कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे
गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ||
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे
मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे
दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे
उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१|
शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने
करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने
शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने
आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२|
- संध्या