Skip to main content

पोपट....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 03/05/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यासाठी ओले झालेले, तिचे डोळे मला पहायचे होते, उन्हात उभे राहून वैतागलेले आप्त, नाईलाजाने, माझ्यासाठी प्रार्थना करत होते, माझ्या मृत आत्म्याला चिरशांती लाभावी, म्हणून देवाला साकडे घालत होते, शेवटी कंटाळून, एका अनुभवी भटजींनी, एक जालीम उपाय काढला, मी दाद देत नाही हे पाहिल्यावर, त्यांनी एक दर्भाचा कावळा आणला, दर्भाच्या कावळ्याला नमस्कार करुन, सगळे नातलग जेवायला बसले, इकडे मात्र माझ्या पोटात, मात्र हजारो कावळे कोकलू लागले, नाईलाजाने मी त्या मोडक्या पिंडातला भात नरड्या खाली ढकलला आणि मागे न बघता, निमुट पंख ओढत, यमलोकाचा रस्ता पकडला

वाचने 11497
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by dadadarekar

सेक्युलर-ए-शबाब बनाके आये थे चार आयडी दो गाली देनेमें 'उड' गए, दो बहस में

In reply to by काळा पहाड

मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

In reply to by तुडतुडी

साधी गोष्ट! तो कावळ्याच्या रूपात तिथे आलाय पिंडाला शिवायला!

माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)