असून आपल्याला वैयक्तिक रीत्या लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि भावनेच्या भरात आपण माझ्या मूळ प्रश्नाला बगल देत आहात. माझा प्रश्न असा आहे, की आपला नायक एकीकडे तीन हजार रुपयाचा शर्ट घेत आहे, आणि दुसरीकडे घरात वीज नाही म्हणून उसासे सोडत आहे, या दोन्हीत काही विरोधाभास नाही का? आपली काही दुष्मनी आहे का हे मला माहित नाही. स्वतः महागडे कपडे घेऊन आईवडीलांच्या बेसिक गरजा पूर्ण न करणे याला दुसरे काय म्हणावे?
मी हे म्हणतोय कि खेड्यातल्या कित्येक घरांची परिस्थिती अशी आहे कि ते लोक inverter घेऊ शकत नाहीत -त्यांनी काय करायचा ?
तुम्ही सांगा. कुणी अडवलंय? किंवा मग दोघं मिळून खंत करू या... ते सगळ्यात सोपं....कारण एकदा असं आळवून आळवून रडलं की मग लोकाला जाब विचारायला आपण मोकळे! (रच्याकने, इन्वर्टर तर माझ्याही घरी नाही. आणि तीन हजार रुपयाचा शर्ट असतो हेही मला आपला लेख वाचल्यावरच पहिल्यांदा कळलं)

In reply to by अर्थहीन

अक्चुअली इट इज नॉट ओके.... बट आय कॅनोट फोर्स अ‍ॅन आन्सर आउट ऑफ यु टू॑ क्व्श्चन्स दॅट यू फाइण्ड ऑक्वर्ड टू आन्सर..

In reply to by असंका

आपला नायक चांगलेच पांग फेडतोय मग आईबापाच्या कष्टाचे
प्रथमदर्शनी वाटेल ही असे. लोक काय म्हणतील हा बागुल बुवा तो हाच असावा. पण ह्या गोष्टींना बरेच पैलू असतात हो. व्यक्ति अन परिस्थिती वेगवेगळी असते. मी स्वतः अनुभवलेय सारे. आधीच्या पिढीचा संयमी पणा, समजूतदारपणा नाही लक्षात येत आपल्या. "असू दे रे. चार तास अंधारात बसले तर काही फरक पडत नाही, तेवढाच शांतपणा." अशीही उत्तरे एकलीत मी. कशाला बॅटर्‍याचा खर्च? त्यापेक्षा तुम्ही सुखात राहा शहरात असेही आशिर्वाद मिळतात. ... प्रकटन छान आहे. लिहिलय पण मस्त. आपल्या गावाकडचे आहात म्हणून जास्तच अभिमान. ;)

In reply to by अर्थहीन

छानच... अभ्या.
याचा अर्थ या वरच्या प्रतिसादाशी आपण पुर्णांशाने सहमत आहात असा मी घेउ ना?

स्वदेसचा गद्य प्रारूप

तुम्ही वैरागचे का? मी पण काही वर्ष वैरागात काढलीयेत -(भोगावतीच्या भोंग्याने दिवस चालू करणारा)desert maratha

लेखनशैली खूप आवडली. लेखनाचा विषय मलूल करणारा आहे पण हे असं होतच. आजकाल प्रवास म्हटलं की या कारणासाठी नको वाटावं अशी परिस्थिती आहे.

लिहिलय मस्त.... विरोधाभास मस्त टिपलाय... काल रात्री पुणे सेन्ट्रलला केलेली शॉपिंग आठवत बसलो. तो चकचकाट -झगमगाट, पुष्कळ लायटिंग, ते महागडे ब्रैंड्स, आउटफिट्स, परफ्यूम, वॉचेस, गॉगल्स, जैकेट्स, बैग्स, शूज प्रत्येक गोष्ट अशी पाच-पाच वेळा पुसून कस्टमरसाठी रॅक मधे व्यवथीत आपापल्या सेक्शन मधे ठेवलेली.

आपल्या अवलोकनात दम आहे लेखनात शैली आहे .ऐला या सोलापूर वाल्याना कोणता साहित्यिक चावला आहे बरे ?एकाच घरातील अशी विषमता मी पाहिलीय ! भारत देश महान आहे व गल्थान ही !

In reply to by चौकटराजा

क्या बात है चौकटराजा.. भ्यानक आवदल हे.. ऐला या सोलापूर वाल्याना कोणता साहित्यिक चावला आहे बरे ?एकाच घरातील अशी विषमता मी पाहिलीय ! भारत देश महान आहे व गल्थान ही !>>