मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यातील 'माणिक' हरपलं ....

सुहास झेले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल - ग्रेस कवी ग्रेस यांचं आज पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्याच महिन्यात कवी ग्रेस यांना अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कवी ग्रेस ह्यांना भावपूर्ण आदरांजली... :( :(

वाचने 5920 वाचनखूण प्रतिक्रिया 29

सगळ्याच जुन्या/नव्या संकल्पनांना हादरा देऊन स्वतःचा असा एक नवा प्रवाह निर्माण केलेला एक प्रतिभासंपन्न ज्ञानी,योगी महाकवि म्हणजे ग्रेस प्रथम त्यांच्याच दोन ओळींनी त्यांना श्रद्धांजली देऊ--- मी महाकवि दु:खाचा,प्राचीन नदीपरि खोलं...। दगडाचे माझ्याहाती वेगाने होते फूलं...॥ साजणवेळा या त्यांच्याच गीतांच्या कॅसेटच्या प्रकाशनावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातीलं काही ओळी... ''माझ्या कवितेशी थांबणार्‍या माझ्या रसिकाचे काय होत असेल? याची कल्पना मी करु शकत नाही.'गाईच्या दुधाला आच दिली की साय धरणार' असे निर्मितीचे साधे कोष्टक घेऊन तो उभा रहात असावा..पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतेच कोठे..?,ती म्हणुन टाकते--'चंदनाच्या झोपाळ्याला,इंधनाचे भय,वाघिणीच्या दुधावर आली कशी साय'... माझी कविता हे एक बेटच आहे,मी ही एक बेटच आहे...बेटावर माणसे सफरीसाठी येतात,किंवा समुद्र जिवावर उठला तर... माझ्या कवितेच्या बेटावर येणार्‍या काव्यरसिकाला परतीच्या बोटीची कुठलिही हमी मी देऊ शकत नाही...परतावेसे वाटले तर स्वतःच होडी झाले पाहिजे... !'' हे ग्रेस यांचं व्यक्त मनोगत... विचारांना थक्क करणारी प्रतिभा... साध्या बोलण्यातच इतकी विलक्षण जादू होती...आंम्ही सारे ग्रेसप्रेमी वेड्यासारखे ऐकत होतो... त्यानंतर आजपर्यंत त्यांनी वरिल शब्दांमधुन रसिकांना करुन दिलेली जाणिव आजही माझ्या स्मरणात आहे... त्यांच्या काव्यावर दुर्बोधते विषयी केलेल्या आरोपांना त्यांनी दिलेले उत्तर असेच थक्क करुन सोडणारे आहे... '' कर्णाला ज्याप्रमाणे जन्मतःच कवचकुंडले मिळालेली होती,तशी माझ्या काव्याला जन्मतःच दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे...माझी कविता जगता जगता वाढेल..तोच तिचा... वंश-वृक्ष...!''

प्यारे१ Mon, 03/26/2012 - 11:48
अरेरे.... ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस.... भय इथले संपत नाही... आणि बर्‍याच बर्‍याच छान कविता... कॅन्सरशी लढून जवळपास जिंकलेला लढवय्या कवी. भावपूर्ण श्रद्धांजली.

विसुनाना Mon, 03/26/2012 - 12:00
कवि ग्रेस यांना श्रद्धांजली. या लेखाचे नाव "मराठी कवितेतला ग्रेस गेला" असे अधिक भावले असते. माणिक गोडघाटे हे नाव तसं त्यांनीही कधी साहित्यक्षेत्रात 'वापरलं' नाही. वापरलं या शब्दावर स्लेष आहे.

अमृत Mon, 03/26/2012 - 12:03
चांदणे तुझ्या स्मरणाचे... भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते.... :-( देव त्यांचा आत्म्याला शांती देवो... (शोकाकूल)अमृत

मृत्युन्जय Mon, 03/26/2012 - 12:22
वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता...... त्यांनी लिहिलेले बरेच झेपले नाही पण जे काही लिहिले आहे ते उच्च आहे इतके नक्कीच समजले होते. एका महान कवीला सलाम आणि श्रद्धांजली.

सागर Mon, 03/26/2012 - 12:42
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली ग्रेस यांच्या 'संध्याकाळच्या कविता' अजूनही मनांत रेंगाळत आहेत. तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पणती लावून देतो आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात… "संध्याकाळच्या कविता" - ग्रेस