मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उन्हाळ्याची तयारी

अरुंधती · · जनातलं, मनातलं
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे! तशी निसर्गाने उन्हाळा आलाय ह्याची वर्दी आधीच दिलेली असते. बाजारात रसरशीत कलिंगडे येऊ लागली असतात. त्यांचा तो जर्द हिरवा आणि गुलाबी लाल रंग पाहूनच डोळे निवतात. कधी एकदा त्या कलिंगडाचा आस्वाद घेतो असे होऊन जाते! घरी कोकम, रुह अफ्जा, खस, गुलाब वगैरेची पारंपारिक सरबते पाहुण्यांसाठी सज्ज असतातच! शिवाय कैरीच्या पन्ह्याची तर काय महती वर्णावी!! पण, कधीही, कोठेही सहज उपलब्ध होणारा व तप्त जीवाची तृषा भागविणारा पर्याय म्हणजे लिंबूपाणी! रस्त्यांवर असे लिंबूपाणी, लिंबू सरबत विकणारे दिसले की त्यांच्यासमोरही ग्राहकांची भरपूर गर्दी असते! सर्वात मस्त म्हणजे घरीच केलेले लिंबाचे सरबत.... त्यात जर जलजिरा, पुदिन्याचे एखादे हिरवेगार पान आणि भरपूर बर्फ घातला तर अजूनच मजा येते! घरी जर लहान मुले असतील तर मग त्यांना आया, आज्ज्या झळवणीच्या पाण्याने आंघोळ करायला लावतात. तांब्याच्या घंगाळ्यात पाण्यात हिरवागार कडुनिंब घालायचा, त्याला वरून सुती मलमलीचे पांढरे कापड बांधायचे व ते घंगाळे दिवसभर उन्हात ठेवून द्यायचे. सायंकाळी त्या सूर्यकिरणांनी अप्रत्यक्षपणे तापलेल्या पाण्याने मुलांना आंघोळ घालायची. त्या अगोदर उकडलेल्या कैरीचा गर अंगाला लावायचा, आणि आंघोळ झाल्यावर सुती पंच्याने अंग कोरडे करून मुलांना सुती, मलमलीचे कपडे घालायला द्यायचे. त्या झळवणीच्या पाण्यातल्या कडुनिंबाच्या डहाळ्या आंघोळ करताना गुदगुल्या करू लागल्या की मुले जी खुदूखुदू हसतात त्यांतही गंमत आहे! आंब्याच्या उल्लेखाशिवाय आणि रसास्वादाशिवाय उन्हाळ्याविषयीचा कोणताच लेख पुरा होऊ शकत नाही! अक्षय्यतृतीया झाली की देवाला डाळ-पन्ह्याचा व आंब्याचा नैवेद्य दाखवून समस्त जनता आंब्यांवर तुटून पडायला सिध्द होते. मग ते आंबे हापूसचे असोत, तोतापुरी, शेंदरी, पायरी की गोटी आंबे! सकाळ- संध्याकाळ जेवणात आमरस, मधल्या वेळेला आंब्याच्या फोडी, आईसक्रीम, लस्सी, पियूष.... एकसे बढकर एक! आंब्याने उन्हाळा सुसह्य होतो. लहान असताना मधोमध आंब्यांचा ढीग ठेवून आम्ही मुले सर्वांग आंब्याने माखून घेत त्यांचा गर ओरपत, साली, कोयी चोखत स्वर्गप्राप्तीचा आनंद अनुभवत असू. इतर सर्व जग त्या आनंदापुढे तुच्छ वाटे!! आणि उन्हाळ्याचे वर्णन सुगंधाच्या त्या मौक्तिक कळ्यांच्या उल्लेखाशिवाय अपुरेच राहते! मोगर्‍याच्या शुभ्र, देखण्या, नाजूक, प्रसन्न रुपाला तितक्याच मोहक सुगंधाची जी अपरिमित देणगी मिळाली आहे त्याची लयलूट तो जणू आसमंतात आपल्या चित्तवृत्ती उल्हसित करणार्‍या परिमळाने करतो. बागेतल्या मोगर्‍याच्या झुडुपांपासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडच्या ह्या रेखीव चांदण्यांच्या माळा मग सखी सजणी मोठ्या दिमाखात आपल्या केशसंभारात मिरवायला लागतात. ग्रीष्माचा ताव कितीही कडक असला तरी आपल्याच लेकरांना निसर्ग त्यावरचा उपायही प्रदान करत असतो. निसर्गाने दिलेली ही रंग, रूप, रस, गंध, स्पर्शाची अनमोल देण दोन्ही ओंजळींनी भरभरून घेतली तरी हात अपुरे पडतात. त्या बहराने अस्तित्त्व व्यापले जाते, मन प्रसन्न होते आणि ग्रीष्माच्या दाहकतेला शांत करते! -- अरुंधती कुलकर्णी http://iravatik.blogspot.com/ (चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. केवळ तुमच्या डोळ्यांना निववण्यासाठी!! :-))

वाचने 10927 वाचनखूण प्रतिक्रिया 37

रेवती Mon, 03/22/2010 - 23:09
आहाहा!! लेखन मनाला एकदम गारेग्गार करून गेले! उन्हाळ्याच्यादिवसात अंगणात किंवा गच्चीवर वाळवलेले चुरचुरीत कपडे, कुर्डया, पापड्यांसारखी वाळवणे (अर्धी ओली असताना खाणे) असं सगळं आठवलं. रेवती

In reply to by मीनल

स्वाती दिनेश Tue, 03/23/2010 - 12:27
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय . इथे तर आज ही बारीकसा स्नो फॉल झालाय. थंडी जायच नावच घेत नाही आहे. अगदी ग, आमच्याकडचा स्नो थांबला आता, पण थंडी जायचं नावच घेत नाहीये,:( आत्ता कुठे पारा "डबल डिजिट" मध्ये तपमान दाखवायला लागला आहे. अजूनही स्वेटर घालावा लागतोच आहे... स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

नितिन थत्ते Wed, 03/24/2010 - 08:23
>>हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय ह्म्म. प्रत्येकाचे वेगवेगळे दु:ख. यावरून एक किस्सा आठवला. आमच्या ओळखीतले एक गृहस्थ सरकारी नोकरी निमित्ताने सिमल्याला दोन एक वर्षे होते. त्यांना बोलता बोलता म्हटले "तुमची मजा आहे बुवा....सिमल्याला नोकरी......उन्हाळ्याचा त्रास नाही !!! :) . तेव्हा त्यांना एकदम संताप आला आणि मला म्हणाले "अहो कसली मजा >:P .... सिमल्याला राहून पहा. थंडीत नुसता जीव अर्धमेला होतो". :( स्वातीतै पण बहुधा असेच म्हणतील. :) नितिन थत्ते

In reply to by मीनल

देवदत्त Tue, 03/23/2010 - 12:57
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय पहिल्यांदा हे वाचून वाटले मार्च मध्येच एवढी गरमी असताना उन्हाळा का पाहिजे? :D पण पुढचे वाचले आणि का ते कळले.

टारझन Mon, 03/22/2010 - 23:14
व्व्वा !! सुर्रेख सुर्रेख .. :) कलिंगड म्हणजे आमचा जिव की प्राण .. ल्हाणपणा पासुन आमचं एक स्वप्न आहे .. एखाद्या भल्या मोठ्या कलींगडात घर करुन रहायचं :)

In reply to by टारझन

मेघवेडा Tue, 03/23/2010 - 16:26
आता तुला रहायला कलिंचा गड लागेल!! कलिंगड काय कामाचं?? :P -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by टारझन

अरुंधती Tue, 03/23/2010 - 20:21
कलिंगडात घर? :-) मला भोपळ्याची व म्हातारीच्या गोष्टीची आठवण झाली... चल रे भोपळ्या टुणुक टुणुक तसे चल रे कलिंगडा टुणुक टुणुक! घर केलंत की सांगा नक्की! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

शुचि Tue, 03/23/2010 - 00:26
लेख भलताच भारी झालाय. मस्त. आवडला. मार्च महीन्यात जे वारे वहातात त्यानी इतकं मस्त वाटतं आणि नेमक्या तेव्हा परीक्षा असतात. मला वाटतं हेच ते वसंत ऋतूचे वारे. पहाटे पहाटे चालण्यासाठी बाहेर पडावं तर पक्षी इतके मंजूळ सुस्वरात साद घालत असतात. त्यांचा मीलन काळ हाच असतो त्यामुळे असेल कदाचीत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

चतुरंग Tue, 03/23/2010 - 00:31
सुंदर लेखन! सगळ्या आठवणींचा पट उलगडलात!! धन्यवाद! :) पन्ह्यासाठी आई कैर्‍या उकडून ठेवायची आणि मग त्यातला गर काढून झाल्यावर राहिलेल्या साली आणि कोयींनी अंग घासून गच्चीवर ठेवलेल्या तांब्याच्या घंगाळातल्या झळवणीच्या पाण्याने आम्ही गच्चीवरच आंघोळ करायचो. मग राजापुरी पंचाने अंग पुसायचे की वेलची पूड घातलेले थंडगार पन्हे हाणायला तयार! आंबे तर एक दोनाच्या हिशेबात कधी खाल्लेच नाहीत! रस काढायला मी सगळ्यात पुढे. आंबे घमेल्यात घेऊन धुवायचे, पुसून मऊ करायचे, रस काढायचा, कोयी आणि साले चाटून सर्व तोंड, हात माखून घ्यायचे त्याशिवाय मजा नाही! घरातच मोगर्‍याच्या चार कुंड्या होत्या संध्याकाळी फुले उमलून संपूर्ण घरभर सुवास सुटायचा. अबोली आणि मोगर्‍याची फुलं एकत्र फार सुंदर दिसतात. (आठवणीत हरवलेला)चतुरंग

चित्रा Tue, 03/23/2010 - 03:40
सुंदर लेख आणि चित्रांनी शोभा वाढवली. आमच्या घरी उन्हाळ्याच्या सुमाराला एप्रिलच्या मध्यावर-मे च्या मध्यापर्यंत भरपूर वाळवणे चालत असत. मुख्य म्हणजे डाळींना उन्हे देणे हा मोठा कार्यक्रम असे. आणि त्या डाळी वर्षभराच्या घेऊन नीट भरून ठेवणे हे प्रचंड कटकटीचे काम आमच्या घरच्या मोठ्या बायका कशा करत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. असो ते नंतर कधीतरी.

इंटरनेटस्नेही Tue, 03/23/2010 - 05:58
अप्रतिम लिहलयं तुम्ही.. तुम्ही आमच्या सारख्या नवीन लेखकांना अगदी आदर्शवत लिहीता.. कीप इट अप..! -- (भारावुन गेलेला) इंटरनेटप्रेमी.

झकासराव Tue, 03/23/2010 - 10:39
मस्त लेख. :) आई उन्हाळ्याचे पापड, कुरडया, सांडगे अस काही काही करत असायची. वाळत घालण्याच काम आम्ही स्वताकडे घायचो. कारण काही गोळे गट्टम करायला मिळायचे.

मदनबाण Tue, 03/23/2010 - 12:13
सुंदर चित्रमय लेख... :) (आमराईतल्या कैर्‍या चोरणारा...) :) मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms

समंजस Tue, 03/23/2010 - 13:36
सुंदर!!! माझ्या सुद्धा उन्हाळ्यातील बालपणीच्या आठवणी जागृत झाल्यात :) शाळेतील बारामाही परिक्षा संपल्यावर सुरू होणार्‍या उन्हाळ्यातील सुट्टया खुपच हव्याशा वाटत 8> (भरपूर खेळायला मिळणार यामुळे की वर लेखात उल्लेखलेल्या पदार्थांचा फडशा पाडायला मिळणार यामुळे :? ठाउक नाही पण उन्हाळा खुप आवडायचा :D )

वाहीदा Tue, 03/23/2010 - 13:59
डोळे सुखावले .. अहाहा अल्हाद -दायक ~ वाहीदा

समीरसूर Tue, 03/23/2010 - 15:14
मजा आली वाचून. आणि उन्हाळ्याचं किती सुंदर वर्णन केलं आहे! अगदी डोळ्यासमोर उभे राहिले उन्हाळ्यातले दिवस. छान! --समीर

मेघवेडा Tue, 03/23/2010 - 16:29
आता कसं वाटतंय??? एकदम गार गाऽऽऽर वाटतंय!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अरुंधती Tue, 03/23/2010 - 20:36
हा लेख खरं तर मी खूप उकडत होतं तेव्हा लिहायला घेतला.... आणि ते सर्व लिहिताना उकाडा कोठे पळाला, मन कसे प्रसन्न झाले ते कळलेच नाही! तुम्हाला सगळ्यांना आवडला हा लेख व फोटो हे वाचून मस्तच वाटले. माझ्या बरोबर तुमचेही सर्वांचे डोळे निवले व आल्हाददायक आठवणी जागृत झाल्या! अजून काय हवे? :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

संदीप चित्रे Tue, 03/23/2010 - 20:50
मागच्या शनिवारी इथे वसंत ऋतुचा पहिला दिवस होता आणि तुम्हीतर आधी उन्हाळ्याची वाट बघायला लावताय :) सगळेच फोटो अगदी योग्य आहेत. पण ह्या लेखात 'उसाच्या रस', रसवंतीगृह आणि फोटो राहिलेले दिसतायत :) शेणाने सारवलेल्या जमिनी, बांबूच्या तट्ट्यांचा भिंती, बसायला लाकडी बाकं आणि डुगडुगणारी टेबलं, भिंतीवर काळानुरूप बदलणारे नट्यांचे फोटो (तेव्हा रेखा, हेमा मालिनी असायच्या, आता प्रियांका, बिपाशा, करीन, कतरीना असतील), आणि तो घुंगुरांच्या आवाजाबरोबर चालणार उसाचा चरक. ... लिहावं तितकं कमीच आहे :) (परवा न्यू जर्सीतल्या स्प्रिंगच्या स्वागताला उसाचा रस प्यायलेला) संदीप ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अरुंधती Tue, 03/23/2010 - 21:38
संदीप, लिहिताना मला पण ऊसाचा आले-लिंबू घातलेला बर्फाळ रस आठवला.... रसवंती गृहात भर दुपारी जाऊन 'एक फुल एक हाफ' करत, घुंगरांचा ताल व नाद कानांत साठवत, आजूबाजूच्या रंगीबेरंगी पोस्टर्सकडे बघत घालवलेला तो ऊसाच्या गुर्‍हाळातला सह्ही काळ! :-) हा घ्या तुमच्यासाठी खास गारेगार ऊसाचा रस! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

चित्रगुप्त Tue, 03/23/2010 - 21:47
वाहवा... अतिशय सुन्दर लिखाण आणि तितकीच छान चित्रे..... असेच र्सौंदर्य निर्माण करीत रहा........सहज "समर नाईट" असे गुगलताना ही प्रतिमा मिळाली: summer night