Skip to main content

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

Published on रवीवार, 19/02/2012
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत) छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली. तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद - पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे नोंदणी जीनस - जगदंबा तलवार जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही जगदंबा मेणावर तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १० एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७ मिळून सबंध तलवार. चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते. हि तलवार सध्या रॉयल कलेक्शन लंडन येथे असल्याचे सांगण्यात येते.परंतु तेथे संपर्क साधला असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही रॉयल कलेक्शन कडून आलेला प्रतिसाद ----------------------------------------------------------------- शिवछत्रपतींची जन्मपत्रिका ! जोधपुर च्या राज घराण्याचे ज्योतिषी शिवराम पुरोहित यांनी बनवलेली हि छत्रपती शिवरायांची जन्मपत्रिका .हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने मिर्झाराजा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी. (सदर पत्रिकेच्या उगमाबद्दल आणि विश्वासार्ह्यते बद्दल शंका आहे) ------------------------------------------------------------------ औरंगजेब साहेबांच्या तारुण्यातले हे चित्र कोलंबिया विद्यापीठाच्या सौजन्याने ----------------------------------------------------------------- मुघल तख्त आणि मयूर सिंहासन मयूर सिंहासन - सध्या हे तेहरान मध्ये आहे मुघल तख्त ------------------------------------------------------------------- अफझलखान रॉयल एशियाटिक सोसायटी च्या सौजन्याने अफझलखानाची शिवाजी महाराजांवर स्वारी म्हणजे एक राजनैतिक मोहीम होती. बादशहाच्या एका सेनापतीने जहागीरदारपुत्राचा पुंडावा मोडून काढण्यासाठी केलेली मोहीम.मुळात अफझलखान स्वत: वाई चा सुभेदार असल्याने हे बंड मोडणे हि त्याचीच नैतिक जबाबदारी होती.खानाबरोबर अनेक हिंदू सरदार होते ते दुखावू नयेत म्हणून खानाने कुठेही हिंदू देव देवतांची विटंबना केल्याचे पुरावे नाहीत.नंतर च्या काळात अनेकांनी यात खानाने विडा उचलला,मंदिरे उध्वस्त केली या गोष्टींची नको ती भर घातली. या युद्धात मराठा सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी शिवराय आणि खान दोघांनी प्रयत्न केले... अनेक मराठा सरदारांना तर शिवरायांकडून आणि खानकडून दोघांकडून पत्रे आलेली होती.ज्याला जी बाजू योग्य वाटली तो त्या बाजूने लढला. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे शिळीमकर बंधूंमध्ये वाद होते त्यात मध्यस्थी करून महाराजांनी मोठ्या भावाच्या बाजूने कौल दिला,त्यामुळे युद्धात दोन्ही बाजूने आमंत्रणे आल्यावर मोठा भाऊ शिवाजी गटात तर लहान भाऊ जो या निवाड्याने दुखावला गेला होता तो खानच्या गटात सामील झाला. खंडोजी खोपड्याने महाराजांच्या बाजूने लढताना फाजाल्खानाला पैसे घेऊन जिवंत सोडून दिले, जर आताच योग्य शासन केले नाही तर भविष्यात हि चूक सरदारांकडून पुन्हा पुन्हा होईल म्हणून जरब बसेल या दृष्टीने साहेबांनी खंडोजी खोपड्याचा चौरंग केला. (प्रतापगड युद्धावर तपशीलवार लेख पुन्हा केव्हातरी) कवी भूषण अफझलखान वधाचे वर्णन शिवराज भूषण मध्ये करतात- दानव दगा करी जावली दिह भयारो महामद भारयो | भूषण बाहुबली सर्जा तेहि भेटिबे को निरसंक पधारयो || बिछु के घाय गिरे अफज्ल्ह्ही उपरही सिवराज निहारयो | दबी यों बैठ्यो नरिंद अरिन्दही मानो मयंद गयंद पछारयो || कवी भूषण अनेक जन या युद्धात भाग घेतल्याने काहीतरी मिळेल या उद्देशाने सामील झाले होते, अफझल खानाचे डोके कापून आणणारा कावजी कोन्ढालकर शिरवळ ची देशमुखी मागत होता ती न मिळाल्याने नाराज होऊन तो नंतर शास्ता खानाला सामील झाला ------------------------------------------------------------------------------- सुरत लुट सुरतेची लुट म्हणजे एक नियोजनबद्ध हल्ला होता, आणि मोगल प्रशासनावर बसलेली जोरदार चपराक होती, पुरंदर च्या तहामुळे जी अपरिमित हानी झाली होती ती भरून काढण्याचा छत्रपतीन्समोर हा एकमेव जवळचा मार्ग होता. हेर्खात्यातील कित्येक जण सुरतेला जाऊन रेकी करून आले होते...शेकडो पानांचा अहवाल सुरत शहराच्या ब्लू प्रिंट सह महाराजांना सादर केला होता. त्यामुळेच हि लुट यशस्वी होऊ शकली,या अहवालामुळे सुरतेच्या मोठ्या व्यापाऱ्यांची,सरंजाम लोकांची नावे,पत्ते कळले आणि त्यामुळे सामान्य जनतेला याचा त्रास न होता खंडणी लवकर गोळा व्हायला मदत झाली.त्याच प्रमाणे इंग्रज,डच,फ्रेंच,पोर्तुगीज या वखारवाल्यांकडून मोठी खंडणी घेण्यात आली.पुरंदर तहात जेवढी खंडणी द्यायला लागली त्याच्या ४-५ पट रक्कम सुरत लुटेतून मिळाली. जागतिक इतिहासात हि घटना अत्यंत महत्वाची मानली जाते,कारण या लुटेची दखल युरोपातील अनेक वर्तमानपत्रांनी घेतली. लंडन गाझेट या वर्तमानपत्रात आलेली बातमी (इ.स.१६७२) ----------------------------------------------------------- मिर्झाराजा जयसिंह महाराजा रामसिंह -------------------------------------------------------------- शिवराय डच चित्रकाराने काढलेले चित्र सरसेनापती आणि महाराणी सोयराबाई यांचे बंधू हंबीरराव मोहिते शिवकालीन पत्र निकोलाय मनुची - मोगल तोफखान्याचा प्रमुख, पुरंदर युद्धाच्या वेळी मिर्झा राजाबरोबर होता.याला शिवरायांना जवळून पाहण्याचा बोलण्याचा योग आला असे त्याने त्याच्या पुस्तकात 'Storia de Mogor' मध्ये लिहिले आहे . कॉसमो दि गार्डा या पोर्तुगीज इतिहासकाराने शिवरायांवर प्रभावित होऊन पुस्तक लिहिले --------------------------------------------------------------- संभाजीराजे राजा कसा असावा याबद्दल नृपशंभू (संभाजी महाराज) लिहितात - शास्त्राय गुणसंयोग: शास्त्रं विनयवृत्तये । विद्याविनीतो नृपति: सतां भवति संमतः ।।१।। शास्त्रासाठी गुणांचा समन्वय नम्रवृतीने शास्त्राभ्यास, असा विधेने नम्र झालेला (विजयी) राजा सर्व संज्जनांना आवडत असतो. मेधावी मतिमानदिनवदनो दक्ष: क्षमावानृ ऋजु- ध्रम्रात्माप्यनसूयको लघुकर: षाड्गुन्यविच्क्षक्तीमान । ऊत्साहि पररंध्रवित्क्रूतधृतिवृद्विक्षयस्थानवित्त शुरो न व्यसनी स्मरत्युपकृतं वृद्धोपसेवि च यः ।।२।। शब्दार्थ : दिनवदन - गरिबांच्या दु:खांना बोलके करणारा । ऋजु - सरळ । अनसूयक - द्वेष न करणारा । लघुकर - अल्पकर घेणारा । षाड्गुण्यार्वद - राजनीतीचे ६ गुण जाणणारा , कृतधृतिवृद्विक्षयस्थार्नावत्त - धर्याने कुठे जोराने तर माघार घ्यायची जाण असलेला । इतका प्रचंड दूरदृष्टी असलेला,रयतेला जपणारा जाणता राजा महाराष्ट्राला लाभला ! या शिवजन्मदिनी माझ्या लाडक्या राजाला मनाचा मुजरा ! ----------------------------------------------------------------------- वरील माहिती व चित्रे साभार - कोलंबिया विद्यापीठ , कॅलीफोर्निया पिक्चर लायब्ररी, रॉयल एशियाटिक सोसायटी , ब्रिटीश लायब्ररी , भारत इतिहास संशोधक मंडळ , बुधभूषण
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 39255
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

माहिती आणि चित्रांसाठी धन्यवाद! पण अफजलखानाबद्दल रियासतकार सरदेसाई आणि बाबासाहेब पुरंदरे हे दोघेही लिहितात , की त्याने तुळ्जापूर आणि पंढरपूरची देवळे फोडली. शिवाय शहाजीराजांविरुद्ध कारस्थान करून त्याना कैदेत टाकणार्‍यात अफजलखा होता, तसाच शिवरायांचे थोरले बंधू संभाजी यांच्या मृत्यूला कारण झाल्याबद्दल जिजाबाई आणि शिवरायांचा खानावर राग होता. (तुमच्या संभाजी राजांवरील पुढच्या लेखाची वाट पहात आहे)

In reply to by पैसा

शहाजीराजांविरुद्ध कारस्थान करून त्याना कैदेत टाकणार्‍यात अफजलखा होता, तसाच शिवरायांचे थोरले बंधू संभाजी यांच्या मृत्यूला कारण झाल्याबद्दल जिजाबाई आणि शिवरायांचा खानावर राग होता
याबद्दल दुमत नाही ! पण त्याने तुळ्जापूर आणि पंढरपूरची देवळे फोडली याबद्दल कोणतेही तत्कालीन पुरावे उपलब्ध नाहीत.,मुळात युद्धामध्ये आदिलशाही सैन्याकडून भाग घेणारे जे मराठा सरदार होते त्यातल्या बर्याच सरदारांचे वजन दरबारात अफझलखाना पेक्षा जास्त होते...मनसबदारीसुद्धा मोठी होती.त्यामुळे खान आपल्या seniors समोर असली आगळीक नक्कीच करणार नाही. सरदार मंबाजी भोसले,नाईक इंगळे,सरदार घाटगे,निंबाळकर,जाधवराव,नाईक पांढरे,सरदार महादजी जगदाळे,घोरपडे इ. मातब्बर आणि वजनदार सरदार,मनसबदार आदिलशाही सैन्यात होते. -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

तुळ्जापूर आणि पंढरपूरची देवळे फोडली याबद्दल कोणतेही तत्कालीन पुरावे उपलब्ध नाहीत मराठी साम्राज्याची छोटी बखर, चिटणीसांच्या बखरीत उल्लेख आहेतच आणि सर जदुनाथ सरकारही लिहितात की, अफजलखान विजापुरपासून निघाल्यानंतर त्याने पंढरपूर, जेजूरी, तुळजापुरला येऊन लुटालुट केली देवळं तोडली असे म्हणतो आपण पुरावे उपलब्ध नाहीत म्हणत आहात ते कशावरुन आणि कोणत्या संदर्भावरुन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजापुर ते पुणे किंवा प्रतापगड या मार्गावर जेजुरी, पंढरपुर हे सहज शक्य वाटतात, परंतु तुळजापुर हे एकदम दुस-या दिशेला आहे या मार्गाच्या, फक्त देवळांच्या तोडफोडीसाठी अशी उलट सुलट तंगडतोड केली असेल असं वाटत नाही, नंतर हा मसाला भरला असला गेल्याची शक्यता आहे. अर्थात माझ्याकडे या बाबतचा काही पुरावा नाही.

In reply to by ५० फक्त

प्रत्यक्ष आपली दहशत बसावी म्हणून खानाने आपली वेगवेगळी दलं निर्माण करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यात तो स्वत: प्रत्येक ठिकाणी उपस्थित होता (की नव्हता) आणि त्याच्या देखरेखीखाली मंदिर, मूर्त्या नष्ट केल्या गेलीत असं काही नाही. पण, हे झालं खर. असं सर जदुनाथ विविध संदर्भावरुन म्हणतात. आमचे बखरखार मोठं रम्य वर्णन करतात पाहा सभासदाच्या बखरीतलं वर्णन- ' शिवाजी काय ? चढे घोडियानिशी जिवंत कैद करुन घेऊन येतो. असे बोलिलियावरि पादशाहाजादी खुशाल होऊन वस्त्रे, अलंकार, हत्ती, घोडे, इजाफा , देऊन नावाजिक बरोबर उमराव जमाव बारा हजार स्वार, खेरीज पायदळ रवाना केले. तेव्हां अवघी फौज एकत्र होऊन चोरस लष्कर उतरले. आणि पुढे तुळजापुरास आले तेथे मुक्काम केला. श्री भवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून, जातियांत घालून भरडून पीठ केले. (पुढे आकाशवाणी झाली वगैरे) पुढे लष्कर कूच करुन श्रीपंढरीस आले. भीमातीरीं उतरले. देवास उपद्रव देऊन वाईस आले........इ..इ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरुटे सर म्हणूनच मी प्रतिसादात 'तत्कालीन' या शब्दावर जास्त भर दिला ! चिटणीस बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर या शिवोत्तरकालीन आहेत, सर जदुनाथ सरकार यांनीही मराठ्यांचा इतिहास लिहिताना मूळ कागदपत्रांपेक्षा बखारींवर जास्त भर दिला त्यामुळे बर्याच त्रुटी राहिल्या...त्या त्रुटी नंतर सेतुमाधव पगडी यांनी दूर केल्या . - मालोजीराव

In reply to by मालोजीराव

माझ्या हातात आत्ता रियासतकार सरदेसाईंचे 'राजा शिवाजी' आहे. त्यात त्यानी अफझुलखानाने तुळजाभवानीची मूर्ती फोडली असा स्पष्टच उल्लेख केला आहे. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुस्तकातही तुळजाभवानीची मूर्ती घणाखाली आली असं वाचलेलं आठवतंय. गुगल बुक्स वर शोधले असता सातारा गॅझेटियर आणि भारत सरकारच्या आर्काईव्ह्ज मधे असे उल्लेख आहेत. या मूर्तीभंजनानंतर खानाने कान्होजी जेध्याना पत्र पाठवले त्यात आणि इतरत्र स्वतःला बुतशिकन म्हणून घेतले आहे. @हर्षद, खान काही सरळ विजापूरहून निघून वाईला येऊन पोचला नसणार. त्यात मला वाटते, सोलापूर- तुळजापूर अंतर फक्त ४५ कि.मी. आहे. जास्त माहिती इतिहासाचे तज्ञ देतीलच.

In reply to by मालोजीराव

सर जदुनाथांनी कोणत्या बखरी अभ्यासल्या, कोणत्या कागदपत्रांचा अभ्यास केला. कोणत्या इंग्रज लेखकांच्या पत्रव्यवहारावरुन त्यांनी मतं मांडली तो वेगळा विषय आहे. आपण जे म्हणत आहात ना ''खानाने कुठेही हिंदू देव देवतांची विटंबना केल्याचे पुरावे नाहीत'' याचे काय आधार आहेत असे मला विचारायचे आहे. कारण आत्तापर्यंत वाचण्यात आलेलं ते हेच की, खानाने आपली दहशत बसावी. राजे घाबरुन जावे म्हणुन आपल्या सैन्याला सांगुन हे सर्व उपद्व्याप केलेलेच आहेत तेव्हा आता तसे पुरावे नाहीत म्हणजे नवीन कोणते पुरावे आले आहेत ते समजून घ्यायला आवडेल. -बरुटेसर (आपला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरुटेसर बखरकारांनी प्रसंग रोमांचित करण्यासाठी ...खानाने विडा उचलला,मूर्तीभंजन केले वगैरे प्रसंग घातले ! आणि तत्कालीन पुरावे उपलब्ध नाहीत याला काय पुरावा देणार.... बखरकारांनी संभाजीला जसे दारूबाज आणि छंदिष्ट ठरवले...तेच चित्र नाटक आणि कादंबर्यात रंगवले गेले... नंतर हेच कादंबरीकार विचारत सुटले कि संभाजी दारूबाज नव्हते याचा पुरावा काय ? ...आता 'पुरावा नाही ' याला काय पुरावा देऊ तुम्हीच सांगा ;) -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

अफजलखान राजे शिवाजींना विजापुरहुन केवळ प्रेमानं भेटायला आला होता. किंवा पर्यटन करता-करता महाराजांच्या ताब्यात असलेले प्रदेश सहज ताब्यात घ्यावेत असाही इरादा असावा. राजे, देत नसलेले प्रदेश शिष्टाई करुन मिळवावेत. आणि मी तर आता चर्चेचा संवाद पाहता या निष्कर्षावर येत आहे की, राजेंना अन्य कोणाचा तरी कोथळा काढायचा होता पण चुकुन खानाचा कोथळा काढला असे वाटायला लागले आहे. :) असो, मी या चर्चेपूरती आपली रजा घेतो. पुलेशु. - बरुटेसर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> अफजलखान राजे शिवाजींना विजापुरहुन केवळ प्रेमानं भेटायला आला होता. किंवा पर्यटन करता-करता महाराजांच्या ताब्यात असलेले प्रदेश सहज ताब्यात घ्यावेत असाही इरादा असावा. राजे, देत नसलेले प्रदेश शिष्टाई करुन मिळवावेत. आणि मी तर आता चर्चेचा संवाद पाहता या निष्कर्षावर येत आहे की, राजेंना अन्य कोणाचा तरी कोथळा काढायचा होता पण चुकुन खानाचा कोथळा काढला असे वाटायला लागले आहे.>>>> पुढे कदाचीत असाहि निश्कर्ष निघेल कि, महाराजांना कृष्णाजी भास्करास मरावयाचे होते पण खान साहेब मधे पडले... :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खान महाराजांना मारायला आलेला, वाई चा सुभेदार असल्याने शिवरायांचे बंड त्यालाच मोडावं लागणार होता, अफझल क्रूर होता,धूर्त होता,हिंदू द्वेष करणारा हि होता...कर्नाटक मोहिमेत त्याने मूर्तीभंजनाचे काही कार्यक्रम केल्याने तो स्वताला बुतशिकन म्हणवून घ्यायचा ! माझा मुद्दा एव्हडाच आहे कि ज्या गोष्टी नंतर टाकल्या गेल्या बखरींमध्ये त्यांचे रुपांतर इतिहास म्हणोन होऊ नये. मोगल सरदारांचे आणि मराठ्यांचे स्नेहबंध इतके चांगले होते कि प्रतापगड युद्धाच्या आधीची राजकीय पार्श्वभूमी कळाली तुम्हाला तर तुम्हीही चक्रावून जाल...झाकली मुठ सव्वा लाखाची ;) -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

कर्नाटक मोहिमेत त्याने मूर्तीभंजनाचे काही कार्यक्रम केल्याने तो स्वताला बुतशिकन म्हणवून घ्यायचा
अच्छा! पण मग त्यावेळेस आदिलशहाच्या दरबारातील मातब्बर मराठा सरदारांची प्रतिक्रिया किंवा तत्कालिन आदिलशहा जो अतिशय सहिष्णु होता त्याची प्रतिक्रिया किंवा त्या मूर्ती फोडताना मातब्बर मराठा सरदार दुखावतील की कसे याबद्दल खानसाहेबांना काही वाटले का इत्यादी मुद्द्यांवर तुमच्या इतिहासात काही आहे का? बहुतेक असेही असावे की मूर्ती फोडल्या त्या कर्नाटकातल्या. त्यामुळे मराठा सरदार चिडण्याची शक्यता नसावी. महाराष्ट्र कर्नाटक वाद आहेच त्यामुळे त्यांच्या तिथल्या मूर्ती फोडल्या तर आपल्याला काय करायचंय असंही मराठा सरदार म्हणले असावेत. शक्यंय! आता इतिहासात सगळंच शक्य झालंय म्हणा!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बहुतेक असेही असावे की मूर्ती फोडल्या त्या कर्नाटकातल्या. त्यामुळे मराठा सरदार चिडण्याची शक्यता नसावी. महाराष्ट्र कर्नाटक वाद आहेच त्यामुळे त्यांच्या तिथल्या मूर्ती फोडल्या तर आपल्याला काय करायचंय असंही मराठा सरदार म्हणले असावेत.
मग आता कसं बोललात ! सिर्फ महाराष्ट्रके सरदारोमे दम हैं , बाकि सब कर्नाटक वाले पानी कम हैं !

In reply to by मालोजीराव

ही उपचर्चा म्हंजे कहर आहे. खानाने ऐन युद्धात दगा देत शिवाजींचे मोठे बंधू संभाजी ह्यांचा घात केला, इतरही वेळेस भोसल्यांना विनाकारण सतावले हेही खरेच. पण कधी कधी त्या लढाईचे वर्णन अतिरंजित होते आहे असे वाटते. अर्थात हेही शिवप्रेमामुळेच होते ह्यात संशय नाही.

In reply to by जोशी 'ले'

बरं झालं ते कंसात (स्वताची) लिहिलंत ते , हो अजुन शे पाचशे वर्षांनी तुमचं डोकं फोडणारी स्माईली कुणी टाकली यावर पुन्हा वाद नको व्हायला.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिकाशी सहमत आहे. मध्यंतरी ग्रॅफीटी वाचली होती "ते लोक ( युरोपीय) भविष्यातले नवनवे शोध लावतात आणि आम्ही इतिहासातले. "

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इतिहास पुराव्यांवर चालतो बखरींवर नाही ! लोक बखरींवर विश्वास ठेवत असतील तर त्यांनी संभाजी ब्रिगेड च्या पुस्तकांवर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही ;) - मालोजीराव

मालोजी राव, रोमांचक लेख. शिवाजी महाराजांवरचे लेखन नुसते वाचूनदेखील कठिण प्रसंगांना तोंड द्यायचं बळ कुठेतरी मिळतं. खूप आवडला लेख. जय शिवराय ! पार्टनर

Extract of a Letter written from Aleppo; November 19, 1672 Two days since we received Letters from India, written by the English President residing at Suratte, who acquaints us with the daily fears they have there, from Sevagde, the Rebel, who having beaten the Mogul in several Battles, remains almost Master of that Country, and takes the boldness to write to all the European Ministers in Suratte, that if they refuse to lend (send???) him such and such immediate presents to Money (which as he puts them would amount to vaft fums*** (vast sums???) ) by way of Contributions, he will return and ruine that City, That he exacts the like from the inhabitants, who certainly would comply with his Demands, but that the Officers of the Mogul, being there hinder them. Which puts them into an extreme Stroight, and caufes others daily to convoy away their richeffe, many also embarking and transporting themselves into other parts, to avoid the.... (पत्राचा मराठी तर्जुमा) अलेप्पोच्या पत्रातील उतारा 19 नोव्हेंबर 1672 दोन दिवसांपूर्वीच आम्हाला भारतातील सुरतस्थित इंग्रज प्र‍ेसिडेटकडून पत्रे प्राप्त झाली आहेत ज्यात तो शिवाजी या बंडखोरामुळे निर्माण झालेल्या ज्या चिंतेला ते सामोरे जात आहेत त्याचे इतिवृत्त आपल्याला कळवतो. शिवाजीने अनेक युद्धांमध्‍ये मोगलांना दणके दिले असून तो त्या देशाचा जवळपास मालक बनला आहे आणि त्याची ही हिंमत की सुरतेतील सर्व युरोपियन मंत्र्यांना तो लिहीतो की त्याला खंडणीच्या (contributions = खंडणी?) माध्यमातून अमुक अमुक रकमेचे नजराणे (जे त्याला फार खर्चिक होईल असे पत्रलेखक म्हणतो) पाठविण्‍यास नकार दिल्यास शहर नष्‍ट केले जाईल. त्याच्या मागण्या पूर्ण करण्‍याशिवाय गत्यंतर नसणार्‍या रहिवाशांकडून त्याला हवी ती रक्कम तो प्राप्त करतो, पण मुघल अधिकारी त्यात आडकाठी करीत आहेत. या सर्व हातघाईच्या परिस्थितीत तेथील नागरिक त्यांची लूट टाळण्‍यासाठी इतर भागात पलायन करीत आहेत. (शेवटच्या वाक्याचा अंदाजे अर्थ लावण्यात आला आहे.. शब्द अनोळखी वाटतात) (दुसरा कॉलम दुसर्‍याच बातमीचा वाटतो) (इंग्रज छापखान्यातले s हे अक्षर संपले होते काय हे न कळे.. बर्‍याच ठिकाणी s च्या ठिकाणी f वापरले आहे..)

In reply to by यकु

अरे, वो पत्र लिखनेको बोलनेवाला साला 'फ' (स) को 'फ' बोलता था तो क्या करनेका? हमाराभी (लिहिणार्‍याचा) फिर गलतीसे मिष्टेक हुवा ना! फिर वो जैसा बोला वैसा हम लिखा, जैसा हम लिखा वैसा वो वर्तमानपत्रवाला छापा.... ;-)

In reply to by प्रास

गुरुप्रास चुकीसे मिष्‍टेक हो गया वो सही है लेकीन मै कंफ्युज हो गया ना.. ;-) ह्या गॅझेट वरुन काढलेले निष्‍कर्ष:- 1. या गॅझेट मधली अक्षरांचा टाइप, त्याचे दुर्भिक्ष्य आणि वाक्ये पहाता इंग्रज त्यावेळी कंगाल होते (चोर साले!) .. (मुद्रणकला प्रगत नव्हती वगैरे बाबी गौण..) 2. हे पूर्ण पत्र नाही, मूळ पत्रातील तिसर्‍याच व्यक्तीने घेतलेला उतारा आहे.. मूळ पत्रात आणखी काय काय असेल ते पहाणे मनोरंजक असेल. 3. राज्य संकटात पडले असताना परराज्यातील पुंडांना झोडपून लूट करण्‍याचा शिवाजी महाराजांचा कावा आवडण्यात आला आहे.. आजच्या सुरतेत शिवाजीराजांचा अश्वारुढ पुतळा पाहून शॉक बसला होता.. ;-)

In reply to by यकु

मूळ पत्र : द लंडन गॅझेट मधून इथे पाहता येईल.(इतरांच्या आणि माझ्याही ;) संदर्भासाठी...) या टाईपफेसमध्ये s हे अक्षर f किंवा (इन्टेग्रल) ∫ चिन्हासारखे दिसते.

तलवारीच्या संदर्भातला पत्रव्यवहार, छायाचित्रे, लेखातील काही संदर्भ यामुळे मिपावर खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी झाली असे म्हणावे लागेल. पुभाप्र. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

माहितीपूर्ण आणि स्फुरतिदायी लेख....... धन्यवाद!!!

माहिती विस्तृत आहे. धन्यवाद. मात्र कॅप्शन्स गंडल्या आहेत बर्‍याच ठिकाणी असे वाटते आहे. अफझलखानाने देवळं तोडल्याबद्दल : मला व्यक्तिशः याचा अभ्यास नसल्याबद्दल काही बोलायचे नाहीये. पण तुम्ही ज्या काही आधारांनी तुमचे मत प्रतिपादत आहात त्यापैकी "बादशाहाच्या दरबारी खूप हिंदू सरदार होते, सिनियर होते" त्यामुळे खान अशी कृत्यं करू धजणार नाही असं जे म्हणत आहात ते पटत नाही. पदरी मातब्बर हिंदू असूनही औरंगझेबाने काय काय केलं ते सर्वशृत आहेच. बहुतेक शाह्यांच्या पदरी मराठे होतेच आणि मातब्बरही होते. (साक्षात शहाजीराजे निझामशाहीचे प्राण होते शेवटच्या टप्प्यात.) पण मुसलमानी धर्माला झुकतं माप होतंच. धर्मांतरं होत होतीच. काहीवेळा सक्तीने. नेताजीचा मुहंमद कुलीखान झालाच. तेव्हा एखादाही रजपूत अथवा मराठा पेटून उठल्याचे ऐकिवात नाहीये. इतकंच काय, खुद्द मिर्झा राजे जयसिंगांसारखा सगळ्यात मोठा रजपूत सरदार, औरंगझेबाच्या आज्ञेवरून विषप्रयोग करून मारला गेला, त्याच्याच विश्वासू सचिवाकडून (त्याचं नाव आत्ता पटकन आठवत नाहीये). त्यानंतर रजपूतांनी सूड घ्यायची प्रतिज्ञा केली. हा सचिव लपून बसला आणि दोन दिवसांनी मुसलमान बनून बाहेर पडला (धर्मांतरानंतरचंही नाव आठवत नाहीये). त्याक्षणी रजपूत थंडच पडले. त्याला हात लावायचीही प्राज्ञा राहिली नाही त्यांची. अजून एक म्हणजे त्याकाळच्या एकंदरीतच राजकारणात मराठे सरदार या सुलतानांची मर्जी राखण्यासाठी कोणत्याही थराला जात होते हा ही इतिहास आहेच. अशा एकंदरीत तत्कालिन परिस्थितीकडे बघता, "इतर मराठा मातब्बरांची भिती असल्यामुळे / त्यांचा मान राखण्यासाठी तरी अफझलखान मंदिरांची तोडफोड करणार नाही" हे अतिशयच तकलादू आणि म्हणूनच न पटण्यासारखे आहे. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्ते, आदिलशाहीचा अभ्यास केल्यास त्या बादशाहाकडे अशी वृत्ती कुठेच आढळून येत नाही ! त्याने कित्येक हिंदू देवस्थानांना सनदा आणि इनाम गावे दिली होती...अत्यंत कावेबाज,राजकारणी आणि धूर्त असा आदिलशहा होता, मराठा सरदारांच्या उपस्थितीत जर त्याने या मूर्ती फोडल्या असत्या तर कित्येक सरदार मोहीम अर्धवट सोडून गेले असते... हिंदू-मुस्लीम विचार करण्यापेक्षा राजकीय दृष्टीने विचार केल्यास माझे विधान पटेल...आणि आफ्झुल्याने मूर्ती फोडल्या असा पुरावा देणारे कोणतेही तत्कालीन ऐतिहासिक दस्त उपल्भ्ध असल्याचे माहितीत नाही. एक तर नंतरच्या काळात लिहिलेल्या बखरी किंवा प्रसंग रोमांचित करण्यासाठी लिहिलेल्या कादंबर्या यातच यांचे उल्लेख आहेत. -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

हिंदू-मुस्लीम विचार करण्यापेक्षा राजकीय दृष्टीने विचार केल्यास
मी तथाकथित हिंदुमुस्लिम विचार करतो आहे असे आपणास वाटत असेल तर जौद्या... :) मी सगळ्याच बाजूंनी विचार करतोय. हिंदू सरदारांच्या धार्मिक भावनांची कदर करणे हे सुल्तानांना तितकेसे बाध्य नव्हते एवढेच माझे म्हणणे आहे. राजांना आणि रयतेला जरब बसावी म्हणून देवस्थानांना त्रास देणे हे जास्त प्रॉडक्टिव्ह असेल तर ते बिनदिक्कत खुश्शाल तसं करतील असं माझं म्हणणं.

In reply to by मालोजीराव

हो. काही देवळांच्या संस्थानांना इनाम म्हणून व नियमित भत्ते सुलतानाने दिल्याचे ऐकले आहे. अवांतरः- शिवाजी महाराज गेल्यावर सत्तावीस वर्षे दख्खनच्या भूमीत राहून औरंगजेब संभाजी,राजाराम्,ताराबाई व अन्य नेतृत्वाशी लढला. ह्यादरम्यान एकदा अजिंक्यतारा का कुथला तरी किल्ला वर्ष वर्ष वेढा घालूनही पडेना म्हणून एका स्थानिक पुजार्‍याच्या सांगण्यावरून चक्क त्याने एका महागड्या यज्ञाची(भरपूर तूप व हवन वगैरे लागणारे विधी) व्यवस्था करून दिली. यज्ञ काही दिवस चालला, व नंतर खरोखरच योगायोगाने किल्लाही पडला. औरंगजेब खूश झाला(असावा).

In reply to by मन१

अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा. नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली ! खान धूर्त,कावेबाज आणि क्रूर होता याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.परंतु बखरकारांनी जे अतिरंजित वर्णन केलंय त्याचे खंडन मला करावेसे वाटले. -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

अगदी बरोबर. बिपीन कार्यकर्ते, तुम्हाला काहीच कळत नाही. त्या देवळांच्या पुजार्‍यांनी खानाने तोडलेल्या मूर्तींची संख्या, तुकड्यांचे वजन, भिंतीपासूनचे अंतर, दिशा, कालावधी यांचा फोटोसकट रीतसर पंचनामा करून त्यावर खान, आदिलशहा आणि खानापेक्षा जास्त महत्त्वाच्या अशा ३ हिंदू सरदारांच्या (?) स्वाक्षर्‍या किंवा गेला बाजार अंगठे घ्यायला हवे होते. नाहीच तर व्हिडीओ शूट करून योउतुबे वर टाकायला हवा होता. याशिवाय खान यवनी पद्धतीने भातशेती केल्यास अधिक फायद्याचे होईल असे सांगायला आला होता आणि शिवरायांनी मावळी पद्धतीने भातशेतीचे केलेले वर्णन ऐकून त्याचे आतडे आतल्या आत पिळवटले जाउन बाहेर आले यावरही माझा पूर्ण विश्वास आहे*.

In reply to by Pain

>>>>याशिवाय खान यवनी पद्धतीने भातशेती केल्यास अधिक फायद्याचे होईल असे सांगायला आला होता आणि शिवरायांनी मावळी पद्धतीने भातशेतीचे केलेले वर्णन ऐकून त्याचे आतडे आतल्या आत पिळवटले जाउन बाहेर आले यावरही माझा पूर्ण विश्वास आहे*. ---- शिवशिवशिव !! _____/\____ !!! =)) =)) =)) =)) मलाही हेच म्हणायचे आहे. खाँ साहेबासारखा पुण्‍यवान माणूस पुन्हा होणे नाही. आमीन.

मालोजी.... अत्यन्त उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती!!!! धन्यवाद!!! राजश्रीयाविराजित प्रौढप्रतापपुरंदर गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपति महाराज की जय !!!!!!!! ‎"फाल्गुन वद्य तृतीया" ही हिन्दु पन्चांगाप्रमाणे शिवरायांची जयन्ती आहे. तेव्हादेखील याहून दुप्पट उत्साहात ती साजरी होईल!!!!... :) जय जय रघुवीर समर्थ!!!!

In reply to by मृगनयनी

"फाल्गुन वद्य तृतीया" ही हिन्दु पन्चांगाप्रमाणे शिवरायांची जयन्ती आहे. तेव्हादेखील याहून दुप्पट उत्साहात ती साजरी होईल!!!!
अगदी बरोबर बोललात....तिथिप्रमाणे तर आपल्याकडे जोरदार साजरी होते शिवजयंती...! तेव्हा रितसर अजुन एक लेख टाकेनच ! -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

अगदी बरोबर बोललात....तिथिप्रमाणे तर आपल्याकडे जोरदार साजरी होते शिवजयंती...! अरे व्वा!!!!... छान छान!!!!! :) तेव्हा रितसर अजुन एक लेख टाकेनच ! नक्की नक्की!!!....... :) आम्ही प्रतीक्षा करु!!!... :)

In reply to by मृगनयनी

>>राजश्रीयाविराजित प्रौढप्रतापपुरंदर गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपति महाराज की जय महाराजांचा कोठेही उल्लेख करताना एवढी बिरुदे लावणे कम्पल्सरी असल्याची नोद घेतली आहे. यापूर्वी कधीकधी उल्लेख करताना माझ्याकडून राजश्रीयाविराजित, प्रौढप्रतापपुरंदर व सिंहासनाधीश्वर ही बिरुदे राहिली होती त्याबद्दल मिपाकरांनी माफ करावे.

In reply to by नितिन थत्ते

'ज्याची त्याची जाण....' इ.इ. ठाऊक असल्याने मिपाकर आपणास फारसे सीरियस घेत नसावेत त्यामुळे माफीचा प्रश्नच येत नाही. बाकी सोनिया गांधींना लावायच्या विशेषणांची नवी यादी तुमच्यापर्यंत आली असेलच. तोंडपाठ करुन लवकरात लवकर वापरात आणा.

In reply to by नितिन थत्ते

एक मिपाकर म्हणुन मी तुम्हाला माफ करणार नाही. कारण एखाद्या वेळेस अशी चुक माझ्याकडुनही होण्याची शक्यता आहे. एवढी बिरुदे मी आत्तापर्यंत कधीही लावलेली नाही, आणि माझ्या लक्षातही राहणार नाही. करिता माहितीस्तव सादर. -दिलीप बिरुटे (नि. थत्तेंच्या प्रतिसादाचा फ्यान)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. दिलीप बिरुदे असं वाचलं!!! ;)

फारच उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही. इतिहासात हा धागा अजरामर राहिल. शिवछत्रपती शिवरायांचे नाव जरी उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. शिवाजी महाराजांचा विजय असो!!!

पा.भें.शी सहमत... हां....आज खरी शिवजयंती साजरी झाली आपल्या इथे...प्रतिक्रीयांमधुन वाद/प्रतिवादांचा गुलाल उडला...तसच वाचताना सर्वत्र ढोल/ताशे ही घणघणत असल्याचे ऐकू येत आहे..मालोजिरावांनी (घाइगडबडित असले तरी..!) कथिलेले हे शिवरायांचे संक्षिप्त चरित्र भाग-१ असे नाव देण्याची मनापासुन इच्छा होत आहे....या लेखाच्या निमित्तानी आंम्ही त्यांना पुढचे भाग लिहुन इच्छापूर्ती करावी,एवढी विनंती अगदी हक्कानी करितो...असो... अता आंम्ही थोडा ताशा वाजवितो-मूर्तीभंजने झाली की नाहित,या वर काथ्याकुट अवश्य व्हावेत,पण अफजलखाना सारखे परकिय असोत,अगर त्याच्या बाजुने लढणारे एतद्देशीय लोक असोत,या सार्‍यांना जनतेची काहिही पडलेली नव्हती,स्वतःचे ऐशो-आरामी राज्यशकट चालावे यासाठी धर्म या गोष्टीचा चलाखिने वापर करणारी ही मंडळी होती,हे या निमित्तानी आमच्या लक्षात राहिले तरी रग्गड...कारण या सगळ्या गोष्टींचा आमच्या समाजजिवनाशी पूर्वी जितका संमंध होता,तितकाच आजही आहे.एवढे जाता जाता नमुद करितो...(कुठं जाता..? उद्या इथेच यायचे आहे परतून.. ;-) ) जय भवानी,जय शिवाजी

संग्राह्य (संग्रहणीय म्हणावे काय?) लेख. जगदंबा तलवारीच्या वर्णनावरून ती बहुधा राजचिन्ह म्हणूनच ठेवली असावी, प्रत्यक्ष लढाईत तीचा वापर होत नसावा, असे वाटते. अफझलखानाच्या मूर्तीभंजनाविषयी - ह्या बाबतीत तत्कालीन असा थेट पुरावा नाही. जे काही उपलब्ध आहे ते त्या घटनेनंतर शे-दिडशे वर्षांनंतर लिहिल्या गेलेल्या बखरींमध्ये आहे. थोडक्यात, मूर्ती फोडल्या गेल्या हा जसा पुरावा नाही तसेच मूर्ती फोडल्या गेल्या नाही असे देखिल म्हणता येणार नाही. कवी भूषण यांनी या बाबतीत काही लिहिले आहे काय? १६७२ च्या इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीविषयी - यशवंत एकनाथ यांना पडलेला प्रश्न मलादेखिल पडला आहे! इंग्रजीत ग्रेट वॉवेल शिफ्ट झाल्याचे ठाऊक होते तसे ग्रेट कॉन्सोनंट शिफ्ट झाल्याचे ऐकीवात नव्हते! (अवांतर - ग्रेट कॉन्सोनंट शिफ्ट जर्मन भाषेबाबत घडले होते) मिपावर शिवजयंती खर्‍या अर्थाने साजरी झाली! ऐतिहासिक व्यक्तींची जयंती-मयंती ही ग्रेगरीयन कॅलेंडरप्रमाणी तर रामकृष्णादी पौराणिक व्यक्तींची जयंती तिथीप्रमाणे साजरी व्हावी, हे ठीकच.

वाचनखूण साठवलाय. भवानी तलवार म्हणून दावा केल्या जाणार्‍या दोन्-तीन तलवारी आहेत म्हणतात. त्या सर्वच शिवाजींनी वापरल्यात, त्यातली "भवानी" तलवार कुठली हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. लेख खूपच वस्तुनिष्ठ वाटला. त्यातील मते पटोत नाही तर न पटोत; पण कुठलाच आवेश न आणता सरळ सरळ जे लिहिले आहे, ते हल्लीच्या ढोल ताशांच्या दणदणाटात क्षीण होत चालले आहे. एक दुरुस्ती:- शिवाजी महाराजांनी सुरत लुटित बाकी सगळ्यांना लुटले, पण जॉर्ज ऑक्झिंडेन ह्याच्या नेतृत्वाखालील धाडसी/शूर्/भाग्यवान अशा ब्रिटिशांना मात्र सोडले. कारण एकच्,सुरत हे पश्चिम भारतातील प्रचंड मोठे व्यापारी केंद्र होते. आख्ख्या मुघलशासित भारताचे भरभ्राटीचे शहर, त्याकाळची मुंबईच म्हणाना. त्याच्या सुरक्षेला प्रचंड सैन्याची तजवीज करायच्या नावाखाली तिथला मुघल सुभेदार बादशाहाकडून नुसतेच पैसे लाटायचा. लाचखोरी करून प्रत्यक्ष सैन्य उपस्थिती वर दाखवल्या जाणार्‍या आकद्यापेक्षा खूपच कमी होती. मात्र मुळातच आख्ख्या भरतात गेल्या कित्येक शतकात एकसंध दिल्ल्ली शासन असताना थेट त्या साम्राज्याच्या मर्मावर आजवर असा कुणी हल्लाच करायची हिम्मत केली नव्हती, दिल्लीचे त्याटप्प्यातील सर्वच विरोधक चेचून टाकले गेले होते. त्यामुळे हा कच्चा दुवा कधीच समोर आला नाही. जबरदस्त कार्यक्षम(efficient) हेरखाते असणार्‍या शिवरायांच्या चाणाक्ष नजरेने बरोब्बर हा दुवा शोधला. लोखंडी कपाटाच्या ऐवजी लाकडी डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने सोपे पडावेत तसे झाले, योग्य नियोजन करून शिवराय सुरतेत गेले. ते आल्याचे कळताच (वखारीवरील भारतीय मजूर धरून) फक्त २०० माणसाम्चे माणूसबळ असणार्‍या जॉर्ज ऑक्झिंडेनने शहरात एक कवायत/millitary march केली. खुद्द मुघल सुभेदार शहर उघड्यावर टाकून तटबंदीच्या आत लपला. स्वतःची फारशी हानी करून न घेता मराठ्यांनी आरामात,चतुराईने सुरत लुटली. इंग्रजांच्या वखारीकडे जाताच जोरदार गोळिबार व प्रतिकार सुरु झाला. आता त्या तेवढ्या उरलेल्या रकमेसाठी परमुलखात उगीच स्वतःची मनुष्यहानी करून उपयोगाचे नाही हे ओळखून शिवरायांनी माघार घेत नाशिकजवळून पुण्यास कूच केले. थोडक्यात, ब्रिटिशांना त्यांनी लुटले नाही. हा किस्सा कळताच औरंगजेबाने मुघल सुभेदाराचे करायचे ते केलेच, पण ऑक्झिंडेनला बहादुरी बद्द्ल खुश होउन काही मागू शकतोस असे फर्मावले. त्याने तत्काळ स्वतःसाठी काहीही न मागता स्वतःच्या कंपनीला अधिक सोयी मिळाव्यात अशी नम्रपण मागणी पुढे ठेवली. तशा काही सवलती मिळाल्याही. असो.

In reply to by मन१

वाचनखूण साठवलाय
आभार मनोबा :)
भवानी तलवार म्हणून दावा केल्या जाणार्‍या दोन्-तीन तलवारी आहेत म्हणतात. त्या सर्वच शिवाजींनी वापरल्यात, त्यातली "भवानी" तलवार कुठली हे मात्र अजून निश्चित झालेले नाही.
महाराजांनी अनेक तलवारी वापरल्या त्यातली एक म्हणजे भवानी तलवार...पण नेमका उल्लेख सापडत नाही ! वरील तलवारीचा उल्लेख हा कागदोपत्री 'जगदंबा' असाच आहे.
थोडक्यात, ब्रिटिशांना त्यांनी लुटले नाही.
अगदी बरोबर...हा उल्लेख टाकला असता तर लेख अजून बराच वाढला असता, तुम्ही इथे माहिती टंकली त्याबद्दल आभार ! इंग्रजांनी केलेल्या प्रतिकारानंतर मराठ्यांनी ऑक्झिंडेन च्या स्मिथ नावाच्या माणसाला पकडून त्याच्याकडून ३००००० ची खंडणी मागितली,पण त्याने आपण सामान्य नागरिक आहोत माझा आणि इंग्रज वाखार्वाल्यांचा काही संबंध नाही असे सांगितले...तरीही मराठ्यांनी त्याच्याकडून ३०० रु एवढी खंडणी उकळून त्याला सोडून दिले आणि खंडणीसाठी त्याला मध्यस्थ करून वखारीवर पाठवले... नंतर तो माणूस परत मराठा शामियानाकडे फिरकलाच नाही ! यामुळे हि खंडणी महाराजांनी वेंगुर्ला आणि राजापूरकरांकडून तर वसुललीच पण रास्त भावाने उडवायच्या दारूच्या खरेदीचा आणि तोफांचा करारही केला. -मालोजीराव

रंजक माहिती आणि छायाचित्रे. लेखन खूपच आवडले. प्रतिसादांमधून देखील नव-नवीन माहिती समजली.
प्रतापगड युद्धावर तपशीलवार लेख पुन्हा केव्हातरी
वाट बघतो आहे.

लेख रोचक आहे. खूप काही नवीन माहिती मिळाली. संभाजीराजांनी लिहिलेला श्लोक पूर्ण आणि शुद्ध स्वरूपात कुठे मिळेल? (लेखातला काही ठिकाणी अशुद्ध आहे) माझ्या अल्प ज्ञानानुसार तो शुद्ध लिहिला तर असा होईल- मेधावीमतिमानदीनवदनो दक्ष: क्षमावानृजु- र्धर्मात्माप्यनसूयको लघुकर: षाड्गुण्यविच्छक्तिमान् । ऊत्साही पररंध्रवित्कृतधृतिवृद्विक्षयस्थानवित् शूरो न व्यसनी स्मरत्युपकृतं वृद्धोपसेवी च यः ।।२।। दिनवदन- असा शब्द नसून अदीनवदन असा आहे. अदीनवदन म्हणजे ज्याचा चेहरा कधीही पडलेला/दीनवाणा नसतो असा. पररंध्रवित्कृतधृतिवृद्विक्षयस्थानवित्= हा शब्द नीट उमगला नाही- षड्गुण-हे ६ गुण राजनीतीचे असतील. पण अजून एक ६ गुणांचा संदर्भ येतो तो असा- षड्गुणा: पुरुषेणेह ध्यातव्या भूतिमिच्छता, सत्यं दानमनालस्यं अनसूया क्षमा धृति: | (वैभवाची इच्छा करणार्‍या पुरुषाने हे षड्गुण अंगी बाणावेत- सत्य बोलणे, दान करणे, आळस न करणे, कुणाचाही द्वेष न करणे, क्षमाशील वृत्ती, धैर्य) असो, अवांतराबद्दल क्षमस्व

In reply to by चैतन्य दीक्षित

होय महाराजा....श्लोक अशुद्ध स्वरुपात आहे थोडा... काय करणार...गुगल मध्ये संस्कृत लिहिणे जिकीरीचे काम आहे ! ...म्हणून वर नमूद केलंय 'लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या !' :) रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई इथे हे श्लोक मिळू शकतील ! -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

बाकीचा लेख इतका सुंदर उतरलाय तर त्यात ही श्लोकाची चूक नसावी म्हणूनच वरचा प्रतिसाद दिलाय. गैरसमज नसावा. असेच अजून लिहा आणि आमच्या ज्ञानात भर घाला.

माहिती आणि चर्चा..... दोनिही मस्त......!!!

शिवजयंतीनिमित्त उचित माहितीपूर्ण लेख. प्रतिसादांतूनही बरीच माहिती समजली.
सुरतेची लुट म्हणजे एक नियोजनबद्ध हल्ला होता, आणि मोगल प्रशासनावर बसलेली जोरदार चपराक होती,
तुम्ही उल्लेख केलेली ही सुरतेची दुसरी लूट आहे. पहिल्यांदा सुरत लुटली ते १६६३-६४ च्या सुमारास. किंबहुना ह्याच लुटीमुळे चिडून औरंगजेबाने प्रचंड फौजेसह मिर्झाराजांना पाठवले. सुरतेच्या ह्या पहिल्या स्वारीतून आणलेल्या धनातूनच सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु झाले. पुरंदराच्या तहानंतर स्वराज्य राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही बरेच क्षीण झाले होते. आग्र्याहून सुटल्यानंतर मग महाराजांनी झपाट्याने एकेक किल्ले घ्यायला सुरुवात केली. १६७० च्या सुमारास जुन्नर लूटून बरीच लूट गोळा केली. व १६७०-७१ सुरतेवर दुसर्‍यांदा स्वारी करून तिथूनही स्वराज्य उभारणीसाठी बरेच धन लूटून आणले गेले.

In reply to by प्रचेतस

दुसरी लूट... बादवे, जुन्नर लुटले की आख्खे ताब्यात घेतले???

In reply to by मन१

जुन्नर फक्त लुटले. त्याकाळी ते मोंगलांचे प्रमुख ठाणे होते. जुन्नर आणि शिवनेरीही नंतर पेशवेकाळात स्वराज्यात आले.

लेख मस्त!नविन माहिती समजली चर्चेतून! प्रतापगड युध्दाचा तपशील येऊ दे लवकर!!

'संस्थानिकांच्या गढ्या' या विषयावरील एका नवीन धाग्यात भवानी तलवारीचा उल्लेख आलेला असल्याने हा धागा वर काढत आहे.

In reply to by चित्रगुप्त

लेख अपडेट करता येत नसल्याने शिवरायांची शस्त्रे या लेखात जगदंबा तलवार आणि भवानी तलवार दोन्ही वेगळ्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे

भवानी आणि जगदम्बा या दोन वेगळ्या तलवारी असाव्यात. भवानी तलवार स्पॅनिश बनावटीची असल्या उल्लेख ब मो पुरम्दर्‍यानी केला आहे. मयूर सिंहासन : मुहमद्शाह ( रम्गीले) याच्या कडून १७३८ मध्ये नादीरशहाने ते सिंहासन लूटीचा हिस्सा म्हणून नेले ते त्याने १७३९ मध्ये इराण ( पर्शिया) ला नेले.१७४७ मध्ये नादीरशहाच्या सैन्यात बेदीली माजल्या नंतर त्या सिंहासनाचे तुकडे झाले. व सैनिकानी ते आपापसात वाटून घेतले. त्या नंतर महंदशाह कजर फते अली शाह कजर यांनीही स्वतःच्या सिंहासनाला मयूर सिंहासन असेच नाव दिले. शाहजहान चे (नंतर औरंगझेबाचे) मयूर सिंहासन हे १७४७ नंतर संपले.त्याचा मागमूसही कोणाला मिळाला नाही.

जय भवानी... जय शिवाजी. जबरदस्त लेख फक्त ह्यावर एक फक्कड लेख येउदे अशी आग्रहाची विनंती.
मोगल सरदारांचे आणि मराठ्यांचे स्नेहबंध इतके चांगले होते कि प्रतापगड युद्धाच्या आधीची राजकीय पार्श्वभूमी कळाली तुम्हाला तर तुम्हीही चक्रावून जाल...झाकली मुठ सव्वा लाखाची Wink