Skip to main content

टू द लास्ट बुलेट-भाग १

टू द लास्ट बुलेट-भाग १

Published on 10/12/2009 - 04:41 प्रकाशित मुखपृष्ठ
टू द लास्ट बुलेट-विनिताताई कामटे यांनी विनीताताई देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय २६/११/२००९ला "मुंबई हत्याकांड (Mumbai Massacre)" म्हणून ओळखल्या जाणार्‍या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष झालं. त्याच दिवशी श्रीमती विनीता कामटे यांनी वीरगती प्राप्त झालेले आपले पती हुतात्मा अशोकजी कामटे यांच्याबद्दल विनीता देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेले "To the last bullet" हे पुस्तक प्रकाशित झाले. २८-२९ नव्हेंबरला मला ते पुण्यातल्या पुस्तकविक्रेत्यांकडे मिळाले व मी ते घेतले. अर्धेअधीक पुण्यातच वाचून झाले व उरलेले मी अमेरिकेच्या विमानप्रवासात वाचले. विनीताताईंनी खरंच फारच ताकतीने आपलं दु:ख गिळून अतीशय सुंदर व अर्थवाही पुस्तक लिहिलेले आहे. घडी उलगडताना प्रत्येक घडीबरोबर जसं एकाद्या साडीचं सौंदर्य झळकू लागतं तसंच प्रत्येक वाक्यागणिक/पानागणिक अशोकजींचं लोभसवाणं - करारी, शिस्तप्रिय व त्याच वेळी अतीशय सहृदय, कनवाळू - असं व्यक्तिमत्व उजळत जातं. हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्याबद्दल माझ्या मनात एकच विशेषण आलं ते म्हणजे "पुरुषोत्तम"! हे पुस्तक वाचायच्या आधी मला त्यांना वीरगती कोणत्या परिस्थितीत मिळाली याची फारशी माहिती नव्हती. विनीताताईंनी लिहिल्याप्रमाणे स्वत:चा नाकर्तेपणा किंवा हलगर्जीपणा (किंवा दोन्ही!) लपविण्यासाठी अशोकजींच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व राजकीय नेत्यांनी एक गैरसमज पसरवला होता कीं हेमंत करकरे, सालसकर व अशोकजी या तीघांना त्यावेळची परिस्थिती किंवा तिचे गांभिर्य कळलेच नाहीं व एकाद्या नवशिक्या व अपरिपक्व अधिकार्‍यांसारखे अविचारी धाडस दाखवत ते एकाच गाडीत बसून पुढे गेले व अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण २१ नव्हेंबरला मी भारतात परत आल्यावर दूरचित्रवाणीवर या हल्ल्याबद्दल सखोल संशोधनावर आधारलले बरेच कार्यक्रम पहायला मिळाले व त्यातून हे गैरसमज दूर होऊ लागले होतेच. पण विनीताताईंचे हे पुस्तक वाचल्यावर मात्र उरली-सुरली कोळिष्टके क्षणात दूर झाली व अनेक नवे (व छुपे) खलनायक समोर येऊ लागले. विनीताताईंनी जरी खूपच सडेतोडपणे हे पुस्तक लिहिले असले तरी कांहीं ठिकाणी त्यांनी जरासा ’आवरता हात’ घेतलाय् असेही वाटले. सुदैवाने विनीताताईंनी त्यांचा तसेच विनीताताई देशमुख यांचाही इ-मेलचा पत्ता दिला होता त्यांना मी बरेच प्रश्न विचारले. अद्याप विनीताताई कामटे यांचे उत्तर आलेले नाहीं पण विनीताताई देशमुख यांनी कामटे मॅडमच उत्तर देतील असे लिहिले आहे. कदाचित् पोलीसखात्याच्या मर्यादांमुळे त्यांनी हात आवरता घेतला असेल. याबाबतीतील मला वाटलेल्या कुशंका माझ्या लेखनात पुढे सविस्तरपणे येतीलच. हा सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रारंभ होतो हुतात्मा करकरेंच्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या हरवण्यापासूनच. म्हणजे ते जॅकेट योग्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते कीं हलक्या प्रतीचे होते याचा शोध तिथेच संपला! अगदी प्रेसिडेंट केनेडींचा मेंदू वॉल्टर रीड इस्पितळातून "नाहींसा" झाल्याच्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना आहे. तो नाहींसा झाल्यामुळे केनेडींना लागलेली गोळी मागून झाडलेली होती कीं पुढून झाडलेली हे कळलेच नाहीं, तसाच हा प्रकार. "त्या दिवशी हेमंत करकरेंनी जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जॅकेट वापरले असते तर ते आज हयात असते कां हा प्रश्न मला जन्मभर भेडसावीत राहील" असे श्रीमती कविता करकरे यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलेलेच आहे. पुढे त्या म्हणतात कीं हुतात्मे कांहीं एका दिवसात तयार होत नाहींत तर त्याला आयुष्यभराची निष्ठा व धैर्य लागते व ते त्यांनी अशोकजींच्या कारकीर्दीत जवळून पाहिले होते. आपल्या "थेट हृदयापासून" या परिचयपर ’दोन शब्दां’त विनीताताईही म्हणतात कीं हा हल्ला असामान्य असाच होता. या हल्ल्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षणही मुंबई पोलिसांना नव्हते, त्यांची शस्त्रेही अद्ययावत् व पुरेशी नव्हती, तरीही कांही पोलीस अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी ही एक जास्तीची जबाबदारी समजून असामान्य नेतृत्व व असाधारण धैर्य दाखवून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्या पुढे म्हणतात कीं याउलट मुंबई पोलीस संघटनेचे बरेच अधिकारी त्या दिवशी या संकटाला सामोरे जायला कचरल्याचे जाणवते. भित्र्या पोलीस अधिकार्‍यांना किती सुरेख "शालजोडीतला आहेर" दिलाय् विनीताताईंनी! अपुरी शस्त्रास्त्रे व अपुरे प्रशिक्षण यांमुळे प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या पोलिस हवालदारांना पुढे न पाठवता या तीन अधिकार्‍यांनी स्वत:च पुढाकार घेऊन या हल्ल्याला तोंड दिले. या अधिकार्‍यांनी दबा धरून बसलेल्या (ambush) अतिरेक्यांवर गोळीबार करून त्यांपैकी कसाबचे दोन्ही हात निकामी केले ज्यामुळे आणखी नरसंहार टळला. पुढे चौपाटीवर हुतात्मा ओंबळे व इतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या जखमी कसाबला पकडले. अशा तर्‍हेने छत्रपती शिवाजी टर्मिनल ते चौपाटी दरम्यान या सर्व अधिकार्‍यांनी दाखविलेल्या शौर्यामुळेच एक अतिरेकी आज आपल्या हाती लागला. वरिष्ठांनी त्यांच्या या शौर्याला 'अविचारी धाडस' किंवा 'अज्ञाना'चा मुलामा चढवायला नको होता. या सर्वांचे व त्यातल्या त्यात अशोकजींचे असाधारण काम व त्यांचा दुर्दैवी मृत्यू रंगभवन गल्लीत कोणत्या परिस्थीतीत झाला यामधील दडवून ठेवलेले रहस्य उलगडून ते जनतेसमोर एका पुस्तकाच्या रूपाने ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला होता व त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला. त्यांना पोलीस संघटनेकडून सहकार्य तर नाहींच मिळाले पण याउलट पदोपदी त्यांच्या मार्गात अडथळेच आणले गेले याचे त्यांना आश्चर्य व दु:ख झाले. साधा पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टही त्यांना दिला गेला नाहीं. जर त्या दिवशी करकरे यांच्या आज्ञा पाळल्या गेल्या असत्या व त्यांनी केलेली व्यूहरचना पाळली गेली असती तर हे शूर अधिकारी असे धारातीर्थी पडलेच नसते. गोळी लागल्यावरही रक्तबंबाळ स्वरूपात त्यांना रस्त्यावर पडलेले रंगभवन गल्लीत रहाणार्‍या रहिवाशांनी पाहिले होते व त्यांनी १०० नंबरवर फोन करून ही माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिलीही होती. तरीही कसे कुणी मदतीला आले नाहीं, एक पोलीसची लाल दिवा असलेली गाडी तिथून गेली त्यातील अधिकार्‍यांनीही त्यांना कशी मदत केली नाहीं याचेही वर्णन त्यांनी केले आहे. करकरे याच्या व्युहरचनेबरहुकूम करवाई झाली असती तर बरेच अतिरेकी हाती लागले असते व या शूर अधिकार्‍यांचा मृत्यूही टळला असता असे त्यांनी नमूद केले आहे. हे रहस्य त्यांनी कसे परिश्रमपूर्वक उलगडले, त्यांना पोलीस संघटनेकडून कुणीही कशी सुखासुखी माहिती दिली नाहीं व शेवटी RTI द्वाराच त्यांनी ही माहिती कशी मिळविली हा व इतर हृदयद्रावक भाग पुढील कांहीं भागात. शेवटी एक विनंती. प्रत्येक स्वदेशाभिमानी भारतीयाने हे पुस्तक वाचनालयातून वाचायला न आणता विकत घेऊन वाचावे जेणे करून तिच्या आवृत्यावर आवृत्या झटपट विकल्या जातील व विनीताताईंच्या लिखाणाचे चीज होईल.

याद्या 14376
प्रतिक्रिया 37

पुस्तक वाचावंच लागेल. तरीही एक गोष्ट नक्की आहे की पुढे ह्यातून काहीही निष्पन्न होणार नाही...म्हणजे एखाद्या पोलिस अधिकार्‍याला बळीचा बकरा बनवण्या पलीकडे काहीच होणार नाही. हल्ल्याच्या वेळी असलेले गृहमंत्री....ज्यांनी राजीनामा दिला होता ते आज पुन्हा त्याच जागेवर स्थानापन्न झालेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात मंत्री झालेत. हल्ल्यानंतर आपल्याच सरकारवर हल्ला करणारे आणि हल्लेखोरांना काही नेत्यांनीच मदत केली होती....त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू...असे म्हणणारे नारायण राणेही मंत्रीमंडळात आहेत. त्यावेळचे पोलिस आयुक्त गफूर देखिल आपल्या जागेवर टिकून आहेतच. मग मला सांगा...ह्या पुस्तकातील मजकुरामुळे असे काय बदलणार आहे? आजवर जे होत आलंय त्यापेक्षा काही वेगळं घडेल असं वाटत नाही....लोकांची स्मरणशक्ति फार काळ टिकत नाही हे राज्यकर्ते जाणून आहेत आणि शेवटी.....भा.रा. तांबे म्हणतात त्याप्रमाणे....जन पळभर म्हणतील हाय, मी जाता राहिल कार्य काय? भविष्यातही असेच हल्ले होतील आणि असेच शूर,बहाद्दुर अधिकारी मरतील,आपण सगळे त्यांना हुतात्मा म्हणून गौरवू..बस्स. पुढे काय? काहीच नाही. :(

ह्म्म्,काय बोलणार !!! मुंबई पोलिस ज्यांच्या बद्धल नेहमी चांगलेच ऐकायला मिळायचे ती परिस्थिती आता राहिली नाही.जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि ज्यांच्याकडुन सुरक्षेची अपेक्षा करावी ती यंत्रणाच पोखरली गेली आहे. जिथे पैसे खायला मिळतात अशा ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणे,तसेच निवडणुक आली की राजकारणी त्यांच्या मर्जीतल्या माणसांची बदली कसे कशी करतात त्याचे आकडे ही बोलके आहेत... ह्या प्रामाणिक यंत्रणेची वाट लावण्यास राजकारणी लोकांशिवाय कोणाचा हातभार असणार आहे का ? आज जिथे पहावे तिथे पोलिस लाच घेताना दिसतात...असे का घडते आहे याचाही जरुर विचार करायला हवा. बाकी वरच्या देव काकांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. असे असले तरी उत्तम काम करणार्‍या पोलिसांची कमी नाही,फक्त गरज आहे ते या यंत्रणेला योग्य ते स्वातंत्र्य देण्याची. काळे काका पुस्तकाची चांगली ओळख करुन दिलीत. जरा हे पण वाचा :--- पोलिसनामा :--- http://policenama.blogspot.com/2009/09/blog-post.html mumbai crime diary :--- http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/04/280.html मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia मुंबई पोलिस मुख्यालयही असुरक्षित :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5188242.cms मुंबईतील राजभवनच असुरक्षित :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5162138.cms

चांगला परिचय. देवकाका आणि बाणाच्या प्रतिसादाशी सहमत.

पुस्तकाची चांगली ओळख करुन देत आहात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

मला मनापासून वाटते कीं एका वीरपत्नीने असे थेट केलेले लेखी आरोप अशा वाईट गोष्टी नक्कीच सुधारू शकतील. त्यात आता गफूर यांनी "चार अधिकारी जबाबदारीने वागले नाहींत" असा उघड आरोप केला आहे. त्याशिवाय श्री. मारिया यांनीही "सरकारने विनीताताईंच्या आरोपांना (negligence or incompetence?) उत्तर द्यावे अन्यथा...." अशी गुरगूरही केली आहे. हे पुस्तक "अरण्यरुदन" होऊ नये असे जर आपणा सर्वांना वाटत असेल तर या अधिकार्‍याना आपण शेकड्यांनी पत्रे पाठविली पाहिजेत. त्यांचे ई-मेल जर आपल्यापैकी कुणाला माहीत असतील तर ते इथे कळावावेत. किंवा पुस्तकात दिलेल्या ई-मेलवरून विनीताताईंकडून मागवावेत. त्यांनाही त्यांच्या पतीचे बलिदान वाया जाऊ नये असे नक्कीच वाटत असणार. नाहीं तर त्यांनी असा हे पुस्तक नेटाने लिहिण्याचा यशस्वी प्रयत्न केलाच नसता. जनतेची स्मरणशक्ती नेहमी क्षणभंगुर नसते, एक विशिष्ट पातळी ओलांडल्यानंतर तिची वज्रमूठ बनते. असे नसते तर सुहार्तो, मार्कोस मुशर्रफ, यांच्यासारखे लष्करशहा किंवा पूर्व युरोपातली - पूर्व जर्मनी - चेक गणराज्य ते सोवियेत संघराष्ट्र - साम्यवादी सरकारे व त्यांचे हुकुमशहा सिंहासनावरून खाली खेचले गेलेच नसते....! मला स्वतःला (कदाचित् अस्थानी असेल) लोकशाही व जनतेचा दबाव या गोष्टींवर विश्वास आहे व आपण चांगले बदल आणू शकतो. नाहीं तर संयुक्त महाराष्ट्र झालाच नसता किंवा शिवसेनेचे सरकार आलेच नसते. (त्यांनी मिळालेल्या सत्तेचा योग्य उपयोग केला नाहीं ही दुर्दैवी गोष्ट आहे.) आपल्याकडे असले नालायक पुढारी असूनही लोकशाही टिकून आहे व आपली आर्थिक घोडदौड 'नजर ना लगे' अशा वेगाने चालली आहे हे केवळ आपल्या भारतीय जनतेचे कर्तृत्व आहे. आपल्या नेत्यांना इतर कांहीं नक्कीच कळत नसेल, पण मते कशी मिळतील ही अक्कल आहे व त्यामुळे त्यांना जनतेच्या दबावाचा रट्ट्याही नक्कीच कळेल. कुणास ठाऊक? उद्या जर विनीताताईंना कुण्या चांगल्या पक्षाने तिकीट देऊन निवडून आणले तर एक क्रांतीही होऊ शकते. असो. मी तरी हे पत्ते मिळवून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

पुस्तकाची माहीती करुन दिल्याबद्दल ! पुढे असं म्हणावं लागेल की आपल्या राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणाच ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. दुसरं असं की, ह्या घटनेनंतर आपल्याकडे जी काही जनजागृती झाली ती फक्त मेणबत्या लावण्यापुरतीच होती. अजूनही आपण एकत्र होत नाही. कशावरून ह्याच मंत्र्यांनी ठरवूनच ही पदं मिळवली नसतील. आज मला राजीनामा द्यायला सांगताय. ठिक आहे. पुढच्या वर्षी मी पुन्हा खुर्चीवर बसतो आणि दुकान पुन्हा चालू करतो. पुन्हा हेच आम्ही हे केलं - ते केलं म्हणून बोंबलायला तयार. विधानभवनात जेव्हा अतिरेकी घुसतील आणि यांच्या मुसक्या आवळ्तील तेव्हाच हे वठणीवर येतील. पण प्रत्येकवेळी अतिरेकीच का? सामान्य जनता ही हे करु शकते. जेव्हा हे घडेल तोच लोकशाहीचा सुदीन असेल.

In reply to by अनिरुध्द

अनिरुद्धजी, माझ्या मूळ लेखात मीच लिहिल्याप्रमाणे इंडोनेशियातून एक वर्षानंतर नेमके नव्हेंबरच्या शेवटी सुटीवर पुण्यात येऊन दूरचित्रवाणीवरील सखोल संशोधनावर आधारित खरंच सुंदर कार्यक्रम पाहीपर्यंत माझाही असाच गैरसमज होता, पण विनीताताईंचे पुस्तक वाचल्यावर कळले कीं या वीरांनी किती विचारपूर्वक व्युहरचना केली होती जी मारिया अमलातआणू शकले तर नाहींतच, पण ती अशी अमलात आलेली नाहीं हे सांगायचे सौजन्यही (सौजन्य कसले? कर्तव्यच) त्यांनी दाखविले नाहीं. त्यामुळे अर्ध्या तासापूर्वी दिलेल्या सल्ल्याची/हुकुमाची अंमलबजावणी झाली असेलच असे गृहीत धरून हे वीर त्या रंगभवन गल्लीत शिरले. निरोप येईपर्यंत वाट पहायचीही सोय नव्हती कारण ACP (Central) श्री दाते जखमी अवस्थेत कामा इस्पितळात होते (जे सुदैवाने वाचले) व नरसंहार चालूच होता! मृत्यूनंतर स्वतःचा बचाव करू न शकणार्‍या वीरांबद्दल कांहीं-बाही बोलून त्यांचा असा अपमान करू धजणारी आपली पोलीस यंत्रणा व आपले राजकीय नेतृत्व किती हीन आणि नीच पातळीला पोचले आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे! अलीकडल्या वक्तव्यावरून असे वाटते कीं गफूरसाहेबांची सदसद्विवेकबुद्धी आता जागृत झाली आहे व ते कांहीं तरी सकारात्मक व विधायक पावलें टाकतील. पुस्तकातील कांहीं उल्लेखावरून असे वाटते कीं अशोक-जी गफूरसाहेबांच्या जवळचे होते. (अशोक-जींनी त्यांना देण्यासाठी एक आधुनिक शस्त्रांवरील पुस्तक आणले होते याचा व राहुलच्या (त्यांचा १४ वर्षाचा मुलगा) तोंडच्या "Why Gafoor uncle always sends Dadda to such situation" याचा उल्लेख पहाता असे वाटते की गफूरसाहेब व अशोक-जी यांच्यात एक खास सौहार्द्र होते व त्यापोटी त्यांची या प्रकरणात खूप मदत होईल. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

हे विनीताताई देशमुखांकडून मला आले आहे. इटॅलिक्समधील अक्षरे फक्त माझी! श्री उल्हास लाटकर हे 'अमेय प्रकाशन'चे मालक आहेत. 'अमेय प्रकाशन'नेच हे पुस्तक प्रकशित केले आहे. From: ulhas latkar Date: Thu, Dec 10, 2009 at 8:59 AM Subject: Re: To the last Bullet To: Vinita Vishwas Deshmukh great feedback.. online Book availability :http://www.slideshare.net/landmarkonthenet/to-the-last-bullet-book-by-vinita-kamate-with-vinita-deshmukh regards Ulhas (Publisher-KBK) On Thu, Dec 10, 2009 at 8:31 AM, Vinita Vishwas Deshmukh wrote: ---------- Forwarded message ---------- From: Dr.Anil Joshi Date: Wed, Dec 9, 2009 at 5:55 PM Subject: To the last Bullet To: Vinita Vishwas Deshmukh Vinitaji, Such is the force of your words that I have finished reading it before I proceed for the vacation. You & Mrs.Kamte have done a commendable job. The Cama Hospital incident was indeed very tragic & I appreciate the courage & preservence (perseverance-KBK) of Mrs. Kamte in getting to the truth. Even I was under an impression that the three officers had failed in reading the situation. I live in Pandharpur which is a part of Solapur district & am aware of Late Ashok Kamte's work in Solapur. He restored the soul to the Police Uniform by his "Law above everyone" policy. I was astonished to note the similarities between Ashokji & his grandfather. The book is very well compiled & brings out all the facets of the remarkable personality of Mr. Kamte. It is always difficult to write a first person account of a third person, but you have done it very well & it only shows how the frequencies of you two have matched! I only wish the photographs & the map of the Cama Hospital surrounding was a little bigger in size. The cover would also have been better...of course my personal opinion. Hope the book makes the system think...! I am sure we are going to read many more books from you in the future,Wishing you all the best! -- डॉक्टर अनिल जोशी ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

पोलिस संघटना या शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. पोलिस खाते असा शब्दप्रयोग उचित आहे. पोलिस ऑर्गनायझेशनाला प्रतिशब्द म्हणुन पोलिस संघटना वापरला तर तो चुकिचा ठरेल. संघटना या शब्द युनियन अशा अर्थाने वापरला जातो. शासकीय कर्मचार्‍यांच्या संघटना असतात पण पोलिसांची संघटना नाही. १९८२ साली जेव्हा असा प्रयत्न केला होता त्यावेळी वसंतदादांनी पोलिस संघटित होउ नये, गृहखात्याचा अंकुश अबाधित रहावा व संप संघटना अशा गोष्टींचा वापर होउ नये असे आदेश दिले होते. त्यावेळी असंख्य पोलिस थेट बडतर्फ झाले होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पोलिसांची संघटना करण्यास परवानगी आता दिली आहे. असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.(चुभुदेघे) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडेसाहेबांचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. पोलीस दल हा शब्दही वापरता येईल. खरं तर संघटना हा शब्द चुकीचा नाहीं पण त्याचे घाटपांडेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्या शब्दाचे दोन अर्थ होतात म्हणून तो टाळणे बरे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

हं...वाचायला पाहिजे. मी ही सोलापूरचा आहे, त्यामुळे कामटेंबद्दल विशेष आदर आहे मनात. पोलिस अधिकारी अतिरेकी हल्ल्याच्या वेळी घाबरतात याच्यापेक्षा घाबरवणारे अजून काय असू शकते? म्हणजे हे लोक नुसते corrupt नाहीत तर incompetent पण आहेत!

पुस्तक परिचय येणार अस वाटलच होत. यातुन काहीच होणार नाही हा विचार मला पटत नाही. किमान जनतेच्या माहीतीत भर पडुन दोषी लोक जनतेसमोर येतील अशी आशा करुया...

पुस्तक परिचय येणार अस वाटलच होत. यातुन काहीच होणार नाही हा विचार मला पटत नाही. किमान जनतेच्या माहीतीत भर पडुन दोषी लोक जनतेसमोर येतील अशी आशा करुया...

In reply to by वात्रट

वात्रट-जी, जीते रहो! खरच माहिती असणे हे महत्वाचे. आणखी एक किंवा दोन भाग होतील पूर्ण पुस्तकाबद्दल लिहायला. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

वाचतीये. जे काही म्हणायचय ते अनेकवेळा म्हणून झालय व बरचसं वरच्या प्रतिसादांमध्ये आहे. पुस्तक विकत घेउनच वाचीन. राज्यकर्त्यांबद्द्ल अजून काही बोलायला शब्द शिल्लक नाहीत. अनेक ठिकाणी ऐश करत पंचतारांकित आयुष्य जगताना याच राज्यकर्त्यांची मुले व नातेवाईक बरे सापडत नाहीत अश्या हल्ल्यांमध्ये? रेवती

पुस्तक लागलीच उपलब्ध होईल असे वाटत नाही.वाचायचे आहेच. उत्तम परिचय. देवकाका आणि मदनबाण यांच्या प्रतिसादाशी सहमत.

चांगली पुस्तक ओळख. वाचलेच पाहिजे. आपल्या पोलिस दलातल्या उणिवा कार्तिकेयन लिखित 'सत्यमेव जयते' ह्या राजीव गांधी हत्याकांड व शोधमोहिमेवरचे पुस्तक वाचतांनाच प्रकर्षाने जाणविल्या होत्या. अश्याप्रकारचे आणखीन एक 'हू किल्ड करकरे' असे एक पुस्तक येणार होते, ते आले का?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अश्याप्रकारचे आणखीन एक 'हू किल्ड करकरे' असे एक पुस्तक येणार होते, ते आले का? मुश्रीफ या निवृत्त पोलीस अधिकार्‍यांनी ते लिहिले आहे असे ऐकले. त्यात हिंदू दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले अशा अर्थाचा निष्कर्ष आहे असे ऐकले... वर्तमानपत्रात वाचले...... ते पुस्तक अशा प्रकारचे नसावे इतकेच म्हणतो

In reply to by भडकमकर मास्तर

ते पुस्तक आलेले आहे, मी ते पहिलेही व जकार्ताला जाताना (४ जाने) घ्यायचे असे ठरविले आहे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

आपण लिहिलेली पुस्तक ओळख वाचून लगेच वाटले पुस्तक वाचायलाच हवे. ताबडतोब विकत घेतले. म्हणजे ऑर्डर देऊन ठेवलीये. ४-५ दिवसात येईल. लगेच वाचून काढीन. पुन्हा एकदा धन्यवाद काळे काका! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

मिळवून वाचायलाच हवे. महाराष्ट्र पोलीसदलातला (तसा एकूणच भारतीय पोलीस सेवेतला) राजकारण्यांचा हस्तक्षेप इतका टोकाला पोचला आहे की काही बोलण्याची सोयच उरलेली नाही! प्रामाणिकपणाने काम करणार्‍या पोलिसांना आपल्या वाटेतून सरसकट दूर केले जाते, मग ते कोणत्याही प्रकारे असेल! करकरेंसारख्या माणसाचे जाकीट गहाळ होते?? आणि हे निर्लज्जपणे कबूल करतात सरकारी लोक??? अरे इथे पाणी मुरते आहे शंकाच नको!!! योग्य ठिकाणी योग्य तो मुखलेप लावून तोंडं बंद केली असणार आहेत - कुठे पैशाने, कुठे आयुष्यातूनच उठवण्याच्या धमकीने - अशा शंकेला पुरेपूर वाव आहे! कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा ह्यापेक्षा वेगळं काय होणार! चतुरंग

In reply to by चतुरंग

चतुरंग-जी, आपण म्हणता ते अगदी खरे आहे व विनीताताईंच्या या रहस्यस्फोटाने कांहीं चांगले घडून येवो असे मला फार वाटते. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

वाचतो आहे. नेहमीप्रमाणे उद्विग्न करणारे :-( पण बाकी काही नाही तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने चांगली चर्चा व जनजागृती झालेली उत्तम. अजुनही एक लक्षात येत नाही आहे की तिघे उच्चपदस्थ एका जीपमधे का होते? का तेही खोटेच आहे? या लोकांना बस फॅक्टर कोणी शिकवला नव्हता का? धन्यवाद काका.

In reply to by सहज

या लोकांना बस फॅक्टर कोणी शिकवला नव्हता का?>> विनीताताईंनी यावर प्रकाश टाकला आहे व तो भाग दुसर्‍या किंवा तिसर्‍या हप्त्यात वाचायला मिळेल! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

हा नकाशा पुढच्या भागात वापरला जाईल. पाहून ठेवावा. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

http://www.intelligentpune.org/IntelligentPune/index.htm पान २ वर विनिता यांचे संपादकीय आहे, त्यानंतर पान ८,९,१०,११ वर राम प्रधान समितीच्या अहवालाची थोडी पिसे काढली आहेत!

In reply to by श्रावण मोडक

मोडक-जी, धन्यवाद. मी तुम्ही पाठविलेला दुवा उघडून वर-वर वाचला. नंतर सविस्तर वाचेन. पण वर-वर पहाता बरीच पाने "टू द लास्ट बुलेट" मधलीच वाटली. प्रधान कमिटीवर त्यांनी ओढलेले ताशेरे मूळ पुस्तकातही आहेत. पण इथे कदाचित् जास्त सविस्तर असतील. सविस्तर वाचून लिहीन. सुदैवाने विनिताताई देशमुख आणि मी एकमेकांशी ई-मेलद्वारे सतत संपर्कात आहोत. माझ्या बर्‍याच शंकांना त्यांनी समर्पक उत्तरेही दिलेली आहेत, तर कांहीं ठिकाणी त्याही उत्तरे शोधत आहेत. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

In reply to by सुधीर काळे

प्रधान कमिटीवर त्यांनी ओढलेले ताशेरे मूळ पुस्तकातही आहेत. काय सांगता? माझ्या (अ)ज्ञानानुसार हा अहवाल हे पुस्तक आल्यानंतर फुटला. पण तुम्ही म्हणता तसे असेल तर, हा अहवाल त्या दोघीनीच फोडलाय की काय? छ्या, इथेही प्रसिद्धी माध्यमे उगाच त्याचे श्रेय घेताहेत वाटते!

In reply to by श्रावण मोडक

मोडक-जी, याबद्दल इतर जागीही विनीताताईंनी लिहिले आहे पण शेवटी पृष्ठ क्र. ६८ वर शेवटचे वाक्य आहे: It is surprising to note that the persons on whom the Pradhan Committee rrelied were mostly persons who were themselves interested in covering up their lapses. त्यांनी स्वत:ला साक्षीदार म्हणून बोलवावे अशी विनंती प्रधानसाहेबांना लेखी केली होती, पण Terms of Reference मध्ये तशी तरतूद नसल्याचे सांगून त्यानी या साक्षीस नकार दिला. पण तरीही बाई स्वस्थ बसल्या नाहींत! त्यानी त्याबेळचे गृहखात्याचे राज्यमंत्री जयंत पाटील यांना Terms of Reference जास्त व्यापक करायची लेखी विनंती ६ फेब.२००९ला केली पण १० महिन्यानंतरही त्यांचे उत्तर विनीताताईंना आलेले नव्हतं! आता काय बोलायचे? कुंपणच असं शेत खातंय्? ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

जर कामटे साहेबांचा दु:खद बळी गेला नसता तर पोलीस दलातील त्रुटींवर हल्ला झाला असता काय? लोकप्रियतेची लाट,सहानुभुतीची लाट,समुहउन्मादाची लाट, जनक्षोभाची लाट अशा लाटा येतात त्यावेळी कुठलेही वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे मुष्कील होते. जनमानसाला ते पटत नाही. एखादा जीवावर उदार झालेला अतिरेकी अचानक बेछुट गोळीबार त्यावेळी अनेक निष्पाप त्यात बळी जातात. अनेक अपघातात देखील ज्याच्या बाजुला नुकसान त्याच्या बाजुला न्याय जातो. चुक कोणाची हा मुद्धा गौण ठरतो गुन्हेगार , अतिरेकी यांची शस्त्रास्त्र ,दळणवळण यंत्रणा नेहमीच पोलिसांपेक्षा चार पावले पुढे असते. मुंबई वर अतिरेकी हल्ला हे देशाचे युद्ध होते. त्यात कुणाचा तरी बळी गेलाच असता. युद्धात सैनिकांचे बळी जातात. मदत वेळेवर पोहोचु शकत नाही म्हणुन जातात. कुठल्याही यंत्रणेत दोष आहेतच. जोपर्यंत त्याचा बळी कुणी जात नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा होत नाही. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यात अमेरिकन संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरली असे म्हणायचे का? पुढच्या क्षणाला काय होणार याची खात्री अशा वेळी कुणालाच नसते. असंतोषासमोर कुठलीही संरक्षण यंत्रणा अपुरीच असते. या पुस्तकाच्या निमित्ताने शासनावर एक सकारात्मक दबाव येईल अशी आशा करु यात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

वा प्रकाश-जी, सुरेख प्रतिसाद. वेळोवेळी जरूर असलेल्या ऑडिटचा मुद्दा उपस्थित होईल असा प्रतिसाद लिहिल्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. सर्व उद्योगधंद्यांची मला १००टक्के माहिती नाहीं पण उत्पादनशील कारखान्यांत ISO 9000 किंवा QS 9000 किंवा तत्सम प्रमाणपत्र मिळवावेच लागते कारण नाहीं तर मालाची विक्री करणे फारच अवघड जाते. अशा सर्व कंपन्यात ठराविक वेळापत्रकानुसार ऑडिट होते (म्हणजे सर्व परिमाणे स्वतःच घालून दिलेल्या 'आदर्शा'बरोबर तपासून पाहिली जातात) व तिथे त्रुटी आढळल्यास अशा कंपन्यांना तंबी दिली जाते व तरीही योग्य ती पावले न उचलल्यास असे प्रमाणपत्र काढूनही घेतले जाते. पूर्वी असे ऑडिट उत्पादनशील कारखान्याशी जास्त प्रमाणात निगडित होते पण हल्ली कित्येक 'सेवा' उद्योगांतही असे ऑडिट लोकप्रिय होत आहे. उदा. हवाई वहातूकवाल्या कंपन्या. हल्ली तर कांही सरकारी खातीही अशी प्रमाणपत्रे मिळवतात व ऑडिटच्या 'चरका'तून स्वतःला भरडून घेतात. हुतात्मा कामटे यांचे बलिदान वाया जाऊ नये असे वाटत असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारने "महाराष्ट्र पोलीस" व "मुंबई पोलीस" या संघटनांना/खात्यांनाही अशी प्रमाणपत्रे घ्यायला लावावी. त्याचा प्रचंड फायदा होईल व असे आत्मपरीक्षण घडवून आणण्यासाठी कुणाच्या बलिदानाची गरज भासणार नाहीं. जय हो! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

In reply to by प्रकाश घाटपांडे

जर कामटे साहेबांचा दु:खद बळी गेला नसता तर पोलीस दलातील त्रुटींवर हल्ला झाला असता काय? अतिशय योग्य मुद्दा !! जोपर्यंत त्याचा बळी कुणी जात नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा होत नाही. मंत्री -संत्रीं च्या कामाचे काय ? त्यांच्या कामाचे मोजमाप Evaluation त्यांच्यावर वर्षाव केलेल्या निधीच्या तुलने ने (Cost assessment) होते का ?? त्यांच्या प्रगति पुस्तकाचे काय ?? प्रत्येक बळी ला अपघात कसे म्हणता येईल ... पोलीस दलातील त्रुटीं ना कोण जबाबदार ?? मंत्र्याना Z - Security यंत्रणा का द्यावी जर ते त्या लायकीचेच नाहीत ?? त्यांच्या कर्तुत्वाचे मोजमाप का ठरविले जात नाही. .. Why they are not accountable ?? There is a difference between accountability and responsibility. Why Govt officials are not measuring Cost Based Accountability on each factor Of people holding responsible positions. Each action should be Billable whether it is negative or positive ईन सब पर Court-marshall होना चाहीये !! These Bloody Politicians are not worth to hold the position ... मंत्रीका खुन, खुन और पुलीस का खुन क्या पानी है ?? ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

वा वाहीदा! सुंदर प्रतिसाद. तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. मंत्र्यांचे रक्त व पोलिसांचे रक्त सारखेच महत्वाचे आहे. या निरुपयोगी नेत्यांची भुतावळ आपणच (जनतेने) निर्मिली, पण आता ती नष्ट कशी होईल? काका ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम