मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंत वेड्या मनाची (गझल)

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मुकी जाहली आज सारीच झाडे, जणु जाहल्या सुन्न या रानवेली जिथे भेटलो बोललो रोज होतो, रया तेथली आज सारीच गेली कधी पाखरे गायली रोज होती, तुझ्या स्वागताची किती गोड गाणी आता पाखरांचा कुठे न सुगावा, कशाने अशी पाखरे पांगलेली असे साचली या जगतात साऱ्या, तुझी आठवण अती रम्य वेडी हवी वाटते जी मनाला तरीही, उगा अंतरी या कुठे बोचलेली कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली मला सापडेना मुळी तोच धागा, सुटे काळजाची जिथे प्रश्नमाला कसा श्रावणाचा उन्हाळाच झाला, किती घालमेल मनी चाललेली आता सोबती त्या रिकाम्याच वाटा, जिथे ना निवारा नसे गारवाही दिलासा मनाला असे एक मात्र, स्मृती आपुली ती तिथे दाटलेली उडे आसमंती उगा धुळमाती, ऋतु कोणता हा मनाला कळेणा किती आज ओढ आकाशी ढगांना, कुठे जावयाची असे लागलेली कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली अजुनी या वेड्या मनी खंत माझ्या, तुझी शेवटी भेट झालीच नाही तुझ्या पावलांचे ठसे शोधताना, कडा लोचनांची ही पाणावलेली -शार्दुल हातोळकर

वाचने 3660 वाचनखूण प्रतिक्रिया 14

माहितगार 27/12/2015 - 08:02
__/\__ क्या बात है, आज मिपावर मेघदूत वाचण्याचा योग आला. रातराणीच्या अघळपघळ मध्ये ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला हे रुपक कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली या ओळीतून नव्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले. ...वाह क्या बात है! अजून येऊ द्यात

चांदणे संदीप 28/12/2015 - 19:18
मस्तच! आवडली गजल! जरा चालीत म्हणायला गेलो तर आपल्या मराठी "माउली-माउली" या गाण्याच्या चालीशी जवळीक वाटली! बघा, अजून कुणाला तसे वाटतेय का? Sandy

देशप्रेमी 13/01/2017 - 18:36
अतिशय उत्कृष्ट आशय. या गझलेचा भावार्थ खरा रसिकच जाणु शकतो!! माहितगार यांच्या प्रतिसादाशी प्रचंड सहमत. तुमच्या इतरही कविता वाचल्या, खुप छान लिहिताय!!

ज्ञानोबाचे पैजार 14/01/2017 - 11:23
काल दिवस भर सुरेश भटांच्या या ओळी मनात घर करुन बसल्या होत्या मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे? दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही आता आजचा दिवस या ओळींचा कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शार्दुल_हातोळकर 15/01/2017 - 12:23
या सर्व ओळींनी मनात कायमस्वरुपी घर केले आहे. शांत निवांत क्षणी या ओळी मनाच्या अंगणात हळुवार पावलांनी चालत येतात.

गौरी कुलकर्णी २३ 14/01/2017 - 16:40
ह्रदयाला भिडणारी भावस्पर्शी गझल...! खुप छान लयीमध्ये शब्दबद्ध केली आहे !!

शार्दुल_हातोळकर 23/01/2017 - 19:12
धन्यवाद गौरी, मदनबाण, प्रसाद. __/\__