तीन इच्छा
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.
मिसळपाव