मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टिळकांचे स्मरण.... एका वेगळ्या पद्धतीने..

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मित्रांनो, अल्बर्ट स्पिअर जरा बाजूला ठेवून....................... टिळकांच्या निधनानंतर "इंदूप्रकाश" ने एक खास टिळक गौरव अंक काढला होता. ९० वर्षे जूना..तो माझ्याकडे आहे. आता जवळजवळ जीर्ण झाला आहे. त्यातील काही पानांचे फोटो आपल्यासाठी देत आहे. प्रकाशकाचे दोन शब्द जरूर वाचावेत व वादातील दुष्मनी कशी निभवावी हे पण शिकावे म्हणून हा प्रपंच केला आहे तसेच मराठाच्या एका अंकाचे मूखपृष्ठाचे पण देत आहे. सगळ्यात शेवटी अखेरचे दर्शन ! Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Unlimited Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.

वाचने 9440 वाचनखूण प्रतिक्रिया 31

चतुरंग 01/08/2011 - 20:38
जयंतराव असा ठेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद! चित्रातली पाने वाचून बघेनच परंतु तोवर हा प्रतिसाद. वयाच्या ६४ व्या वर्षी लोकमान्यांचे निधन हा भारताच्या इतिहासातला फार मोठा अपघात होता त्यांच्या जाण्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला एक वेगळेच वळण मिळाले. माझे आजोबा हे टिळकभक्तच. त्यांच्याकडून टिळकांच्या आठवणी ऐकल्या होत्या. १ ऑगस्टला टिळक गेले आणि त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता. माझ्या आजोबांनी ही अंत्ययात्रा बघितली होती. पावसाची रिपरिप सुरु असूनही लक्षावधीच्या संख्येने शोकाकुल लोक गर्दी करुन होते. अशी अंत्ययात्रा मुंबईने कधी पाहिली नाही असे आजोबा म्हणत. कित्येक घरी त्यादिवशी अन्न शिजले नाही. कर्मयोगाची शिकवण देणार्‍या त्या नरसिंहास लक्ष प्रणाम! -नतमस्तक रंगा (जयंतराव एक विनंती. चित्रातली जीर्ण पाने प्लास्टिकच्या कागदात लपेटून टिकवण्याच्या दृष्टीने काय करता येईल? किंवा अधिक चांगले म्हणजे पुणे युनिवर्सिटी किंवा भांडारकर प्राच्यविद्या किंवा फिल्म इंस्टिट्यूट मधे मायक्रोफिल्मिंग करुन ठेवता येईल का हे बघू शकाल का? हा ठेवा नष्ट होऊ नये ह्या इच्छेपायी ही विनंती.)

In reply to by चतुरंग

किंवा अधिक चांगले म्हणजे पुणे युनिवर्सिटी किंवा भांडारकर प्राच्यविद्या किंवा फिल्म इंस्टिट्यूट मधे मायक्रोफिल्मिंग करुन ठेवता येईल का हे बघू शकाल का? मायक्रोफिल्मिंग म्हणजे काय? आणि हे करण्याची काही गरज आहे काय ? असल्या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचे व्यर्थ राजकारण केले जाते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यापेक्षा श्री. जयंत कुलकर्णी यांच्याकडेच तो अधिक सुरक्षित राहू शकेल. एवीतेवी त्यांनी स्कॅनिंग करुन ठेवलेच आहे. त्यामुळे कागद टिकला काय किंवा न टिकला काय. काय फरक पडतो ?

लोकमान्य टिळक गेले तेंव्हा अ.ब. कोल्हटकर क्षणभरही न थांबता कित्येक तास्/दिवस लोकमान्य टिळकांवरचा मॄत्यूलेख लिहित होते. तो जगातला सगळ्यात मोठा अग्रलेख / मॄत्यूलेख होय कर्‍हेचे पाणी मध्ये लिहिलेले आहे. 'लोकमान्य टिळकांचा मॄत्यू' असे नाव असलेल्या त्या प्रकरणात अत्र्यांनी टिळकांच्या अंत्ययात्रेचे अतिशय हॄदयंगम वर्णन केलेले आहे. पहिल्याने मला वाटले की वर जयंत कुलकर्णी यांनी दिलेला अग्रलेख म्हणजे कोल्हटकरांचाच अग्रलेख आहे की काय. पण हा तो नसावा. कारण त्या अग्रलेखाच्या सुरुवातीसच 'सर्व अग्नींमध्ये विझविण्यास अत्यंत कठीण अग्नी म्हणजे शोकाग्नी होय' असे वाक्य असल्याचा उल्लेख वाचल्याचे स्पष्टपणे आठवत आहे. असो. सामना या दैनिकात सुद्धा आज 'लोकमान्यांचे स्मरण' असे मथळा असलेला अत्यंत वाचनीय अग्रलेख छापून आलेला आहे. लोकमान्यांना विनम्र नमस्कार.

विकास 02/08/2011 - 01:18
शतशः धन्यवाद! खूप मोलाचा ठेवा. ह्या अंकातील लेख-छायाचित्रे जर अशीच स्कॅन करून येथे देता आली तर अवश्य द्यावीत ही विनंती.

विकास 02/08/2011 - 01:26
जयंतरावांनी वर म्हणल्याप्रमाणे, इंदूप्रकाश मधील "दोन शब्द" हे प्रकाशकाचे मनोगत वाचले... ते वाचताना काय लक्षात आले?
  1. इंदूप्रकाश हे न्या. रानड्यांनी चालू केलेले मराठी-इंग्रजी वर्तमानपत्र.
  2. सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या तत्वांवरून वाद घालणारे टिळक आणि रानडे हे कसे एकमेकांचा आदर राखत,
  3. टिळकांचे रानड्यांना गुरूस्थानी मानणे, रानड्यांचा टिळकांबद्दल आदर,
  4. रानड्यांच्या पश्चात,सुरत काँग्रेसला फूट पडल्यावर प्रखर टिका करणारे इंदूप्रकाश त्यानंतर एकाच वर्षात जेंव्हा इतर कोणी टिळकांची वकीली मते त्यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यात छापून ज्युरींपर्यंत रोजच्या रोज पोचवायला तयार नव्हते तेंव्हा ह्याच इंदुप्रकाशने केलेले काम...
थोडक्यात मार्ग वेगळे असले तरी जेंव्हा समान उद्दीष्ट असते तेंव्हा दोहोंकडून असलेला प्रामाणिक आदर आणि एकमेकांसाठीचा पाठींबा बघताना त्या सर्वांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो. आशा करतो असेच आजही, एकत्रीय भ्रष्टाचारासाठी नाही तर देशाच्या/जनतेच्य भल्यासाठी विविध विचारांकडून होईल...

In reply to by विकास

या माणसांप्रमाणे सुशिक्षित माणासांना वागणे सहज शक्य आहे, फक्त थोडासा स्वर्थीपणा कमी केला, व लोकांचा विचार केला तर हे शज शक्य आहे. मी नेहमी म्हणतो " दुसर्‍या माणसाला त्रास होणार नाही असे वागणे" हा धर्म स्विकारला तर बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत. फक्त एक, फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारायचा "मी आत्ता जे करतोय किंवा करणार आहे याने दुसर्‍याला त्रास होणार आहे का ?" माझ्या घरात हाच धर्म कटाक्षाने पाळला जातो. असो.

In reply to by जयंत कुलकर्णी

धन्या 02/08/2011 - 08:49
जयंतराव, आपल्या प्रतिसादाने खरंच भारावून गेलो आहे. किती मोजक्या शब्दांत आयुष्य सचोटीने जगण्याचं सार तुम्ही मांडलं आहे... टिळकांच्या जीवनचरीत्रावरील अनमोल ठेवा इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!!

In reply to by धन्या

अर्थात वर लिहिलेले विषयांतर आहे, पण या धर्माचा प्रचारक :-) असल्यामुळे लिहावेसे वाटले.. बाकी काही नाही.

धनंजय 02/08/2011 - 03:11
हा ठेवा येथे दिल्याबाबत मनापासून धन्यवाद. शेवटले चित्र जितके स्पष्ट दिसते आहे, त्या मानाने आदली चित्रे नाहीत. मला वाचायला फार कठिण जाते आहे. आळशी/हावरटपणाचा दोष स्वीकारून विनंती करतो : आदली चित्रे सुद्धा पुन्हा काढून/चढवून तशीच स्पष्ट करता येतील काय?

कच्ची कैरी 02/08/2011 - 13:14
कोटी कोटी धन्यवाद जयंत हा लेख लिहिल्याबद्दल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल !

कच्ची कैरी 02/08/2011 - 13:14
कोटी कोटी धन्यवाद जयंत हा लेख लिहिल्याबद्दल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल !

राही 02/08/2011 - 20:48
इंदुप्रकाश हे त्याकाळचे नेमस्त पत्र. त्याकाळी मुख्यत्वे तरुणांचा ओढा जहालांकडे असल्यामुळे मवाळांना खूपच टिंगलटवाळी व कुचेष्टा सहन करावी लागे. आगरकरांची तर जिवंतपणी प्रेतयात्रा निघाली.इंदुप्रकाश विषयी अनेक कुत्सित शेरे त्यावेळच्या साहित्यात आढळतात.पण असे असूनही या नेत्यांमध्ये आपापसात द्वेष अथवा वैरभाव नव्हता. हा अग्रलेख त्याचेच द्योतक आहे. टिळकांचा आगरकरांवरचा मृत्युलेखही असाच आहे. आचार्य अत्रे हे सिद्धहस्त लेखक.त्यांचे मृत्युलेखही उत्तम साहित्याचा नमुना ठरले. 'सूर्यास्त' तर प्रसिद्धच आहे.टिळक वारले तेव्हा अत्रे लहान होते. त्यामुळे मृत्युलेख जरी नसला तरी अंत्ययात्रेचे वर्णन तितक्याच दु:खाने आणि आत्मीयतेने त्यांनी केले आहे. ही अंत्ययात्रा खरोखरच न भूतो न भविष्यति, कारण टिळकांनंतर तितक्या तोलामोलाचे आणि लोकांनी इतके प्रेम केलेले नेते मुंबईत झाले नाहीत त्यामुळे अशी अंत्ययात्रा निघाली नाही. नाही म्हणायला मोहम्मद रफी साहेबांच्या अंत्ययात्रेच्या वेळी टिळकांच्या अंत्ययात्रेच्या आठवणी जागवल्या गेल्या असे उल्लेख आढळतात.पण अर्थातच टिळक आणि रफी पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्वे,भिन्न कर्तृत्वे. तुलना करूच नये. आताशी अश्या मोठ्या अंत्ययात्रा केवळ राजधानी दिल्लीत निघतात..सरकारी इतमामाने...

In reply to by राही

...तरुणांचा ओढा जहालांकडे असल्यामुळे मवाळांना खूपच टिंगलटवाळी व कुचेष्टा सहन करावी लागे. आगरकरांची तर जिवंतपणी प्रेतयात्रा निघाली
इथे आगरकर हे मवाळ असल्याचे सुचवायचे आहे असे वाटले म्हणून हे अवांतर. जहाल - मवाळ या संज्ञा राष्ट्रीय सभेच्या अर्थात काँग्रेसच्या राजकीय भूमीकेच्या संदर्भात वापरल्या जातात. एकंदर भूमीकेच्या , किंवा सामाजिक भूमीकेच्या संदर्भात नाही. जहाल मवाळ असे उदाहरण द्यायचे झाले तर टिळक - जहाल, आणि गोखले - मवाळ असे देता येईल. आगरकर यांना या संदर्भात मवाळ म्हणणे योग्य वाटत नाही. भूमीकेच्याच संदर्भात बोलायचे झाले तर मला वाटते आगरकरांइतकी (समाजसुधारणेबद्दल) जहाल मते क्वचितच कुणाची असतील; आणि म्हणूनच त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा निघाली. याबाबतीत आगरकर, म. फुले या मंडळींना एका बाजूला मांडता येईल - इंग्रजी राजवट असण्याला आक्षेप नाही, (जोवर समाजसुधारणेला त्या राजवटीचे साहाय्य होते आहे). काँग्रेसी मवाळांचे असे काही मत नव्हते. मवाळांची भूमीका स्वातंत्र्य मिळवण्याचीच होती, फक्त टप्प्या टप्प्याने, हळू हळू; तर जहालांना हवे होते संपूर्ण स्वराज्य. शिवाय, जहाल- मवाळ वाद हा एका विशिष्ट काळापुरता काँग्रेसमध्ये उद्भवलेला वाद होता. टिळक मंडालेला गेले आणि मवाळांनी काँग्रेस ताब्यात घेतली. फिरोजशहा निवर्तल्यानंतरच या वादाची इतीश्री झाली. जहाल मवाळ या सापेक्ष संज्ञा आहेत. कालचे जहाल हे आजचे मवाळ, आणि आजचे जहाल हे उद्याचे मवाळ अशी चढत्या भाजणीने जहालांची भूमीका अधिकाधिक कठोर होत गेलेली दिसते. दादाभाई, रानडे, गोखले, यांनी प्रथम ज्या भूमीका मांडल्या त्या अत्यंत साहसी (आणि जहाल) अशाच होत्या. त्यानंतर टिळक, अरविंद, यांच्या भूमीकेच्या पुढे त्या मवाळ वाटू लागल्या. असो. मुळात जहाल मवाळ हा वाद आगरकर यांच्या मृत्युनंतर काँग्रेसमध्ये आलेला/ वाढलेला दिसतो. बाकी जयंत साहेबांना विशेष धन्यवाद. आजचा दिवस सार्थकी लागला. या पुण्यस्मरणाने. टिळक मध्ययुगात जन्मले असते तर त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन केले असते असे कुणा समकालीनाने म्हणल्याचे वाचलेले आठवते. ते खरे वाटते. (ते स्वतः मात्र गणिताचा प्रोफेसर व्हायची माफक आकांक्षा बाळगून होते हा भाग वेगळा!)

In reply to by आळश्यांचा राजा

विकास 03/08/2011 - 00:32
जहाल मवाळ या सापेक्ष संज्ञा आहेत. सहमत. शिवाय, जहाल- मवाळ वाद हा एका विशिष्ट काळापुरता काँग्रेसमध्ये उद्भवलेला वाद होता. टिळक मंडालेला गेले आणि मवाळांनी काँग्रेस ताब्यात घेतली. फिरोजशहा निवर्तल्यानंतरच या वादाची इतीश्री झाली. टिळक मंडालेला जाण्याआधीच काँग्रेस पहील्यांदा फुटली होती. मात्र त्या सुरतेच्या घटनेच्याही आधी फिरोजशहांचे वर्चस्व होते. टिळक ते जाणून होते. त्यांची काँग्रेसमधील तत्कालीन मवाळांना गोंजारतच पुढे जायची इच्छा होती. आठवणीप्रमाणे, त्यावेळची काँग्रेस वास्तवीक नागपूरला भरण्याचा प्लॅन होता आणि तसे झाले असते तर टिळक समर्थक (मतदार सभासद) अधिक असणार होते. फिरोजशहांना ते अर्थातच नको होते. टिळकांच्या समर्थकांना त्यांनी चर्चेसाठी बोलावले होते. टिळकांनी त्यांना (त्यात एक आठवणारे नाव म्हणजे डॉ. मुंजे) या अर्थी समजावून पाठवले की ते स्वतः अध्यक्ष होणे महत्वाचे नाही, पण काँग्रेस नागपुरात झाली तर त्यांची (पक्षी: जहाल) विचारसरणी अधिक नेत स्वातंत्र्यचळवळ पुढे नेता येईल. त्यामुळे जरी फिरोजशहांनी चुचकारले तरी त्याकडे दुर्लक्ष करा. अर्थातच, "आतून कितीही तापलो असलो तरी डोके थंड ठेवून काम करता आले पाहीजे," असे म्हणणार्‍या आणि स्वाचरणार्‍या लोकमान्यांचे समर्थक तसे नव्हते. ते भावनेच्या आहारी गेले आणि फिरोजशहांना कोलीत मिळाले आणि काँग्रेस सुरतेला (मवाळांच्या प्राबल्यात) हलली... या सर्वामधे एक लक्षात ठेवले पाहीजे, की काँग्रेस ही तो पर्यंत आणि नंतरही बराच काळ चळवळ होती, राजकीय पक्ष नव्हता. त्यामुळे ही भांडणे अधिक करून तत्वावरून झाली. त्यात देशभक्ती कुणाचीच उथळ नव्हती अथवा वैयक्तीक स्वार्थ ना टिळकांचा होता ना त्यांच्याविरोधात सुरतेस अध्यक्ष होणार्‍या गोखल्यांचा होता.

In reply to by राही

विकास 03/08/2011 - 00:17
आचार्य अत्रे हे सिद्धहस्त लेखक.त्यांचे मृत्युलेखही उत्तम साहित्याचा नमुना ठरले. 'सूर्यास्त' तर प्रसिद्धच आहे.टिळक वारले तेव्हा अत्रे लहान होते. त्यामुळे मृत्युलेख जरी नसला तरी अंत्ययात्रेचे वर्णन तितक्याच दु:खाने आणि आत्मीयतेने त्यांनी केले आहे. अत्र्यांप्रमाणेच दुर्गाबाई भागवतांनी टिळकांच्या अंत्ययात्रेसंदर्भात (बघितल्याचे वगैरे) लिहीलेले आठवते. अत्र्यांचे सुर्यास्त केवळ नेहरूंवरीलच आहे. पण अनेक दिग्गजांच्यावरील त्यांचे मृत्युलेख वाचायचे असले तर "समाधीवरील अश्रू" आणि "हुंदके" ही पुस्तके वाचनीय आहेत.