मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्युअरसोतम - ला - देस्पांद

ज्ञानव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो. पु.लनच्याच असामी असामी मध्ये एक वाक्य आहे "टॅकसी ड्रायव्हर सरदारजी असल्याने केव्हा फेट्यात राख घालून निघून जाईल हि भीती होती" किंवा मुबैकर पुणेकर की नागपूरकर मध्ये घरातली बोली आणि व्यासपीठावरील बोली हा फरक दाखवणारा उतारा. मी गडबडा लोळून हसलोय ह्या सर्वांवर...आपण सगळेच हसलोय मनमुराद...अशी अनेक वाक्ये जी वाचून किंवा पु.लंच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकून लक्षात राहिलेली आहेत. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील. माझी एक विनंती आहे तुम्हाला पु.लची जी वाक्य आवडली आहेत ती प्रतिसादरूपाने इथे मांडा. कुणी कधीही केव्हाही हा धागा वाचला तर त्याला एक निर्भेळ, निर्मळ आनंद, समाधान मिळावे आणि धागा अजरामर सुरूच राहावा. धन्यवाद

वाचने 39902 वाचनखूण प्रतिक्रिया 92

शेखर काळे 24/12/2013 - 09:37
छे छे ... छे हां छे .. बेन्सन जाॅन्सन कंपनीमधे सर्वीस करे छे.. - असामी असा मी.

असा मी असामी 24/12/2013 - 10:23
शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच

असा मी असामी 24/12/2013 - 10:40
गोविंदा डबल घोडा घे... "कस आहे हो अंग?" - "गोर"असे म्हणून हि एवढ्यांदा ओरडली कि मी ज्या गोऱ्या अंगाकडे पाहत होतो ते देखील दचकल. लुगड हे अंग झाकण्या साठी असते असे माझी समजूत. आता लुगड्यालाही अंग असते हे मला काय ठावूक?

In reply to by असा मी असामी

आदूबाळ 24/12/2013 - 12:52
गोविंदा नाय हो.
गजानन, डबल घोडा काढ...
त्यावरून आठवलं - आमच्या शाळेत "गजानन" नाव असलेल्या एका मास्तरांचं टोपणनाव "डबल घोडा" याचमुळे पडलं होतं...

प्रभाकर पेठकर 24/12/2013 - 10:48
'कॉफीत कॉफिन की काय नांवाचे विषारी द्रव्य असते.' मास्तर. एवढी चुकीची माहिती एवढया आत्मविश्वासाने आणखी कोण देणार? 'कॉफीन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटीका' कथा कथन 'म्हैस'.

In reply to by असा मी असामी

प्रभाकर पेठकर 24/12/2013 - 12:29
मी सुद्धा तुमच्या प्रतिसादानंतर पुन्हा एकदा वाचले. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेंद्र मेहेंदळे 13/01/2014 - 13:35
ओरिजिनल वाक्य असे आहे "चहात कॅफीन कि काय नांवाचे विषारी द्रव्य असते" हा विनोद कॅफीन/कॉफीन वर नसुन मास्तरांनी केलेल्या टॅनिन /कॉफीन च्या घोळावर आहे

अनिरुद्ध प 24/12/2013 - 12:44
ठिक आहे, अहो ठिक आहे काय? प्लान तर मोकळाच दिसतोय्?सोडता काय अर्ध्या तिकिटात? नाही जमणार, अहो चार आण्यात जमवा? चार आण्यात जमवायला तो काय डोंबार्याचा खेळ आहे? अहो तो बरा,तो आधी खेळ दाखवतो मग थाळी फिरवतो,तुम्ही तसे करा 'पुढच्या कशीया त्यजु पदाला',जमले फक्कड तर थाळीत चार आणे जास्त टाकीन. (पु लं कथाकथन-अंतु बर्वा.)

आदूबाळ 24/12/2013 - 12:55
"बाबा रे, तुझं जग वेगळं आणि माझं जग वेगळं"

पेस्तन काका 24/12/2013 - 13:20
दातांचा बराचसा आण्णु गोगट्या झाला होता. आण्णु गोगट्या होणे म्हणजे पडणे. हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णु गोगटे वकील गेली कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपालटिच्या निवडणुकीत पडत आलेला आहे. तेव्हापासुन विहिरित पोहरा पडला तरी पोहर्याचा अण्णु झाला काय रे अस अंतू ओरडतो. - अंतू बरवा

मुक्त विहारि 24/12/2013 - 13:34
तो बुवाजी तर नुसताच चहा पीत आहे. (असा मी असामी.... कधीही, केंव्हाही आणि कुठूनही वाचायला सुरुवात करावी....)

अमेय६३७७ 24/12/2013 - 13:43
चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली, दारचा हापूस त्या घटकेपासून आजपर्यंत मोहरला नाही. शेकड्यान आंबा घेतलाय एकेकाळी त्या आंब्याचा...भाग्य कुठल्या वाटेने जाते ते बघा

एम.जी. 24/12/2013 - 14:31
तुकाराम आणि रामदास समकालीन. पण तुकारामांना त्रास झाला तसा रामदासांना झाला नाही. त्यांच्या तालमी होत्या..... [ मराठी वांग्मयाचा गाळीव इतिहास ]

फारएन्ड 24/12/2013 - 14:48
"त्याकाळी आम्ही मॅट्रिकला बसत होतो" (एक पुस्तक परत परत वाचताना सापडलेला 'जेम') :)

बॅटमॅन 24/12/2013 - 15:30
ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या भागात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता इथे मराठी बोलली जाण्याचे कारण म्हणजे इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे होय! मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवायचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बर्‍हाणपुरी प्राण सोडला असे म्हणतात. शिवकालीन मराठ्यांनीही तत्कालीन उर्दू-मराठी अपशब्दकोशातील शिव्यांची उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनांस हैराण केले. पुढे पेशवाई आल्यावर वकीलसाहेब दरबारात तर वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलावयास लागल्यावर "हल्ला चालेल, पण उर्दू आवरा" अशा मागण्या आल्या. पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवायचा एक निकराचा प्रयत्न केला. पण दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमानंतरदेखील ब्याट, ब्यांक, गूड ह्याबिट्स यांड ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी परतला. तात्पर्य, महाराष्ट्रातील लोकांना मराठीखेरीज दुसरी भाषा येत नसल्याने इथली भाषा मराठी आहे.

कौस्तुभ.दीक्षित 24/12/2013 - 16:10
आता हे समस्त कुलकर्णी कुटुंब आणि त्यांचे दासदासी आपापली पोटे कुठल्या सिस्टिमने साफ करतात याचे ज्ञान मला कशाला ? तरीही मी 'अरे वा, छान केलंस' वगैरे शिफारशी दिल्या
" एका हौदाला हनम्या सोलुन काढीन दोन तोट्या आहेत त्यातली अरे तुझ्या बापाने दीर्घ काढली होती का रे तिखटातील ती ति आँ ति र्‍हस्व शंभर वेळा लिही तिखट एका तोटीतुन जन्या पुढे ये हात कर पुढे तुम्ही पाट्या पाडा रे हा गोंद्या कान धर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकारात लपवुन काय खाते आहेस आँ पस्तीस मिनिटे तो डुक्कर गाढवाशी बोलतोय बघतोय मी आँ हा वीस सेकंदात रिकामा होतो दुसरा नळ सोडला तर ऐ रेड्या उभा रहा उभा रहा बाकावर नाडी काय चोखताय आँ बाप उपाशी घालतो तुझा तर दोन तास पंचेचाळीस मिनीटे अरे अरे अरे हे शुध्दलेखन काढलयस की हगलायस पाटीवर आँ पुन्हा काढ आज वागळ्याण्च्या विन्या का नाही आला बसा खाली काही नको जायला त्याच्या घरी आणायला उठले सगळे मर्तिकाला निघाल्यासारखे बसा तर तो हौद दोन तास पंचेचाळीस मिनीटात भरतो " ;)

मैत्र 24/12/2013 - 22:02
ऑल टाईम फेव्हरिट डायवर कोन हाय! ए शिवराम गोविंद, नाव सांग. "गंपा नाना भोरीकर.. " "कोण कर?" "भोहो रीही कह र.." "मु.पो.किंकवडी" "किंही कह वह डी' "आणखी एक लिवा. -- आक्षरास हासू नये." एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे याला 'वीट' येणे का म्हणतात ते मला त्या दिवशी समजलं. आजोबा तुमचा आमचा संबंध नाही. उगाच देवळात उडी मारून घंटा वाजवताना धोतराचा काष्टा सुटल्यावर होतो तसा चेहरा करू नका. माझ्या ओरडण्याने फक्त गाढव तेवढं दचकलं. उगाच 'बाजरीवरील कीड' किंवा 'दुसरे बाजीराव यांचे शुद्धलेखन' असल्या व्याख्यानांना हजेरी लावावी. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्याला गंभीर आवाजात - "या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे." असं म्हणावं.

In reply to by बॅटमॅन

चाणक्य 25/12/2013 - 07:11
बघू लायसन्स बघू हवालदाराने ते अडीच यार्ड लिहिलं होतं नाना फडणविस अशी सही करून आलो अर्जुनाला कसाला पाटवलं? कंडम मानुस हरचन पालवाची बिजागिरी गंजून खलास...हॅ हॅ (मास्टरपीस)

In reply to by चाणक्य

सूड 26/12/2013 - 14:41
हल्ली कालेजात काऽऽऽय पट्टेवालेसुद्धा जातात ह्हो!! रक्त? तुमचा आर्डरली थुंकलाय पान खाऊन पचापच. म्यानरलेस माणूस!! माझ्या धोतरावरदेखील शिंतोडे उडालेत.

In reply to by बॅटमॅन

>>म्हशीस चालते का हो तुमची होमिपदी???? न चालायला काय झालंय? पथ्य पाळलंनीत म्हणजे झालं, काय हो डाक्टर? बाकी तुमच्या होमिपदीची पथ्य बाकीं कडक हो !! काफीचं नि तुमचं येवढं का हो वाकडं?

आनन्दिता 25/12/2013 - 01:21
---पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं, "कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें ,माइकचं बोंडूक जरा वर उचल म्हणुन!, बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे शिंचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला. स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः ! हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले.

अर्धवटराव 25/12/2013 - 02:21
तुम्हाला कोण व्हायचय -अस्सल मुंबैकर भुताला भीत नाहि एव्हढा हिंदीला भितो. परोपकारी गंपू -हेड क्लर्क गुरासारखा ओरडत होता -व्हॉट एल्स कॅन दॅट मुर्ख फेलो से - द्वैभाषीक इंग्रजी बोलण्यात गंपूचा हात धरणं अशक्य आहे. -धीस इज बिकॉज ऑफ मालिश यु आर सीइंग लाइट ऑफ द डे - नेहेमीच्या गिर्‍हाइकाला बनवु नका मिस्टर - एक वेळ दत्ताच्या सभोवती कुत्री नसतील पण गंपूच्या सायकलवर स्वतःखेरीज इतरांच्या दोन चार असणार नाहि असं होणार नाहि. पाळीव प्राणि आणि पक्षी - हे एक अत्यंत निर्बुद्ध जनावर आहे...हे म्हणजे... मांजर...मॅड्ड्म नव्हे -माझी अशी संभावना केलीत तर विदर्भाची मनं दुखतील

चौकटराजा 25/12/2013 - 04:35
माझा वाढदिवस ७ नोव्हे तर पुलंचा ८ नोव्हे. मी त्याना हटकून ७ तारखेलाच फोन करून आशिर्वाद मागायचो. ८ ला फोन लागणार नाही असे कारण सांगून ७ लाच शुभेच्छा द्यायचो. एका ७ ला असाच नमस्कार केला असता ते पटकन म्हणाले " नमस्कार कसला करता आशीर्वाद द्या तुम्ही माझ्यापेक्षा एका दिवसाने मोठे ना ?" असे लॉजिक त्यानाच सुचू शकते.

खटपट्या 25/12/2013 - 08:31
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी परवा मला म्हणाली, 'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना- इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' ------------------------------- एकदा तुम्ही मला छान दिसतेस म्हणालांत पण 'समोरच्या सरोजबाईसारखी' हे शब्द जोडून.. --------------------------- मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त. इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे. आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे. बोलणे हा इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार करतात उपचारांना मात्र जागा नाही. -------------------------------- अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा? एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी? मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा! तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा ----------------------------------------------- www.puladeshpande.net वरून साभार

देव मासा 26/12/2013 - 00:32
मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे

llपुण्याचे पेशवेll 26/12/2013 - 09:41
" ओ गोब्राम्हणप्रतिपालक, उठा. सांगा सातव्या हेन्रीने काय केले? " भणगे मास्तर. आदल्या दिवसाच्या नाटकाच्या तारेत असल्याने "आठव्या हेन्रीला जन्म दिला" असे उत्तर रुबाबात दिले. "पाटला, उठ थोबाड रंगव महाराजांचे" - भणगे मास्तर

विजुभाऊ 26/12/2013 - 10:54
" गड देखील आला नव्हता सिंह मुर्दाडासारखा जिवंत होता. मधल्यामध्ये माझी विडी मात्र विझली होती." " म्हातारा गनीम खोखत होता..........."

शित्रेउमेश 26/12/2013 - 11:28
इथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता. - सखाराम गटणे..................
मी मधूबरोबर हॅगिंग गार्डनला फिरायला गेली होती, येताना बस ने आलो, मधू पाकिट विसरला, तरी बरं माझ्याकडे दोन रूपये होते. येताना कोथिंबीर घेऊन आली. दोन रूपयांत इतकीशीच कोथिंबीर कशी आली म्हणून आई मला ओरडली. "प्रेमाच्या जगात वावरणा-यांना व्यवहाराची भाषा शिकवणारे जग दूष्ट आहे" :काही वास-या, व्यक्ती आणि वल्ली

म्हैस 26/12/2013 - 14:28
काही म्हणा पण आम्ही सातारा कोल्हापूर साईड चे असल्यामुळे म्हणा कि काजून काही मला तरी पु लं चे विनोद कधी आवडले नहित. काही लेख , काही गोष्टी नक्कीच आवडल्यात पण सगळ्या नहि. त्या मानाने मिरासदार , शंकर पाटील, अत्रे ह्यांचे विनोदी पुस्तके जास्त आवडली आहेत, पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात . सहज घडणारे विनोद नाही वाटत . ओढून ताणून केलेले विनोद वाटतात

In reply to by म्हैस

बॅटमॅन 26/12/2013 - 14:34
आपल्या मताचा आदर आहेच. पण मी स्वतः मिरजेचा आहे ('जीवनाची' पहिली १७-१८ वर्षे मिरजेस काढलेली आहेत) अन पुणेमुंबैला उच्चासनावर ठेवून रेस्टॉफ म्हाराष्ट्रावर पुलंनी हिणकस विनोद केलेत असं कधीच त्यांच्या शैलीतून जाणवलं नाही. असो.

In reply to by बॅटमॅन

लॉरी टांगटूंगकर 26/12/2013 - 16:29
ब्याट्याशी सहमत, सातारा + कोल्हापूरचा याच्याशी काहीही संबंध नसावा. दोन्ही शहरात पुरेसा काळ राहीलो आहे. इथले बरेच मित्र पुलंचे चाहते आहेत. मी पण अर्थातच आहे. बाकी वैयक्तीक मत ठेवायचा अधीकार तुम्हाला आहेच.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

विजुभाऊ 29/12/2013 - 01:33
ब्याट्याशी सहमत. सातारा मिरज कोल्हापूर सांगली कराड या बहुतेक गावात रहिलोय. पुलंचे विनोद कधी पुण्यामुम्बईला उच्चासनावर ठेवून लिहीलेत आसे वाटले नाही. य उलट पुलांची भाषेवर फार उत्तम कमांड होती. त्यानी " ती फुलराणी" आनि " वार्‍यावरची वरात" यात सातारी मराठीचा उत्तम वापर केलेला आहे

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 29/12/2013 - 01:35
शंकर पाटील मिरासदार या बातीत बोलायचे तर ते दोघी ही सीमा भागात राहिलेले. ग्रामीण मराठी वातावरणाचा त्यांचा जवळचा संबन्ध आलेला. पुलं चे बहुतेक आयुष्य मुम्बैत पुण्यात गेलेले. अपवाद बेळगावच्या कॉलेजात केलेली नोकरी., त्यांच्या लेखनात पुण्या मुम्बैचे संदर्भ जास्त न येतील तरच नवल.

In reply to by म्हैस

ज्ञानव 27/12/2013 - 19:10
१) ह्यांचे नाव प्रथम जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी त्यांच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी उकार नाही फार सरळ नाव आहे...हा त्यांनी त्यांच्या नावातला "ओढूनताणून" दाखवलेला कमीपणा मला खूप भावला होता. २)आमचे घर अगदीच "आलिशान" नसले तरी "गेलीशान " हि नाही ह्याच्यात कुठेच सहजता नाही हे कुणाही ऐर्या गैर्याला सुचू शकतेच की ३) म्हणजे मी हमाली करून काही "चलनी पौंड " कमवावेत आणि "वजनी पौंड " घटवावेत असा सल्ला हिने मला दिला ह्यात विनोद करताना खूपच ओढाताण जाणवते. ४)राम कदम ह्यांना मुल झाल्यावर "कदम, कदम बढाये जा" हि तर...काय बोलू... असे किती तरी किस्से आणि विनोद आहेत जे करताना पुलंना प्रचंड धाप लागली असेल.

In reply to by म्हैस

ज्ञानव 29/12/2013 - 12:31
पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात .
तरीही ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते बाकी तुम्हालाही विनोद जमतोय असे दिसते.

In reply to by म्हैस

प्रभाकर पेठकर 29/12/2013 - 16:18
@म्हैस, >>>>पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात . विनोद हा मराठी भाषेतला अलंकार आहे. त्यात अतिशयोक्ती, उपरोध, विरोधाभास वगैरे मार्गांनी व्यक्तीच्या, समाजाच्या वैगुण्यावर नेमके बोट ठेवून विनोदाच्या मार्गाने हसत-खेळत, संबंधीत व्यक्तीला, समाजाला न दुखावता, ते वैगुण्य दाखविणे हा विनोदकर्त्याचा उद्देश आणि कर्तव्य असते. जसे म्हैस कथेत, ' अहों एंवढ्याशां पाण्यांने कांय होतंय? असे म्हणून तेंव्हढेंसें पाणी स्वतः पिउन टाकले आणि तुंमचा थर्मास बाकी फर्मास हों. अमेरिकन दिसतोंय. अशी मखलाशीही केली.' ह्यात त्या, सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या, व्यक्तीच्या स्वार्थावर नेमके बोट ठेवले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्याला तुम्ही कमीपणा म्हणता आहात त्यालाच 'वैगुण्य' म्हणतात. असे वैगुण्य हसत हसवत दाखवून दिल्यास त्या व्यक्तीलाही कमीपणा/अपमान वाटत नाही आणि त्यास आपल्या स्वभावात इष्ट बदल करण्यास प्रवृत्त केले जाते. पुलंची प्रवासवर्णनं (अपूर्वाई, पूर्वरंग), व्यक्तीचित्रणं (रावसाहेब, अंतू बर्वा, हरीतात्या, नारायण) बालपणीच्या आठवणी (बिगरी ते मॅट्रीक) ह्या सर्व साहित्यात कुणाच्या कमीपणावर बोट ठेवले आहे असे मला तरी वाटत नाही. खुप वेळा माणूस तोंडाने एक बोलतो आणि कृती अगदी त्या विरुद्ध करत असतो. हा फरक, हे वैगुण्य हसत हसत दाखवून देण्याचे काम 'विनोद' करीत असते. असे विनोद समाज स्वास्थ्य सुदृढ करण्यास हातभार लावतात असे माझे मत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 30/12/2013 - 02:57
जीवनातल्या विकृती आणि विसंगतींकडे जो दयाबुद्धीने बघतो तो विनोदी. म्हणुनच पु.ल. हाडाचे विनोदी (हे मी म्हणतोय :) )

सूड 26/12/2013 - 14:45
बाकी एक बाई दुसर्‍या बाईकडे जेवढी निरखून बघते तेवढे पुण्यातले पेन्शनरपण नाही हो पाहात !

पैसा 26/12/2013 - 17:42
धमाल धागा झालाय! काही प्रमाणात म्हैस आणि वल्ली यांच्याशी सहमत. कधी कधी रत्नांग्री आणि मधल्या आळीवर जरा जास्तच विनोद केल्यासारखं वाटतं. मात्र त्याचबरोबर त्यांचे स्वतःवर केलेल विनोदही बर्‍याच प्रमाणात आहेत हे कबूल करावं लागेल.

In reply to by पैसा

मोदक 26/12/2013 - 22:40
फारसा सहमत नाही. गणगोतमधील रामूभैय्या दाते आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखांमधले पुण्याचे उल्लेख वाचले तर पुणेकर याच भावना व्यक्त करतील.

In reply to by मोदक

मला पु. ल. आणि शंकर पाटील दोघेही आवडतात. दोघांचे विनोद सुंदर असतात. पु. ल. यांचे विनोद भाषेवर आधारित असतात. तर शंकर पाटीलांचे विनोद परिस्थीतिजन्य असतात. तसेच व्यंकटेश माडगुलकर, द. मा. मिरजडार पण आवडतात. एवढेच कशाला आज कालचे अजित कोष्ठी पण आवडतात. व. पु. यांच्या बद्दल तर प्रचंड आदर आहे. त्यांच्या ईतक्या भाषेवर प्रभुत्व असणार्‍या माणसास ज्ञानपीठ पुरस्कार मिळू नये ह्याचे शेवट पर्यंत वाईट वाटत राहील. पण सांगणे हेच की ही सगळीच मंडळी अदरणिय आहेत.

बॅटमॅन 27/12/2013 - 00:16
"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू असतो असं कुडचेडकरांनी म्हटलं आहेच." "कोण म्हटलं हे?" "स.त. कुडचेडकर- केतकी पिवळी पडली चे लेखक-ख्यातनाम." "अस्सं!" वास्तविक पाहता कुडचेडकर नावाचा कुणी लेखक या जगात आहे याचा मला पत्तासुद्धा नव्हता आणि या गटण्याला त्याच्या " केतकी पिवळी पडली" या पुस्तकातली-आता हे काव्य होते की नाटक की अजून काही काय माहिती-वाक्येच्या वाक्ये पाठ होती. या गटण्याची केस अगदी हाताबाहेर गेली होती.

अत्रुप्त आत्मा 29/12/2013 - 13:56
काही सहित्यिक भोग- पु ल देशपांडे स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ. मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज. मी उपाख्य गाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे? मी. काही कल्पना नाही बुवा. गा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.) मी. हो. गा.ग.जो. किती वर्षे? मी. बरीच. गा.ग.जो. व्यवसाय? मी. पुस्तकं वगैरे लिहितो. गा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही. मी. आपण कुठल्या गावचे? गा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार. मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून. गा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही. मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली? गा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवरवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल. मी. तुम्हाल तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती? गा.ग.जो. हो आहे मग. मी. मग कशाला विचारताय? गा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला. मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध? गा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा अहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे. मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता. गा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठी आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका. मी. खरं आहे. गा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर! मी. (देवावर भार घालून) मानतो तर! गा.ग.जो. मग जाता का? मी. दशभुजाला नाही जात. गा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता? मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही. गा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय. मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.) गा.ग.जो. सरळ हो सांगा ना. मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची? गा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो. मी. (मुकाट्याने) हो. गा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे? मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता. गा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो. मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच) गा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट! मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला) गा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय! मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल. गा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात. मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम. गा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता? मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल... गा.ग.जो. ती कुठेशी आली? मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून. गा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम. मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो. गा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय. मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील. गा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये. मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे. गा.ग.जो. ती कशी येणार? मी. म्हणजे? गा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय. मी. काय म्हणता. गा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल. मी. मग मघापसून का नाही सांगितलंत. गा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं? मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते. गा.ग.जो. आजच हे नाव ऎकतोय. मी. मी पण! (गा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.) =)) ================================ =)) पु.लं.च्या "पुरचुंडी" किंवा "उरलं-सुरलं" या २ पैकी एका पुस्तकातल्या लेखातला हा भाग आहे. =)) त्यांचे अश्या तर्‍हेचे संवादंही प्रत्यक्ष दृष्य उभं करून जाम हसवतात! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्ञानव 29/12/2013 - 14:21
साहेब आज ह्या धाग्याचे सार्थक केलेत ("केलेत" म्हटले कारण तुमचे लिखाणाचे श्रम मला जाणवतात म्हणून आणि झालेत म्हंटले तर सारे श्रेय नशिबाला जाते हो...तसे होऊ नये ना म्हणून.) मजा आणलनीत हो धाग्यात

In reply to by अत्रुप्त आत्मा

मोदक 29/12/2013 - 20:27
पु.लं. चा एक किस्सा .... चाळीतला दादर चाळीमधल्या दोन तरुण मुली समोरासमोर आल्या आणि संवाद सुरु झाला ... "इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -" "इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!" "पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा." "तीन दमडीचा ब्लाउज!" "म्हणजे तुला महागच!" "पन्नास ब्लाउज आणून देइन -" "शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?" "का म्हणून -" "त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!" "अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं" "हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणिच्या मागे जायला " "तुला पाहतांना फुटले होते वाटतं?" "कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?" "असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !" "हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?" "आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!" "तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!" "चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!" "आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत " "हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली " "आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?" "हॉ हॉ हॉ ~!" "वेडावतेस काय माकडासारखी " "तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता." "ही ही ही ही! गणपती उत्सवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे कावय नको." "चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!" "बाबांच नको हं नाव घेऊ!" "मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन." "माडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!" "मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?" "तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टिक? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला" "खरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी!" "चप्पल मारीन, सांगते!" "आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल!" "बघायचिय का?" "बघू - माझीच असेल!" "ही बघ .. फाट! "

In reply to by मोदक

अत्रुप्त आत्मा 30/12/2013 - 02:31
@"तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!" "चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!" "आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत ">>> =)) =)) =))

खटपट्या 29/12/2013 - 15:18
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणास्तव हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु. ल. उद्गारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा में है' असं लिहायला हरकत नाही.' --------------------------------------------------------------------------------- साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु. लं. ना आवर्जून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक चालू असतांनाच पडद्यामागे धडाम्‌कन्‌ काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु. लं. ना म्हणाला, 'काय पडलं हो?''नाटऽऽक दुसरं काय?' पु. लं. उत्तरले. ----------------------------------------------------------------------------- नवीन शुद्ध लेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुद्धलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडळात घाटत होतं. त्यावर पु. लं. नी खालील छेद दिला,'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुद्धलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो, लिवा. क्याऽऽऽ ळंऽऽ!'

खटपट्या 12/01/2014 - 22:57
अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?" "करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला त्या रद्दित...

विटेकर 13/01/2014 - 14:19
माताय , पुलं च काहीही वाचले तरी मूड एकदम फ्रेश होतो.. अय्या .. चपला कुठे ठेवायच्या ? ओळ्खा पाहू हे वाक्य कशातलं आहे ?

मराठे 15/01/2014 - 02:34
राघूनानांची कन्येस पत्रे: 'आईस म्हणावे, तीने दिलेला स्वेटर डोक्यातून जात नाही. पण स्वेटरपेक्षा टोपीसारखा घातल्याने थंडी जाते. आल्यावर ती टाके ढीले करेलच'. मी आणि माझा शत्रूपक्षः "घर तुझं आहे लेका. ते कधीतरी बघायला जावं लागेल म्हणून आम्ही सदैव अर्ध्या चड्ड्या घालूनच गावातनं हिंडायचं का रे?" "आणि हा पाहिलास का? हा आमच्या नोकरांचा संडास!"

पहाटवारा 15/01/2014 - 07:10
हल्ली पूर्वीसारखे माझा चेहरा टवटवीत दाखवणारे आरसे मिळेनासे झाले आहेत !

हेमंतकुमार 27/01/2019 - 19:45
...सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छ्वास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही. ( एक शून्य मी’ मधून)

शेंडेनक्षत्र 30/01/2019 - 21:43
हिंसेचा निषेध म्हणून चार ऐवजी दोनच पेढे खाऊन स्वल्प उपोषण केले. १० वाजता मोसंबीचा रस घेऊन सोडले! बटाट्याची चाळ. अनरिअलिस्टिक म्हणताना बाईंचे पुढचे दोन दात निसटल्यासारखे वाटले ते चपळाईने पुन्हा बसवून बाईंनी आपले भाषण चालू ठेवले.