मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???

कॅप्टन जॅक स्पॅरो · · जनातलं, मनातलं
आमचा पेर्णास्त्रोत आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्‍याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात? अर्थात शालेय वयामधे ही अक्कल मला नव्हती त्यामुळे ती अक्कल त्या वयामधे लहान मुलांमधे असेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. कॉलेजमधे अक्कल आलेली असते पण ज्या राष्ट्रगीताचं आणि प्रतिज्ञेचं पालनं करावं अशी अपेक्षा असते ती मात्र १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि फारफार तरं १ मे महाराष्ट्र दिनाचा प्रोटोकॉल एवढीचं सिमीत असते. त्यामधला अर्थ आचरणात आणायसाठी जी संवेदनशिलता लागते ती मात्र शाळेतचं राहिलेली असते. पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.

मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते.

कारण भारत हा देश हिप्पोक्रसी, धर्माजातीआडच्या बुरख्याआड लपलेल्या छुप्या राजकारणावर चालतो.

कसा तो आता सांगतोच भारताची प्रतिज्ञा काय आहे हो?

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्यानी वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातचं माझे सौख्यं सामावलेले आहे.

चु.भु.दे.घे. मोजुन आठं वाक्याची प्रतिज्ञा आणि त्यातली पण सहा वाक्यं खोटी. व्वा!! क्या बात है. पण हा खोटेपणा ज्यांनी प्रतिज्ञा लिहिली त्यांचा नाहिये, तरं ही प्रतिज्ञा म्हणल्यानंतर साधारण पुढच्या पाच सेकंदांमधे त्याचा अन्वयार्थ विसरुन जाणार्‍यांचा म्हणजे आपला आहे.

१. भारत माझा देश आहे.

आख्ख्या प्रतिज्ञेमधलं पहिलं सत्य वाक्य. झालाय बाबा इथे जन्म, त्यामुळे भारत माझा देश आहेच. आणि हो माझं नशिब चांगलं आहे म्हणुन माझा जन्म भारतामधे झालेला आहे.

२. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

प्रतिज्ञेमधलं बहुतेक सगळ्यात खोटं वाक्य. हे वाक्य म्हणायच्या आधी आपण देशबांधव सोडा पण स्वतःच्या सख्ख्या भावंडांना तरी "बांधव" समजतो काय? साधं एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. शेताचा बांध वितभर इकडचा इकडे झाला म्हणुन पार कुर्‍हाडी सख्ख्या भावाच्या डोक्यात घालणारी जमात ह्याचं माझ्या भारतात अस्तित्वात आहे. तु हिंदु, हा मुस्लिम, तो तिकडे बसलाय तो अजुन कोणीतरी. कसले बोडक्याचे बांधव रे? बरं एक वेळ कमीत कमी एका धर्मियाने त्याच्याचं स्वधर्मियाला तरी "बांधव" म्हणायची तयारी आहे का आपली? हॅट्ट, आपल्या सगळ्यांच्या अंगातल्या हिप्पोक्रसी ला धक्का लागेल की मग. सारे भारतीय माझे बांधव आहेत ह्या वाक्याचं आचरण करायला गेलं की मी ब्राम्हण, मी मराठा, मी अमुक-तमुक अश्या भिंती बांधणार्‍यांची दुकानं बंद होतील की मग. उगाचं कशाला कोणाच्या पोटावर पाय आणायचा? लायकीपेक्षा कागदी सर्टिफिकेटवरच्या जातीउल्लेखाच्या एक दोन शब्दाला जिथे महत्त्व आहे तिथे "बंधुभाव" कसा वाढीस लागावा हो. भीक नं मागता अभिमानानी नोकरी करुन जगणार्‍या तृतीयपंथीयांना सार्वजनिक ठिकाणी काय बंधुभावाची वागणुक मिळते? आपल्याच इशान्य भारतीय बांधवांना आपण नेपाळ्या, चीन्या, गुरखा वगैरे नावानी बोलवतो. केवढा तो बंधुभाव तो, ड्वाळे पाणावले बंधुभावाच्या ओव्हरडोसनी. मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु? होय मला एक बेजबाबदार आणि बंधुभावाचा अभाव असणारा एक भारतीय असल्याची लाज वाटते.

३. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

प्रतिज्ञेमधलं दुसरं आणि शेवटचं सत्यवचन. होय माझा जन्म इथे झालायं आणि माझ्या आईवर आहे तेवढचं माझं प्रेम माझं ह्या देशावर आहे. त्याविषयी वाद नाही.

४. माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

देशाच्या अनेक परंपरा नक्कीचं अभिमानास्पद आहेत. त्याविषयी दुमत नाही. पण त्याबरोबर येणार्‍या कर्मकांडांचा आणि ह्या कर्मकांडांबरोबर येणार्‍या परंपरांचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे का? कितीतरी परंपरा अश्या आहेत की ज्यामुळे लोकांची आयुष्य उध्वस्तं झालीयेत. एकमेकांवर प्रेम असणार्‍या दोन लोकांचा फक्त सजातीय नाहीत, रुढी परंपरा मोडतात म्हणुन जीव घेणारे आणि त्यांच्या घरच्यांना वाळीत टाकणारे खाप पंचायत, गावकीची बैठक बसवणारे पण ह्याचं परंपरांचा भाग आहेत की. बाळगणार का त्यांचा अभिमान? देवदासी, मुरळी वगैरे प्रथा परंपरा कमी झाल्यात, पण ह्या स्त्रियांचं आयुष्याची राखरांगोळी करणार्‍या परंपरा अभिमानास्पद असु शकतात? ही तर फक्तं प्रातिनिधिक उदाहरणं झाली. अश्या शेकडो "अभिमानास्पद" परंपरांच्या नावाखाली हजारो-लाखो लोकं पिचतं आहेतं त्यांचं काय? का परंपरांच्या नावाखाली ही लोकं "कोलॅटरल डॅमेज" ह्या सदराखाली मोडली जावीत? बाकी सणवार आणि त्याच्या अनुषंगानी येणार्‍या परंपरा ह्या आनंद पसरवत असल्यानी अभिमान आहेचं. होय, मला असल्या अंध परंपरांचा विरोध करायची ताकद नसल्याची एक भारतीय म्हणुन लाज वाटते.

५. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी; म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

योग्य परंपरांचा पाईक होण्याला कोणाचाही विरोध नसावा. पण फक्त नुसतं पिढ्यानपिढ्या चालतं आलेल्या अर्थहिन, दुसर्‍या कोणाचं तरी आयुष्य उध्वस्तं करायची ताकद असणार्‍या बिनडोक परंपरा पण अगदी प्रयत्न करुन जपल्या जाव्यात ह्याचं दुख्ख: वाटतं. नेमक्या शब्दात मांडता येतं नाहिये मला, पण योग्य परंपरांचा पाईक एवढा एक बारीकसा बदल केला तर प्रतिज्ञेमधे दोनच्या ऐवजी तीन सत्य वाक्य होउ शकतील. होय, बिनडोक परंपरांचा सारासार विचार नं करता अनुसरण करण्याच्या भारतीय वृत्तीची मला लाज वाटते.

६. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणा किंवा पालकांशी असणारे स्नेहबंध म्हणा सुदैवानी बहुतेक घरांमधे पालकांचा आदर केला जातोचं. पण ह्यालाही लाखो नतद्रष्ट अपवाद आहेतचं की. आई-बापाची इष्टेट नावावर झाली की त्यांची रवानगी थेट वृद्धाश्रमात करणारे लोकही ह्याचं समाजात आहेत. बरं कमीत कमी जे रवानगी वृद्धाश्रमात रवानगी होणार्‍या आई-बापांना कमीत कमी चार भिंती तरी असतात हो. पण चक्कं रस्त्यावर सोडुन देणारे महाभागही इथेचं आहेत. गुरुजन आणि आईवडील सोडुन इतर वडीलधारी माणसं ह्यांना सौजन्यानी वागेन. ह्या वाक्याला फाट्यावर मारणारे शेकडा ९० लोकं सहजं सापडतीलं. मी स्वतः एक-दोन गुर्जी सोडले तर बाकीच्या सर्व गुरुजनांना आदरानीचं वागवतं आलेलो आहे. शाळेपासुनचं हल्ली गुर्जी गुर्जींणींचा उल्लेख थेट अरे तुरे, पंचाक्षरी, चाराक्षरी वगैरे विशेष स्नेहभाव व्यक्त करणारे मा, भे, आ पासुन सुरुवात होणारे शब्द वापरल्याशिवाय होतं नाही. सौजन्याचा अतिरेक हो बाकी काही नाही. वडीलधार्‍यांना बसमधे साधी बसायला जागा नं देणार्‍या लोकांकडुन सौजन्याची आणि चार समजुतीचे शब्द बोलले जातील अशी अपेक्षा करावी का? पुण्यात पी.एम.पी.एम.एल. मधे डाव्या बाजुच्या जागा महिलावर्गासाठी आरक्षित केलेल्या आहेत. ह्या जागेवर बसलेल्या एका अत्यंत वृद्ध व्यक्तीला अत्यंत उद्धट शब्दात उल्लेख करुन जागेवरुन उठवणार्‍या धडधाकट कॉलेज कन्यकाही पाहिलेल्या आहेत. पुरुषवर्गही ह्या आजोबांना बसायला जागा द्यावी असा विचार नं करणारा निघाला. (सन्मानिय अपवाद आहेत. पण फोर लिफ क्लोव्हर हुन दुर्मिळ आहेत.) सौजन्याचा हा कडेलोट अगदी. होय, ह्या सौजन्यहिन आणि आदरहिन समाजाचा एक भाग असल्याची एक भारतीय म्हणुन मला जबरदस्त लाज वाटते.

७. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.

ज्या देशामधे पैसा फेकल्यावर काहीही मिळु शकतं त्या देशाच्या प्रतिज्ञेमधे हे वाक्यं असावं ही प्रचंड हास्यास्पद गोष्ट आहे. हाचं तो देश जिथे देशाशी निष्ठा बाळहुन असणार्‍या लोकांनी जन्मठेपं, काळ्या पाण्यापासुन ते फाशीपर्यंतच्या शि़क्षा भोगल्या त्यांच्याच दृष्टीकोनाला "वाट चुकलेले" वगैरे विशेषणं बहाल केली गेली. चुकीच्या आणि "लोहा गरम है, मार दो हातोडा" छाप लोकांच्यामागे अपप्रचाराला बळी पडुन निष्ठा वाहिल्यानी देशाचं काय वाट्टोळं व्हायचं ते होउन गेलं. ज्या देशामधे कुंपणच शेत खातं त्या देशात निष्ठा हा शब्द उच्चारल्याबद्दल काही वर्षांनी कदाचित फाशी होईल. काळानुरुप त्यामधे माझ्या देशाचा पैसा आणि माझ्या देशबांधवांची संपत्ती ह्यांच्याशी निष्ठा वगैरे बदल सरकारी पातळीवरुन झाले नाहीत ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. निष्ठा ज्याच्यावर वाहायची ती व्यक्ती तेवढी विश्वासु नको? होय, चुकीच्या ठिकाणी निष्ठा वाहण्याच्या वृतीचीमला एक भारतीय म्हणुन लाज वाटते.

८. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे.

=)) ह्या विषयी मी अधिक काही लिहायची गरज आहे का? दुसर्‍याला मुलं झाली म्हणुन तुम्ही किती दिवस आनंद साजरा करणार हे माननिय मुख्यमंत्री फडणवीस ह्यांचं विधान पुरेसं आहे असं मला वाटतं. एकुण तात्पर्य काय? मला भारताची नव्हे तर भारतीय असल्याची लाज वाटते. आणि ह्या वरच्या काही प्रकारात मी स्वतःही सामील आहे. पण आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन. पुनर्जन्म ही संकल्पना खरी असेल तर मला पुढचा जन्म परत भारतात मिळाला तरी हरकत नाही. पण तोपर्यंत ह्या देशातले लोकं सुसंस्कृत झाले असतील हिचं अपेक्षा. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्वं. आणि हो जय हिंद जय भारत.

वाचने 34075 वाचनखूण प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

दहा वर्षे रविवार वगळता अक्षरशः रोज एकदा या प्रमाणात म्हणूनही तीन वाक्यांच्या पुढची प्रतिज्ञा विस्मरणातच गेली होती. मुद्द्यांवर काय बोलणार.. ?

इरसाल 24/02/2015 - 14:43
कोर्टात घ्यायची शपथ पण ह्याच फलाटावर आहे.

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:00
वाईट वाटत असे लेख लिहीनार्यान्बाबत… बर, हि एवढी "अर्थपूर्ण" लेख लिहायची उठाठेव करून साध्य काय केल? जर देशामध्ये काही समस्या आहेत तर त्यावर योग्य शब्दात चर्चा करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा! पण हे सगळ करणं खूपच वेळखाऊ आणि सपक वाटत ना? त्यापेक्षा एखादा मसालेदार लेख पाडला कि कसे बरे वाटत! बाकी भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे, नाही का? १२५ कोटी लोकांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करायला आणि टिकवून ठेवायला असे काय लागते? काही कोटी ओतले कि या गोष्टी लगेच यायला हव्यात! तसाही गेल्या ७० वर्षात आपला समाज बदललाच नाही ना हो? ज्या संपन्न अवस्थेमध्ये या गौरवशाली देशाची निर्मिती झाली आणि निर्मिती बरोबर लगेच ज्या काही घटना घडल्या त्या लोकशाहीला फार पोषक होत्या. तरीपण नाही जमल देशाला आणि समाजाला प्रगती करायला… धिक्कार तर व्हायलाच हवा! पण असो! तुमचे कार्य सुरु ठेवा, अपेक्षा आहे तुमच्या पुनर्जन्मापर्यंत तरी इथले सगळे लोक तुमच्या लेखी "सुसंस्कृत" होतील आणि नाहीच झाले तर लिहा पुन्हा एखादा लेख!! हाय काय नाय काय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकी दुसर्यांनी काय वाचावे काय वाचू नये हे सांगणेसुद्धा "हिप्पोक्रसी" चा भाग नाही का? अर्थात तुम्ही संमती दिली तरच हा! नाहीतर मी अभ्यास वाढवतोच! तुम्ही देशासाठी काही करत नसाल हे माझे म्हणणे नाही पण जाउदे इथे या मुद्यावर चर्चा करून काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघेल असे वाटत नाही… आपले मत व्यक्त केल्यानंतर समोरच्याकडून येणारी प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करावा… बाकी असो! राग नसावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती तर मी स्वागतचं केलं असतं. तुम्ही मग माझ्यामधे नसलेली निष्क्रियता, लेखाचा मसालेदारपणा वगैरे मधे शिरलात. वरुन तुम्ही खाली ब्रुस्वेण ला म्हणताय की,
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?
तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो कॅप्टन, गल्लत होतीये पहिला पूर्ण परिच्छेद लेखाची आणि उद्देशाची टीका केली आहे मी! मसालेदार सुद्धा लेखाला म्हणालो आहे मी! तुम्ही निष्क्रिय आहात हे कुठंच म्हणायचं नव्हते पण या लेखाच्या उद्देशात "मला" अर्थपूर्ण काही दिसले नाही. तेव्हा टीका करण्याचा देखील अधिकार येतोच ना? बाकी तुम्ही दुखावले असाल तर माफी असावी! :)

In reply to by शब्दबम्बाळ

असो. आंतरजालीय जगात जिथे सगळे भास असतात तिथे राग, मत्सर, लोभं माया अश्या भावनांना थारा देउ नये असं आमच्या गुर्देवांनी सांगुन ठेवलं आहे. लिहिते वाचते रहा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बर, आता मला पडलेले काही प्रश्न… १. भारत म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरचा भू-भागाचा एक तुकडा कि आणखी काही… मुळात भारतातील लोकांशिवाय "भारत" हि संज्ञा पूर्ण होऊ शकते का? २. भारतावर प्रेम असणे म्हणजे नेमके काय म्हणता येईल? फक्त या भू-भागावर प्रेम करणे कि इथे असलेल्या अथवा होऊन गेलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि इतिहासावर प्रेम असणे… का अजून वेगळे काही… हे प्रश्न पडण्याचे एक कारण म्हणजे "मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते" हे वाक्य! आता पहा भारताची लाज वाटत नाही म्हणजे नक्की कोणाची? जर भारत हा शब्द भारतीयांशिवाय अपूर्ण असेल तर वरील वाक्याचा अर्थ कसा काढणार? जाणकारांनी प्रकाश टाकावा!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 19:42
ते सोडा हो! वरच्या प्रश्नांवर तुमचे उत्तर अपेक्षित होते. ते कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म कि काय त्यानुसार… तर तुम्ही बोलेनाच काही…

In reply to by शब्दबम्बाळ

बहुगुणी 24/02/2015 - 19:16
शब्दबम्बाळ यांच्या प्रतिसादास -१००, कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या लेखनास +१००! भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्‍यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!

In reply to by बहुगुणी

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:52
धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल, हो तो परिच्छेद उपहासात्मकच आहे. पण त्यातून चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगीर आहे! मला त्यातून हे दाखवायचं होत कि माणूस हा सगळीकडे तसाच असतो. हेवे-दावे, भांडण हे माणसाचे अवगुण सगळीकडे पाहायला मिळतात(इथे सुद्धा काही प्रतिसादांमध्ये तुम्हाला ते दिसतील! :) )… अगदी प्रगत देशातसुद्धा हे चालूच असते. पण म्हणून भावा-भावा मधली भांडणे देशाची प्रातिनिधिक उदाहरण खरच होऊ शकतात का? इथे मी भांडणाचे समर्थन नसून दिलेल्या उदाहरणाचा विरोध करत आहे! मला मान्य आहे भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि देशाच्या सामाजिक परिस्थितीत अजून सुधारणा होईल हा मला विश्वास आहे. आपला देश तरुण आहे नवीन विचार स्वीकारायला तयार असणाऱ्या पिढीचा आहे!
मला कळत नाहीये., कि भारतातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिल्यावर हे सो कॉल्ड देशप्रेमी इतके चवताळून का उठत आहेत? म्हणजे "देशाची स्तुती करणे" हा देशभक्तीचा एकमेव क्रायटेरिया आहे का? भारतात राहायचे असेल तर त्या देशातील सर्व (चांगल्या आणि वाईट पण ) गोष्टींची स्तुती करा आशी पाटी लावलीये का कुठे. ? एखादा व्यक्ती जर देशातील वाईट प्रथा आपल्याला आवडत नाही आणि त्याचमुळे मला त्याची लाज वाटते असे म्हणत असेल तर त्यात काय बिघडले? वरील लेखामध्ये कोणतीही खोटी किंवा कल्पनेतील गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. हे सर्व वास्तव आहे. आणि त्याची जाण एखाद्याने करून दिल्यावर त्या गोष्टी बदलण्यापेक्षा, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी चांगल्या आहेत त्यावर चर्चा करा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्या वाईट प्रवृत्तींना समर्थन करणे. मान्य आहे आपल्या देशावर किंवा लोकांवर असे लिहिल्यावर कोणालाही वाईट वाटेल. पण सत्य हे नेहमी कडू असते. आणि मला खात्री आहे कि कॅप्टन जॅक स्पॅरो यांना देखील हा लेख लिहिताना काय आनंदाच्या उकळ्या फुटत नसणार. माझा हा लेख लिहिताना देखील मी काय या सर्व गोष्टी खूप आनंदाने लिहित होतो असे नाही. पण यातून बदल घडावा आणि एकदा तरी "मेरा भारत महान" हे मनापासून म्हणल्याचे आणि तेच सत्य असल्याचे समाधान याच जन्मात मिळावे एवढीच माफक अपेक्षा. पुनर्जन्मावर विश्वास नसलेला बाप्पू.

In reply to by बाप्पू

अगदी सहमत.........देशात राहणे म्हणजे देशाची आंधळी स्तुतिस्तोत्रे गाणे इतकेच ज्यांच्या बुद्धीला झेपते त्यांना बाकी काय कळणार म्हणा.

In reply to by बॅटमॅन

"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का? वरच्या लेखात 'सारे भारतीय बांधव आहेत' हे कसे खोटे आहे हे सांगितले आहे. जणू तेच सिध्द करायची धडपड दिसते तुमची! आणि परत गळे काढायचे एकमेकांना आदर दिला पाहिजे वगैरे! पहा जरा स्वतःकडे, आपल्या मताचा विरोध करणारा आपला शत्रू आहे असेच जणू तुम्ही वागत आहात! बर मी हे हि म्हणालो नाही कि भारत परिपूर्ण आहे. पण "तू चूक आहेस" हे ओरडून सांगण्यापेक्षा सहजपणे ती सवय मोडता कशी येईल यावर लक्ष दिले तरच बदल घडू शकतो या विचाराचा मी आहे! आपापला दृष्टीकोन दुसर काय…

In reply to by शब्दबम्बाळ

तुमचा आयडी बाकी स्वतःच्या प्रतिसादातून सिद्ध करताहात. मणोरंजणाबद्दल अनेक आभार! दुसर्‍यांना उपदेश करण्याअगोदर स्वतःकडे बघा असा एक नम्र सल्ला. या शब्दजंजाळात जाईलच असे नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:14
चला नम्रपणे बोललात आनंद झाला! :) मी आंतरजालावर कोणाचा अपमान करून स्वताची गोष्ट सिध्द करण्याचा प्रयास करत नाही. मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!
हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 01:29
एकंदरीत, व्यक्तिगत टीका हा आपला आवडता प्रांत दिसतो त्यामुळे बोलणे शक्य नाही… आपण म्हणाल तीच पूर्व! आपला सल्ल्याचा विचार करेन!

In reply to by शब्दबम्बाळ

कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक टिका? जरा हायलाईट करुन मांडा की. जरा मला पण कळु दे व्यक्तीगत टिका कशी कराय्ची ते. माझा लेख आणि ब्रुस्वेण चे प्रतिसाद वाचा ७००-८०० वेळा...थोडक्यात अभ्यास आणि उजळणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 16:01
मी इथे उत्तर देऊन काही साध्य होणार नाही पुन्हा शब्दाला शब्द वाढणार आणि तीन चार लोकांचा वेळ उगाच वाया जाणार! त्यापेक्षा वर काही प्रश्न विचारले आहेत त्यावर चर्चा करूया का? :)
अहो, जी गोष्ट अगोदरच आपल्याकडे आहे किंवा सहज साध्य आहे अश्या गोष्टींसाठी प्रतिज्ञा करायची गरजच नसते ! हाती नसलेल्या, कठीण साध्य असलेल्या आणि काहीतरी स्वार्थत्याग/पराक्रम करून मिळणार्‍या गोष्टींसाठीच प्रतिज्ञेची गरज असते. अर्थात, हे सुद्धा खरेच की, अर्थ समजून न घेता नुसती प्रतिज्ञा करण्याने काही फरक पडत नाही... पण म्हणतात ना की "आशा एक विचित्र गोष्ट असते"... सार्वजनिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञांच्या मागे "जमावातले निदान काही लोक तरी त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून उमजून, तिने प्रभावित होऊन, ती आपल्या जीवनात खरी करण्यासाठी धडपड करतील." हाच दुर्दम्य आशावाद असतो. कुठल्याही संघटनेच्या/संस्थेच्या (organization, देश ही एक संघटनाच असते) बांधणीत मानचिन्हे, गीते, समारंभ, प्रथा, (symbols, songs, ceremonies, norms) इत्यादींची मोठी आवश्यकता असते. मात्र या सर्वांचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम त्या संस्थेच्या चालकांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असतो... आणि भारत इथेच मार खात आला आहे.

अवतार 24/02/2015 - 23:47
Nationalism is imperialism in disguise राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे. राष्ट्रातील ज्या घटकांकडे गमावण्यासारखे बरेच काही असते त्यांच्या नजरेतून राष्ट्रवाद व्यवहार्य ठरतो. ज्या घटकांकडे गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या डोक्यांत राष्ट्रवाद भिनवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या नावावर लढायचे नेमके कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सहज सुचते तेच घटक राष्ट्रवादाचा प्रचार करत असतात.
मला मायभूमीच नाही
हे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.

In reply to by अवतार

सांगलीचा भडंग 26/02/2015 - 00:52
राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे . हे चुकीचे वाटते कसेही असले तरी राष्ट्रवाद महत्वाचा वाटतो कारण फक्त " एका " देशातील लोकांनी राष्ट्रवाद सोडून दिला ताल चालणार नाही . एकाच वेळी जगातील सगळे देश आपल्या सीमा उघड्या करतील ( हे कधीच घडणार नाही ) तेव्वाच राष्ट्रवादाची गरज असणार नाही .
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.

In reply to by arunjoshi123

ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.