एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")

चलत मुसाफिर जनातलं, मनातलं
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली. मुंबईची सुरुवात ही अशी झाली. अमेरिकावासी लेखक ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मायानगरी मुंबईच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी असे बहुभाषिक स्रोत वापरून-पडताळून प्रकाश हे मुंबईच्या उगमाला भिडण्याचा (बराचसा यशस्वी) प्रयत्न करतात. ज्ञानप्रकाश हे रांची शहरात (तेव्हा बिहार आणि आता झारखंड राज्यात) जन्मले. लहानपणापासूनच ते मुंबई शहराच्या सुरस आणि आतिशयोक्तिपूर्ण कथा ऐकत होते. त्यामुळे त्यांच्या मनात मुंबईची जी अद्भुतरम्य कल्पना निर्माण झाली, ती पुढे प्रत्यक्ष मुंबई पाहून, तिथे राहून झाल्यावरही गेली नाही. अशी मुंबईची प्रतिमा मुंबईबाहेर लहान शहरां-गावांत वाढलेल्यांपैकी बहुतेकजण बाळगून असतातच. मनामनात घर केलेल्या या मुंबईच्या जादूचा अर्थ लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईला शून्य प्राचीन इतिहास आहे. मुंबईत एकही मध्ययुगीन इमारत नाही. मुंबई ही भारतात परकीयांची वसाहत होतीच, पण त्याआधी ती मानवाने निसर्गावर विजय मिळवून निर्माण केलेली वसाहत आहे. पोर्तुगीजांनी पुढे ब्रिटिशांना आंदण दिलेले हे शहर, व्यापारी महानगर या स्वरूपातच अस्तित्वात आले. सद्यकालीन राजकारणी काहीही म्हणोत, पण मुंबईचा जन्म हाच मुळी "परप्रांतीयां"मुळे झालेला आहे हे विसरून चालत नाही. त्याकाळीही मुंबईतील मराठी लोकसंख्या ही केवळ ५० टक्क्याच्या आसपास होती. दक्षिणी, मंगलोरी, गुजराती, पारशी, सिंधी, मारवाडी, काश्मिरी, इराणी, मेमन-खोजा, कच्छी, अफगाणी, गोवेकर, पंजाबी, उत्तर भारतीय, युरोपीय, चिनी, अरब हे आणि असे अन्य समुदाय तेव्हाही मुंबईचा भाग बनून राहिलेले होते. अर्थात वसाहतकार गोरे आणि एतद्देशीय काळे यांच्यातला अस्पृश्यतासम फरक हा पदोपदी ठसवला जाई. बहुरंगी मुंबईला आपापल्या पुस्तकांतून जिवंत करणारे मराठीतील सुर्वे, ढसाळ, पाध्ये किंवा इंग्लिशमध्ये सलमान रश्दी, सुकेतु मेहता हे साहित्यकार आपल्याला परिचयाचे आहेत. पण मुंबईची गाथा पार तिच्या जन्मापासून निरंतर गायली जात आहे. १८७५मधला पोलीस कमिशनर एडवार्ड, तत्कालीन पत्रकार नौरोजी डुमासिया, दिनशॉ वाछा, जेम्स मकलेन, लुईस ब्रॉम्सफील्ड आणि अर्थात गो. ना. माडगावकर यांनी मुंबईवर पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. बहुतेक सर्व लेखक हे त्याकाळीदेखील मुंबईचा अवाढव्यपणा, गर्दी, जीवनाची गती, वातावरणातील उत्साह, बहुसांस्कृतिक ओळख आणि उघडपणे लक्ष्मीशरण झालेली नीतिमत्ता या गोष्टींनी प्रभावित झालेले दिसतात. पैसा या एकमेव दैवताला पूजणारे हे शहर अखेर याच कारणामुळे दुर्दशेच्या गर्तेत अडकले. कोणत्याही प्रकारचा निखळ आदर्शवाद मुंबईला झेपत नाही. पुढच्या पिढीतील मुल्कराज आनंद, मंटो, इस्मत चुगताई यांच्या मुंबईविषयक लेखनातही हाच सूर उमटतो. ईस्ट ईंडिया कंपनी ही अफूच्या व्यापारातून अमाप नफा कमवीत होती. हा व्यापार कलकत्त्यात केंद्रित होता. मुंबई बेट हाती आल्यावर ब्रिटिशांनी मध्य आणि पश्चिम भारतातील अफू निर्यातीसाठी मुंबईकडे वळवली आणि या शहराने बाळसे धरायला सुरुवात केली. आज ज्यांचे नाव सन्मानपूर्वक अनेक इमारती-रुग्णालये-उद्यानांना दिले गेले आहे त्या जमशेट जीजीभॉय यांनी आपली संपदा याच अफूच्या धंद्यातूनच कमावली होती हे आज फार कुणाला माहीतच नसेल! इंग्रजांनी मुंबईत कापडगिरण्याही सुरू केल्या. त्या अहोरात्र चालू लागल्या. त्यासाठी लागणारे स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ कोकण आणि देशावरून मिळू लागले. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसल्यामुळे या कामगारांच्या वस्त्या गिरण्यांना खेटून दाटीवाटीने उभ्या राहिल्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी कापसाला सोन्याचा भाव आला आणि शहराने कात टाकली. ज्ञानप्रकाश यांच्या मते, मुंबई शहरातली पराकोटीची धनासक्ती आणि यशासक्ती या दोहोंची उत्तम उदाहरणे म्हणजे अनुक्रमे रेक्लमेशन प्रकल्प (समुद्रभराव) आणि पत्रकार करंजिया यांचे 'ब्लिट्झ' वर्तमानपत्र! मुंबईतील आजच्या अस्वच्छतेला नाके मुरडणाऱ्यांनी ज्ञानप्रकाश यांच्या पुस्तकातील नरकसदृश गिरणीकामगार वस्त्यांचे आणि त्यातून जन्मलेल्या १८९६ सालच्या भयानक प्लेगचे वर्णन मुळातून वाचावे! यां वस्त्यांना 'चाळ' हे नाव पडलेले होते. सुरुवातीला सरकारने अनिच्छुकपणे या वस्त्या सुधारण्याचे थातुरमातुर प्रयत्न केले. वरळीच्या डबासदृश बी.डी.डी. चाळी सरकारने याच काळात बांधल्या. पण शहराचे आमूलाग्र परिवर्तन करायचे असेल तर समुद्रात रेक्लमेशन करून तिथे शिस्तबद्ध कामगारवस्त्या उभाराव्यात ही कल्पना जोर धरू लागली. ब्रिटिशकाळातच त्यावर काम सुरू झाले. पण धनासक्त मुंबईला असले निरिच्छ समाजकार्य पटणे शक्यच नव्हते. रेक्लमेशनने निर्माण केलेल्या जमिनीवर गिरणी कामगारांच्या बकाल, रोगट वस्त्यांचे योजनाबद्ध पुनर्वसन करावे या मूळ कल्पनेला मध्येच संपूर्ण तिलांजली दिली गेली. त्या जागी मरीन ड्राईव्ह आणि कफ परेड निर्माण झाले. ब्रिटिश सरकारने लठ्ठ नफा घेऊन तिथे धनाढ्यांना वसवले. हे गुलामीचे फळ म्हणावे तर तेही खरे नाही. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही याचीच पुनरावृत्ती झाली. प्रगतीशील महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी सरकारनेही मरीन ड्राईव्हच्या दुसऱ्या टोकाचे रेक्लमेशन गब्बर बिल्डरांना गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी विकले. या भागाला सरकारने नरिमन पॉईंट असे नाव दिले हा एक क्रूर विनोदच! कारण खुर्शीद नरिमन यांनी एकेकाळी ब्रिटिश सरकारच्या स्वार्थी, नफेखोर रेक्लमेशन योजनेविरोधात न्यायालयात जवळजवळ एकाकी अशी झुंज दिली होती. ज्ञानप्रकाश हे या काळाची कथा वस्तुनिष्ठ शैलीत मांडतात. रेक्लमेशन हे अखेर श्रीमंतांच्या घशात गेले हे खरे. पण मुंबईची ओळख जगभर नावारूपाला आली तीही याच काळात. नावाजलेल्या वास्तुशास्त्रज्ञांनी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत दिमाखदार इमारती (खाजगी तसेच सार्वजनिकही) बांधल्या. खंबाटा यांचे एरॉस थिएटर, फ्रामजी सिधवा यांचे रीगल आणि हॉलीवूडच्या एम.जी.एम. स्टुडिओवाल्यांनी बांधलेले मेट्रो, ही सर्व याच १९३० च्या दशकातली. टाटांचे ताज हॉटेल त्याआधीच उभे राहिलेले होते. नेराळे यांनी गिरणी कामगारांच्या घटकाभर विरंगुळ्यासाठी हनुमान तमाशा थिएटर बांधले तेही याच काळात. (आज अस्तित्वात आहे का ते?). दादासाहेब फाळक्यांचा पहिला चित्रपट १९१३ साली आला. १९३०च्या दशकात हिंदी चित्रपट उद्योगाची खरी वाढ सुरू झाली. ज्ञानप्रकाश वारंवार प्रतिपादन करतात की गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भयानक तफावत आणि परिणामस्वरूप मुंबई शहराला आलेली कायमस्वरूपी गलिच्छ अवकळा ही तेव्हापासून आजतागायत तशीच आहेत. याचा दोष सोयीस्करपणे गरिबांवर ढकलण्याची दुटप्पी मध्यमवर्गीय समाजप्रवृत्तीही बदललेली नाही. वास्तविक बकाल बेकायदा झोपडपट्ट्या हे गरिबांचे नव्हे तर उद्दाम, नफेखोर भांडवलशाहीचे पाप आहे. दुसरे उदाहरण ब्लिट्झचे. संपूर्णपणे शहरी आणि वाचकशरण तोंडवळा असलेले हे भारतातील पहिले वर्तमानपत्र. आज ते जीवित नाही, पण मिरर आणि मिड-डे ही त्याचीच बाळे. खप वाढवण्यासाठी काहीही छापले तरी ते क्षम्यच असते, ही खास मुंबईची अशी बेफिकीर, न-नैतिक विचारसरणी बाळगून बी.के. करंजिया यांनी हे पत्र एकहाती चालवले. नानावती खटल्याच्या काळात ब्लिट्झच्या प्रती चक्क काळ्या बाजारात विकल्या जात. करंजिया यांनी ब्लिट्झच्या कार्यालयात पाटी लावली होती: "इथे नोकरी करण्यासाठी माथेफिरू असायलाच हवं असं नाही, पण असलात तर बरं होईल!" इथून पुढे मार्क्सवाद-समाजवाद यांचा प्रवेश, कामगारांचा लढा, मराठी माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचे राजकारण, शिवसेनेचा जन्म, राजकीय पक्षाला एक विचारसरणी म्हणून असावी लागते या संकल्पनेलाच फाट्यावर मारून तिने केलेली जमावखोर दंडुकेशाहीची सुरुवात, कृष्णा देसाई खून खटला, गिरणी संपाची शोकांतिका, त्यातून अटळपणे झालेला धार्मिक उन्मादाचा शिरकाव, आणि गुन्हेगारी अधोजगताने शहराचा घेतलेला कब्जा हा सारा आलेख ज्ञानप्रकाश अचूकपणे मांडतात (मराठी वाचकांना तो आधीच परिचित आहे). एवढेच नव्हे तर या इतिहासक्रमाची अतूट नाळ मुंबई शहराच्या धनोपासक प्रवृत्तीशी कशी जोडलेली आहे याचेही विवेचन करतात. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे हिंदीभाषिक लेखक-पत्रकारांच्या मनात सेनास्टाईल 'मराठी माणूस' राजकारणाबद्दल जो एक कायमचा असा आकस दिसत असतो (रास्त की अवाजवी हा निराळा मुद्दा) त्याचा लवलेश प्रकाश यांच्या लिखाणात आढळत नाही. धारावी हे नाव घेताच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यांच्या मुखावर स्पष्ट नाराजी उमटत असते. पण धारावी हे अविरत उद्यमरत असलेले एक छोटेखानी गतिशील शहरच आहे. उद्याचा दिवस हा नक्की आजच्याहून चांगला असेल या अभंग आशेवर इथे असंख्य 'उद्योजक' नवनव्या वस्तू बनवून, आकर्षक वेष्टनांत बांधून लोकल ट्रेनमध्ये किंवा सिग्नलवर पायपीट करत विकतात. पुस्तकाच्या एका भागात ज्ञानप्रकाश मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या हिंदीभाषिक 'डोगा कॉमिक्स'मधून दिसणारी बदलती मुंबई या विषयावर लिहितात. या कॉमिक्सचा आणि माझा अजिबात परिचय नसल्यामुळे मी काहीश्या त्रयस्थपणेच तो वाचून संपवला. मुंबईबद्दल लेखकाला असलेली ओढ आणि तिला मिळालेली सखोल अभ्यासाची जोड या पुस्तकाच्या पानापानात जाणवते. (टीप: या पुस्तकाच्या काही भागाचा आधार घेऊन दिग्दर्शक अनुराग कश्यप याने 'बॉम्बे व्हेल्वेट' हा चित्रपट काढला आहे)

54 टिप्पण्या 10,983 दृश्ये

Comments

चलत मुसाफिर नवीन

In reply to by एस

Maximum City वाचून फार काळ लोटला. पण Behind the Beautiful Forevers या मुंबईविषयक आणखी एका नितांतसुंदर पुस्तकाबद्दल लिहायचा विचार आहे.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by एस

मॅक्सिमम सिटी वाचलंय. आवडलं होतं. थोडा साऊथ बाॅम्बे दृष्टिकोन जाणवतो. चमुंच्या म्हणण्यानुसार मुंबई फेबल्समध्ये असा आकस (उदाहरणार्थ उत्तर भारतीय लोकांचा शिवसेनेच्या राजकारणाबद्दल असलेला) दिसत नाही त्यामुळे ते वाचण्यासाठी उत्सुक. चमु, एक पुस्तक परीक्षण स्तंभच चालू करा आता.

dadadarekar नवीन

बाँबे वेल्वेट आवडला होता. हे पुस्तक मराठीत आहे का ?

तर्राट जोकर नवीन

मुंबै मराठी माणसाचीच हा एक फार मोठा गैरसमज भगव्या पक्षांनी पसरवला. कारण इथे मलिदा खायला खुप दर्जेदार कुरण आहे. सीमावादातल्या लोकांकडे ढुंकूनही बघायला वेळ नसतो मराठीची पोकळ डरकाळी फोडणार्‍यांना. तात्पर्य काय, अर्थकारण सर्वथा बलवान.

अन्या दातार नवीन

In reply to by तर्राट जोकर

तस बघायला गेलं तर कोणतच शहर कोणत्याच भाषिकांच म्हणता येणार नाही. तुमचा तर्क तुम्ही कोलकता, चेन्नई वा बंगळूरुला लावणार काय?

तर्राट जोकर नवीन

In reply to by अन्या दातार

उल्लेखित शहरांमधे लुंगी हटाव पुंगी बजाव, गुजराती-मारवाडी-विरोध, युपी-बिहारी-विरोध, (हे शहर) आमचेच वा तत्सम पोकळ अस्मिताधारी आंदोलने भूमिपुत्रांच्या नावाखाली तिथल्या स्थानिक राजकिय पक्षांनी चालवली आहेत का या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर काही बोलता येईल.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by तर्राट जोकर

योग्य बोललास रे टीज्या. पोकळ दिखाउ आंदोलने ६०/७० च्या दशकात लोकांनी पाहिली.'तुम्हाला नोकर्या मिळत नाहीत्,व्यवसाय करता येत नाही ह्याचे कारण अमराठी लोक होत' हा गैरसमज मध्यम्वर्गाच्या गळी उतरवण्यात स्थानिक पक्ष यशस्वी झाले. सुदैवाने आता स्थिती चांगली आहे.

गामा पैलवान नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, >> 'तुम्हाला नोकर्या मिळत नाहीत्,व्यवसाय करता येत नाही ह्याचे कारण अमराठी लोक होत' हा गैरसमज >> मध्यम्वर्गाच्या गळी उतरवण्यात स्थानिक पक्ष यशस्वी झाले. या विधानाशी असहमत. एक उदाहरण देतो. रेल्वेत नोकरभरतीची जाहिरात मराठी भाषेत देणं कायद्याने आवश्यक असतांना फक्त बिहारी आणि भय्या वृत्तपत्रांत जाहिराती येत असंत. याविरुद्ध आवाज उठवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला लावणे म्हणजे गैरसमज निर्माण करणे नव्हे. आ.न., -गा.पै.

dadadarekar नवीन

In reply to by गामा पैलवान

सगळ्या सरक्सरी नोकर्‍यांच्या जाहिराती एम्प्लॉयमेंट न्य्युज मध्ये येतात. यू पी बिहारची राज्य सरकारे या जाहिरातींची माहितेव त्यांच्या लोकल पेप्रात देतात. मुम्बै पालिका व महाराष्ट्र शासन यानीही एम्प्ल. न्यूजमधील जाहिरातेंची माहिती लोकल पेप्रात स्वखर्चाने द्यावी. कोण अडवले आहे का ?

चलत मुसाफिर नवीन

In reply to by अन्या दातार

पुणे किंवा कोल्हापूर मराठी माणसाचे हे कदाचित एका मर्यादित अर्थाने मान्य करता येईल. पण मुंबईचा इतिहास संपूर्णपणे वेगळा आहे.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by तर्राट जोकर

' फक्त ' मराठी माणसाची हा गैरसमज पसरवलेला आहे जो आपल्या देशाच्या राज्यघटनेशी विसंगत आहे आणि सगळ्या भगव्या पक्षांनी तो पसरवलेला नाही तर शिवसेनेने पसरवलाय तोही अगदी स्थापनेपासून. बाकी भगवे पक्ष म्हणजे भाजपसुद्धा म्हणत असाल तर त्यांनी असं कधीच म्हटलं नव्हतं. काँग्रेसनेही नव्हतं. शिवसेनेनेही ही भूमिका सोयीस्कर रीतीने वापरलेली आहे कारण मुंबई हातात ठेवण्यासाठी हा भावनिक मुद्दा सेनेला महत्वाचा वाटत आलेला आहे. सचिन तेंडुलकरच्या एका उद्गारांवरुन बाळासाहेबांनी किती विरोध केला होता ते आठवत असेलच. बाकी शिवसेनेला मुंबईबद्दल काही वाटतं यावर आता शिवसैनिकांचाही विश्वास राहिलेला नाही, सामान्य नागरिकांचं सोडूनच द्या.

प्रचेतस नवीन

लेख चांगलाच पण
मुंबईला शून्य प्राचीन इतिहास आहे. मुंबईत एकही मध्ययुगीन इमारत नाही
ह्याच्याशी अगदीच असहमत ब्वॉ. सोपार्‍याचा अशोककालीन स्तूप व तिथे मिळालेले अशोकाचे शासन, कान्हेरीचा पार इसवी सनापासून असलेला इतिहास, वशिष्ठिपुत्र पुळुमावी, श्री यज्ञ सातकर्णीचे शिलालेख, घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर इथल्या कोकण मौर्य/ राष्ट्रकूटांनी ६/७ व्या शतकात खोदलेल्या लेण्या असं बरंच काही आहे. त्याच्या अलीकडचं ठाणं तर उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. आजही तिथे काही प्राचीन मंदिरे आहेत. गेला बाजार महिकावतीच्या बखरीत मुंबईचा बराच प्राचीन इतिहास दिलेला आहे.

राही नवीन

In reply to by प्रचेतस

जुने चिमुकले मुंबई बेट म्हणजे इन मीन चारसहा चौ.मै.पेक्षासुद्धा छोटे समुद्रात घुसलेले जमिनीचे टोक. या टोकावर कोण बांधकाम करणार? पण या मुंबई बेटापासून २५ कि.मी.च्या त्रिज्येत अनेक जुने स्तूप, गुहा, विहार, मंदिरे आहेत. मुंबैचा हा इतिहास आता मुंबई विद्यापीठाच्या कलाशाखेच्या प्रथमवर्षास अभ्यासाला आहे असे ऐकले होते. कान्हेरी तर तेराचौदाव्या शतकापर्यंत नांदते होते. मुंबईला इतिहास नाही हे म्हणणे म्हणजे पुण्यातली एखादी वस्ती पकडून, उदा. डेक्कन, आणि तिला काहीही इतिहास नाही असे म्हणण्यासारखे आहे. सुरतेच्या हल्ल्यानंतर वखारी हलवण्याचा ब्रिटिशांचा विचार बळावला. तोपर्यंत मुंबई बेट ब्रिटिशांच्या ताब्यात आले होते. युरोपीय लोक चांगले दर्यावर्दी. त्यांनी मुंबईची बंदरासाठीची उपयुक्तता ओळखली. आणि बंदर म्हणून मुंबईचे महत्त्व वाढत गेले. पूर्वेचा व्यापारही वाढला. प्लेगचे उंदीर शांघाय वगैरे पूर्वेच्या बंदरांतून जहाजाद्वारे मुंबईत आले म्हणतात. बाँबे इम्प्रूव्मेन्ट ट्रस्टसंबंधी बरीच माहिती विकीवर आहे. आधुनिक शहर ही संकल्पना तोवरच्या जगातही नवीनच होती. यांत्रिक क्रांतीमुळे युरोपमध्येसुद्धा सोळाव्या सतराव्या शतकापासून शहरीकरणाची सुरुवात झाली. त्या आधी युरोपचा चेहराही खेडवळच होता. आणि आधुनिक युगात भारत हा जगाला पंधराव्या शतकात ज्ञात झाला असला तरी त्या आधीही तो होताच. इथे संस्कृती होती, अर्किटेक्चर होते. मधल्या काळात याविषयीचे ज्ञान युरोपियनांच्या स्मृतीतून गेले असले तरी संपूर्ण कोंकणप्रांताचे पश्चिमेशी संबंध होते.

चलत मुसाफिर नवीन

In reply to by प्रचेतस

प्राचीन किंवा मध्ययुगात मुंबईचे अस्तित्वच नव्हते असं म्हणायचं होतं.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by प्रचेतस

महिकावती म्हणजे आजचं माहिम आणि महिकावतीच्या राजाची हत्ती बांधायची पागा जिथे होती ती जागा म्हणजे मत्तंगालय म्हणजे माटुंगा असा एक तर्क ऐकलेला आहे. खरा आहे का?

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

परिचय आवडला रे मुसाफिरा. विश्वास पाटलांचे 'लस्ट फॉर लालबाग' प्रसिद्ध होतेय असे ऐकले आहे.

मांत्रिक नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई अराजकीय धाग्यांवर फारशा येत नाहीत. तुमच्या धाग्यावर आल्या हे महद्भाग्य!!! ओ माई कधी कधी आमच्या धाग्यांवर पण पायधूळ झाडत जावा.

चलत मुसाफिर नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्यवाद

वेल्लाभट नवीन

वाचायला हवं..... छान परिचय. तरीही वाटतं, मुंबई बद्दल काही न पटणारे, न रुचणारे समज 'इतिहास' म्हणून या पुस्तकात नक्कीच मांडलेले असणार.

राही नवीन

In reply to by वेल्लाभट

मलाही हे पुस्तक न वाचताही ते काही अजेंडा ठेवून लिहिले असावे असे वाटू लागलेय.

जगप्रवासी नवीन

नेराळे यांनी गिरणी कामगारांच्या घटकाभर विरंगुळ्यासाठी हनुमान तमाशा थिएटर बांधले तेही याच काळात. (आज अस्तित्वात आहे का ते?).>>> हनुमान थिएटर लालबागच का? लालबागच असेल तर अजून ही आहे. लालबागच्या चिवडा गल्लीत एक हनुमान थिएटर आहे आणि बाजुलाच दर्गा आहे.

द-बाहुबली नवीन

हम्म यामुळेच मुंभाय आवडत नाय... मराठी मानुस (निसत्या) कर्तुत्वाने नाय तर अंगच्या गुनामुळे मागे हाय हे पुन्हा पुन्हा ठसवते ही नगरी :(

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

त्याआधी ती मानवाने निसर्गावर विजय मिळवून निर्माण केलेली वसाहत आहे.
२६ जुलैचा अनुभव घेतलेल्यांनी ह्यावर थोड लिहावं!

dadadarekar नवीन

अग्गोबै ! मुम्बैला प्राचीन इतिहास नाही म्हणे. साक्षात प्रभू रामचंद वाळकेश्वरात मुक्कामास होते.

नाखु नवीन

पुस्तक परिचय आंग्ल भाषेत असेल तर मराठीत आल्यावर वाचले जाईल. ता.क. वरती आम्च्या कवीता वचनाच्या दाखला-पडताळा दिल्याबद्दल सध्या होबासरावांना शोधीत आहे.

गामा पैलवान नवीन

चलत मुसाफिर, पुस्तक परिचय फक्कड जमलाय. वाचायला हवं हे पुस्तक. उत्सुकता जागी झालीये. धन्यवाद. थोडं अवांतर : वर शिवसेनेचा राजकीय पक्ष म्हणून उल्लेख आला आहे. (तो तुमचा की लेखकाचा ते स्पष्ट होत नाही). मात्र शिवसेना अगदी स्थापनेपासूनही राजकीय पक्ष कधीच नव्हती. उद्या महाराष्ट्रात जरी एकहाती सत्ता लाभली तरीही शिवसेना राजकीय पक्ष नसणारे. ती एक चळवळच असेल. तिला राजकीय पक्षाची मोजमापं लावून पाहणं दिशाभूलजनक ठरेल. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुका लढवणारे, 'आमची सत्ता आली तर काय करू'ची आश्वासनं देणारे जाहिरनामे प्रसिद्ध करूणारे, कित्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमधे असलेली प्रत्यक्ष सत्ता, निवडून आलेले कायदेशीर प्रतिनिधी इत्यादी असूनही तुम्ही शिवसेनेला चळवळ म्हणताय हे म्हणजे 'आमचा बाब्या गुंड न्हाय, तो गरिबांचं रक्षण करतो, अन्याव दूर करतो' म्हणण्यासारखे आहे. एकतर तुम्हाला चळवळ आणि राजकिय पक्ष यांच्यातला फरक माहित नाही किंवा तुम्ही स्वतः दिशाभूल करत आहात.

गामा पैलवान नवीन

In reply to by तर्राट जोकर

TJ, संघ कधीही निवडणुका लढवीत नाही. त्याचा राजकीय कारभार भाजप सांभाळतो. त्याप्रमाणे शिवसेना ही मुळातून चळवळ असून तिचा राजकीय कारभार तिचा पक्षीय विभाग सांभाळत असे. निदान बाळासाहेब हयात होते तोवर तरी. संघ आणि भाजप जसे वेगळे दाखवता येतात तसे शिवसेनेत स्वतंत्र विभाग दाखवता येत नाहीत. नेमकी हीच तिच्यातली त्रुटी आहे. यावर बाळासाहेबांनी विचार करायला हवा होता. शिवसेना टिकवायची असेल तर उद्धव यांना तो आज ना उद्या करावाच लागेल. असो. बरंच अवांतर झालंय. :-) आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

माझ्यामते तुम्ही राजकिय पक्ष व चळवळ याविषयी अधिक अभ्यास करायला हवा. शिवसेना जरी चळवळ म्हणून सुरु झालेली असली तरी तीचं आज केवळ राजकिय पक्ष म्हणून अस्तित्व आहे. संघ आणि भाजप हे दोन स्पष्ट वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यात गल्लत करून त्याचे उदाहरण म्हणुन देण्यात काय हशील. तसेही राजकीय पक्ष म्हणवून घेण्यात काय लाज आहे का? किंवा चळवळ म्हटल्याने काही माहात्म्य प्राप्त होत नाही हे आपण जाणताच. मग ओढून ताणून बादरायण संबंध जोडायची काय आवश्यकता?

गामा पैलवान नवीन

TJ, तुम्ही म्हणता की : >> शिवसेना जरी चळवळ म्हणून सुरु झालेली असली तरी तीचं आज केवळ राजकिय पक्ष म्हणून अस्तित्व आहे. हे दुर्दैवाने खरं होतंय. नेमक्या याच कारणासाठी उद्धव ठाकऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. बाळासाहेबांचं पुण्य काही वर्षं टिकेल. पण पुढे उद्धवांना बरंच आत्मशोधन करावं लागेल. थोडं शिवसेनेच्या मूळ स्वरूपाकडे वळतो. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तरी त्यात मराठी माणसाला नगण्य स्थान होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी मार्मिक सुरू करून त्यातून या असंतोषाला वाचा फोडली. पुढे त्याचं रुपांतर शिवसेनेत झालं. तेव्हा निवडणुका लढवणं हे प्राधान्य नव्हतं. आजही निवडणुका लढवणं हे सामान्य शिवसैनिकाचं प्राधान्य नाही. शिवसेनेला नेहमी सामान्य शिवसैनिकाचाच आधार राहिला आहे. तेव्हाही आणि आताही. शिवसेनेत कितीही मोठा सत्ताधारी असला तरी तो सेनेचं काहीही वाकडं करू शकत नाही. ही सेनेची ताकद आहे. तिचं नीट नियमन करायला हवं. बंगालमध्ये ३३ वर्षांची जवळपास अनिर्बंध सत्ता संपुष्टात आल्यावर मार्क्सवादी कम्युनिस्टांची काय हालत झालीये, ते गेले चारपाच वर्षं दिसतंय. १९९९ साली शिवसेनेच्या हातातून सत्ता निसटल्यावर तिची अशीच हालत झाली होती का? भुजबळ, राणे अशी दिग्गज मंडळी सोडून गेली तरी शिवसेना उभी कशाच्या जोरावर? आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

धागालेखक वा वाचकांनी हा प्रतिसाद अवांतर समजू नये. मुंबईच्या राजकिय इतिहासात शिवसेनेचं चांगलं म्हणा वाईट म्हणा पण विशेष उल्लेखनिय स्थान आहेच. स्वातंत्र्योत्तर मुंबईच्या घडण्या-बिघडण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहेच. 'बाळासाहेबांचं पुण्य' हा शब्द वापरून आपण आपला कल-रुची-श्रद्धा स्पष्ट करून आपल्या प्रतिसादांमधलं शिवसैनिकपण अधोरेखित केलं त्याबद्दल धन्यवाद! आपले प्रतिसाद बायस्ड आहेत हे उघड आहे. बाळासाहेबांबद्दल काही विशेष मत नाही पण स्वतःच्या सोयीनुसार व लहरीपणानुसार भुमिका बदलण्यात पटाईत असलेल्या व्यक्तीला लाखो लोक दैवत मानतात यात मला खरे आश्चर्य वाटत राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तरी त्यात मराठी माणसाला नगण्य स्थान होतं. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई अशी जी मांडणी बाळासाहेबांतर्फे किंवा शिवसेनेतर्फे सतत केली गेली आणि जात आहे ती स्पष्ट धूळफेक आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला नगण्य स्थान होतं हे सिद्ध करणारे पुरावे, पुस्तकं, घटना काहींचे संदर्भ मिळतील का? त्यामुळे बाळासाहेबांनी मार्मिक सुरू करून त्यातून या असंतोषाला वाचा फोडली. मार्मिक हे मुंबईपुरतं मर्यादित होतं. ते मुंबईतल्या तथाकथित नागवलेल्या गेलेल्या मराठी माणसांच्या तथाकथित असंतोषाला वाचा फोडनारं होतं. मुंबईत गुजराती कारखानदार, व्यापारी आणि पांढरेपेशे-इतर कामगार म्हणून अधिक संख्येने येणारे दक्षिण भारतीय हे 'आपल्याच मुंबईत आपल्याच मराठी लोकांचे धंदे-नोकर्‍या हिसकावून घेत आहेत' अशी न्यूनगंडांची भावना तयार करण्यात ठाकरे पुढे होते. अधिक काम करा, योग्य शिक्षण घ्या, हुशार व्हा, मोठी स्वप्नं बघा असे शाश्वत व विकासाचे विचार देण्याऐवजी 'ते तुमच्यावर अन्याय करत आहेत' अशी तद्दन राजकिय थाटाची मांडणी असायची. त्यात ही जी मांडणी केली जात होती ती नक्की पुर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची होती? शिवसेनेच्या अधिकृत संस्थळावरील हा उतारा: "`मार्मिक’मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या त्या परप्रांतीयांच्या होत्या. मराठी माणसास स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व प्रायव्हेट कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. `मार्मिक’मधील आपल्या लिखाणाने बाळासाहेबांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले." पुढे त्याचं रुपांतर शिवसेनेत झालं. तेव्हा निवडणुका लढवणं हे प्राधान्य नव्हतं. शिवसेनेच्या जन्मात काँग्रेसने पितृपण केलंय हे कितीवेळा शिवसैनिक नाकारतील? मुंबैतून भांडवलदारांना जाचक ठरणारा कम्युनिजम शिवसेनेचा हुशारीने वापर करत काँग्रेसने निपटून काढला हे जगजाहिर आहे. शिवसेनेच्या अधिकृत संस्थळावरील हा उतारा: "१९६७ साली लोकसभा निवडणुकीत राजकीय डावपेचांचे पहिले शड्डू ठोकून झाल्यानंतर ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेना वाजत-गाजत उतरली. या पहिल्या-वहिल्या ढाल-तलवार युध्दाचा निकाल होता १७ जागा! ४० पैकी १७ जागा जिंकून शिवसेनेने पुढच्या झंझावाताची चुणूक आनंदलेल्या मराठी मनाला आणि मराठीद्वेष्ट्यांना दिली!" १९६६ला स्थापन झालेली 'चळवळ' १९७१ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांत भाग घेऊन पाच खासदार निवडून आणते तरी 'तेव्हा स्थापनेच्या वेळेस निवडणुका लढवणं हे प्राधान्य नव्हतं' हे म्हणणे तार्किक दृष्ट्या योग्य असलं तरी ते खरं आहे असं नाही. आजही निवडणुका लढवणं हे सामान्य शिवसैनिकाचं प्राधान्य नाही. शिवसेनेला नेहमी सामान्य शिवसैनिकाचाच आधार राहिला आहे. तेव्हाही आणि आताही. मग सामान्य शिवसैनिकाचं काय प्राधान्य आहे? काल ज्यांची डोकी फोडली, सत्तेसाठी आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत. वरून शहाजोगपणे निवडणुका लढवणं हा साशिसै चं प्राधान्य नाही म्हणतात. त्यांचं प्राधान्य उधोजींच्या हातातलं बाहुलं बनून राहणे असेल. किंवा गल्लोगल्ली गुंडगिरी करत फिरणे, वचक बसवणे. वडापावची दुकाने थाटणे, बाळासाहेब-नंतर-उधोजी यांच्या सतत बदलणार्‍या, अनुत्पादक भूमिकांचे झेंडे वर डोके नसलेल्या खांद्यावरून वाहणे. शिवसेनेला अशाच सामान्य शिवसैनिकाचा आधार राहीला आहे कारण हेच की सामान्य, स्वतःची अक्कल चालवू शकत नसलेले, कसल्या तरी न्यूनगंडांच्या दबावाखाली असतात, आपल्या सर्व समस्यांचं कारण कधी गुजराती, कधी मद्रासी, कधी मुसलमान, कधी दलित, कधी भय्ये आहेत असं वाटून घेतात. मुख्य नेत्यांच्या सोयीनुसार बदलणार्‍या भुमिकांना अजिबात विरोध करत नाहीत. असेच सैनिक आधार असतात अशा पक्षांचे व त्यांच्या हुकुमशाही नेत्यांचे. बहुसंख्य शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा होती-आहे परत एकत्र व्हायची. दोन भावांच्या इगोवर घोडं अडलंय. हीच किंमत सामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही सेनेत. शिवसेनेत कितीही मोठा सत्ताधारी असला तरी तो सेनेचं काहीही वाकडं करू शकत नाही. ही सेनेची ताकद आहे. तिचं नीट नियमन करायला हवं. वरील वाक्य अतिशय हास्यास्पद वाटली, माफ करा. जिथे एकच माणुस लहरीपणाने आदेश सोडतो, त्यावर इतर मान डोलावतात अशा हुकूमशाही पक्षाच्या एकहाती ताकदीचं काय कौतुक? परत सेनेचं वाकडं म्हणजे नक्की कोणाचं आणि कशाचं वाकडं? सामान्य शिवसैनिकाच्या पदरात काय पडलंय आजवर? मुंबईत कित्येक वर्षे सत्ता असून काय दिवे लावलेत हे सर्व जगाला माहित आहे. घराणेशाहीचा आयुष्यभर कायम विरोध करणार्‍यांची जीभ 'आपल्या पोरांना सांभाळून घ्या' असं निर्लज्ज आवाहन करतांना अजिबात चाचरत नाही. पक्षात एकच सत्ताकेंद्र आहे आणि ते अतिशय चूक असूनही त्याचाच सेनेला अभिमान आहे हे ही चमत्कारिक आहे. सतत भाजपाशी तुलना करू पाहणार्‍या पक्षाने एक पक्ष म्हणून भाजपाची रचना तरी समजून घ्यावी. राज व राणे यांनी शिवसेनेची कशी हवा टाइट केलेली त्यादिवसांत, ते प्रत्यक्ष मातोश्रीत जाऊन पाहिले आहे. तसेच 'मोठा सत्ताधारी' आणि 'सामान्य शिवसैनिक' या शब्दांतून व्यक्त होणारी मानसिकताही बरेच काही सांगून जाते. बंगालमध्ये ३३ वर्षांची जवळपास अनिर्बंध सत्ता संपुष्टात आल्यावर मार्क्सवादी कम्युनिस्टांची काय हालत झालीये, ते गेले चारपाच वर्षं दिसतंय. १९९९ साली शिवसेनेच्या हातातून सत्ता निसटल्यावर तिची अशीच हालत झाली होती का? भुजबळ, राणे अशी दिग्गज मंडळी सोडून गेली तरी शिवसेना उभी कशाच्या जोरावर? बंगालमध्ये ३३ वर्षे अनिर्बंध सत्ता हेच मा.क. यांचे प्रचंड यश आहे. शिवसेनेला ते एकट्याच्या स्वबळावर महाराष्ट्रात एकदाही मिळवता आले नाही हेही लक्षात घेतले पाहिजेच. जेव्हा सत्ता निसटल्याची भावना व्यक्त होते तेव्हा ती मिळवण्याची लालसा होतीच असेही दिसून येते. काँग्रेसचेही २०१४ मध्ये पानिपत झाले, तीही संपली का? रीपब्लिकन पार्टीचे तर कधीच सरकार आले नाही मग तेही संपले का? मायावतीचे सरकार गेले तर तीही संपली का? लालूचे सरकार गेले तो ही संपला? हे सगळे कशाच्या जोरावर अजूनही उभे आहेत? आवडतीचं कारलं आहे म्हणून उसाची बरोबरी करावी? गा.पै., म्हणून मी म्हटले की राजकिय पक्ष, चळवळ याबद्दल अधिक अभ्यास करावा. शिवसेना ही मुंबईत खंडणी-गोळा-करु-सुपारी-घेऊ-पिच्चर-हिटकरू# संघटना आहे. इतर महाराष्ट्रात गुंडगिरी करणारा पक्ष आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास चाळला तर ग्लोबलायझेशनच्या युगात चुकीच्या वेळी मराठी अस्मितेच्या पोकळ डरकाळ्या फोडून मराठी माणसाचं अतोनात नुकसान करणारा, त्याला धार्मिक, जातीय, तोडफोडीच्या अनुत्पादक कामांत गुंतवणारा पक्ष म्हणून स्वतःची ओळख आहे. शिवसेनेने किती मराठी माणसांना कारखाने-उद्योगधंदे उभे करण्यास मदत करून किती मराठी लोकांस रोजगार उपलब्ध करून दिला ह्यावर संशोधन करा हवेतर. झुणका-भाकर, शिव-वडा-पाव सारखे मराठी माणसाची जणू तीच लायकी आहे असे अप्रत्यक्ष सूचित करणारे कार्यक्रम कसे फायदेशीर होते तेही सांगा पुढ्च्या प्रतिसादात. शिवसेनेच्या स्थापनेची जी कारणे होती तीच कारणे, समस्या आज पन्नास वर्षांनीही दोन्ही 'चुलतभाऊ' (खर्‍या-मराठीपणास-न-चुकता वेगवेगळे होऊन)जनतेसमोर मांडत असतील तर शिवसेनेने साशिसै साठी नक्की काय केले हे ऐकायला आवडेल. सामान्य शिवसैनिकांना दिसणारी शिवसेना व प्रत्यक्ष वेगळ्या हेतूने नियमन केल्या जाणारी शिवसेना ह्या दोन टोकाच्या परिस्थिती आहेत. सा.शि.सै. अजूनही शिवशाहीच्या रोमांटीक स्वप्नात गुंग आहेत. हे अर्थात आमचे व्यक्तिगत विचार आहेत. तुम्हाला तुमच्या पक्षाचं ग्लोरिफिकेशन करायचा पूर्ण हक्क आहे, तोही आम्हाला मान्य आहे. मराठी माणसाचं भले झाले, होत आहेच. ते तो कोण्याही मराठी-मराठी करणार्‍या पक्षाशिवाय स्वतःच करत आहे. त्यात शिवसेनेचा दुर्दैवाने खारीचाही वाटा नाही. TJ (स्वतंत्र भारतात केवळ मराठी आहे म्हणून कधीच अन्याय न झालेली एक मराठी व्यक्ती) #संदर्भः गर्लफ्रेंड नावाचा तद्दन भिक्कार चित्रपट व त्यानिमित्त झालेले शिवसेनेचे आंदोलन, दोन्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. शिवसेनेने चित्रपटाची व्यवस्थित प्रसिद्धी करून भरपूर गल्ला मिळवून दिला. एरवी एवढा 'संस्कृती-विध्वंसक' पिच्चर आलाय हे त्या थेटरच्या डोअरकीपरलाही कळले नसते.

dadadarekar नवीन

In reply to by तर्राट जोकर

सारे राजे महाराजे मोहरा षिनिमाच्या नसरुद्दीन शहाचे अवतार होते / आहेत. लोकाना हे समजेल तो सुदिन म्हणायचा.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by तर्राट जोकर

प्रचंड सहमत. शिवसेना-भाजप युती तुटल्यावर शिवसेना कुठल्या पातळीवर जाऊन प्रचार करत होती? जर शिवसेनेला स्वबळावर जिंकण्याची एवढी खात्री होती तर युती तोडल्यावर एवढं अस्वस्थ व्हायची काय गरज होती?निवडणूक झाल्यावर जेव्हा भाजपच्या निम्म्या जागा मिळाल्या तेव्हा विरोधी पक्ष म्हणून सेना राहिली असती तर सामान्य शिवसैनिकाला निवडणुका लढवण्यात स्वारस्य नाही हे जरातरी खरं आहे हे दिसलं असतं. पण १५ वर्षांनी तुटपुंजी का होईना, सत्ता मिळतेय ना, मग झालं तर - अशा भावनेने शिवसेना वागली. शिवसैनिकांच्याच म्हणण्यानुसार भाजप नेतृत्वाकडून त्यांना कमीपणाची वागणूक मिळते आहे. पण पाठिंबा काढून परत निवडणुकांना सामोरं जाऊन स्वबळावर सत्ता खेचून आणण्याची ताकद आणि धमक शिवसेनेत नाही हेही खरं आहे. १९९४-९५ मध्ये शिवसेनेने भाजपला दुय्यम स्थान दिलं होतं. आज ते स्थान स्वतःकडे स्वतःच्याच कर्मांनी आल्यावर त्यांची अस्वस्थता दिसून येते आहे. त्यामुळे शिवसैनिकांना सत्तेची इच्छा नाही आणि निवडणुका लढवण्यात स्वारस्य नाही असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणूक लढवण्यात स्वारस्य नसेल तर ते उद्धवजींना.

गामा पैलवान नवीन

In reply to by तर्राट जोकर

TJ, आपला प्रतिसाद वाचला. माझी मतं व्यक्त करतो. १. >> आपले प्रतिसाद बायस्ड आहेत हे उघड आहे. मान्य. मी शिवसैनिक आहे. मात्र मला निवडणुकांतल्या यशापयशात काडीमात्र रस नाही. माझ्यासारखे लाखो शिवसैनिक ही शिवसेनेची खरी शक्ती आहे. कोणी निवडून येणारे नेते नव्हेत. २. >> सोयीनुसार व लहरीपणानुसार भुमिका बदलण्यात पटाईत असलेल्या व्यक्तीला लाखो लोक दैवत मानतात यात मला >> खरे आश्चर्य वाटत राहिले आहे. शिवाजीमहाराजही असेच होते. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नसे त्या इंग्रजांनादेखील महाराजांच्या मनाचा थांग लागला नाही. महाराज लबाड, कावेबाज, धूर्त असूनही त्यांच्या पश्चात २७ वर्षे जनता का लढली? याचं कारण उमगलं तर बाळासाहेब समजून घ्यायला मदत होईल. अर्थात, त्यासाठी इच्छा पाहिजे. ३. >> संयुक्त महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई अशी जी मांडणी बाळासाहेबांतर्फे किंवा शिवसेनेतर्फे सतत केली गेली आणि >> जात आहे ती स्पष्ट धूळफेक आहे. 'चांद्यापासून बांद्यापर्यंत' हा शब्दप्रयोग तुम्ही बहुधा ऐकलेला नाही. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भात प्रबोधनकार ठाकरे हे नावही तुमच्या ऐकिवात नाही. ४. >> महाराष्ट्रात मराठी माणसाला नगण्य स्थान होतं हे सिद्ध करणारे पुरावे, पुस्तकं, घटना काहींचे संदर्भ मिळतील का? हे असं जर बाळासाहेब करत बसले असते तर ....! 'महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही' हे वसंतदादा पाटलांचे उद्गार आहेत. ५. >> अधिक काम करा, योग्य शिक्षण घ्या, हुशार व्हा, मोठी स्वप्नं बघा असे शाश्वत व विकासाचे विचार देण्याऐवजी >> 'ते तुमच्यावर अन्याय करत आहेत' अशी तद्दन राजकिय थाटाची मांडणी असायची. 'मुंबई तुमची भांडी घासा आमची' हे वाक्य कोणाचं आहे ते तुम्हाला आठवतंय का? अधिक काम करणे, योग्य शिक्षण घेणे, हुशार होणे आणि मोठी स्वप्न बघणे यातून पुढे भांडीच घासायची का? ६. >> मुंबैतून भांडवलदारांना जाचक ठरणारा कम्युनिजम शिवसेनेचा हुशारीने वापर करत काँग्रेसने निपटून काढला >> हे जगजाहिर आहे. आहेच मुळी. ७. >> 'तेव्हा स्थापनेच्या वेळेस निवडणुका लढवणं हे प्राधान्य नव्हतं' हे म्हणणे तार्किक दृष्ट्या योग्य असलं तरी ते खरं >> आहे असं नाही. आम्ही ८० % समाजकारण करतो तर २० % राजकारण करतो. असा शिवसेनेचा दावा आहे. हा कितपत खरा धरायचा ते माहीत नाही. पण त्यातून प्राधान्यक्रम सूचित होतो, असं माझं मत आहे. ८. >> शिवसेनेला अशाच सामान्य शिवसैनिकाचा आधार राहीला आहे कारण हेच की सामान्य, स्वतःची अक्कल चालवू शकत >> नसलेले, कसल्या तरी न्यूनगंडांच्या दबावाखाली असतात, आपल्या सर्व समस्यांचं कारण कधी गुजराती, कधी मद्रासी, >> कधी मुसलमान, कधी दलित, कधी भय्ये आहेत असं वाटून घेतात. मराठी माणूस इतका फालतू नाहीये की कोणाच्याही दबावाखाली जगेल. एक शिवसैनिक म्हणून माझा भय्यांना वा दाक्षिणात्यांना मुंबईत येऊन रास्त मार्गाने पैसा कमावण्यास विरोध नाही. महाराष्ट्रात आलात, खुशाल खा, प्या, मजा करा. पण महाराष्ट्रातून राहून तुम्ही काय शिकलात, आणि तुमच्या प्रांतात परत काय नेताय? हा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. एक मराठी म्हणून मला हा प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे. हा प्रश्न विचारायला मला शिवसेनेने शिकवलं. ९. >> त्यांचं प्राधान्य उधोजींच्या हातातलं बाहुलं बनून राहणे असेल. किंवा गल्लोगल्ली गुंडगिरी करत फिरणे, वचक बसवणे. >> वडापावची दुकाने थाटणे, बाळासाहेब-नंतर-उधोजी यांच्या सतत बदलणार्‍या, अनुत्पादक भूमिकांचे झेंडे वर डोके >> नसलेल्या खांद्यावरून वाहणे. साफ चूक. समाजकारण आणि अन्यायाचा प्रतिकार हे सामान्य शिवसैनिकाचं प्राधान्य आहे. निदान माझा तसा समज आहे. १०. >> पक्षात एकच सत्ताकेंद्र आहे आणि ते अतिशय चूक असूनही त्याचाच सेनेला अभिमान आहे हे ही चमत्कारिक आहे. शिवसेनेत पक्षीय सत्ताकेंद्र लाभाचं पद धरलं जात नाही. शिवाय पक्षीय सत्ता आणि शासकीय सत्ता यांत बराच फरक आहे. ११. >> राज व राणे यांनी शिवसेनेची कशी हवा टाइट केलेली त्यादिवसांत, ते प्रत्यक्ष मातोश्रीत जाऊन पाहिले आहे. आज दोघे कुठे आहेत? १२. >> बंगालमध्ये ३३ वर्षे अनिर्बंध सत्ता हेच मा.क. यांचे प्रचंड यश आहे. शिवसेनेला ते एकट्याच्या स्वबळावर महाराष्ट्रात >> एकदाही मिळवता आले नाही हेही लक्षात घेतले पाहिजेच. महराष्ट्रात १९९५ आणि त्यानंतर कोणालाही एकहाती बहुमत मिळालेलं नाहीये. शिवसेनेने जे काही मिळवलंय ते नक्षलवाद न पोसता मिळवलंय. १३. >> काँग्रेसचेही २०१४ मध्ये पानिपत झाले, तीही संपली का? रीपब्लिकन पार्टीचे तर कधीच सरकार आले नाही मग तेही >> संपले का? मायावतीचे सरकार गेले तर तीही संपली का? लालूचे सरकार गेले तो ही संपला? हे सगळे कशाच्या >> जोरावर अजूनही उभे आहेत? बाळासाहेब कधीही मतांचा जोगवा मागायला लोकांसमोर गेले नाहीत. पक्षाचा प्रचार भरपूर केला, पण मला निवडून द्या अशी भीक मागितली नाही. उपरोक्त माणसं कुणासाठी मतं मागतात ते सगळ्यांना माहितीये. नेमकं यातच कोण कशाच्या जोरावर उभं आहे ते दिसून येतं. १४. >> आवडतीचं कारलं आहे म्हणून उसाची बरोबरी करावी? नाही हो. बाळासाहेबांची बरोबरी करणारा माणूस आजून सापडायचाय. १५. >> शिवसेना ही मुंबईत खंडणी-गोळा-करु-सुपारी-घेऊ-पिच्चर-हिटकरू# संघटना आहे. इतर महाराष्ट्रात गुंडगिरी करणारा >> पक्ष आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ६२ मतदारसंघात गंडवले गेलेल्या लोकांचं बहुमत आहे असा होतो. तुमचं म्हणणं खरं असेलही. पण काये की कोणी सर्व लोकांना सदासर्वदा फसवू शकत नाही. मला वाटतं की ५० वर्षे गंडले जाण्याइतके मराठी लोकं बाळबोध खचितच नाहीत. १६. >> शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास चाळला तर ग्लोबलायझेशनच्या युगात चुकीच्या वेळी मराठी अस्मितेच्या पोकळ >> डरकाळ्या फोडून मराठी माणसाचं अतोनात नुकसान करणारा, त्याला धार्मिक, जातीय, तोडफोडीच्या अनुत्पादक कामांत >> गुंतवणारा पक्ष म्हणून स्वतःची ओळख आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. तर भारतात जागतिकीकरणाची सुरुवात त्यानंतर पंचवीसेक वर्षांनी १९९१ साली झाली. १७. >> शिवसेनेने किती मराठी माणसांना कारखाने-उद्योगधंदे उभे करण्यास मदत करून किती मराठी लोकांस रोजगार >> उपलब्ध करून दिला ह्यावर संशोधन करा हवेतर. हे शिवसेनेचं काम नाही. १८. >> .... तर शिवसेनेने साशिसै साठी नक्की काय केले हे ऐकायला आवडेल. शिवसेनेने सामान्य शिवसैनिकासाठी काहीही केलेलं नाहीये. नारायण राण्यांना ३९ वर्षं शिवसेनेत राहून काहीच मिळालं नाही. दत्ताजी साळवींनाही आयुष्य घालवून काहीच मिळालं नव्हतं. आनंद दिघ्यांचीही तीच गत होती. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी आपापले वेगळे मार्ग चोखाळून बघितले. तरीही त्यांच्या पदरी ठाशीव म्हणावं असं काहीच पडलेलं दिसंत नाहीये. एकंदरीत, काहीतरी फायदा व्हावा म्हणून कुणीही शिवसैनिक बनूच नये. १९. >> सामान्य शिवसैनिकांना दिसणारी शिवसेना व प्रत्यक्ष वेगळ्या हेतूने नियमन केल्या जाणारी शिवसेना ह्या दोन >> टोकाच्या परिस्थिती आहेत. सा.शि.सै. अजूनही शिवशाहीच्या रोमांटीक स्वप्नात गुंग आहेत. दोन्ही विधानं मान्य. शिवशाहीचं रोमँटिक स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं हेच शिवसैनिकाचं प्राधान्य असायला हवं. हे तुमच्याकडूनच सूचित होतंय. हे फार चांगलं झालं. 'वादे वादे जायते तत्त्वबोध:' याचं प्रत्यक्ष उदाहरण देवाविल्याबद्दल आभार! :-) असो. बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यापासून काही शिकता येईल का असा प्रश्न आहे. माझं उत्तर होकारार्थी आहे. मात्र तसं प्रत्येकाचं उत्तर नसणारे, याची जाणीव आहे. आ.न., -गा.पै.

dadadarekar नवीन

In reply to by dadadarekar

इंग्रजाना शिवाजी महाराजांचा थांगपत्ता आता तरी लागलाय यावर संशोधन करायला ते बहुदा कायमचेच इंग्लंडात गेलेले आहेत.

गामा पैलवान नवीन

In reply to by dadadarekar

दादा दरेकर, इतका दांडगा प्रतिसाद लिहायला विद्वत्तेची जरुरी असते. तिचा लवलेशही तुमच्याकडे दिसंत नाही. अन्यथा तुम्ही विषयाला धरून मते मांडली असती. तरीपण तुम्हाला संशयाचा फायदा देऊया. राणीसैनिक ही काय भानगड आहे, ते तुमच्या विद्वत्तेच्या सहाय्याने जरा विस्कटून सांगा. आ.न., -गा.पै.

दिवाकर कुलकर्णी नवीन

मुंबईत एकही मध्ययुगीन इमारत नाही. मुंबई ही भारतात परकीयांची वसाहत होतीच, पण त्याआधी ती मानवाने निसर्गावर विजय मिळवून निर्माण केले ही माहिती नव्हती