मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शत्रुघ्न

मृत्युन्जय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.) पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार? शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली. पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्‍या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले. वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही. राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.

वाचने 21194 वाचनखूण प्रतिक्रिया 130

नाना चेंगट Tue, 02/05/2013 - 13:16
>>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे अगदी सहमत. लेख आवडला. रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे. उगाच अरेरे त्याच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे आमचे मत आहे. बाकी रामाला उदात्त वगैरे म्हटले आहे तेव्हा संभाळून... रामाचे नाव घेतले की पूर्वी भुते पळून जात हल्ली गोळा होतात ;)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन Tue, 02/05/2013 - 17:26
नान्याशी सहमत आहे. लेख आधी सोनाक्षीच्या (आम्हाला आवडते, चालायचेच) पप्पांबद्दल आहे असे वाटले होते, अपेक्षाभंगाचे सुख सुख वाटले, छान लेख. - छोटा डॉन

In reply to by नाना चेंगट

धन्या Tue, 02/05/2013 - 21:04
रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे. उगाच अरेरे त्याच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे आमचे मत आहे.
सहमत. रच्याकने, नाना जर कुणी असं म्हटलं की "रामायण हे इतिहासावर आधारीत काव्य असल्याने..." तर?

In reply to by धन्या

नाना चेंगट Wed, 02/06/2013 - 11:02
तर इतिहास म्हणजे काय त्यांचे काय म्हणणे आहे आपल्याला काय अपेक्षित आहे हे आधी तपासावे लागेल.

In reply to by नाना चेंगट

श्रावण मोडक गुरुवार, 02/21/2013 - 12:01
रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे.
ते मान्य केल्यानंतरही, जो शत्रुघ्न इथे चितारला आहे त्याचा आधार जर वाल्मिकी रामायण हाच असेल तर वाल्मिकींनी शत्रुघ्नासंदर्भात पुरेशी माहिती दिली आहे, असे म्हणावे लागेल. आणि मग, त्या काव्यातील (आपल्या सोयीचाच) विशिष्ट भाग जनतेने उचलला असे ठरेल. आणि वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त शत्रुघ्नाची काही माहिती या लेखात आली असेल तर ते संदर्भ आणि पुरावे लागतील. मग ते वाल्मिकी-इतर असल्याने त्याबाबत त्यांच्या काव्यस्वातंत्र्याचा उल्लेख करावा लागेल... :-)

In reply to by श्रावण मोडक

नाना चेंगट गुरुवार, 02/21/2013 - 22:39
मुद्द्याशी तत्वतः सहमत आहे. वाल्मीकिंनी चितारलेल्या रामायणाच्या विपरीत अनेक कल्पना नंतर अनेक लेखक नाटककारांनी वापरुन त्या मुळच्याच असाव्यात की काय असा पगडा लोकांवर आहे. (प्रमुख उदाहरण म्हणजे लक्ष्मणरेषा :) ) राम सर्वांचाच आहे घ्या वापरुन हवा तसा.. दगड तरतो त्याच्या नावाने तर सामान्य माणसाची काय कथा ! रघुपती राघव राजाराम ! पतितपावन सीताराम !!

उपटसुंभ Tue, 02/05/2013 - 13:16
शत्रुघ्न उपेक्षित राहिला हे खरंच.. सुमित्रेचं तसंच आहे. कौसल्या रामाची आई म्हणून ओळखली गेली. कैकेयी दशरथाला युद्धात मदत करणारी आणि रामाला वनवासात पाठवणारी म्हणून परिचीत. त्यामानाने सुमित्रेची फारशी ओळख होत नाही. बाकी माहिती छान दिलीत..!

मन१ Tue, 02/05/2013 - 13:23
रंजक व्यक्तिचित्र. रामायणातील अशीच एक उपेक्षित व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. नवर्‍यापासून दूर सतत चौदा वर्षे ती अयोध्येत रहात होती.

प्रचेतस Tue, 02/05/2013 - 13:46
उत्तम लेख. शत्रुघ्नाबद्दल खुद्द रामायण बरेचसे मुग्धच आहे. लवणासुर वधाची कामगिरी भरत घ्यायला तयार होता पण शत्रुघ्न तेव्हा स्वतःहून पुढे येऊन रामास म्हणाला की भरताने नंदिग्रामास राहून फळमूळांवर गुजराण करून बहुत कष्ट उपभोगिले आहेत तस्मात मी विद्यमान असता त्यांना अधिक कष्ट न द्यावेत. तेव्हा रामाने शत्रुघ्नावर ही कामगिरी सोपवून यमुनातटाकी नवीन नगर वसवण्याचे आदेश दिले. नगरं यमुनाजुष्टं तथा जनपदान् शुभान् । यो हि शत्रुं समुत्पाट्य पार्थिवस्य निवेशने || न विधत्ते नृपं तत्र नरकं स हि गच्छति । स त्वं हत्वा मधुसुतं लवणं पापनिश्चयम् ॥ बाकी उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असे काहीजण समजतात.
मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली.
हा संदर्भ समजला नाही. नंतर लव कुशांनी शत्रुघ्नाचा पराभव केला होता काय? आणि असल्यास तो कधी?

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Tue, 02/05/2013 - 14:28
नाही नाही. दिग्विजयात लव कुशांनी शत्रुघ्नाचा पराभव केला त्याचा संदर्भ आहे हा. राम - लक्ष्मणाने खुप थोर पराक्रम केले त्यामुळे त्यांचे एखादे अपयशही झाकले जाते. शत्रुघ्नाच्या वाट्याला ते क्षण कमीच आले आणि जेव्हा संधी मिळाली त्यातल्या एकात पराभव पत्करावा लागला म्हणुन तसे लिहिले आहे.

In reply to by मृत्युन्जय

अनुराधा१९८० Tue, 02/05/2013 - 18:52
असे तर प्रत्येक कथे मधल्या side role करणार्‍या पात्रांबद्दल लिहिता येइल. रामायणात सुद्धा अशी १०० पात्र सापडतील.

In reply to by अनुराधा१९८०

येवढे लांब कशाला जायचे? मिपावर देखील अशी खंडीभर पात्रे सापडतील. बाकी लेखन अतिशय सुरेख ! एकदम आवडेश. सोनाक्षीची टर उडवल्याबद्दल निषेध !

In reply to by अनुराधा१९८०

मृत्युन्जय Wed, 02/06/2013 - 10:33
मान्य आहे. पण प्रत्येक उपेक्षित पात्र महत्वाचे असते का? महाभारतातले १०० कौरवही उपेक्षित आहेत पण ते महत्वाचे आहेत का? आणि महत्वाचे आहेत असे वाटत असेल, त्यांच्याबद्दल लिहिता येते असे वाटत असेल तर जरुर लिहा की. थोडी चांगली माहितीच मिळेल लोकांना. बादवे मला अजुनही ते खाजवुन खरुज आणण्याचा संदर्भ कळालेला नाही. चुकुन लिहिले असेल तर सोडुन द्या. अन्यथा तपशीलात समजुन घ्यायला आवडेल तुम्ही असे का लिहिलेत ते.

In reply to by मृत्युन्जय

मृत्यंजया तुला येवढे साधे कळू नये ?
बादवे मला अजुनही ते खाजवुन खरुज आणण्याचा संदर्भ कळालेला नाही.
ते त्यांनी स्वतःच्या प्रतिसाद लेखनाचे केलेले मुल्यमापन आहे लेका.

प्यारे१ Tue, 02/05/2013 - 14:12
रामायणात महाभारत शोधू पाहणार्‍या सगळ्यांनाच सलाम! वाचता वाचता 'शोले' चित्रपटात सांभा ला केवळ एकच ड्वायलॉक दिलाय त्यामुळं सांभाची फार मोठी उपेक्षा झाली असं आठवलं गेलं नि ड्वाळे पाणावले...!

स्पा Tue, 02/05/2013 - 14:28
वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही. राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
क्या बात हे मान गये उस्ताद

अनुराधा१९८० Tue, 02/05/2013 - 14:39
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. >>> अहो हा काही इतिहास नाही, कवि कल्पना आहेत, त्यामुळे हीरो हिरोईन आणि व्हीलन ला च फूटेज मिळणार.

In reply to by अनुराधा१९८०

मृत्युन्जय Tue, 02/05/2013 - 15:13
खाजवुन खरुज हे काही कळाले नाही. रामायण आणि महाभारत तुम्हाला इतिहास न वाटता कवि कल्पना वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न पण त्यामुळे मी खाजवुन खरुज कसे आणतो आहे हे कळाले तर बरे होइल.

In reply to by मृत्युन्जय

अनुराधा१९८० Wed, 02/06/2013 - 13:40
कुठल्यातरी गोष्टी मधे कुठल्या तरी साईडी पात्रा वर कसा अन्याय झाला आहे ह्याच्या वर काथ्या कुट करणे म्हणजे खाजवुन खरुज काढणे नाही का? प्रत्येक कथे मध्ये २-३ lead characters असणार, आणि बाकिच्या पात्रांचे त्या २-३ lead characters शी जेव्हडा संबध आहे तेव्हडेच फूटेज त्यांना त्या कथेत मिळणार. ह्याला का फूटेज दिले नाही, त्याच्या वर का अन्याय केला ह्याला काय अर्थ आहे. तुम्ही एक शत्रुघ्नायण लिहा आणि त्यात रामा ला ignore करा. १०० कॉरवांचा तुमचा पॉईंट बरोबर आहे. तुमच्याच लॉजिक प्रमाणे त्या ९८ कॉरवांवर पण असे ९८ धागे चालु केले पाहिजेत तुम्ही. त्यांची नावे पण आहेत महाभारतात.

In reply to by अनुराधा१९८०

मृत्युन्जय Wed, 02/06/2013 - 14:38
साधारणपणे खाजवुन खरुज आणणे हा वाक्य्प्रयोग कुठल्यातरी वादग्रस्त विधानाला गरज नसताना आमंत्रण देण्याच्या कृतीसाठी वापरला जातो. आपण तो अस्थायी आणि अपात्री वापरलात. मी कुठलेही वादग्रस्त विधान केलेले नाही. दूसरी गोष्ट आपण कदाचित लेख नीट वाचला नसावा कारण शत्रुघ्नाचे रामायणातील योगदान काय याबद्द्ल तो लेख लिहिला आहे. वाल्मिकींनी शत्रुघ्नावर कश्याप्रकारे अन्याय केला यावर लिहिलेला नाही. राहुल द्रविडच्या कारकीर्दीचे य्प्ग्य मुल्यमापन होत नाही किंवा सचिन / सौरव यांच्यासमोर तो झाकोळला जातो असे जेव्हा आप्ण लिहितो तेव्हा त्याची कारकीर्द ठळकपणे मांडण्यासाठी तसे लिहिले जाते. तसेच शत्रुघ्नाबद्दल. हा काथ्याकूट नाही हे देखील तुम्हाला समजले नसेल तर दुर्दैव आहे. माझे, लेखाचे, तुमचे आणि मिपाचे देखील. हा काकू नाही. हा एक लेख आहे. तुम्हाला शत्रुघ्नावर अन्याय झाला असे वाटत नाही काय? तुमचे मत द्यावे? अश्या आशयाचा असला असता तर तो काकू. असाही मी तो जम मध्ये टाकला आहे.. काकू मध्ये नाही. मी शत्रुग्नायण लिहुन रामाला इग्नोअर करायचा माझा काहिही विचार नाही. शत्रुघ्न रामायणात कसा आहे हे फक्त मी लोकांसमोर मांडले. एकुण सर्व प्रकार पाहता खाजवुन खरुज आणण्याचे उपद्व्याप तुम्हीच करता आहात असे दिसते. धाग्याचा खाक्या, त्याचा आशय आणि त्यातील संदर्भ पाहुन यापुढे प्रतिसाद दिलेत तर फार बरे होइल. झुरळ्याच्या अंड्याप्रमाणे काथ्याकूट टाकुन गंमत बघत बसण्याची माझी सवय नाही, इच्छा नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. त्यामुळे या असल्या धाग्यांच्या आणी धागाकर्त्यांच्या मांदियाळीत मला बसवु नये अशी कळकळीची विनंती.

In reply to by मृत्युन्जय

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 02/07/2013 - 03:15
अरे बाबा कशाला स्वतःला जस्टीफाय करत बसला आहेस ??? इतकी वर्षे आहेस मिपावर, फाट्यावर मारता येत नाहीत का आक्षेप ? अनुल्लेखाने मार ना, कशाला मोलाचे शब्द खर्च करतो आहेस ??

स्पा Tue, 02/05/2013 - 14:43
अहो हा काही इतिहास नाही, कवि कल्पना आहेत, त्यामुळे हीरो हिरोईन आणि व्हीलन ला च फूटेज मिळणार.
माश्री . वल्ली या बाबतीत खुलासा करतीलच

चिगो Tue, 02/05/2013 - 15:03
शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.)
हे मात्र पटलं.. सुंदर, नेटका लेख..

सुहास झेले Tue, 02/05/2013 - 18:07
राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे.... शत्रुघ्न ह्या व्यक्तिरेखेबद्दल आजवर कुठेच कधी लिखाण झाल्याचे स्मरणात नाही...अजून काही माहिती किंवा संदर्भ असतील, तर वाचायला आवडतील.

आजच्या आधुनिक काळात अशीच एक भावंडाची जोडी भारतात प्रसिद्ध आहे , प्रियांकाने मोठ्या मनाने स्वतःकडे चालून आलेले राज्य नाकारून आपल्या भावास संधी दिली तिच्यात अनेकांना तिच्या आजीचे प्रतिबिंब दिसते. जेव्हा जेव्हा तिचा भाऊ उत्तरेत किंवा दक्षिणेत दिग्विजय करायला निघतो , तेव्हा त्याच्या पाठीशी ती सावली सारखी उभी असते ,

In reply to by पैसा

सस्नेह Tue, 02/05/2013 - 21:22
या उपेक्षित व्यक्तिरेखेबद्दल आणखी तपशील वाचायला आवडेल.

रेवती Wed, 02/06/2013 - 06:23
लेख आवडला. भलताच रंजक झालाय. काही ठिकाणी आजची स्टोनाक्षी आणि कालचा शत्रुघ्न यांचे संदर्भ आलेत तसेच मलाही काही आठवले. रामायण आणि महाभारतातल्या फारच मुख्य समजल्या जाणार्‍या गोष्टी माहित आहेत. त्यापलिकडे नाही. पूर्वी रामायण, महाभारत वाचले किंवा घरात ठेवले की तसेच आपल्या घरातही घडते असे मानायची पद्धत होती वाटतं. आम्हाला कधी हे प्रकार फारसे वाचायला मिळाले नाहीत. सगळे आपले ऐकीव.

In reply to by रेवती

नाना चेंगट Wed, 02/06/2013 - 11:11
>>>पूर्वी रामायण, महाभारत वाचले किंवा घरात ठेवले की तसेच आपल्या घरातही घडते असे मानायची पद्धत होती वाटतं. बहुधा मुळ कथानक वाचले की त्याआधारावर हे असेच व्हायला हवं अशी मनमानी करता येत नसावी म्हणून सोईस्कररित्या घरात कथानक ठेवायचेच नाही आणि त्याकाळी असे होते त्याकाळी तसे होते असे दाखवत आपल्याला हवे तसे वागायचे आणि वागायला लावायचे ही पद्धत विशेषतः गेल्या दोनशे वर्षांत रुढ झाली असावी.

मृत्युन्जय Wed, 02/06/2013 - 12:09
सर्व प्रतिसादकर्त्यांना मनःपुर्वक धन्यवाद. प्रत्येक प्रतिक्रियेमागे एक धन्यवाद द्यायचा विचार होता (तेवढाच ट्यार्पी वाढतो) पण नेहमीप्रमाणे आळशीपणा आड येतो. तरी हे जाहीर आभारप्रदर्शनच वैयक्तिक मानावे. कळावे लोभ असावा :)

आदिजोशी Wed, 02/06/2013 - 18:32
आमच्या बिचार्‍या सोनाक्षीला उगाच नसत्या वादात खेचल्याबद्दल निषेध. लेख चांगला झाला आहे.

अग्निकोल्हा गुरुवार, 02/07/2013 - 02:21
पण बहुदा त्याने सर्व सुखांचा उपभोग येथेच्छ घेतल्याने "जाणकारांना" ते खुपले नसावे म्हणुनच त्याला... तो बिचारा दुर्लक्षित वगैरे वगैरे अजिबात ठरत नाही...म्हटलं तर ते सतयुग होतं.. रामाच्या काळचं मग.. सर्व सोयिसुविधा, पत्नि, वडीलधारे, सत्ता, पद, संपत्ति हाति असताना त्याचं ताळतंत्र सुटलं नाही म्हणु कौतक करायचं म्हटलं तरी त्यासाठी तो कलियुगात हवा होता.. पण ते पण नाही मग त्याच कर्तुत्व कलियुगात प्रेरणादायी वाटणे कितीही चुक नसले तरी असं करणे म्हणजे सिंहाने चक्क शिकार केल्याबद्दल अप्रुप वाटुन घेणे न्हवे काय ?

In reply to by अग्निकोल्हा

५० फक्त गुरुवार, 02/07/2013 - 08:09
चला आता या बाजुने विचार करणे आले... आधीच याच विषयावर विचार करुन करुन डोके भंजाळुन जाते त्यात अजुन थोडी भर.

In reply to by प्रचेतस

अग्निकोल्हा गुरुवार, 02/07/2013 - 19:45
मंग मात्र थोडासा इचार करायला लागनार...? त्रेता म्हंजे ३/४ लोक्स पापी अनं १/४ लोक्स पुन्यवान ना ? हम्म असं असुनबी क्षत्रु सुस्वभावी निपजला, ह्यो एक चमत्कारच है असच म्हनल पैजे. रामाची क्रिपा असनार तेच्यावर... @५० फक्त उगा कशाला इचार कर्ताय, इचार न करता क्षत्रु म्हान वाटला तरच नमस्कार नैतर तो फकस्त सोपस्कार ...

In reply to by अग्निकोल्हा

अग्निकोल्हा गुरुवार, 02/07/2013 - 20:07
इतकच म्हणायच होतं की , इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले वगैरे शत्रुघ्नच्या बाबतीत घडलेले नाही. त्यानं त्याचं आयुष्य मस्त आनंदाने सुखोपभोगाने, न्यायाने वेंजाय माडी म्हणत संपुर्ण जगले आहे, त्याच्या वाट्याला राम-सिता-लक्ष्मण-उर्मिला-भरता प्रमाणे कश्टप्रदता आली नाही/ स्विकारली नाही, सबब तो विशेष स्मरावा असे मह्त्व त्याला "जाणकारांनी" दिले नाही याला शोकांतिका वगैरे मानणे अतिशय मेलोड्रामॅटिक वाटतयं. हां आता तो लहानपणीच महाकुंभमेळाव्यात वगैरे हरवला असता, तो कुछ और बात होती.

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय गुरुवार, 02/07/2013 - 20:26
ग्लिफूकाका ती अजुन एक काडी टाकुन धाग्याची पन्नाशी करुन टाका की. जीव कसा आसुसलाय बघा प्रतिक्रियांचे अर्धशतक बघायला. ;)

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Fri, 02/08/2013 - 11:17
अहो ग्लिशूकाका पण त्याचे आयुष्य म्हणजे शोकांतिका आहे असे कुठे म्हटले आहे मी? त्याचे कार्य मी लोकांसमोर मांडले आणि त्याला त्याचे ड्यु क्रेडिट मिळालेले नाही हे त्याचे दुर्दैव असे म्हणालो. जसे अनिल कुंबळेला योग्य वेळात कप्तनाची धुरा मिळाली नाही हे त्याचे आणि देशाचे दुर्दैव पण म्हणुन काय कुंबळेचे आयुष्य म्हणजे शोकांतिका थोडीच आहे. तसेच थोडेसे.

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा Wed, 02/13/2013 - 23:42
५फ म्हणतात तसं (५० फक्त चा शॉर्ट्फॉर्म), "कलिंगडात बी सुरक्षित" त्यात उगा बी ला क्रेडिट दिलं गेलं नाही असं म्हणन्यात काय अर्थ आहे ? नाही मिळालं कुंबळेला कप्तानपद पण धोनीने वर्ल्डकप मारला तर उगाच कुंबळेच दुर्दैव म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ?

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय गुरुवार, 02/14/2013 - 13:07
बोटं मोडण्यात काहिच हशील नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेचे योगदान अधोरेखित करुन त्याची दखल घेण्यात देखील काहीच हरकत नाही. शिवाय मुद्दा आयुष्य शोकांतिका असण्याचा होता. तशी शोकांतिका काही नाहे असेच म्हटले आहे मी माझ्या प्रतिसादात. शिवाय कुंबळेला त्याचे ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे आहे. जर तसे मिळाले नसेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. राष्ट्रीय कर्तव्य आहे ते.

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा गुरुवार, 02/14/2013 - 18:13
शिवाय मुद्दा आयुष्य शोकांतिका असण्याचा होता. तशी शोकांतिका काही नाहे असेच म्हटले आहे मी माझ्या प्रतिसादात.
समजा रामायण घडले नसते व राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे शांतपणे जन्मले तिथेच राज्य उपभोगुन अंती सहकुटुम्ब वानप्रस्थाला निघुन जाउन इश्वरचरणी लिन झाले याबद्दलही ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे ठरलं असतं काय ?

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय गुरुवार, 02/14/2013 - 18:39
अहो रामायणच घडले नसते तर रामाला तरी कशाला कोणी मरयला कशाचे क्रेडिट दिले असते. सचिन तेंडुलकर जन्मलाच नसता तर त्याला क्रेडिट मिळाले असते का महान फलंदाज असण्याचे? मला मुद्दाच कळाला नाही. बाकी पराशी बाडिस.

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा Fri, 02/15/2013 - 00:36
मला मुद्दाच कळाला नाही.
होतं असं कधी कधी. मुद्दा इतकाच आहे की जर तिन भावांनी जगायच्या तिन वेगवेगळ्या तर्‍हा जोपासल्या असताना चवथ्याने मात्र डोक शांत ठेउन जेव्हां परिस्थिती संयमाने हाताळली भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेतले नाहीत या बद्दल त्याला ड्यु क्रेडिट देणे म्हणजे उरलेल्या तिघांनी अनुसरलेल्या मार्गाचा अपमान ठरत नाही काय ? तसं नसेल तर...

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Sat, 02/16/2013 - 10:52
कधी कधी नाही. समोरचा माणूस क्षणाक्षणाला मुद्दे बदलत असेल तर बर्‍याचदा होते. असो. मुद्दा इतकाच आहे की जर तिन भावांनी जगायच्या तिन वेगवेगळ्या तर्‍हा जोपासल्या असताना चवथ्याने मात्र डोक शांत ठेउन जेव्हां परिस्थिती संयमाने हाताळली भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेतले नाहीत या बद्दल त्याला ड्यु क्रेडिट देणे म्हणजे उरलेल्या तिघांनी अनुसरलेल्या मार्गाचा अपमान ठरत नाही काय ? जर एखाद्या गोष्टीसाठी २ वेगवेगळे मार्ग अवलंबले गेले तर त्यातला एक निखालस चुकीचाच असला पाहिजे काय? तिन्ही भावांनी आपापल्या वृत्तीला अनुसरुन काही एक निर्णय घेतले आणि त्यातुन काही आदर्श घालुन दिले. अगदी तसेच शत्रुघ्नाने केले. फरक इतकाच की इतर तिघांना त्यांचे ड्यु क्रेडिट मिळाले. शत्रुघ्नाला मिळाले नाही. याचा अर्थ कोणी एक किंवा आधिक चुक आणि इतर बरोबर असा त्याचा अर्थ होउच शकत नाही. हे काही राम आणी रावण इतके सरळसोप्पे गणीत नाही आहे. तसं नसेल तर... अपमान ठरत नसल्याने याबद्दल काही टिप्पणी करु इच्छित नाही.

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा Sat, 02/16/2013 - 23:18
जर एखाद्या गोष्टीसाठी २ वेगवेगळे मार्ग अवलंबले गेले तर त्यातला एक निखालस चुकीचाच असला पाहिजे काय?
नाही.
तिन्ही भावांनी आपापल्या वृत्तीला अनुसरुन काही एक निर्णय घेतले आणि त्यातुन काही आदर्श घालुन दिले. अगदी तसेच शत्रुघ्नाने केले.
चुकताय. शत्रुघ्नाने तिन भावांनी घालुन दिलेल्या आदर्शाच्या विरोधि वर्तन केले आहे.
फरक इतकाच की इतर तिघांना त्यांचे ड्यु क्रेडिट मिळाले. शत्रुघ्नाला मिळाले नाही.
शत्रुघ्नाने तिन भावांच्या आदर्शाच्या नेमके विरोधि वर्तन केल्याने जर तिन भावंडांनाच्या वर्तानाला जे आदर्श मानले तर त्या अनुशंगाने शत्रुघ्नाचे वर्तन दखलपात्र ठरत नाही, ते जर दखलपात्र ठरवले तर तिन भावंडांच्या आदर्शवादी भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, म्हणूनच महात्म्यांनी शत्रुघ्नाचे वर्तन दखलपात्र ठरवलेले अनुभवास येत नाही.

In reply to by अग्निकोल्हा

अग्निकोल्हा Sat, 02/16/2013 - 23:23
शत्रुघ्नाचे वर्तन हे त्याच्या तिनही भावंडानी स्ववर्तनातुन घालुन दिलेल्या आदर्शांची*** नेमकी प्रतारणा आहे हे आपण विसरता कामा नये. (***जर का ते आदर्श ठरत असेल तर...)

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Sun, 02/17/2013 - 19:57
तिन्ही भावंडांनी घालुन दिलेल्या आदर्शांची *** प्रतारणा तर होतच नाही. त्यापैकी एखाद्याच्या आदर्शाविरोधी वर्तन असा एखाद्याचा गैरसमज होउ शकतो. प्रत्यक्षात शत्रुघ्नाचे वर्तन हे इतर तिघांच्या आदर्शांना आणि वर्तनाला अतिशय पूरक असल्याचे दिसुन येते. शत्रुघ्नाने निर्लेप वृत्तीने राज्याची सेवा केली त्यामुळेच तर इतर तिघे आदर्श निर्माण करणारे वर्तन करु शकले आणी त्यांच्या धर्माचे पालन करु शकले. प्रत्येक भाऊ आपापल्या भूमिकेत एक आदर्श जीवन जगला असेच म्हणावे लागले. *** चुका करुन का होइना चारही भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही.

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा Mon, 02/18/2013 - 07:45
चुका करुन का होइना भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही ?
=)) आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ?

In reply to by अग्निकोल्हा

अग्निकोल्हा Mon, 02/18/2013 - 07:52
सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ?

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Mon, 02/18/2013 - 11:18
सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, भारीच ब्वॉ कुतुहल तुम्हाला. तुमच्या रामालाच विचारा की त्याने सैन्याची मदत का नाही मागितली ते. कदाचित तुमच्या रावणाने टेलिफोन लाइन्स कट केल्या असतील. आम्हाला काय विचारता?

In reply to by मृत्युन्जय

अग्निकोल्हा Mon, 02/18/2013 - 20:34
कदाचित तुमच्या रावणाने टेलिफोन लाइन्स कट केल्या असतील. आम्हाला काय विचारता?
म्हंणजे तुम्हाला याबद्दल काही माहितीच नाही ? असुदे आपण शत्रुघ्न अदखलपात्र कसा आहे याची चर्चा करतोय त्यामुळे तुमचा माहितीचा अभाव तुमच्या मुद्याच्या विरोधात न्हेणार नाही हे नक्कि. असो... सविस्तर प्रतिसाद या आधिच इथे दिलेला होता ज्यात शत्रुघ्नाचे पुरक वर्तन या अनुशंगाने मुख्य मुद्दे मांडलेले आहेत अवश्य वाचावा. शत्रुघ्नचे वर्तन जे आपण पुरक मानत आहात ते खरच परिस्थितीजन्य / आदर्श होते का यावरतीही प्रश्न निर्माण होतात.

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Tue, 02/19/2013 - 10:28
अहो तो रावण येऊन रोज तुमच्या कानात गुफ्तगू करुन जातो तसा तो आमच्याकडे येत नाही. त्यामुळे रामायणातली अद्ययावत दळणवळण यंत्रणा याबाबत त्याने मला मौलिक माहिती दिली नाही. ;) शिवाय त्या काळच्या आयडिया / व्होडाफोनचे रेकॉर्ड माझ्याकडे नाही. वाल्मिकी कडे आणि तुलसीदासाकडेही नव्हते त्यामुळे त्यांच्याकडुन माहिती मिळण्याची शक्यता मावळली. त्यामुळे तुमच्यावर विसंबुन राहण्यावाचौन पर्याय नाही. तुम्हीच सांगा आता की मोबाइल स्विच ऑफ होता की रेंजच नव्हती की रावणाने मधल्यामध्ये फेरफार करुन शत्रुघ्नाचे कॉल्स इंद्रजीताकडे फॉरवर्ड केले. :P बाकी तुम्ही मोठ्या मनाने माझ्या या अज्ञानाबद्दल माझी कानौघडणी न करत मला सोडुन द्यायचे ठरवले त्यामुळे तुमच्या क्षमाशीलतेबद्दल मी शतशः ऋणी आहे :D . मज पामरास याबाबतीत थोडे ज्ञानदान करुन उपकृत करावे. अमल भारतवर्षाची परिक्रमा करुन आपण मिळवलेले मौलिक ज्ञान इतर अज्ञ मानवासही थोडे द्यावे अशी नम्र विनंती :)

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय Mon, 02/18/2013 - 11:16
अहो पण चुका केल्या म्हणुन चांगल्या कामांचे आणि निर्माण केलेल्या आदर्शांचे क्रेडिट देखील नाही द्यायचे काय? नाही मह्णजे उद्या दाउदने एखादे सत्कर्म केले तर त्याची पापे लक्षात घेता त्याला क्रेडिट दिले गेले नाही तर समजु शकतो. पण गोष्ट जेव्हा राम - लक्ष्मणाची असते तेव्हा तोच आदर्श कसा काय असु शकतो?

In reply to by अग्निकोल्हा

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 02/14/2013 - 18:22
समजा रामायण घडले नसते व राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे शांतपणे जन्मले तिथेच राज्य उपभोगुन अंती सहकुटुम्ब वानप्रस्थाला निघुन जाउन इश्वरचरणी लिन झाले याबद्दलही ड्यु क्रेडिट मिळणेही गरजेचे ठरलं असतं काय ?
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ?
संपादनाचे अधिकार असणार्‍या एका व्यक्तिने त्याच्या संपादकिय अधिकाराचा गैरवापर करत माझा येथिल आधिचा प्रतिसाद मला कोणतिही सुचना व कारण न देता परस्पर उडवल्या बद्दल निषेध.
नाही आवडला तुमचा पहिला प्रतिसाद, म्हणून उडवला गेला पण दुसरा प्रतिसाद तर टिकला ना तर उगाच निषेध म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय गुरुवार, 02/14/2013 - 18:41
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ? हे बघ आता हे पुढे नेउन " हा मृत्युंजय जन्मलाच नसता तर.............." असे नको होउ देउस बरे. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अग्निकोल्हा Fri, 02/15/2013 - 00:39
मी काय म्हणतो, जर हा धागाच निघाला नसता, तर ह्याची गरज पडली असती काय ?
पडल्यास स्विकारायची तयारी आहे काय ?
नाही आवडला तुमचा पहिला प्रतिसाद, म्हणून उडवला गेला पण दुसरा प्रतिसाद तर टिकला ना तर उगाच निषेध म्हणुन बोटं मोडण्यात काय हशिल ?
मग काय मोडायचं तुम्ही सुचवता बरे ?

In reply to by अग्निकोल्हा

पडल्यास स्विकारायची तयारी आहे काय ?
अहो, पदरी पडले पवित्र झाले ! तुम्हाला नाही का सदस्य म्हणून स्विकारले.
मग काय मोडायचं तुम्ही सुचवता बरे ?
तुमच्याकडे काही असेल मोडायसारखे तर मोडा.. नाहीतर गाजराची पुंगी बनवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा Wed, 02/20/2013 - 10:38
तुमच्याकडे काही असेल मोडायसारखे तर मोडा.. नाहीतर गाजराची पुंगी बनवा.
चुकून गुजरात्याची पुंगी बनवा असे वाचलेअसो

In reply to by अग्निकोल्हा

संपादक मंडळ गुरुवार, 02/14/2013 - 18:32
काही तांत्रिक कारणाने येथील मूळ प्रतिसाद उडाला असावा. आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे आणि सदर प्रतिसाद त्याप्रमाणे संपादित केला आहे.

चावटमेला गुरुवार, 02/07/2013 - 10:02
छान लेख. लवणासुर वधाबद्दल माहिती होती (लहानपणी चांदोबा मध्ये वाचल्याचे आठवतेय). पण मी आजपर्यंत भरत आणि शत्रुघ्न हेच सख्खे जुळे भाऊ होते असं समजत होतो. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. एक शंका की अशी समजूत का झाली असावी? कदाचित काही साहित्यामध्ये असा चुकीचा संदर्भ आला असावा. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by चावटमेला

मृत्युन्जय गुरुवार, 02/07/2013 - 10:39
राम लक्ष्मण वनवासाला जाण्यापुर्वी भरत आणि शत्रुघ्न भरताच्या आजोळी गेले होते. ती संधी साधुन कैकेयीने रामाला वनवासात धाडले असे संदर्भ आहेत. ज्या अर्थी ते दोघे अजोळी गेले होते त्या अर्थी तेच भाऊ असणार असा आभास निर्माण होतो. शिवाय नावे घेताना नेहमीच राम - लक्ष्मण, भरत - शत्रुघ्न असा उल्लेख होतो. तेही एक कारण असावे. त्याशिवाय एक कारण म्हणजे राम - लक्ष्मण वनवासाला गेले. त्यापैकी फक्त रामाने वनवासाला जावे असे कैकेयीने सुचवले होते. लक्ष्मणाबद्दल तिला काही अढी नव्हती कारण रामानंतर मोठा भरत होता त्यामुळे रामानंतर सिंहासनावर हक्क त्याचा होता. लक्ष्मण स्वेच्छेने रामाबरोबर गेला. पण लोकांना असे वाटते की कैकेयीने त्याच्यासाठीही वनवास मागितला होता. आणि ज्या अर्थी शत्रुघ्नासाठी मागितला नव्हता आणी ज्या अर्थी ते दोघेही (भरत आणि शत्रुघ्न) अयोध्येत राहिले त्याअर्थी ते दोघे भाऊ असावेत असा लोकांचा समज होतो.

प्रमोद्_पुणे गुरुवार, 02/07/2013 - 11:17
छान लेख बरिच नवीन माहिती समजली. अशाच फारशा परिचीत नसलेल्या व्यक्तिरेखांवर वाचायला आवडेल.

आनंद घारे गुरुवार, 02/07/2013 - 20:28
याबद्दल पाठभेद आहेत. तो कैकेयीचा मुलगा होता असेच मला लहानपणी सांगितल्या गेलेल्या रामायणात होते, पण तो सुमित्रेचा मुलगा होता असे अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले आहे. बहुधा तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये तसे असावे. त्याला वनवास घडला नाही, तो पर्णकुटीमध्ये न राहता राजवाड्यातच राहिला वगैरे पाहता त्याचे काही बिघडले नाही असे दिसते.

In reply to by आनंद घारे

मृत्युन्जय Fri, 02/08/2013 - 12:07
वाल्मिकी रामायणाच्या इंग्रजी अनुवादातुन पुढील उतारे घेतले आहेतः And Queen Kaikeyí bore a child Of truest valour, Bharat styled, With every princely virtue blest, One fourth of Vishnu manifest. Sumitrá too a noble pair, Called Lakshman and S'atrughna, bare, Of high emprise, devoted, true, Sharers in Vishnu's essence too. शत्रुघ्न लक्ष्मणाचा नसुन भरताचा जुळा भाऊ आहे हा प्रवास पसरण्यास मुख्य कारण हेच असावे की रामाने वनवासासारठी जेव्हा प्रस्थान केले तेव्हा शत्रुघ्न भरताबरोबर भरताच्या आजोळी होता. बाकी अजुन कारणे वरती एका प्रतिसादात देखील नमूद केली आहेत.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस Fri, 02/08/2013 - 13:30
आणि हा मूळ संस्कृतातला दाखला प्रोद्यमाने जगन्नाथं सर्वलोकनमस्कृतम् । कौसल्याजनयद् रामं दिव्यलक्षणसंयुतम् ॥ भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रमः । साक्षाद् विष्णोश्चतुर्भागः सर्वैः समुदितो गुणैः ॥ अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत् सुतौ । सर्वास्त्रकुशलौ वीरौ विष्णोरर्धसमन्वितौ ॥

In reply to by प्रचेतस

नाना चेंगट Fri, 02/08/2013 - 13:33
अध्याय आणि श्लोक क्रमांक न दिल्याने सदर संदर्भ आधारहीन आहे असे आम्ही दाखवून देऊ इच्छितो. तसे हा श्लोक तुम्ही तुमच्याच मनाने लिहिला नाही हे कशावरुन? ऑ !! (विज्ञाननिष्ट) नाना

In reply to by नाना चेंगट

प्रचेतस Fri, 02/08/2013 - 13:39
काय हे नाना, रामायणात अध्याय नसून सर्ग आहेत हे तुम्हास माहित नव्हे काय? :) असो. बालकांड, सर्ग १८, श्लोक १०, १३ आणि १४.