मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे. आताच्या नित्याच्या बातम्यांमधे भ्रष्टाचार, खुन, दरोडे, पोलीसांची गुन्हेगारांशी हातमिळवणी, बॉलिवूडी अभिनेत्यांच्या बातम्या, त्यांनी ट्विटरवर काय लिहीले, राजकारणी, प्रिंस काय जेवला, कोणत्या झोपडीत काय खाल्ले आदींसारख्या, एक बिग अभिनेता व एखादा खेळाडू पैशासाठी व स्व:तासाठी सारी मेहनत करत असून सामाजिक योगदान शुन्य असतांनाही त्याला भारतरत्न आदींसारखे पुरस्कार देण्याची मागणी केली जाते अन त्या व्यक्तीही मुकसंमती देतात या असल्या काळ्या बातम्या असतात. अंधारातील रजतरेषा ठरावी अशी दैनिक दिव्य मराठीतील वरील तारखेची बातमी जशीच्या तशी देत आहे. आताच्या काळात डॉक्टरलोकंही व्यापारी झालेत. डॉक्टर सुनिल गाजरेंसारखे सन्माननिय अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहेत म्हणूनच त्या बॉलबेअरींगरूपी माणसांमुळे देश चालतोय. डॉक्टर सुनिल गाजरेंना मानाचा मुजरा! पॅरालिसीसचा दोन लाखांचा उपचार 20 हजारात! (सुनील बडगुजर । जळगाव) डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान हातापायाचा पॅरालिसीस झाल्यानंतर ‘आयव्हीआयजी’ या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. र्शीमंताना हा खर्च परवडणारा असला तरी गरिबांना मात्र ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. परिणामी अनेक रुग्णांना उपाचाराअभावी अपंगत्व किंवा थेट मृत्यूला सामोरे जावे लागते. या दुर्दैवी प्रसंगावर मात करण्याच्या दृष्टीने न्युरोफिजिशिअन डॉ. सुनील गाजरे यांनी ‘लो डेअसर प्लाझ्मा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत शोधून काढली असून यामुळे अवघ्या 20 हजारांत रुग्ण बरा होत आहे. या पद्धतीने आतापर्यंत 110 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. हवा आणि पाण्यातील विषाणूंमुळे इमिनो अँलर्जीचे इनफेक्शन शरीरात झाल्याने हाता-पायाचा पॅरालिसीस होतो. यामुळे रुग्ण आयुष्यभर लुळा होतो. त्यापुढेही अधिक लागण झाली तर यात मृत्यूही ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर विशेष पध्दतीने इलाज करावा लागतो. अशी आहे नवीन आणि स्वस्त उपचार पद्धती या रोगाच्या रुग्णांवर डॉ. गाजरे त्यांनी संशोधन केलेल्या नवीन उपचार पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीला त्यांनी ‘लो डेअसर प्ला ामा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत हे नाव दिले आहे. यात ते रुग्णांच्या शरीरातून दिवसाला दोन वेळा 350 एमएल रक्त काढतात. ते रक्तपेढीत पाठविल्यानंतर तेथे प्रक्रिया होऊन रक्तातील प्लाझ्मा व लाल-पांढर्‍या पेशी वेगळ्या काढल्या जातात. त्यामध्ये अँण्टी बॉडीज असल्याने त्या नष्ट करण्यात येतात. त्यानंतर शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाला दिले जाते. असा उपचार पाच दिवस केला जातो. यासाठी दिवसाला तीन ते चार हजार रुपये असे पाच दिवसासाठी फक्त 20 हजार रुपये खर्च येतो.

वाचने 2376 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रभाकर पेठकर 25/10/2011 - 10:24
डॉ. सुनिल गाजरेंचे हे समाजकार्य नक्कीच प्रशंसनिय आणि अभिनंदनिय आहे. हि बातमी आपल्या ओळखितल्या सर्व व्यक्तींनी सर्वदूर पसरवावी.

मदनबाण 25/10/2011 - 10:26
चांगली माहिती. गव्ह्यांच्या रोपाचा (तॄणांकुर) रस देखील शरीरास उत्त्तम असतो म्हणतात्,तसेच त्याला हिरवे रक्त असे म्हणतात म्हणे.
एआयडीपी / गीयां बारे सिंड्रोम अशा नावाने ओळखला जाणारा हा पॅरेलिसिस आहे. जवळच्या व्यक्तीला तो झाला की काय होतं ते दुर्दैवाने पाहिलं आहे. आयसीयूमधे जगण्याचा झगडा कितीकाळ चालू राहील सांगता येत नाही. महिनाभर आयसीयूबाहेर सोबतीला बसून काढला आहे. जाऊ दे.. काळाकुट्ट काळ होता तो. आयव्हीआयजी आणि प्लाझ्माफेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती फार पूर्वीपासून चालू आहेत. त्यात नवीन शोध काही नाही. असलाच तर पद्धतीत (प्रोसेस) किंवा किंमतीत (स्वस्त) अशा स्वरुपाचा बदल असेल. या आजारामधे सर्व स्नायू (श्वासाचे सुद्धा) पूर्ण पॅरेलाईझ होतात आणि व्हेंटिलेटरवर श्वास चालू ठेवावा लागतो. रिकव्हरी काही आठवडे ते काही महिन्यांच्या पॅरेलाईज्ड स्थितीनंतर हळूहळू चालू होते. उदा. आधी एखादे बोट किंचित हलवता येणे. मग हाताचा पंजा.. वगैरे. पूर्ण उभे राहून चालायला एखादे वर्ष लागू शकते. आयसीयूमधे असताना जीव जाण्याची शक्यता बरीच असते. इतर कॉंप्लिकेशन्स होतातच (व्हेंटिलेटर असिस्टेड न्युमोनिया, बेड सोअर्स.. कारण पापणी सोडून काहीच स्वतः हलवता येत नाही. कुशी बदलणं दूरच.. बोलताही येत नाही घशात व्हेंटिलेटर असल्याने. कोणाला बोलावता येत नाही, बटणही दाबता येत नाही.. काहीजणांच्या केसमधे पापण्याही हलवता येत नाहीत. बरिड अलाईव्ह अशी स्थिती..) हा बरा होणारा सिंड्रोम आहे. दहावीस टक्के लोकांमधे काहीसा अशक्तपणा दीर्घकाळ राहतो. जन्मभर पूर्ण पॅरेलाईझ असे होत नाही. वर्षभरानंतर निदान ८०% शक्ती जवळजवळ सगळ्या रुग्णांत हळूहळू परत येते. शिवाय आयव्हीआयजी किंवा प्लाझ्माफेरेसिसने खरोखर कितपत उपाय होतो हे अजूनही संशोधन पातळीवरच आहे. रोग आपला कोर्स पूर्ण करुनच जातो असं दिसतं. काही डॉक्टर्स या दोन्ही उपचारपद्धती आवर्जून नको असं सांगतात कारण त्यात रिस्क फॅक्टर जास्त आहे असं त्यांना वाटतं. इच्छा असेल तर हे वाचावं

In reply to by गवि

साती 25/10/2011 - 23:34
गवि,अत्यंत चांगला प्रतिसाद. इतकं व्यवस्थित कदाचित मीही लिहू शकले नसते. हा प्रतिसाद कॉपी पेस्ट करून दुसर्‍या एका ठिकाणी (तुमच्या नावासहित) चिकटवायला परवानगी देता का?

In reply to by साती

साती..अगदी जरुर..परवानगी कसली त्यात? जमल्यास ती लिंकही वाचा.. बाकी तुम्ही डॉक्टर.. तुमच्यापुढे मी किती बोलणार अशा विषयावर? थँक्स..