मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांघाय

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की. भडक अभिनय, अभिनय संपन्न पात्रांचा न करता आलेला वापर, उत्कर्ष बिंदू पर्यंत पोचतोय असे वाटत असतानाच टिपीकल मसाला वळण घेणारा संघर्ष ह्या सर्वांमुळे चित्रपट आपल्याला फार काही गवसून देत नाही. मग चित्रपटात बघण्यासारखे काहीच नाही का ? आहे ! अभय देओलचा सुरेख अभिनय आणि बर्‍याच कालावधी नंतर फारुख शेखचा सहज सुंदर वावर ह्यासाठी एकदा तरी चित्रपट बघायला नक्की हरकत नाही. अर्थात फारशा अपेक्षा ठेवायच्या नाहीत हे ओघाने आलेच. व्हॅसिलीसच्या 'Z' ह्या नॉव्हेलवरती आधारीत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दिबाकर बॅनर्जी. खोसला का घोसला, ओये लकी लकी ओये, लव्ह सेक्स धोका असे थोड्या हटके थीमचे चित्रपट बनवणारा दिबाकर बॅनर्जी ह्या चित्रपटात देखील वेगळे काही देण्याचा प्रयत्न नक्की करतो पण कुठेतरी प्रयत्नात कमी पडल्याचे नक्की जाणवत राहते. चित्रपटात अभय देओल, फारुख शेख, कल्की कोचलीन, प्रोसेनजीत चटर्जी अशी तगडी स्टारकास्ट आहे. चक्क चक्क आपला चिन्मय मांडलेकर देखील आहे. तुकड्या तुकड्यांनी आलेल्या प्रसंगात एकदम भाव खाऊन गेला आहे बेटा. ह्या चित्रपटाची कथा(?) ऊर्मी जुवेकर ह्या मराठी मुलीचीच आहे हे एक विशेष. भारतनगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावरती येऊ घातलेले एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय काटा काटीचा खेळ हे ह्या चित्रपटाचे कथासूत्र. प्रोजेक्टला पाठिंबा देणारे आले म्हणजेच विरोध करणारे देखील येणारच. डॉ. अहमदी (प्रसेनजीत) हे असेच हाय प्रोफाइल सामाजिक कार्यकर्ते ह्या प्रोजेक्टच्या विरोधात दंड थोपटतात. कल्की अर्थात शालिनी ही एकेकाळची त्यांची विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्रेमात पडलेली मुलगी. हिचे स्वतःचे वडील सैन्यात अधिकारी असतात आणि सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असतात. तर ह्या शालिनीला डॉ. अहमदी शहरात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या मोलकरणीकडून कळते आणि ती त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करते. मात्र 'आखरी सांस तक लढना हे!' हा मंत्र जपणारे अहमदी शहरात हजर होतातच. नेहमीप्रमाणेच अशा लोकांची जी गळचेपी चालू होते ती त्यांना देखील अनुभवायला मिळते. पोलिसांची कुमक नाही म्हणून सभेला संरक्षण पुरवता येणार नाही, आणि त्यामुळे मग सभेला परवानगीच नाही असे त्यांना कळवण्यात येते. अहमदी मात्र सभा होणारच ह्या जिद्दीला पेटतात. त्यांना विरोध करायला सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतातच. ह्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजी समोर पोलीस नुसते बघ्याची भूमिका घेऊन उभे असतात. छोटीशी दगडफेक, अहमदींच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण असे प्रसंग घडत जातात आणि सभा संपवून परत येत असताना चौकातच एक टेंपो सरळ अहमदींना उडवून निघून जातो आणि चित्रपट संघर्षाच्या एका टोकावरती येऊन पोचतो. कोमात गेलेल्या अहमदींना अपघात झाला नसून तो खूनाचा प्रयत्न आहे अशी शालिनीची पूर्णं खात्री असते. मग न्यायासाठी धडपड करण्याची ती तयारी सुरू करते. अशातच अहमदींची एकेकाळची विद्यार्थिनी आणि आताची बायको हजर होते आणि चित्रपट वेग पकडू लागतो. लग्नानंतर देखील अहमदींच्या कार्याने भारावलेली त्यांची बायको आता मात्र हताश आणि निराश झालेली आहे आणि अशा आंदोलनाला काहीच फळ नसल्याच्या जाणिवेने ह्या सगळ्यातून बाहेर देखील पडली आहे. आता मात्र ती नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून धाडसाने उभी राहिली आहे. प्रकरण चांगलेच जोर धरू लागले आहे हे बघून मुख्यमंत्री मॅडम (सुप्रिया पाठक) चौकशीसाठी क्रिष्णन अर्थात अभय देओलची एक सदस्यीय समिती नेमतात. ह्या अभयला रिपोर्ट करायचा असतो तो आपल्या बॉसला फारुख शेखला. मुरलेला राजकारणी, कसबी आणि व्यवहारी मनुष्य असे विविध कंगोरे फारुख शेखने आपल्या ह्या भूमिकेद्वारे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूला प्रामाणिक, सामाजिक अशांततेने अस्वस्थ होणारा, अधिकार असून देखील बजावता येत नसल्याने हतबद्ध झालेला आणि मोक्याच्या क्षणी सगळी बुद्धी पणाला लावत डावात रंगत आणणारा व्हा‌इस चेहरमन अभय देओलने झकास साकारला आहे. संयत अभिनय, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही असा कृष्णन त्याने निव्वळ काही शब्दांचे टिपीकल मद्रासी उच्चार आणि मद्रासी लहेजावाली हिंदी ह्या जोरावरती उभा केलेला आहे. कृष्णनला नेहमीप्रमाणेच गुन्ह्याच्या दिवसाची पोलीस स्टेशनमधली डायरी न मिळणे, खात्यांतर्गतची माहिती देता येणे शक्य नाही ह्या कारणाने पोलीस खात्याकडून माहिती द्यायला टाळाटाळ, मुख्य पोलीस अधिकारी (चिन्मय मांडलेकर)चे असहकाराचे धोरण आणि गुन्ह्यांवरती पांघरूण घालण्याचे प्रयत्न असे अनुभव यायला सुरुवात होते. ह्या सर्वातून कृष्णन हळूहळू पण ठाम मार्गाने पुढे सरकतच असतो. अशातच जोगींदर शर्मा (इम्रान हाश्मी) हा पॉर्न फिल्म मेकर + राजकीय सभांमधला फोटोग्राफर आपल्याकडे अहमदींच्या अपघाता विषयी काही ठोस पुरावे असल्याचा दावा करतो आणि कथेला वेगळेच वळण लागते. शालिनी आता जोगींदरच्या साहाय्याने ह्या प्रकरणाचा गुंता सोडवायला सुरुवात करते. अपेक्षेप्रमाणेच त्यांना गुंड कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. अशातच जोगींदरच्या हाताला असा एक भक्कम पुरावा लागतो जो सरकारला सुरुंग लावण्या येवढा स्फोटक असतो. जीवावरती उदार होऊन ते हा पुरावा कृष्णनकडे घेऊन हजर होतात, पण त्या आधीच 'क्यूं ना ये बीना दातवाला आयोग बंद कर के, CBI को इसकी छान बीन करने दी जाये' असे म्हणत मुख्यमंत्री मॅडम आयोग बंद करण्याचा निर्णय घेऊन मोकळ्या झालेल्या असतात. आता हा पुरावा अभय देओल कसा आणि कुठे वापरतो, ह्या पुराव्याचा खरंच काही उपयोग होतो, का तोच स्वतः अडचणीत सापडतो, नक्की राजकारण काय वळण घेते हे प्रश्न सोडवायचे असतीत तर मग शांघायची सहल करणे गरजेचे. अभिनयात अभय देओल आणि फारुख शेखने बाजी मारलेली आहे. थोडासा आक्रस्ताळेपणा सहन करता आला तर कल्की देखील बरीचशी सुसह्य आहे. लगाम व्यवस्थित घातला तर इम्रान हाश्मी देखील सुसह्य वाटू शकतो हे जन्नत २ नंतर पुन्हा एकदा ह्या चित्रपटात अनुभवता येते. चित्रपटात बर्‍याच खटकणार्‍या गोष्टी मात्र जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार विरोधातील एक प्रमुख कार्यकर्ती, डॉ. अहमदींच्या अगदी जवळची असलेली कल्की. ह्या कल्कीच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झालेली आहे, असे असताना कुठलाच मिडिया ह्याची दखल कशी घेत नाही ? 'डॉ. अहमदींचे समर्थकच भ्रष्टाचाराशी जोडले गेलेले आहेत' हे ठामपणे जनतेसमोर आणणे शक्य असताना, सरळ त्यांच्यावरती हल्ला का केला जातो हे कोडे उलगडत नाही. त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?, राजकीय कार्यकर्ते हे सहजपणे खून, जाळपोळ करून कसे वावरू शकतात? ते कार्यकर्ते कमी आणि सुपारी घेऊन थंड डोक्याने खून करणारे जास्ती शोभतात. असे काही खटकणारे प्रश्न सोडले, तर एकुणात चित्रपटाला 'बरा आहे' असे म्हणायला हरकत नाही.

वाचने 8857 वाचनखूण प्रतिक्रिया 44

निखिल देशपांडे 13/06/2012 - 12:46
चित्रपट एकदा बघण्यालायक नक्कीच आहे. हा पर्‍या उगाच समिक्षक म्हणुन मिरवण्यासाठी असे लिहितो. चित्रपटाकडुन काहिच अपेक्षा नसल्यामुळे चित्रपट आवडला.
त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?
हे कुठे? कधी दाखवले आहे?

बिपिन कार्यकर्ते 13/06/2012 - 12:48
हम्म! हा तर बघणारच. सामान्यपणे कौतुक झालं आहे या सिनेमाचं! अभय देओलने चांगलं काम केलंय यात आश्चर्य नाहीच. पण इम्रान हाश्मीने चांगलं काम केलंय हे आश्चर्यच आहे! बघावा लागेल.

पप्पुपेजर 13/06/2012 - 12:52
हे जेंव्हा ते लोक त्या मोलकरणी कडे जातात तेंव्हा दाखवले आहे. "त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?' अपघाताच्या आधी दोघे स्कूटर वर बसली असतात पोलीस लोकां सोबत हुज्जत घालत आणि तेंव्हाच जोगींदर टेंपोच्या ड्रायव्हरला पाहतो असे मला वाटते .

In reply to by स्वैर परी

मुक्त विहारि 13/06/2012 - 16:31
पैसे बचाता है. लेकिन बघनेका है, तो थोडे दिवस के बाद बघो. बर्‍याच वेळी प्रिंट बरोबर नसते. वो बरीचशी, धुर्कट धुर्कट, अस्ती है....

आदिजोशी 13/06/2012 - 14:16
परिक्षण करताना पूर्ण सिनेमाचे परिक्षण करावे. म्हणजे जो काही शेवट असेल तर तोसुद्धा लिहावा. अन्यथा सिनेमा विषयी बांधले जाणारे तर्क तर्कच राहतील. आणी अशा अर्धवट परिक्षणांमुळे ना परिक्षणाची मजा येते ना चित्रपट बघायचा की नाही हा निर्णय होतो.

राजघराणं 13/06/2012 - 15:00
पूर्वीसारख स्वतःच ओरिजनल काहितरी लिहान... हल्ली लई परिक्षणात अडकलाय म्ह णून म्हणतो बाकी हे पण परिक्षण झकास

कवटी 13/06/2012 - 15:35
परा, तु अता सरळ कुठल्यातरी पेपर मधे लिहित जा परिक्षणे.... नाही म्हण्जे काय आहे की तसा चांगला लिहितोस परिक्षणे , मग लिहिल्याचे ४ पैसे ही सुटतील... शिवाय तुला पिच्चरही फुकट पहायला मिळतील.. बाकी तुला शांघायवाल्यांकडून काय कमिशन मिळाले होते का? नाही तुकारामाच्या तुलनेत बरे म्हणलय्स या पिच्चर ला म्हणून विचारल...
आणि पहिल्या 20 मिनिटात उठून थिअटरबाहेर पडलो. बाकी आजकाल विवाहित इम्रान हाश्मीला अविवाहित बाया जरा जास्तच चिकटु लागल्यायेत ब्वॉ.

मुक्त विहारि 13/06/2012 - 16:45
वाट्याला न जायचे ठरवले आहे.आणि तिकीट काढून तर ह्या जन्मात जाणार नाही. शेवटी ते पैसे कुठे जातात?आणि कूणाला मिळतात? कूणास ठावूक... बाय द वे, आज-काल प्रत्येक हिंदी सिनेमात एक तरी मुस्लीम पात्र का असते? पुर्वी शीख, पारशी किंवा ख्रिच्चन असायचे. का, ही पण "त्याची " मर्जी आहे?

In reply to by मुक्त विहारि

नाना चेंगट 13/06/2012 - 18:30
>>>आज-काल प्रत्येक हिंदी सिनेमात एक तरी मुस्लीम पात्र का असते? हॉलीवुडपटांमधे निग्रो पात्र का असते?

रेवती 13/06/2012 - 19:42
एकंदरीत शिनेमा बघण्याजोगा असावा असे वाटत आहे. अभय देओल आवडता कलाकार तर फारूख शेख बर्‍यापैकी आवडतो. चित्रपट पाहण्यास हरकत नाही.

निनाद मुक्काम … 13/06/2012 - 22:56
मुंबई चे शांघाय करू ( जसा कोकणचा केलिफोर्निया ) अशी माजी मुख्यमंत्र्यांची घोषणा गाजली होती. शहरातील अनधिकृत झोपडपट्या व तेथील अनधिकृत रहिवाश्यांना काही लाख व कोटी देऊन अहिंसक मार्गाने कटवायचे ( कशाला उगाच राजकीय पक्षाला हाताशी धरा मग संघटीत गुन्हेगारी टोळ्या आल्या मग वृत्तपत्रात एखादी बातमी मग त्यावर कमिटी ह्यापेक्षा कोर्पोरेट ला हा मार्ग सोयीचा वाटतो. डायरेक्ट झोपडीतील माणसाला एवढे पैसे दिल्यावर ...... तो जागा काय मुंबई सोडून जायला तयार होतो.) तेथे मोठमोठाले इमले बांधणे मुंबईत सुरु आहे ( साला आमची हक्काची ,अधिकृत बटाट्याच्या चाळीला कोण मुंबईत विचारत नाही. पण कुर्ला बांद्रा संकुलात एक अनधिकृत बांधकाम असललेल्या वस्तीवर एका बड्या कंपनीला कार्यालय बनवायचे होते. म्हणून त्यांनी त्या झोपडपट्टी मधील लोकांना ३० ते ४० लाख वाटले ( घरटी) तेथील एक बाई आमच्या येथे धुणी भांडी करायची ती आता कुटुंबासह नवी मुंबईत नव्या घरात राह्यला गेली. आता ती कंपनी प्रतिष्ठीत होती म्हणून पैशावर निभावून नेले. हाश्मी साहेबांचा भट्ट केंप बाहेरचा हा महत्वाचा सिनेमा. सगळ्यात म्हत्वाचे काही प्रसंगात त्याचा अभिनय हा जिवंत व उस्फुर्त असतो. ह्या वर्षी त्याला एखादा तरी पुरस्कार मिळेल. ( ह्यासाठी फार फार तर स्टेज वर थोडे नाचकाम करावे लागेल ) एकताच्या आगामी सिनेमात अक्षय डी ची भूमिका करणार हा विचार असह्य करतो- हाश्मी फिट होता. सिनेमा आंजा वर पहिला जाईल- आवांतर अभय चा शांत व संतुलित अभिनय पाहता त्याचे आडनाव खरेच देओल आहे का असा कधी काही प्रश्न पडतो. कल्की चे वर्णन वाचून हसतोय मला तर ती ड्रायकुला पिडीत शोषित तरुणी वाटते.

स्वाती दिनेश 14/06/2012 - 12:53
परीक्षण आवडले. कथानक बरे वाटते आहे. परा, इतरांच्या बर्‍या कथानकांवर लिहीच तू,पण तुझी अधुरी कथानके(क्रमशः रे) कधी पूर्ण करतो आहेस? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

अमृत 14/06/2012 - 14:33
|| अधुरी कथानके(क्रमशः रे) कधी पूर्ण करणार??????????????? अमृत

अमृत 14/06/2012 - 14:32
काही कारणास्तव सध्या चित्रपट बघु शकत नसल्याने तुझ्या परिक्षणातून आनंद मानतो :-) अमृत

चौकटराजा 14/06/2012 - 14:33
मी अनेक वाहिन्यानी व वर्तमान पत्रानी नावाजला म्हणून हा चित्रपट पाहिला. कथा विशेष नाही. संवाद , व्यक्तिचित्रण अभिनय सार्‍यात उणाच आहे. तुलना कोणाशी ? अ वेडनेस डे . सगळा चित्रपट जवळ जवळ रात्रीच्या वेळी घडल्यासारखा. अभय देओल ची भुमिका चांगली असली. तरी कथानकातील गुंफण तकलादू आहे.

कुसुमिता१ 14/06/2012 - 15:44
चित्रपट सुरेख आणि एकदा तरी बघण्याजोगा निश्चितच आहे. प्रसेनजीत खुप आवडला. इंटेल्युक्चल आणि हँडसम (त्याच्या चित्रपटातील व्यक्तीरेखेला साजेसा) दिसतो. सगळ्यांची अ‍ॅक्टींग उत्तम आणि संयमीत वाटते. विशेष उल्लेख : अर्थातच अभय देवोल..बंदेमे कुछ बात है बॉस! इमरान हाश्मीच ही कौतुक!

मालोजीराव 14/06/2012 - 20:52
परीक्षण आवड्ण्यात आले आहे, नेहमीचा 'परा'टच होता ! बाकी चित्रपट बघितला (इम्रान हाश्मी आणि अभय देओल आवडते कलाकार असल्याने ), बरा वाटला.... -मालोजीराव

सहज 15/06/2012 - 07:36
शांघायचा नेमका संदर्भ काय? ते मोठे प्रॉजेक्ट तिथुन येणार असते की मुंबईचे शांघाय करायचे असे काही?

In reply to by सहज

चौकटराजा 15/06/2012 - 08:27
चित्रपटाचे नाव शांघाय नव्हे " शांघाई " असे आहे . म्हण्जे मुंबई चा अपभ्रंश . त्यात एक वाक्य गृहमंत्र्याच्या तोंडी आहे ते असे -" तो..... सी एम पी एम बनती और हम चायना से आगे जाते " चायना मधे जर खाजगी मालकीची जमीनच नसेल तर सरकार व भांडवल शहा यांच्या संगनमताने ती भांडवलशहांच्या घशात घालायचा प्रश्न तेथे उदभवला नसेल बहुदा . या चित्रपटाचा विषय च मुळी जमीनी हडपणे हा आहे. सेझ विरोधाचा त्याला संदर्भ आहे.

In reply to by चौकटराजा

प्यारे१ 15/06/2012 - 10:05
>>>चित्रपटाचे नाव शांघाय नव्हे " शांघाई " असे आहे . म्हण्जे मुंबई चा अपभ्रंश . मुंबईचा अपभ्रंश शांघाई. ओके गुरुजी. माझ्या राहिल लक्षात. ए बॅकबेंचर परा, तुझ्या लक्षात राहिल का रे?

In reply to by प्यारे१

परिकथेतील राजकुमार 15/06/2012 - 11:18
आता चौकटराजांसारखे ब्रह्मर्षी म्हणतात म्हणजे ते खरेच असणार. आंतरजालाला ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी आणि मोक्ष मिळवून देण्यासाठीच तर त्यांचा अवतार झाला आहे. १४ विद्या, ६४ कला सर्वातले सर्व ज्ञान असणारे एकमेव ज्ञानी आहेत ते. मला वाटले की विकी आणि इतर लोक्स म्हणतात तसे त्याचा मराठीतला उच्चार आणि लेखन शांघाय असेच होते, तर हिंदीत शांघाई असे होते. पण वेळीच माझी चुक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. ह्यापुढे तुम्हाला वेळ असल्यास लेखन तुमच्याकडून तपासून मगच जालावर प्रकाशित करीन म्हणतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नेहमी च्या अपभ्रंशाच्या व्याख्येने तो अपभ्रंश नाही. त्याना मुंबई या शहराच्या बदलत्या स्वरूपाच्या संदर्भात एखाद्या शहराचे नाव घ्यायचे असेल. त्यानी दुबईच्या ऐवजी हा बदलाशी जास्त साम्य असणारे शांघाई हे नाव निवडले असावे.

गणेशा 18/06/2012 - 19:36
*क मारली आणि पिक्चर ला गेलो. परिक्षण न पाहता, पहिले २-४ रिप्लाय वाचले आणि वाटले यावेळेस काहीच पिक्चर बद्दल न वाचता जाऊ या. टीव्ही तर मुंबईला पाहत नसल्याने नक्की कोण आहे पिक्चर मध्ये , काय आहे असले काही माहिती नसतेच. पण काय करणार उगाच पिक्चर ला गेलो . एक नं बकवास आहे पिक्चर.. अभय देवोल चे काम चांगले जे वरती म्हंटले आहे.. त्याला किती काम आहे त्यात .. ? १० % पण नाही.