सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ? एवढ्या सर्वांच्या रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाखाणाची, अंथरूण-पांघरुणाची कशी काय सोय करणार? त्यात थंडीचे दिवस. दिवस छोटे आणी रात्री मोठ्या. शेकोटीसाठी, स्वयंपाकासाठी वाळकी लाकडे हवीत, ती कशी मिळवायची ? एवढ्या स्त्रिया, त्यांची आपापसात भांडणे झाल्यास, त्या आजारी पडल्यास वा कुणाला पायी चालणे अशक्य झाल्यास काय करायचे ? सगळेच प्रश्न होते...."
तर मित्रहो, अशी कल्पना करा, की तुम्हीच त्याकाळचे मदनकेतु होता, आणि तुमच्यावर श्रीकृष्णाने टाकलेली ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडलीत.
कसे केलेत हे सर्व, त्या पाचेक हजार वर्षांपूर्वीच्या काळात ? कसे नेले त्या वीस हजारांच्या तांड्याला, आसाम ते द्वारकेपर्यंतचे तीन हजार कि.मी. चे अंतर पार करून? बैलगाड्या वा रथातून की पायी ? संरक्षणाची, जेवणखाणाची, मुक्कामाची, सरपण, शिधा, घोडे, बैल, दवादारू वगैरे सर्व गोष्टींची कशीकाय तजवीज केलीत? वाटेत काय काय घडले? कोणत्या अडचणी आल्या? त्यावर कशी मात केलीत?
सोडा तुमच्या कल्पनेचे वारू भरधाव, आणि लिहून काढा जे जे सुचेल ते.
(मुदत: २५ नोहेंबर, २०१३)
सर्वोत्कृष्ट प्रतिसादकाला माझे एक चित्र सप्रेम भेट.
संदर्भ: 'नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा'
http://www.misalpav.com/node/25950
वाचन
21292
प्रतिक्रिया
0