मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परिघ परिक्रमा

वडापाव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं? एखादं स्थळ, एखादी कथा, एखादं गाणं, यांची लज्जत पहिल्यांदा चाखतानाचा आलेला अनुभव आपल्या मनात घर करून बसतो. चांगला असो वा वाईट. ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). थोडक्यात काय तर आपण सतत अनपेक्षिताची अपेक्षा ठेवून असतो. जिथे सगळंच अपेक्षित असतं, तिथे उत्साहाचं अस्तित्व नसतं. सकाळी घराबाहेर पडून, दिवसभर बाहेर विविध अनुभव घेऊन रात्री घरी परतायची वेळ येते तेव्हा रोजचा वरणभातच घशाखाली ढोसण्याच्या कल्पनेने कितीसा उत्साह जागा होतो? तेच जर मध्येच आईचा फोन आला आणि 'लवकर ये आज तुझ्या आवडीचा बेत आहे' असं तिनं म्हटलं तर पावलं कशी झपझप पुढे टाकली जातात!! तत्त्वज्ञानावरच्या गप्पा सुरू झाल्या की सिद्धत्वाबद्दल हमखास चर्चा होते. जो सिद्ध होतो त्याला सर्वस्वाचा साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे त्याला कसलीच इच्छा आकांक्षा उरत नाही, कसलं बंधन नाही, कसलीही भिती नाही. त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. तो पूर्णत्वाला पोचतो. पूर्णत्वाला पोचला म्हणजे आता त्याच्याकडे करण्यासारखं काही राहिलं नाही. दुरूस्त करण्यासाठी उणीवच राहिली नाही. आणि म्हणूनच पूर्णत्वाला शून्यत्वही म्हणायचं. म्हणजे स्वतःच्या मूळपदाशी तो सिद्ध माणूस पोचलेला असतो. आयुष्यभर झक मारून पुन्हा 'जैसे थे'च व्हावं लागणार असेल, तेच जर जगण्यामागचं उद्दिष्ट असेल, तर जगण्याची उमेद का राहील एखाद्याला? आपलं आयुष्य म्हणजे शून्यत्वापासून सुरूवात करून पुन्हा शून्यत्वाकडेच नेणारं एक वर्तुळ असेल, आणि आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. आयुष्य म्हणजे पंचतत्त्वांपासून आकार घेऊन, आपल्या वाटणीचे सगळे अनुभव जगून घेऊन, त्या अनुभवांचं गाठोडं बरोबर घेऊन आपण पुन्हा पंचतत्त्वांत विलीन व्हायचं असतं. निर्जीव शक्तीचं सजीव शक्तीत रूपांतर होऊन पुन्हा निर्जीव शक्तीत रूपांतर होतं. निर्मिती होते ती अनुभवांची. यात शून्यत्व आणि पूर्णत्वाची काहीच भूमिका मला तरी दिसत नाही. - कौस्तुभ अनिल पेंढारकर

वाचने 4638 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 05/09/2014 - 13:00
असेच म्हणतो. जीवनोन्नतीचे ६ सोपान इ.इ. आठवले.

सूड 05/09/2014 - 15:10
>>आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय. हे लिखाण म्हणून लिहीलं असेल तर ठीकाय!! जर खरोखरच मनात असे विचार असतील तर या विचारांना थोडा स्वल्पविराम देऊन मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गजबजाटात थोडं स्वत:ला ढकलून द्यावं. (अर्थात हे माझं मत, व्यक्तिगणिक हे वेगळं असू शकतं).

प्यारे१ 05/09/2014 - 17:31
चान चान! बाकी स्पा नं 'अच्चा' न वापरल्याबद्दल स्पाला अजगराचा एक सौम्य बाईट.

इथे लेखन संपूर्ण फसलंय. कारण शून्यत्व किंवा पूर्णत्व याचा काहीच अनुभव नाही! त्यामुळे पहिल्या लेखावरच मी म्हटलं होतं :
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू देखिल आहे. मला एक नवी गोष्ट समजलीये ती मी तुमच्याशी शेअर करतोयं. या परिस्थितीत सगळ्यांना ती समजेल किंवा कुणालाही समजणार नाही. अशा वेळी माझी विचारसरणी जर अनुभवातून आलेली असेल, तर दुसर्‍याचं समजणं किंवा न समजणं हा माझ्या आकलनाचा भाग राहात नाही.
आणि असं म्हटलं होतं की :
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी म्हणजे तिचा भाव, अभिव्यक्तीपेक्षा `विचारणा' असा हवा.
आता तिथे (आणि सगळीकडेच), (निव्वळ) कॉपी पेस्ट मारणारे, आणि पीएचडी करायची मनीषा असलेले धुरंधर; तुझी विषय `सोपा करण्याची हातोटी' कितपत आहे ते जाणतीलंच आणि त्यावर स्मायली टाकायला तुला काही समजायला पाहिजे असं कुठे आहे?

वडापाव 05/09/2014 - 18:46
त्या टोमण्याखाली त्यांनी जे दिलं होतं ते मला मजेशीर आणि चपखल वाटलं म्हणून मी हसलो. टोमण्यावर नाही. इतर कुठल्या शेरेबाजीत भागघेण्यात मला रस नाही. बाकी माझ्या या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद मला खूप आवडलाय. हसत सुटलो वाचल्या वाचल्या.

कवितानागेश 05/09/2014 - 19:01
मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.>> परत परत हेच केलं तर तेच सगळं चक्र सुरु आहे... वगरै वगरै.... बट थिन्क डिफरन्ट... एखाद्यावेळेस आपणच त्या अजगराला गिळलं तर??

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 05/09/2014 - 19:56
दुध, उंदीर, मिपावरचे भन्नाट धागे वगैरे गिळण्याचा तुला सराव आहे...आम्हि पामरांनी काय करावं ?? ;)

अर्धवटराव 05/09/2014 - 19:53
प्रचंड आवडलं. स्वतः खयाली पुलाव पकवुन भुकेल्या कटकटीचे ढोल वाजवायचे व त्यातुन इतरांना शांततेचे संगीत ऐकवण्याचा अट्टहास धरायचा त्यापेक्षा अजगराशी आमनेसामने खेळणं कधिही उत्तम. जबराट लेख.

>>>> ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility). Law of diminishing marginal utility पुन्हा एकवार वाचावा. तो एखाद्या वस्तूचा संग्रह जसजसा आपल्याकडे वाढत जातो तसतशी त्याच्या प्रत्येक युनिटचे मुल्य आपल्यासाठी कमी कमी होत जाते. ह्याला समर्पक उदाहरण दिले आहे की भुकेल्या माणसाला एक सफरचंद दिले तर त्याला त्याचे उपयुक्तता मुल्य (Utility value) सर्वात जास्त असते. त्या भुकेल्या माणसाची भूक भागते. दुसरे सफरचंद मिळाल्यावर भूक शिल्लक असेल तर तो ते खातो पण जरा कमी आतुरतेने कारण पहिल्या सफरचंदाने त्याची भूक अंशत: भागविलेली असते. अशा प्रकारे जसजशी जास्तीची सफरचंद मिळत जातील त्यांचे उपयुक्तता मुल्य कमी कमी होत जाते. शेवटी भूक भागून सफरचंद नकोशी झाली की माणूस त्या सफरचंदाने दुसर्‍या व्यक्ती बरोबर ते सफरचंद एकमेकांकडे फेकून झेलण्याचा खेळ सुरु करतो. म्हणजे त्या शेवटच्या सफरचंदाचे उपयुक्तता मुल्य शून्य झालेले असते. ह्याला Law of diminishing marginal utility असे नांव आहे. ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते. परीक्षेत Law of diminishing marginal utility सोदाहरण स्पष्ट करताना हा अपवाद लिहीला नाही तर मार्क कापले जातात. पूर्ण मिळत नाहीत. (निदान आमच्यावेळी तरी तसे होते.) कांही कांही प्रवासाबाबतीत तर प्रत्यक्ष गंतव्य स्थानापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच जास्त विस्मयकारक आणि आनंददायी असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

आदूबाळ 08/09/2014 - 14:51
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस माणूस ह्यांचे नाते आहे. पैसा कितीही कमविला तरी कंजूस माणसास त्याची उपयुक्तता कमी होताना भासत नाही. कांही प्रमाणात वाढताना दिसते.
मिडास राजाची गोष्ट? DMU ला (पर्यायाने law of demand ला) खराखुरा अपवाद नाही असं माझं मत आहे.