Skip to main content

पीपली लाइव

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 15/08/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्‍या एका गरीब शेतकर्‍याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट. चित्रपटाला निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. मुख्यप्रदेशात निवडणूका येउ घातल्या आहेत आणि पीपली गाव मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे. एकीकडे मुख्यमंत्री, ठाकूर, पप्पूलाल (ठाकूरचा प्रतिस्पर्धी), कृषीमंत्री किडवई ह्यांच्यातली रस्सीखेच तर दुसरीकडे हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवाल्यांची रस्सीखेच अप्रतीम सादर केली आहे. सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत, विशेषतः नथा, त्याची बायको, अम्माजी, राकेश (लोकल रिपोर्टर).. होरी महातो आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम परिणामकारक. मला स्वतःला नथाची बायको आणि होरी महातो ह्यांची मरण्यापेक्षा जगण्याची जिद्द खूप खूप भावली. संगीत सुद्धा छान आहे. 'महंगाइ डायन' गाणे मस्तच आहे. अनुशा रिजवी ह्यांचे दिग्दर्शन केवळ अप्रतीम. फेमला रात्री १० चा शो होता. शो सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत एकवले गेले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्गीत एकल्यावर छान वाटले. चित्रपट संपल्यावर जी जाणिव झाली ती मात्र खूप वेदना देणारी होती...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3989
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

याच/अशाच विषयावरचे गाभ्रीचा पाऊस , टिंग्या वगैरे आधी बघितले होते. दोन्ही ही नवोदित दिग्दर्शकांचे होते. या तुलनेत हा सिनेमा म्हणजे महाप्रलयाच्या पाण्यातून कपभर चहा बनवावा असा वाटला. (उपमा- गंगाधर गाडगीळ ) आधी हबिब तन्वीर , नया नाट्क वगैरेचे निर्देश वाचून अपेक्षा फार वाढतात. पण पुढं काय मजा येत नाही.

In reply to by अडगळ

याच/अशाच विषयावरचे गाभ्रीचा पाऊस , टिंग्या वगैरे आधी बघितले होते. दोन्ही ही नवोदित दिग्दर्शकांचे होते. सहमत. पण या सिनेमांच्या मागे अमीरखान हे नाव नव्हते. त्यामुळे मीडीयाने त्या सिनेमांची फुकट प्रसिध्दी नाही केली. पण ज्यांनी हे सिनेमे बघीतले ते नक्कीच प्रभावीत होते.

In reply to by चिंतामणी

गाभ्रीचा पाऊस हा सिनेमा तर खरोखरच विदारक होता. त्यातली सुरवातीची त्या शेतकर्‍याची कविता तर अगदी हेलावून सोडणारी आहे. ती कविता ऐकूनच काळजात कालवाकालव झाली.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत. टिंग्या आणि गाभ्रीचा पाउस दोन्ही पाहिले होते. ते सुद्धा अप्रतिमच होते. फरक एवढाच आहे की त्यांची मांडणी पूर्ण वेगळी होती (कारूण्यमय). तरी गाभ्रीचा पाउस मध्ये काही प्रसंग हलके फुलके आहेत (उदा. नायिका तिच्या मुलाला वडिलांच्या मागे पोलिसासारखी पाळत ठेवायला लावते, नायकाला सणासुदिचे दिवस नसताना गोड्धोड करून घालते इ.). त्यातसुद्धा नायकाच्या मित्राच्या वडिलांची पॅकेज मिळवण्याची धडपड दाखवली आहेच की. मुद्दा हा आहे की आजच्या शेतकर्‍याच्या आत्महत्येची किंमत सरकारदफ्तरी केवळ १-२ लाख रुपये आहे आणि ते खूप वाईट आणि निंदनीय आहे. पीपली लाइव मध्ये हे सर्व वेगळ्या स्वरुपात मांडले आहे. आणि हा चित्रपट संपल्यावर वा काय विनोदी चित्रपट होता असे मी तरी थेटरात ऐकले नाही. पीपली लाइव सुद्धा सुजाण प्रेक्षकांना अंतर्मुखच करतो, हे नक्की.

In reply to by प्रमोद्_पुणे

प्रमोदरावांशी सहमत आहे. ह्या आहेत त्या कवितेतील काही ओळी. मी आगळा येगळा माई न्यारीच जिन्दगानी, माह्ये मरनबी आहे, खरं अवकानी पानी मले हरीक माया कवितेचा, काया जमिनीतला काऊस त्याच्या मुईले गोडवा, गोड उसाच्या पेराचा माया मरनाले कोनी म्हणतील येळा, देह टांगता ठेवला जसा, फुलोऱ्यातला कानोला

मी मूव्ही आताच पाहून आले. ` अ मस्ट` म्हणण्याजोगा आहे. Sadness coated in comedy असा काहिसा. अर्थात मला त्यात कॉमेडी असे काहीच वाटले नाही. पण थिएटर मधले अमेरिकी भारतीय पब्लिक मात्र खूप हसत होते. आता मला वाटते आहे की कॉमेडी मला कळली नाही की सॅडनेस त्यांना कळला नाही? मेक अप न केलेली सर्वाधिक पात्र, गरीबीची वास्तवता, मिडिया ची लूडबूड, राजकिय गोंधळ, स्वार्थ ,निरूत्तरीत प्रश्न, अशक्यप्राय म्हणण्यापेक्षा कठिण उपाय असलेल्या समस्या... हे पडद्यावर पाहून मन पिळवटून गेले. अनुशा रिझवीचा लेखनाचा , दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव. तरीही नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रोड्युसर अमीर का तो क्या कहना?

In reply to by पारुबाई

रेडीओवर ऐकल्याप्रमाणे हा चित्रपट विनोदी अंगाने सत्यस्थिती दाखवणारा आहे. असं असल्यास लोकं हसले याबद्दल मलातरी वाईट वाटणार नाही. पिक्चर बघण्याची इच्छा आहे; कधी पूर्ण करेन माहित नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेडीओवर ऐकल्याप्रमाणे हा चित्रपट विनोदी अंगाने सत्यस्थिती दाखवणारा आहे. असं असल्यास लोकं हसले याबद्दल मलातरी वाईट वाटणार नाही.
आपण कोणत्या मुडमधे लिहल माहीती नाही,पण मला खुप हासायला आल.
पण थिएटर मधले अमेरिकी भारतीय पब्लिक मात्र खूप हसत होते.
आता कळल का ते पुढे आहेत ते! भावनावश होउन देश पुढे जात नसतो!! विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स्वःताला विचारुन बघा!! त्यांना कसलाच आधार सोडायचा नाही का??

वाईट वाटुन घेवुन काय फायदा? अमेरिकेतील भारतिय तिकडे चैनी करायला गेले नाही. त्याना तिकडे चांगला रोजगार मिळाला म्हणुन गेले आहेत. त्यानी चार घटका मनोरंजन करुन घेतले तर कुणाचा पोटात दुखु नये. आमीरने पिक्चर अमेरिकेत दाखवला तो पैसा मिळवायलाच ना? बाकी इकडे भारतात किती आणि कुणा कुणासाठी म्हणुन रडायचे हा मोठा प्रश्न आहे.

पीपली लाइव्ह बद्दल बरेच ऐकले, वाचले आहे, त्यामुळे सिनेमा बघायची इच्छा तर आहेच. स्वाती

आमिर खान च्या नावाला जागणारा छान चित्रपट!! भाषा थोडी वेगळी आहे पण समजते... सगळी पात्रं आपलं काम योग्य प्रकारे करतात.. प्रेक्शक हसतात पण विचारातही पडतात... गाणी ठीक पण संवाद उत्तम आहेत, प्रसंग पन छान रंगवलेत... थोड्क्यातः जरूर बघा पैसे वाया गेले असं नक्की वाटणार नाही...

सदानंद देशमुखांची ह्या विषयावरची बारोमास कादंबरी ह्याच अंगाने आहे.. पण अंगावर येतो शेवट! हतबल करुन जातो. नक्कीच पाहायला हवा हा चित्रपट.. पण आपण काय करतोय ह्या शेतकर्‍यांबद्दल ह्याचा विचार होण आणि त्यातून कृती होणं आवश्यक आहे, नुसतं (ब्लॅक कॉमेडी का होईना) हसण्यापेक्षा!

अतिशय चुकीचा निर्णय. त्याने लगान च्या आमिर खान कडुन क्रिकेट शिकुन घ्यावे. कृषिमंत्री साहेब त्याला पुढच्या आयपीएल मध्ये नक्की मजबुत पॅकेज मिळवुन देतील.

कालच हा चित्रपट पाहिला. मला तर त्यात कुठे फारसे हसायला आले नाही. कर्जबाजारी शेतकर्‍यापेक्षा मिडीया चा कावेबाजपणा चॅनेल्स चे टी आर पी वाढवायचा ध्यास राजकारण यावरच चित्रपट जास्त लक्ष्य देतो. शेतकर्‍याची कर्जबाजारी अवस्था का होते यावर कोणीच काही भाष्य करत नाही. होरी महातो दिवसभर माती खोदून अवघे १५ रुपये मजूरी मिळवत असतो. आपण साध्या चहासाठी १५ रुपये सहज उडवतो. चित्रपटात दाखवलेला कृषीमन्त्री आपल्या सध्याच्या कृषीमन्त्र्यांची आणि त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देतो.

पैशाच्या मोहापायी शेतकरी आत्महत्या करतो, असा आभास निर्माण करणारा चित्रपट, त्यावर टाळ्या वाजवणारे प्रेक्षक आणि यात गैर काय असे वाटून घेणारा समाज..........!! काय बोलणार.....................????????????????????????????? ( विकृत,बधिर, नपुसंक,षंढ वगैरे शब्द जुने झालेत. नविन परीणामकारक शब्दांची निर्मिती होऊन योग्य शब्द मिळेपर्यंत न बोललेच बरे......... हम्म्म.)

In reply to by गंगाधर मुटे

चित्रपट न बघताच चित्रपट समजल्यासारखे भाष्य करणारे आणि निषेध करणारे लोक, त्याला मिळणारा मेंढरांचा पाठींबा.... काय बोलणार यावर????

In reply to by नीधप

जाउद्या हो. अशा लोकांची मानसिकता आपण बदलू शकत नाही . तुम्हाला चित्रपट आवडला ना, संपलेतर.. चित्रपट न बघताच मत नोंदवणार्‍यांकडे दुर्लक्ष करणे अत्युत्तम.

आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम परिणामकारक लालबहादूर तर खुपच परिणामकारक. आणि त्याचा उपयोग तर त्याहुनही भारी.

>>>चित्रपट न बघताच चित्रपट समजल्यासारखे भाष्य करणारे आणि निषेध करणारे लोक, त्याला मिळणारा मेंढरांचा पाठींबा.... काय बोलणार यावर??? सहमत आहे.

टिंग्या, गाभ्रीचा पाऊस वगैरे चित्रपटांच्या उल्लेखानेच मला हसू आले. हे दोन चित्रपट आजवर जितक्या लोकांनी पाहिलेले आहेत, त्यापेक्षा अधिकांनी पीपली लाईव्ह पहिल्याच दिवशी पाहिला.

मी ही काल पाहिला पीपली लाइव्ह. एकदम जबरदस्त चित्रपट आहे (मी टिंग्या आणि गाभ्रीचा पाऊस ही पाहिलेले आहेत). मला तरी कोठे वाटले नाही की शेतकर्‍यांना कमी लेखले आहे किंवा त्यांच्यावर काही टीकात्मक सूर आहे. सगळा भर राजकारणी आणि मीडिया त्याचा वापर कसा करतात यावरच आहे. जरूर पाहा!