परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही. कोण येणार तुमच्याशी रंग खेळायला?' मीपण लगेच उत्तरलो, ' मुलांच्या शाळेला सुटी आहे. कुणी नाही आले तर आम्ही वेळ मिळाल्यावर घरातच खेळू, पण मराठी प्रथा मोडणार नाही.'
मला खरंच नवल वाटते. एकीकडे आपणच आपल्या प्रथा मोडायच्या आणि पुन्हा मराठी संस्कृती कशी आक्रमणाच्या विळख्यात सापडलीय त्याचे गळे काढायचे. होळीलाच रंग खेळण्याची उत्तरेची प्रथा आपण स्वीकारलीय, पण होळी पेटवल्यावर संध्याकाळी त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची, होळीभोवती तांब्याभर पाण्याचे रिंगण घालत प्रदक्षिणा घालण्याची आणि होलिका राक्षशिणीच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा अन्य समाजांतील लोकांनी स्वीकारलीय का? असल्यास माझ्या पाहण्यात नाही. मग प्रत्येक समाज आपल्या प्रथा जतन करत असताना आपणच का आपल्या प्रथा मोडतोय?
आणखी एका अनुभवामुळे मी विचारमग्न झालोय. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आम्ही काय करतो, की आसपासच्या/नात्यातील परीक्षार्थींना घरी जाऊन शुभेच्छा आणि एक पेनसेट देतो. मुलांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे, एवढाच हेतू. तर या खेपेस जवळच राहणार्या दोन कन्यांना शुभेच्छा द्यायला गेलो. पहिले घर मराठी. मुलगी हाय-फाय शाळेत शिकणारी. तिने 'थँक्स' म्हटले. आई-वडिलांनी ती कसा जोरात अभ्यास करतीय सांगितले. नंतर दुसर्या घरी गेलो. हे कुटूंब परराज्यातून येथे स्थाईक झाले आहे. त्यांच्या मुलीने मला आणि पत्नीला पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. मी फार ओशाळलो. तिला म्हटले, 'ताई! असा नमस्कार आमच्यात आजी-आजोबांना करतात. इतर मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो.' त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' येताना मी पत्नीला म्हटले, 'बघ. आपला समाज कसा लवकर प्रथा विसरतोय ते.' त्यावर ती म्हणाली, 'अरे आताच्या तरुण मुलामुलींना वाकून पाया पडणे, विवाहाआधी दाखवण्याचा कार्यक्रम या गोष्टी रुचत नाहीत. तो काळ मागे पडलाय.'
खरंच तो काळ मागे पडलाय? की मराठी समाज नको इतका पुढे गेलाय?
वाचने
22435
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यावर तिचे आई-वडील म्हणाले,
या धाग्यापासून स्फूर्ती घेउन
पण...
In reply to या धाग्यापासून स्फूर्ती घेउन by अप्पा जोगळेकर
बादरायण
In reply to पण... by विकास
गांधी टोपी त्यांना कदाचित
In reply to पण... by विकास
त्यांना कदाचित दाको (दादा
In reply to गांधी टोपी त्यांना कदाचित by वपाडाव
अगदी बरोबर आहे तुमचे.