मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक रात्र फुटपाथवरील

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

एक रात्र फुटपाथवरील

पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “... अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा...” “बरं का रे शशी,” मला आपल्या बोलण्यात सामावून घेताना मित्राचे वडील म्हणाले, “तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, येणारही नाही पण या रात्रीची आठवण ठेवा. ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या...” ती रात्र संपली. पहाटेच्या एसटीतून प्रवास करत आम्ही योग्य ठिकाणी पोहोचलो. आयुष्याच्या पुढल्या प्रवासात पुन्हा असे फुटपाथवर हात उशाला करून पडणे वाट्याला आले नाही. मऊ आरामदायक गाद्या व सुखवस्तू जीवनात त्या रात्रीच्या आठवण मागे पडली. पण अचानक कुठे असे फुटपाथवरील कोणाचे देह पाहिले की त्या रात्रीचा आठवण येते... त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदलेल. असा संदेश मला आयुष्यात कामाला आला...

वाचने 8774 वाचनखूण प्रतिक्रिया 27

गणपा 21/09/2014 - 12:39
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या..
मित्राच्या बाबांचे अनुभवी बोल आवडले.

त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. पण खरंच अशी वेळ का आली?

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 21/09/2014 - 12:51
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे. कुठलं ठिकाण ते त्यांनी लिहिलं नाही. पण मुंबई जरी असली तरी तेव्हाची अन आत्ताची मुंबई बराच फरक असणार. हल्ली आसतात तशी २४ तास सेवा पुरवणारी लॉजेस तेव्हा नसावीत. (किंवा ते ज्या भागात होते तिथे तरी नसावीत.)

In reply to by गणपा

शशिकांत ओक 21/09/2014 - 17:32
आधीच्या प्रवासात बस बंद पडल्याने काही बाही करत रत्नागिरी ला पोहोचलो तेंव्हा शेवटची बस हुकली होती. म्हणून ती वेळ आली...

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 21/09/2014 - 21:30
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत एस्टी स्टँडजवळच्या कोणाचंही दार ठोठावलं असतंत तर पिठलंभात टाकला असतान आणि ओसरीत झोपायची सोय केली असतीन. असो. पण अनुभवाच्या पोतडीत चांगली भर पडली हे खरं.

In reply to by मिसळपाव

शशिकांत ओक 21/09/2014 - 22:51
कोणाचेही कोकणातील दार ठोठवले तर जेवण घालायचे जमले असते? पुणेरी म्हणून हिणवले जाणाऱ्या व्यक्ति कोकणातील मुल वाले साधा पत्ता विचारला तर हुडूत्त करतात असा अनेकांचे अनुभव आहेत!

In reply to by शशिकांत ओक

मिसळपाव 22/09/2014 - 02:22
हो. पुणेरी हिणवले जाणारे..पत्ता विचारला... वगैरे जाउंद्या. पण हो, स्टँडजवळच्या कोणीहि तुम्हाला उपाशी राहू दिले नसते. मधल्या आळीतल्या माझ्या आजी-आजोबांकडे आला असतात तर नक्किच नाहि पण ते तिथे रहात होते म्हणून त्यांचं नाव घेतलं एव्हढंच. आळीतल्या कोणाकडेहि गेला असतात तरी हाच प्रातिनिधिक अनुभव आला असता.

काउबॉय 22/09/2014 - 16:06
अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा
अशा अवस्थेत मनात विचारच येत नसतात. प्रयत्न करुनही.

vikramaditya 22/09/2014 - 19:50
काही प्रसंग, घटना आयुष्यात अचानक घडतात आणि काही अनुभव देवुन जातात. काही गोष्टी शिकवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करत बसण्यात कधी कधी अर्थ नसतो. कारण तो अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. असो.

असंका 23/09/2014 - 11:24
त्या रात्रीतले अजून काही अनुभव सांगा ना इथे! वय काय होते आपले त्यावेळी? एस टी स्टँड वगैरे नसायचे का? कारण एस टी स्टँडवर पडायला तशी मजा येते..अनेक लोक दिसतात! कोण कसे, कोण कसे!! (रत्नागिरीत आजही रात्रीच्या वेळी एस टी स्टँडवर फार वर्दळ नस्ते हे खरं, पण आतातरी तिथे झोपायला लागणं हे एवढं त्रासदायक वाटत नाही. तेव्हा कसं होतं, हे सांगाल का? )

आदिजोशी 23/09/2014 - 16:02
फुटपाथवर का झोपलात हे कळलं नाही. स्टँडवर जाऊन झोपायचं की. मजा येते. आम्ही झोपलो आहे कैक वेळा ट्रेकिंगच्या वेळी - स्टँडवर, प्लॅटफॉर्मवर, देवळात, लोकांच्या पडवीत, कधी नुसतंच डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, वगैरे वगैरे.

In reply to by आदिजोशी

शशिकांत ओक 27/09/2014 - 10:40
त्या जागा आधी बळकावल्या गेल्या होत्या. ५० वर्षा पुर्वी घडलेल्या एका घटनेवर आत्ता असे करायला हवे होते असे भाष्य करायच्या आधी त्या रात्रीने माझ्या मनावर काय प्रभाव टाकला ते महत्वाचे. असो.

प्रसाद१९७१ 23/09/2014 - 16:27
मला लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. मी सुद्धा एक रात्र रेल्वे फलाटावर काढली आहे ( १५ -२० वर्षा पूर्वी गुजराथ मधे पूर आला होता तेंव्हा ). बर्‍याच लोकांनी असे काहीतरी अनुभवलेच असेल. ह्या एकदम "विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदले" एव्ह्डे मोठे तत्वज्ञान कळण्यासारखे काय आहे? आणि एक रात्र बस, रेल्वे, विमान चुकले म्हणुन रस्त्यावर, फलाट अश्या ठीकाणी काढण्यात विषेश काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

शशिकांत ओक 23/09/2014 - 22:03
विक्रमादित्य यांनी विचार व्यक्त केलेत ते संक्षेपाने योग्य वाटतात.

In reply to by विलासराव

संदीप डांगे 27/09/2014 - 10:41
आजकाल पादचारी मार्ग झोपायलासुद्धा मिळत नाहीत. मी फोटो काढला तेंव्हा ह्या बाई नुकत्याच उठल्या होत्या. फोटोचा उद्देशही तोच होता. पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे आता रस्ता दुभाजक. पुढे काय?

In reply to by संदीप डांगे

विलासराव 27/09/2014 - 10:48
पुढे काय? माहीत नाही पण कदाचीत मंगळावरील फुटपाथवर. मी गोवंडीजवळ दोन रेल्वे ट्रॅकमधे झोपडी बांधुन रहात असलेले कुटुंब पाहीले होते, तेही १० वर्षापुर्वी.