मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक पद्धत..

गवि · · जनातलं, मनातलं
म्हणे मरणाची बातमी देणार्‍या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात.. पोस्टकार्डंच कुठे राहिली आता.. सगळीकडे ईमेल.. अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात.. आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत.. खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..? मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही... अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही .. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात .. सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही.. पण भीषण वाटतं.. निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का? बाकी मी कोर्टात कधीच गेलो नाही.. खुनाच्या खटल्यात तर नाहीच नाही.. अर्थात मी जजचं तुटणारं निब किंवा आतडं पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात.. मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. ..

वाचने 14814 वाचनखूण प्रतिक्रिया 63

चाणक्य 30/03/2012 - 14:38
हा माणूस कश्यावर लिहिल काही सांगता येत नाही. आता बोली भाषेत सहज पणे वापरली जाणारी पालुपदं - 'असेल आपली एक पध्दत' किंवा 'एकात एक' यावरही काही लिहिता येउ शकतं हे आमच्या टकुर्‍यात येणार पण नाही. पण हा माणूस लिहिणार...आणि लई भारी काहीतरी लिहिणार. अवघड आहे.

अत्रुप्त आत्मा 30/03/2012 - 14:40
@गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. >>> ग.वि. काटा आला हो अंगावर,अता मुर्दाड व्हायच्या जमान्यात हे असले घाव सोसत नाहीत हो... :-(

In reply to by वपाडाव

कोपरे कापण्याचं पहिल्यांदाच वाचलं.. 'श्री' शिवाय आणि लाल शाईतलं पोस्टकार्ड आलं की घरात उदासी पसरायची हे आठवतंय.. शाळेत लिहायला सांगितलेली, घरची पत्रे लिहिताना 'श्री' लिहायचं राहून गेल्याने खाल्लेल्या चापट्या पण आठवत आहेत.. ;-)

सुहास.. 30/03/2012 - 14:45
अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. >>> बरचं पुनर्वसन झालय आता, गवि, पुन्हा स्मरण रंजन ? काका म्हणायला सुरूवात करावी वाटते ;)

In reply to by सुहास..

बरचं पुनर्वसन झालय आता,
वा.. चांगलंच.. प्रश्नच नाही तर मग.. :)
गवि, पुन्हा स्मरण रंजन ?
..एक आपली पद्धत.. :) ( पंचवीसेक वर्षांपूर्वी अवचटांनी वाघ्या मुरळी / देवदासींवर लिहिलं तेव्हाही त्यांची आधी पक्की समजूत होती की ती प्रथा आता जवळजवळ संपली.. त्यांनी तसं लिहूनच सुरुवात केलीय.. मग जसजसे पाहात गेले तसं वारुळ फुटून एकदम लाखो मुंग्या बाहेर याव्यात तशा या व्यक्ती दिसायला लागल्या.. पुनर्वसनाचे प्रयत्न चालू आहेत हे जरुर खरं.. पण प्रथेविषयी.. "आता ते संपलंय" किंवा "कमी झालंय" अशी आपली समजूत असणं हीच जुन्या काळापासूनची ट्रॅजेडी आहे.. आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय...... यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल.. )

In reply to by गवि

सुहास.. 30/03/2012 - 17:48
एक आपली पद्धत.. >> :) यात वाचकांपैकी कोणी त्यांचं आयुष्य जवळून पाहिलेलं नसेल असं म्हणण्याचा उद्देश नाही.. कदाचित त्यांच्यासाठी काम करणाराही कोणी इथे असू शकेल. इथे आहे की नाही ते माहीत नाही, पण पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )

In reply to by सुहास..

विश्वनाथ मेहेंदळे 31/03/2012 - 15:04
पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल तिथ, आणी तिथल इथ नाव घेण चांगल दिसत नाही ..असो )
बरा मुद्दा काढलात. कित्येक दिवसांपासून मनात होते विचारायचे. मराठी संस्थळांवर इतर संस्थळांची नावे का घेतली जात नाहीत ? सरळ, उपक्रमावर एक गृहस्थ आहेत, किंवा ऐसी वर कुणी आहे, मनोगतावर काही जण आहेत, असे म्हटले तर काय बिघडते? एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रास 31/03/2012 - 15:43
सहमत.
एका संस्थळावर इतर संस्थळांची बदनामी होऊ नये हे ठीक आहे. पण चांगले लिहिताना नावे का घेऊ नयेत? त्या मागे काही ठोस कारण आहे की ही पण "आपली एक पद्धत" ???
बुल्साय....!

इरसाल 30/03/2012 - 14:53
हे खरेच आहे मयताची बातमी लिहुन पाठवताना कार्डाचा कोपरा कापून पाठवतात. १. आणी जर लग्नासाठी कार्ड असेल तर त्यावर कुंकवाच्या पाण्याचे शिंतोडे मारुन पाठवतात. (कार्ड = पोस्टकार्ड) हे वाचण्यासारखे आहे. २. इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे)
इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक माणुस आहे. तो जमिनीचा व्यवहार झाला की, ज्या सिम्कार्ड वरुन बोलणे वगैरे फायनल झाले तेच तोडुन टाकतो.(आताशा ७/८ कार्ड तोडलेत म्हणे) >> आयला खरच की काय ? मी पण घरात नाष्ट्याची प्लेट संपली की किचन च्या वॉश बेसीन मध्ये ठेवतो, माझी पध्दत कशी कोणाला ठावुक नाही ;)

प्रास 30/03/2012 - 15:09
फारच सुंदर मुक्तक गवि! अत्यंत कमी शब्दांमध्ये अपेक्षित असा टोकदार परिणाम करवण्याचं तुझं कसब जबरदस्त आहे. ही मात्र खास तुझीच पद्धत.....

विसुनाना 30/03/2012 - 15:14
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
या ओळी चिरफाड करणार्‍या.

स्मिता. 30/03/2012 - 15:37
शेवटपर्यंत वाचता वाचता मनाला कितीतरी यातना झाल्या... या पद्धती लवकरात लवकत बंद पडाव्या!

बॅटमॅन 30/03/2012 - 15:49
गविभौ, अल्टिमेट हो...._/\_ कमीतकमी शब्दांत आदर व्यक्त करायची आपली एक पद्धत :)

सहज 30/03/2012 - 15:52
मुक्तक छान आहे. असेच अजुन काही सुचले काही दिवसांनी की परत लिहता येईल. पोस्टकार्डची ही पद्धत माहित नव्हती. बाकी मनुष्य हा मुळात हिंस्त्र पशु आहे, दुर्बलांचे सबलीकरण झाले की तो उरलेले दुर्बल शोषणाकरता शोधायला लागतो. सहज (तेंडुलकर)

परिकथेतील राजकुमार 30/03/2012 - 15:54
मुक्तक आवडले हो गवि. भिकार लिखाणाच्या लाटेत काहितरी सकस वाचण्याचे समाधान लाभले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आबा 30/03/2012 - 23:37
+१ सुरेख, गवि ... __/\__

प्यारे१ 30/03/2012 - 15:56
ओ गवि... ही डोक्याला शॉट पद्धत बरी नव्हे... डोक्यात भुंगे पोखरत राहतात नुसते. शेवट तर अंगावर येतोय. दु:खद बातमी असेल तर पोस्टकार्ड दोन ओळींमध्ये लिहून मायना आणि शेवट पण न करता पाठवले जायचे. पत्रिका हळदकुंकवाची बोटे लावून पाठवली जायची.

चिगो 30/03/2012 - 16:37
सलाम, मालक.. काटेरी लिहीलंय अगदी.. __/\__ मागे एकदा लोकप्रभात जटा सोडवणार्‍या व जटा होण्यामागची तार्कीक/वै़ज्ञानिक कारणे सांगून जनजागृती करणार्‍या लोकांबद्दल लेख वाचला होता..

तिमा 30/03/2012 - 18:21
आवडले गवि. त्या जुन्या 'घालून घालून होईल सैल' (चप्पल) या कवितेची आठवण झाली.

अमृत 30/03/2012 - 18:26
आता आणखी वेगळी प्रतिक्रीया काय देणार? अमृत

सुहास झेले 30/03/2012 - 18:46
तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं....
प्रचंड त्रास झाला वाचताना :( :(
दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख आणि त्यावर कवडीमोल उसासे सोडणारे वाचक पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. :( संधी असती तर गविंच्या हातून हे वरंच लिहिलेला ड्राफ्ट हिसकाऊन घेऊन फाडून टाकला असता.

In reply to by यकु

दुसर्‍याच्या दु:खाचा एवढा उडत उडत चवीपुरता केलेला उल्लेख >>>> अगदी तस्संच करायचं होतं यकु. तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..

In reply to by यकु

श्रीरंग 30/03/2012 - 20:32
पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. अश्यासारख्या ओळींमुळे हे एक डार्क सटायर (नेमका शब्द सुचत नाहिये) असावे असे वाटले. थोडक्या शब्दांत वाचणार्यांच्या अंगावर सर्रकन काटा आणण्यामधे गवी चांगलेच यशस्वी झालेत. त्यामुळे चवीपुरता दु:खाचा विनाकारण वापर केलाय असं वाटत नाही.

In reply to by गवि

प्रदीप 31/03/2012 - 16:36
तो "उडत उडत"पणा च ... तुला ते जाणवलं पण उलट बाजूने..
मला तो 'उडत' आलेला उल्लेख वास्तवाचे चरचरीत (बिकांनी काय अचूक विशेषण वापरलंय!) भान आणणारा आणि मुद्दामच संदिग्ध ठेवलेला वाटला. खरे तर हे शेवटचे देवदासींचे नॅरेशनच मुख्य थीम आहे, त्या अगोदरचे सगळे प्रास्तविक म्हणून प्रयोजिले होते असे वाटले.

स्वाती दिनेश 30/03/2012 - 18:56
शेवटचा परिच्छेद वाचून स्तब्ध झाले, स्वाती

अश्फाक 30/03/2012 - 19:19
नीब तोडतात ते खरे असते , याचे कारण म्हनजे त्या लेखनीने आता या पेक्षा जास्त निर्दय लिहू शकत नाही. बाकी इतर लेखन नेहमी प्रमाने मस्त.

५० फक्त 30/03/2012 - 21:07
आवडलं, या आणि अशा पद्धतीमुळं आपलं आयुष्य भरुन गेलेलं आहे, त्यातल्या काही श्रद्धा होतात काही अंधश्रद्धा. श्रद्धेच्या प्रकाशाचा कवडसा हसवुन जातो, अन अंधश्रद्धेचं बाराचं उन डोकं भाजुन टाकतं, पण टळत दोन्ही नाही, कारण असं ट्ळावं ही पद्धत नाही.

sneharani 31/03/2012 - 10:29
मस्त झालयं मुक्तक! :)

जेनी... 31/03/2012 - 10:41
गवि , सुंदर मांडणी . सगळ्याच कडव्यात कधीच अनुभव न घेतलेली व्यक्ति फक्त ऐकुन असनार्‍या गोष्टिंचा कसा आणि कुठ्वर विचार करु शकते ,ह्याच खूप सुंदर सादरिकरण केलयं. मनापासुन आवडलं. :)

मृत्युन्जय 31/03/2012 - 10:43
आई गं. वाचताना चढत्या क्रमाने कसेतरी झाले हो गवि. मन हेलावुन टाकणारे लेखन आहे. तुम्ही कुठलाही लेखनप्रकार त्याच कसबाने हाताळता. अभिनंदन आणि धन्यवाद.
गवि साहेब, तुम्हाला हात जोडुन नमस्कार. खरच अप्रतिम कविता आहे. ह्या कवितेत मुख्यता ह्या शेवटच्या कडव्यात समाजाचा वाईट पणा उघड केला आहेत. म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात.. मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं.. पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक.. जटबिट येण्याचा प्रश्नच नाही.. अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. हे शेवटच कडव एक स्वतंत्र कविता होइल एतक जबराट आहे. (माणुस म्हणुन जगताना नेहमिच समाजातिल दांभिकपणामुळे दुखावणारा..) निश

निनाद 31/03/2012 - 12:48
निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का?
किंवा
मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही.. तिचा फक्त देव.. म्हणजे कोणीच नाही ना...? गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
हे लेखन खाली जाईल मग परत वर दिसणार नाहीच अशी वाट पाहत होतो. आत्मवंचना आणि स्वतःची फसवणूक करणंही फार काळ जमले नाही... एकदा वाचल्यावर जी खिन्नता आली ती जातच नव्हती, अजूनही गेली नाही.

पक्या 01/04/2012 - 04:05
मुक्तक / काव्य आवडले. शेवटचा परिच्छेद वाचून अंगावर काटा येतो. पण तरिही एक जाणवलं की शेवटची ओळ ''पण असेल.. आपली एक पद्धत.." ही नको होती. त्या आधीच्या कडव्यांमधे उल्लेख केलेल्या पारंपारिक पध्द्तींना असेल आपली एक पध्दत म्हणून आपला तटस्थपणा दाखवता येतो. त्या ठिकाणी हे पालुपद कवितेच्या दॄष्टीने वाचकाची पकड घेतयं . पण शेवटच्या परीच्छेदात 'असेल आपली एक पध्दत' म्हणण्या इतपत तटस्थपणा चांगला वाटत नाही. माणसाचं मन हळहळ सुध्दा व्यक्त न करण्या इतपत मुर्दाड झालेलं असेल ह्यावर विश्वास नाही. त्यापेक्षा - अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही.. ..पण असेल.. आपली एक पद्धत.. असं म्हणवत देखील नाही ' असं किंवा अजुन काहितरी वेगळं हवं होतं असं वाटतं. आपल्या लेखनाचा चाहता आहेच त्यामुळे अजून असेच मनाची पकड घेणारे लेखन वरचेवर करावे ही विनंती.

समीरसूर 02/04/2012 - 17:20
गविंच्या लिखाणाला खरं म्हणजे जिवंत, सणसणीत अनुभवच म्हणायला पाहिजे. म्हणजे वाचल्यानंतर अक्षरशः त्या अनुभवातून स्वतः गेल्यासारखं वाटतं...बाकी त्यांच्या लिखाणाला लिखाण, लेख, मुक्तक वगैरे म्हणायचं...आपली एक पद्धत!!! एक नंबर लिखाण!!!

अत्रन्गि पाउस 21/04/2015 - 07:53
समग्र ग वी पुन्हा वाचून काढण्यात येत आहेत ...