मृत्यूचा रंग कसा असतो माहितेय तुम्हाला ?
काळा ,खोल खोल काळा . त्याच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला शोषून घेणारा . जिवंत प्राण्याला सहसा दिसणार नाही असा .
काही लोक त्याच्या ओढिनेच मरण पत्करतात .
मी नशीबवान . कितीही मोठा प्रतिभावान चित्रकार पकडू शकणार नाही असा हा रंग मी रोज अंगावर पांघरते .
माझा आबा मरताना मला तीन लहान बहिणी आणि आमचं रक्त शोषणारी अपंग सावत्र आई देऊन गेला .
आबा गेल्यावर पोटभर खायला मिळालंय असं फारसं झालंच नाही .लहान बहिणी भुकेपाई बाजारात बसायच्याच बाकी होत्या.
पण देवाच्या दारात गर्दी खूप असावी . त्याला आम्हाला जगवत ठेवावं लागलं . देव निष्ठुर आहे त्याची सारखी प्रचीती देत.
आबा गेल्याच्या तीन चार दिवसांनीच पोलीस आले .
नवीन काम आलंय म्हणाले .
चला म्हणजे दोन तीन दिवस चूल पेटणार !!!
मी लगबगीनी आबाची हत्यारं घेऊन निघाले . पोलिस मला नेईनात .लहान बाई माणूस काय कामाचं ? .
पण उपाशी ,अन्नाच्या नुसत्या आठवणीनी थुंकी गिळणाऱ्या अभागी माणसाची इच्छा जबर असते .
पोलिसांचाही नाईलाज असावा .
त्यांच्या जीपडी मधून साईट वर गेले .
तीन बॉड्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या . रक्ताचे काळे ओघळ उतारा कडे धावत होते .
बघूनच शिसारी आली . आतडी तोंडातून बाहेर येतील एवढा आचका बसला .
पण पोटातल्या भुकेनी सावरलं ,कामाचं बळ दिलं .
सराईता प्रमाणे हत्यारं चालवून विखुरलेले सांधे, अवयव जुळवून पहिली कमाई मिळवली .
आता घरामध्ये सरपण येईल. भाकरीचा वास दरवळेल . बहिणींच्या निस्तेज चेहेऱ्यावर थोडसं समाधान दिसेल .
आता हेच माझं काम झालंय ,बॉड्या शिवायचं . विद्रूप झालेल्या ,अवयवांच्या गर्दीतून सौंदर्य शोधत.
देवाच्या दारात जाण्याच्या आधी जेवढी करता येईल तेवढी देहांची कुरूपता कमी करायची .
मी आता पुण्यवान ,पापी , शांत , मायाळू ,रागीट सगळ्या छटा थंड कलेवारा वर ओळखू लागलीय . एखादी कनवाळू माय लेकराच्या चेहऱ्या वर वाचते तशी .
नंतर काम वाढतंच गेलं . घराला घरपण येत राहिलं .
बहिणी शिकल्या ,मोठ्या झाल्या ,संसाराला लागल्या .
कित्येक अचेतन शरीरं जाता जाता आम्हाला जगवायचं पुण्य संचीत करून गेली .
मृत्युनी गिळलेला प्रत्येक घास आम्हाला समृद्ध करत राहिला.
मी मात्र आता अचेतन शरीरां मध्येच रमते .
कितीही आकर्षक सजीव पौरुष्य मला मोहात पाडू शकत नाही .
मृत्यू दिसल्यामुळे होणारा पौरुष्याचा शक्तिपात, आणि होणारी देहाची विटंबना मला दिसते .
कित्येक साधकांना ,योग्यांना आयुष्यभर जमणार नाही असा पल्ला मी लहान वयात गाठलाय .
मी मृत्यूलाही भीत नाही . मैत्री केलीय ना त्याच्याशी .
आता तो मला कधी भेटायला आलाच तर त्याला घट्ट कवटाळेन . एखादी नवथर ,उतावीळ प्रेयसी ,प्रियकराला कवटाळते अगदी तशीच.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही कथा श्री .उत्तम कांबळे ह्यांच्या एका लेखावर आधारीत आहे.
कथाबीज फुलवण्या साठी थोडे लेखन स्वातंत्र्य घेतले आहे ,पण गाभा तसाच ठेवण्याचा प्रयत्न केलाय .
"अभोगी " च्या जगण्यातलं रोजचं मरण मी तुमच्या पर्यंत पोचवू शकलो नसल्यास तो दोष माझ्या बुद्धी दारिद्र्याचा म्हणावा. .
वाचने
5513
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे असंही काही असतं?
+१
In reply to हे असंही काही असतं? by चैतन्यमय
!!!
+१
In reply to !!! by एस
+१
In reply to !!! by एस
++१
In reply to !!! by एस
+१
In reply to !!! by एस
खरंय !!!
In reply to !!! by एस
घ्या
In reply to खरंय !!! by यमन
दुव्याबद्दल धन्यवाद!
In reply to घ्या by कोमल
धन्यवाद कोमलजी
In reply to घ्या by कोमल
सुन्न ...
सुन्न!!
.....
थेट आणि
अत्यंत प्रभावी! सुन्न झालेय.
प्रभावी लेखनशैली.
तात्याची अभ्यंकर यांची "
+१ हेच म्हणतो
In reply to तात्याची अभ्यंकर यांची " by जेपी
!!!!
सुन्न!!
:(
जबरदस्त!
फारच "टोकदार" लिहीलय
अंगावर काटा आला!
भयानक, भयानक लिहीता हो तुम्ही
बापरे, घाबरलोच...!
कथा अगदी अंगावर आली. मूळ लेख
वाचून अगतिकपणे केवळ पुन्हा एकदा निगरगट्ट होण्यापेक्षा...
मोबाईल नंबर आत्ता पण त्यांचाच
In reply to वाचून अगतिकपणे केवळ पुन्हा एकदा निगरगट्ट होण्यापेक्षा... by बहुगुणी
किती वेगळ्या प्रकारचं जगणं...
बापरे!
हे सर्व सत्य आहे
अंगावर आली ही कथा. :(