ही एक १०० टक्के सत्य घटना आहे.
मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले.
मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".
हे ऐकून तो आणखीनच बिचकला.
ते लक्षात आल्यावर मी त्याला विचारलं, ""आप कहाँके हैं?"
"मैं पाकिस्तानी हूँ|" तो म्हणाला.
"कोई बात नहीं| चलो साथमें घूमते हैं|" मी म्हणालो.
तो माझ्याबरोबर चालू लागला. आधी थोडा गप्पसा होता, पण थोड्या वेळाने बोलू लागला. मूळचा पेशावरचा रहिवासी, पण तो थायलंडमध्ये शिंपीकाम करायला आला होता व क्वाला लुंपूरला व्हिसाच्या कामासाठी एक दिवस आला होता. पेशावरला एक बायको होतीच, पण त्याने थायलंडमध्ये आणखी एक लग्न केले होते व या नव्या बायकोबरोबर तो तिथे रहात होता.
"आप ऐसे कैसे कर सकते हैं?" मी विचारले.
"उसमे कोई नयी बात नहीं जी| वहाँ हम सभी लोग ऐसेही करते हैं!" तो उत्तरला.
आता काय बोलायचे म्हणून मी जरा विचारात पडलो. पण तो त्याच्या पेशावरच्या बायकोबद्दल आपणहून बोलू लागला. त्याने त्याच्या नात्यातल्याच मुलीशी लग्न केले होते. "ऐसे क्यूं" या प्रश्नाला उत्तर देतांना तो म्हणाला "यही रिवाज अच्छा है। घरमें बाहरके रिश्तेके साथ बाहरके (म्हणजेच वधूचे नातेवाईक) लोग आकर खामखाँ बात खराब कर देते हैं। राईका पर्बत बना देते हैं। इसलिये रिश्तेवालीसे शादी करनेसे घरके तमाम सवाल घरके अंदरही रहते हैं, बाहर नहीं जाते। इसलिये हम रिश्तेमेंही शादी-ब्याह करते हैं।"
मी तर हा विचार ऐकून चकितच झालो.
"मगर रिश्तेदारोंसे शादी करनेसे बच्चे ठीक नहीं पैदा हों तो?" मी विचारले.
"ऐसी कोई बात नही जी|" उत्तर. अज्ञानात केवढे सुख आहे!
मग कसे कुणास ठाऊक, पण आमचे संभाषण संततीनियमनाकडे वळले.
"अपनी अमदनीमें अगर हम बच्चोंकी परवरिश अच्छी तरहसे नहीं कर सकते तो आप फॅमिली-प्लानिंग क्यूँ नहीं करते? क्यूँ उसके खिलाफ हैं?" मी विचारले.
"अरे साहब, ऐसा करनेसे आप अगले नबीको जनम लेनेसे रोक रहे हैं ये आपने कभी सोचा है? जिसका जनम हमने रोका वो कलका बडा सायंटिस्ट हो सकता था, कोई बडा लीडर, बडा नबी हो सकता था! उसका जनम रोकना बिल्कुल गलत है!"
मी अवाक् झालो! कां कुणास ठाऊक, पण त्याच्याशी झालेले हे संभाषण व त्यातला त्याचा युक्तिवाद इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात राहिला आहे. कुटुंबनियोजन का करू नये तर आपण जो गर्भ राहू दिला नाहीं तो आईनस्टाईनचा असू शकतो किंवा नव्या संताचा, नव्या प्रेषिताचा असू शकतो हा त्याचा मुद्दा बिनतोड होता. पण अशा विचारांवर विश्वास ठेवणारा तो मला आतापर्यंत भेटलेल्या माणसांत पहिलाच व एकुलता एक माणूस होता. विचार करण्याची ही एक अनोखी रीत होती यात कांहीं शंका नाहीं.
कोणी असे विचार त्याच्या मनात बिंबविले असतील व त्यावर त्याचा कसा विश्वास बसला असेल हाही एक विचार करण्यासारखा व जास्त सखोलपणे अभ्यास करण्याजोगा विषय आहे असे आजही मला वाटते.
हळू-हळू आमच्यातले संभाषणाचे विषय संपले, अंधारही पडू लागला होता. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
पण तो पोरगेलासा भांबावलेला किडकिडीत तरुण आजही मला माझ्या मनःचक्षूपुढे दिसतो आणि त्याचे हे विचारही माझ्या लक्षात राहिले आहेत.
तुम्हाला हे वाचून काय वाटले?
वाचने
20874
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?
In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक
नाड्या
In reply to नाड्या ओढता ओढता एकमत... by भोचक
नाड्या ओढता ओढता एकमत...
In reply to हे प्रासंगिक लेखन by शशिकांत ओक