मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजून एक क्रियाशील आदर्श

विकास · · जनातलं, मनातलं
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू. किंबहुना दूध गोडच करू ... अर्थात ह्या "मुक्या संवादावर" राजा एकदम खुष झाला आणि एकीकडे स्वतःपुरता मर्यादीत असलेला हा पारशी समाज दुसरीकडे संपूर्ण भारतवर्षासाठी सातत्याने देतच राहिला आणि भारताला मोठे करत राहिला. आता वरील कथा एकदा दंतकथा आहे असे कदाचीत एरव्ही म्हणावेसे वाटले असते, पण लोकसत्तेतील टाटांची अशीही एक औदार्यगाथा ही बातमी वाचली आणि खरेच दुधातील साखर समजली. त्या बातमीत ताजमधील कर्मचार्‍यांनी केलेल्या कर्मचार्‍यांची माहीती आहेच, पण आजपर्यंत कधीही गाजावाजा न केलेली माहीती रतन टाटांबद्दल आहे. तेव्हढाच भाग खाली चिकटवला आहे.
सर्वसामान्य माणसांनी-कर्मचाऱ्यांनी आपल्या संस्थेसाठी, किंबहुना आपल्या देशासाठी बजावलेली ती धाडसी सेवाच होती.. नेमका तोच भाव एका कार्यक्रमात बोलताना दस्तुरखुद्द रतन टाटांच्या शब्दांतून व्यक्त झाला आणि नंतर तर तो कंपनीनं टाकलेल्या एकेका पावलातनं अभिव्यक्तही झाला.. ते म्हणाले, ‘हा उद्योग एकटय़ा टाटांचा नाही, त्यादिवशी कामावर हजर असलेल्या सर्वाच्या मिळून मालकीचा तो आहे, म्हणूनच हे घडू शकलं’.. अवघी एक दिवसाची कंत्राटी नोकरी केलेल्या, पण त्या दिवशी कामावर हजर असलेल्या प्रत्येकाला हॉटेल पुन्हा सुरू होईपर्यंतच्या काळात तो नोकरीवर असल्यासारखंच वागवलं गेलं.. नोकरीत असणाऱ्या प्रत्येकाला मदत आणि सहाय्य मिळालंच, पण रेल्वे स्थानकावर मृत्युमुखी पडलेल्या, शेजारच्या पावभाजीवाल्याच्या वा पानवाल्याच्या टपरीवर असताना मृत्युमुखी पडलेल्यांनाही टाटांनी मदत केली.. हॉटेल बंद होतं त्या काळात तर प्रत्येकाला (अंदाजे १६०० जणांना) मनीऑर्डरनं घरपोच पगार मिळाला.. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्यानं ज्यांना-ज्यांना आवश्यक होती, त्या प्रत्येकाला मानसिक सल्ल्याची मदत दिली गेली.. जखमी झालेल्या वा मृत्युमुखी पडलेल्या ८० कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन रतन टाटांनी सर्वाची भेट घेतली, विचारपूस केली.. ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुंबईबाहेर रहात होते, अशा सर्वाना विमानानं मुंबईत आणलं गेलं, त्यांची सुमारे तीन आठवडे राहण्याची व्यवस्था हॉटेल प्रेसिडेंटमध्ये करण्यात आली.. टाटांनी प्रत्येकाची समक्ष भेट घेतली.. तीन दिवस तर स्वत: रतन टाटा स्मशानाच्याच फेऱ्या मारत होते.. अवघ्या २० दिवसात या मदतकार्यासाठीचं वेगळं प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं.. टाटांचं मोठेपण असं की ज्यांचा प्रत्यक्ष टाटा उद्योगसमूहाशी काडीचाही संबंध नव्हता, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना एवढंच काय अगदी पादचाऱ्यांनाही टाटांनी मदत देऊ केली.. जवळपास सलग सहा महिने प्रत्येकाला दहा हजार रुपये टाटांकडून मिळत राहिले.. एका पदपथविक्रेत्याची चार वर्षे वयाची नात, चार गोळ्या लागल्यानं जखमी झाली.. टाटांनी तिलाही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं, लक्षावधी रुपये खर्च करून तिच्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली.. ज्यांच्या हातगाडय़ा गेल्या त्यांना टाटांनी पर्यायी गाडय़ा घेऊन दिल्य़ा.. बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील ४६ मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली.. हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येकाला टाटांनी दिलेली नुकसानभरपाईच ३६ ते ८५ लाखांच्या घरात गेली असावी.. पण त्या शिवायही त्यांच्या कुटुंबीयांची आणि त्यांचेवर अवलंबून असलेल्या सर्वाची जबाबदरी घेण्याचं, जगाच्या पाठीवर कुठेही त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं तरी त्यासाठीचा सारा खर्च उचलण्याचं, आयुष्यभरासाठी कुटुंबीयांचा वैद्यकीय खर्च करण्याचं, मृतांनी घेतलेलं सारं कर्ज सव्याज परत करण्याचं दायित्वही टाटांनी घेतलं..
आधीच्या क्रियाशील आदर्शातून सामान्यातील असामान्य वृत्ती दिसली तर या उदाहरणातून केवळ "धंदेवाईक" म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते त्यांनी ठेवलेली सामाजीक बांधिलकी आणि जबाबदारी. आता (नुसती) आशा(च) करतो इजा-बिजा-तीजा म्हणत एखाद्या राजकारणी व्यक्तीमत्वाचे पण उदाहरण वाचायला मिळेल. :-)

वाचने 5304 वाचनखूण प्रतिक्रिया 25

पाषाणभेद Sun, 12/06/2009 - 21:59
'टाटा, टाटा' :H ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

अमोल केळकर Mon, 12/07/2009 - 12:26
टाटांचे कार्य कौतुकास्पद ! फारसा गाजावाजा न करता केले हे जास्त विशेष अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ Mon, 12/07/2009 - 12:40
टाटांचे स्थान देशभरात सर्वांच्या हृदयात आहे. शक्य असूनही कधीच टाटानी गुटखा दार वगैरे उत्पादनात भाग घेतला नाही. करचुकवेगिरी केली नाही. ताज होटेलच्या कर्मचार्‍यानी त्या दिवशी प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तुसुद्धा ज्याच्या त्याना कुरीयर ने पोहोच केल्या. एका कस्टमरची लग्नाची अंगठी सुद्दा त्या पद्धतीने त्या कस्टमरला घरपोच केली होती. सामान्य कर्मचार्‍यांमध्ये ही भावना रुजवणे हे टाटा उद्योग समूह च करू जाणे. हॅट्स ऑफ....

In reply to by विजुभाऊ

मनिष Mon, 12/07/2009 - 13:05
टाटा कंपनीत कर्मचार्‍यांची जितकी काळजी घेतली जाते, तितकी इतरत्र अपवादानेच आढळते. ह्याच्या दुसर्‍या टोकाचे उदाहरण म्हणजे - अंबानी. त्यांना शक्य असूनही जमेल तितक्या वेळा नफा (फक्त) स्वतःच्या खिशात घालणे हीच मनोवृत्ती आहे असे वाटते.

In reply to by मनिष

गणपा Mon, 12/07/2009 - 13:45
विजुभौ आणि मनिष दोघांशीही सहमत. आजच्या जाहिरातिच्या युगात कुणी चार आणे जरी दान केले तरी मिडियाला हाताशी धरुन आव आणतो सोळा आण्यांचा. या पाश्वभुमीवर टाटांचे कार्य हे कलीयुगात सत्ययुगाचा अनुभव देणार आहे. हॅट्स ऑफ. -माझी खादाडी.

In reply to by विजुभाऊ

धनंजय Fri, 12/11/2009 - 19:57
टाटा भारतातील उज्ज्वल यशाची कंपनी आहे, हे खरे. आणि गेली कित्येक दशके कंपनीने नशेच्या साधनांचा व्यापार केला नाही हेसुद्धा खरे. मूळ टाटा कंपनीची संपत्ती (१८००-१९०० काळात) अफूच्या व्यापारातून आली. याबाबत आजवर मी केवळ अफवा ऐकल्या होत्या, पण सलॉन.कॉम मासिकातील लेखावरून कळले की हाँगकाँग सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रव्यवहारात टाटा कंपनीच्या अफू-व्यापाराबाबत कागदपत्रे सापडतात. इतिहासातील अफू-व्यापाराचा रतन टाटा यांच्याशी कुठलाही वैयक्तिक संबंध नाही, आणि त्यांच्या सामाजिक जाणिवेची किंमत मुळीच कमी होत नाही, हे सांगणे नलगे.

जे.पी.मॉर्गन Mon, 12/07/2009 - 13:58
टाटा समूहानी २ वर्षांपूर्वी ओरियंटल होटेल्स विरुद्ध घेतला पवित्रा ही त्यांच्या देशप्रेमाचाच दाखला होता. http://www.forbes.com/2007/12/20/orient-tata-spat-markets-equity-cx_rd_1220markets3.html परदेशात जगातल्या अव्वल कंपन्यांबरोबर तितक्याच दिमाखात झळकणारा टाटा चा लोगो पाहिला की अभिमान दुणावतो !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरय अगदी ! वरील सर्वांशी १००% सहमत ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चतुरंग Mon, 12/07/2009 - 15:56
व्यवसायातला प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी हे सगळे जेआरडीं बरोबर तिथेच थांबून राहिले की काय असे वाटत होते पण नाही हा फक्त त्या व्यक्तीचाच गुणविशेष नसून ती संपूर्ण समूहातल्या कर्मचार्‍यांची मानसिकता बनविण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे ह्याचे ही घटना द्योतक आहे. "रयतेची काळजी घ्या!" हा शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श तरी ह्यापेक्षा काय वेगळा होता? असा उद्योगसमूह भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो! रतन टाटा आणि सर्व टाटा कर्मचार्‍यांना माझा सलाम! (आनंदी)चतुरंग

दमनक Mon, 12/07/2009 - 17:16
या संपूर्ण खानदानानेच 'देशसेवे'ची टिमकी न वाजवता, स्वतःचे ढोल न बडवता भारताच्या प्रगतीस ज्याप्रकारे हातभार लावला आहे त्याला तोड नाही. टाटा लोकांचे मोठेपण केवळ त्यांची स्वतःची वादातीत सचोटी व कार्यनिष्ठा यांतच नसून हजारो कर्मचार्‍यांमध्ये ते रुजवणे यातही आहे.

jaypal Mon, 12/07/2009 - 19:51
माणुसकी चा उत्तम नमुना. रतन टाटांना मानाचा मुजरा. टाटा समुहात करीयर करण्यासाठी ईथे भेट द्या. ____________________________________________________ सर्वांचे मंगल होवो.

प्रभो Mon, 12/07/2009 - 20:42
टाटासमूहास मुजरा....आदर होताच तो वाढलाय. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सुधीर काळे Mon, 12/07/2009 - 22:02
एकाच व्यवसायात असल्यामुळे टाटा स्टीलचे लोक भेटतच असतात. इतर व्यवस्थापनांनी केलेल्या वाईट गोष्टींची चर्चा होते तेंव्हा त्यांच्या बोलण्यात "हमारे टाटामें ऐसा कभी नहीं होता है" हे वाक्य नेहमी येते. "हमारे टाटा" कंपनीच्या या "संस्कृती"ला अभिवादन. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

भानस Mon, 12/07/2009 - 23:10
मदत अशी करावी की या कानाची त्या कानालाही कळू नये असे नेहमी ऐकले आहे. टाटा समूहाचे बाबतीत हे यथार्थ लागू पडते. माननीय रतन टाटांना अभिवादन.

पारशी समाजाने आपल्या अल्पसंख्यत्वाचे कधीही भांडवल केले नाही व स्वत:ला राष्ट्रीय प्रवाहापासुन कधीही तोडून घेतले नाही. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर व चातुर्यावर स्वत:सकट आपल्या अवतीभवतीचा विकास या समाजाने घडवुन आणला आहे. उद्यमशीलतेला दिलेले लोकप्रियतेचे वलय व त्यातुन विकास हा संदेश यातुन मिळतो. लुळीपांगळी श्रीमंती व धट्टीकट्टी गरीबी या कृष्ण धवल द्वैतात अडकलेल्या समाजाला एक वेगळा आयाम टाटा उद्योग समुहाने दिला. या उद्योगसमुहातील कर्मचार्‍यांकडे काही अवांतर कौशल्ये वा गुणवत्ता असेल तर त्याला व्यवस्थापनाकडुन प्रोत्साहन दिले जाते असे ऐकुन आहे. जमशेदजी टाटांनी रोवलेली मुहुर्तमेढ भारतीय उद्योगजगताचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदण्यासारखी आहे. असो अवांतर- प्रवीण दवणे ष्टाईल प्रतिक्रिया मारली राव प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नि३ गुरुवार, 12/10/2009 - 17:32
मि नेहमिच टाटा समुहाचा कर्मचारी असल्याचे अभीमानाने सांगतो ---(Tcser)नि३.

आकडा Fri, 12/11/2009 - 22:47
वरच्या सर्व प्रतिसादांची री ओढते. टाटा हे फक्त एक आडनाव राहिले नसून टाटा ही वृत्ती झाली आहे.